Tuesday, September 17, 2024

सेक्टर 36

Sector 36
सेक्टर 36
दिल्ली तील सेक्टर 36 हा भाग तसा दुर्लक्षित .तिकडचा पोलीस इन्स्पेक्टर रामचरण पांडे भ्रष्ट अधिकारी आहे.दीड लाख लोकसंख्या असलेल्या सेक्टर 36 मध्ये फक्त तीन पोलीस आहेत म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला पन्नास हजार माणसे आलीत.कुठे आणि कोणावर लक्ष ठेवणार ? 
त्यात सेक्टर 36 मध्ये अचानक लहान मुले मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे.  इन्स्पेक्टर रामचरण पांडे ला यागोष्टीची काहीही पर्वा नाही .तो एफआयआर ही दाखल करून घेत नाही .
पण एके दिवशी जत्रेत रामचरण पांडेच्या लहान मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न होतो  आणि रामचरण खडबडून जागा होतो. आपली मुलगी ही कधीतरी गायब होऊ शकते याची जाणीव त्याला होते आणि तो हादरतो.
बलबीरसिंह बस्सी हरयाणातील एक प्रसिद्ध उद्योगपती .त्याचा सेक्टर 36 मध्ये बंगला आहे.प्रेमसिंह नावाचा तरुण त्या बंगल्याचा केअरटेकर आहे. एका अपहरण झालेल्या मुलीचा मोबाईलचे लोकेशन बस्सीच्या बंगल्याजवळ दाखवते आणि संशयाची सुई बस्सी आणि प्रेमसिंहकडे वळते.
प्रेमसिंह हा विकृत मनोवृत्तीचा तरुण आहे .त्याला कौन बनेगा करोडपती पाहण्याचे वेड आहे. पोलीस त्याला ताब्यात घेतात आणि त्याने दिलेली माहिती ऐकून हादरून जातात .
ओटीटी प्लॅटफॉर्मवर रक्तपात जास्त प्रमाणात दाखविला जातो .यात ही अतिप्रमाणात हिंसा आहे . काही प्रसंग पाहून अंगावर शहारे येतात .
विक्रात मेस्सी हा ओटीटी वर असलेला दमदार कलाकार .प्रेमसिंहच्या प्रमुख भूमिकेत त्याने चीड आणणारे काम केलंय. तर इन्स्पेक्टर रामचरण पांडेच्या भूमिकेत दिपक डोब्रियाल आहे .आकाश खुराणा बलबीरसिंह बस्सीच्या छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत आहे .
चित्रपटात रहस्य काहीच नाहीय.खुनी कोण आहे हे आपल्याला काही मिनिटातच कळते मग त्याला कसे पकडणार हीच उत्सुकता राहते.
ज्यांना रक्तपात आणि अंगावर येणारे प्रसंग पहायची तयारी असेल त्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहावा .

Saturday, September 14, 2024

तथास्तु

तथास्तु
आज तो त्या आलिशान मंडपात शिरताना खुशच होता. मंडळाने त्याच्या आदरातिथ्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती. गेली कित्येक वर्षे तो पाहिजे ते देणारा म्हणून फेमस होता. मंडपात सगळे काही आलिशान होते.त्याचे पितांबर ,दागिने रोजच्या रोज बदलले जायचे. उंदरालाही रोज नवीन  भरजरी जॅकेट आणि दागिने घातले जायचे.
"आज मी फारच खुश झालोय. आज तर मी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार .मग ती कोणतीही असो. " तो प्रसन्न चेहऱ्याने उंदराशी बोलत होता.
" तो श्रीमंत उद्योगपती दोन  लाखाचा नैवेद्य आणणार म्हणून खुश झालात ना ? " उंदीर खुदुखुदु मिशीत हसत म्हणाला.
" हल्ली तुही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोस का ? " तो चकित होऊन म्हणाला " आणि काय हरकत आहे रे ? आल्याआल्या मन प्रसन्न करणारे काही पाहिले की माणूसच काय पण देव ही खुश होतात. पण काही प्राणी तर समोर चणाडाळ ठेवली तरी खुश होतात " उंदराकडे न पाहता  तो  उत्तरला.
" कळतात हो आम्हालाही कुजकट बोलणी " शेपटी आपटत उंदीर धुसफुसला.
" चला कामाला सुरुवात करू" असे बोलून त्याने नेहमीची पोझ घेतली.
प्रभाकर  हाडाचा चोर .चोर म्हणजे अगदी कट्टर चोर. तो चोरी करताना कसलीच नीतिमत्ता  पाळत नसे. मोठा डल्ला मारला की तो उधळायचा आणि संपला की पुन्हा मोठा हात मारायचा. पण हल्ली बरेच दिवस त्याला कुठे हात मारायची संधी मिळत नव्हती .त्यातच  गणेशोत्सव आल्यामुळे पोलीस खूपच सतर्क झाले होते.
 मंडपात आपल्याला कोणावर तरी हात साफ करता येतील या आशेने घुसला होता. रांगेत उभा राहिला आणि बाप्पा समोर येईपर्यंत त्याला काहीच करता आले नाही शिवाय सीसी कॅमेरा सगळीकडे होतेच.
नाईलाजाने तो बाप्पासामोर उभा राहिला आणि हात जोडून " बाप्पा काहीतरी कर आणि मोठा हात मारायची संधी दे.गणपती उत्साहात पार पाडू दे " मनात म्हणाला.
त्यानेही खुश होऊन "तथास्तु " म्हटले आणि उंदराने चमकून त्याच्याकडे पाहिले.
" म्हणजे तुम्ही खरच सर्वांच्या इच्छा पूर्ण करणार ? आहो ह्या चोराचीही इच्छा पूर्ण करणार तर ? हेच संस्कार करता का भक्तांवर तुम्ही ? तुमची लेखी तक्रार केली पाहिजे बाबांकडे " तो हातातील काजू कतली फेकून देत रागाने म्हणाला .
" किती माज तुला .अरे,  बाराशे रुपये किलो आहे ती काजूकतली .बरेचजण फक्त काचेच्या कपाटातच पाहतात. ज्यांना फुकट मिळते त्यांना किंमत नाही " तो थोडा चिडून म्हणाला .
अर्जुन पुसाळकर भला माणूस . पण गेले काही महिने कंपनी बंद असल्यामुळे थोडा टेन्शनमध्ये असतो . नशीब आपल्या घरी गणपती येत नाही नाहीतर कंपनीच्या प्रॉब्लेममुळे काही करायला जमलेच नसते.आपले आपल्याला हल्ली पुरत नाही त्यात बाप्पाचे लाड कसे करणार . 
आर्थिक चणचण सुरू झाली होतीच त्यात मुलाच्या कॉलेजची फी भरायची होती .ओळखीच्या व्यक्तीला गाठून पीएफ मधून काही पैसे काढायची व्यवस्था केली होती. आजच त्याच्या अकाऊंटला पैसे आले होते.घरात थोडी कॅश हवी होती म्हणून बायकोने पंचवीस हजार घेऊन या असे सांगितले होते .एक काळ असा होता की अर्जुनने अडल्यानडल्या मित्राना भरपूर मदत केली होती पण आता त्यांच्याकडेच पैसे मागायची लाज वाटत होती . 
अर्जुन पैसे घेऊन बँकेतून बाहेर पडला .आपल्या हातातील छोट्या पाऊचमध्ये त्याने ती रक्कम ठेवली होती .कोपर्यावरच्या वडापावच्या गाडीवरून एक वडापाव घेतला आणि पाऊच बाजूला ठेवला.विचारांच्या धुंदीत त्याने वडापाव आणि नंतर चहा संपविला .पैसे देऊन तो काही अंतरावर गेला असताना पाऊचची आठवण झाली आणि छातीत धस्स झाले.तो पळत त्या गाडीवर आला. अपेक्षेप्रमाणे त्याचा पाऊच गायब झाला होता.वडापाववाल्याने हात वर केले. तो रडकुंडीला आला .मनाची समजूत घालण्यासाठी त्याने आजूबाजूला शोधाशोध केली पण काही उपयोग झाला नाही .आजूबाजूच्यांच्या सहानुभूतीचा नजरा सहन करीत तो निघाला .
रस्त्यातच त्याच्या जुन्या मित्राचे घर लागणार होते. सुमंत भोर नेहमीच त्याच्याकडे पैसे मागायचा आणि पगार झाला की स्वतःहून आणून द्यायचा. तो कधीही जास्त रक्कम मागायचा नाही जास्तीत जास्त पाचशे रुपये ही त्याच्याकडून घेतलेली मोठी रक्कम होती . त्याची पैसे परत करण्याची वृत्ती पाहून याने काहिजणांकडे  त्याची शिफारस केली होती आणि त्यांनाही सुमंतने कधी नाराज केले नव्हते. 
खरे तर सुमंतला जुगाराचा नाद होता .तो थोडया पैश्यावरच जुगार खेळायचा .शंभर दोनशे सुटले की उठायचा . लोकांचे पैसे आपल्याकडे आहेत ही जाणीव ठेवूनच तो खेळायचा .आज अर्जुनला दारात पाहून तो चमकला .
" साहेब आज इकडे कुठे ?" सुमंतने अर्जुनच्या हातात पाण्याचा ग्लास देत विचारले .चेहऱ्यावरून काही तरी प्रॉब्लेम आहे हे तो समजून गेला .
पाणी पीतापीता अर्जुनने जे घडले ते सांगितले .
" तू काही पैश्याची मदत करू शकतोस का ?" अर्जुनने मान खाली घालत विचारले .
" साहेब इतकी मोठी रक्कम आजच्या आज उभी करू शकत नाही. मी पण प्रयत्न करतो आणि जमेल तितके देतो .तुम्ही काळजी करू नका " खांद्यावर हात ठेवून सुमंत म्हणाला .
अर्जुन बाहेर पडला आणि समोरच्या मंडपात बसलेल्या त्याच्यावर नजर गेली. तो आत शिरला .त्याच्या दर्शनासाठी मोठी रांग होती . पण रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना चहा नाश्ताची सोय होती. तासाभरात अर्जुन त्याच्यासमोर उभा राहिला .आज तो खुश आणि आनंदी दिसत होता. माग काय मागायचे असेच भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते .त्याने मनोमन हात जोडून आपल्याबाबतीत काय घडले हे सांगितले.आणि माझे पैसे परत मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली.
इच्छा व्यक्त करतात तो हसल्याचा भास झाला . मनावरचा भार हलका करून अर्जुन बाहेर पडला . 
" त्यालाही होय म्हणालास तू .त्याचे पैसे त्या चोरानेच चोरले होते ना .त्यालाही तू होय म्हणालास .आता काय तू बाहेर जाऊन चोराकडून पैसे काढून ह्याला देणार का " उंदीर चिडून म्हणाला पण यावेळी ड्रायफ्रुट घातलेला मोदक हातातून सोडला नाही . 
" मी कुठून पैसे आणू ? माझे काम फक्त तथास्तु म्हणायचे " तो डोळे मिचकावत म्हणाला .
अर्जुनला रिकाम्या हाताने परत पाठविताना सुमंतच्या मनाला लागले होते. आपल्या पडत्या काळात अर्जुन साहेबांनी केलेली मदत तो विसरला नव्हता. पण आज त्याच्याकडे पैसे नव्हतेच. उलट मित्राकडून तीनशे रुपये आणले होते .जुगारात तीनशेचे पाचशे करून बाहेर पडायचे असा त्याचा प्लॅन होता . आज नशीब असेल तर जास्त खेळून थोडे पैसे अर्जुनला द्यायचे असा निश्चय करून तो बाहेर पडला .
बाहेर निघताच त्याची नजर समोरच्या मंडपात गेली .आज जरा जास्तच गर्दी मंडपात दिसत होती .कोणीतरी सेलिब्रिटी आलाय तर त्याला पाहूनच जाऊ जमल्यास सेल्फी काढू असा विचार करून तो आत घुसला . सेलिब्रिटीची पूजा संपायला आणि तो बाप्पाच्यासमोर यायला एकच गाठ पडली .
"अर्जुनचा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी मला मदत कर" अशी इच्छा मनात ठेवून त्याने मनोभावे नमस्कार केला आणि योगायोगाने सेलिब्रेटीच्या हातातून पाचशेची नोट त्याच्या पायाशी पडली . त्याने पटकन उचलून त्या सेलिब्रिटींच्या हातात दिली.
" लगता है ये नोट आपको मिले ऐसी बाप्पा की इच्छा है . ये बाप्पाका प्रसाद समझकर आपके पासही रख लो " असे म्हणून नोट जबरदस्तीने सुमंतच्या खिश्यात ठेवली आणि आपल्या खिशातील मोबाईल काढून एक सेल्फी त्याच्या सोबत घेतला .सेल्फीत सेलिब्रिटी, सुमंत आणि हसणारा बाप्पा सुंदर दिसत होते.
" तुमचे डोके ठिकाणावर आहे का ?" उंदीर दोन पायावर उभा राहून आवेशात म्हणाला .
" काही वर्षांपूर्वी असाच प्रश्न टिळकांनी केसरीमधून सरकार ला विचारला होता . काय दिवस होते ते. टिळक तुम्ही धन्य आहात " तो मनोभावे हात जोडत भूतकाळात गेला.
" तुम्ही त्या जुगाऱ्याला पैसे दिलेत .आता तो जुगार खेळायला जाईल बघा " तो पुन्हा चिडला आणि शेपटी आपटू लागला.
खिश्यातील पाचशेच्या नोटेची ऊब अनुभवत तो जुगाराच्या अड्डयात शिरला तेव्हा मोजकेच लोक बसले होते . आपल्याला पाहिजे तसे गिऱ्हाईक शोधत असताना त्याची नजर कोपऱ्यातल्या व्यक्तीकडे गेली .त्याच्यासमोर फक्त एकच जण खेळायला बसला होता आणि त्या व्यक्तीच्या समोरचा पाऊच थोडा फुगलेला दिसत होता .
" हाय मी सुमंत ,बसू का तुमच्या सोबत खेळायला ' सुमंत त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला.
" मी प्रभाकर , बसा ना आपण खेळू "असे म्हणून त्याला समोरची खुर्ची ऑफर केली .
हळूहळू त्यांचा डाव रंगत गेला .डाव मोठा होतोय हे पाहून तिसरा साथीदार उठून गेला आणि हे दोघेच राहिले. आज  सुमंतचे नशीब जोरदार दिसत होते .एक डाव हरत होता तर चार डाव जिंकत होता .प्रभाकरच्या पाऊच मधील रक्कम कमीकमी होत होती .आता प्रभाकर हरत जात होता तसा चिडून जास्त चुका करत होता तर सुमंत सावध झाला होता .पाहता पाहता तीस हजारची रक्कम सुमंतच्या समोर जमा झाली आणि प्रभाकरने तो पाऊच त्याच्यादिशेने फेकत मी हरलो हे जाहीर केले.
ती रक्कम त्या पाऊचमध्ये भरून सुमंत तसाच अर्जुनच्या घरी गेला आणि त्याच्या हातात तो पाऊच दिला .तो पाऊच पाहताच अर्जुन चक्रावला आणि त्याने पाऊचविषयी सुमंतला विचारले .सर्व काही ऐकून सुमंतने पाच हजार काढून घेतले आणि उरलेले पंचवीस हजार रुपये अर्जुनला परत केले .
" साहेब हे तुमचेच  पैसे आहेत . शेवटी हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत . त्यावर दुसरे कोणीही हक्क सांगू शकणार नाही . ते पुन्हा मिळाले असेच समजा. इतकी वर्षे माझ्यासोबत चांगुलपणे वागण्याचे फळ आहे असे समजा " सुमंत हात जोडून म्हणाला.
इथे प्रभाकर पुन्हा बापाच्या मंडपात आला .पुन्हा आपल्याला मोठे घबाड मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली .पण यावेळी त्याने फारसे लक्ष दिले नाही 
" काय निर्लज्ज लोक आहेत .पुन्हा तुझ्याकडे काहीतरी मागायला आला " उंदीर खुसखुसत म्हणाला .
" एकावेळी  एकाची एकच इच्छा पूर्ण करायची हा  माझा नियम  आहे त्यामुळे आता त्याला काहीच मिळणार नाही " तो हसत म्हणाला .
" पण हे तू कसे जुळविलेस " उंदराने मावा बर्फी तोंडात टाकीत विचारले .
" अरे मी काय करणार ? मी देव आहे जादूगार नाही .आपण ट्रेडिंग करतो . म्हणजे याचे उचलून त्याला द्यायचे आणि त्याचे उचलून ह्याला . पंचवीस हजार मी कुठून आणू. प्रभाकरला पैसे पाहिजे मी अर्जुनकडून दिले .अर्जुनला त्याचे पैसे पाहिजे होते ते सुमंतकडून दिले .सुमंतला जुगारात मोजकेच पैसे जिंकतो .यावेळी त्याला जास्त पैसे मिळाले तो जास्त जिंकला आणि त्याने अर्जुनला त्याचे पैसे दिले .आता सांग मी यात काय केले " समोरचे सफरचंद उचलून तोंडात टाकीत तो म्हणाला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

Friday, September 13, 2024

आत्मसंरक्षण

आत्मसंरक्षण
अश्विनी कोसलेकर गावात परत आली ते पुन्हा कधीच मुंबईत न जाण्यासाठी. खरेतर आपले करियर करायला कोकणातील या आपल्या छोट्या गावातून मुंबईला गेली होती. कोकणातून मुंबईला आज नाही तर गेली कित्येक वर्षे लोक जातात .काही तिथेच मुंबईकर बनून राहत तर काही निवृत्तीनंतर परत गावी येत.आपल्या छोट्या जमिनीवर पाहिजे ते पिकवत आणि आरामात पुढचे आयुष्य काढीत.
अश्विनी याला अपवाद नव्हती .ती लहानपणापासूनच हुशार. पण तिची  हुशारी अभ्यासात फारशी नाही तर कोणत्याही झाडावर सरसर चढ .सापळे लावून जनावरे पकड. तर नदीत तासनतास पालथे पडून राहा यातच दाखवली होती. गणपतीची सजावट करण्यात तिचा हात कोण धरू शकत नव्हता .दरवर्षी कोसलेकरांकडे मखर कसा असेल याचीच उत्सुकता सर्वाना असायची .
त्यालाही अश्विनीमुळेच कोसलेकरांकडे जायला आवडायचे.अश्विनी यावर्षी कसले मखर बनवेल  याची उत्सुकता त्यालाही असायची." कोसलेकराकडे  दरवर्षी नवीन घरात जाण्याचा आनंद मिळतो बघ " तो आपल्या उंदराला नेहमी म्हणायचा.
" नैवेद्य ही दरवर्षी नवीन केला तर जास्त आनंद होईल . काकूने कधीतरी माडावरून नवीन नारळ काढून त्याच्या वड्या बनवाव्या इतकीच माफक इच्छा आहे माझी किंवा त्यांनी घरात नैवेद्य बनवूच नये म्हणजे आपण सुखी होऊ " उंदीर चेहऱ्यावर कोणतेच भाव न दाखवता त्याला उत्तर द्यायचा .
दहावी झाल्यावर अश्विनी मुंबईत काकांकडे राहायला आली आणि कॉलेजात जाऊ लागली. पण वाटेतल्या कराटे क्लासकडे तिचे जास्त लक्ष होते.अर्धातास दारात उभे राहून ती कराटेचे ट्रेनिंग पाहू लागली. तिची आवड पाहून क्लासच्या सरांनी तिला काही प्राथमिक गोष्टी शिकवल्या .ती एकटी असताना त्या गोष्टींचा सराव करू लागली.
या क्लासला घरचे परवानगी देणार नाही याची तिला खात्री होती आणि सरांनीही तुला सगळ्या गोष्टी फुकट शिकवणार नाही हे आधीच स्पष्ट केले होते. पण भविष्यात तुमची फी व्याजासकट परत करेन.तिची हुशारी पाहून सरही तयार झाले.
तिचे कॉलेज पूर्ण झाले तेव्हा तिने ब्लॅक बेल्ट कमावला होता. या पाच वर्षात ती बऱ्याच गोष्टी शिकली. शेजारचे ज्यांना आपण काका मामा म्हणतो त्यांची नजर ,त्यांचे स्पर्श ती ओळखू लागली. ट्रेन, बसमधून प्रवास करताना कोणीतरी अंगलटीला येतोय, त्याचे सहेतुक बोलणे, नको त्या ठिकाणी जाणारा हात याचाही अनुभव येत होता . 
पण आता तिच्यात एक आत्मविश्वास आला होता. मग तीही कोण चिकटायला आला की हाताची कमीत कमी हालचाल करून योग्य त्या ठिकाणी प्रहार करी त्यामुळे तो आपोआप वेदना सहन करीत पुढे निघून जाई. कधीकधी तिला दुसऱ्या मुलींच्या मागे उभे राहून स्पर्श करणारे दिसत आणि त्याही काही न बोलता ते सहन करीत असताना पाहून तिच्या डोक्यात जात. 
तिचे शिक्षण पूर्ण झाले आणि मुंबईचा उबग आला. म्हणे मुंबई आणि इतर शहरे सुरक्षित आहेत. रात्री अपरात्री स्त्री एकटी कुठेही फिरू शकते . पण लहान मुली , एकट्या राहणाऱ्या,प्रवास करणाऱ्या,ऑफिसात काम करणाऱ्या  स्त्रिया यांचे काय ? त्यातर ओळखीच्याच माणसांपासून सुरक्षित आहेत का ?
तिने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. तसेही घरचे वातावरण जुन्या वळणाचे होते. तिला नोकरी करायला विरोधच होणार होता. मग कशाला नोकरी करायची.आणि नोकरी करताना प्रवासात इतर प्रवाश्यांचा आणि  ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचा  स्पर्श सहन करीत जगायचे का ? 
घरच्यांनी तिच्या गावी येण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले. गेली पाच वर्षे ती गणपतीच्या आदल्या दिवशी घरी जायची .तिला मनासारखी सजावट करायची संधी मिळायची नाही मग ती वेगवेगळ्या प्रकारचे हार बनवून गणपतीला घालायची. रोज नवनवीन सुगंधित हार पाहून तो सुखवायचा .
या वर्षी ती घरी आली.आता तिला वेळच वेळ होता.पाच वर्षात गाव काही फारसे बदललेले नव्हते. हो पण मोबाईल संस्कृती वाढली होती. व्हाट्स अप फेसबुक इन्स्टाग्राम प्रत्येकाच्या हातात होते.  ती गेली पाच वर्षे एकच मोबाईल वापरत होती. अर्थात तीही सोशल मीडियावर होती पण जरुरी कामापूरती.
गावातील तिच्या बरोबरीची काही मुले आता तिच्यासारखीच तरुण झाली होती.बाईक घेऊन फिरायचे ,हातातील मोबाईलमधून सेल्फी काढायचे .बाजूने जाणाऱ्या तरुण मुली स्त्रियांवर कॉमेंट्स करायचे यातच वेळ जात होता त्यांचा.
तिला एका जागी नुसते बसून राहणे शक्य नव्हते .पण गावात नोकऱ्याही नाहीत. शेवटी तिने कराटेचा क्लास सुरू करायचा निर्णय घेतला .हा क्लास फक्त महिलांसाठी असेल हे ही जाहीर केले.
तिचा हा निर्णय घरच्यांनाच काय तर गावलाही आवडला नव्हता.
" कित्याक हवा ता स्वरक्षण ? आम्ही काय मेलाव काय ? लगीन होवुसतोवर आम्ही हायतच आणि लगीन झाल्यावर नवरो हाय तिच्यासाठी " गावातील जेष्ठ स्त्री पुरुषांच्या प्रतिक्रिया उमटल्या .
क्लास उघडून आठवडा झाला तरी कोण फिरकत नव्हते. नाही म्हणायला शेजारच्या दोन पाच वर्षांच्या मुली खेळायला येत होत्या.मग तीच त्यांना हळूहळू शिकवू लागली .
आता गावाला गणेशोत्सवाचे वेध लागले होते.गेल्या पाच वर्षांची कसर यावर्षी भरून काढायची हे अश्विनीने ठरविले होतेच. आणि अगदी तसाच मखर तयार केला.
यावर्षी तो अश्विनीच्या घरात शिरला आणि खुश झाला . मखर पाहून त्याला जुने दिवस आठवले. पोरीला डोके आहे चांगले. तो शेजारी डोळे मिटून बसलेल्या उंदराकडे पाहत म्हणाला .पण उंदराने डोळे उघडले नाही.
"काहींना कलेची जाणच नसते हे खरे. पण काकू प्रसादात ड्रायफ्रूट टाकणार हे ही नवीनच आहे " तो त्याला ऐकू जाईल इतक्या आवाजात पुटपुटला.
"काय म्हणता ड्रायफ्रूटस " उंदीर खडबडून जागा होत म्हणाला .
"हे बरे ऐकू येते तुला " तो हसत उत्तरला .
गणपतीची पूजा आटपून अश्विनी संध्याकाळच्या तयारीसाठी मार्केटमध्ये गेली. सण असल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी जास्तच होती .तिच्यासोबत क्लासमध्ये खेळणाऱ्या छोट्या मुली होत्या.
गर्दी असली म्हणजे फायदा घेणारे असतातच . पण तो तरुण त्यांच्यामागे बराच वेळ होता. ते जातील तिथे आजूबाजूला घुटमळायचा 
मध्येच त्याने छोट्या मुलीला आईस्क्रीम देण्याचा प्रयत्न केला .पण त्यांनी झटकून टाकला . आता काहीच प्रतिकार होत नाही म्हणून त्याची भीती चेपली तो अजून धीट झाला.आपला कोपर्याचा तुटलेला दात दाखवत तो किळसवाणे हसला तशी अश्विनीच्या डोक्यात तिडीक गेली.दात ओठ खात तिने हाताचा फटका त्याच्या तोंडावर मारला . फटका खाताच तो चवताळला .रागाने तो अंगावर धावून गेला.तिने पुन्हा उजव्या पायाची लाथ त्याच्या कुशीत हाणली.आतापर्यंत मार्केटची गर्दी त्यांच्या आजूबाजूला जमा झाली होती. तिचा हल्ला पाहून सोबतच्या लहान मुलीही धीट झाल्या.कोपऱ्यात पडलेली काठी घेऊन त्यांनीही त्याच्यावर हल्ला केला.ते पाहून अश्विनी थांबली नाही तिने त्याला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली.आपले काही खरे नाही पाहून तो तरुण धावत सुटला . त्यांचे धाडस पाहून सर्वांनी टाळ्या वाजविल्या.
त्याला मखरात धडपडत शिरताना पाहून उंदीर चकित झाला." काय झाले रे ? तुझी अशी अवस्था कोणी केली ? अरे चार दिवस इथे  सुखाने राहायला येतो त्यातही तू अश्या भानगडी करतोस? चेहरा बघ कसा सुजलाय. कपाळावर ही टेंगुळ येणार बहुतेक "उंदराने प्रश्नांची तोफ सुरू केली.
" जरा गप्प बस रे ." वेदनेने कण्हत तो म्हणाला."औषधोपचार करायचे सोडून प्रश्न  कसले विचारतोस .त्या पोरीने जीव घेतला असता माझा .काय मारते ती .एकेक फटका जीवघेणा आहे तिचा .नशीब वेळीच सावध होऊन पळालो." 
" म्हणजे आता तू मारही खाऊन आलास का ? तो ही एका स्त्री कडून ? देवा आता मी कोणाचे नाव घेऊ ? हेच दिवस बघायचे बाकी होते आता. इथे येऊन इतरांना मदत करतोस हे चांगले होते. पण मारही खाऊ लागलास आता .मीच आता बाबांकडे अर्ज देऊन बदली करायची विनंती करतो . तुझ्यामुळे मीही मार खाणार एक दिवस " समईतील तेल त्याच्या अंगाला लावीत उंदीर म्हणाला.
घरी सगळ्यांनाच अश्विनीची कामगिरी समजली होती. त्यांना हे काही फारसे आवडले नव्हते. "शहरात जाऊन हेच शिकून आलीस का ? " काकू ओरडल्या. "सगळो गाव बघत होतो " कोणीतरी हळूच पुटपुटले.
" मी त्याला प्रतिकार केला ही माझी चूक झाली का" असे अश्विनीच्या मनात येत होते इतक्यात शेजारची त्या लहान मुलीची आई घरात शिरली.
"बरा झाला हो तू सोबत होतीस आणि आमच्या पोरींनीही दोन फटके मारले असे ऐकले " तिने कौतुकाने विचारले.
" ताई  आज मी होते , पण दरवेळी मी नसेन तिच्यासोबत त्यावेळी काय करेल ती " अश्विनीने डोळ्यात डोळे घालून विचारले.
" खरच की बाय .आजपासून ह्या दोघींना तूच क्लासमध्ये कराटे शिकव. उद्या त्यांनाच फायदा होईल चांगले तयार करा त्यांना " त्यांची आई म्हणाली.
" बघ रे ,  मार खाल्ल्याचा काहीतरी फायदा झाला ना ? आज दोन मुली आल्या उद्या चार येतील .आत्मसंरक्षणाचा फायदा आज ना उद्या होणारच. त्यासाठी आज थोडा मार खाल्ला तर काय हरकत आहे." वेदनेने तोंड वाकडे करीत तो म्हणाला .
आज बाप्पाचा चेहरा  सकाळपेक्षा जास्तच लाल का दिसतोय आणि समईतील तेल इतक्या लवकर कसे संपले याचाच विचार आरती म्हणताना अश्विनी करत होती.
© श्री .किरण कृष्णा बोरकर 

Thursday, September 12, 2024

द टेरर लाईव्ह

The Terror Live
द टेरर लाईव्ह
युन यंग हा एके काळी टॉपचा न्यूज समालोचक होता. पण त्याच्या हातून काही चुका झाल्या आणि त्याची बदली आता रेडिओ चॅनलवर झाली.आता तो रेडिओवर लाईव्ह शो करतो .
आताही त्याचा शो सुरू झालाय आणि त्याला नेहमीप्रमाणे एक फोन कॉल येतो. फोन करणारा स्वतःचे नाव पार्क शिन वू सांगतो.
तो सेऊल शहराला जोडणारा समुद्रावरील ब्रिज उडवून देण्याची धमकी देतो . युन यंग ही गोष्ट थट्टेवारी नेतो पण काही मिनिटातच त्याच्या ऑफिसमधून तो ब्रिज एका बाजूने तुटताना पाहतो .ब्रिजवर एक मोठा बॉम्बस्फोट झालेला असतो .
एका टेररिस्टने हा बॉम्बस्फोट केलाय आणि त्याची पहिली बातमी आपल्याकडे आहे या विचाराने यंग खुश होतो .याचा वापर करून आपण पुन्हा टीव्ही न्यूज समालोचक होऊ शकतो अशी खात्री त्याला वाटते.त्या चॅनेलचा बॉसही त्याला दुजोरा देतो आणि चॅनेलचे रेटिंग वाढव अशी सूचना देतो आणि हा कार्यक्रम टीव्हीवर लाईव्ह करण्याची व्यवस्था करतो.
टेररिस्ट  पार्क यंगच्या पुढ्यात कोरियाच्या राष्ट्रपतींने जनतेची माफी मागावी अशी अट ठेवतो .कारण तो ब्रिज बांधताना तीन कामगार मृत्युमुखी पडले होते आणि त्यांची जबाबदारी कोणीही घेतली नव्हती.
यंग ही गोष्ट मान्य करत नाही तेव्हा पार्क ब्रिजच्या दुसऱ्या बाजूने बॉम्बस्फोट करतो .त्यामुळे ब्रिजच्या मधल्या हिस्स्यात काही नागरिक अडकतात .त्यात यंगची पत्नी ही असते.
राष्ट्रपती ऐवजी कमिशनर  लाईव्ह येतात आणि ते पार्कची अट मान्य करायला नकार देतात तेव्हा त्यांच्या कानातील इयरफोनचा स्फोट होतो आणि  ते मारले जातात .
शेवटी पोलिसांना पार्क कुठे लपलाय याची बातमी मिळते आणि ते त्याला पकडायला जातात .
पोलीस पार्कला पकडतील का ? राष्ट्रपती जनतेची माफी मागतील का ? 
साधारण 90 मिनिटांचे थरारनाट्य आपल्याला खिळवून ठेवते.
हा कोरियन चित्रपट हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे .

केयरटेकर

केयरटेकर
त्या एकमजली चाळीच्या शेवटच्या कोपऱ्यातील खोलीत वासुदेव जाधव आपल्या कुटुंबासोबत राहत होते . ते  मुलगा अनिल आणि सून अनिता असे तिघांचेच कुटुंब. दोन वर्षांपूर्वी पत्नी गेली आणि ते थोडे खचलेच.त्यात परिस्थिती बेताचीच .पन्नास वर्षांपूर्वी कोकणातून मुंबईत आले खरे पण परिस्थिती बेताचीच राहिली.मुंबईत कोण उपाशी राहीत नाही हे खरे पण त्यासाठी मेहनत करावीच लागते. 
इथे येऊन ते मिल कामगार झाले आणि मिल कामगारांचे पुढे काय झाले हे सांगायला नकोच .भविष्यात पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना आल्यामुळे एकाच मुलावर थांबायचा निर्णय घेतला . गिरणी संपात खूप हाल झाले त्याचा परिणाम मुलाच्या भविष्यावर झाला .पुढे त्यानेच स्वतःसाठी मुलगी शोधून आणली आणि आईबापाचा त्रास कमी केला .
काही वर्षांपूर्वी गावातील संबंध संपले म्हणून इथेच गणपती आणायचा निर्णय घेतला .अनिल आणि त्याची बायको कामाला जायचे . घरी हे नवरा बायकोच असायचे .अनिल आणि अनिताला देवात फारसा इंटरेस्ट नव्हता पण आई वडिलांना नाहीही म्हटले नाही .तुम्ही दोघेच बाप्पाचे सर्व काही करा असे सांगून गप्प झाले.
आपल्या पत्नीच्या साथीने वासुदेव उर्फ वासू बाप्पाची सर्व तयारी हौसेने करायचे .सहा दिवस घर कसे भरलेले असायचे .ते स्वतः मखरापासून विसर्जनापर्यंत सर्व तयारी करायचे . अनिल आणि अनिता संध्याकाळी फक्त आरतीला टाळ्या वाजवायला असायचे .
पण मागच्या वर्षी वासुदेवची पत्नी देवाघरी गेली आणि ते एकटे पडले. हल्ली ते कोणाशी फारसे बोलत नसत. एकटेच दरवाजाबाहेर कोपऱ्यात बसून रहात. पण गणेशोत्सव जवळ आला आणि ते थोडे खुलले .मुलांकडून थोडे पैसे घेऊन मूर्ती बुक करून आले .मखराचे साहित्य घेतले .
बाबा खुश आहेत हे पाहून अनिल ही काही बोलला नाही . दरवर्षीप्रमाणे सकाळीच बाप्पाचे त्यांच्या घरी आगमन झाले .
यावर्षी वासुदेवचा मखर कसा असेल अशी कल्पना करीत तो अनिलच्या डोक्यावरून घरात शिरला आणि समोरचे साधेच पण ऐसपैस मखर पाहून खुश झाला.त्याला असेच ऐसपैस मखर आवडायचे .चार नैवेद्याची ताटे जास्त राहतात असे त्याचे म्हणणे आणि या गोष्टीला त्याचा उंदीर ही सहमत होता .
सकाळची पूजा झाली आणि अनिल अनिता बाहेर पडले .आता घरात फक्त वासुदेव होते . जाताजाता अनिलने "बाबा काळजी घ्या, लक्ष ठेवा "असे सांगताच . वासुदेवने "तो आहे , तुम्ही निश्चितपणे जा " असे म्हणतात मखरात आरामात बसलेला तो दचकून उठला .
" घ्या आता ह्याला तुम्ही सांभाळा .आहो याने आपल्याला आणलेय की आपण यांच्यासाठी आलोय .बिनधास्त आपल्या जीवावर घर सोडून जातात " उंदीर त्रासिक मुद्रा करून म्हणाला.
" वासुदेव फार हौसेने करतो रे आपले आणि कधी काही मागत ही नाही आपल्याकडे .तसेही असे बोलायची पद्धत आहे .कितीजण आपल्या पायाशी उभे राहून बाप्पा लक्ष असू दे असे म्हणताच " बेफिकीर स्वरात तो म्हणाला.
 आता घरात शांतता होती म्हणून तो आणि उंदीर मोबाईलवर ल्युडो खेळत बसले होते.
" जग किती बदलले आहे बघ .एके काळी महाभारतात कौरव आणि पांडव जमिनीवर बैठक मारून समोरासमोर बसून द्युत खेळत होते आणि आता आपण मोबाईल वर खेळतोय " तो हसत उंदराला म्हणाला .
" हे काही नाही आता तर तुम्ही कैलासावर बसलेल्या बाबांशी इथे बसून ल्युडो खेळू शकता आणि इतर कोणाशीही खेळू शकता " उंदीर त्यांच्याकडे पाहून कीव करीत म्हणाला .
" काय म्हणतोस ? हे इतके पुढारलेले आहेत " आश्चर्याने तो म्हणाला .
" हो नाहीतरी हल्ली तुमची ऑनलाइन पूजा होते पुढे कदाचित आपल्याला बोलावणार नाहीत डायरेक्ट पुजाच करतील मोबाईल समोर ठेवून " उंदीर  शेंगदाणे तोंडात टाकून म्हणाला .
 तिथे अचानक पाणी पीतापीता वासुदेव खाली कोसळले . ते कोसळतात उंदीर टंणकन उडी मारून त्याच्या मागे गेला .
" अरे तो वासुदेव खाली पडला बघ आता काय करायचे "  तो उंदराला शोधत विचारू लागला . 
" मला काय माहित काय करायचे .ते तुम्हीच पहा ." उंदीर नुसता इकडेतिकडे पळत म्हणाला .
शेवटी हा मखरातून  बाहेर पडला .
"अहो असे कसे बाहेर पडलात तुमच्या ओरिजिनल रुपात ? असे पाहून वासुदेव जास्तच घाबरेल ?" त्याला ओरिजनल रुपात बाहेर पडताना पाहून उंदीर मोठ्याने ओरडला .
" इमर्जन्सी आहे .असाही तो बेशुद्ध आहे .तू दरवाज्यावर लक्ष ठेव मी बाकीचे पाहतो " असे म्हणून त्याने वासुदेवला उठवले .बिछान्यावर झोपवले . शर्ट काढून फॅनचा स्पीड वाढविला .
"बहुतेक बीपी वाढले असावे ." हातापायाला मालिश करत तो म्हणाला .
" तू काय डॉक्टर आहेस का ? "उंदीर छद्मीपणे म्हणाला " आणि निदान घरात कोणीतरी येईपर्यंत तरी त्याला काही होऊ देऊ नकोस नाहीतर पोलीस केस झाली तर आपल्याला घेऊन जातील " उंदीर त्याला सावध करीत म्हणाला .
" तू तर कायदेपंडित आहेस "तो  हसत म्हणाला.
" ह्या मुंबईत कोणाचा भरोसा नाही . एका चित्रपटात तर देवावर केस केली होती " उंदीर उत्तरला .
"असो पण या वसुदेवाचे काही खरे दिसत नाही .मी त्याची प्रेशरची गोळी दिलीय पण परिस्थिती बिकट होणार आहे " तो चिंतीत स्वरात म्हणाला .
संध्याकाळी घरी येताच वासुदेवची अवस्था पाहून अनिल हादरला. तो डॉक्टरला घरी घेऊन आला . हॉस्पिटलमध्ये ह्या दिवसात ठेवायचे म्हटले की घरात बाप्पा त्याला कोण बघेल . डबल त्रास .मग डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण बेडरेस्ट करायला सांगितले.तसेही आता काही दिवस वासुदेव अथरुणांतून उठू शकत नव्हताच .
आता सकाळीच अनिल त्यांना अंघोळ घालून बाहेर बसवायचा .अनिता बाप्पाचे बघायची .दोघांनाही सुट्टी मिळत नव्हती पण उशिरा यायची परवानगी दिली होती.
सर्व आवरले की वासुदेव अनिलला" तुम्ही जा तो आहे "असे त्याच्याकडे हात करून खुणवायचे तेव्हा उंदीर खुदुखुदु हसायचा. अशाक्तपणामुळे वसुदेवला बोलताही येत नव्हते.
अनिल आणि अनिता घराबाहेर पडले की हा खाली उतरायचा. वासुदेवच्या हातापायाला मालिश करायचा .त्यांची औषधे द्यायचा.जेवण भरवायचा . कधीकधी उंदीर तो आणि  वासुदेव ल्युडो खेळायचे . त्याला पाहून वासुदेवच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते . 
आज त्याचा शेवटचा दिवस होता . आरती झाली आणि अनिलने त्याला डोक्यावर घेतले .निघताना त्याने मान वळवून वासुदेवकडे प्रेमळ नजरेने पाहिले .वासुदेवच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
अनिलच्या डोक्यावर बसून तो उदासपणे समुद्रकाठी आला.
"त्याला खरे रूप दाखवायची गरज होती का ? आता उद्या बरा झाल्यावर आपल्या नावाची बोंबाबोंब करेल " उंदीर शेपटी  फिरवत म्हणाला .
" हल्ली अश्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवतो का ? त्याच्या डोक्यावर काही काळ परिणाम झालाय असेच डॉक्टरही म्हणतील .या जगात खरे देव आहेत यावर कोणाचाच विश्वास नाही आहे फक्त श्रद्धा " तो हसत म्हणाला .
बाप्पाला सोडून घरात शिरताच अनिलला वासुदेव शांतपणे झोपलेला दिसला ते कधीही न उठण्यासाठीच. 
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Wednesday, September 11, 2024

लोकल

लोकल
सकाळी साडेआठच्या सुमारास रोहन कारखानीस विरार स्टेशनमध्ये धावतच शिरला. नाही हो , कसली मुंबई मॅरेथॉनची प्रॅक्टिस ?? उपनगरात राहणारे नेहमीच बस आणि लोकलसाठी धावतच असतात. त्यात आमचे रोहन कारखानीससाहेब तर साध्या छोट्या कंपनीत अकाऊंटंट. म्हणणे अंगठा दाबून हजेरी लावणारे .तीन लेट मार्क झाले की एक कॅज्युअल लिव्ह गेली.म्हणजे वेळेवरची लोकल पकडण्यासाठी धावावेच लागेल ना ?? त्याच्या आडनावात कारखानीस असले तरी कोणत्याही कारखान्याशी संबंध येत नव्हता. 
कोकणातून मोठी स्वप्न बघून आलेला रोहन आता विरार चर्चगेट रोज लोकलचे धक्के खात प्रवास करीत होता.
8.40 ची नेहमीची लोकल नुकतीच प्लॅटफॉर्मवर येत होती.पाठीवरची सॅक पुढे पोटावर घेऊन तो नजर रोखून लोकलवर लक्ष ठेवू लागला.आपल्या देशातील खेळाडूंना निदान एक महिना तरी विरार चर्चगेट स्टेशनवर लोकल ट्रेन पकडायची ट्रेनिंग दिली पाहिजे .कोणाच्याच हातातून बॉल सुटणार नाही .एकदम सावध नजर होईल त्यांची.जवळ येणाऱ्या लोकलकडे पाहत त्याच्या मनात विचार आला आणि खुणेच्या ठिकाणी लोकल येताच उडी मारून दरवाजाचा मधला दांडा पकडून शरीर आत लोटून दिले. आणि नेहमीच्या विंडो सीटवर झेपावला .
"चला सुरवात तर चांगली झाली सकाळची "असा विचार करीतच त्याने ब्लुटूथ काढून कानात सरकविले .
" रोहन भाऊ , उठा आजपासून पुढील सहा दिवस हेच तुमच्या जागेवर बसणार आहेत." सदाशिव फडके हातातील छोट्या गणेश मूर्तीकडे नजर वेधत म्हणाले.
आयला ! होकी 8.40 विरार ग्रुप दरवर्षी गणेशोत्सव लोकलमध्येच साजरा करतो . त्यासाठी दोनशे रुपये वर्गणी ही रोहन देत होता. दरदिवशी सकाळी जाताना आणि संध्याकाळी येताना गणपतीची आरती व्हायची प्रसाद वाटला जायचा. भजन व्हायची .कोण मिमिक्री सादर करायचा .एकूण या लोकलमध्ये उत्साहाचे वातावरण असायचे .
बाप्पाची जबाबदारी सदाशिव फडकेकडे असायची .ते मूर्ती ऑफिसमध्ये ठेवायचे संध्याकाळी लोकलमधून घरी घेऊन जायचे पुन्हा सकाळी लोकलमधून प्रवास.
रोहनला हे सगळे आवडायचे. पण बाप्पाला आयतीच जागा मिळते याचा राग यायचा.
" च्यायला ! रोज कसरत करत जागा पकडायची आणि बाप्पा  आरामात येउन बसतो . बरे तेही शेवटपर्यंत .आम्ही कसे प्रवास करतो याचा अनुभव एकदातरी बाप्पाने घ्यावा परत खाली आल्यावर लोकलकडे बघणारसुद्धा नाही . मी काय म्हणतो याने आमचा प्रवास सुखाचा होवो इतकाच आशीर्वाद द्यावा " टाळ्या वाजवत रोहन मनाशी पुटपुटत होता.
आज गौरी आगमनाचा दिवस होता. स्टेशनवर आज जास्तच हिरवळ दिसत होती.गौरी आगमन आणि पूजनाला बऱ्याच स्त्रिया नटून थटूनच प्रवास करीत असत. 
 सकाळी रोहन  विरार स्टेशनवर हजर झाला . आज  8.40 ची विरार लोकल दोन मिनिटे लेटच होती.त्याचेच कारण की काय या वेळेत गर्दी जास्तच वाढली . 
त्या गर्दीत तो ही रोहनच्या बाजूलाच उभा होता. बाजूला एक वयस्कर स्त्री नऊवारी नेसून  हातात छोटे गाठोडे घेऊन उभी होती. इतकी गर्दी  पाहून ते दोघेही भांबावलेले  दिसत होते.
"नवीन का ?" रोहनने हसत विचारले .
" हो , पण तुम्हाला कसे कळले ?" तो तरुण आश्चर्याने म्हणाला . त्याचा कोपर्यावरच्या तुटलेला दात बोलताना दिसत होता.
" तुझी सॅक अजून पाठीवरच आहे . ती अजून पोटावर घेतली नाहीस त्यावरूनच कळले आणि या  मॅडमला घेऊन तू पुरुषांच्या डब्यात चढणार हे पाहून कळले " असे म्हणेपर्यंत गाडी जवळ आली आणि नेहमीच्या चपळाईने रोहन आत घुसलासुद्धा .
 त्याने ताबडतोब बरोबरच्या स्त्रीला पुढच्या लेडीज डब्यात पाठविले . पण तोपर्यंत त्याचे हाल बेकार झाले .चढताना त्याची सॅक खेचली गेली.पाठीवर गुद्दे पडले. चालताना दोघांच्या पायात पाय येऊन तो अडखळला .
कोणीतरी "अरे चढने को आता नही क्या "असे रागाने विचारत शर्ट खेचला .इतके होऊनही त्याला आत बसायला जागा मिळालीच नाही .नाईलाजाने दोन सीटच्या मध्ये तो उभा राहिला .इतक्यात एक माणूस त्याच्या जवळ येऊन म्हणाला " बाहेर हो ,इथे मी उभा राहतो " 
" च्यायला !  इथे उभे राहायचे ही नंबर आहेत की काय ?? "असा विचार करीत तो बाजूला झाला तर बाजूच्याने अजुन त्याला बाहेर ढकलले .
ट्रेन सुरू झाली . आपली आई तरी स्त्रियांच्या डब्यात व्यवस्थित असेल अशी आशा मनातच व्यक्त केली.
लांबूनच बाप्पाच्या आरतीचा आवाज ऐकू येऊ लागला तसा इथल्या प्रवाश्यानी ही ताल धरला . काहींनी तर त्यालाही जबरदस्तीने आरती म्हणायला लावली. आरती संपताच एका प्रवाश्याने बॅगेतून  साखर फुटाणे काढून सर्वाना  वाटायला सुरवात केली. 
" रोज असणार का या ट्रेनला ? " साखर फुटाणे त्याच्या हाती देत एकाने विचारले .तसे त्याने नकारार्थी मान हलवली.ठीक आहे ." नाहीतर उद्याचा प्रसाद तुलाच आणायला सांगितला असता " असे बोलून देणारा हसला.
" पण इथे बाप्पा कुठेय ?" त्याने आजूबाजूला पाहत विचारले . " शेजारच्या डब्यात आहे ना ? काय बारा डब्यात बारा बाप्पा आणायचे का ?  आपण त्या डब्यात आरती सुरू झाली की इथे ही करतो " तो प्रवासी हात जोडून म्हणाला. 
प्रत्येक स्टेशनवर ट्रेन थांबत होती. पण उतरणारे कमी आणि चढणारे जास्त.  तो चाहुबाजुनी पार चेपला गेला होता . बोरीवली आले आणि एक बसलेला प्रवासी उठला ताबडतोब त्याच्या जागेवर दुसरा प्रवासी बसला . "अरे ह्यानेच तर आपल्याला बाजूला केले होते. आता त्या जागेवर मी बसायला हवे होते " असा विचार करतोच तोच तो प्रवासी त्याच्याकडे पाहून हसला .
" हे आमचे रोजचेच आहे . याची सीट बोरीवलीला रिकामी होते .कधी कधी मला बसायला मिळाले की मीच त्याला सीट देतो नंतर मी बसतो " प्रवासी त्याला समजावत म्हणाला .
नंतर प्रत्येक स्टेशनवर बसलेला प्रवासी उठून दुसऱ्याला सीट देत होता . दादर सुटले तेव्हा कोणीतरी त्याच्या पाठीवर मारून आपली सीट दिली. तो हुश्श करीत बसला.
काहीवेळाने त्याला सदाशिव फडकेच्या कपाटात शिरताना पाहून उंदीर चपापला .
" आहो सर ! काय ही तुमची अवस्था ? आता रस्त्यावर मारामारी ही करू लागलात का ? जरा समोरच्या आरश्यात अवतार पहा तुमचा ? ती कॉलर उघडली आहे . केसांचा भाग गायब .शर्ट घामाटला आहे.इन उघडले आहे .शूजची लेस लोंबतेय .कशासाठी केलात हा पराक्रम " उंदीर सहानुभूतीने म्हणाला.
इतक्याच त्याच्या सोबतची स्त्री ही धापा टाकत त्या कपाटात शिरली .
"गौरी माते तुमची ही अवस्था कोणी केली " उंदीर चिडून शेपटी आपटत म्हणाला .
" गप रे तू ! उगाच फुशारकी मारत काही बोलू नकोस .ह्या तुझ्या मालकाला विचार काय झाले ते .त्याच्यामुळेच माझी अवस्था अशी झालीय."त्या स्त्रीने जोरदार धपाटा त्याच्या पाठीत मारत चिडून म्हटले.
होय ती त्याची गौरी माता होती. यावेळी त्याने स्वतः तिला घेऊन जायचे ठरविले होते.
" पण माते काय झाले ? तू तर स्त्रियांच्या डब्यातून प्रवास करीत होतीस "  तो खाली मान घालून विनयाने म्हणाला.
" कसला तो स्त्रियांचा डबा ? नुसती बजबजपुरी माजली होती तिथे. मला तर कुठच्या कुठे लोटून टाकले .हातातील गाठोडे खाली पडले तर त्यावरूनही पाय देऊन गेल्यात. एका रिकाम्या सीटवर बसायला गेले तर बाजूची म्हणाली  उठ दुसरीची सीट आहे ती .पुढच्या स्टेशनवर अजून स्त्रिया आत शिरल्या आणि प्रत्येकीला तुम्ही कुठे उतरणार असे विचारू लागल्या .माझ्या बाजूच्या स्त्रीने तर कोपऱ्यातील बाईला मी बसेन तुमच्या जागेवर अशी ऑर्डरच सोडली.बसलेल्या स्त्रिया तर तिथेच मेकअप करू लागल्या .तर काहींनी पालेभाजी निवडायला सुरवात केली.एकीने आपले पूर्ण केस व्यवस्थित सेट करून घेतले . त्या दादरपर्यंत हेच चालू होते मध्येच काहीजणी जागेवरून अश्या भांडू लागल्या की मला वाटले कोणीतरी चालत्या ट्रेनमधून फेकले जाईल " ती स्वतःला आरश्यात पाहत रागाने धुसफूसत म्हणाली .
तिचा चेहरा लालभडक झाला होता.कापळवरचे कुंकू पार विस्कटून गेले होते.साडीचा पदर एका बाजूने फाटला होता .
" अरे त्या रोहन कारखानीसने चॅलेंज केले मला . विरार लोकलमधून प्रवास करून दाखवा . मग मी ही पेटलो .इतके लोक प्रवास करतात मग मला का जमणार नाही ? चॅलेंज स्वीकारले  त्यात आई ही येणार होती म्हटले तिलाही लोकल प्रवास घडवू आणि घुसलो ट्रेनमध्ये . पण तुला सांगतो दोन मिनिटात हवा गेली बघ .कसे रे प्रवास करतात ही लोक ? कशी ती ट्रेन जीवावर उदार होऊन पकडतात .एकमेकांना ढकलतात काय ,दुसऱ्यांची सीट अडवतात काय ,सर्व काही विचित्रच आणि या गर्दीत माझी ही पूजा आरती चालूच आहेच . कसे जमते रे याना. "तो स्वतःचे दुखरे अंग दाबीत म्हणाला .
" मग करा की काहीतरी त्यांच्यासाठी ? "उंदीर कुत्सितपणे म्हणाला .
" मी काय करणार ? काही गोष्टी माझ्या हातात नाही ? मी देव आहे जादूगार नाही. पण यांचे रोजचे हाल मी उघड्या डोळ्याने पाहू शकणार नाही  " तो उदासपणे म्हणाला .
त्या दिवशी संध्याकाळी सदाशिव फडकेला ऑफिसमधून बाहेर पडायला थोडा उशीर झाला . ते प्लॅटफॉर्मवर आले तेव्हा विरार लोकल नुकतीच सुटत होती . एका हातात मूर्ती सांभाळत दुसऱ्या हाताने त्यांनी चालत्या लोकलचा दांडा पकडला पण दुसऱ्याचा धक्का लागून बाप्पाची मूर्ती खाली पडली आणि सरळ ट्रॅकवर गेली.
सदाशिव फडकेच्या लक्षात येईपर्यंत ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला ही होता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Monday, September 9, 2024

मॅकेनिक

मॅकेनिक
" गजा.. ,नालायका !  यावर्षी तरी गणपतीच्या कमीतकमी एक दिवस आधी घरात ये, नाहीतर पुढचे सात दिवस गणपतीचे पाय ही दृष्टीस पडू देणार नाही. " आईचा खणखणीत फोनवरचा आवाज ऐकून गजा समजून गेला यावर्षी काही खरे नाही. आई जास्तच सिरीयस होऊन बोलतेय. 
अहो, का बोलणार नाही ती..? गजानन पावसकर  मुंबईत गेली तीन वर्षे  एकटाच राहतोय. 
 मुळात कोकणातला गजानन उर्फ गजा गावात भागत नाही म्हणून मुंबईत नोकरीसाठी आला. दहावी पास हेच शिक्षण आणि बाईक चालविण्याचे लायसन्स हीच पात्रता.  शिक्षणात असा तसाच असणारा गजा काय पुढे शिकणार होता. त्यातच घरातली परिस्थिती जेमतेमच. 
दोन मोठ्या बहिणी संगिता आणि योगिता आणि त्यांच्या मागचा गजा. आईवडील गणेश भक्त. कोकणात घरोघरी गणपती बसवण्याची प्रथा फार पूर्वापारपासून चालू आहे. घरातल्या अडीअडचणी ऐकणारा, सोडवणारा त्यांचा  गणपती बाप्पा. त्याच्याकडेच तर नवस बोलले होते मुलासाठी आणि थोडी उशिरा का होईना बाप्पाने पण त्यांची प्रार्थना ऐकली.  तर नवसाने झालेला असा हा गजा. जास्तच लाडावलेला. पण वर्तणुकीने चांगला. म्हणून शिक्षण घेतलं नाही तरी घरात कोणी त्याला काही बोललं नाही. करेल काहीतरी पुढे मागे असं सर्वांनाच वाटत होतं. बहिणींची पण त्याच्यावर खूप माया. मोठ्या बहिणीचेही संगीताचे  दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्यानंतर ती शेती भातीच्या कामात मदतीला तयार झाली. नाकीडोळी सुरेख असणाऱ्या संगीताला शेती भातीच्या कामाचे हे चांगले वळण होते. त्यामुळे तिच्यासाठी लवकरच मागणी येऊ लागली.  योग्य वर येताच तिचे तसे लवकरच हात पिवळे करून देण्यात आले होते. मुलगा शेजारच्याच गावातला होता. गावातच त्याचे किराणा मालाचे दुकान होते.  ती तशी सुखात होती. कोकणात सासरी त्रास होत नाही म्हणजे ती सुखाने नांदतेय असेच म्हटले जायचे. कोकणात पैशाने श्रीमंत म्हणजे सुखी असे अजूनही समजले जात नाही. गावातलीच असल्यामुळे रीतीभाती जाणून होती त्यामुळे लवकरच ती सासरी रुळली.
आता दुसऱ्या मुलीसाठी योगितासाठी स्थळ शोधणे सुरू झाले.  शोधणे यासाठी कारण योगिता त्यामानाने शिकलेली होती. कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात होती. थोडी तिची मतं तयार झाली होती. तरीही आई-वडिलांच्या मतांचाही आदर करणारी होती. हुंडा द्यायचा प्रश्नच नव्हता पण पोरीच्या अंगावर दोन दागिने हवेत. त्यासाठी सध्या घरच्यांची जास्त मेहनत चालू होती. गजालाही  या सर्वांची जाणीव होतीच. त्याचाच परिणाम म्हणून गजा मुंबईत आला होता. 
आता दहावीच्या जीवावर कोणती नोकरी मिळणार? शेवटी गाववाल्याने डिलिव्हरी बॉय म्हणून एका कंपनीत चिकटवले आणि आपल्या सोबत राहण्याची सुद्धा सोय केली. 
शाळेतल्या एका खोलीत गावातलेच सात आठ जण एकत्र राहत होते. त्यामुळे सगळ्यांच्याच खर्चात थोडीफार बचत होत होती. गावातलेच असल्यामुळे सगळ्यांच्या खाण्याच्या  आवडीनिवडी जवळपास सारखाच होत्या. गप्पाटप्पा करत सगळेजण गुण्यागोविंदाने राहत होते.
गजाचे आईवडील साधे. अर्ध्या एकरात जमेल ते पिकवायचे. तीन  कलमं, एक फणस ,चार माड  यावरच उत्पन्न. पण गावात मान .प्रत्येक सण हौसेने साजरा करायचे.दारात आलेला जेवल्याशिवाय बाहेर जायचा नाही .गणपती उत्सवात तर धमाल असायची .
 पण गजा गेली दोन वर्षे गणपतीत उशिरा घरी येत होता.मागच्या वर्षी तर विसर्जनाच्या एक दिवस आधी घरात शिरला होता.म्हणून यावर्षी आईने आताच फोन करून लवकर येण्याची ऑर्डर दिली होती.
"आहो ,पोराक काय वाईट संगत तर लागली नसा ना ?" आईने रात्री झोपताना  काळजीने विषय काढला.
" गप गो ! काहीतरी काय बोलूक नको .आपलो झील हाय तो आणि नाव पण त्याच्या नावावरून ठेवलंय आपण .आता त्याची काळजी त्यालाच " देवघरातल्या गणपतीच्या मूर्तीकडे हात करीत बाबा म्हणाले आणि झोपेची तयारी करू लागले.
"आयला , मुलगा ह्यांचा.हेच मागे लागले मुलगा हवा म्हणून . चांगली माणसे आहेत ,दरवर्षी मनोभावे पूजा करतात म्हणून होय म्हटले तर माझ्याच अंगावर जबाबदारी टाकली " देवघरातील तो स्वतःशीच चिडून म्हणाला.बाजूला खुसखुस ऐकू आली म्हणून पाहिले तर उंदीर फुटाणे खात हसत होता.
"प्रत्येकवेळी तुम्हाला सांगतोय कोणाचेच ऐकू नका. लोक वाटेल ते मागतात आणि नंतर आपल्यालाच कामाला लावतात. तुम्ही तर भोळ्या वडिलांचे भोळे पुत्र.जाता त्यांना मदत करायला .आता तो जीवाची मुंबई करत असेल आणि त्याच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी तुमची " तो आपली शेपटी आपटत म्हणाला.
जगात सर्व बदलेल पण ह्याला कोणी बदलू शकत नाही.उंदराकडे पाहत त्याने हताशपणे मान डोलावली.
इकडे गजा मात्र टेन्शनमध्ये होता.यावर्षी बहिणीच्या लग्नासाठी जमेल तितके पैसे गोळा करायचे म्हणून जीवापाड मेहनत करीत होता. मोटारसायकल वरून पूर्ण मुंबईत डिलिव्हरी करत होता.रोज बारा ते पंधरा तास डिलिव्हरीची कामे करीत होता.त्यात सण आले की जास्त काम पण इंसेंटिव्हही जास्त मिळायचा . सणाच्या दिवशी बहुतेकजण दांडी मारायचे पण हा मुंबईत एकटा म्हणून यालाच कामाला जुंपायचे. त्यामुळेच दोन वर्षे गणपतीला उशिराच घरी जात होता.आईचा फोन येताच तो चिंतेत पडला.
" गजाभाऊ ,यावेळी खूप काम आहे हो " सकाळीच मॅनेजर साहेबांनी संभाव्य धोक्याची कल्पना दिली .
" साहेब यावर्षी  गणपतीच्या दोन दिवस आधी घरी जायचे आहे .मला सुट्टी लवकर हवीय" गजा केविलवाणा चेहरा करीत म्हणाला .
" दिली असती हो, पण यावेळी एका कंपनीचे लाडूचे बॉक्स वाटायची मोठी ऑर्डर मिळाली आहे . ती ऑर्डर जितक्या लवकर पूर्ण कराल तितक्या लवकर मोकळे करेन मी तुम्हाला .बस फक्त तीच ऑर्डर पूर्ण करा .ऑर्डर मुंबईतलीच आहे पण पूर्ण मुंबईत फिरावे लागेल " मॅनेजर छद्मी हसत म्हणाला .
" फक्त एकच ऑर्डर ना ? मग हरकत नाही "गजा उत्साहाने म्हणाला .
"ऑर्डर चोवीस तास चालू आहे. जितक्या लवकर करशील तितक्या लवकर मोकळा होशील " मॅनेजर म्हणाला.
गजाने खुश होऊन ऑर्डर स्वीकारली आणि बाईकला किक मारली.पुढचे दोन दिवस तो ऑर्डर डिलिव्हरी करत होता.
कोणा एका श्रीमंताने उकडीचे मोदक आपल्या आप्तजनांना आणि मित्रांना घरपोच डिलिव्हरी करण्याचे ठरविले होते.तीच ऑर्डर गजा डिलिव्हर करत होता. 
गणपती आगमनाला दोन दिवस राहिले होते.बहिणीच्या लग्नाची बोलणी ही त्याचवेळी होणार आहेत म्हणून घरी हजर राहा अशी धमकीवजा सूचनाही घरून आली होती.
आता रात्रीचे दोन वाजले होते . डिलिव्हरी करून तो घरीच निघाला होता .अचानक त्याला डुलकी लागली आणि बाईक रस्त्यावरून उतरली.वेळीच सावध होऊन त्याने बाईक कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण ती घसरत गेलीच . त्याला फारसे लागले नाही पण बाईकची मोडतोड झालीच .
" देवा आता काय करू ? बाईकची अवस्था पाहता  एक दिवस तरी गॅरेजमध्ये जाणार हे निश्चित . म्हणजे डिलिव्हरी अजून दोन दिवस पुढे जाणार .
हताश होऊन तो रस्त्याच्या कडेला बसला. अधून मधून एखादं दुसरे वाहन जात होते पण ही मुंबई आहे .उगाच कोणासाठी थांबणार नाही.पण तो तरुण गजाला पाहून थांबला .
" आपटली का ?" बाईककडे पाहत त्याने विचारले ."चल टो करून नेऊ ."
त्याने  बाईक पायाने ढकलत जवळच्या गॅरेजमध्ये आणली .गॅरेज कसले ते .एका झाडाखाली पत्र्याची उघडी शेड होती.दोन टायर, एक पाण्याचे पिंप आणि चार पाच उंदीर इकडे तिकडे फिरत होते.
" मी विनायक ,या गॅरेजचा मालक ." त्याने बाईक स्टॅण्डला लावून तिचे निरीक्षण करत सांगितले.
" गॅरेज ? " गजाने भुवया उंचवीत विचारले.
समोरचा तरुण थोडासा अंगाने सुटलेला ,बुटका होता.कान वाजवीपेक्षा जास्तच मोठे होते. हसताना तुटलेला दात दिसत होता. खोचक बोलत होता पण डोळ्यात शांत भाव होते.
" हो .काय हरकत आहे ? गॅरेज म्हटले की गाड्या दिसायला हव्याच का " त्याने खिशातील चपातीचा तुकडा उंदरांच्या दिशेने फेकत विचारले. 
" गाडी आता होणार नाही .दोन दिवस लागतील ." त्याने जाहीर केले.
" च्यायला ,उद्या माझ्या डिलिव्हरी आहेत हो" उद्याचे काम संपले की परवा गावी निघतोय .यावर्षी गणपतीच्या आधी घरात पाहिजे अशी घरच्यांची ऑर्डर आहे ".गजा कळवळून म्हणाला.
"मग मी काय करू ?  मला ही जायचंय गणपतीला चार लोकांच्या घरी. पण हे मी तुला सांगितले का " तो चिडक्या स्वरात म्हणाला .
"पण एक होईल . तो कपाळावर बोटे मारीत म्हणाला.  " तू माझी बाईक घे .उद्याची डिलिव्हरी पूर्ण कर आणि गावाला जाण्यापूर्वी बाईक परत कर. तोपर्यंत मी तुझी बाईक तयार करून ठेवीन " 
" चालेल, " गजा आनंदाने ओरडला आणि मन बदलायच्या आत त्याची बाईक घेऊन निघालाही.
दुसऱ्या दिवशी रात्री गजा बाईक घेऊन त्या गॅरेजमध्ये आला .विनायक त्याची बाईक चेक करत होता .
" ही बघ झाली तुझी बाईक तयार "त्याने गजाच्या हातात चावी दिली.
गजाने हात जोडले आणि हातातील लाडूचा बॉक्स त्याच्या हाती दिला.
"अरे ह्याच बॉक्सची डिलिव्हरी करत होतास का ?" विनायक लाडूचा बॉक्स हातात घेऊन म्हणाला.
" होय  मालकाने सर्व डिलिव्हरी वेळेत पूर्ण केल्या म्हणून मलापण एक बॉक्स दिला. पण तुमच्या मदतीशिवाय हे पूर्ण झाले नसते म्हणून या बॉक्सचा मान तुमचा " गजा हात जोडून म्हणाला.
" पण इतकी काय घाई आहे गावी जायची ?" विनायकने विचारले.
" बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमविले आहेत.ते गणपतीच्या पुढ्यात ठेवायची इच्छा आहे. आईबाबांना शब्द दिला होता मुंबई जाऊन कष्ट करून पैसे साठविन आणि तेच बहिणीच्या लग्नाला देईन त्यासाठी गेली तीन वर्षे मुंबईत राहतोय.दोन वर्षे तर गणपतीच्या विसर्जनालाच गेलो. पण बाप्पाला घरी आणण्यात जे सुख आणि आनंद आहे ते विसर्जनात नाही.आता बहिणीच्या लग्नाला गावी जाईन तो पुन्हा मुंबईत येणार नाही.आपला गाव बरा" गजा डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला.
" अरे पण माझ्या बाईकबद्दल  काही सांगितले नाहीस.कशी वाटली ?  " तो आपल्या बाईककडे वळत म्हणाला.
" तुमची बाईक स्पीड घेत नाही .सतत बुजत असते .मध्येच स्पीड घेते तर मध्येच हळू होते.आणि चीचीची असा इंजिन मधून आवाज येतो. त्या पेट्रोल टॅंकवर लावलेल्या उंदरांच्या चित्रसारखीच बाईक वागते" गजा हसत उत्तरला.
चेहरा पाडून विनायकने  पाठ वळवली.
" ही असली मॅकेनिकची काम करायला तुम्ही चार दिवस आधीच इथे आलात का ? बरे तू काम करतोस आणि मला ही कामाला लावलेस. त्याला पाठीवर बसवून अर्धी मुंबई फिरलो मी. ती पृथ्वी प्रदक्षिणा घातली तेव्हाही इतका दमलो नव्हतो. " उंदीर पाठीवर शेपटी आपटत कुरकुरला.
 पण यावर्षी गजाच्या डोक्यावर बसून घरात शिरताना तो जास्तच खुश होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर