Uyir – उयीर
एसआय अजीब प्रोबेशनवर असतो. लहानपणी रेल्वेने प्रवास करताना त्याची बहीण अचानक हरवलेली असते. तिचा आजपर्यंत काहीही शोध लागलेला नसतो. बहिणीच्या हरवण्याची ही रुखरुख अजूनही अजीबच्या मनात कायम असते.
आता अजीबची एका छोट्या गावातील पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झालेली असते. एके दिवशी एका विहिरीत महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी पोलिसांना मिळते. प्रथमदर्शनी तिने आत्महत्या केली असावी, असेच सर्वांना वाटते.
नेहमीच्या प्रक्रियेनुसार पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवली जाते. मृत महिलेचे नाव शोभा असल्याचे समजते. तिला दोन मुले आणि नवरा असल्याची माहिती मिळते. पोलिस तिच्या नवऱ्याचा शोध घेतात आणि त्याच्याकडे मृतदेह सोपवतात. आपली मुले बहिणीकडे असल्याचे सांगून तो मृतदेह घेऊन जातो.
मात्र, त्यानंतर डॉक्टरांकडून धक्कादायक माहिती मिळते—शोभाने आत्महत्या केलेली नसून तिचा खून झालेला असतो!
या खुलाशामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरते. त्यातच शोभाचे नातेवाईक पुढे येतात आणि एक धक्कादायक सत्य सांगतात. राजू हा शोभाचा नवरा नाही आणि तिची मुलेही त्यांच्या बहिणीकडे नाहीत.
वरिष्ठ अधिकारी पोलिसांना चोवीस तासांच्या आत शोभाचा कथित नवरा राजू याला अटक करण्याचे आदेश देतात. पोलिस राजूचा माग काढतात आणि अखेर त्याला अटक करतात.
पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो—शोभाची मुले कुठे आहेत?
इथून एका वेगळ्या तपासाला सुरुवात होते.
पोलिसांच्या मते, खुन्याला अटक झाली म्हणजे त्यांची जबाबदारी संपली. मात्र, एसआय अजीबला या मुलांचा शोध घेणे ही आपलीही जबाबदारी वाटते. कारण त्याला स्वतःच्या बहिणीची आठवण येत असते. आपल्या बहिणीप्रमाणे या मुलांचीही अवस्था होऊ नये, यासाठी तो त्यांना शोधून काढण्याचा निर्धार करतो.
पण अजीबसमोरचे आव्हान सोपे नसते. “ही मुले सापडणारच नाहीत. अशी मुले कधीच सापडत नाहीत, असा इतिहास आहे,” असेच त्याला आजूबाजूचे लोक सांगत असतात.
मग कुठे असतील ती मुले?
अजीब त्यांना शोधून काढू शकेल का?
आणि या मुलांचा शोध घेताना अजीबच्या स्वतःच्या भूतकाळातील जखम पुन्हा उघडेल का?
सुरुवातीला साधा आणि सरळ वाटणारा खुनाचा तपास पुढे एका वेगळ्याच भावनिक पातळीवर पोहोचतो. मुलांचा शोध घेताना अजीबची स्वतःच्या हरवलेल्या बहिणीशी जोडलेली भावनिक नाळ अधिक घट्ट होत जाते आणि कथा प्रेक्षकांना अक्षरशः हेलावून टाकते.