Friday, May 29, 2026

शोध

शोध 
मुरलीधर खैरनार
राजहंस प्रकाशन 
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली ती पूर्ण सुरक्षित आणि अचूक योजना आखून .यावेळी त्यांच्याकडे प्रत्येक व्यापाऱ्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची आणि ठिकाणांची माहिती होती .त्यामुळे अतिशय कमी वेळात जास्त लूट मिळाली.ती लूट त्यांनी बाराशे जनावरांवर लादली आणि लुटीचे दोन भाग करून दोन मार्ग आखले. 
एक लूट ठरल्या मार्गावरून स्वराज्यात पोचली.दुसऱ्या लुटीचे जबाबदारी गोंदाजी नारो या दोन हजारी घोडदळाच्या सरदारकडे होती.त्याच्याकडे सुमारे सात हजार जनावरांच्या पाठीवर लादलेली लूट होती.ती घेऊन तो नाशिकमार्गे  स्वराज्याकडे निघाला होता. दाऊदखानाचे मुगल शिपाई सगळ्या मार्गावर त्याच्या मागावर होते. तो त्यांच्याशी लढत पुढे सरकत होता शेवटी जखमी होऊन मुघलांच्या हाती सापडला .पण शेवटपर्यंत सात हजार जनावरांवर लादलेला खजिना मुघलांना सापडला नाही.
केतकी देशपांडे ,शौनक , निनाद  फेसबुक माध्यमातून मित्र झालेले.सर्वांना इतिहासाची आवड त्यामुळे एकत्र आले .इंग्लंडला राहणारी क्लारा रेंजर त्यांची मैत्रीण.ती इतिहासात डॉक्टरेट करत होती आणि कामानिमित्त त्यांना भेटणार होती.तिचे पूर्वज एकेकाळी ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होते . त्यावेळी मुघलांनी त्यांना एका छाप्यात पकडले आणि त्यांची रवानगी औरंगाबादच्या तुरुंगात झाली .तुरुंगात त्यांना गोंदाजी भेटला.जखमी अवस्थेतील गोंदाजी फार काळ जगू शकणार नाही याची कल्पना दोघांनाही होती.मरताना गोंदाजीने एका कापडावर लिहिलेला निरोप त्यांच्या हाती दिला आणि हा तुकडा कसाही करून शिवाजी महाराजांपर्यंत  पोचवा अशी विनंती केली .दुर्दैवाने  रेंजर तो निरोप महाराजांपर्यंत पोचवू शकले नाहीत आणि ते इंग्लंडला परत गेले.
क्लाराकडे तो कापडाचा तुकडा होता आणि तो मेसेज काय आहे याची उकल तिला मित्रांना भेटून करायची आहे.
सुरतमधील एक प्रसिद्ध व्यापारी घराणेही या लुटीत संपूर्णपणे लुटल गेलंय. त्यांना आपली संपत्ती परत नकोय पण त्यातील एक महत्वाची मौल्यवान वस्तू परत हवीय.त्यासाठी त्यांनी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ती वस्तू शोधण्याची जबाबदारी दिलीय .त्या व्यक्तीला खोजनार म्हणतात.आज त्या घराण्याचा अठरावा खोजनार ती वस्तू शोधतोय.गोंदाजीने लपवलेल्या खजिन्यात ती वस्तू आहे याची खोजनारला खात्री आहे.
आबाजी स्कायलार्क कंपनीला हाताशी धरून तो खजिना शोधतायत. स्कायलार्क कंपनीचा सीइओ जयंत आबाजीला सगळी मदत देतोय.आबाजी हुशार आणि खुनशी आहेत.खजिन्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ते संपवितात. त्यांची नजर क्लारावर गेलीय.तिच्याकडे असलेला तो निरोपाचा तुकडा त्यांना हवाय आणि त्यासाठी त्यांनी क्लाराचाही खून केलाय ,त्याचा आळ केतकी ,निनाद आणि शौनकवर आलाय. मुंबई पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
काय आहे या खजिन्याचे रहस्य जे शिवाजी महाराजांपर्यंत शेवटपर्यंत पोचले नाही.मोरोपंत पिंगळे दहा वर्षे नाशिकच्या  कड्याकपारीत तो खजिना शोधत होते. 
आबाजीना काही धागेदोरे मिळाले आहेत तर शौनक आणि केतकीच्या हातात ही काही पुरावे लागले आहेत .पण खरोखरच हा खजिना अस्तित्वात आहे का ? 
असेल तर त्यापर्यंत नक्की कसे पोचायचे ? 
मुरलीधर खैरनारानी अतिशय अचूकपणे याचा शोध घेतला आहे.हा शोध वाचताना आपण पूर्णपणे त्यात गुंतून जातो.  

No comments:

Post a Comment