कारा
Kara
कारासामी उर्फ कारा हा हाडाचा चोर आहे. चोरी आणि घरफोडी याशिवाय त्याला दुसरे काहीच करता येत नाही. आपल्या आयुष्यातील शेवटची चोरी करण्यासाठी तो एका आमदाराच्या घरात शिरतो; पण दुर्दैवाने तो पकडला जातो.
या चोरीच्या तपासाचे श्रेय मिळवण्यासाठी डीएसपी भारतन पुढे येतो. काराकडून आपल्या मनाप्रमाणे कबुली मिळवण्यासाठी तो त्याच्यावर दबाव आणतो. मात्र, मारहाण करून कारा तेथून पळून जातो.
या घटनेला सहा महिने उलटतात. आता कारा आपल्या पत्नीसोबत एका हॉटेलमध्ये मजुरी करत असतो. त्याचे स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न असते. गावात त्याच्या वडिलांकडे आठ एकर जमीन असते; पण सोळा वर्षांचा असतानाच तो वडिलांचे पैसे चोरून घरातून पळून आलेला असतो. त्यामुळे आता पुन्हा कोणत्या तोंडाने वडिलांकडे जायचे, हा प्रश्न त्याला सतावत असतो.
तरीही, जमीन विकून त्या पैशांत हॉटेल सुरू करण्याचा विचार करून तो गावाकडे परतण्याचा निर्णय घेतो. अनेक वर्षांनी मुलाला पाहून त्याचे आई-वडील आनंदित होतात; पण वडिलांनी जमीन गहाण ठेवून कर्ज घेतल्याचे कळताच कारा निराश होतो.
काराचा खरा हेतू समजताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसतो आणि त्यातच त्यांचे निधन होते. मृत्यूपूर्वी त्यांची इच्छा असते की, आपल्या पूर्वजांच्या शेजारी त्यांचे दफन व्हावे. कारा आणि गावकरी त्यांचे दफन करण्यासाठी जातात; पण बँकेचे अधिकारी ती जमीन ताब्यात घेतल्याचे सांगून दफन करण्यास परवानगी देत नाहीत.
नाईलाजाने काराला आपल्या वडिलांचे पार्थिव सरकारी शवागृहात ठेवावे लागते. मात्र, सात दिवसांच्या आत मृतदेह नेला नाही तर त्याच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी सूचना त्याला दिली जाते.
आता वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी काराकडे फक्त सात दिवस उरलेले असतात. ज्या बँकेकडून कर्ज घेतलेले असते, त्या बँकेने अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकवलेले असते. कर्जाच्या फॉर्ममध्ये अनेक गुंतागुंतीच्या अटी असतात, ज्या शेतकऱ्यांना ना वाचता येतात, ना समजतात.
“मला फक्त घरफोडी करता येते… मग बँक लुटणे हाच एकमेव मार्ग आहे,” असे म्हणत कारा बँक लुटण्याची योजना आखतो.
पण बँक लुटणे इतके सोपे असते का?
डीसीपी भारतनला या योजनेचा सुगावा लागतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. तो पुन्हा काराच्या मागावर निघतो.
कारा आपल्या वडिलांचे कर्ज फेडून त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकेल का?
त्याच्या हातात फक्त सात दिवस आहेत.
Dhanush ने नेहमीप्रमाणे संयमित आणि प्रभावी अभिनय केला आहे. चित्रपटात फारशी हाणामारी नसली, तरी कथा वेगाने पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवते.
No comments:
Post a Comment