Tuesday, March 8, 2022

मध्यस्थ... फ्रेडरिक फॉरसिर्थ

मध्यस्थ... फ्रेडरिक फॉरसिर्थ
अनुवाद....लीना सोहोनी 
ऑक्सफर्डच्या रस्त्यावरून सकाळी पळण्याचा सराव करीत असताना  सायमन कॉरमॅकचे अपहरण झाले आणि पूर्ण जग हादरले. सायमन हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन कॉरमॅकचा मुलगा होता. ब्रिटिश गुप्तहेर आणि अमेरिकन गुप्तहेर मिळून सुमारे शंभर लोक त्याच्या संरक्षणासाठी हजर होती.असे असूनही त्याचे अपहरण केले गेले.
त्या अपहरणाच्या वाटाघाटीसाठी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ शोधला गेला. क्वीन हा आतापर्यंत तरी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ समजला जात होता .त्याच्यावर हे काम सोपविले गेले.क्वीनने वाटाघाटी आपल्या पद्धतीनुसार केल्या.
शेवटी पुरेशी खंडणी घेऊन  सायमनला एका निर्जन रस्त्यावर सोडून देण्यात आले .ब्रिटिश आणि अमेरिकेन एजंट त्याला ताब्यात घेण्याआधीच एका बॉम्बस्फोटात सायमन मारला गेला.
योग्य खंडणी घेऊनही सायमनचा असा क्रूर मृत्यू का झाला ...??? मुळात छोट्याश्या खंडणीसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षकाच्या मुलाचे अपहरण का केले होते..??
क्वीनने या गोष्टीचा छडा लावायचे ठरविले.तो जसजसा अपहरणकर्त्यांच्या जवळ गेला त्याआधीच त्यांची हत्या झाली होती.
कोण आहे याच्या मागे....?? 
रशियातील तेलसाठे संपत आले आहेत.त्यांची तेलासाठी शेजारच्या राष्ट्रावर नजर आहे. तर अमेरिकेतील धनाढ्य व्यावसायिक सौदीच्या शेखची सत्ता उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत.या सर्वांचा सायमनच्या हत्येशी संबंध आहे का....?? क्वीन हे शोधून काढेल का....??
एक थरारक, अंगावर काटे आणणारी कादंबरी

Tuesday, March 1, 2022

तो

तो
ती नेहमी खिडकीपाशीच बसून असायची.समोर काही अंतरावर जळणाऱ्या आगीकडे पाहत बसायची.
 कळायला लागले तेव्हापासूनच ती एका जागी बसून असायची . तिच्या कमरेखालचे शरीर काहीच काम करत नव्हते .फारफार तर आता कुठे दहा वर्षांची असेल. खिडकीतून बाहेर बघत राहणे हाच तिचा टाईमपास .खिडकीतून काही अंतरावर ती स्मशानभूमी होती. नेहमी एकतरी चिता तिथे पेटत असायचीच. अंत्यसंस्कारासाठी आलेली माणसे न्याहाळणे हाच तिचा विरंगुळा .
त्या गर्दीत तो तिला दिसायचा . सहा फूट उंच.कमावलेले शरीर .कपाळावर भस्म. डोक्यावर राख .सतत गर्दीत इकडे तिकडे फिरत असायचा .माणसे श्रद्धांजली वाहून बाहेर पडली की हा चितेची व्यवस्था पाहायचा .काठीने चिता वरखाली करून पूर्ण पेटू द्यायचा.त्यावेळी त्याचे उघडे शरीर घामाने चकाकायचे .
कधीकधी साधारण मध्यरात्री हिला जाग यायची तेव्हा तिथे तो जळत्या चितेच्या प्रकाशात हातातील बाटलीतून घोट घेत धुंद होऊन नाचत असायचा . कधी कधी चक्क काही माणसांच्या घोळक्यात भाषण करताना  चिलीम ओढताना दिसायचा.
हिला त्याच्याविषयी उत्सुकता वाटू लागली .बऱ्याचवेळा हात हलवून तिने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण त्याला इतक्या लांबून ती दिसत नसावी .पण त्या दिवशी त्याने अचानक तिच्या दिशेने पाहिले . काही क्षण थांबून त्याने हात हलविला .त्यानंतर त्यांचे एकमेकांकडे पाहून हात उंचावून हाय चालू झाले .
एक दिवस रात्री तिला अचानक जाग आली . तिने सवयीने स्मशानाच्या दिशेने पाहिले . तो धुंद होऊन चितेच्या प्रकाशात नाचत होता . मध्येच हातातील चिलीम तोंडाला लावून जोरदार कश मारत होता . अचानक त्याचे लक्ष  तिच्याकडे गेले आणि तो तिच्या दिशेने चालू लागला . काही क्षणात तो तिच्या  खिडकीसमोर उभा होता .
"तुला भीती नाही वाटत रात्रीचे असे फिरायची..."?? तिने मनात बरेच दिवस साचून राहिलेला प्रश्न विचारला.
"कोणाची ...?? भुताची ...?? की जनावरांची ..?? नाही वाटत कसली भीती. सर्वांपलीकडे गेलोय मी .."?? त्याने हसून उत्तर दिले.
"मला नेशील तिकडे .."?? तिने स्मशानाकडे बोट दाखवून विचारले .
"चल की ....'असे बोलून त्याने तिला अलगद उचलून घेतले आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागला .
"तू इथे राहतोस .."?? 
"होय ...' एका बाकड्यावर तिला हळुवार बसवत त्याने उत्तर दिले.
"इथे नेहमी गर्दी असते का ..."?? आजूबाजूला फिरणारी माणसे पाहत तिने विचारले.त्यात काही स्त्रिया लहान मुले ही होती. सगळे जण त्याच्याकडे पाहून हात हलवीत सलाम करीत होते.
"सगळेजण फिरायला येतात . गप्पा मारायला येतात..." तो सहज म्हणाला. 
"ते आमच्या बिल्डिंगमधील काकाही आलेत.."ती एका वृद्ध व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली. "खूप दुःखी असतात ते पण आता किती खूष दिसतायत .."ती त्याने दिलेला दुधाचा ग्लास हातात घेत म्हणाली.
"इथे येणारा प्रत्येकजण खूष असतो .तू ही खूष झालीस ना ..."?? तो गूढ हसत म्हणाला ."चल घरी सोडतो तुला .."असे म्हणून  तो तिला उचलून घ्यायला पुढे आला .
"नको ..मला चालवेसे वाटते ..."असे म्हणून तिने त्याचा हात पकडला आणि घराकडे चालू लागली.घराजवळ येताच त्याने तिला अलगद उचलले आणि पुन्हा खिडकीतून बेडवर ठेवले.
"मी निघतो ....भेटू पुन्हा ..."असे बोलून तो वळला .
"एक मिनिटं ...."ती थोड्या कठोर स्वरात म्हणाली..."तू भूत आहेस ना ..."??
तो आश्चर्याने वळला ...
"तुला कसे कळले...भुतांविषयी किती माहिती आहे तुला ...."??त्याने विचारले .
"जगातील कोणतीही व्यक्ती जमिनीवर उभे राहून तिसऱ्या मजल्यावरील छोट्या मुलीला खिडकीतून सहजपणे उचलून घेऊ शकत नाही.आणि स्मशानातील ते काका आठ दिवसांपूर्वीच देवाघरी गेले .त्यावेळी तू ही हजर होतास ..मी पाहिले तुला ..."ती नजर रोखून म्हणाली .
तो हसला ."उद्या महाशिवरात्र आहे .मी या दिवसात असाच फिरत असतो सगळ्या स्मशानात. तेच तर माझे मूळ घर आहे. इथली राख मला थंडावा देते. तू मला बोलावलेस म्हणून तुला भेटलो ..मी भूत नाही मी रुद्र आहे..."
"पुन्हा भेटशील ..."तीने हसत विचारले .
"आतातर सारखी भेट होईल ..."तो गूढ हसला आणि वळला .
दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या बेडवर शांतपणे झोपलेली आढळली पुन्हा कधीही न उठण्यासाठी .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Sunday, February 27, 2022

मृत्यू अखेरचा सोबती....अगाथा ख्रिस्ती

मृत्यू अखेरचा सोबती....अगाथा ख्रिस्ती
अनुवाद... श्रीनिवास गुळवणी
( द डेथ कम्स एज द एन्ड )
कादंबरीतील काळ  हा सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचा आहे.इजिप्तमधील नाईल नदीकाठच्या गावात ही घटना घडते.
ईमहोटेप हा कुटुंबप्रमुख आणि धर्मगुरू .तो मोठा व्यापारी आणि जमीनदारही आहे . त्याच्या कुटुंबात तीन मोठी मुले,दोन सुना ,एक विधवा मुलगी म्हातारी आई आणि नातवंडे आहेत. तसेच एक जुनी विश्वासू मोलकरीणही आहे .
यावेळी बऱ्याच महिन्यांनी घरी येताना ईमहोटेप आपल्यासोबत एक सुंदर तरुणी घेऊन आला .ती त्याची रखेली आहे आणि घरात सर्वांनी  तिचा मान ठेवलाच पाहिजे अशी ऑर्डर सर्वाना दिली.
नोफ्रेट ही ईमहोटेपची रखेली हुशार आणि कपटी होती.तिने आल्याआल्या सगळ्या घराचा ताबा घेतला.मालकाच्या दोन्ही सुनांमध्ये भांडणे लावून दिली.घरातील म्हाताऱ्या मोलकरणीला आपल्या बाजूला वळवून घेतले.
पण एक दिवस स्मशानजवळील टेकडीच्या पायथ्याशी नेफ्रेडचा मृतदेह आढळला .तो अपघात आहे का खून ...?? विधिवत तिच्यावर अंत्यसंस्कार झाले . पण त्यानंतर सुरू झाली एक  खुनांची मालिका....
काही दिवसांनी याहमोज आणि सोबेकवर दारुतून विषप्रयोग झाला आणि त्यात सोबक मृत्यू पावला तर याहमोज कसाबसा बचावला.
त्यानंतर याहमोजची पत्नी सॅटीपीचा  अपघाती मृत्यू झाला.पण मरताना  तिच्या डोळ्यात विचित्र भाव  होते.
ईमहोटेपची वृद्ध आई ईसा ही हुशार स्त्री. भूत प्रेत ,जादूटोणा यावर तिचा विश्वास नाही.यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे याची तिला खात्री होती.तिने आपल्या पद्धतीने या गोष्टीचा छडा लावायचा प्रयत्न केला पण तिचाही विषप्रयोगाने मृत्यू झाला .
कोण आहे या मागे...?? वृद्ध मोलकरीण हेनेटच्या मते यामागे नेफ्रेटचा अतृप्त आत्मा आहे .पण तिचाही काटा काढला गेला.
असे घडत राहिले तर कुटुंबातील कोणीही जिवंत राहणार नाही .किंवा खुनीच सर्व इस्टेटीचा मालक बनेल.
मानवी मनांशी खेळणारी.अनेक पात्र असणारी अगाथा ख्रिस्तिची खिळवून ठेवणारी रहस्यकथा

Wednesday, February 23, 2022

एक हग डे

एक हग डे
घरात शिरताच मुलाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या पाहून त्याने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले . बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर पडला तेव्हा बायकोने चहा चपाती पुढ्यात आणून ठेवली होती.
 " काल रात्रीची आहे .."बायको म्हणाली. त्याने काही न बोलता मान डोलावली.अन्न वाया घालवू नये ही त्याचीच शिकवण होती. मुलाने टाकलेले अन्न तो आणि बायको पहिल्या पासूनच खात होते. 
"बाबा ...कॉलेजची आणि क्लासची फी भरायची आहे. पैसे हवे आहेत.."मुलाने लांबूनच सांगितले .त्याने मान डोलावली."उद्या आई कडून घे .."त्याने उत्तर दिले.
"बापाशी बोलतोयस तू ....जरा जवळ येऊन बोललास तर काटे लागणार नाहीत ..."आई चिडून म्हणाली.याने फक्त हात वर करून तिला थांबविले.
"कशाला अडवता तुम्ही मला.मोठा झाला  म्हणून पंख नाही फुटले त्याला.नशीब अजून शिकतोय. नोकरीला नाहीस....नाहीतर बापाला बाहेरच काढले असतेस .."तिचा पट्टा चालू झाले .
"जाऊ दे ग ...लहान आहे अजून . खूप काही शिकायचे त्याला ..."त्याने बायकोला चूप केले.
रात्री जेवण झाल्यावर अंथरुणावर पडला तेव्हा सर्व आवरून बायको जवळ आली .
"या वर्षी व्हॅलेंटाईन डे ला काय देणार मला ..."?? त्याच्या कुशीत शिरत तिने विचारले .
"अरे हो ..आपला व्हॅलेंटाईन विक सुरू आहे ना ..?? दरवर्षी प्रमाणे मोठा परफ्युम देतो .त्या निमित्ताने माझ्या अंगाचा वास तरी कमी येईल .."तो हसत म्हणाला .
"काहीतरी बोलू नका हो.तुमच्या वासाचे काहीच वाटत नाही मला .पण मुलाची चिंता वाटते .."ती म्हणाली.
"हम्मम .."तो पुटपुटला .
समजायला लागल्यापासून मुलगा याच्यापासून लांब पळत होता.सुरवातीला कारण कळले नाही पण नंतर आपल्या अंगाचा वास त्याला आवडत नाही हे कळले .काही दिवसांनी सवय होईल असा विचार करून तो शांत राहिला .अर्थात मुळातच  तो शांतच होता. 
मुलगा हळू हळू मोठा होत गेला तसं तसा त्याच्यापासून दूरच होत गेला .ह्यालाही त्याच्या अंगाला येणाऱ्या वासाची कारणे द्यायची गरज भासली नाही कधी.
सकाळ झाली तो लवकरच घराबाहेर पडला.मुलगा शांतपणे झोपला होता .आईच्या धपाट्याने त्याला जाग आली तेव्हा दहा वाजले होते. त्रासिक चेहऱ्याने त्याने मोबाईल हाती घेतला तेव्हा गुड मार्निंग आणि हगडे च्या मेसेजनी व्हाट्स अप भरून गेला होता . कोणी मैत्रिणीला तर कोणी आई वडिलांना तर काहीजणांनी कुत्र्याला मिठीत घेऊन फोटो काढले होते .याने ही स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आईला मिठी मारली . हॅपी हग डे आई असे म्हणून दोनचार सेल्फी काढून स्टेटस अपडेट केले आणि बाथरूममध्ये घुसला .
सर्व तयारी करून नाश्त्याला बसणार इतक्यात मित्राचा फोन आला . हायवेवर  त्याचा कारचा अपघात होऊन तो जखमी झाला होता आणि त्याचे वडील जागीच गेले होते .तो तडक अपघात स्थळी गेला. 
संध्याकाळी मित्राच्या वडिलांची अंत्ययात्रा निघाली.मुलाची अंत्ययात्रेत सामील व्हायची पहिलीच वेळ.थोड्याश्या घाबरलेल्या अवस्थेत त्याने  स्मशानात प्रवेश केला आणि त्या वासाने तो हादरला .हा गंध त्याच्या परिचयाचा होता ,हाच गंध वडिलांच्या तिरस्काराला कारणीभूत ठरला होता .हाच गंध लहानपणापासून वडिलांच्या शरीराला अनुभवत होता. त्याची नजर आता काहीतरी शोधू लागली आणि अपेक्षित असे त्याला ते दिसले .
मित्राच्या वडिलांच्या शवावर त्याचे वडील लाकडे ठेवत होते.अतिशय शांतपणे मन लावून ते चिता रचत होते.चितेची राख त्यांच्या शरीरावर चिकटलेली होती.त्यांना पाहून मित्राने एकदम त्यांना मिठी मारली आणि मोठ्याने टाहो फोडला.तो ही अश्रू पुसत त्यांच्या जवळ गेला आणि कुशीत शिरला . आज खरोखरच हग डे साजरा झाला .

© श्री.किरण कृष्णा बोरकर 

Monday, February 21, 2022

रावण ..राजा राक्षसांचा ...शरद तांदळे

रावण ..राजा राक्षसांचा ...शरद तांदळे
न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
दशग्रीवाला कुंभकर्ण,बिभीषण हे सख्खे भाऊ तर महापार्श्व ,खर, दूषण,शूर्पणखा,महोदर, कुम्मीनसी सावत्र भाऊ बहिणी.
दशग्रीवची आई आणि त्याच्या दोन मावश्या विश्रव ऋषीच्या पत्नी .विश्रव ऋषींच्या पहिल्या पत्नीचा मुलगा कुबेर हा देवांचा लेखापाल आणि लंकेचा राजा होता .त्याच्या बेढब आणि कुरूप दिसण्यामुळे सर्व त्याला कुबेर म्हणत.
सुमाली हा असुर राजा .लंकेवर त्याचेच राज्य होते पण देवांविरुद्धच्या युद्धात  लंका  त्याच्या ताब्यातून गेली आणि कुबेराने सुमाली राजाच्या तीन मुली आपल्या वडिलांना भेट दिल्या.  
काही वर्षांनी सुमालीने  विश्रवाच्या आश्रमावर हल्ला करून आपल्या मुलींना आणि नातवंडांना मुक्त केले आणि पुन्हा लंका काबीज करण्यास निघाले .
दशग्रीव हळूहळू मोठा होत होता . त्याने आपले शिक्षण ब्रम्हदेवाकडे पूर्ण केले .तो उत्कृष्ट वादक होता ,वेद आणि धर्मशास्त्रात पारंगत होता .त्याचा आयुर्वेदात आणि विविध औषधी वनस्पतीचा प्रचंड अभ्यास होता. त्याने सर्व असुर जमातींना एकत्र केले आणि फक्त राक्षस ही जमात निर्माण केली . या जमातीत स्त्री पुरुषांना समानता होती. त्याने स्वतंत्र स्त्री सेना उभारली.त्याने बलशाली राक्षस सेना उभारून कुबेरावर चढाई केली . त्यात कुबेराचा पराभव झाला  आणि दशग्रीव लंकेचा राजा झाला . कुबेराचे पुष्पक विमान त्याच्या ताब्यात आले . त्यातून तो कैलासावर महादेवाचे आशीर्वाद घ्यायला गेला तेव्हा त्यांनी  त्याचे रावण ठेवले. रावणाने आपला सासरा मयच्या मदतीने संपूर्ण लंका सोन्याची बनवली.
सुमालीने विविध असुर जमातींना एकत्र आणण्यासाठी काही जमातींचा नरभक्षकपणा नष्ट करण्यासाठी  दशग्रीव नावाचा एक सर्व शक्तिमान असा ईश्वर आहे . त्याला दहा डोकी आणि वीस हात आहेत.तो त्याच्या इच्छेनुसार पाऊस  पाडतो.सूर्य चंद्र ही त्याच्या आज्ञेत राहतात. तो माणसे खातात त्यांवर कोपतो आणि शिक्षा करतो अशी अफवा पसरवली .त्यामुळेच रावणाला दहा डोकी आहेत असे समजले जाते.
या संपूर्ण पुस्तकात रावण अतिआत्मविश्वासाने भरलेला आहे. रामाचे नाव  70% पुस्तक वाचल्यानंतर येते. राम लक्ष्मण सीता  अयोध्या याविषयी रावणाला काडीचीही माहिती नाही असेच या पुस्तकात दिसून येते .
शूर्पणखा आणि तिचे भाऊ दंडकारण्यात फिरायला गेले असताना ती राम लक्ष्मणाकडे आकर्षित झाली आणि त्यातून वाद निर्माण होऊन तिचे नाक आणि कान कापले . त्याचाच सूड म्हणून रावणाने सीतेला पळवले . त्या आधी त्याने राम लक्ष्मण सीतेला पाहिले ही नव्हते .
समोरच्या शत्रूला त्याने नेहमीच कमी लेखले .त्याचाच परिणाम पराभवात झाला.
पुन्हा एक वेगळा अहंकारी कपटी अतिआत्मविश्वास असलेला समोरच्याला हलके लेखणारा रावण आपल्याला या पुस्तकातून दिसतो .

Saturday, February 12, 2022

एक हग डे

एक हग डे
घरात शिरताच मुलाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या पाहून त्याने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले . बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर पडला तेव्हा बायकोने चहा चपाती पुढ्यात आणून ठेवली होती.
 " काल रात्रीची आहे .."बायको म्हणाली. त्याने काही न बोलता मान डोलावली.अन्न वाया घालवू नये ही त्याचीच शिकवण होती. मुलाने टाकलेले अन्न तो आणि बायको पहिल्या पासूनच खात होते. 
"बाबा ...कॉलेजची आणि क्लासची फी भरायची आहे. पैसे हवे आहेत.."मुलाने लांबूनच सांगितले .त्याने मान डोलावली."उद्या आई कडून घे .."त्याने उत्तर दिले.
"बापाशी बोलतोयस तू ....जरा जवळ येऊन बोललास तर काटे लागणार नाहीत ..."आई चिडून म्हणाली.याने फक्त हात वर करून तिला थांबविले.
"कशाला अडवता तुम्ही मला.मोठा झाला  म्हणून पंख नाही फुटले त्याला.नशीब अजून शिकतोय. नोकरीला नाहीस....नाहीतर बापाला बाहेरच काढले असतेस .."तिचा पट्टा चालू झाले .
"जाऊ दे ग ...लहान आहे अजून . खूप काही शिकायचे त्याला ..."त्याने बायकोला चूप केले.
रात्री जेवण झाल्यावर अंथरुणावर पडला तेव्हा सर्व आवरून बायको जवळ आली .
"या वर्षी व्हॅलेंटाईन डे ला काय देणार मला ..."?? त्याच्या कुशीत शिरत तिने विचारले .
"अरे हो ..आपला व्हॅलेंटाईन विक सुरू आहे ना ..?? दरवर्षी प्रमाणे मोठा परफ्युम देतो .त्या निमित्ताने माझ्या अंगाचा वास तरी कमी येईल .."तो हसत म्हणाला .
"काहीतरी बोलू नका हो.तुमच्या वासाचे काहीच वाटत नाही मला .पण मुलाची चिंता वाटते .."ती म्हणाली.
"हम्मम .."तो पुटपुटला .
समजायला लागल्यापासून मुलगा याच्यापासून लांब पळत होता.सुरवातीला कारण कळले नाही पण नंतर आपल्या अंगाचा वास त्याला आवडत नाही हे कळले .काही दिवसांनी सवय होईल असा विचार करून तो शांत राहिला .अर्थात मुळातच  तो शांतच होता. 
मुलगा हळू हळू मोठा होत गेला तसं तसा त्याच्यापासून दूरच होत गेला .ह्यालाही त्याच्या अंगाला येणाऱ्या वासाची कारणे द्यायची गरज भासली नाही कधी.
सकाळ झाली तो लवकरच घराबाहेर पडला.मुलगा शांतपणे झोपला होता .आईच्या धपाट्याने त्याला जाग आली तेव्हा दहा वाजले होते. त्रासिक चेहऱ्याने त्याने मोबाईल हाती घेतला तेव्हा गुड मार्निंग आणि हगडे च्या मेसेजनी व्हाट्स अप भरून गेला होता . कोणी मैत्रिणीला तर कोणी आई वडिलांना तर काहीजणांनी कुत्र्याला मिठीत घेऊन फोटो काढले होते .याने ही स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आईला मिठी मारली . हॅपी हग डे आई असे म्हणून दोनचार सेल्फी काढून स्टेटस अपडेट केले आणि बाथरूममध्ये घुसला .
सर्व तयारी करून नाश्त्याला बसणार इतक्यात मित्राचा फोन आला . हायवेवर  त्याचा कारचा अपघात होऊन तो जखमी झाला होता आणि त्याचे वडील जागीच गेले होते .तो तडक अपघात स्थळी गेला. 
संध्याकाळी मित्राच्या वडिलांची अंत्ययात्रा निघाली.मुलाची अंत्ययात्रेत सामील व्हायची पहिलीच वेळ.थोड्याश्या घाबरलेल्या अवस्थेत त्याने  स्मशानात प्रवेश केला आणि त्या वासाने तो हादरला .हा गंध त्याच्या परिचयाचा होता ,हाच गंध वडिलांच्या तिरस्काराला कारणीभूत ठरला होता .हाच गंध लहानपणापासून वडिलांच्या शरीराला अनुभवत होता. त्याची नजर आता काहीतरी शोधू लागली आणि अपेक्षित असे त्याला ते दिसले .
मित्राच्या वडिलांच्या शवावर त्याचे वडील लाकडे ठेवत होते.अतिशय शांतपणे मन लावून ते चिता रचत होते.चितेची राख त्यांच्या शरीरावर चिकटलेली होती.त्यांना पाहून मित्राने एकदम त्यांना मिठी मारली आणि मोठ्याने टाहो फोडला.तो ही अश्रू पुसत त्यांच्या जवळ गेला आणि कुशीत शिरला . आज खरोखरच हग डे साजरा झाला .

© श्री.किरण कृष्णा बोरकर 

Thursday, February 10, 2022

तंट्या ....बाबा भांड

तंट्या..... बाबा भांड 
साकेत प्रकाशन 
खांडव्यावरून इंदूरला जाताना जिथे मुखत्यारा बलवाडा घाटाची चढण सुरू होते त्या ठिकाणी प्रत्येक ट्रेन अचानक थांबते आणि हॉर्न वाजवून तंट्याला सलामी देते.तसे नाही केले तर पुढे अपघात होईल अशी दंतकथा आहे .तिथे तंट्याचा आत्मा अजूनही फिरतो आहे अशी समजूत आहे. कोण आहे हा तंट्या ...?? काय केले होते त्याने ...???
विंध्य सातपुडाच्यामध्ये निमाड भागात भिल्लांची वस्ती .हा काळ साधारण 1857 च्या उठवाच्या काळात .पाटील आणि मालगुजरांच्या ताब्यात या भिल्लांच्या जमीनी. एका कागदावर जमिनीच्या मालकांचा अंगठा घेऊन त्या जमिनी कायमच्या ताब्यात घेणे हे सर्रास चालत होते. तंट्याच्या वडिलांची एक जमीन अशीच पाटलाच्या ताब्यात गेली.तिच्याविषयी विचारणा करण्यास गेलेल्या तंट्याला जेलमध्ये जावे लागले .तंट्याचे मूळ नाव तात्या पण जेलरला ते उच्चारता येत नव्हते म्हणून तंट्या झाले आणि पुढे त्याच नावाचा दरारा विध्य सातपुडा खांडवा येथे पसरला .
तंट्याने गरिबांना कधीच त्रास दिला नाही . त्याने पाटील मालगुजराना लुटले .तो पैसा गरिबांना वाटला. एकाच वेळी तो अनेक ठिकाणी दरोडे घालीत असे त्यामुळे इंग्रजांना त्याचा नक्की ठावठिकाणा कळत नसे .
भिल्ल मूळचे जंगलाचे राजे .जंगल त्यांच्या पायाखालचे होते.इंग्रजांना सहज चकमा देऊन तंट्या आणि त्याचे साथीदार पसार होत. जंगलात फिरणाऱ्या पोलिसांचे तो कपडे काढून नाकाचा शेंडा कापीत असे.
दुष्काळात त्याने धान्याची गोदामे ,मालगाडी लुटून सर्व धान्य गरीबात वाटले .तंट्या गरिबांसाठी रॉबिन हूडचा अवतार होता. त्याच्या पकडण्यासाठी दोनशे रुपयांपासून सुरू झालेली बक्षीसाची रक्कम पुढे पंचवीस हजारांपर्यंत गेली. दहावर्षे तो इंग्रजांविरुद्ध लढत होता .फितुरी दगा करून तंट्याला पकडणे हा एकच पर्याय इंग्रजांपुढे होता आणि शेवटी त्यात इंग्रज यशस्वी झाले .
तंट्याची ही अज्ञात कहाणी आज बाबा भांड या लेखकाने अतिशय अभ्यास आणि संशोधन करून आपल्यासमोर मांडली आहे .