Wednesday, August 27, 2025

आंदोलन

आंदोलन
रामभाऊ मोहिते निराश मनाने कोकणात जाणाऱ्या गाडीत शिरले. खूप मोठ्या आशेने ते मुंबईत आले होते.
गावातल्या काशिनाथ बिर्जेचा नातू मुंबईत नगरसेवक होता. त्याच्या पक्षाला कोकणाचा आणि मराठीचा अभिमान वाटायचा. जेव्हा कधी गावी यायचा तेव्हा हमखास रामभाऊंच्या घरी यायचा .गावातील समस्यांवर चर्चा करायचा .जमतील ती छोटी मोठी कामे करून जायचा .कधी काही अडचण आली की हक्काने मुंबईत येऊन भेटा असे सांगून जायचा . 
अर्थात आजपर्यंत तशी वेळ रामभाऊंवर आली नव्हती म्हणा आणि मुंबई गोवा महामार्ग हा फक्त रामभाऊंचा नव्हे तर संपूर्ण कोकणचा प्रॉब्लेम होता त्यामुळे रामभाऊ त्याच्या वाटेल कधी गेले नाहीत.
पण यावेळी गावातील एक दोन रस्त्यांची हालत खूपच खराब झाली होती.  तुकाराम परबाची सून तर त्यादिवशी रस्त्यातच बाळंत होणार होती .नशीब जनार्दन खोताची बॉडी घेऊन अँबुलन्स गावात शिरली आणि त्याच अँबुलन्समध्ये खोताच्या बॉडीशेजारीच तिला झोपवून हॉस्पिटलमध्ये नेले. 
जनार्दन खोताची कृपा म्हणून तुकारामाची सून व्यवस्थित बाळंत झाली आणि पोरगा जन्माला आला.आता पोरगा झाला त्याचा आनंद साजरा करायचा की जनार्दन खोत गेला त्याचे दुःख करायचे हा प्रश्न बर्याचजणांना पडला होता पण रामभाऊना मात्र रस्ता कधी चांगला होणार हाच प्रश्न सतावत राहणार होता.
काशिनाथ बिर्जेच्या नातवाने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिले होते पण मुले शाळेत जातात की नाही याकडे लक्ष दिले नव्हते.पावसाने रस्ता धुवून गेला होता.चालताना दोन तीन विद्यार्थी तरी चिखलात घसरून पडत होते. तर बऱ्याच जणांच्या पायाला भेगा पडल्या होत्या .परवाच्या पावसात तर रस्त्यावर इतके पाणी साचले होते की कुशाबा कोळीने आपली होडी बाहेर काढून मुलांना शाळेत पोचविले होते. 
तेव्हा मात्र रामभाऊ संतापले होते. ग्रामपंचायत , तालुक्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस अश्या अनेक ठिकाणी अर्ज विनंत्या करून झाल्या .सर्व ठिकाणाहून काम होईल असे आश्वासन दिले गेले होते . पण कामाला सुरुवात कधी होणार हे कोण सांगू शकले नाहीत.
शेवटी ते काशिनाथच्या नातवाला मुंबईत भेटायला आले. रामभाऊ आले म्हटल्यावर भेट ताबडतोब झालीच .
पण आता मुंबईत भाषेच्या मुद्द्याने जोर धरला असून माझी सगळी ताकद तिथेच लागली असल्याने पाऊस गेला की तुमचे काम होईल असे आश्वासन त्यांना मिळाले .शिवाय सरकारने महिलांसाठी नवीन योजना सुरू केलीय त्याचा लाभ घेण्यासाठी जी काय मदत हवीय ती ताबडतोब देण्याचा  शब्द  दिला.
निराश मनाने रामभाऊ तसेच ट्रेनमध्ये बसले.गणेशोत्सव जवळ आल्यामुळे चाकरमान्यांची कोकणात जाण्याची लगबग चालू होती.ट्रेन तर नेहमीसारखी भरलेली होती. रामभाऊ आरक्षण असलेल्या बोगीत चढणार नव्हतेच कारण ते त्यांच्या तत्वात बसत नव्हते. निमूटपणे जनरल डब्यात शिरून एका कोपऱ्यात उभे राहिले.
"ओ भाऊ ," बाजूच्या सीट वरून कोणीतरी हाक मारली आणि रामभाऊ चमकले. दचकून त्यांनी पाहिले तर खिडकीजवळ एक तरुण त्यांच्याकडे पाहून हात हलवत होता आणि जवळ बोलवत होता.
ते ओळखीचा असेल या आशेने जवळ गेले तसा तो हसला .त्याचे हास्य पाहून रामभाऊ थोडावेळ का होईना आपले दुःख विसरले.
" या रामभाऊ ,बसा " त्याने सरकून जागा बनवली.
" कोणतरी बसले असेल ,मी उभा राहतो थोडा वेळ " रामभाऊ संकोचून म्हणाले.
" आहो मीच जागा अडवून ठेवली होती .कोणतरी ओळखीचा भेटतोच याचा अनुभव आहे मला " तो तरुण हसत म्हणाला .हसताना त्याचा कोपऱ्यातील तुटलेला दात स्पष्ट दिसत होता पण तो त्याला शोभून दिसत होता .
" पण मी तुला ओळखले नाही " रामभाऊनी मनातील प्रश्न विचारलाच .
मी हेरंब भोसले , शंकर भोसलेचा भाचा. मुंबईत असतो .मधल्या आळीतील विहिरीशेजारचे घर .काय भाऊ गणपतीला दररोज आरतीला येतो मी आणि काकूंच्या हातचा प्रसाद खाऊनच निघतो." तो थोड्या आश्चर्याने म्हणाला.
" असे होय तरीच म्हटलंय ओळखीचा चेहरा दिसतोय ," रामभाऊ खुशीत येऊन आरामात बसत म्हणाले.
" मुंबई कसले काम काढले ? हेरंबने हळूच विचारले तसे रामभाऊनी सगळी कथा त्याला ऐकवली.सांगताना ही त्यांचा उर भरून येत होता.
" रामभाऊ ,तुमची लढाई तुम्हीच लढा .दुसरे कोण तुमचे काम करणार नाही .रस्ते , वैद्यकीय उपचार , शिक्षण याबाबतीत आपण खूपच मागे आहोत.पण मंदिरे , धर्म , महिला अत्याचार , कायदे / नियम न पाळणे. एकमेकांवर चुकांचे खापर फोडणे याबाबतीत आपण खूप पुढे आहोत." हेरंब हसत म्हणाला.
" मग आपण काहीच करायचे नाही का ? " रामभाऊ हताशपणे उद्गारले .
" आंदोलन करायचे ,जनजागृती करायची.लोकमान्य टिळकांनी हेच शिकवलंय की आपल्याला . हात धरून त्यांनी गणपतीला वाडीत उभे केले .सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून जनजागृती केली .आताही तेच करायचे .तुम्ही आंदोलन करा " हेरंब हसत म्हणाला .
" कायतरी काय .ह्या वयात रस्त्यावर बॅनर घेऊन बसू .लोक वेडे समजतील मला .आणि आता गणपतीचे दिवस आलेत , सगळे सुट्टीवर कोण लक्ष देईल माझ्याकडे ."रामभाऊ हादरून म्हणाले.
" बघा शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारी हे म्हणतात ते खरे आहे .तुम्हाला वाटते ना काहीतरी चांगले व्हावे मग सुरवात करा . आज नाही तर उद्या काहीतरी निकाल लागेल. " हेरंब त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला.
त्याचा हात पाठीवर पडताच रामभाऊंच्या शरीरात एक अनामिक ऊर्जा निर्माण झाली .
सकाळी घरी जाताच त्यांनी आंघोळ केली . प्रसन्न मुद्रेने गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभे राहिले काहीतरी पुटपुटले आणि हातात पाण्याची बाटली ,काखेत चटई मारून बाहेर पडले. 
वाटेत एका पुठ्ठयावर चांगला रस्ता आमचा हक्क असे रंगवून घेऊन तो काठीवर उभा करून त्या रस्त्याच्या कोपऱ्यात उभे राहिले.जमिनीला मनोभावे पाया पडून त्यांनी झाडाखाली चटई टाकली .तो बोर्ड जमिनीत घट्ट रोवला आणि मांडी घालून बसले.
येणारे जाणारे त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते .हळूहळू ही बातमी गावभर झाली .रामभाऊंच्या घरातही ही बातमी जायला वेळ लागला नाही .काकूंच्या कानावर जाताच ती किंचित हसली .पोरगा गणपतीच्या मखराची तयारी करत होता त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि हातातील काम चालू ठेवले.
दुपारी काकूंनी जेवणाचा डबा तयार केला . तांब्यात चहा घेतली आणि सरळ रामभाऊंच्या शेजारी येऊन बसली. दोघेही शांतपणे जेवले ,चहा प्यायले आणि काळोख पडताच उठून घरी आले. घरात नेहमीसारखे वातावरण होते.पण पारावर रामभाऊंच्या आंदोलनाची चर्चा रंगली होती. 
दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार. यावेळी रामभाऊच्या मुलीला सुट्टी पडली होती म्हणून तीही चटईवर बसली होती. दुपारी मुलाने थोडा मोठा बॅनर रंगवून आणून दिला .
तिसऱ्या दिवशी मात्र लोक तिथे थांबून चौकशी करू लागले. पोलिसांनीही त्यांना घरी जाण्याची विनंती केली पण रामभाऊ शांत होते. 
उद्या गणेश चतुर्थी .गणपतीची पूजा करण्यासाठी रामभाऊ आंदोलन स्थगित करतील असे सगळ्यांना वाटत होते पण कसले काय .सकाळीच रामभाऊ पत्नीसह आंदोलनाच्या ठिकाणी हजर होते.
" रामभाऊ यावर्षी गणपती नाय काय ? " कोणीतरी जाताजाता विचारलेच .
" आहे ना पण त्यासाठी हे काम का सोडायचे .मुलगा मोठा झालाय तो बघेलच त्याच्याकडे आणि  त्यालाही कळूदे की यावर्षी रामभाऊ का दिसत नाही ते " ते  वर पाहत हसून म्हणाले.
" खरच की यावर्षी तुम्ही दिसला नाहीत आणि तुम्ही इथे आहात असे कळले म्हणून इथेच भेटायला आलो " एक ओळखीचा हसरा आवाज रामभाऊंच्या कानी पडला आणि त्यानी मान वळवली .
त्याच्या मागे हेरंब हसत उभा होता .
भाऊ गणपतीच्या दर्शनाला घरात शिरलो पण तुम्ही आणि काकू दिसला नाहीत आणि तुम्ही इथे आंदोलन करताय असे कळले मग इथेच आलो तुम्हाला भेटायला " हेरंब त्यांच्या बाजूला बसून बॅनर हातात घेत म्हणाला .
" म्हणजे तू पण आमच्यात सामील होणार काय " रामभाऊनी कौतुकाने विचारले .
" होय तर ." जवळ येणाऱ्या उंदराला हाताने हुसकावीत तो हसत म्हणाला .
आता तर रामभाऊंच्या घरी रात्रीच गणपतीची पूजा आणि आरती होत होती .
हळूहळू गावात चलबिचल सुरू झाली.सुट्टीत शाळकरी मुले गणवेश घालून रामभाऊंच्या शेजारी बसू लागली .तर वृद्धही तिथे बसू लागले.
स्थानिक पत्रकाराने ही बातमी पेपरात छापली .तालुक्यातील केबल टीव्हीने त्यांची मुलाखत प्रसारित केली.रामभाऊच्या घरात गणपती एकटाच मखरात बसलेला दाखविला गेला. कलेक्टर कार्यालयात विचारणा होऊ लागली. ग्रामसेवक स्थानिक नेते तिथे येऊ लागले. मुंबईच्या प्रसिद्ध गणेशोत्सवात ही बातमी आली आणि त्यांनीही पत्रक काढून रामभाऊंना पाठिंबा दर्शविला तेव्हा प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनलने ही बातमी राज्यभर केली .
अचानक वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि रस्त्याचे काम सुरू झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी हात जोडून रामभाऊंची माफी मागितली आणि घरी जाण्यास सांगितले.खुश होऊन रामभाऊंनी हेरंबला मिठी मारली.
" जिंकलात तुम्ही रामभाऊ,  शेवटी शांततेने केलेल्या आंदोलनाचा विजय होतो हे सिद्ध केलेत तुम्ही .आज घरी जा ,तो मखरात बसलेला तुमची वाट पाहतोय .काकू नेहमीसारखा छान नैवेद्द करा मी येतोच आरतीला " असे बोलून तो वळला .
रामभाऊंनी घरी येताच मखरात बसलेल्या गणेशाची हात जोडून माफी मागितली .रात्री नेहमीसारखा छान नैवेद्य बनवून काकूंनी तो त्याच्या पुढ्यात ठेवला आणि आरतीला सुरवात केली .आरती झाली तरी हेरंब आला आला कसा नाही याची चौकशी मुलाकडे केली .त्याने आश्चर्याने कोण हेरंब म्हणून विचारले .शंकर भोसलेला हेरंब नावाचा भाचा नाही आणि शंकर भोसले नावाची व्यक्तीही मधल्या आळीत राहत नाही हे सांगितले . 
" आता रस्त्यावर बसून आंदोलन करायचेच बाकी होते का ? नशीब जुन्या काळात इंग्रजांसारखे हल्ली कोणाला  गोळ्या घालीत नाही आणि लाठीमार करत नाही . नाहीतर एक दिवशी चांगलीच पाठ शेकवून घ्याल.मला नाही ताकद राहिली पूर्वीसारखी तुम्हाला पाठीवर झोपवून फिरायची." मखरात बसलेल्या उंदराने चिडून शेपटी  आपटली.
" अरे हल्ली माणसे आपल्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिली आहेत .निवडून दिले म्हणजे आपले काम झाले असे त्यांना वाटते . पण काम करण्यासाठी इतर मार्ग आहेत हे लक्षातच येत नाही त्यांच्या .मी त्यांना त्याची जाणीव करून दिली ." आरामात मांडी घालून बसत तो म्हणाला .
" मान्य पण म्हणून काय आपल्याला उपाशी ठेवून जायचे का ? ह्याच्या आंदोलनामुळे सकाळपासून उपवास सुरू व्हायचा आणि रात्रीच घाईघाईत केलेला नैवेद्द मिळायचा. त्यात तू  ऊनपावसाची पर्वा न करता त्यांच्या बाजूला तो बॅनर घेऊन बसायचास. मी एक दोनदा यायचा प्रयत्न केला पण दारावरची मांजर हटतच नव्हती .तू त्यांचे काम आंदोलन न करता ही करू शकला असताच " तो कुरकुरत एक फुटाणा तोंडात टाकीत म्हणाला .
" अरे मी देव आहे .जादूगार नाही .आपण फक्त इकडंचे तिकडे करतो .आणि थोडे लढू दे त्यांना. सर्वच आपण केले तर त्यांना काहीच करावे लागणार नाही . आपल्याला थोडा त्रास झाला हे कबूल आहे पण पुढची काही वर्षे आपण या सपाट गुळगुळीत रस्त्यावरून रामभाऊच्या घरी येऊ हे नक्की " तो जांभई देऊन डोळे मिटत म्हणाला .
रात्री आरती करताना मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव आपल्याला ओळखीचे का वाटतायत याचा विचार रामभाऊच्या डोक्यातुन जाणार नव्हता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment