Thursday, June 21, 2018

अखेरचे क्षण

काल एका पोस्टमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी हिटलर आणि इव्हा ब्राऊनमध्ये शेवटच्या क्षणी काय बोलणे झाले असेल असा मुद्दा होता. त्यांचे माहीत नाही पण भारतात असे घडले असते तर काय बोलणे झाले असते ते मांडायचा प्रयत्न केलाय . जास्त विचार न करता वाचून आनंद घ्या आणि विसरून जा .
"मग तू तयार आहेस ना... ???  बंकरमध्ये प्रवेश करताच तो तिला म्हणाला.
"नाहीतर दुसरा पर्याय तुम्ही ठेवलाय कुठे .? ती त्याच्या डोळ्यात बघून बोलली.
"तस नाही ग राणी.....नकार दिलास तरी तुझ्या डोक्यात गोळी मारणारच आहे मी .पण विचारायची पद्धत असते"तो हसत म्हणाला .आता बघ ...त्या अण्णा खोताकडे  पोर नारळ काढू म्हणून विचारायला जातात पण त्या आधीच त्याचे पन्नास नारळ घरात चोरून ठेवलेले असतात"
"तुम्हाला  अश्या वेळी बरे असे  सुचते.. मी काय म्हणते.. थोडा वेळ थांबुया ...वाट बघू ..बाहेरचे जातील निघून..."ती म्हणाली .
"च्यायला ती काय मालवणकरची कुत्री आहेत काय...??आळशी नुसती .....फिरून निघून जायला.. सैनिक आहेत ते" तो चिडून म्हणाला.
"काय दिवस आलेत .. एके काळी राणी बनून राहिले होते. रोज चार पैठण्या नेसत होते. पापलेट...सुरमईशिवाय जेवत नव्हती. पण तुमच्या ह्या एक निर्णयामुळे सगळं पाण्यात गेले.. कशाला त्या लोकांच्या नादी लागलात.बर....तुमच्या नावावर त्या मेल्यानी इतके लोक मारले पण एक सोन्याचा दातपण तुम्हाला दाखविला नाही . किती दिवस नवी नथ करायची बोलत होती पण तुमचा लक्ष नाय माझ्याकडे".ती चरफडत बोलली.
" अगो बाय .....माझा माझ्याकडे तरी कुठे लक्ष आहे . आज पंधरा दिवस झाले . हा घातलेला धोतर बदलायला वेळ नाही.आज तर चार वेळा टॉयलेटमधून पळत आलो.."तो संतापून म्हणाला .
"पण मी काय म्हणते..??काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची ...??  इलेक्शन तर आरामात जिंकलात.ते तुमच्या विरुद्ध उभे राहिलेले चारजण कुठे गायब झाले ते कोणालाही कळले नाही आतापर्यंत. पण नंतर गावासाठी काय कमी केलात ....?? रवळनाथाचा मंदिर बांधलात. घराघरातून संडास बांधलात . आपल्या गावात आपण सुखी होतो. .कशाला त्यामाणसांना गावाबाहेर काढलात..बरे काढलात तर दुसऱ्या गावातली पण कशाला काढली....?? ती अजून चिडलेली होती .
"अग....त्या संडासानेच सगळा घोटाळा केला बघ... रात्रीचे कोण घराबाहेरच पडतच नाहीत आता. मग शत्रू घुसले ते कळलेच नाही मला ....तो म्हणाला .
"बर....आपल्यानंतर मागची इस्टेट सर्वाना समान वाटली आहे ना ....?? नाहीतर सर्व रवळनाथाला देऊन टाका.दहाव्या तेराव्याला भानगडी नको हो ....  सगळी भावकी जमा होईल .." तिला भावकीची काळजी.
" तू काय काळजी करू नकोस .... सर्व व्यवस्थित करून ठेवलाय मी .. तू मरायला तयार हो .."तो घाई करत म्हणाला.
"बर... बर..तसा माझा तुमच्यावर विश्वास आहे..तरी मला वाटते आपण आधी  लग्न केले  असते तर चार  सण तरी साजरे करता आले असते ...माहेरी जाऊन चार दिवस राहून आले असते .भावकीत तुमचे नाव सांगून भाव खाता आला असता.शेवटी सगळं स्वप्नात राहिले . नशीब मरायच्या आधी तरी लग्न केलात.पण मला गोळी घातल्यावर तुम्ही नक्की स्वतः ला गोळी मारणार ना...??नाहीतर जाल दुसरीच्या मागे .. तुम्हा पुरुषांचा काही भरोसा नाही.."शेवटी तिने मनातले बोलूनच टाकले .
त्याने हताश होऊन पिस्तुल खाली टाकले आणि कोपरापासून हात जोडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment