राख (RAAKH)
1978 साल. दिल्लीतील सुखवस्तू अरोरा कुटुंब. कुटुंबात दोन मुले आहेत—सोळा वर्षांची सुमन आणि तिचा तेरा वर्षांचा धाकटा भाऊ साहिल. आज सुमनचा नॅशनल रेडिओवर गाण्याचा कार्यक्रम असतो. ती साहिलला सोबत घेऊन रेडिओ केंद्राकडे निघते. घरी आई-वडील तिचे गाणे ऐकण्यासाठी रेडिओसमोर उत्सुकतेने बसलेले असतात; मात्र कार्यक्रमात सुमनचे गाणे प्रसारितच होत नाही. चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर येते—सुमन आणि साहिल रेडिओ केंद्रावर पोहोचलेलेच नसतात.
दोघांचाही कुठेच पत्ता लागत नसल्याने हे प्रकरण सब-इन्स्पेक्टर जयप्रकाश जाटव याच्याकडे सोपवले जाते. नुकताच सेवेत दाखल झालेला जयप्रकाश हा एका निवृत्त कॉन्स्टेबलचा मुलगा असतो. तो तपासाला सुरुवात करतो आणि काही दिवसांतच दोन्ही मुले जंगलात मृतावस्थेत आढळतात. त्यांच्या शरीरावर असंख्य वार करून अत्यंत अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आलेली असते.
याच काळात दिल्लीत फॉरेन्सिक लॅबची सुरुवात झालेली असते. या लॅबमधून मिळालेल्या पुराव्यांमुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळते.
दरम्यान, मुंबईत रज्जो आणि बाबू हे दोन सराईत गुन्हेगार घरफोड्या करत असतात. एका घरात चोरी करून ते फरार होतात. त्यांच्या मार्गात जो कोणी येतो, त्याची ते निर्दयपणे हत्या करतात. तपास पुढे सरकत असताना जयप्रकाशला या दोघांच्या गुन्ह्यांची आणि त्यांनी केलेल्या खुनांच्या मालिकेची माहिती मिळते.
सत्य शोधण्याच्या निर्धाराने जयप्रकाश आपल्या वरिष्ठांचा रोष पत्करतो. तो रज्जो आणि बाबू यांचा माग काढत मुंबईपर्यंत पोहोचतो. मात्र वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे त्याला निलंबित करण्यात येते. तरीही तो हार न मानता खुन्यांच्या शोधात राहतो आणि प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवतो.
दिल्लीत 1978 साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ही मालिका मानवी स्वभावातील क्रूरता, विकृती आणि अमानुषता यांचे भयावह दर्शन घडवते. त्याचबरोबर माणुसकी, संवेदनशीलता आणि चांगुलपणाचे पैलूही प्रभावीपणे उलगडते.
या मालिकेत अली फाजल यांनी सब-इन्स्पेक्टर जयप्रकाश जाटव यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच सोनाली बेंद्रे, अमीर बशीर, रमणदीप यादव, आकाश माखीजाआणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
प्राईम व्हिडिओवर उपलब्ध असलेली ही आठ भागांची हिंदी मालिका गुन्हेगारी तपास, थरार आणि वास्तववादी कथानक आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी निश्चितच पाहण्यासारखी आहे.