Friday, January 9, 2026

स्मृती पालवी

स्मृती पालवी
अनिल हरि देशपांडे 
साहित्यसंपदा प्रकाशन
आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक आठवणी जाग्या होतात.जणू त्या आठवणींना नव्याने पालवी फुटत असते.किती छोट्या छोट्या असतात ह्या आठवणी .त्यावेळी आपण नेहमीच्या वापरातील आहेत म्हणून फारसे लक्ष देत नाही पण नंतर किती सुंदर आहेत असे समजून जातो.
अनिल देशपांडे यांचा हा ललित कथासंग्रह वाचताना आपल्याही अश्याच आठवणी आहेत हे जाणवते पण आपण त्या लिहू शकलो नाही याचे नक्कीच वाईट वाटते.लेखकाने लिहिणे किती सोपे असते हे या कथासंग्रहातून आपल्याला शिकवले आहे त्याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजे.
अतिशय सोप्या सरळ भाषेत त्यांनी या आठवणी मांडल्या आहेत.साधारण पंचेचाळीस कथा ह्या संग्रहात आहे आणि प्रत्येक कथा आपल्या सर्वांच्या आठवणींशी संबंधित आहे.
यातील कथा फार मोठ्या नाहीत. साधारण दोन ते तीन पानात कथा संपते पण वाचताना आपण त्यात रमून जातो आणि हे माझ्याही बाबतीत घडलंय याची जाणीव होते. 
पहिला पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात येतो .काहीजणांना तो त्रासदायक असतो तर काही लोकांसाठी आनंददायी .पण तो लिहून काढणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही .लेखकाने ते केलंय. प्रत्येकजण कोणत्यातरी वाहनाने प्रवास करतो लेखकाची एक सायकल होती.त्या सायकलची आठवण या पुस्तकानिमित्ताने लिहिली गेलीय.वस्तू तर सर्वांच्या कधी ना कधी हरवल्या असतील पण त्या सापडल्यावर होणारा आनंद आणि वस्तू परत करणाऱ्याचे उपकार त्यांनी वस्तू हरवली माणुसकी सापडली या लेखात शब्दबद्ध केली आहे.
चहा, काठी म्हातारपणीची, जेष्ठ नागरिक दिवस, कल्हईवाला, पहिला आंबा आशा अनेक गोष्टीतून ते आपल्याला ही आठवणीत घेऊन जातात.आपण वाचताना आपल्याच आठवणीत रमतो.
अनिल देशपांडे सरांनी स्मृती पालवी  लिहून वाचकांना  एक वेगळीच सफर घडवून आणलीय  हे निश्चित.

No comments:

Post a Comment