Friday, October 28, 2022

अंजान

अंजान स्पेशल क्राईम युनिट
डिस्कव्हरी + 
गोव्यातील तो बीच झपाटलेला बीच म्हणून ओळखला जात होता. रात्री त्या बीचवर कोणीही जात नव्हते.पण त्या दिवशी ते तीन मित्र दारू प्यायला बीचवर आले होते.त्यातील एक तिकडच्या आमदाराचा मुलगा होता . अचानक त्यांना तिथे एक मच्छीमार स्त्री दिसून आली . ती हळूहळू एका पडक्या होडीच्या दिशेने चालू लागली.आमदाराचा मुलगा संमोहित झाल्यासारखा तिच्यामागे चालू लागला आणि गायब झाला. 
स्पेशल क्राईम युनिटच्या एसीपी विक्रांतकडे ही केस दिली गेली. तो गोव्यात आला तेव्हा आमदाराचा मोठा मुलगा ही काही महिन्यांपूर्वी गायब झाल्याचे त्याला आढळून आले . तसेच इतर काहीजणही तिथे असेच गायब झाले होते. गायब झालेल्या व्यक्तींचा काहीही तपास लागला नव्हता.
विक्रांत गावात फिरून चौकशी करू लागला. मध्येमध्ये त्याला एक शाळकरी मुलगा खुणावू लागला . चौकशी दरम्यान त्याला असे कळले की काही महिन्यांपूर्वी एक मच्छीमार आपल्या होडीत मृतावस्थेत सापडला होता आणि त्या नंतर त्याच्या बायकोने आपल्या मुलांसोबत आत्महत्या केली होती. बीचवर जी स्त्री आमदाराच्या मुलाला दिसली होती ती त्या मच्छीमाराचीच पत्नी होती.
असे काय कारण होते की गावातील मोजकीच माणसे गायब होत होती ?? विक्रांत हे शोधून काढेल का ?
नॅशनल पार्कच्या त्या रस्त्याने रात्री कोणीच जात नव्हते .पण त्या दिवशी एका डीजीपीचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत त्या रस्त्याने निघाला .वाटेत त्याला ती लिफ्टसाठी उभी असलेली दिसली.एक सुंदर तरुणी नववधूच्या पोशाखात हातात जड बॅग घेऊन उभी होती.तो तसाच पुढे निघाला आणि पुढच्या वळणावर ती त्याच्या गाडीसमोरच आली. त्या नंतर तो नाहीसा झाला . एसीपी विक्रांतकडे ते प्रकरण सोपवले गेले.  विक्रांतने त्याला शोधून काढले त्यावेळी तो स्वतःशी बडबडत झाडावर काही विचित्र खुणा काढत होता . भूतप्रेत या गोष्टींवर विश्वास नसलेला विक्रांत या केसकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहू लागला . एका बंद पडलेल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीचा फोटो सापडला . दहा वर्षांपासून  ती मुलगी मिसिंग होती.चौकशी करताना कळले की तिच्या लग्नाच्या दिवशीच दागिने घेऊन पळून गेली होती .
मग ती मुलगी त्याच रस्त्यावर आताही कशी दिसते ? त्या भागात काही लोक नाहीसे झाले होते. त्यांचा तर तिच्याशी काही संबंध नसेल ?? विक्रांत ही केस सोडवू शकेल ??
 एसीपी विक्रांतच्या भूमिकेत गश्मीर महाजनीने दमदार अभिनय केला आहे .पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत तो फिट बसतो. ही सिरीजमध्ये अनेक गूढ भयकथा आहेत.काही अतर्क्य अमानवी आहेत .कथेचे सादरीकरण अतिशय सुंदर आहे . कधीकधी काही सिन पाहताना भीती वाटते .
ज्यांना भयकथा गूढकथा आवडतात त्यांना ही सिरीज नक्की आवडेल . 

Thursday, October 20, 2022

द रीडर

द रीडर
बर्नार्ड शिंल्क
अनुवाद..अंबिका सरकार 
दुसरे महायुद्ध आठवले की हिटलर आणि त्याच्या छळछावण्यांचीच आठवण होते.आतापर्यंत या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.पण हे पुस्तक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर वेगळे ठरते.ही एक प्रेमकहाणी आहे .ही नुसती प्रेमकथा नाही तर त्यामागे एक गूढता आहे.
कादंबरी तीन भागात घडते .पहिल्या भागात लेखकाचे बालपण आणि त्यात त्याची नायिकेशी असलेले संबंध यावर आहे.नायक हा पंधरा वर्षाचा शाळेत जाणारा विद्यार्थी आहे तर नायिका ट्राममध्ये कंडक्टर आहे.ती साधारण पस्तीस वर्षाची असेल. नायक आणि नायिकेचे प्रेमसंबंध असतात.त्यांच्यात लैंगिक संबंध ही असतात. ती निरक्षर आहे .त्याच्याकडून वेगवेगळी पुस्तके वाचून घेते .त्यावर चर्चा करते. हे सगळे व्यवस्थित चालू असताना ती अचानक निघून जाते. इथे पहिला भाग संपतो.
दुसऱ्या भागात नायक आता मोठा झालाय.तो कायद्याचा अभ्यास करतोय. काही नाझी एसएस महिला अधिकाऱ्यांवर ज्यू अत्याचाराचा खटला चालू आहे .नायकाला तिथे ती आरोपी म्हणून दिसते. तो संपूर्ण खटला हजर राहतो तिचे निरीक्षण करतो .तीही त्याला पहाते पण लक्ष देत नाही . ती तिच्यावर असलेल्या आरोपाचे खंडन करत नाही. तिचा आरोप सिद्ध होतो आणि तिला जन्मठेपेची शिक्षा होते.
तिसऱ्या भागात नायक वकील झाला आहे. तो नायिकेला अजूनही विसरला नाही .त्याने पुन्हा तिच्या आवडीची पुस्तके वाचायला सुरुवात केली.ती पुस्तके आपल्या आवाजात रेकॉर्ड करून तिला पाठवतो. रिप्लाय म्हणून ती त्याला दोन ओळींचे पत्र पाठवते.त्यानंतर ती त्याला पत्रे पाठवीत राहते. त्याच्याशी चर्चा करण्यासाठी  ती लिहायला वाचायला शिकते. पत्राद्वारे त्याच्याशी वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करते.
शेवटी तिची तुरुंगातून सुटका होण्याचा दिवस नक्की होतो.त्यावेळी तुरुंगाधिकारी नायकाला बाहेरच्या जगात तिची सोय करशील का म्हणून विचारते.त्यावेळी तो तिला भेटायला तुरुंगात येतो.बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची प्रत्यक्षात भेट होते.ती अजूनही त्याला बच्चू म्हणूनच हाक मारते. तो तिच्यासाठी घर शोधतो. नोकरी शोधतो  आणि उत्सुकतेने तिच्या सुटकेची वाट पाहत राहतो.पण ....
 तुरुंगातून सुटका झाल्यावर ती पुन्हा त्याच्यासोबत राहील का ??  तिने खरोखरच छळ छावणीत काही गुन्हे केले होते का ?? ज्या गुन्ह्याची शिक्षा  ती भोगतेय त्यामागील सत्य काय आहे ?? एका नाझी महिला अधिकाऱ्याला जग स्वीकारेल .?? यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला शेवटी मिळतील.

Friday, October 14, 2022

कलिंगसंहाराचा न्याय ...श्रेयस भावे

चाणक्य- चंद्रगुप्त- अशोक - त्रिधारा
कादंबरी ...३
कलिंगसंहाराचा न्याय ...श्रेयस भावे
अनुवाद...शिरीष सहस्त्रबुद्धे
चाणक्य चित्रगुप्त अशोक या त्रिधारेतील हे तिसरे पुस्तक 
ही कादंबरी संपूर्णपणे सम्राट अशोक आणि आचार्य चाणक्यभोवती फिरते. सम्राट बिंदुसारनंतर त्याच्या शेकडो पुत्रांपैकी अशोक हा नावडता पुत्र राजा झाला आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आचार्य चाणक्याचा त्याला पाठिंबा होता. सम्राट अशोकाची उमेदीची वर्षे युद्ध करण्यात गेली.नंतर तो राज्यकारभारात लक्ष देऊ लागला . पण त्याच्या राज्यकारभाराची पद्धत महाआमत्य आचार्य चाणक्याला पसंद नव्हती. त्याने आपली चाणक्यनीती वापरून सम्राट अशोकला स्त्री आणि मदिराची चटक लावली.आता सम्राट अशोक पूर्वीसारखा चपळ राहिला नाही. त्याचे पोट वाढले हालचाली मंदावल्या. तो सतत स्त्री सहवास आणि दारूच्या नशेत राहू लागला. त्यात त्याने जिच्यावर जीवापाड प्रेम केले ती देवी त्याची प्रेयसी जळून मरण पावली.नाईलाजाने त्याने दुसरे लग्न केले .
सम्राट अशोक हा मौर्य सम्राट चंद्रगुप्त याचा नातू .आर्य चाणक्यने अखंड भारताचे स्वप्न पाहिले आणि ते चंद्रगुप्ताच्या मदतीने पूर्णत्वास नेले .त्यासाठी त्याने अनेक कुटील कारस्थाने केली. मार्गात आडवे येणाऱ्यांची गय केली नाही. 
कलिंग राज्य मौर्य साम्राज्यात यावे यासाठी त्याने अनेक वर्षाची योजना आखली होती.संपूर्ण कलिंग राज्यात त्याचे हेर अनेक वर्षे कार्यरत होते.
शेवटी तो दिवस आलाच. त्या दिवशी मौर्य सेनेने पूर्ण ताकदीने कलिंगाच्या सेनेवर हल्ला केला. कलिंग सेनेनेही पूर्ण ताकदीनिशी त्यांना प्रत्युत्तर दिले.या युद्धात सम्राट अशोकने प्रत्यक्ष भाग घेतला नाही .पण युद्ध संपल्यावर तो रणभूमीवर आला आणि प्रचंड नरसंहार पाहून हादरला. त्याचे अनेक आप्त स्वकीय मित्र इतकेच नव्हे जीला मृत समजत होता ती त्याची प्रेयसी देवीही होती. या युद्धानंतरच त्याचे मनपरिवर्तन झाले आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला.
 या कादंबरीत महाअमात्य आचार्य चाणक्य यांची ही प्रमुख भूमिका आहे .शंभर वर्षाचा हा म्हातारा आज चाकाच्या खुर्चीवर बसून कुशल राजनीती करतो. जे त्याला हवे तो ते कोणत्याही मार्गाने घडवून आणत असतो.त्याच्या हालचाली मंद झाल्या आहेत पण डोके अजूनही तल्लख आहे. सम्राट अशोकचा ही तो नावडता आहे. राज्य भावनेने नाही तर कठोर होऊन चालवावे लागते हीच चाणक्याची भूमिका आहे.अखंड भारत घडविण्यास तो काहीही करू शकतो आणि कोणत्याही  थराला जाऊ शकतो.
एक वाचनीय सुंदर कादंबरी

Friday, October 7, 2022

2019 मोदींनी भारत कसा जिंकला ?..राजदीप सरदेसाई

2019 मोदींनी भारत कसा जिंकला ?..राजदीप सरदेसाई 
अनुवाद....मीना कर्णिक 
अक्षर प्रकाशन
राजदीप सरदेसाई हे टेलव्हिजन न्यूज मिडियातील जेष्ठ नाव . पंतप्रधान मोदी ,अमित शहा ,आणि देशातील मातब्बर राजकारणी त्यांना प्रत्यक्ष नावानी ओळखतात.भारतीय राजकारणाचा त्यांना दांडगा अभ्यास आहे.
या पुस्तकात त्यांनी मोदींनी 2019 च्या निवडणुकीत कसा दणदणीत विजय मिळवला याचे सविस्तर वर्णन केले आहे. या निवडणुकीसाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.यात कार्पोरेट पद्धतीचे सुनियोजित नियोजन होते. यात नैतिक अनैतिकच्या सीमारेषा पुसल्या गेल्या होत्या.यासाठी प्रचंड संपत्ती आणि साधनांचा वापर केला गेला होता.काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच हाच एकमेव उद्देश यात होता.
जिथे वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता होती तिथे भाजपने कसा विजय मिळवला.? पाच वर्षात पुन्हा एकदा विरोधकांच्या पुढे जाणे भाजपाला कसे शक्य झाले ? निवडणुकीचा मुख्य मुद्दा कोणता होता ? 
हे निवडणूक युद्ध  मोदी शहानी कसे जिंकले याचे रोमांचकारी विश्लेषण राजदीप सरदेसाई यांनी केले आहे. 

Tuesday, September 27, 2022

पांढरा रंग

पांढरा रंग 
 गाव तसे छोटेच होते.मुख्य शहरापासून थोडे लांब आणि आडवाटेवर .गावाची लोकसंख्याही मर्यादित होती. गावात सर्व धर्म समभाव वागणूक होती.  आता कमी लोकसंख्येमुळे काय जातीभेद , धर्मभेद पाळणार म्हणा . गावात ईद , गणपती,  ख्रिसमस जोरात साजरे व्हायचे. त्यावेळी मात्र गावात नुसती गर्दी दिसायची .
आजपासून गावात नवरात्र उत्सव सुरू होणार होता.गावातील तरुण वर्ग  नुसता उत्साहाने सळसळत होता. सणांच्या वेळीच त्यांना एकत्र येण्याची संधी मिळत होती.उत्सव समितीने रोजचे रंग प्रसिद्ध केले होते.आता त्याप्रमाणे रोज त्यात्या रंगाच्या साड्या , ड्रेस  नेसायला सुरवात होणार होती.
आजचा रंग होता पांढरा. उत्सव समितीने आज गरबा नृत्याचे आयोजन केले होते. पण गरबा नृत्यात भाग घेणाऱ्यांनी पांढरा पोशाख नेसला पाहिजे अशी अटही ठेवली होती.
संध्याकाळ झाली तशी देवीच्या पटांगणात गर्दी जमा होऊ लागली. डीजे ही तयार होता. सर्व स्त्री पुरुष पांढरे कपडे घालून हळूहळू डीजेच्या तालावर ठेका धरू लागले. हळूहळू गर्दी वाढू लागली  प्रत्येकाच्या अंगात गरबा भिनू लागला .बेफाम होऊन सर्व नाचत होते. 

आजच्या  गर्दीत त्या दोन तरुणी उठून दिसत होत्या .पांढरी शुभ्र साडी ,मोकळे केस ,कपाळावर देवीचा मोठा टिळा,गळ्यात पांढरी माळ अश्या पेहरावात त्या मोकळेपणाने हसत धुंद होऊन नाचत होत्या .काही तरुण तर त्यांच्याभोवतीच  नाचत होते आणि त्याही प्रतिसाद देत होत्या .
गावात काही वेळेचे बंधन नव्हते .त्यामुळे मध्यरात्र उलटून गेली तरी गरबा चालूच होता . हळूहळू त्या तरुणींच्या भोवती तरुणांचा घोळका वाढू लागला . त्यातील दोन तरुणांनी त्यांना हेतुपूर्वक एका कोपऱ्यात ढकलत नेले. नाचण्याच्या नादात त्यांच्याही लक्षात आले नाही .
शेवटी नाच थांबवून ते तरुण त्यांच्या जवळ गेले.
"या गावातल्या दिसत नाही तुम्ही ? " एकाने विचारले .
"ही इथलीच आहे .एकीकडे बोट दाखवून दुसरी म्हणाली , मी शेजारच्या गावची, हिची मैत्रिण ."
"मग आता काय विचार आहे .? तिच्याजवळ सरकत एक तरुण गूढ हसत म्हणाला .
"इथे नको . घरी जाऊ .मी काय एकटी घरी जाऊ का ? मला  सोडून परत या "  दुसरी डोळ्याने सूचक इशारा करीत म्हणाली .
ते दोघे खुश झाले ."चला निघू "असे म्हणून सर्व निघाले .
गप्पा मारत मारत कधी गावाबाहेर आले ते त्यांना कळलेच नाही . अचानक एका मोठ्या झाडाच्या पारावर त्या थांबल्या .
" थोडे थांबूया इथे ,एक म्हणाली .नाचून आणि चालून पाय दुखले माझे ."
" इथे नको ," ते दोघेही घाबरत म्हणाले ."इथे स्मशान आहे .आपण पुढे जाऊ ."
"मग काय झाले . गेली कित्येक वर्षे आम्ही इथेच राहतोय. ही या झाडावर राहते आणि मी त्या स्मशानात . यावेळी पहिल्याच दिवशी पांढरा रंग होता .म्हटले आपण गेली शेकडो वर्षे पांढऱ्या रंगाचे ड्रेस घालून फिरतोय मग त्याच ड्रेसवर गरबा खेळायला जाऊ .आता उद्यापासून पुन्हा इथेच बसून गरबा बघणार .चला येतायत ना ?" असे म्हणून एक स्मशानात शिरली तर दुसरी मोठ्याने हसत झाडावर चढून गेली.
दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना एक तरुण स्मशानात तर दुसरा वडाच्या पारावर बेशुद्धावस्थेत आढळले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, September 25, 2022

क्रिमिनल जस्टिस 2

क्रिमिनल जस्टिस 2
बिहाईंड क्लोज डोअर

बिक्रम चंद्रा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी वकील आहे. पत्नी अनुराधा आणि बारा वर्षाची  मुलगी रिया यांच्यासोबत एक छान आयुष्य जगतोय. 
अनुराधा  डिप्रेशनमध्ये आहे आणि तिचे एका  मानसोपचारतज्ञाकडे उपचारही चालू आहेत. अनुराधा  एकलकोंडी बनली आहे. सतत गोंधळलेली आणि विसारळू  बनली आहे असे तो म्हणतो.त्याने तसे आपल्या आईला आणि सासऱ्यांना ही सांगितले आहे.
आजच बिक्रमने  एक खूप  गाजलेली केस जिंकली आणि तो आनंदात घरी आला .आल्यावर त्याने पत्नीचा वॉर्डरोब चेक केला .त्यातील वस्तूंचे फोटो काढले. तिच्या गाडीचे किलोमीटर चेक केले. फोन चेक केला . त्यानंतर त्याने तिला आईसस्क्रिम आणले का ? म्हणून विचारले. आईसस्क्रीमचे तिच्या लक्षात नव्हते म्हणून स्वतः जाऊन आईसक्रिम घेऊन आला . रात्री तिघेही एकत्र जेवले .
मध्यरात्री रियाला कसल्याश्या आवाजाने जाग आली . तिने बेडरूमचा दरवाजा उघडून पाहिला तर तिची आई बाहेर  जात होती. म्हणून ती त्यांच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिचे वडील जखमी अवस्थेत बेडवर पडले होते. त्यांच्या कुशीत सुरा भोसकला होता .भीतीने तिने तो सुरा बाहेर काढला आणि रक्ताची धार सुरू झाली.घाबरून तिने आपल्या आजीला फोन केला .
थोड्या वेळाने पोलीस  हजर झाले आणि बिक्रम चंद्राला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. थोड्याच वेळाने अनुराधाने त्याच्याजवळ येऊन सॉरी म्हटले आणि काही वेळाने बिक्रम चंद्रा मृत्यू पावला.
 रियाच्या जबानीनुसार पोलिसांनी अनुराधाला अटक केली. तिचा गाऊन रक्ताने माखला  होता . तिने आपण नवऱ्यावर  चाकूने वार केले हे  कबूल केले. 
तिचा बाप पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला .पोलिसांनी त्याला जामिनासाठी वकिलाची मदत घेण्यास सांगितले. बिक्रम चंद्रासारख्या वकीलावर हल्ला झालाय तेव्हा त्याच्या विरोधात कोणताही वकील केस लढणार नाही हे निश्चित होते.इतक्या रात्री कुठून वकील आणायचा या चिंतेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने माधव मिश्राला फोन केला .
माधव मिश्राचे लग्न झालेय .आज त्यांची पहिली रात्र आहे . त्याचवेळी त्याचा फोन वाजतो आणि त्याला केस घेणार का ? असे विचारले जाते. समोरची पार्टी तगडी मालदार असेल या आशेने  माधव तडक मुंबईला निघतो.
केस फारच सोपी आणि सरळ असते. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केला आहे.सर्व पुरावे अनुराधाच्या विरुद्ध आहे . सोशल मीडिया ,प्रेस सर्व अनुराधावर तुटून पडलेत.तिला तुरुंगातही त्रास होतोय.त्यात ती गरोदर असल्याची बातमी येते. अनुराधा काहीही बोलायला तयार नाही . माधव मिश्राला फक्त खुनाचा हेतू शोधायचा आहे.
अनुराधाविषयीची सगळी माहिती गोळा करायला माधव मिश्रा सुरवात करतो .त्याला साथ मिळते ती एका नवोदित हुशार स्त्री वकिल निखटची .निखटने माधव मिश्राला आधीच्या केसमध्येही मदत केलेली असते आणि त्याचा परिणाम नोकरी जाण्यात होते.आता ती पुन्हा जॉब शोधतेय .माधव पुन्हा तिला सहाय्यक बनण्याची विनंती करतो आणि ती स्वीकारते.
दोघे मिळून अनुराधाच्या केसचा पहिल्यापासून तपास करतात.त्यात त्यांना काही धक्कादायक गोष्टी कळतात.इथे तुरुंगात अनुराधा मुलीला जन्म देते. पण अजूनही ती खुनाचा हेतू सांगायला तयार नाही .
शेवटी असे काय घडते की भर कोर्टात अनुराधाला तोंड उघण्यास भाग पडते. का करते अनुराधा आपल्या पतीचा खून ??
नेहमीप्रमाणे पंकज त्रिपाठी माधव मिश्राच्या भूमिकेत भाव खाऊन गेलाय.संपूर्ण सिरीजच त्याच्या खांद्यावर आहे. अनुप्रिया गोयंका निखटच्या भूमिकेत शोभून दिसते.पंकज त्रिपाठीच्या समोर यावेळी आशिष विद्यार्थी सरकारी वकील म्हणून उभा राहिलाय .कीर्ती कुल्हारी अनुराधा चंद्राच्या भूमिकेत फिट बसते.

अभिनय

अभिनय
"आजी ,उद्या शूट आहे.फिल्मसिटी सेट तीनला . सकाळी दहा वाजता या आठवणीने ". दरवाजा उघडून आत येत त्या तरुणाने तिला निरोप दिला . तसे तिने डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहून मान डोलावली. 
तिचा होकार पाहून तो हसला. " किती दिवस शूटिंग आहे रे " तिने हातानेच चहाची खूण करत त्याला विचारले.
"असेल दोन दिवस तरी . तुला माहितीय हल्ली प्रत्येक गोष्ट काही एका एपिसोडमध्ये संपत नाही . दोन तीन एपिसोड तरी होतील ". तो मोठ्याने हसत म्हणाला ." ये वेळेवर आणि हो येताना  टॅक्सीभाडे लावायचे विसरू नकोस ." त्याने आठवण करून दिली आणि निघून गेला.
तो गेल्यावर बंद त्या दरवाजाकडे पाहत ती कितीतरी वेळ गप्प बसून होती. ती साधारण सत्तरीच्या जवळपास होती. एकटीच राहायची . म्हणजे नवरा पूर्वीच गेला होता. नंतर एकुलता एक मुलगा ही गेला . अंगात थोडे अभिनयाचे गुण होते . त्यावर कधीकधी छोटीमोठी कामे मिळायची तिला.  
हल्ली टीव्ही सिरियलमुळे कामाची कमी नव्हती त्यामुळे जिथे काम मिळेल तिथे जायची. आपल्यावर तिचा बोजा नको म्हणून नातेवाईक ही टाळत होते तिला.
आज सकाळपासूनच तिच्या अंगात थोडी कणकण जाणवत होती.पुढे ताप आला तर कोणाला त्रास नको म्हणून गोळी घेऊन थोडी पडली  तेव्हाच हा निरोप आला .
सकाळी लवकर उठली तरी अंग दुखत होतेच. घाईघाईने तयार होऊन ती सेटवर वेळेवर पोचली. तिला पाहताच तो कालचा तरुण जवळ आला .
" वेळेवर आलीस आजी " असे म्हणून सरळ सेटवर घेऊन गेला . आज सेटवर दुःखद वातावरण दिसत होते. बरेचसे कलाकार पांढऱ्या कपड्यात वावरत होते. अच्छा म्हणजे आज मरणाचा सीन आहे तर. चला म्हणजे दुःखी चेहरा करून कोपऱ्यात बसायचे इतकेच काम तर. बरे झाले . असे मनात म्हणत ती सेटवर फिरू लागली .
इतक्यात तो तरुण पुन्हा आला " आजी, त्या चटईवर झोप. प्रेतासारखे . आज तुलाच मेलेल्या आजीची ऍक्टिग करायची आहे. आज सेलिब्रिटी आहेस तू ." असे म्हणून मोठ्याने हसला. तशी ती चमकलीच .
" अरे पण किती दिवस असे प्रेतासारखे पडून राहायचे. कंटाळा येईल रे " ती केविलवाणा चेहरा करीत म्हणाली. "काळजी नको, आज दिवसभरात करून टाकू .एकदा का तुला चितेवर झोपवून अग्नी दिला की तुझे काम संपले." तो सहज स्वरात म्हणाला .
तिने डोळे वटारत त्याच्याकडे पाहिले आणि मुकाटपणे त्याने दाखविलेल्या जागेवर झोपली . हळूहळू एक एक सेलिब्रिटी कलाकार तिच्या शेजारी येऊन गोलाकार बसू लागले. सगळ्यांनी पांढरे ड्रेस चढविले होते. ती त्या कलाकारांना पाहून खुश झाली . सगळेच टीव्ही सिरियलचे मोठे कलाकार होते आणि आज तिच्यासाठी रडणार होते. नेहमीच भरपूर दागिने आणि उंची साड्या नेसणार्या , एकमेकींच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या स्त्रिया आज डोळ्याला पदर लावून रडत होत्या .एकीने सासूबाई असे मोठ्याने ओरडत तिला मिठी मारली त्यात  हातातली बांगडी जोरात तिच्या मानेजवळ टोचली . त्या मोठ्या आवाजात  मग तिनेही आई ग करीत ओरडून घेतले.
" मॅडम , इतकेही प्रेम दाखवू नका हो की प्रेताच्या मानेतून रक्त येईल." डायरेक्टर हसत ओरडला.तसे तिच्यासकट सगळेच हसू लागले.
"बघत होते आजीला खरोखरच प्रेताचा अभिनय येतोय का ?"  ती अभिनेत्री हसत हसत म्हणाली.
दुःखी असलेले वातावरण अचानक हलके झाले.सगळे इथेतिथे पसरले.काहीजण सिगारेट ओढू लागले तर काही चहासाठी गेले. बराच वेळ झोपून राहिल्यामुळे हिचे अंग आखडून गेले होते. ती उठून उभी राहिली आणि सेटवर फेऱ्या मारू लागली.
"आजी ,काही त्रास नाही ना ?  सेलिब्रिटी तुमच्या मरणावर रडतायत .भाग्यवान आहात." तो हसून म्हणाला. तशी तीही हसली.
पुन्हा शूटिंग सुरू झाले .यावेळी बरेचजण रडत होते. तिच्याविषयी चांगले बोलत होते.तिला आंघोळ घालून भरजरी साडी नेसवली गेली.दागिने चढविले गेले.
साडी तर खूपच महाग दिसते. शूटिंग संपल्यावर मागून घेतली पाहिजे निर्मात्याकडून .तिने मनात पक्के केले. केसातील गजऱ्याचे धागे तिच्या कानाजवळ येऊन गुदगुल्या करू लागले.मोठ्या कष्टाने तिला चेहरा गंभीर ठेवावा लागला .तिच्या नाकात कापसाचे बोळे होते. तोंडात कापूस आणि तुळशीचे पान ठेवले होते. शेवटी तिला उचलून तिरडीवर ठेवण्यात आले. "अरे देवा ह्याला काही नीट उचलता येत नाही का ? आता पडले असते ना मी ." ती मनातच चिडली. 
मग तिची प्रेतयात्रा  निघाली. इच्छा असूनही तिला डोळे उघडता येत नव्हते. नेमके कॅमेऱ्याने पकडले तर सगळी मेहनत वाया जायची. आज ना उद्या टीव्हीवर बघूच .
शेवटी चितेवर झोपवून पुन्हा सर्वांनी रडारड केली.त्या सेलिब्रिटी कलाकारांनी तिला पाणी पाजले आणि एक हातात जळते लाकूड घेऊन चितेभोवती फेऱ्या मारू लागला.
"अरे देवा, हा खरोखरच पेटविणार की मला ."ती मनातून हादरली.इतक्यात कट ओके आवाज ऐकू आला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
"आजी तुझे काम झाले . निघालीस तरी चालेल " तो तरुण पुन्हा तिच्याजवळ येऊन म्हणाला .तशी ती त्याच साडीवर बाहेर पडली.
सकाळी जाग आली तेव्हा तो तरुण तिच्यासमोर उभा होता. "दुसऱ्या जगात स्वागत आहे तुमचे ? "तो हसत उद्गारला 
" दुसरे जग ..? म्हणजे ".तिने कुतूहलाने विचारले.
" म्हणजे आता तुम्ही मेल्या आहात. पृथ्वीवरचे जीवन संपवून आमच्या जगात आला आहात. कालपासून तुमच्यावर नजर ठेवून होतो.योग्य वेळ येताच तुम्हाला घेऊन जाणारच होतो .पण म्हटले असेही महानगरपालिका बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करणार आहे तर निदान शुटिंगमधून तरी मृत्यूचे सर्व विधी अनुभवू द्या.चार चांगल्या लोकाना खोटेखोटे का होईना तुमच्या मृत्यूवर रडू द्या .म्हणून सर्व घडवून आणले. म्हातारे बेवारस म्हणून तुला अग्नी मिळेल पण खोटे खोटे का होईना तुझ्या प्रेतावर विधिवत अंत्यसंस्कार तरी झालेत .चल आभार मान माझे ."असे म्हणून तिचा हात धरून चालू लागला .
निघताना मागे वळून पाहिले तेव्हा बेडवर तिचे शरीर शांतपणे पडून होते.कालच नेसलेली साडी तिला शोभून दिसत होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर