Showing posts with label माझी मुसाफिरी. Show all posts
Showing posts with label माझी मुसाफिरी. Show all posts

Monday, September 1, 2025

लोकमान्य

लोकमान्य
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेगवेगळ्या मंडपांत तो फिरत होता. त्याच्या वेशभूषेमुळे तो इतरांच्या नजरेत लगेच भरत होता.
टिपिकल पुणेरी वेश होता त्याचा . शुभ्र पांढरे धोतर, लांबलचक सदरा, खांद्यावर उपरणे, हातात काठी, आणि डोक्यावर पुणेरी पगडी. चेहरा लक्षात राहील असा; पण जास्त भीतीदायक होती ती त्यांची करडी नजर. जाड झुपकेदार मिशा, भव्य कपाळ . सर्व काही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देत होतं.
ते अस्वस्थपणे समोर दिसेल त्या गणपती मंडपात जात होते. गणेशाच्या मूर्तीकडे बारकाईने पाहत, कधी नाराजीने काठी आपटत ते ताडताड निघून जात. त्यांच्या देहबोलीतली अस्वस्थता पाहून मंडपातील मखरात बसलेला तोही गोंधळून जात होता.
आताही ते एका मंडपातून नाराजीने बाहेर पडत होते, इतक्यात समोरून एक तरुण आला.
 "सर, काय झालं? इतक्या रागावलेल्या चेहऱ्याने बाहेर का पडताय? काही प्रॉब्लेम आहे का?"
तो मंडप एका सुप्रसिद्ध मंडळाचा होता.
 "रागावू नको तर काय करू? आत शिरूच देत नाहीत कार्यकर्ते. म्हणतात, ‘लाइन लावा’. सगळे रांगेतूनच येतात म्हणे!" ते संतापाने म्हणाले.
 "बरोबर आहे ना. नियमच आहे तो. रांग न लावली तर गोंधळ उडेल. लाखो लोक येतात इथे दर्शनाला." तरुण हसत म्हणाला. हसताना त्याचा कोपऱ्यावरचा तुटका दात उठून दिसत होता.
 "म्हणजे तुलाही बाहेर काढलंय तर ! पण मग मंडपाच्या मागून जे थेट मूर्तीच्या पायाजवळ जातात, ते कोण ?" करडी नजर रोखून त्यांनी विचारलं.
तरुण थोडा चपापला.
"मी इथला कार्यकर्ता आहे. विनायक नाव माझं. ती लोक मोठी माणसं आहेत. त्यांना रांगेत उभं करायचं कसं? त्यांचा वेळ देशासाठी महत्त्वाचा आहे," तो हळू आवाजात म्हणाला.
 "त्यांच्या घरीही गणपती बसले असतील ना? मग इथे का येतात? पाहा त्या बिचाऱ्याला .तीन तास लहान मुलाला घेऊन रांगेत उभा आहे. आता दर्शनाला येईल तर पाच सेकंदही थांबू देणार नाहीत, हात धरून बाहेर काढतील." त्यांनी गर्दीकडे बोट दाखवलं.
 "मी करतो त्याच्यासाठी काहीतरी," असं म्हणून विनायक त्या दिशेने गेला.
 "अशा किती जणांची मदत करणार तू? कित्येक स्त्रियांना ढकलून बाजूला केलं जातं, त्यासाठी काही करणार का?" पुन्हा करडी नजर रोखून त्यांनी विचारलं.
विनायक गप्प बसला.
"यासाठीच का आम्ही घरातील गणपती बाहेर काढून सार्वजनिक केला ?" ते पुटपुटत पुढे निघाले. विनायकही मागून गेला.
 "आता कुठे येतोस मागेमागे?"
 "मलाही काही काम नाही. येतो तुमच्यासोबत, लोकमान्य."
ते चमकले.
 "तू ओळखलंस मला? अजूनही माझी ओळख आहे तर!" ते हलकेसे हसले.
 "तुम्हाला कोण विसरेल, लोकमान्य! हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय, ते तुमच्यामुळेच."
 "माझ्यामुळे? मी ज्या हेतूने सुरू केला तो हेतू आता कुठे दिसतोय? मी घरातून बाहेर काढला गणपती, जनजागृतीसाठी. रात्रभर व्याख्यानं, कथाकथन, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं गुणगान,  बालगंधर्वांची नाटकं…  बाबासाहेबांची व्याख्याने काय दिवस होते ते!" लोकमान्य आठवणीत रंगले.
"बरोबर आहे, पण आता गर्दी एवढी असते की असं काही करणं अवघड आहे. शिवाय सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांचं वेड आलंय. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न आहे."
ते बोलता बोलता एका गल्लीत गेले. छोटा मंडप दिसला. शांतता होती. काही कार्यकर्ते कॅरम खेळत होते; काही झोपून मोबाईल पाहत होते. दर्शनाला कोणीच नव्हतं.
 "इथे तर विरुद्ध परिस्थिती आहे. उंदीर आरामात नैवेद्य खातोय; कुणाला पर्वा नाही! इथे कार्यक्रम करायला काय हरकत आहे? आपल्याच भागात किती होतकरू कलाकार आहेत. त्यांनाच सेलिब्रिटी बनवा! पण मनावर घ्यायला हवं ना." लोकमान्यांचा आवाज चढला.
 "जग बदलतंय, तसे उत्सवही बदलतील. पण सामाजिक कर्तव्यं विसरलेली नाहीत अजून. जमा होणारा पैसा लोककल्याणासाठी वापरला जातोय." विनायक समजावत म्हणाला.
 "खरं आहे. चला, पहाट होतेय. निघतो मी."
 "मला एखाद्या मंडपापर्यंत सोबत चला."
ते हसले.
एका मंडपाजवळ पोहोचल्यावर अचानक त्यांनी विचारलं 
 "तुला घरातून बाहेर काढून सार्वजनिक बनवलं, त्याचं दुःख नाही ना?"
विनायक थोडा चिडून म्हणाला —
 "कधी घराबाहेर काढलंत तुम्ही? तुम्ही खरंच स्वतःला लोकमान्य समजता का?"
ते पुन्हा हसले आणि वळून चालू लागले.
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विनायकाने नम्रपणे नमस्कार केला.

मंडपात शिरल्यावर उंदीर बोलला  "आता काय, रात्रीची गस्त सुरू केलीत का? कंटाळा येतो म्हणून कोणासोबतही फिरायला जाता का ?"
तो चिडून म्हणाला  "तोंड सांभाळून बोल, मूषका. लोकमान्य होते ते. आज खरंच इथे येण्याचं सार्थक झालं."
 "पण म्हणून इतकं भ्यायचं का त्यांना? मान खाली घालून किती हळू आवाजात बोलत होता, निघताना पाया पडला. शेवटी मानवच आहेत ते."

तो गंभीर होत म्हणाला " काही माणसं कर्तृत्वानं देवापेक्षाही मोठी होतात. त्यांच्या नजरेला नजर दिली की आपोआपच मान झुकते. असं सहवास लाभणं हे भाग्यच. पण त्यांच्यापासून स्वतःला लपवू शकलो नाही, हे कायम लक्षात राहील."

© श्री.किरण कृष्णा बोरकर

Sunday, August 31, 2025

वधूवर सूचक मंडळ

वधुवर सूचक मंडळ
" ह्या वर्षी अमोलचे लग्न ठरले नाही तर पुढच्या वर्षीपासून तुला घरी आणणे बंद " हातातली घंटा जोरजोरात बडवत रघुवीर कदम कडाडले .
त्यांचा  आवाज ऐकून धुप आणि अगरबत्तीचा मंद सुवास अनुभवत असलेला तो खडबडून जागा झाला तर आता लवकरच  भक्तांच्या घरी जाण्यासाठी तोंडाला फेशियल पॅक आणि  डोळ्यावर काकडीचे काप ठेवून आराम करीत असलेला उंदीरही बेडवरून पडला. 
" आयला, हा कदम पूजा करतोय की धमकी देतोय ?" थोड्या चिंतीत आवाजात त्याने आपल्या उंदराला विचारले.
" घ्या, करा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण .मग हे असेच चढून बसतात आणि काहीही नवस मागतात .पण  तुम्हाला तर सवय झालीय तथास्तु म्हणायची ' तो शेपटी आपटत  काकडीचे काप तोंडात टाकीत छद्मीपणे म्हणाला.
" अरे माझे ठीक आहे पण तू का दचकलास ? "त्याने हसत विचारले.
" का म्हणजे ? आता पुढच्या वर्षी ह्याचे घर आपल्यासाठी बंद झाले तर नैवेद्याचे काय ? प्रमिला काकू किती हौसेने दर दिवशी वेगवेगळे नैवेद्य बनवितात .एकदम डायट वाले .म्हणून आपले वजन कंट्रोलमध्ये राहते." तो चिडून नवीन काकडीचे काप डोळ्यावर  ठेवीत म्हणाला. 
" हो हो पण ते पुढच्या वर्षी ना .अजून एक वर्ष आहे आपल्या हातात .करू काहीतरी " तो सोंड हलवीत बेफिकीरपणे म्हणाला.
" म्हणजे आता तुम्ही लग्नेही जुळवणार तर ? देवा काय हे .अजून काय काय करणार तुम्ही स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी.  अंत्यसंस्कार काय केले . पोस्टमार्टेम केले .रस्त्यावरचा ट्रॅफीकही कंट्रोल केलात. तुम्ही कितीही करा आपले भक्त सुधारणार नाहीत." असे बोलून त्याने शेपटी जोरात आपटली.
" कितीही झाले तरी ते आपलेच आहेत.आज वर्षानुवर्षे आपली त्याच भक्तिभावाने सेवा करतायत .भले पद्धती बदलल्या तरी मनातील श्रद्धा तीच आहे ." तो हसत म्हणाला .
अंबादास चाळीत कोपर्यावरच्या खोलीत नुकतेच एक ऑफिस उघडले होते. विनायक वधुवर सूचक मंडळ असे नाव दिले होते .पण विनायकाचा फोटो कुठेच दिसत नव्हता. दहा बाय दहाच्या खोलीत एक तरुण टेबल वर लॅपटॉप ठेवून काम करताना दिसायचा तर माळ्यावर उंदीर बिनधास्त फिरत होता.
रघुवीर कदम त्याच रस्त्याने ऑफिसला जायचे. दोन दिवस ते फक्त नजर टाकून जात होते पण आत शिरायची हिंमत होत नव्हती .शेवटी आज धीर करून आत शिरलेच.
समोरच्या खुर्चीत बसलेला तरुण त्यांच्याकडे पाहून ओळखीचे हसला जणू काही तो त्यांचीच वाट पाहत होता .
" मी रघुवीर कदम " ते हात जोडून म्हणाले .
" मी अथर्व " समोरच्या तरुणाने उत्तर दिले.
" तुमचे लग्न करायचे आहे का ?" अथर्वने असे बोलून लॅपटॉप उघडला .
" काहीही काय ? माझा मुलगा लग्नाचा आहे .वय वर्षे सत्तावीस .बँकेत आसिस्टंट मॅनेजर आहे ." रघुवीर कदम एका झटक्यात बोलले.
" अरे सॉरी , तुम्हाला इतका मोठा मुलगा आहे हे पटत नाही " अथर्व हसत म्हणाला तसे कदम मनातून सुखावले.
" कोणी आहे का बघण्यात एखादी चांगली मुलगी " त्यांनी  हळुवारपणे  विचारले.
" आहेत ना .पण चांगल्या मुलीची तुमच्या मते व्याख्या काय ? " अथर्व लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला .
"चांगली म्हणजे  सासू सासर्याना सांभाळणारी , घरात सगळ्याचा आदर करणारी .नवऱ्याच्या संसारात हातभार लावणारी . पारंपरिक सण साजरे करणारी " कदम म्हणाले.
"म्हणजे तुम्हाला सून हवीय " अथर्व पुटपुटला.
" म्हणजे ? " कदम चिडून म्हणाले 
" आहो हल्ली बायको आणि सून असे दोन प्रकारे मुली पाहतात .बायको पाहिजे म्हणजे फक्त नवऱ्याकडे लक्ष देणारी आणि सून पाहिजे म्हणजे संपूर्ण कुटुंब सांभाळणारी . बायको फक्त नवऱ्यासोबत राहते .तिला स्वतःचे आणि नवऱ्याचे आई वडील नको .कोणाची जबाबदारी नको .आपले आणि नवऱ्याचे सुख पहायचे मजामस्ती करायची . ह्या मुली जास्त शिकलेल्या ,श्रीमंत  आणि आधुनिक परिवारातून आलेल्या असतात त्यांची नोकरी ही चांगली असते काहींचा व्यवसाय असतो . सून पाहिजे तर पदवी पर्यंत शिकलेल्या , मध्यम वर्गीय ,साधारण नोकरी करणाऱ्या ,घरात आर्थिक मदत करणाऱ्या , उपवास करणाऱ्या .नवऱ्याशी ऍडजस्ट करणाऱ्या  " अथर्व शांतपणे म्हणाला .
" हे असे असते होय हल्ली . आम्हाला आमचा मुलगा सुखी झालेला हवाय .त्यामुळे जी मिळेल ती चालेल .आम्हीच ऍडजस्ट करू " शेवटी रघुवीरमधील बाप जागा झालाच .
" ओके चला माहिती सांगा पटापट ." खिडकीत खुडबुड करणाऱ्या उंदरकडे हळूच पाहत अथर्वने लॅपटॉप जवळ ओढला.
आरती साने समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहत होती. बिल्डिंग कसली हो .साधारण तीस वर्षे जुनी तीन मजल्याची चाळच ती. तिचे वडील सरकारी खात्यात क्लार्क .ही कशीबशी ग्रॅज्युएट झाली आणि छोट्याश्या ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करते. दरवर्षी गणपती आले की घरगुती मखर बनवून विकायची . खोट्या गोष्टींचा तिला राग होता .तिच्या तिखट स्वभावामुळे कोण मुलगा लग्न  करत नाही अशी बापाची तक्रार . 
त्या दिवशी मखर बनवायचे सामान घरी घेऊन येत होती.भली मोठी सामानाची गोण घेऊन मैत्रिणीच्या मागे स्कुटरवर कशीबशी बसली आणि दोघी निघाल्या. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे रस्त्यावर बरीच गर्दी होती .संथ गतीने ट्रॅफीक पुढे सरकत होता .पाऊस आल्यामुळे रस्त्यावर ओलावा होता आणि अचानक स्कुटर घसरली . ती आणि तिची मैत्रीण दोघीही खाली कोसळल्या .आपल्या पेक्षा सामानाचे काय झाले याकडे आरतीने पाहिले लक्ष दिले आणि सामानाची अवस्था पाहून तिने खच्चून दोन शिव्या हासडल्या.  मैत्रिणीने शांतपणे एका दिशेने बोट दाखविले .एक म्हातारा स्कुटरचा धक्का लागून बाजूला बसला होता .इतके लागूनही त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत नव्हती.
" ओ बाबा ,सरळ बघून चाला ना .किती नुकसान झाले बघा .आता याची भरपाई कोण करेल ? " आरतीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला .
" मी भरेन ना .फक्त समोरच्या बँकेत मला घेऊन चला .मी पैसे देतो " ते बाबा लागलीच म्हणाले.
" चला , आता तर आरती हट्टाला पेटली. भांडण न होता नुकसानभरपाई मिळतेय यात ती खुश होती. म्हाताऱ्याचा हात धरून बँकेत शिरली .
" त्यांचे केवायसी करावे लागेल."काउंटरवरची स्त्री चेहऱ्यावर सुरकुती न आणता म्हणाली.
म्हाताऱ्याने हताशपणे आरतीकडे पाहिले.
" माझ्या खात्यात माझेच पैसे आहेत. पण तरीही माझी ओळख मलाच पटवून द्यावी लागते." म्हातारा हसत म्हणाला. "गावी जायचे आहे म्हणून पैसे काढायला आलो तर ही परिस्थिती."
" तुमचे मोठे साहेब कुठेयत " आरतीने शांतपणे  विचारले तर त्या स्त्रीने फक्त अमोल कदमकडे बोट दाखविले.
आरती निमूटपणे त्या बाबांचा हात धरून अमोलच्या केबिनमध्ये शिरली . अमोलने त्रासिक नजरेने तिच्याकडे पाहिले . 
" ह्या बाबांना पैसे हवेत " ती अमोलला म्हणाली .
" मग मी देऊ का ? " अमोलने उत्तर दिले.
" त्यांचे खाते आहे बँकेत " आता आरती चिडली. 
" मग घ्या खात्यातून काढून " अमोल ही तयार होता. 
" केवायसी करायला सांगितली आहे " अजूनही आरती शांत होती
" नियम असतात बँकेचे ते पाळावे लागतात ." अमोल उत्तरला
" आहो नाहीत पेपर त्यांच्याकडे आता ,देतील नंतर  .इतके काटेकोरपणे नियम कधीपासून पाळू लागली तुमची बँक .हे वरिष्ठ नागरिक आहेत .आता सणासुदीचे दिवस आलेत .पैश्याची गरज प्रत्येकाला भासते . थोडेफार इकडे तिकडे होते म्हणून काय पैसे द्यायचे नाहीत का ?" आरती चिडून म्हणाली.
" अरे बापरे पोरगी चिडलेली दिसते . पण तरीही सुंदर दिसते हे मान्य करावे लागेल." अमोल मनात म्हणाला .का कोण जाणे त्याला तिचे आकर्षण वाटू लागले .अमोल साधा होता .स्त्रियांशी मोजकेच बोलायचा. फारसे मित्रही नव्हते त्याचे.
" बाबा बसा,  तो त्यांना म्हणाला , तुमचे नाव "
" विनायक भोला मानस " तो म्हातारा हळुवारपणे म्हणाला
" आयला गणपती फॅमिली आहे .तुमची अमोल हसत म्हणाला "मी तुम्हाला आता पैसे देतो पण माझी अट आहे .तुमच्या सूनबाईना इथे अकाउंट काढावे लागेल " 
" ओ, मी याची कोण नाही आणि माझे लग्न झाले नाही अजून .माझ्या स्कुटरसमोर पडले आणि माझे नुकसान झाले त्यासाठी मी याना घेऊन बँकेत आले "आरती चिडून म्हणाली तरी तिच्या चेहऱ्यावर चढलेली लाली काही लपली नाही .
" तरीही अकाउंट काढावे लागेल .आता हा फॉर्म भरा कागदपत्र उद्या आणून द्या "असे म्हणत त्याने फॉर्म तिच्यासमोर ठेवला 
" माझ्याकडे पैसे नाहीत " आता तिने बचावात्मक पवित्रा घेतला .
" झिरो बॅलन्स अकाउंट काढू . "अमोल आता मागे फिरणार नव्हता.
"आहो पण ही जबरदस्ती का ? "ती चिडून म्हणाली.
" तुमची जबरदस्ती चालते आणि आम्ही विनंती करतोय ते मात्र चालत नाही .ओ बाबा उद्या कागदपत्र घेऊन या  परवा पैसे काढून घेऊन जा " अमोलने पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष वळविले.
" पोरा मला आज रात्री गावी जायचंय.देव येतक घरात." भिंतीवरच्या गणपतीकडे बोट दाखवून तो म्हातारा म्हणाला.
" बाबा तुम्हाला देव आणायची गरज काय ? तुमच्या नावातच दोन तीन देव आहेत " अमोल हसत म्हणाला .
न राहवून ती ही हसली . 
" फारच गमतीदार स्वभाव आहे तुमचा .बँकेत शोभत नाही .आरती तिरकसपणे म्हणाली. "काढा माझे अकाउंट पण पैसे कट झाले तर माझ्याशी गाठ आहे. तिने आपले बोट त्याच्याकडे रोखून सांगितले.
" हो हो , आता किती पैसे हवेत सांगा असे म्हणत खिशातून पाकीट काढले आणि सांगितलेली रक्कम  तिच्या हातात दिली." 
" हे पैसे तुम्ही का देतायत " आरतीने आश्चर्याने विचारले.
कारण त्यांची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय पैसे काढता येणार नाही म्हणून माझ्याकडचे देतोय आणि यांनाही माझ्या अकाउंटमधून काढून देतो म्हणजे तुमचे काही अडायला नको "  तो हसत म्हणाला .
"धन्यवाद साहेब " बाबा पैसे घेत म्हणाले .
" मी उद्या कागदपत्र घेऊन येते " आरती खाली मान घालून पुटपुटली.
दुसऱ्या दिवशी ती कागदपत्र घेऊन आलीच पण गणपती डेकोरेशनचे काही फोटो ही अमोलला दाखविले .
घरातल्या गणपतीसाठी त्याने एक मखर सिलेक्ट केले तसेच गावच्या गणपतीसाठी ही एक निवडले .मग चहा पीत बऱ्याच गप्पा झाल्या .हळूहळू दोघांनाही एकमेकांची संगत आवडू लागली .
गणपतीचा मखर सजविण्यासाठी ती अमोलच्या घरी आली तेव्हा सगळ्यांना तिचा स्वभाव आवडला . त्याचवेळी विनायक वधुवर सूचक मंडळाच्या अथर्वने नेमका आरती सानेचा फोटो रघुवीर कदमला दाखविला . फोटो पाहताच रघुवीर खुश झाला आणि ताबडतोब होकार कळवून टाकला.
आज तो रघुवीर कदमच्या डोक्यावर बसून घरात शिरला आणि मखर पाहून खुश झाला .
" पोरीच्या हातात जादू आहे " तो आसनावर ऐसपैस बसत पुटपुटला .
" तर , त्यासाठी काय काय करावे लागले याची कल्पना आहे ना " स्वयंपाक घरात चौकस नजरेने पाहत उंदीर ही पुटपुटला .
" यापुढे हे असेच ब्लॅकमेल करून काम करून घेणार . त्या अमोल आणि आरतीचे जुळवायला दहा दिवस आधी यावे लागले .खाण्यापिण्याचे राहण्याचे किती वांधे झाले माहितीय ना " उंदराने रागाने शेपटी आपटली.
" ते ही खरच म्हणा.  पण हे लग्न जुळवणे फारच कठीण आहे.नशीब त्या आरतीला लहानपणापासून ओळखतोय आपण .कष्ट तर तिच्या पाचवीला पुजले आहेत .अमोल ही साधा आहे म्हणा .आपल्यावर फारशी श्रद्धा नाही पण तिरस्कारही करत नाही . दोघांचे जुळले त्यात आनंदच आहे ." तो लोडाला अलगद टेकून म्हणाला पण टेकताना चेहऱ्यावरची वेदना लपवू शकला नाही .
" त्यादिवशी स्कुटरचा धक्का जरा जास्तच जोरात लागला म्हणा  पण दरवर्षी कदम काकूंचा डायट नैवेद्य खायचा असेल तर हे सहन करायलाच हवे " समोरच्या डायट मोदकाकडे आशाळभूत नजरेने पाहत उंदीर छद्मीपणे म्हणाला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Saturday, August 30, 2025

ढोलताशे

ढोल ताशे
" ह्या वर्षी गणपती आणताना ढोल ताशे हवेच नायतर गणपती आणूचोच नाय " हट्टाने पेटलेल्या आवाजात गणेश उर्फ गणू ओरडला आणि पॅकिंग करत असलेल्या उंदराच्या हातातून बॅग खाली पडली .
" याला काय अर्थ आहे मालक .हल्ली कोणही उठतो आणि धमकी देतो तुला आणणार नाही म्हणून .आपल्याला मनापासून घरी घेऊन जातायत की आपल्यावर उपकार करतायत.ते काही नाही तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करायलाच हवी" तो कपडे बाहेर फेकत म्हणाला
" मला ही असेच काहीसे वाटू लागले आहे बघ .हल्ली जरा जास्तच धमक्या मिळू लागल्यात .इतका जोर माझा आणि स्वतः चा प्रवास किती सुखकारक होईल यात दाखवायचा .अरे तो कोकणातील प्रवास खूपच त्रास देतो रे " पितांबरची घडी घालून बॅगेत भरत तो उद्गारला .
" आहो मालक , तुम्हीच याना शेफारून ठेवले .चांगले दहा दिवस घरात बसून कौटुंबिक सुट्टी साजरी करत होतो .पण लोकमान्यनी घराबाहेर काढले आणि आपल्याला जनता जनार्दन भक्तांना भेटायची सवय लागली .मग त्यांची दया येऊन मदत करा .हल्ली तुम्ही इथे मखरात असता कुठे ? बघावे तेव्हा भक्तांसाठी धावत असता .आता तर  ढोल ताशे शोधायला जाणार असाल " उंदीर भरजरी माळ गळ्यात घालून आरश्यात पाहत म्हणाला .
" आयडिया काही वाईट नाही आणि मलाही ढोल ताशे वाजवायची संधी मिळेल.नाहीतरी हल्ली काही प्रसिद्ध कलाकार ढोल ताशे वाजवतात की " तो उत्साहाने म्हणाला .
" धन्य आहे तुमची " उंदीर हात जोडून म्हणाला.
" अरे आपला घरगुती गणपती .आपल्याला ढोल ताशे परवडतील का ? सीताराम नागवेकर चिडून गणूला म्हणाले.
" काय हरकत आहे . ढोलताशे काय फक्त सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आहेत का ? मी शोधतो कोणतरी कमी बजेटमधला मिळेलच " गणू उत्साहात म्हणाला.
" आधी चार पैसे  कमवून शिक.मग हवी ती नाटक कर " संगीता काकी चिडून म्हणाल्या.
गणेश नागवेकर पदवीधर झाला पण कामात काही लक्ष नव्हते.नाक्यावर बसून मोठ्या वार्ता करायची सवय मात्र होती. 
विठोबा कीर्तिकर पूर्वी तमाशात ढोलकी वाजवायचा .तमाशा बंद झाले तसे काम कमी झाले . हल्ली कमी तिथे आम्ही या धर्तीवर निरनिराळ्या ढोलताशे पथकात  ढोल वाजवायला जायचा .दशवतारात ढोलकी  वाजवायचा .आपले काम प्रामाणिकपणे करायची सवय त्याला होती.
सण आले की त्याला खूप डिमांड असायचा .यावर्षी स्वतःचे पथक बनवावे अशी त्याची इच्छा होती. पण म्हणावी तशी माणसे सापडत नव्हती. त्यामुळे ऑर्डर ही फारश्या नव्हत्या . थोडे कर्ज काढून मोठ्या कष्टाने पथक उभे केले होते. दोन चार ऑर्डर हातात होत्या पण टीम पूर्ण झाली नव्हती. त्या दिवशी थोड्या चिंतेत टपरीवर चहा पीत बसला होता 
" काय विठोबा भाऊ ? नाराज दिसतायत ." कटींग हातात देत अण्णाने विचारले.
" अरे कर्ज घेऊन पथक काढले पण वाजवायला दोन तीन पोर कमी पडायताय .आता थोडेच दिवस राहिलेत गणपतीला .सराव कधी करणार ? दोन ऑर्डर घेऊन बसलोय ." विठोबा काळजीने म्हणाला .
" विठोबा साहेब,  या कागदावर ढोल ताशे पथकासाठी तरुण तरुणी पाहिजे असे लिहून तुमचा फोन नंबर लिहून जा .मी कागद इथे टपरीवर चिकटवतो .माझ्या रेफरन्सने आले तर कमिशन द्या " अण्णा सहज म्हणाला .
" छान कल्पना " विठोबा खुश होऊन म्हणाला .
दुसऱ्या दिवशी विठोबा टपरीवर चहा पिण्यासाठी गेला तेव्हा एक तरुण अण्णाजवळ उभा होता .विठोबा येताच अण्णाने त्याच्याकडे बोट दाखविले तसा तो तरुण विठोबाकडे आला .
" भाऊ , मला पथकात यायचे आहे .माझे नाव ओमकार पर्वते. " तो हात जोडून म्हणाला .
" तुला ढोल ताश्याचे बेसिक ज्ञान तरी आहे का ? विठोबा त्याच्याकडे थोड्या नाराजीने पाहत म्हणाला . तसे मी थोडे शिकविन तुला. पण मध्येच पळून जायचे नाही . गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि विसर्जनाला दिवसभर वाजवावे लागेल " विठोबाने आधी प्रमुख अटी सांगितल्या .
" मान्य आहे . माझा एक मित्र ही येईल वाजवायला ." कोपऱ्यात बिस्कीट खाणाऱ्या उंदरकडे पाहून तो हसत म्हणाला तसा तो उंदीर पळून गेला .
काही वेळाने गणेश ही मित्रांसोबत चहा पियाला टपरीवर आला .त्याने तो कागद वाचला आणि ताबडतोब विठोबाला फोन केला .
बाजूलाच बसलेल्या विठोबाचे त्याचा फोन उचलला .फोन केलेली व्यक्ती बाजूलाच आहे पाहून गणेश खुश झाला .
" काका माझी ऑर्डर घ्या पहिल्या दिवसाची "  गणेश खुशीत म्हणाला .
" सॉरी , आम्ही पूर्ण दिवस बुक आहोत ."ओमकार विठोबा  काही बोलायच्या आधीच उत्तरला .
" अरे बाबा ,मालक मी आहे की तू " विठोबा चिडून म्हणाला.
" धंद्याची ट्रिक आहे भाऊ , पटकन होकार द्यायचा नाही .आपल्या कामावर शंका घेतली जाते."  ओमकार विठोबाच्या कानात पुटपुटला .
" तू कार्पोरेट ऑफिसमध्ये काम कर. इथे नको ." विठोबा चिडून म्हणाला . "तो गेला तर ऑर्डर जाईल आपली " 
" ओ भाऊ , सध्या सर्वच पथक फुल आहेत .तुम्हाला माणसांची गरज आहे म्हणजे ऑर्डर नसतील म्हणून फोन केला तुम्हाला " गणेश पुन्हा हात जोडून म्हणाला.
" यावर्षी ढोल ताशे वाजवीत बाप्पा घरात आणायचा असाच निश्चय केलाय मी " गणेश छाती फुगवत म्हणाला.
" मग आमची अट आहे . " ओमकार उद्गारला 
" अट कशासाठी .तुम्ही पैसे सांगा मी देईन "गणेश उत्तरला .
" तुम्ही आमच्या ढोल पथकात सामील व्हायचे .पहिल्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी ढोल पथकात सामील होऊन ढोल ताशे वाजवायचे." ओमकार ठामपणे उद्गारला.
" च्यायला ,असे कुठे असते का ? मी तुम्हाला ऑर्डर देतोय ऍडव्हान्स देतोय तर तुम्ही मलाच कामाला लावतायत. " गणेश चिडून म्हणाला .
" हे बघ पथक हवे असेल तर आमचे ऐकावे लागेल.नाहीतर दुसरे पथक शोध " आता विठोबाही आवाज चढवून म्हणाला .
आता दुसरे कुठलेही पथक येण्यास तयार होणार नाही याची खात्री गणेशला होती म्हणून नाईलाजाने त्याने होकार दिला .
आज त्याच्या आगमनाचा दिवस होता .सीताराम नागवेकराच्या डोक्यावर बसून तो समोर ढोल ताशे वाजविणाऱ्या ओमकार आणि गणेशाकडे  पाहत हसत मान डोलवत होता .एका कोपऱ्यात उंदरासारखी बारीक मान असलेली व्यक्ती ताशा वाजवीत त्याच्याकडे रागाने पाहत होती.
अर्ध्या तासाने तो सीतारामच्या घरात शिरून मखरात बसला तेव्हा त्याच्यासमोर हात जोडून काकू उभ्या राहिल्या .
" पोराने शब्द खरा केलान हो .ढोल ताशे वाजवत बाप्पाक घरात घेऊन इलो " तिच्या चेहऱ्यावर विजेते हास्य होते.
" शेवटी तू ढोल वाजवायची इच्छा पूर्ण करून घेतलीसच .पण मला का ताशा वाजवायची शिक्षा ? मला ना तुझ्यासोबत यायची इच्छाच होत नाही हल्ली ." उंदीर चिडून शेपटी आपटत म्हणाला .
" अरे कसले भारी वाटते बघ ढोल वाजवताना .एक वेगळीच भक्तीची नशा अंगात भिनते.तरीच ते प्रसिद्ध कलाकार आपली कामे सोडून ढोल ताशे का वाजवतात याचे कारण आज कळले बघ .आज हात दुखतील थोडे रात्री मालीश करून देशील का ? " तो हसत हसत उंदराकडे पाहत म्हणाला.
 " मी फक्त वाहन आहे तुमचा आणि सरकारी नोकरावर तुम्ही काहीच कारवाई करू शकत नाही. पण तुमच्या सोबत त्या गणेशला  का अडकवले तुम्ही " स्वयंपाक घरातून येणाऱ्या प्रसादाचा सुवास घेत उंदराने विचारले.
" अरे तो मला धमकी देतो . त्याची शिक्षा त्याला मिळायला नको . काय तर म्हणे, ढोल ताशे नसतील तर बाप्पाला आणायचे नाही .वा रे वा ,इतकी वर्षे घरी येतोय तर ही तरुण पिढी मला हलक्यात घेऊ लागली .आता वाजव दहा दिवस ढोल ताशे" शांतपणे डोळे मिटत तो म्हणाला .
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Friday, August 29, 2025

विसर्जन

विसर्जन
" आहो , या वर्षी गणपती आणलाच पाहिजे का ? "कावेरी काकू डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली ." प्रतीकला जाऊन महिनाही झाला नाही ."
" प्रतीक कुठेच गेला नाही .तो आहे . काहीही झाले तरी गणपती घरी आलाच पाहिजे हीच त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्याच्या इच्छेचा मान राखायलाच हवा " गणपत नाईक ठाम स्वरात म्हणाले.
" गणपती आगमनाला आठवडा राहिलाय .तू तुझी तयारी कर. मी गणपती ठरवून येतो." असे बोलून ते बाहेर पडले.
गेला महिनाभर नाईक कुटुंब दुःखात होते. त्यांचा मुलगा प्रतीक नाईक सैन्यात सुभेदार होता .नाईक घराण्यात सैन्यात कोणीच गेले नव्हते . ते शेतकरी होते . थोडीफार जमीन होती .काही कलमे होती .त्यातच सुखी होते. गणेशोत्सव जोरात साजरा करायचे. 
प्रतीक सैन्यात गेला हे त्यांना काही रुचले नव्हते पण नंतर स्वीकारले. सैन्यात गेला तरी प्रतीक गणपती विसरला नव्हता .संपूर्ण वर्षात फक्त गणपतीसाठी तीन दिवसच सुट्टी घेऊन घरी यायचा आणि विसर्जन झाले की निघायचा.
यावर्षी त्याची पोस्टिंग काश्मीरला होती. पूर्वीसारखे काश्मिर अतिसंवेदनशील राज्य राहिले नाही .आता खूपच शांत झालेय असे फोन करून आईवडिलांना तो सांगायचा .यावर्षी नेहमीसारखा तीन दिवस घरी येईन आणि विसर्जन करून निघेन असा निरोप ही गणपत नाईकांना दिला होता.
" पोरगो जगाच्या पाठीवर खंयसर पण रावांदे , पण गणपती विसर्जनाक हजर असता. स्वतःच्या डोक्यावरून गणपती विसर्जन करायचा हक्क सोडूचा नाय " गणपत फोन ठेवत हसत म्हणाले.
त्याच रात्री गस्तीवर असताना अतिरेक्यांच्या भयानक गोळीबारात प्रतीक शाहिद झाला. पण मरताना तो साथीदाराच्या कानात काहीतरी पुटपुटला .
दुसऱ्या दिवशी गावात तिरंग्यात लपेटून प्रतीकचे शव गावात आणले आणि सरकारी इतमामाने त्याचे अंत्यसंस्कार ही झाले. कालच फोनवर बोलणारा आपला मुलगा आज शाहिद झाला याचे दुःख नाईक कुटुंबाना सहन होत नव्हते.
यावर्षी गणपती आणायचा नाही हे दोघांनीही ठरविले होते . 
" यावर्षी एक घर तर सुटले .थोडा आराम आहे आपल्याला आणि पोटालाही .तसेही त्या सुतकी घरात काय आदरातिथ्य  होणार आपले "  पलंगावर स्वतःला झोकून देत उंदीर कुत्सितपणे म्हणाला.
" अरे प्रतीक देशासाठी शाहिद झालाय.सैनिकांचा आदर करा हेच आपण शिकवतो आणि तू आराम बघतोस ? यावेळी मलाच तुझी तक्रार केली पाहिजे " तो सोंड आपटत चिडून म्हणाला .
" हे बघ पृथ्वीवरील घराघरात आपले स्थान हळूहळू कमी होणार आहे आणि आपण ग्लोबल होणार आहोत हे सत्य स्वीकार .कोकणातून चाकरमानी मुंबईत आले आणि आता मुंबईतून परदेशी जाऊ लागले .हल्ली आपणही फॉरेन ट्रिप करतोच की " उंदीर शेपटी फिरवत म्हणाला .
पण आताच  एक तरुण नाईकांच्या  दारात उभा राहिला . प्रतीकच्या लॉकरमधील काही वस्तू त्याच्या हातात होत्या .
" मी सिद्धी वर्तक . प्रतीकच्या रेजिमेंटमध्ये आहे. " तो दारातूनच म्हणाला आणि आत शिरला. 
तो आत शिरताच एक चैत्यन्याची लहर घरात शिरली असा भास कावेरी आणि गणपतला झाला.
" या काही वस्तू आहेत प्रतीकच्या . मरणापूर्वी त्या मी  तुमच्याकडे पोचवाव्या अशी त्याची इच्छा होती."असे बोलून त्याने त्या गणपतरावांच्या हाती दिल्या .
सामानात गणपतीची छोटी मूर्ती .ताईत आणि एक चिट्ठी होती. आपण शाहिद झालो तरी गणपती आणणे बंद करू नये. दरवर्षी जसा उत्सव साजरा करतो तसाच साजरा करावा असे त्या चिट्टीत लिहिले होते .
म्हणूनच कावेरी काकूंचा विरोध असला तरी गणपती आणायचा या मतावर गणपतराव ठाम होते.
दरवर्षी प्रमाणे तो गणपतरावांच्या हातावर बसून घरात शिरला तेव्हा घरातील दुःखी वातावरण ताबडतोब जाणवले त्याला . आता गणपतरावांचे हात ही थरथरतायत याचीही जाणीव झाली. कावेरी काकूनी पूजेची तयारी नेहमीसारखीच केली होती.
" यावेळी वेगवेगळ्या नैवेद्याची अपेक्षा करू नकोस " त्याने बसतानाच बाजूला उभ्या असलेल्या उंदराला खडसावले .
" तुमच्या इतका मी दगडी काळजाचा नाही " तो चिडून म्हणाला .
" मी काय केले  आता ? तुझी  नेवेद्य खाण्याची आवड बघूनच तुला सांगितले आणि यावर्षी सगळेच ऍडजस्ट कर आपण दुःखी घरात आहोत ." तो डोळे मिटून म्हणाला.
" पण प्रतीकला वाचवू शकला असता तुम्ही .गोळीबार झाला तेव्हा तुम्हीच बाजूला होता त्याच्या .जास्त नाही पण काही दिवस त्याचे मरण पुढे ढकलता आले असते तुम्हाला " उंदीर शेपटी आवळून घेत म्हणाला.
" मी देव आहे जादूगार नाही . आपल्या जगात काही नियम ठरलेले  आहेत आणि यमराजांच्या कार्यात मी ढवळाढवळ करीत नाही .मी काही नियम मोडले पण कोणाचा मृत्यू थांबवू शकत नाही .त्या सत्यवानाचा जीव परत केला त्याचे परिणाम यमराज अजूनही भोगतायत , माहितीय ना " तो आजूबाजूला नजर फिरवीत पुटपुटला .
पूजा आरती झाल्यावर एक तांब्याचा छोटा कलश गणपतरावानी मूर्तीच्या बाजूला ठेवला .तो कलश लाल कपड्याने बंद केला होता.
" आता हे काय ' उंदीर चिडून म्हणाला .या कलशामुळे त्याची जागा बदलली होती.
" प्रतीकच्या अस्थी आहेत त्या .मीच गणपतरावाना ही आयडिया दिली होती ." तो हसत म्हणाला .
" आधीच मखरात जागा कमी .आपणच कसेतरी राहतोय. मला माझी शेपटीही मनासारखी फिरवता येत नाही .त्यात तुम्ही या स्मशानातील अस्थी इथेच ठेवायची आयडिया दिली. किती विचित्र वास मारतोय."  उंदीर कुरकुरत म्हणाला .
" तोंड सांभाळून बोल . या अस्थीच्या मालकाने आपल्या देशासाठी प्राण दिलेत हे विसरू नकोस .तूच काय माझ्या दर्शनाला येणाऱ्या कोणीही ते विसरू नये म्हणून त्या अस्थी माझ्या शेजारी राहतील . ही एक श्रद्धांजली असेल त्या शहीद प्रतीकला .अरे  त्या बीडीडी चाळीत यापेक्षा ही कमी जागेत आपण राहत होतो . झोपायला जागा नसायची तेव्हा घरातील पुरुष मंडळी बाहेरच्या पॅसेजमध्ये झोपायचे तर आपल्या माखराखाली छोटी मुले झोपायची तेव्हा नाही तक्रार केलीस. " तो चिडून आपली सोंड फिरवीत म्हणाला.
" तेव्हा प्रसाद भरपूर मिळायचा " उंदीर छद्मीपणे हसत म्हणाला .
आज त्याच्या विसर्जनाचा दिवस होता.विसर्जनाच्या  दिवशी प्रतीकची खूपच आठवण नाईक कुटुंबियांना आणि गावाला येत होती .गावातील गणपती हळूहळू बाहेर पडू लागले होते .गणपतराव गणपती उचलण्यास पुढे जाणार इतक्यात दारात सिद्धी वर्तक उभा राहिला .
" काका , प्रतीकचे काही झाले  तर गणपतीचे विसर्जन मी करावे अशी त्याची इच्छा होती .म्हणून आलोय ." सिद्धी हात जोडून म्हणाला .
गणपतरावानी  किंचित हसत मान डोलावली आणि अस्थीचा कलश मखरातून बाहेर काढला .
" काका कलश मूर्तीच्या बाजूलाच ठेवा .त्याचेही विसर्जन करू . गणेशासोबत प्रतीकच्या अस्थीचे विसर्जन ही भाग्याची गोष्ट आहे आणि माझीही इच्छा आहे. " तो कलश गणपती च्या बाजूला ठेवत म्हणाला .
काही न बोलता गणपतरावानी मान डोलावली.
सिद्धीने गणपती डोक्यावर घेतला आणि नदीकडे चालू लागला .आज गावात एक वेगळेच वातावरण होते .प्रत्यक्ष गणपतीच आपल्यासोबत चालतोय असा भास सगळ्यांना होत होता .
उघड्या अंगाने डोक्यावर गणपती आणि हातात अस्थीचा कलश घेऊन सिद्धी पाण्यात शिरला तो परत आलाच नाही .
बराचवेळ वाट पाहून गणपतराव खिन्न मनाने परत फिरले तेव्हा दारातच रिकामा कलश आणि पाट ठेवलेला दिसला .
" आज स्वतःचे विसर्जन स्वतःच केलेत .चला ही हौस ही पूर्ण केलीत आणि अस्थी विसर्जनाचे पुण्यही पदरात पाडून घेतलेत " टॉवेलने डोके पुसत उंदीर कुत्सितपणे म्हणाला.
" एका  शाहिदाचे अस्थी विसर्जन करणे हे पुण्याचेच काम आहे .आपले मरण डोळ्यासमोर दिसत असताना ही पाठ न दाखवणारे हे भारतीय सैनिक आहेत आपण देव म्हणून आपले सर्व करण्यात पुण्य मानणाऱ्या ह्या मानवांसाठी थोडे पुण्य आपण केले तर  काय हरकत आहे ." आपले ओले केस पंख्यापुढे करत तो हसत म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, August 28, 2025

इको फ्रेंडली

इको फ्रेंडली
"ती मूर्ती दाखवा " अमेय पावसकर त्या सुंदर बाप्पाच्या मूर्तीकडे बोट दाखवीत म्हणाला.
"ती दहा हजार रुपयांची आहे " कुत्सितपणे मूर्तिकार म्हणाला .
" बापरे , इतकी महाग मूर्ती. आहो, मी साधी मातीची मूर्ती विचारली .पंचधातूंची नाही " अमेय नाराजीने म्हणाला .
 " साहेब , मेहनतीचे पैसे आहेत हो .वर्षातून एकदाच सण येतो आणि मूर्ती एकदाच बनविल्या जातात. त्यात यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे बंद केले आहे . सरकारनेच बंदी घातलीय . मग आता महागाई वाढली तश्या मूर्तीच्या किमती वाढणारच . "  मूर्तिकार नाराजीने म्हणाला .
" भाऊ थोडे कमी करा की, माझ्या मुलीला आवडली आहे  मूर्ती म्हणून विचारतोय " नेत्राच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे पाहत अमेय म्हणाला. नेत्रा अमेयची पंधरा वर्षाची मुलगी .आपला बाबा मनासारखी कोणतीच गोष्ट करत नाही म्हणून सतत बापावर नाराज असलेली आधुनिक कन्या होती.
" जास्तीत जास्त दोनशे रुपये कमी होतील .तेही मुलीचे नाव घेतले म्हणून " मूर्तिकार नेत्राकडे पाहत म्हणाला. 
" दोन हजार तरी कमी करा " अमेय अजिजीने म्हणाला.
 " अजिबात नाही .अजून दहा दिवस आहेत . खूप गिऱ्हाईक येतील . आदल्या दिवशी बारा हजार मागितले तर कोणीही हसत हसत देईल आणि आता हा  उत्सव वाढत जाणार आहे .सरकारने राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला मान्यता दिलीय. पुढच्या वर्षी अजून किमती वाढणार आहेत " मूर्तिकार हसत म्हणाला .
नाईलाजाने अमेय वळला .दुसरीकडे मूर्ती पाहू कदाचित स्वस्तात मिळेल असे नेत्राला समजावले . तरीही नेत्रा नाराज झालीच.
 " दरवर्षी तुझा डिमांड वाढतोच आहे .आता तर तू ऑफिशियल सरकारी पाहुणा झालास " आपली बॅग भरत उंदीर छद्मीपणे म्हणाला .
तसा तो खिन्नपणे हसला . " दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे हे खरेच आहे .सध्या भक्तीपेक्षा  लोक महोत्सव म्हणून बघतायत् . माझ्या मूर्तीचा भाव चालू आहे , त्यावर घासाघीस होतेय . पण भक्तांच्या श्रद्धेचा कोणीच विचार करत नाही .भक्त ही मला या दहा दिवसांतच शोधतात . त्यांना मला वेगवेगळ्या रुपात पहायचे असते . कठीण आहे रे आता सुट्टीत भक्तांच्या घरी जाणे.लोकांनी पर्यावरणाचा विचार करणे ही सोडून दिलंय " तो सुटकेस लॉक करून कपाटात ठेवत म्हणाला .
इथे अमेयला मात्र मनासारखी मूर्ती मिळत नव्हती .जी मूर्ती त्यांना आवडायची ती मूर्ती त्याच्या बजेटच्या बाहेर असायची . खरे तर त्याला मूर्ती महत्वाची नव्हती. देव सगळीकडे प्रत्येक मूर्तीत असतो तो घरातही असतो असे त्याचे म्हणणे पण नेत्रा उत्साही होती तिला या गोष्टी कळत नव्हत्या .ती बाजारात गणेशाची विविध रूपे पाहून हरखून गेली होती. 
" च्यायला , पुढच्या वर्षी गणपती आणायला नकोच.पूर्ण पगार या उत्सवात जातो आणि महिना अखेर मित्रांपुढे हात पसरावे लागतात . काय फायदा या उत्सवाचा . गावी जायचे म्हटले तरी अजून रस्ते सुधारले नाहीत . पूर्ण दिवस प्रवासात जातो . ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही मग उभे राहायला मिळाले तरी नशीब .रोज कामावर जाताना कोपर्यावरच्या गणेश मंदिरात हात जोडू , तरी परवडेल आपल्याला .नकोच तो गणपती .तीन वर्षे झाली अजून इन्क्रीमेंट नाही आणि ह्याच्या किमती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढतायत . अमेय मनात म्हणाला .
हे ऐकून उंदराने आपली बॅग उघडून सगळे कपडे पुन्हा कपाटात ठेवले आणि त्यानेही कपाटातून बॅग काढून आपले पितांबर पुन्हा बाहेर हँगरला लटकविले.
" हा खरच आपल्याला  घरी नेणार नाही याची खात्री तुलाही पटलेली दिसतेय ? मालक दरवर्षी आपली सुट्टी कठीण होत जाणार आहे . तसेही भारतात पर्यटन बजेट खूप वाढलंय. पुढे  दहा दिवसाचे पॅकेज आपल्यालाही परवडणार नाही. मी आजच आपल्या वडिलांकडे अधिकृत निवेदन देतो." उंदीर शेपटी फिरवत म्हणाला. तो काहीच न बोलता डोळे मिटून शांतपणे विचार करीत बसला.
थोड्या उदास मनस्थितीत अमेय घरी निघाला . नेत्रा तर रडवेली झाली होती. तिला  कसे समजवायचे याचाच विचार तो करत होता .
रस्त्याच्या कोपऱ्यात तो हातात काही कागद घेऊन उभा होता .रस्त्यातील येणाऱ्या जाणाऱ्यांना तो कागद देत होता .अमेयच्या हातात ही कागद दिला आणि प्रसन्नपणे हसला. त्याचे हास्य खूपच निरागस आणि आश्वासक होते.हसताना त्याचा कोपऱ्यातील तुटलेला दात दिसत होता पण तो त्याच्या व्यक्तिमत्वात भरच टाकीत होता.
" मी बल्लाळ प्रभुणे , पर्यावरणपूरक अर्थात इको फ्रेंडली गणपती कसे बनवायचे याचा एक दिवसाचा कोर्स घेतो .दोनशे रुपये फक्त. तुम्ही एका दिवसात टाकाऊ वस्तू  पर्यावरणाला हानी न करणाऱ्या वस्तू वापरून गणेश मूर्ती कशी बनवायची ते शिकाल आणि घरीच मूर्ती बनवू शकाल " तो हसत म्हणाला .
" वेडा आहेस का ? मूर्तिकार एका गणपतीचे दहा हजार घेतो आणि तू दोनशे रुपयात शिकवणार ." अमेय हसत म्हणाला .
"साहेब एकदा ट्रायल तरी घ्या आणि तुमच्या ह्या छोट्या मुलीला आवडेल मूर्ती बनवायला .चला तुम्ही दोघे दोनशे रुपयात शिका .छोटीला फ्री ." तो नेत्राच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला .
" पप्पा काय हरकत आहे , तुम्ही दहा हजारही देणार नाही आणि दोनशे रुपयात शिकणारही नाही .मग कसा साजरा करणार आपण गणेशोत्सव ?" नेत्रा गाल फुगवत म्हणाली .
" ठीक आहे .उगाच गाल फुगवू नकोस .शिकूया आपण " खिशातून दोनशे रुपये काढीत अमेय म्हणला.
" उद्या सकाळी दहा वाजता तुमच्या घरी येतो. मोबाईल नंबर द्या " बल्लाळ हसत म्हणाला.
" काय माझ्या घरी येऊन शिकवणार ?" अमेय आश्चर्याने म्हणाला .
" हो ,तुमचे घर ,  पाट पाहून मूर्ती कशी, किती उंचीची बनवायची ते शिकविन मी . त्यासाठी घर पाहायला नको ? आणि मी शिकवताना व्हिडिओ बनवून ठेवा म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको . माझे कोणतेही चॅनल नाही आणि यू टूब ही नाही " बल्लाळ पुन्हा हसत म्हणाला आणि कोपऱ्यावर कागद खाणाऱ्या उंदरांना हाकलत निघून गेला.
" पप्पा हा आपल्याला चुना तर लावून गेला नाही ना " नेत्रा संशयाने विचारले.
" कसली ही भाषा ग तुझी. दहा हजार जाण्यापेक्षा दोनशे गेलेले बरे आणि विश्वासावर जग चालते ग .आपण ठेवू विश्वास त्याच्यावर " असे  बोलत ते घरात शिरले.
दुसऱ्या दिवशी बरोबर दहा वाजता दारावर बेल वाजली .अमेयने कोण आले असेल ? असा विचार करत दरवाजा उघडला तर समोर बल्लाळ उभा.
" काय साहेब विसरलात का ? आपले ट्रेनिंग सुरू करायचे आहे .चला पटापट तयारी करा .मुलीलाही बोलवा " बल्लाळ घाई करत म्हणाला.
पटापट तयारी करून दोघेही ट्रेनिंगला बसले.बाजूलाच मोबाईल ठेवून शूटिंग चालू होते.त्याने  वर्तमानपत्र ,टाकाऊ नाशवंत वस्तू गोळा करून आणल्या होत्या .त्यापासून आपल्याला पाहिजे तशी मूर्ती कशी बनवता येईल याचे बेसिक ट्रेनिंग दोघांना दिले.नेत्राला तर हा आपल्या शाळेतील प्रोजेक्ट चालू आहे असा भास होत होता .चार तासात त्याने मूर्ती कशी बनवायची ,रंग कसा वापरायचा याचे सुंदर प्रात्यक्षिक दाखविले.
" चला उद्यापासून तुम्ही मूर्ती बनवायला सुरवात करा .हीच मूर्ती बनवा ना " खिशातून मोबाईल काढत त्याने गणपतीच्या मूर्तीचा फोटो दाखविला .
फोटो पाहताच नेत्रा आणि अमेय आश्चर्यचकित झाले.हीच मूर्ती त्याना दहा हजार रुपये सांगितली होती.
" साहेब , मूर्ती तुमच्या मनातून घडते .जितकी भक्ती खरी तितकी मूर्ती सुंदर " बल्लाळ बोलून निघून गेला.
दुसऱ्या दिवशीपासून दोघांनी घरीच मूर्ती बनविण्यास सुरवात केली. काही अडले तर दोघेही व्हिडिओचा आधार घेत होते.
गणेशाच्या आगमनाआधी त्यांची मूर्ती तयार झाली .मूर्ती बनवताना त्यांना एक वेगळीच अनुभूती येत होती .प्रत्यक्षात गणपतीचं आपल्या हातून घडतोय ही भावनाच किती सुखद होती . घरचेही त्यांची मेहनत पाहून आनंदात होते. हे घडत असताना नेत्रा आणि अमेय या पितापुत्रीत एक अनोखे नाते तयार होत होते .दोघांमध्ये चांगला संवाद घडत होता तर दोघेही एकमेकांच्या मताचा आदर करीत होते.
 आज गणेश चतुर्थी . तो अमेयच्या हातातून मखरात येऊन बसला .
" गमाचा वास अजून गेला नाही . शेपटीही चिकट लागतेय " उंदीर नाक मुरडत शेपटी फिरविण्याचा प्रयत्न करीत म्हणाला .
" त्यांच्या मेहनतीची कदर कर.आयते खाऊन आणि उत्तम सेवा  घेऊन तुला माज चढलाय .आता माझाही हात थोडा तिरका झालाय आणि सोंड ही मनासारखी फिरवता येत नाही पण मी तक्रार करतोय का ? कारण त्यांनी मनापासून मला घडवलय. इतकेच नव्हे दोघेही एकमेकांना समजू लागलेत .पुढच्यावर्षी यापेक्षा जास्त प्रगती करतील .अरे हेच तर आपण इथे येण्याचे कारण आहे .विस्कटलेली घडी जोडण्यासाठी , एकमेकांशी चांगले संबंध जोडण्यासाठी आपण येतो .आणि कितीही झाले तरी नैवेद्यात त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही हे तुझ्यासाठी महत्वाचे आहे नाही का ?? समोरच्या ड्रायफ्रुट मोदकाकडे बोट दाखवीत तो हसून म्हणाला .
ही मूर्ती आपल्याला साधारण बल्लाळ सारखी का दिसते याचाच विचार पूजा करताना अमेय करीत होता .
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Wednesday, August 27, 2025

आंदोलन

आंदोलन
रामभाऊ मोहिते निराश मनाने कोकणात जाणाऱ्या गाडीत शिरले. खूप मोठ्या आशेने ते मुंबईत आले होते.
गावातल्या काशिनाथ बिर्जेचा नातू मुंबईत नगरसेवक होता. त्याच्या पक्षाला कोकणाचा आणि मराठीचा अभिमान वाटायचा. जेव्हा कधी गावी यायचा तेव्हा हमखास रामभाऊंच्या घरी यायचा .गावातील समस्यांवर चर्चा करायचा .जमतील ती छोटी मोठी कामे करून जायचा .कधी काही अडचण आली की हक्काने मुंबईत येऊन भेटा असे सांगून जायचा . 
अर्थात आजपर्यंत तशी वेळ रामभाऊंवर आली नव्हती म्हणा आणि मुंबई गोवा महामार्ग हा फक्त रामभाऊंचा नव्हे तर संपूर्ण कोकणचा प्रॉब्लेम होता त्यामुळे रामभाऊ त्याच्या वाटेल कधी गेले नाहीत.
पण यावेळी गावातील एक दोन रस्त्यांची हालत खूपच खराब झाली होती.  तुकाराम परबाची सून तर त्यादिवशी रस्त्यातच बाळंत होणार होती .नशीब जनार्दन खोताची बॉडी घेऊन अँबुलन्स गावात शिरली आणि त्याच अँबुलन्समध्ये खोताच्या बॉडीशेजारीच तिला झोपवून हॉस्पिटलमध्ये नेले. 
जनार्दन खोताची कृपा म्हणून तुकारामाची सून व्यवस्थित बाळंत झाली आणि पोरगा जन्माला आला.आता पोरगा झाला त्याचा आनंद साजरा करायचा की जनार्दन खोत गेला त्याचे दुःख करायचे हा प्रश्न बर्याचजणांना पडला होता पण रामभाऊना मात्र रस्ता कधी चांगला होणार हाच प्रश्न सतावत राहणार होता.
काशिनाथ बिर्जेच्या नातवाने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिले होते पण मुले शाळेत जातात की नाही याकडे लक्ष दिले नव्हते.पावसाने रस्ता धुवून गेला होता.चालताना दोन तीन विद्यार्थी तरी चिखलात घसरून पडत होते. तर बऱ्याच जणांच्या पायाला भेगा पडल्या होत्या .परवाच्या पावसात तर रस्त्यावर इतके पाणी साचले होते की कुशाबा कोळीने आपली होडी बाहेर काढून मुलांना शाळेत पोचविले होते. 
तेव्हा मात्र रामभाऊ संतापले होते. ग्रामपंचायत , तालुक्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस अश्या अनेक ठिकाणी अर्ज विनंत्या करून झाल्या .सर्व ठिकाणाहून काम होईल असे आश्वासन दिले गेले होते . पण कामाला सुरुवात कधी होणार हे कोण सांगू शकले नाहीत.
शेवटी ते काशिनाथच्या नातवाला मुंबईत भेटायला आले. रामभाऊ आले म्हटल्यावर भेट ताबडतोब झालीच .
पण आता मुंबईत भाषेच्या मुद्द्याने जोर धरला असून माझी सगळी ताकद तिथेच लागली असल्याने पाऊस गेला की तुमचे काम होईल असे आश्वासन त्यांना मिळाले .शिवाय सरकारने महिलांसाठी नवीन योजना सुरू केलीय त्याचा लाभ घेण्यासाठी जी काय मदत हवीय ती ताबडतोब देण्याचा  शब्द  दिला.
निराश मनाने रामभाऊ तसेच ट्रेनमध्ये बसले.गणेशोत्सव जवळ आल्यामुळे चाकरमान्यांची कोकणात जाण्याची लगबग चालू होती.ट्रेन तर नेहमीसारखी भरलेली होती. रामभाऊ आरक्षण असलेल्या बोगीत चढणार नव्हतेच कारण ते त्यांच्या तत्वात बसत नव्हते. निमूटपणे जनरल डब्यात शिरून एका कोपऱ्यात उभे राहिले.
"ओ भाऊ ," बाजूच्या सीट वरून कोणीतरी हाक मारली आणि रामभाऊ चमकले. दचकून त्यांनी पाहिले तर खिडकीजवळ एक तरुण त्यांच्याकडे पाहून हात हलवत होता आणि जवळ बोलवत होता.
ते ओळखीचा असेल या आशेने जवळ गेले तसा तो हसला .त्याचे हास्य पाहून रामभाऊ थोडावेळ का होईना आपले दुःख विसरले.
" या रामभाऊ ,बसा " त्याने सरकून जागा बनवली.
" कोणतरी बसले असेल ,मी उभा राहतो थोडा वेळ " रामभाऊ संकोचून म्हणाले.
" आहो मीच जागा अडवून ठेवली होती .कोणतरी ओळखीचा भेटतोच याचा अनुभव आहे मला " तो तरुण हसत म्हणाला .हसताना त्याचा कोपऱ्यातील तुटलेला दात स्पष्ट दिसत होता पण तो त्याला शोभून दिसत होता .
" पण मी तुला ओळखले नाही " रामभाऊनी मनातील प्रश्न विचारलाच .
मी हेरंब भोसले , शंकर भोसलेचा भाचा. मुंबईत असतो .मधल्या आळीतील विहिरीशेजारचे घर .काय भाऊ गणपतीला दररोज आरतीला येतो मी आणि काकूंच्या हातचा प्रसाद खाऊनच निघतो." तो थोड्या आश्चर्याने म्हणाला.
" असे होय तरीच म्हटलंय ओळखीचा चेहरा दिसतोय ," रामभाऊ खुशीत येऊन आरामात बसत म्हणाले.
" मुंबई कसले काम काढले ? हेरंबने हळूच विचारले तसे रामभाऊनी सगळी कथा त्याला ऐकवली.सांगताना ही त्यांचा उर भरून येत होता.
" रामभाऊ ,तुमची लढाई तुम्हीच लढा .दुसरे कोण तुमचे काम करणार नाही .रस्ते , वैद्यकीय उपचार , शिक्षण याबाबतीत आपण खूपच मागे आहोत.पण मंदिरे , धर्म , महिला अत्याचार , कायदे / नियम न पाळणे. एकमेकांवर चुकांचे खापर फोडणे याबाबतीत आपण खूप पुढे आहोत." हेरंब हसत म्हणाला.
" मग आपण काहीच करायचे नाही का ? " रामभाऊ हताशपणे उद्गारले .
" आंदोलन करायचे ,जनजागृती करायची.लोकमान्य टिळकांनी हेच शिकवलंय की आपल्याला . हात धरून त्यांनी गणपतीला वाडीत उभे केले .सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून जनजागृती केली .आताही तेच करायचे .तुम्ही आंदोलन करा " हेरंब हसत म्हणाला .
" कायतरी काय .ह्या वयात रस्त्यावर बॅनर घेऊन बसू .लोक वेडे समजतील मला .आणि आता गणपतीचे दिवस आलेत , सगळे सुट्टीवर कोण लक्ष देईल माझ्याकडे ."रामभाऊ हादरून म्हणाले.
" बघा शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारी हे म्हणतात ते खरे आहे .तुम्हाला वाटते ना काहीतरी चांगले व्हावे मग सुरवात करा . आज नाही तर उद्या काहीतरी निकाल लागेल. " हेरंब त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला.
त्याचा हात पाठीवर पडताच रामभाऊंच्या शरीरात एक अनामिक ऊर्जा निर्माण झाली .
सकाळी घरी जाताच त्यांनी आंघोळ केली . प्रसन्न मुद्रेने गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभे राहिले काहीतरी पुटपुटले आणि हातात पाण्याची बाटली ,काखेत चटई मारून बाहेर पडले. 
वाटेत एका पुठ्ठयावर चांगला रस्ता आमचा हक्क असे रंगवून घेऊन तो काठीवर उभा करून त्या रस्त्याच्या कोपऱ्यात उभे राहिले.जमिनीला मनोभावे पाया पडून त्यांनी झाडाखाली चटई टाकली .तो बोर्ड जमिनीत घट्ट रोवला आणि मांडी घालून बसले.
येणारे जाणारे त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते .हळूहळू ही बातमी गावभर झाली .रामभाऊंच्या घरातही ही बातमी जायला वेळ लागला नाही .काकूंच्या कानावर जाताच ती किंचित हसली .पोरगा गणपतीच्या मखराची तयारी करत होता त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि हातातील काम चालू ठेवले.
दुपारी काकूंनी जेवणाचा डबा तयार केला . तांब्यात चहा घेतली आणि सरळ रामभाऊंच्या शेजारी येऊन बसली. दोघेही शांतपणे जेवले ,चहा प्यायले आणि काळोख पडताच उठून घरी आले. घरात नेहमीसारखे वातावरण होते.पण पारावर रामभाऊंच्या आंदोलनाची चर्चा रंगली होती. 
दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार. यावेळी रामभाऊच्या मुलीला सुट्टी पडली होती म्हणून तीही चटईवर बसली होती. दुपारी मुलाने थोडा मोठा बॅनर रंगवून आणून दिला .
तिसऱ्या दिवशी मात्र लोक तिथे थांबून चौकशी करू लागले. पोलिसांनीही त्यांना घरी जाण्याची विनंती केली पण रामभाऊ शांत होते. 
उद्या गणेश चतुर्थी .गणपतीची पूजा करण्यासाठी रामभाऊ आंदोलन स्थगित करतील असे सगळ्यांना वाटत होते पण कसले काय .सकाळीच रामभाऊ पत्नीसह आंदोलनाच्या ठिकाणी हजर होते.
" रामभाऊ यावर्षी गणपती नाय काय ? " कोणीतरी जाताजाता विचारलेच .
" आहे ना पण त्यासाठी हे काम का सोडायचे .मुलगा मोठा झालाय तो बघेलच त्याच्याकडे आणि  त्यालाही कळूदे की यावर्षी रामभाऊ का दिसत नाही ते " ते  वर पाहत हसून म्हणाले.
" खरच की यावर्षी तुम्ही दिसला नाहीत आणि तुम्ही इथे आहात असे कळले म्हणून इथेच भेटायला आलो " एक ओळखीचा हसरा आवाज रामभाऊंच्या कानी पडला आणि त्यानी मान वळवली .
त्याच्या मागे हेरंब हसत उभा होता .
भाऊ गणपतीच्या दर्शनाला घरात शिरलो पण तुम्ही आणि काकू दिसला नाहीत आणि तुम्ही इथे आंदोलन करताय असे कळले मग इथेच आलो तुम्हाला भेटायला " हेरंब त्यांच्या बाजूला बसून बॅनर हातात घेत म्हणाला .
" म्हणजे तू पण आमच्यात सामील होणार काय " रामभाऊनी कौतुकाने विचारले .
" होय तर ." जवळ येणाऱ्या उंदराला हाताने हुसकावीत तो हसत म्हणाला .
आता तर रामभाऊंच्या घरी रात्रीच गणपतीची पूजा आणि आरती होत होती .
हळूहळू गावात चलबिचल सुरू झाली.सुट्टीत शाळकरी मुले गणवेश घालून रामभाऊंच्या शेजारी बसू लागली .तर वृद्धही तिथे बसू लागले.
स्थानिक पत्रकाराने ही बातमी पेपरात छापली .तालुक्यातील केबल टीव्हीने त्यांची मुलाखत प्रसारित केली.रामभाऊच्या घरात गणपती एकटाच मखरात बसलेला दाखविला गेला. कलेक्टर कार्यालयात विचारणा होऊ लागली. ग्रामसेवक स्थानिक नेते तिथे येऊ लागले. मुंबईच्या प्रसिद्ध गणेशोत्सवात ही बातमी आली आणि त्यांनीही पत्रक काढून रामभाऊंना पाठिंबा दर्शविला तेव्हा प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनलने ही बातमी राज्यभर केली .
अचानक वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि रस्त्याचे काम सुरू झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी हात जोडून रामभाऊंची माफी मागितली आणि घरी जाण्यास सांगितले.खुश होऊन रामभाऊंनी हेरंबला मिठी मारली.
" जिंकलात तुम्ही रामभाऊ,  शेवटी शांततेने केलेल्या आंदोलनाचा विजय होतो हे सिद्ध केलेत तुम्ही .आज घरी जा ,तो मखरात बसलेला तुमची वाट पाहतोय .काकू नेहमीसारखा छान नैवेद्द करा मी येतोच आरतीला " असे बोलून तो वळला .
रामभाऊंनी घरी येताच मखरात बसलेल्या गणेशाची हात जोडून माफी मागितली .रात्री नेहमीसारखा छान नैवेद्य बनवून काकूंनी तो त्याच्या पुढ्यात ठेवला आणि आरतीला सुरवात केली .आरती झाली तरी हेरंब आला आला कसा नाही याची चौकशी मुलाकडे केली .त्याने आश्चर्याने कोण हेरंब म्हणून विचारले .शंकर भोसलेला हेरंब नावाचा भाचा नाही आणि शंकर भोसले नावाची व्यक्तीही मधल्या आळीत राहत नाही हे सांगितले . 
" आता रस्त्यावर बसून आंदोलन करायचेच बाकी होते का ? नशीब जुन्या काळात इंग्रजांसारखे हल्ली कोणाला  गोळ्या घालीत नाही आणि लाठीमार करत नाही . नाहीतर एक दिवशी चांगलीच पाठ शेकवून घ्याल.मला नाही ताकद राहिली पूर्वीसारखी तुम्हाला पाठीवर झोपवून फिरायची." मखरात बसलेल्या उंदराने चिडून शेपटी  आपटली.
" अरे हल्ली माणसे आपल्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिली आहेत .निवडून दिले म्हणजे आपले काम झाले असे त्यांना वाटते . पण काम करण्यासाठी इतर मार्ग आहेत हे लक्षातच येत नाही त्यांच्या .मी त्यांना त्याची जाणीव करून दिली ." आरामात मांडी घालून बसत तो म्हणाला .
" मान्य पण म्हणून काय आपल्याला उपाशी ठेवून जायचे का ? ह्याच्या आंदोलनामुळे सकाळपासून उपवास सुरू व्हायचा आणि रात्रीच घाईघाईत केलेला नैवेद्द मिळायचा. त्यात तू  ऊनपावसाची पर्वा न करता त्यांच्या बाजूला तो बॅनर घेऊन बसायचास. मी एक दोनदा यायचा प्रयत्न केला पण दारावरची मांजर हटतच नव्हती .तू त्यांचे काम आंदोलन न करता ही करू शकला असताच " तो कुरकुरत एक फुटाणा तोंडात टाकीत म्हणाला .
" अरे मी देव आहे .जादूगार नाही .आपण फक्त इकडंचे तिकडे करतो .आणि थोडे लढू दे त्यांना. सर्वच आपण केले तर त्यांना काहीच करावे लागणार नाही . आपल्याला थोडा त्रास झाला हे कबूल आहे पण पुढची काही वर्षे आपण या सपाट गुळगुळीत रस्त्यावरून रामभाऊच्या घरी येऊ हे नक्की " तो जांभई देऊन डोळे मिटत म्हणाला .
रात्री आरती करताना मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव आपल्याला ओळखीचे का वाटतायत याचा विचार रामभाऊच्या डोक्यातुन जाणार नव्हता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, July 17, 2025

कार्य

कार्य
सुरेशभाऊ पालकर गेले तेव्हा मी गावी होतो . पण त्यांच्या कार्याला हजर राहायचे हे मनाशी पक्के करूनच कामे उरकली आणि परतलो.
कार्याचे एक बरे असते . बरेचसे नातेवाईक आणि मित्रमंडळी भेटतात . ते जणू एक छोटे गेट टू गेडर असते. यावेळी ज्याचे कार्य आहे त्याच्या विषयी कोण चर्चा करत नाही पण गावातील वाद ,मुलांचे शिक्षण ,जमीन ,भावकी , देऊळ असे बरेच विषय चर्चिले जातात .
सुरेशभाऊच्या दशविधी कार्याला काही वेगळे चित्र नव्हते. त्यांचा मुलगा अंकित निर्विकार चेहऱ्याने भटजी सांगेल ते करत होता.
अर्थात वयाच्या नव्वदाव्या वर्षी नातवंडांची लग्ने पाहणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याचे कोणाला दुःख होईल म्हणा. 
पण सुरेशभाऊनी माणसे खूप जोडून ठेवली होती. स्मशानात नाही म्हणायला पन्नास साठ जण उपस्थित होती. मी रजा घेतली असल्यामुळे घाईत नव्हतो.त्यातच  काही जुने मित्र आणि ओळखीचे काहीजण स्मशानात नेहमीप्रमाणे भेटले आणि त्यांची विचारपूस ही झाली.
सुरेशभाऊंच्या दशक्रियाविधी शेजारीच साधारण पंचविशीचा एक तरुण विधी करायला बसला होता . त्याच्यासोबत कोणीच दिसत नव्हते. त्याचा तो केस काढलेला गुळगुळीत चेहरा पाहून मी हळहळलो. बिचारा .. तरुण वयातच हे असे विधी करायला किती यातना होत असतील त्याला .शिवाय धीर द्यायलाही कोणी हजर नाही.आपले कोणी गेल्याचे दुःख एकट्याने सहन करायचे म्हणजे साधी गोष्ट नाही . मी त्याच्याकडे पाहत हाच विचार करीत होतो .
काही वेळाने सुरेशभाऊंचे कार्य संपले .कावळेही जणू पिंडाची वाटच पाहत होते.अंकितची पाठ वळताच तीन कावळ्यांनी पिंडावर एकदम हल्ला केला आणि अंकितसह उपस्थित सर्वांनी हुश्श केले आणि पैसे लावायला  रांग लावली.
त्या तरुणाचेही सर्व आटपले आणि पाचच मिनिटात त्याने ठेवलेल्या  पिंडाला कावळा शिवला.  
मी सवयीप्रमाणे हुश्श केले पण त्याच्या चेहऱ्यावरची माशी हलली नाही. सर्व संपल्यावर त्याने भटजीला नमस्कार केला आणि बाराव्याची वेळ विचारून घेतली. त्याने जाताजाता आपले कार्ड काढून गुरुजींना दिले , हे माझ्यासाठी थोडे विचित्रच होते . साधारणतः भटजी आपले कार्ड देतात पण इथे उलट होते .मी फारसे मनात न ठेवता सर्वांसोबत घरी परतलो .
आज सुरेशभाऊंना जाऊन महिना झाला. मित्राचा फोन आला म्हणून ऑफिसमधून बाहेर पडलो आणि समोरच्या कॉफीशॉपमध्ये बसलो . त्याच्याशी गप्पा मारताना रस्त्यावर नजर होती . समोरच्या गल्लीतून एक प्रेतयात्रा बाहेर पडत होती. हल्ली कोणीही  प्रेताला खांद्यावर घेऊन स्मशानात जात नाही . त्यासाठी विभागातील समाजसेवकांनी वेगवेगळे रथ तयार केलेले असतात .
अश्याच एका रथावरून ती प्रेतयात्रा चालली होती .त्या रथावर हातात मडके धरून बसलेल्या तरुणांकडे पाहून मी उडालोच .हा तोच तरुण होता जो स्मशानात अंकितच्या बाजूला कार्याला बसलेला होता.
"अरे रे ..!! बिचाऱ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलेला दिसतोय. महिन्याभरापूर्वी एकाला गमावले आणि आता दुसऱ्याला " मी स्वतःशी पुटपुटलो.
 दोन दिवस त्याचा चेहरा नजरेसमोरून जाईना .मी मनाशी दिवस मोजले आणि दहाव्या दिवशी सकाळी स्मशानात हजर झालो.अर्थात तिथे नेहमीप्रमाणे कोणी ना कोणी ओळखीचे भेटलेच , त्याची विचारपूस करतानाच माझी नजर त्याला शोधू लागली आणि एका कोपऱ्यात गुरुजींच्यासमोर कार्याला बसलेला  तो दिसलाच.
त्या दिवशीसारखाचा तो एकटाच कार्य करत होता . आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते .मी  माणुसकी म्हणून त्याच्यामागे उभा राहिलो . खरे तर आता स्मशानात सकाळीसकाळी आलोच आहे तर कोणाच्या तरी पिंडाला पैसे लावूनच जाऊ हा सुप्त हेतू होताच .
कार्य होताच तो पिंड ठेवायला पुढे गेला आणि हात जोडून कावळ्याची वाट पाहत उभा राहिला.पाच मिनिटात कावळ्याने पिंडाला चोच मारली. मी सवयीप्रमाणे पैसे लावायला पुढे झालो तसा तो थबकला.काही न बोलता त्याने मला पाया पडायला दिले नंतर सर्व सामान गोळा करून समुद्रात सोडायला गेला. जाताना त्याने आपले कार्ड भटजीला दिले. ते पाहून मला पुन्हा आश्चर्य वाटले.
तो स्मशानाबाहेर पडला आणि मी त्याच्या मागून जात हाक मारली .
"अरे मित्रा " 
तसा तो वळला आणि माझ्याकडे पाहून ओळखीचे हसला .
" तुम्ही महिन्यांपूर्वी इथे आला होतात " तो हसून म्हणाला ."कोणी गेले का पुन्हा ?"
" नाही , पण यावेळी तुला भेटायला आलो होतो.दहा दिवसापूर्वी तुला रथावर मडके घेऊन बसलेले पाहिजे.महिन्याभरात दोन कार्य आणि सोबतीला कोणीच नाही म्हणून आश्चर्य वाटले .म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी आलो " मी म्हणालो.
तसा तो हसला आणि खिशातून कार्ड काढून माझ्यासमोर धरले आणि म्हणाला "चला चहा पिवू ."
कार्डवर त्याचे नाव आणि  मोबाईल नंबर होता पाठीमागे एकच वाक्य होते मी आहे.
" हे काय " चहाचा घोट घेत मी विचारले.
"एका कार्याचे  कमीत कमी पंचवीस हजार घेतो . भटजी आणि सामानाचे वेगळे." तो शांतपणे म्हणाला.
म्हणजे "मी चकित होऊन विचारले .
" ज्यांचे कोणीच नाही .पण त्यांच्याकडे पैसे आहेत . माणसे नाहीत अश्याच्या कार्याची जबाबदारी मी घेतो .त्यांच्या अंत्ययात्रेपासून दिवसापर्यंत इतकेच नव्हे तर वर्षश्राद्धपर्यंत सर्व कार्य व्यवस्थित करण्याची जबाबदारी मी घेतो आणि त्यानुसार पैसे आकारतो " तो सहजपणे म्हणाला .
"अहो पण अंत्यसंस्कार तर आमचा बंड्याही करतो . तेही फुकट " मी ऐटीत म्हणालो.
" पण तो दशक्रिया ,बारावे , तेरावे, श्राद्ध  करतो का "? त्याने विचारले. 
तसा मी निरुत्तर झालो. 
" बंड्या अंत्यसंस्कार करून मोकळा होतो पण पुढे काय ? बंड्या चांगले काम करतो मान्य आहे पण मृत्यूनंतर बाकीची कार्य केल्याशिवाय आत्म्याला मुक्ती मिळत नाही अशी आपली समजूत आहे .मग ती कामे मी करतो अर्थात पैसे घेऊनच " तो सहजपणे म्हणाला.
" सुरवात कशी झाली ? " मी कुतूहलाने विचारले.
" माझ्या मित्राचे लांबचे काका होते.ते निपुत्रिक होते आणि शेवटी वृद्धाश्रमात राहत होते.ते गेल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार मित्रच करणार होता पण नेमका काही दिवसासाठी बाहेरगावी गेला आणि ते वारले.त्यांच्या मृत्यूनंतर सगळी कार्य व्यवस्थित रितिरिवाजनुसार व्हावे अशी त्यांची इच्छा . मित्राने मला फोन केला . मीच त्यांचे अंत्यसंस्कार केले .नंतर वृद्धाश्रमाने साठ हजार माझ्या हातात दिले आणि अंतिम इच्छेनुसार त्यांची सर्व कार्य करायला सांगितले.मी त्यांचे दहावे बारावे ,वर्ष श्राद्ध केले .सर्व मिळून पंचवीस हजार खर्च झाले .मित्राने उरलेले पैसे तुलाच ठेव असे सांगितले . एकेक दिवसाची तीन कार्य आणि तीही दोन दोन तासाची .साधारण पस्तीस हजार मिळाले .मीही खुश ,मित्र खुश ,त्याचे काका वर जाऊन खुश .नंतर त्या वृद्धाश्रमाने अजून दोन तीन जणांची कार्य करायला सांगितली .त्यातही पैसे मिळाले .मग ह्यातच गुंतून गेलो. " तो हसत म्हणाला.
" तरीही पैसे घेऊन दुसऱ्याची कार्य करणे हे पटते का तुम्हाला " मी धाडस करून विचारले.
" भाऊ, भटजी पैसे घेऊन विधी करतो . हजाम पैसे घेऊन केस कापतो. स्मशानात लाकडे फुकट देतात तरीही आपण तिथे चिता पेटवणार्याला दोनशे रुपये टीप देतो.पोलिसांना  बॉडी सोडविण्यासाठी पैसे देतो . मग अंत्यसंस्कार आणि इतर विधी करणाऱ्याला का पैसे देऊ नये ? तसेही हल्ली बरेचसे वृद्ध आपल्यानंतर अंत्यसंस्काराची आधीच तयारी करून ठेवतात. मग त्यांच्या इच्छा माझ्यामार्फत पूर्ण होतात " तो सहजपणे म्हणाला.
त्याचे चुकीचे काहीच वाटत नव्हते .तो कोणाला फसवत नव्हता . अगदी त्यांच्या अंतिम इच्छेनुसार सर्व कार्ये करीत होता.
" मग किती ऑर्डर असतात महिन्यात ? "मी हसत विचारले .
"सरासरी महिन्याला चार ते पाच .लाख दीड लाख सुटतात महिन्याला .आता तर स्मशानातील भटजीही ओळखीचे झालेत .कधी ते मला बोलावतात तर कधी मी त्यांना ऑर्डर देतो .तुम्हाला सांगतो भाऊ हल्ली वेळ कोणालाच नसतो.लोक दशक्रियेला पाया पडून इथूनच ऑफिसला जातात .बाराव्याला जेवायला कोण येत नाहीत .खांदेकरी वेळ मिळेल तेव्हा येऊन खांदे उतरवून जातात . विधुर मिळत नाही, जोडपे मिळत नाही मग मीच काहींना पैसे देऊन बोलावतो ." त्याने आपल्या धंद्यातील अडचणी सांगायला सुरुवात केली. 
अरे बापरे ,हा आता मलाही एखादी ऑफर देईल की काय ? अशी भीती वाटू लागली .
" मग त्या केसाचे काय ? " मी हसत विचारले.
" मी आता हीच स्टाईल ठेवलीय .त्याने शेंडी दाखवत सांगितले. पैसे महत्वाचे .डोक्यावर भरमसाठ केस असणे महत्त्वाचे नाही " असे बोलून तो उठला  आणि चहाचे पैसे देऊ लागला.
" मी देतो " मी त्याला थांबवत म्हणालो.
" नको भाऊ , हे पॅकेजमधून आहे . या कार्यातून बारा ते पंधरा हजार तरी मिळतील "  तो हसत म्हणाला .
मी हात मिळवून पुढे निघालो . मागून पुन्हा त्याने हाक मारली .
" भाऊ ,भेटू पुन्हा इथेच कधीतरी .नाहीतर या वीस तारखेला भेटा .एकाचे वर्षश्राद्ध आहे.चांगल्या दहा पदार्थांचा मेनू आहे विथ आईस्क्रीम. हॉल घेतलाय .बघा प्रयत्न करा ." तो हसत म्हणाला.
मी लांबूनच हात जोडले आणि हसत हसत पुढे निघालो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Monday, July 7, 2025

शिक्षण

शिक्षण
सदाशिव वाघुले अर्थात सदाभाऊ . आयुष्यभर या माणसाने फक्त कीर्तन केले. तरीही ते कधीच कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले नाही. त्यांचे कीर्तन फक्त विभागातील देवळात किंवा गावी गेले की गावाच्या देवळात. त्यांचा आवाजही बेताचाच .अर्थात त्यांना स्वतःची कुवत माहीत होती त्यामुळे कोणत्याही स्पर्धेत किंवा मोठ्या समारंभात कीर्तन करायचे टाळत .
तसे ते दिवसभर कीर्तन करत नाहीत.फावल्या वेळात चाळीतील मुलांना चांगले संस्कार देण्याचे प्रयत्न करतात.
 चाळीतील लहान मुले त्यांच्याकडे हौसेने येत पण आता तीच मुले मोठी झाली आणि त्यांच्या मुलांना मोबाईलमधून डोके वर करायला वेळ नाही .
सदाभाऊना शिक्षणाची खूप आवड .परिस्थितीमुळे आपण शिक्षण घेऊ शकलो नाही याची खंत त्यांना नेहमीच जाणवत असते .त्यामुळेच वेळ मिळेल तसा लहानमोठ्याना कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व सांगायचे प्रयत्न करीत. 
पण त्यांची एक गोष्ट फारच कमीजणांना माहीत होती. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून जितके पैसे मिळत ते पैसे आपल्या विभागातील रात्रशाळेतील मुलांवर खर्च करीत असत.काही गरजू होतकरू विद्यार्थ्यांची फी ही ते भरत होते.
नेहमीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशीजवळ आली होती. आषाढी एकादशी म्हटले की ते मनातून खुश होत.वारी सुरू झाल्यापासून कोणी ना कोणी त्यांना कीर्तनाला बोलावत असे .ते देतील तितके पैसे कपाळाला लावून ते बाहेर पडत . आषाढीत थोडे जास्त पैसे मिळत हे नक्की.
पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना घश्याचा त्रास जाणवू लागला होता.तस काही फार गंभीर नसल्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही .पण आता तो जास्तच जाणवू लागला .इतका की त्या दिवशी घरात बसून कीर्तन करताना अचानक आवाज बसला . यावर्षी काय पण यापुढे कीर्तन करू शकणार नाही याची भीती त्यांना जाणवू लागली .
आताही ते घरात बसले असताना शेजारचा अमित एका गृहस्थाला त्यांच्याकडे घेऊन आला . आत शिरताच त्या गृहस्थाने हात जोडून त्यांना नमस्कार केला. 
थोडासा स्थूल ,बुटका ,काळसर वर्णाचा , कपाळावर पांढरा टिळा . मळकट झालेला सदरा ,तसाच लेंगा ,डोक्यावर पांढरी टोपी अश्या अवतारात तो सदाभाऊंपुढे उभा राहिला.
" माफ करा मी यापुढे कीर्तन करू शकणार नाही " तो काही बोलायच्या आधीच सदाभाऊने आपले पत्ते उघड केले.तसा तो चमकला .
"आहो भाऊ ,मी कीर्तनाचे आमंत्रण द्यायला आलो नाही "  कमरेवर हात ठेवून  तो हसत म्हणाला .त्याचे हास्य खूपच आश्वासक आणि मधुर होते.ते पाहूनच सदाभाऊ आपले दुखणे विसरले.
" मग कशाला आलात " सदाभाऊने उत्सुकतेने विचारले .
" मी पंढरीनाथ , त्या नाक्यावरच्या रात्रशाळेत शिकतो .दरवर्षी तुम्हीच आम्हाला शैक्षणिक वस्तू देता. दहावीच्या मुलांची परीक्षा फी भरता .मी आता दहावीला आहे . सकाळी मिळेल ती कामे करतो आणि रात्रशाळेत शिकतो.तुमची समोरच्या विठ्ठलाच्या देवळातील कीर्तन ऐकली आहेत मी .मला पुस्तके लवकर हवी आहेत आणि यावर्षी माझी परीक्षा फीही भरायची आहे म्हणून तुम्हाला लवकर भेटायला आलोय " तो पुन्हा हात जोडत म्हणाला.
" तू दहावीला आहेस "? पंढरीनाथकडे निरखून पाहत  सदभाऊनी विचारले.
" होय, शिकण्यासाठी वय नसते असे तुम्हीच कीर्तनातून सांगतात ना ? आणि एका  साहेबानी मला दहावी पास झाल्यावर कॉम्प्युटर शिकवणार असे वचन दिले आहे." पंढरीनाथ छाती पुढे काढून म्हणाला .
" अरे वा ! छान ! पण माफ कर .यावर्षीपासून मी कीर्तन करू शकणार नाही . मला घश्याचा त्रास होतोय. " दुःखी आवाजात सदाभाऊनी सांगितले.
" अरे पांडुरंगा ! पंढरीनाथ चकित होऊन म्हणाला .मग यावर्षी माझी आणि माझ्या वर्गाची दहावी बुडणार का ?
" अरे काळजी करू नकोस . तो आहे ना . करील काहीतरी तुमची व्यवस्था " भिंतीवरच्या विठ्ठलाच्या फोटोकडे बोट दाखवीत सदाभाऊ उत्तरले.
"भाऊ, तुमचे कीर्तन मी केले तर "? पंढरीनाथ चुटकी वाजवत म्हणाला.
" काहीतरी काय .त्यासाठी चांगला आवाज पाहिजे.कीर्तनातून समाजाला प्रबोधन करायचे असते त्यासाठी माहिती असावी लागते .कीर्तनाचा सराव असावा लागतो " सदाभाऊ हसत म्हणाले.
" भाऊ, मी नेहमीच तुमचे कीर्तन ऐकतो .मी समोरच असतो पण तुमचे लक्ष नसते माझ्याकडे .तुम्ही तल्लीन होऊन समोर बसलेल्या श्रोत्यांना कीर्तन सांगत असतात. " तो हसत म्हणाला ." राहिला आवाज,  कीर्तन पाठ असेल तर आवाजाचा प्रॉब्लेम होणार नाही.तसा थोडाफार चांगला आहे माझा आवाज " तो हसत म्हणाला.
" ठीक आहे ,बघू प्रयत्न करून.हे करून तुमच्या फीचे पैसे भरता आले तर आनंदच आहे .पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू " सदाभाऊनी थोड्या नाखुषीनेच परवानगी दिली.
पहिल्याच कार्यक्रमात सदाभाऊनी जमलेल्या श्रोत्यांची माफी मागून त्यांच्याऐवजी पंढरीनाथ कीर्तन करणार असे जाहीर केले. 
पंढरीनाथने कीर्तन सुरू केले आणि काही वेळातच संपूर्ण कार्यक्रम मंत्रमुग्ध केला. हा आपल्यापेक्षा चांगले कीर्तन करतो हे सदभाऊना जाणवले आणि आपला वारसा त्याने चालू ठेवावा अशी विनंती करण्याचे त्यांनी ठरविले.
प्रत्येक कार्यक्रमत मिळणारे पैसे त्याने न चुकता सदाभाऊना दिले.त्यातूनच रात्रशाळेतील मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघाला.
आज आषाढी  एकादशी .आज सर्व विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार होते .आज कुठेच कीर्तनाचा कार्यक्रम नव्हता .सकाळीच पंढरीनाथ त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आला .पंढरीनाथाने त्यांचे चरणस्पर्श करताच त्यांना गहिवरून आले. नकळत त्यांनी त्याला मिठीत घेतले आणि स्वतःच्या खिशाला लावलेले पेन त्याच्या  सदर्याच्या खिशाला अडकवले .
" आतातरी हेच मी देऊ शकतो तुला .ह्या पेनानेच पेपर लिही " डोळे पुसत सदाभाऊ पुटपुटले.
तो हसला .ते हास्य पाहताच एक अदभुतआनंदाची जाणीव सदभाऊंच्या शरीरात पसरली .
तो मागे वळून न पाहताच निघून गेला .संध्याकाळी गर्दी कमी होताच  सदाभाऊ विठ्ठलाच्या मंदिरात गेले. त्यांनी डोळे मिटून भक्तिभावाने विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि ते चमकले.
एका अनामिक भीतीने त्यांनी डोळे उघडून विठ्ठलाकडे पाहिले .पंढरीनाथच्या चेहऱ्यावरील हास्य विठ्ठलाच्या मुखावर झळकत होते आणि त्याच्या उपरण्याला सदभाऊंचे पेन लटकत होते.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Sunday, July 6, 2025

अशी एक वारी

अशी एक वारी
शंकर मोरे आज नाईलाजानेच कामावर जाण्यास तयार झाला . त्याच्या नाराजीचे कारणच तसे होते . आज आषाढी एकादशी होती. महराष्ट्रात सणावाराला तोटा नाही पण हेच सण मुंबईतीच्या ट्रॅफिकची वाट लावून टाकतात आणि शंकरसारख्यांचा दिवस खराब जातो.
 आहो , आमचा शंकर महाष्ट्रातील सर्वात मोठ्या बस वाहतूक कंपनीत बस वाहक अर्थात कंडक्टर आहे.गेली तीस ते पस्तीस वर्ष तो आपले काम इमानेइतबारे करतोय.
पण हे सण आले की सर्व जनता हौसेने रस्त्यावर उतरते आणि मग ट्रॅफिकची वाट लागते.  बरे ह्याचे काम तर उभ्यानेच .त्यात गर्दी असेल तर , म्हणजे ती नेहमीच असते मग वाटच लागते .त्यात हा प्रामाणिक कामगार .ह्याच्या बसमधून कोण फुकट प्रवास करेल तर शपथ .बस स्टॉपवर उभी करून तिकीट फाडेल पण कोणाला फुकट प्रवास करू देणार नाही .
नाखुषीनेच तो तयार झाला .निघताना  त्याचा आवडता रुमाल हातात देऊन बायकोने संध्याकाळी इथेतिथे भटकत न राहता घरी या, देवळात जायचे आहे अशी तंबी दिलीच.
एन्ट्री करून त्याने बस आगाराबाहेर काढली आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला . ब्रेक मारताच शंकरच्या तोंडातून सणसणीत शिवी बाहेर पडली.  तितक्यात मागच्या दारातून तो आत शिरला आणि कमरेवर हात ठेवून उभा राहिला. 
" काय रे , चालत्या बसमध्ये कसा चढतोस ? पडला असता म्हणजे ? आधीच डोक्याला ताप कमी आहे का ? त्यात तुझी भानगड नको " शंकर चिडूनच म्हणाला तसा तो मागे वळला .
तो साधारण बुटकाच होता . काळा रापलेला  रंग .कपाळावर पांढरा शुभ्र टिळा , डोक्यावर पांढरी टोपी,  उपरणे ,पांढरा सदरा आणि काळपट झालेला लेंगा. 
" वा , वारकरी दिसतोस .मग नियम पाळा की " शंकर चिडून म्हणाला . तसा तो हसला.
 " मुंबईकर नेहमीच घाईत असतो असे ऐकून होतो .तुमच्या बोलण्यावरून ते खरेच आहे असे दिसते. "
त्याचे हास्यच इतके आश्वासक  आणि गोड होते की शंकर गप्प झाला .
" आहो,  या मुंबईत पावलापावलावर सावध राहायला हवे .इथे काही घडले की पाहिले टार्गेट बस नंतर ट्रेन . बॉम्बस्फोट करायचाय, मग घुसा बसमध्ये , गोळीबार करायचाय ,या बससमोर , दंगल करायचीय मारा बसवर दगड "शंकराचा पट्टा सुरू झाला .
" हो हो ,पुरे .मला तर विठ्ठलाच्या देवळात जायचे आहे " तो हात वर करून म्हणाला .
" पंधरा रुपये " तिकीट मशीन हातात घेऊन शंकर म्हणाला आणि त्याने तिकीट फाडले ही.
" मास्तर , माझ्याकडे पैसे नाहीत " तो गांगरून म्हणाला 
" काय ?"  मुंबईत खिश्यात पैसे न ठेवता माणूस फिरू शकतो हे शंकरसाठी नवीन होते .नसले तरी बसमध्ये कोणी चढणार नाही याचीही त्याला खात्री होती.
" हो, मी आजच मुंबईत आलोय .पैश्याची कधी गरज पडली नाही मला " तो हसत म्हणाला .
" मग हे वारकरी चालत जातायत, त्यांच्या सोबत जा " संध्याकाळपर्यंत पोचाल." रस्त्यावरून चालणाऱ्या दिंडीकडे बोट दाखवत शंकर म्हणाला.
"आहो मुंबईत इतकी गर्दी आणि ट्रॅफिक आहे ,बसने गेलो तरी संध्याकाळपर्यंत पोचेन .गावात वारकऱ्यांसोबत वारीला जाण्याची मजा वेगळीच असते .सगळे कसे शिस्तीत चालते .एकमुखाने एकाच तालासुरात विठ्ठलाचा गजर करीत चालतो तेव्हा वेगळीच अनुभूती असते पण इथे खूप कंटाळा येतो हो .रणरणते ऊन, गाड्यांचे हॉर्न , वेडीवाकडी गर्दी ,धक्के मारीत धावणारे मुंबईकर.  कंटाळा आला हो .तुमची बस बाहेर पडली म्हणून पटकन चढलो त्यात ही एसी बस छान थंडगार प्रवास होईल " तो पुन्हा कमरेवर हात ठेवून रिकाम्या सीटवर बसला .
" ओ साहेब,  ती लेडीज सीट आहे , पहिल्या दोन अपंग आणि वृद्धांसाठी आरक्षित आहे " शंकर छद्मीपणे म्हणाला .
" बापरे इथेही आरक्षण . महिलांना समान हक्क कधी मिळणार देवा .बरे झाले मला भेटणारे सर्वच एका वर्गात येतात तो म्हणजे माणूस " तो पुन्हा हसत म्हणाला .
" पैसे नसतील तर उतर " शंकर आता शांत झाला . 
" मास्तर ,देवाला भेटायला चाललो आहे .पोचेपर्यंत कर ऍडजस्ट " तो केविलवाण्या चेहऱ्याने म्हणाला आणि बाहेरून जात असलेल्या पंधरा ते वीस जणांच्या दिंडीला हाका मारून बसमध्ये बोलावले .
त्याने हाक मारताच ती दिंडी बसमध्ये शिरली .डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला , तुकारामाच्या वेशात असलेला वारकरी  आणि इतरजण टाळ चिपळ्या वाजवत विठ्ठलाचा गजर करीत होते. एका क्षणात बसमधील वातावरण भक्तिमय झाले.
"आहो यांचे तिकीट ?" आता शंकर हतबल झाला .
आषाढी निमित्त मुंबईत कडेकोट बंदोबस्त होता .पोलीस वारकर्यांना बघून काहीच बोलणार नव्हते .शंकरने मुकाट्याने सर्वांची तिकीट्स फाडली पण कोणीही पैसे देण्याच्या मनःस्थितीत नव्हते .आज बहुतेक मेमो मिळणार याची जवळजवळ खात्रीच त्याला झाली.
बसमध्ये सर्व वारकरी तन्मयतेने भजन गात होते .रस्त्यावरील लोक मोबाईलमध्ये या अनोख्या दिंडीचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते .
अचानक त्यांच्या बाजूने जाणारी बस रस्त्यावरचा दुभाजक तोडून बाजूच्या लेनमधून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका मोठ्या ट्रकवर आदळली . 
तो अपघात पाहून शंकर ला काहीच सुचेना . तो नुसता पाहत बसला .
" ओ मास्तर ,चला धावा ,आत माणसे अडकली असतील ." कोणीतरी जोराने ओरडले .
त्याबरोबर सर्व दिंडी खाली उतरून बसच्या दिशेने धावली .जखमींना ताबडतोब शंकरच्या बसमध्ये घेतले वारकर्यांनी आपले पागोटे ,उपरणे काढून जखमा बांधल्या .त्यानेही आपले उपरणे काढून एका जखमी व्यक्तीला बांधले .बस हॉस्पिटलकडे सुसाट निघाली.
जखमींना बसमधून बाहेर काढताना एक पत्रा त्याच्या हाताला लागून रक्त वाहत होते.शंकरने  आपला रुमाल काढून त्याच्या हातावर बांधला .ते पाहून तो पुन्हा हसला .
काही होणार नाही मी आहे असे जणू तो सांगतोय असा भास शंकरला झाला . हॉस्पिटलमध्ये जखमींना रक्त देण्यासाठी दिंडीतील सर्व वारकरी तयार होतेच . सर्व सोपस्कार पार पाडून संध्याकाळी उशिरा शंकर घरी निघाला तेव्हा  वारकरी  हात जोडून पुढे निघून गेले .
" किती उशीर ? तुम्हाला सांगितले होते लवकर घरी या .कधी ऐकलं तर शपथ " बायको चिडून म्हणाली .
काही न बोलता शंकरने कपडे बदलले आणि बायकोसोबत विठ्ठलाच्या देवळात शिरला.  त्याचवेळी एक वारकरी त्याच्या हातात पाकीट देऊन गेला . त्याने पाकीट उघडले त्यात वारकऱ्यांची बस तिकीट्स आणि पैसे होते .
आश्चर्यचकित होत , डोळे मिटून तो विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभा राहिला. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तो कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला  दिसला.  दचकून त्याने डोळे उघडले तेव्हा विठ्ठलाच्या हातावर त्याचाच  रुमाल बांधलेला दिसला आणि चेहऱ्यावर तेच आश्वासक हसू विलसत होते.
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Saturday, July 5, 2025

काम

काम
बाईकच्या साध्याशा धडकेने आपले इतके नुकसान होईल हे सीताराम भोजणेच्या ध्यानीमनीही नव्हते.
तो बिचारा त्यादिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आपली सायकल घेऊन घराबाहेर कामासाठी बाहेर पडला आणि पहिल्याच  वळणावर त्या बाईकस्वाराने सायकलच्या कोपर्याला धडक दिली. तोल जाऊन तो पडला आणि हॉस्पिटलमधून पायाला भले मोठे प्लास्टर बांधूनच घरी आला .
आता हा सीताराम भोजणे कोण ? मी का त्याच्याविषयी इतके सांगतोय ? अपघात काय होत नाहीत का ?
नाही हो . सीताराम भोजणे हा पापभिरू माणूस .तो अशिक्षित  आहे, त्यामुळे मिळेल ते काम करून स्वतःचे पोट भरतो . त्याची कामे निश्चित नसतात . बोलावतात तिथे जातो आणि सांगतील ती कामे करतो . 
पण दरवर्षी आषाढी एकादशीच्या वारीचे काम त्याच्याकडे फिक्स असते . नाही हो , तो कुठे विठ्ठल विठ्ठल करत भक्ती करणारा . दिंडी सुरू झाली की साफसफाईसाठी याची निवड होते . महिनाभर वारकऱ्यांच्या गर्दीत राहून जेवणखाण सुटते ,थोडे मनोरंजन होते , थोडे जास्त पैसे मिळतात आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद मिळतो म्हणून तो जातो. दिंडी देवळाजवळ आली की ह्याचे काम संपले .तो विठ्ठलाच्या दर्शनालाही कधी गेला नाही .
आता पायाला प्लास्टर असल्यामुळे महिनाभर घरीच रहावे लागणार आणि पैशाचाही प्रॉब्लेम होणार याच चिंतेत सीताराम घरात बसून होता . फक्त वारीला जाऊन विठ्ठल विठ्ठल करत नुसते खायचे हे त्याला मान्य नव्हते आणि मुळात त्याच्या मनात देवाविषयी  फारशी भक्ती ही नव्हती .
" सीतारामभाऊ आहेत का घरी ? " दारात आवाज आला आणि त्यांची तंद्री तुटली .
"आत या " त्याने आवाज देताच एक व्यक्ती घरात शिरली .
थोडी बुटकी , काळसर रंगाची ,कपाळावर पांढरा टिळा  ढगळ लेंगा , थोडा जुनाट झालेला सदरा, आणि डोक्यावर पांढरी टोपी अश्या अवतारात तो सीतारामसमोर हात जोडून  हसत उभा राहिला . त्याच्या  शरीराशी विसंगत त्याचे हास्य होते.त्याचे प्रेमळ डोळे  खूपच आश्वासक होते .वरून तरी ते एकदम बावळट ध्यान दिसत होते.
" बोला काय काम ? " सीताराम कंटाळलेल्या स्वरात म्हणाला .
"  मी पंढरीनाथ . मालकांनी पाठवलंय .ते म्हणले सीतारामसोबत वारीला जा आणि तो सांगेल तसे काम कर .तरच पैसे मिळतील " तो कमरेवर हात ठेवून म्हणाला .
" असा उभा राहिलास तर काम कसे करणार तू ?" सीतारामने हसत विचारले .
"सवय आहे बघा "तो लाजून म्हणाला.
" पण यावर्षी मला जमणार नाही "सीताराम पायातल्या प्लास्टरकडे बोट दाखवून म्हणाला ."मला काम करता येणार नाही "
" आहो भाऊ असे बोलू नका . तुम्ही नाही तर मलाही काम मिळणार नाही .कायपण करून चला " तो हात जोडून म्हणाला.
" अरे, पण काही काम जमणार नाही तर कशाला येऊ ? उगाच दुसऱ्यांवर बोज " सीताराम चिडला.
" मी तुमची काळजी घेईन भाऊ  . पण चला .माझ्यातले थोडे पैसे देईन मी . पण तुम्ही चला " तो हात जोडून विनवणी करत राहिला तसा सीताराम तयार झाला .
वारीच्या दिवशी सकाळीच तो सीतारामला घ्यायला घरी आला होता .कुबड्या घेऊन सीताराम त्याच्यासोबत वारीच्या ठिकाणी आला .
यावर्षी आपण काहीच काम न करता नुसते बसणार याचे त्याला वाईट वाटत होते. तरीही जमेल तितके काम करण्याचे मनाशी ठरवले .पंढरीनाथ सीतारामला विचारूनच कामे करत होता. हळू हळू सीताराम ही जेवण वाढायची , कचरा गोळा करण्याची , कामे करू लागला .वारकरी त्याला कामे करू देत नव्हते पण हा कोणाचे ऐकत नव्हता मग वारकऱ्यांनीच त्याला मदत करायची ठरविले .
कधीकधी पंढरीनाथ कामे सोडून वारकऱ्यांच्या भजनात दंग होऊन जातो . तेव्हा सीताराम त्याला हात धरून बाहेर काढत असे. आपण इथे काम करण्यासाठी आलोय आणि मालक त्याचे पैसे देणार आहे याची आठवण तो करून देत असे. 
मग संपूर्ण वारीत पंढरीनाथने मनापासून वारकऱ्यांची सेवा  केली. त्याचे काम पाहून सीतारामही खुश झाला .खुश होऊन विठ्ठलाचा फोटो असलेला ताईत पंढरीनाथला भेट दिला .
आषाढी एकादशीला दिंडी देवळाजवळ पोचली तसा सीताराम मागे फिरला आणि पंढरीनाथच्या खांद्यावर हात ठेवून निघण्याची खूण केली .
" हे काय भाऊ ? आता आलो तर दर्शन घेऊन जाऊ ना . नशिबाने आज दर्शन मिळतेय ते का सोडा " पंढरीनाथ हात जोडून सीतारामला म्हणाला.
" आपले काम इथेच संपते.आपण काम करायला आलो आणि त्याचे पैसे मिळतात .देव इथेही आहे आणि माझ्या घरीही आहे .यावर्षी तू नसतात तर मी घरीच देवाकडे पाहत बसलो असतो .तुझे खरेच आभार ,आज तुझ्यामुळे मी चार पैसे कमवू शकलो ."असे म्हणून तो पंढरीनाथला नमस्कार करून मागे फिरला .
घरात शिरताच त्याच्या मोबाईलवर बँक अकाउंटवर पैसे क्रेडिट झाल्याचा  मेसेज आला .स्वतःशी हसत तो समोरच्या कॅलेंडरवर असलेल्या विठ्ठलाच्या फोटोपुढे हात जोडण्यासाठी उभा राहिला आणि विठ्ठलाच्या गळ्यात पंढरीनाथला दिलेला ताईत पाहून हादरून गेला .
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Tuesday, April 15, 2025

ऑनलाइन संसार

ऑनलाइन संसार
मध्यरात्री दोन वाजता अचानक फोन वाजला. मनात म्हटलं गेलं कोणीतरी आणि नात्यातील सर्व म्हाताऱ्या व्यक्तींची आठवण आली .
थोड्या काळजीनेच  उचलला. तर समोरून वरूण बोलत होता. "काका, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या.  नेत्राला ऍडमिट केलेय. आणि डॉ. म्हणतात घरातील मोठ्या माणसाना बोलवा."
 मी येतो बोलून फोन ठेवला आणि बायकोला घेऊन निघालो. जाता जाता नकळत मन भूतकाळात गेले.
वरूण एक I.T. इंजिनियर. MBA अतिशय हुशार मुलगा. माझा दूरचा नातेवाईक. पण जवळच राहणारा.आईवडील गावी. तसा तो स्वभावानी  हेकट. माझे कोणावाचून काही अडत नाही या वृत्तीचा. माझा मोबाइल आणि इंटरनेट हेच माझे विश्व असे मानणारा. 
दोन वर्षांपूर्वी अचानक घरी पेढे घेऊन दारात उभा राहिला.
"काका, लग्न ठरलंय." 
मी ताबडतोब मोठेपणाचा आव आणून विचारले "अरे वा ! कधी ? कुठे पाहिलीस मुलगी ??कोणी ठरविले ?
 तो फक्त हसला "काका, काय गरज आहे कोणाची ? एका साईटवर तिला पाहिले.आवडली. व्हिडिओ  पाहिला तिचा. तिचा आणि माझा प्रोफाइल जुळला आणि आम्ही ठरविले. इथून जात होतो म्हणून तुम्हाला सांगायला आलो." 
" अभिनंदन, मग आता पत्रिका कधी छापूया. खरेदी वगैरे." माझा मोठेपणा चालू झाला. 
तर तो जोरात हसला "काहीही गरज नाही. मी व्हाट्स अँपवरून सगळ्यांना आमंत्रणे पाठवली आहेत आणि खरेदीही ऑनलाइन केली आहे. इथे वेळ कोणाला आहे ? खूप कामे असतात." 
माझा थोडा हिरमोड झाला ,म्हटले "अरे बायकोला तरी वेळ देतोस का ?"
"नाही हो, तीही माझ्यासारखी बिझीच. मग वेळ मिळेल तेव्हा व्हाट्स अँपवर  चाट करतो सेल्फी काढतो, विडिओ पाठवतो". मी न राहवून हाथ जोडले.
काही दिवसांनी आम्ही त्याच्या लग्नाला गेलो. फक्त 50 माणसे हजर पाहून धक्काच बसला. स्टेजवरही आहेर द्यायला गर्दी नव्हती. 
अरे ह्याने आहेर आणू नये असे लिहिले होते कि काय ? ह्या विचाराने थोडा सुखावलो. 
भेटायला गेलो तेव्हा विचारलं "इतकी कमी माणसे कशी आली ?" तेव्हा परत तो हसला आणि म्हणाला " सगळ्यांनी व्हाट्स अँपवर अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या आहेत. तो बघा एक माणूसच खास रिप्लाय द्यायला ठेवलाय."
मी उडालोच."बरे आहेरचे काय ?" माझा बालसुलभ प्रश्न.
त्यानेहि लहान मुलाला समजवावे तसे मला सांगितले "अहो काका, प्रत्येकाच्या घरी मिठाई आणि गिफ्ट्स पाठवले आहे कुरियरने . अगदी घरपोच डिलिव्हरी आणि आहेर ही बँक अकाउंटवर ट्रान्स्फर करायला सांगितले आहे.
" धन्य आहेस बाबा तू. मी हात जोडले आणि पोटभर जेवून निघालो.
दुसर्या दिवशी पूजेला गेलो पण यावेळी घरात सहा माणसे बघून मुळीच आश्चर्य वाटले नाही. सर्व कसे आरामात बसले होते.
 म्हटले "अजून भटजी आले नाही वाटते "? 
तेव्हा उत्तर आले "अहो भाऊ,  रेकॉर्ड लावून पूजा केली. अगदी पूर्णपणे. कुठेही शॉर्टकट नाही. कशाला हवाय भटजी "?  प्रसादाची ऑर्डर दिलीय आता येईल, शिवाय पंधरा। माणसांच जेवण सांगितले आहे."
" चला , म्हणजे माझे जेवण होईल इथे. मी सुखावलो. परत एकदा पोटभर जेवून समाधानाने घरी आलो.
काही दिवसांनी तो रस्त्यात भेटला. एकटाच होता म्हणून विचारले "अरे कुठे गेलास कि नाही हनिमूनला "? 
तर नेहमीसारखे हसून बोलला " कुठे वेळ आहे भाऊ ? तीही नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी अणि मीही. " 
मी अचंबित झालो. मग मित्रत्वाच्या नात्याने त्याच्या खांदयावर हाथ ठेवुन विचारले "ते सर्व झाले का "? तर लाजून म्हणाला " सध्या तरी सेक्स चाट सुरु आहे, कधीतरी सेल्फी आणि व्हिडिओ "
 कप्पाळ ! मग नाटक सिनेमा तरी ? मी हळूच विचारले.
"अहो नवीन चित्रपट आला कि डाउनलोड करतो आणि पाहिजे तेव्हा बघतो. वेळही वाचवतो." मी दरवेळी नवीन नवीन धक्के खात घरी येत होतो.
आता काही महिन्यापूर्वी त्याचा मेसेज आला. बायकोला दिवस गेले आहेत. पटकन मनात आले. " हेही ऑनलाईन नाही ना ?" फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि काही मदत पाहिजे का असे विचारले.
पुन्हा त्याचे परिचित हास्य ऐकून नवीन काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता लागली. त्याने सांगितले काही गरज नाही काका. हिचे सर्व काही करण्यासाठी एका कंपनीला ऑनलाइन  पॅकेज दिले आहे. आता ते लोक हिची व्यवस्थित काळजी घेतील मला फक्त बाळाला हातात घ्यायचे आहे..हे मात्र अतीच झाले .मी थोडा चिडलोच आणि तणतणतच  घरी आलो.
हॉस्पिटलमध्ये शिरत असताना हे सर्व आठवले आणि समोरच हा उभा राहिला. 
रडवेला चेहरा, खांदे झुकलेले, आम्हाला बघून त्याचा बांध फुटला. माझ्या कुशीत शिरून हमसाहमशी रडू लागला. 
मी विचारले "अरे काय झाले, तू तर पॅकेज दिले होतेस ना ? मग अचानक काय झाले ?"
 तर म्हणाला "त्यांनी नेत्राची क्रिटिकल कंडिशन पाहून हातवर केले, डॉक्टरांनीहि सांगितले तुमचे कोणीतरी नातेवाईक बोलवा परिस्थिती गंभीर होत चालली आहे. इथे मला सगळ्यांनी एकटेच सोडले. सगळेजण भावनाशून्य चेहऱ्यानी  वावरत होते. त्यांना फक्त त्यांच्या पॅकेजशी मतलब आहे. आज मला जाणवले आपलेपणाची भावना असलेले पॅकेज कितीही किंमत दिली तरी विकत मिळत नाही."
मी म्हटले काळजी करू नकोस आपण करू काहीतरी. ताबडतोब फोन करून  सौ.विक्रम, आणि  बंड्याला  हॉस्पिटलमध्ये  बोलावून घेतले आणि पुढच्या संकटाचा सामना करण्यास तयार झालो . 
" हे जरा नीट पार पडू दे मग त्याचे ऑनलाइन बघतोच मी." आल्याआल्या विक्रमने घोषणा केली .
नशिबाने परिस्थिती तितकीही नाजूक नव्हती.आम्ही आमच्या ओळखीच्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केले आणि काहीवेळातच तिने गोंडस मुलीला जन्म दिला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, April 8, 2025

एक समाजसेवा अशी ही

एक समाजसेवा अशीही
आज आरतीला बंड्या नाही बघूनच थोडे  आश्चर्य वाटले . घरात गणपती आणि हा आरतीला हजर नाही ? थोडा चिडलोच . न राहवून त्याच्या आईला विचारले "बंड्या "? 
" गेलाय कर्जतला , जळली मेली ती समाजसेवा,"  तिने थोड्या रागातच उत्तर दिले.
मी त्याच्या बाबांकडे नजर टाकली. तर ते फक्त हसले .
आरती संपता संपता बंड्या दारात हजर झाला. पण आत शिरला नाही तसाच मागच्या दारातून बाथरूममध्ये घुसला . 
हा काय प्रकार आहे ते कळेना . मी बंड्याशी बोलायचे ठरविले . तशीही सौ.गणपतीसाठी चार दिवस गावी गेली होती त्यामुळे माझ्याकडे हि वेळ होता .
" भाऊ तुम्ही घरी बसा ,मी येतो तुमच्याकडे " माझ्या मनातले विचार ओळखूनच बंड्या म्हणाला.
थोड्या वेळाने तो घरात शिरला आणि समोर बसला " काय रे ? घरातला गणपती सोडून कुठे बाहेर  फिरतोस ? हे पाच दिवस तरी घरी राहा .नंतर तुलाच करायचे आहे सगळे , कुठे गेलेलास भटकायला ? " माझा प्रश्नाचा भडीमार चालू झाला .
"प्रेताला "  बंड्याने मान खाली घालून  उत्तर दिले .
मला भयानक धक्का बसला ,"अरे कोणाच्या ?  घरचे बोलले कसे नाही मला ? कोण गेले "? मला राहवत नव्हते.
" भाऊ , ती आजी कोण आहे ? होती ? मला माहित नाही .पण ती अनाथ होती आणि तिच्या मागे करणारे कोण नव्हते एव्हडेच मला माहित आहे " बंड्याने पडलेल्या चेहऱ्याने उत्तर दिले .
'काय चाललंय ते नीट सांग बंड्या "? मी रागाने बोललो .
 "भाऊ  मागच्या महिन्यात आमचा ग्रुप कर्जतला गेलेला ,आठवतंय "? 
"अरे तू नेहमीच कुठे तरी भटकत असतोस . पुढे बोल ".मी म्हटले.
 " तिथे सहज आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट दिली .तेव्हा तिथे एका वृद्ध माणसाचे निधन झाले होते आणि सर्वजण महानगरपालिकेच्या गाडीची वाट पाहत होते .आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे नजर टाकली आणि कुठेतरी मनातून हाललो .त्याच्या चेहऱ्यावर  वेदना होती ,एक दुःख दडलेले दिसत होते.न राहवून आम्ही त्याची चौकशी केली .तर एका मोठ्या सरकारी कंपनीतून मोठ्या पदावरून निवृत्त झालेला वृद्ध होता तो .दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशात होती ,इथे कोणीच नाही. वेळच्या वेळी त्यांच्या खात्यात पैसे जमा होत होते. पण कोण भेटायला येत नव्हते .नेहमी बोलायचे खूप काही कमावले मी आयुष्यात. पण खांद्यावर घेऊन जाणारी चार माणसे जमवू शकलो नाही .ते ऐकून आम्ही ठरविले याचे अंत्यसंस्कार आम्ही करू.आम्ही विधिपूर्वक त्याचे अंत्यसंस्कार केले .चितेवर ठेवताना का कुणास ठाऊक त्यांचा चेहरा समाधानी दिसला . आम्हालाही काहीतरी केल्याचा आनंद झाला .तेव्हापासून आम्ही त्या आश्रमातील बेवारशी मृतदेहांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार करायचे ठरविले ,.आज तिसरी व्यक्ती होती जिचे अंत्यसंस्कार आम्ही करुंन आलो.भाऊ कसे हे आयुष्य हो .तरुणपणी या माणसांनी खूप मजा केली असेल .कुटुंबासाठी खूप कष्ट घेतले असतील . मित्रासाठी रात्री अपरात्री धावून गेले असतील.पार्ट्या केल्या असतील. पण आज ते एकटे पडलेत .त्यांचे कोणी ऐकत नाही. त्यांना सांभाळायला नको म्हणून इथे आणून टाकतात. पण जिवंत आहेत कि मेलेत हे हि पाहत नाहीत. काय वाटत असेल हो त्यांना ? म्हणून आम्ही ठरविले कमीत कमी याना बेवारशी मरण येऊ नये याची काळजी आम्ही घेऊ .त्यांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार करू . मला कळतंय हे असे  कोणाच्याही बाबतीत घडू नये. पण हे घडतेय मग आमच्यापरीने जे जे काही होईल ते आम्ही करू." 
मला काही सुचेना. हि कसली समाजसेवा ?आणि तीही या वयात .
मी म्हटले " अरे तुझ्या घरचे काय म्हणतील ?" 
" आई नाराज आहे . पण बाबा काहीच म्हणाले नाहीत ."
" ठीक आहे ,मी बोलतो बाबांशी " मी त्याला  आश्वासन दिले .
दुसऱ्या दिवशी त्याचे बाबा रस्त्यातच भेटले.
 " काल बंड्या बोलला माझ्याशी .तुमचे काय मत आहे ? मी डायरेक्ट विचारले.
 "खरे सांगू का  ? बाबा म्हणाले " आज अभिमान वाटतो मला बंड्याचा , तो जे करतोय ते समाजाच्या दृष्टीने चुकीचे असेल .रूढी परंपरेच्या विरुद्ध असेल पण त्याला जे योग्य वाटतेय तो ते करतोय .आज माझे संस्कार कामी आले त्याच्या " 
मी ताबडतोब बंड्याला फोन केला " बंड्या पुढच्यावेळी जाशील तेव्हा सांग मला .मीही खांदा द्यायला येईन .
© श्री. किरण कृष्णा बोरकर.

Saturday, March 22, 2025

अस्तित्व

अस्तित्व
शहरात आज तंग वातावरण होते. जिकडे बघावे तिकडे पोलीस . सायकल ,मोटारसायकलवरून जाणाऱ्यांची चौकशी होत होती.भले त्यांच्यासोबत स्त्री लहान मुले असो. संशय आलेल्या व्यक्तींना बाजूला काढले जात होते. शहरातील मस्जिद ,देवळे , महापुरुषांचे पुतळे याना विशेष संरक्षण दिले गेले होते. भिकाऱ्यांना मारून हटवले जात होते. तर हॉस्पिटलजवळ मोफत अन्नदानही आज बंदच दिसत होते.
" वाईन शॉपतरी उघडे असू दे बाबा " बंड्या स्वतःशी पुटपुटत हातातील कापडी पिशवी खिश्यात सारत चालला होता.
" परिस्थिती कोणतीही असो वाईन शॉप उघडेच राहणार बाळा,  ते फक्त ड्रायडे ला बंद असतात " अचानक बाजूने आवाज आला तसा बंड्या दचकला.
त्याच्या बाजूनेच तो चालत होता. जीर्ण झालेले कपडे, लांबलचक पांढरी शुभ्र दाढी , गळ्यात माळ ,हातातील काठीचा आधार घेत तो बंड्याच्याच बाजूने चालत होता. बंड्याने त्याच्याकडे पाहतच तो हसला.
" बाबा तुम्ही सुद्धा ?" बंड्या अंगठा ओठाजवळ नेऊन आश्चर्याने विचारले.
" नाही रे , आयुष्यात कधीही मद्याला स्पर्श केला नाही मी. हो पण दुसर्यांना रोखलेही नाही ." त्या म्हाताऱ्याने हसत हसत सांगितले .
" मग इतक्या तणावपूर्ण वातावरणात काय करतायत " 
" बघायला आलोय काय होणार ते "
" काय होणार ? येत्या  काही वर्षांत यादेशातून आपले इतिहासातील शत्रू नाहीसे होणार . "  बंड्या हसत म्हणाला.
" कदाचित इतिहास देखील अस्तित्वात राहणार नाही. कारण त्यासाठी लागणारे पुरावेही नष्ट होतील " कुत्सितपणे तो म्हातारा म्हणाला.
"आमचे महापुरुष नेहमीच आमच्या मनात राहतील." बंड्या छाती फुगवून म्हणाला.
" तुमच्या मनात तर तुमचे देवही आहेत . पण काहीजण अजूनही देव भूत अस्तितवात नाही असे म्हणतात." तो म्हातारा आजूबाजूला पाहत म्हणाला.
" बाबा तुम्ही घाबरू नका .इथे म्हाताऱ्यांना कोणीच हात लावत नाही ." बंड्या आश्वासक स्वरात म्हणाला.
" पण स्त्रियांना लावतात . मग ती सात वर्षाची असो की साठ वर्षाची " उपरोधिकपणे हसत म्हातारा उद्गारला.
" बाबा,  नको त्या विषयांवर चर्चा नको "बंड्या चिडून म्हणाला. 
" का रे बाबा ? तुला घेतल्यावरच अश्या गोष्टींवर चर्चा करावीशी वाटते का ? " अंगठा ओठाजवळ नेऊन तो म्हातारा म्हणाला.
" अरे  तुम्ही ज्या महापुरुषांची पूजा करता ना ते किती महान होते याची तीळभरही कल्पना नाही तुम्हाला ",आठवणीत हरवून जात तो म्हातारा पुटपुटला.
" दाढी पांढरी झाली म्हणून सर्व  इतिहास  येतो का तुम्हाला " ?  बंड्या चिडला
" बाळा आज तुझे पणजोबा ज्या वयाचे असते त्यापेक्षा जास्त वयाचा असेन मी .इतिहास  कोळून प्यायलोय किंबहुना इतिहास मीच लिहिला आहे असे समज." म्हातारा हसत म्हणाला.
" मग त्यालाही तुम्ही ओळखत असाल ? " पोलीस बंदोबस्तात असलेल्या त्या कबरीकडे बोट दाखवून बंड्याने विचारले.
" मी त्यांनाही लहानपणापासून ओळखतो."अश्वारूढ असलेल्या त्या तेजस्वी मूर्तीकडे काठी दाखवत म्हातारा म्हणाला. पण बोलताना त्याची काठी थरथरत होती आणि नजरेत भीतीची एक चमक क्षणात निघून गेली हे मात्र बंड्याला दिसले नाही.
" त्यांना कोण ओळखत नाही " पुतळ्याला मनोभावे नमस्कार करीत बंड्या हळवा झाला.
" पण तुझी मुले ओळखतील का त्यांना " पुन्हा कुत्सित स्वरात म्हातारा म्हणाला." हा तोच महापुरुष आहे ज्याने सामान्य जनतेवर जुलूम होताच तलवार उपसली. अन्यायाविरुद्ध लढला.लोकांना स्वाभिमानाने जगायला शिकवले.सैन्य उभारले. वाहतुकीचे मार्ग बनविले.समुद्रावर सैन्य निर्माण केले. स्त्रियांना हक्क दिले." म्हातारा आवेशात म्हणाला.
" बघा बाबा ,तुम्हाला ही ते मान्य आहे ना ? मग त्यांच्या शत्रूच्या आठवणी निशाण्या का आपण ठेवायच्या  " बंड्याचा स्वर समजावण्याचा झाला.
" कारण तुझ्या पुढच्या पिढीला हे कळावे म्हणून. नाहीतर  तुझा मुलगा किंवा  तुझा नातू उद्या विचारेल हे महापुरुष कोणाच्या विरुद्ध लढले.त्यांच्या शत्रूंचे काहीच पुरावे दिसत नाहीत तेव्हा काय उत्तर द्याल ." म्हातारा हसत म्हणाला .
" चल उशीर झाला मी निघतो " अचानक तो म्हातारा म्हणाला.
" बाबा तुमचे नाव तरी सांगा. नाहीतर घरी चला चहा प्यायला ." बंड्याने त्यांना प्रेमाने विचारले.
" मी असा माणूस आहे ज्याकडे सर्व काही होते पण शेवटपर्यंत तो अपयशी राहिला. आपले घरदार सोडून तो इथे येऊन राहिला आणि आता स्वगृही जाऊ शकत नाही .मी एक कमनशिबी आहे जो फक्त निंदा सहन करीत राहणार " खिन्नपणे मान हलवीत तो म्हातारा पुटपुटला आणि समोरच्या गर्दीत दिसेनासा झाला .

शहराबाहेर असणाऱ्या मोठ्या कार्पोरेट  ऑफिसमध्ये तो म्हातारा भव्य टेबलमागे बसलेल्या दोन व्यक्तींपुढे उभा होता. यशवंत मनोहर राज उर्फ यमराज बोटात बुलेटची किचेन गरागरा फिरवत त्याच्याकडे छद्मीपणे पाहत होते.तर बाजूला त्यांचे सचिव चिंतामणी त्रंबक गुप्त उर्फ चित्रगुप्त लॅपटॉपवर बोटे चालवत होते.
" फिटली का हौस फिरून यायची . बरे जायचे तर दिल्लीला तुमच्या मूळगावी जायचे ते नाही तर म्हणे मला माझीच कबर बघायला जायचे आहे .आज मरून साडे तीनशे वर्ष झाली असतील पण शहेनशहा बनायची हौस फिटली नाही " यमराज तावातावाने बोलत होते.
" महाराज माझ्या कबरीवरून वाद चालू आहेत असे ऐकले म्हणून तुमच्याकडे पॅरोलसाठी अर्ज केला . खाली परिस्थिती बिकट आहे .पुढे अजून बिकट होतील.खरे सांगू हा औरंगजेब होता म्हणूनच शूर महापुरुष निर्माण झाले . त्यानंतर आमच्याविरुद्ध लढायला मराठ्यांच्या अनेक पिढ्या तयार झाल्या .पण उद्या आमचेच अस्तित्व नष्ट झाले तर ?"  औरंगजेबाने उदास होऊन विचारले आणि केबिनच्या बाहेर पडला.

Saturday, September 14, 2024

तथास्तु

तथास्तु
आज तो त्या आलिशान मंडपात शिरताना खुशच होता. मंडळाने त्याच्या आदरातिथ्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती. गेली कित्येक वर्षे तो पाहिजे ते देणारा म्हणून फेमस होता. मंडपात सगळे काही आलिशान होते.त्याचे पितांबर ,दागिने रोजच्या रोज बदलले जायचे. उंदरालाही रोज नवीन  भरजरी जॅकेट आणि दागिने घातले जायचे.
"आज मी फारच खुश झालोय. आज तर मी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार .मग ती कोणतीही असो. " तो प्रसन्न चेहऱ्याने उंदराशी बोलत होता.
" तो श्रीमंत उद्योगपती दोन  लाखाचा नैवेद्य आणणार म्हणून खुश झालात ना ? " उंदीर खुदुखुदु मिशीत हसत म्हणाला.
" हल्ली तुही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोस का ? " तो चकित होऊन म्हणाला " आणि काय हरकत आहे रे ? आल्याआल्या मन प्रसन्न करणारे काही पाहिले की माणूसच काय पण देव ही खुश होतात. पण काही प्राणी तर समोर चणाडाळ ठेवली तरी खुश होतात " उंदराकडे न पाहता  तो  उत्तरला.
" कळतात हो आम्हालाही कुजकट बोलणी " शेपटी आपटत उंदीर धुसफुसला.
" चला कामाला सुरुवात करू" असे बोलून त्याने नेहमीची पोझ घेतली.
प्रभाकर  हाडाचा चोर .चोर म्हणजे अगदी कट्टर चोर. तो चोरी करताना कसलीच नीतिमत्ता  पाळत नसे. मोठा डल्ला मारला की तो उधळायचा आणि संपला की पुन्हा मोठा हात मारायचा. पण हल्ली बरेच दिवस त्याला कुठे हात मारायची संधी मिळत नव्हती .त्यातच  गणेशोत्सव आल्यामुळे पोलीस खूपच सतर्क झाले होते.
 मंडपात आपल्याला कोणावर तरी हात साफ करता येतील या आशेने घुसला होता. रांगेत उभा राहिला आणि बाप्पा समोर येईपर्यंत त्याला काहीच करता आले नाही शिवाय सीसी कॅमेरा सगळीकडे होतेच.
नाईलाजाने तो बाप्पासामोर उभा राहिला आणि हात जोडून " बाप्पा काहीतरी कर आणि मोठा हात मारायची संधी दे.गणपती उत्साहात पार पाडू दे " मनात म्हणाला.
त्यानेही खुश होऊन "तथास्तु " म्हटले आणि उंदराने चमकून त्याच्याकडे पाहिले.
" म्हणजे तुम्ही खरच सर्वांच्या इच्छा पूर्ण करणार ? आहो ह्या चोराचीही इच्छा पूर्ण करणार तर ? हेच संस्कार करता का भक्तांवर तुम्ही ? तुमची लेखी तक्रार केली पाहिजे बाबांकडे " तो हातातील काजू कतली फेकून देत रागाने म्हणाला .
" किती माज तुला .अरे,  बाराशे रुपये किलो आहे ती काजूकतली .बरेचजण फक्त काचेच्या कपाटातच पाहतात. ज्यांना फुकट मिळते त्यांना किंमत नाही " तो थोडा चिडून म्हणाला .
अर्जुन पुसाळकर भला माणूस . पण गेले काही महिने कंपनी बंद असल्यामुळे थोडा टेन्शनमध्ये असतो . नशीब आपल्या घरी गणपती येत नाही नाहीतर कंपनीच्या प्रॉब्लेममुळे काही करायला जमलेच नसते.आपले आपल्याला हल्ली पुरत नाही त्यात बाप्पाचे लाड कसे करणार . 
आर्थिक चणचण सुरू झाली होतीच त्यात मुलाच्या कॉलेजची फी भरायची होती .ओळखीच्या व्यक्तीला गाठून पीएफ मधून काही पैसे काढायची व्यवस्था केली होती. आजच त्याच्या अकाऊंटला पैसे आले होते.घरात थोडी कॅश हवी होती म्हणून बायकोने पंचवीस हजार घेऊन या असे सांगितले होते .एक काळ असा होता की अर्जुनने अडल्यानडल्या मित्राना भरपूर मदत केली होती पण आता त्यांच्याकडेच पैसे मागायची लाज वाटत होती . 
अर्जुन पैसे घेऊन बँकेतून बाहेर पडला .आपल्या हातातील छोट्या पाऊचमध्ये त्याने ती रक्कम ठेवली होती .कोपर्यावरच्या वडापावच्या गाडीवरून एक वडापाव घेतला आणि पाऊच बाजूला ठेवला.विचारांच्या धुंदीत त्याने वडापाव आणि नंतर चहा संपविला .पैसे देऊन तो काही अंतरावर गेला असताना पाऊचची आठवण झाली आणि छातीत धस्स झाले.तो पळत त्या गाडीवर आला. अपेक्षेप्रमाणे त्याचा पाऊच गायब झाला होता.वडापाववाल्याने हात वर केले. तो रडकुंडीला आला .मनाची समजूत घालण्यासाठी त्याने आजूबाजूला शोधाशोध केली पण काही उपयोग झाला नाही .आजूबाजूच्यांच्या सहानुभूतीचा नजरा सहन करीत तो निघाला .
रस्त्यातच त्याच्या जुन्या मित्राचे घर लागणार होते. सुमंत भोर नेहमीच त्याच्याकडे पैसे मागायचा आणि पगार झाला की स्वतःहून आणून द्यायचा. तो कधीही जास्त रक्कम मागायचा नाही जास्तीत जास्त पाचशे रुपये ही त्याच्याकडून घेतलेली मोठी रक्कम होती . त्याची पैसे परत करण्याची वृत्ती पाहून याने काहिजणांकडे  त्याची शिफारस केली होती आणि त्यांनाही सुमंतने कधी नाराज केले नव्हते. 
खरे तर सुमंतला जुगाराचा नाद होता .तो थोडया पैश्यावरच जुगार खेळायचा .शंभर दोनशे सुटले की उठायचा . लोकांचे पैसे आपल्याकडे आहेत ही जाणीव ठेवूनच तो खेळायचा .आज अर्जुनला दारात पाहून तो चमकला .
" साहेब आज इकडे कुठे ?" सुमंतने अर्जुनच्या हातात पाण्याचा ग्लास देत विचारले .चेहऱ्यावरून काही तरी प्रॉब्लेम आहे हे तो समजून गेला .
पाणी पीतापीता अर्जुनने जे घडले ते सांगितले .
" तू काही पैश्याची मदत करू शकतोस का ?" अर्जुनने मान खाली घालत विचारले .
" साहेब इतकी मोठी रक्कम आजच्या आज उभी करू शकत नाही. मी पण प्रयत्न करतो आणि जमेल तितके देतो .तुम्ही काळजी करू नका " खांद्यावर हात ठेवून सुमंत म्हणाला .
अर्जुन बाहेर पडला आणि समोरच्या मंडपात बसलेल्या त्याच्यावर नजर गेली. तो आत शिरला .त्याच्या दर्शनासाठी मोठी रांग होती . पण रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना चहा नाश्ताची सोय होती. तासाभरात अर्जुन त्याच्यासमोर उभा राहिला .आज तो खुश आणि आनंदी दिसत होता. माग काय मागायचे असेच भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते .त्याने मनोमन हात जोडून आपल्याबाबतीत काय घडले हे सांगितले.आणि माझे पैसे परत मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली.
इच्छा व्यक्त करतात तो हसल्याचा भास झाला . मनावरचा भार हलका करून अर्जुन बाहेर पडला . 
" त्यालाही होय म्हणालास तू .त्याचे पैसे त्या चोरानेच चोरले होते ना .त्यालाही तू होय म्हणालास .आता काय तू बाहेर जाऊन चोराकडून पैसे काढून ह्याला देणार का " उंदीर चिडून म्हणाला पण यावेळी ड्रायफ्रुट घातलेला मोदक हातातून सोडला नाही . 
" मी कुठून पैसे आणू ? माझे काम फक्त तथास्तु म्हणायचे " तो डोळे मिचकावत म्हणाला .
अर्जुनला रिकाम्या हाताने परत पाठविताना सुमंतच्या मनाला लागले होते. आपल्या पडत्या काळात अर्जुन साहेबांनी केलेली मदत तो विसरला नव्हता. पण आज त्याच्याकडे पैसे नव्हतेच. उलट मित्राकडून तीनशे रुपये आणले होते .जुगारात तीनशेचे पाचशे करून बाहेर पडायचे असा त्याचा प्लॅन होता . आज नशीब असेल तर जास्त खेळून थोडे पैसे अर्जुनला द्यायचे असा निश्चय करून तो बाहेर पडला .
बाहेर निघताच त्याची नजर समोरच्या मंडपात गेली .आज जरा जास्तच गर्दी मंडपात दिसत होती .कोणीतरी सेलिब्रिटी आलाय तर त्याला पाहूनच जाऊ जमल्यास सेल्फी काढू असा विचार करून तो आत घुसला . सेलिब्रिटीची पूजा संपायला आणि तो बाप्पाच्यासमोर यायला एकच गाठ पडली .
"अर्जुनचा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी मला मदत कर" अशी इच्छा मनात ठेवून त्याने मनोभावे नमस्कार केला आणि योगायोगाने सेलिब्रेटीच्या हातातून पाचशेची नोट त्याच्या पायाशी पडली . त्याने पटकन उचलून त्या सेलिब्रिटींच्या हातात दिली.
" लगता है ये नोट आपको मिले ऐसी बाप्पा की इच्छा है . ये बाप्पाका प्रसाद समझकर आपके पासही रख लो " असे म्हणून नोट जबरदस्तीने सुमंतच्या खिश्यात ठेवली आणि आपल्या खिशातील मोबाईल काढून एक सेल्फी त्याच्या सोबत घेतला .सेल्फीत सेलिब्रिटी, सुमंत आणि हसणारा बाप्पा सुंदर दिसत होते.
" तुमचे डोके ठिकाणावर आहे का ?" उंदीर दोन पायावर उभा राहून आवेशात म्हणाला .
" काही वर्षांपूर्वी असाच प्रश्न टिळकांनी केसरीमधून सरकार ला विचारला होता . काय दिवस होते ते. टिळक तुम्ही धन्य आहात " तो मनोभावे हात जोडत भूतकाळात गेला.
" तुम्ही त्या जुगाऱ्याला पैसे दिलेत .आता तो जुगार खेळायला जाईल बघा " तो पुन्हा चिडला आणि शेपटी आपटू लागला.
खिश्यातील पाचशेच्या नोटेची ऊब अनुभवत तो जुगाराच्या अड्डयात शिरला तेव्हा मोजकेच लोक बसले होते . आपल्याला पाहिजे तसे गिऱ्हाईक शोधत असताना त्याची नजर कोपऱ्यातल्या व्यक्तीकडे गेली .त्याच्यासमोर फक्त एकच जण खेळायला बसला होता आणि त्या व्यक्तीच्या समोरचा पाऊच थोडा फुगलेला दिसत होता .
" हाय मी सुमंत ,बसू का तुमच्या सोबत खेळायला ' सुमंत त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला.
" मी प्रभाकर , बसा ना आपण खेळू "असे म्हणून त्याला समोरची खुर्ची ऑफर केली .
हळूहळू त्यांचा डाव रंगत गेला .डाव मोठा होतोय हे पाहून तिसरा साथीदार उठून गेला आणि हे दोघेच राहिले. आज  सुमंतचे नशीब जोरदार दिसत होते .एक डाव हरत होता तर चार डाव जिंकत होता .प्रभाकरच्या पाऊच मधील रक्कम कमीकमी होत होती .आता प्रभाकर हरत जात होता तसा चिडून जास्त चुका करत होता तर सुमंत सावध झाला होता .पाहता पाहता तीस हजारची रक्कम सुमंतच्या समोर जमा झाली आणि प्रभाकरने तो पाऊच त्याच्यादिशेने फेकत मी हरलो हे जाहीर केले.
ती रक्कम त्या पाऊचमध्ये भरून सुमंत तसाच अर्जुनच्या घरी गेला आणि त्याच्या हातात तो पाऊच दिला .तो पाऊच पाहताच अर्जुन चक्रावला आणि त्याने पाऊचविषयी सुमंतला विचारले .सर्व काही ऐकून सुमंतने पाच हजार काढून घेतले आणि उरलेले पंचवीस हजार रुपये अर्जुनला परत केले .
" साहेब हे तुमचेच  पैसे आहेत . शेवटी हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत . त्यावर दुसरे कोणीही हक्क सांगू शकणार नाही . ते पुन्हा मिळाले असेच समजा. इतकी वर्षे माझ्यासोबत चांगुलपणे वागण्याचे फळ आहे असे समजा " सुमंत हात जोडून म्हणाला.
इथे प्रभाकर पुन्हा बापाच्या मंडपात आला .पुन्हा आपल्याला मोठे घबाड मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली .पण यावेळी त्याने फारसे लक्ष दिले नाही 
" काय निर्लज्ज लोक आहेत .पुन्हा तुझ्याकडे काहीतरी मागायला आला " उंदीर खुसखुसत म्हणाला .
" एकावेळी  एकाची एकच इच्छा पूर्ण करायची हा  माझा नियम  आहे त्यामुळे आता त्याला काहीच मिळणार नाही " तो हसत म्हणाला .
" पण हे तू कसे जुळविलेस " उंदराने मावा बर्फी तोंडात टाकीत विचारले .
" अरे मी काय करणार ? मी देव आहे जादूगार नाही .आपण ट्रेडिंग करतो . म्हणजे याचे उचलून त्याला द्यायचे आणि त्याचे उचलून ह्याला . पंचवीस हजार मी कुठून आणू. प्रभाकरला पैसे पाहिजे मी अर्जुनकडून दिले .अर्जुनला त्याचे पैसे पाहिजे होते ते सुमंतकडून दिले .सुमंतला जुगारात मोजकेच पैसे जिंकतो .यावेळी त्याला जास्त पैसे मिळाले तो जास्त जिंकला आणि त्याने अर्जुनला त्याचे पैसे दिले .आता सांग मी यात काय केले " समोरचे सफरचंद उचलून तोंडात टाकीत तो म्हणाला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर