Thursday, June 11, 2026

टीच यु अ लेसन





टीच यू अ लेसन (Teach You a Lesson)

कोरियामध्ये विद्यार्थ्यांना खूपच सवलती आणि अधिकार दिले गेले आहेत. अनेक कायदे त्यांच्या बाजूने आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांवर हात उचलू शकत नाहीत किंवा त्यांच्यावर मोठ्याने ओरडूही शकत नाहीत. पालक समितीचीही शिक्षकांना सतत भीती वाटत असते, कारण पालक शिक्षकांविरुद्ध शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार करू शकतात, तसेच त्यांच्यावर खटलेही दाखल करू शकतात.

या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक शाळांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. ड्रग्जचा वापर आणि पुरवठा गुप्त मार्गाने वाढत आहे. मोठ्या शाळांमध्ये रॅगिंगचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षणमंत्री चॉई गॅंग-सिओ "एज्युकेशन राइट्स प्रोटेक्शन ब्युरो" (ERPB) या विशेष विभागाची स्थापना करतात.

या विभागाचा प्रमुख म्हणून स्पेशल फोर्सचा माजी अधिकारी ना व्हा-जीन याची निरीक्षकपदी नियुक्ती केली जाते. त्याला सहाय्यक म्हणून स्पेशल फोर्समधून आलेली हान रिम ही तरुणी असते.

शाळांमधील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी ERPB ची स्थापना करण्यात आलेली असते. या विभागाला अमर्याद अधिकार देण्यात आलेले असतात. दहा भागांच्या या मालिकेत प्रत्येक भागात वेगवेगळी प्रकरणे समोर येतात; मात्र सर्व भागांना जोडणारा एक समान धागा संपूर्ण कथेत कायम राहतो.

एका भागात रॅगिंग करणारा एक विद्यार्थी आत्महत्या करतो. त्यामागील कारणांचा शोध घेतला जातो. तर दुसऱ्या भागात, आपल्या मुलाबाबत अतिशय काळजी करणाऱ्या एका आईच्या सततच्या दबावामुळे त्या मुलाची वर्गशिक्षिका आत्महत्येचा प्रयत्न करते.

एका विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळावा म्हणून त्याची आई त्याला ड्रग्ज देऊन अभ्यास करण्यास भाग पाडते. त्याचबरोबर पालक समितीच्या अध्यक्षांना विविध भेटवस्तू देऊन त्यांना आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न करते.

एका शाळेतील हुशार आणि अव्वल क्रमांकाच्या विद्यार्थ्याने सर्वांत लोकप्रिय शिक्षकावर हात उचलल्यामुळे त्याचीच बदनामी होते. मात्र त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे सत्य उलगडत जाते.

सोशल मीडियाचा वापर करून काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांची बदनामी करतात आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतात. तरीही संबंधित विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही; उलट समाजात शिक्षकांचीच प्रतिमा खराब होते.

किशोरवयीन विद्यार्थ्यांना कायद्याकडून मिळणाऱ्या संरक्षणाचा गैरफायदा घेत काही विद्यार्थी चोरी, ड्रग्ज विक्री आणि इतर गुन्हे करतात. पकडले गेल्यावर केवळ माफी मागून ते सहज सुटतात.

या सर्व प्रकरणांचा ERPB यशस्वीपणे तपास करून त्यांची उकल करते. मात्र या विभागाला विरोध करणारे काही प्रभावशाली लोकही असतात. ते सतत ERPB विरुद्ध कारवाया करून या युनिटला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस ते या विभागाला बंद करण्यातही यशस्वी होतात; पण त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे कथेला एक वेगळेच वळण मिळते.

विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षकांची हतबलता, राजकारणी आणि उद्योगपतींचा शाळांमधील हस्तक्षेप, तसेच कायद्याच्या संरक्षणामुळे मनमानी करणारे विद्यार्थी अशा अनेक गंभीर विषयांवर ही मालिका भाष्य करते. त्यामुळे ही कथा कुठेतरी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील समस्यांशीही नाते सांगताना दिसते.

प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी आवर्जून पाहावी अशी ही उत्कृष्ट मालिका आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. 

द इनोसंट मॅन

 द इनोसंट मॅन ....जॉन ग्रिशम
अनुवाद ...संजय गडकरी 
मेहता पब्लिशिंग हाऊस
अडा हे ओक्लाहोमामधील छोटे गाव .गावातील सर्व एकमेकांना ओळखत. रॉन विल्यम्सन त्याच गावात लहानाचा मोठा झाला . तो बेसबॉलचा स्टार खेळाडू .राष्ट्रीय संघात तो निवडला जाणार याची सर्वांना खात्री होती.पण ती प्रसिद्धीच त्याच्या डोक्यात गेली. दारू ,ड्रग ,बायका यात गुरफटून त्याने आपल्या कारकीर्दीची  वाट लावली . शरीरावर आणि मनावर परिणाम होऊन तो अडाला परत आला .
तो परत येताच पुन्हा त्याचे रंगील आयुष्य सुरू झाले. डेबि कार्टर अडातील स्थानिक बारमध्ये वेट्रेस होती. एके दिवशी तिच्यावर बलात्कार होऊन खून झाला . पोलिसांनी पाच वर्षे प्रयत्न करून रॉन विल्यम्सनला अटक केली. खरे तर पोलिसांकडे  फारसे पुरावे नाहीत .त्यांनी केवळ स्थानिक खबऱ्यांच्या साक्षीने त्याला अटक केलीय आणि दोषी ठरविण्यात येऊन मृत्युदंडाची शिक्षाही फर्मावली आहे.
आपण निर्दोष आहोत हे फक्त रॉनीलाच माहीत होते . आता तो मृत्युदंडाच्या शिक्षेची पूर्तता होण्याची वाट पाहत तुरुंगात नरकयातना भोगतोय.
 एका सत्यघटनेवर आधारित अस्वस्थ करणारी कादंबरी.

Monday, June 8, 2026

spider noir

Spider noir
स्पायडर नोइर
बेन रिली वृद्ध खाजगी गुप्तहेर . छोटी छोटी प्रकरणे तो हाताळतो.एके काळी तो सैन्यात मेजर होता.फ्रान्समध्ये त्याने जर्मन हॉस्पिटलमधून आपले काही सैनिक सोडवले होते.त्या सैनिकांवर विविध प्रयोग चालू होते.त्यातीलच एक सैनिक त्याच्या हाताला चावला.बरे होताच त्याला आपल्यातील शक्तीची जाणीव झाली.तो स्पायडरमॅन बनला होता.नंतर त्याने सुपरहिरो बनून अनेकांचे प्राण वाचविले. पण त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याने हे सर्व सोडून सामान्य गुप्तहेराचे जीवन जगू लागला.
पण आता  हॉस्पिटलमधून वाचविलेल्या मित्राच्या सुपरपॉवर जागृत झाल्यात. पण शहरातील काही व्यक्ती आहेत जे ह्या सुपर हिरोला आपल्या ताब्यात ठेवू पाहतायत.  एक जर्मन डॉक्टर गेली अनेक वर्षे एका  औषधाचा शोध घेतेय जे घेतल्यावर त्यांच्यातील सुपर पॉवर नष्ट होतील.
बेन पुन्हा सुपरहिरो बनून आपल्या मित्रांना वाचवेल का ?
निकोलस केज सारखा मातब्बर अभिनेता पहिल्यांदाच या सिरीज द्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण करतोय.
ही सिरीज ब्लॅक ऍण्ड व्हाईट आणि रंगीत अश्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
सिरीज हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.

कारा

कारा

Kara

कारासामी उर्फ कारा हा हाडाचा चोर आहे. चोरी आणि घरफोडी याशिवाय त्याला दुसरे काहीच करता येत नाही. आपल्या आयुष्यातील शेवटची चोरी करण्यासाठी तो एका आमदाराच्या घरात शिरतो; पण दुर्दैवाने तो पकडला जातो.

या चोरीच्या तपासाचे श्रेय मिळवण्यासाठी डीएसपी भारतन पुढे येतो. काराकडून आपल्या मनाप्रमाणे कबुली मिळवण्यासाठी तो त्याच्यावर दबाव आणतो. मात्र, मारहाण करून कारा तेथून पळून जातो.

या घटनेला सहा महिने उलटतात. आता कारा आपल्या पत्नीसोबत एका हॉटेलमध्ये मजुरी करत असतो. त्याचे स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न असते. गावात त्याच्या वडिलांकडे आठ एकर जमीन असते; पण सोळा वर्षांचा असतानाच तो वडिलांचे पैसे चोरून घरातून पळून आलेला असतो. त्यामुळे आता पुन्हा कोणत्या तोंडाने वडिलांकडे जायचे, हा प्रश्न त्याला सतावत असतो.

तरीही, जमीन विकून त्या पैशांत हॉटेल सुरू करण्याचा विचार करून तो गावाकडे परतण्याचा निर्णय घेतो. अनेक वर्षांनी मुलाला पाहून त्याचे आई-वडील आनंदित होतात; पण वडिलांनी जमीन गहाण ठेवून कर्ज घेतल्याचे कळताच कारा निराश होतो.

काराचा खरा हेतू समजताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसतो आणि त्यातच त्यांचे निधन होते. मृत्यूपूर्वी त्यांची इच्छा असते की, आपल्या पूर्वजांच्या शेजारी त्यांचे दफन व्हावे. कारा आणि गावकरी त्यांचे दफन करण्यासाठी जातात; पण बँकेचे अधिकारी ती जमीन ताब्यात घेतल्याचे सांगून दफन करण्यास परवानगी देत नाहीत.

नाईलाजाने काराला आपल्या वडिलांचे पार्थिव सरकारी शवागृहात ठेवावे लागते. मात्र, सात दिवसांच्या आत मृतदेह नेला नाही तर त्याच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी सूचना त्याला दिली जाते.

आता वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी काराकडे फक्त सात दिवस उरलेले असतात. ज्या बँकेकडून कर्ज घेतलेले असते, त्या बँकेने अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकवलेले असते. कर्जाच्या फॉर्ममध्ये अनेक गुंतागुंतीच्या अटी असतात, ज्या शेतकऱ्यांना ना वाचता येतात, ना समजतात.

“मला फक्त घरफोडी करता येते… मग बँक लुटणे हाच एकमेव मार्ग आहे,” असे म्हणत कारा बँक लुटण्याची योजना आखतो.

पण बँक लुटणे इतके सोपे असते का?

डीसीपी भारतनला या योजनेचा सुगावा लागतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. तो पुन्हा काराच्या मागावर निघतो.

कारा आपल्या वडिलांचे कर्ज फेडून त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकेल का?

त्याच्या हातात फक्त सात दिवस आहेत.

Dhanush ने नेहमीप्रमाणे संयमित आणि प्रभावी अभिनय केला आहे. चित्रपटात फारशी हाणामारी नसली, तरी कथा वेगाने पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवते.

हा चित्रपट हिंदी भाषेत Netflix वर उपलब्ध आहे.

लेडी जल्लाद

आराचर  (मल्याळी ) ... के.आर. मीरा
लेडी जल्लाद .….रेश्मा कुलकर्णी- पाठारे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
भारतात पश्चिम बंगालमध्ये नऊ वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जतीनचंद्रला लहान मुलीवर बलात्कार आणि खुनाचा आरोप सिद्ध झाल्यावर सरकारने कोणाच्याही विरोधाला न जुमानता फाशीची शिक्षा जाहीर केली होती.
फणीभूषण ग्रद्धा मलिक सरकारी अधिकृत जल्लाद आहे.आता तो 88 वर्षाचा आहे.तो राहतोही स्मशानाच्या वाटेवर, जिथून सगळ्या अंत्ययात्रा जातात.त्याचे चहाचे दुकानही आहे.अंत्यसंस्कार झाल्यावर सगळे तिथेच चहा पितात. 
जल्लाद मलिकच्या घराण्याला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे .असे फणीभूषण  ग्रद्धा मलिक अभिमानाने सांगतो. त्याने आता पर्यंत चारशे एकावन्न जणांना फाशी दिलेय असेही सांगतो.तो हुशार आणि स्वार्थी आहे.आपल्या शिवाय सरकारला पर्याय नाही हे त्याला पक्के माहितीय म्हणूनच त्याने सरकारला वेठीस धरून काही मागण्या केल्यात.यात आपल्या मुलीला चेतना ग्रद्धा मलिकला अधिकृत जल्लादाची नेमणूक करावी.फाशीची रक्कम वाढवून देण्यात यावी .अश्या  मागण्या आहेत.
चेतना बावीस वर्षाची तरुणीतिच्या रक्तातच जल्लाद असल्याने तिला कुशलतेने गाठ मारता येते.  आपले घराणे जल्लादाचे असल्याने त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम तिने भोगले आहे .ती उत्कृष्ट जल्लाद बनेल याची खात्री तिच्या बापाला आहे.
संजीवकुमार मित्रा एका न्यूज चॅनेलचा वार्ताहर .लेडी जल्लाद चेतना मलिकचा आपल्या वाहिनीला कसा फायदा होईल याचाच विचार त्याच्या डोक्यात सतत चालू आहे.त्यासाठी त्याने चेतना आणि फणी मलिकला हाताशी धरले आहे.त्याच्या वाहिनीवर रोज चेतानाची मुलाखत चालू आहे.
ग्रद्धा मलिक कुटुंबात कित्येक शतकातील फाशी आणि जल्लादाच्या कथा आहेत.त्या संदर्भानुसार आपल्या समोर येतात .जतीनचंद्रला फाशी जाहीर  झाल्यापासून ते फाशी देईपर्यंतचा काळ या पुस्तकात लिहिला गेलाय. या  संपूर्ण पुस्तकात  मृत्यू जाणवत राहतो.तो कसा असतो याची जाणीव सतत आपल्याला वाचताना होत असते तरीही आपण ते पुस्तक हातातून सोडवत नाही.आपण ते वाचत राहतो. अंगावर काटा आणत मृत्यू अनुभवत राहतो. 
यात अनेक  पात्रे भेटतात .बहुतेक पात्रे स्वार्थी आहेत. चेतना या सर्वांना सामोरी जात आपले कर्तव्य पार पडेल का ?


Friday, May 29, 2026

शोध

शोध 
मुरलीधर खैरनार
राजहंस प्रकाशन 
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली ती पूर्ण सुरक्षित आणि अचूक योजना आखून .यावेळी त्यांच्याकडे प्रत्येक व्यापाऱ्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची आणि ठिकाणांची माहिती होती .त्यामुळे अतिशय कमी वेळात जास्त लूट मिळाली.ती लूट त्यांनी बाराशे जनावरांवर लादली आणि लुटीचे दोन भाग करून दोन मार्ग आखले. 
एक लूट ठरल्या मार्गावरून स्वराज्यात पोचली.दुसऱ्या लुटीचे जबाबदारी गोंदाजी नारो या दोन हजारी घोडदळाच्या सरदारकडे होती.त्याच्याकडे सुमारे सात हजार जनावरांच्या पाठीवर लादलेली लूट होती.ती घेऊन तो नाशिकमार्गे  स्वराज्याकडे निघाला होता. दाऊदखानाचे मुगल शिपाई सगळ्या मार्गावर त्याच्या मागावर होते. तो त्यांच्याशी लढत पुढे सरकत होता शेवटी जखमी होऊन मुघलांच्या हाती सापडला .पण शेवटपर्यंत सात हजार जनावरांवर लादलेला खजिना मुघलांना सापडला नाही.
केतकी देशपांडे ,शौनक , निनाद  फेसबुक माध्यमातून मित्र झालेले.सर्वांना इतिहासाची आवड त्यामुळे एकत्र आले .इंग्लंडला राहणारी क्लारा रेंजर त्यांची मैत्रीण.ती इतिहासात डॉक्टरेट करत होती आणि कामानिमित्त त्यांना भेटणार होती.तिचे पूर्वज एकेकाळी ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होते . त्यावेळी मुघलांनी त्यांना एका छाप्यात पकडले आणि त्यांची रवानगी औरंगाबादच्या तुरुंगात झाली .तुरुंगात त्यांना गोंदाजी भेटला.जखमी अवस्थेतील गोंदाजी फार काळ जगू शकणार नाही याची कल्पना दोघांनाही होती.मरताना गोंदाजीने एका कापडावर लिहिलेला निरोप त्यांच्या हाती दिला आणि हा तुकडा कसाही करून शिवाजी महाराजांपर्यंत  पोचवा अशी विनंती केली .दुर्दैवाने  रेंजर तो निरोप महाराजांपर्यंत पोचवू शकले नाहीत आणि ते इंग्लंडला परत गेले.
क्लाराकडे तो कापडाचा तुकडा होता आणि तो मेसेज काय आहे याची उकल तिला मित्रांना भेटून करायची आहे.
सुरतमधील एक प्रसिद्ध व्यापारी घराणेही या लुटीत संपूर्णपणे लुटल गेलंय. त्यांना आपली संपत्ती परत नकोय पण त्यातील एक महत्वाची मौल्यवान वस्तू परत हवीय.त्यासाठी त्यांनी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ती वस्तू शोधण्याची जबाबदारी दिलीय .त्या व्यक्तीला खोजनार म्हणतात.आज त्या घराण्याचा अठरावा खोजनार ती वस्तू शोधतोय.गोंदाजीने लपवलेल्या खजिन्यात ती वस्तू आहे याची खोजनारला खात्री आहे.
आबाजी स्कायलार्क कंपनीला हाताशी धरून तो खजिना शोधतायत. स्कायलार्क कंपनीचा सीइओ जयंत आबाजीला सगळी मदत देतोय.आबाजी हुशार आणि खुनशी आहेत.खजिन्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ते संपवितात. त्यांची नजर क्लारावर गेलीय.तिच्याकडे असलेला तो निरोपाचा तुकडा त्यांना हवाय आणि त्यासाठी त्यांनी क्लाराचाही खून केलाय ,त्याचा आळ केतकी ,निनाद आणि शौनकवर आलाय. मुंबई पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
काय आहे या खजिन्याचे रहस्य जे शिवाजी महाराजांपर्यंत शेवटपर्यंत पोचले नाही.मोरोपंत पिंगळे दहा वर्षे नाशिकच्या  कड्याकपारीत तो खजिना शोधत होते. 
आबाजीना काही धागेदोरे मिळाले आहेत तर शौनक आणि केतकीच्या हातात ही काही पुरावे लागले आहेत .पण खरोखरच हा खजिना अस्तित्वात आहे का ? 
असेल तर त्यापर्यंत नक्की कसे पोचायचे ? 
मुरलीधर खैरनारानी अतिशय अचूकपणे याचा शोध घेतला आहे.हा शोध वाचताना आपण पूर्णपणे त्यात गुंतून जातो.  

Friday, May 22, 2026

Kaattaan

Muthu Alias Kaattaan
मुथु उर्फ कत्तन
तामिळनाडूतील छोट्या गावातील पोलीस स्टेशन लवकरच बंद होऊन सर्व पोलिसांची बदली शहरात होणार आहे.तिथे सर्व पोलीस स्थानिक आहेत. एका हवालदाराच्या तर पाच हजार बकऱ्या आहेत. गावात काहीतरी गुन्हा व्हावा यासाठी सर्व पोलीस कामाला लागले आहेत.
त्याचवेळी एका मुलाला गावाच्या बाहेर टेकडीवर एका माणसाचे मुंडके सापडते. मुंडक्याच्या शेजारी  काही पैसेही आहेत  .जो कोणी आपले अंत्यसंस्कार करेल त्याला हे पैसे द्यावेत अशी चिट्ठी त्यात असते.पण त्याचे धड कुठेही सापडत नाही.
गावातील सर्व पोलीस यंत्रणा तपासाला लागते .मुळात त्या शीराची ओळख पटायची आहे .त्याचे धड शोधायचे आहे.
त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्नात पोलिसांचा प्रवास सुरु होतो.त्या व्यक्तीचे नाव मुथु असल्याचे कळते आणि तुकड्या तुकड्यात त्याची ओळख होत जाते. शेवटी त्या मुथुची सलग कहाणी उलगडली जाते.
कोण आहे हा मुथु ? कोणी त्याचा खून केलाय ?? त्याबद्दल फार कोणाला माहीत नाही.जे त्याला ओळखतात ते फक्त काही काळ त्याच्यासोबत राहिले आहेत .
मुथु एक रहस्य आहे . 
एक थरारक रहस्यमय तपास आपली उत्सुकता ताणून धरते .
विजय सेथुपती निर्मित ह्या सिरीजमध्ये  त्यानेच मुथुची प्रमुख भूमिका केली आहे.सिरीजचे कथानक खूप चांगले आहे .
हॉटस्टारवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे .