Wednesday, August 20, 2025

त्रिमूर्ती

त्रिमूर्ती  रिपोर्टिंग लाईव्ह फ्रॉम गॅलेक्सी सोसायटी 
कालच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर येथे पाहण्याचा योग आला .
मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात मारलेली भरारी आणि त्यामुळे सृष्टीचा नाश होईल याची देवांना वाटणारी भीती या थीमवर आधारलेले हे नाटक .इथली नायिका ही पृथ्वीचे ,नायक मानवाचे प्रतिनिधित्व करतोय.आज मानव उच्च विज्ञान वापरून प्रत्यक्ष देवांवर ही वरचढ होण्याचा प्रयत्न करतोय .सृष्टीचा तो विकास करण्याचा प्रयत्न करतोय.
ही पृथ्वी म्हणजे एक गॅलेक्सी अपार्टमेंट आहे.ब्रह्मदेवाचा पुत्र नारद पृथ्वीवर निरीक्षक म्हणून आलाय.तो मानवाच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून आहे.आपल्या हातातून मानव निसटत चालला आहे याची जाणीव तो ब्रह्मदेवाला करून देतो . 
ब्रह्मदेवही पृथ्वीवर येतो .मानव त्यांना ओळखतो तो त्यांच्या प्रत्येक चालीवर वरचढ होतो. हतबल ब्रह्मदेव विष्णूदेवा बोलावतात  पण मानव त्यालाही धुडकावून लावतो  .सध्या विष्णूदेवही नवीन अवतार घेऊ शकत नाही त्यामुळे तोही हतबल होतो. शेवटी अखेरचे अस्त्र म्हणून शंकराला बोलावले जाते .
मानवाच्या आणि सृष्टीच्या संयोगातून विकासाचा जन्म झाला तर सृष्टीचे नुकसान होईल तिचा नाश होईल याचीच काळजी देवाला आहे .तर मानव देवाने फक्त माकड निर्माण केली त्यापासून माणूस तो स्वकर्तृत्वावर झाला असे उत्तर देतो . सती प्रथा ,स्त्री भ्रूण हत्या मानवाने थांबविली असे मानवच सांगतो . विज्ञानाने सृष्टीचा नाश नाही तर विकासच होईल हे मानव ठणकावून सांगतोय.काही प्रश्नांची उत्तरे देवांकडेही नसतात.
नाटकातील सर्व कलाकार तरुण आणि उत्साहाने भरलेले आहेत.यात नारद गळ्यात गिटार घेऊन रॅप करतो .तो आधुनिक नारद आहे .पण मूळ नारदासारखा चलाख ,कपटी नाहीय तर भित्रा आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्या आज्ञेत राहणारा आहे. ब्रह्मदेव फोटोत दिसतो तसा आहे कृश ,म्हातारा ,थकलेला  आणि हतबलही .विष्णू काळा कोट ,धोतर ,आणि डोक्यावर मुकुट घालून प्रवेश करतो तर शंकर पोरसावदा ,भोळा ,सरळमार्गी वाटतो .
आजूबाजूला वावरणाऱ्या सहकलाकारानी चांगलीच साथ दिलीय . स्टेजवर एकत्र असताना ,वावरताना ,नृत्य करताना ते कुठेही अडखळत नाहीत. स्टेजवर सेट बदलताना ही कोणाचे लक्ष वेधून घेत नाहीत .त्यांची आणि देवाची रॅप जुगलबंदी ही छान रंगली आहे.
देव आताच्या भाषेत बोलतात .त्यांचे इंग्लिश ही चांगले आहेत .त्याची वेशभूषा ही आधुनिक दाखविली असती तर फारसा फरक पडला नसता.नारद आणि ब्रह्मदेव एका बारमध्ये भेटतात यामागचे कारण ही स्पष्ट होत नाही .
पण काही त्रुटी असल्या तरी नाटकाचा विषय आणि त्याचे सादरीकरण निश्चितच कौतुकपात्र आहे. प्रायोगिक आणि व्यावसायिक यांचे एकत्रीकरण यात दिसून येते. 
नाटकाला मध्यंतर नाही ही थोडी अडचणीची बाब आहे.सलग साधारण पावणेदोन तास एका जागी एसीमध्ये बसून प्रयोग पाहणे शेवटी शेवटी कंटाळवाणे होऊ शकते.सुरवातीला प्रेक्षकांमध्ये निर्माण केलेली ऊर्जा शेवटी संपून जाते. कदाचित मध्यंतर ठेवले तर प्रेक्षक पुन्हा नव्या उत्साहाने दुसरा अंक पाहतील.
एक तरुणाईचा वेगळा प्रयोग ज्यातून काहीतरी शिकवण मिळते. एकदा पाहायला हरकत नाही.

© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment