Tuesday, September 27, 2022

पांढरा रंग

पांढरा रंग 
 गाव तसे छोटेच होते.मुख्य शहरापासून थोडे लांब आणि आडवाटेवर .गावाची लोकसंख्याही मर्यादित होती. गावात सर्व धर्म समभाव वागणूक होती.  आता कमी लोकसंख्येमुळे काय जातीभेद , धर्मभेद पाळणार म्हणा . गावात ईद , गणपती,  ख्रिसमस जोरात साजरे व्हायचे. त्यावेळी मात्र गावात नुसती गर्दी दिसायची .
आजपासून गावात नवरात्र उत्सव सुरू होणार होता.गावातील तरुण वर्ग  नुसता उत्साहाने सळसळत होता. सणांच्या वेळीच त्यांना एकत्र येण्याची संधी मिळत होती.उत्सव समितीने रोजचे रंग प्रसिद्ध केले होते.आता त्याप्रमाणे रोज त्यात्या रंगाच्या साड्या , ड्रेस  नेसायला सुरवात होणार होती.
आजचा रंग होता पांढरा. उत्सव समितीने आज गरबा नृत्याचे आयोजन केले होते. पण गरबा नृत्यात भाग घेणाऱ्यांनी पांढरा पोशाख नेसला पाहिजे अशी अटही ठेवली होती.
संध्याकाळ झाली तशी देवीच्या पटांगणात गर्दी जमा होऊ लागली. डीजे ही तयार होता. सर्व स्त्री पुरुष पांढरे कपडे घालून हळूहळू डीजेच्या तालावर ठेका धरू लागले. हळूहळू गर्दी वाढू लागली  प्रत्येकाच्या अंगात गरबा भिनू लागला .बेफाम होऊन सर्व नाचत होते. 

आजच्या  गर्दीत त्या दोन तरुणी उठून दिसत होत्या .पांढरी शुभ्र साडी ,मोकळे केस ,कपाळावर देवीचा मोठा टिळा,गळ्यात पांढरी माळ अश्या पेहरावात त्या मोकळेपणाने हसत धुंद होऊन नाचत होत्या .काही तरुण तर त्यांच्याभोवतीच  नाचत होते आणि त्याही प्रतिसाद देत होत्या .
गावात काही वेळेचे बंधन नव्हते .त्यामुळे मध्यरात्र उलटून गेली तरी गरबा चालूच होता . हळूहळू त्या तरुणींच्या भोवती तरुणांचा घोळका वाढू लागला . त्यातील दोन तरुणांनी त्यांना हेतुपूर्वक एका कोपऱ्यात ढकलत नेले. नाचण्याच्या नादात त्यांच्याही लक्षात आले नाही .
शेवटी नाच थांबवून ते तरुण त्यांच्या जवळ गेले.
"या गावातल्या दिसत नाही तुम्ही ? " एकाने विचारले .
"ही इथलीच आहे .एकीकडे बोट दाखवून दुसरी म्हणाली , मी शेजारच्या गावची, हिची मैत्रिण ."
"मग आता काय विचार आहे .? तिच्याजवळ सरकत एक तरुण गूढ हसत म्हणाला .
"इथे नको . घरी जाऊ .मी काय एकटी घरी जाऊ का ? मला  सोडून परत या "  दुसरी डोळ्याने सूचक इशारा करीत म्हणाली .
ते दोघे खुश झाले ."चला निघू "असे म्हणून सर्व निघाले .
गप्पा मारत मारत कधी गावाबाहेर आले ते त्यांना कळलेच नाही . अचानक एका मोठ्या झाडाच्या पारावर त्या थांबल्या .
" थोडे थांबूया इथे ,एक म्हणाली .नाचून आणि चालून पाय दुखले माझे ."
" इथे नको ," ते दोघेही घाबरत म्हणाले ."इथे स्मशान आहे .आपण पुढे जाऊ ."
"मग काय झाले . गेली कित्येक वर्षे आम्ही इथेच राहतोय. ही या झाडावर राहते आणि मी त्या स्मशानात . यावेळी पहिल्याच दिवशी पांढरा रंग होता .म्हटले आपण गेली शेकडो वर्षे पांढऱ्या रंगाचे ड्रेस घालून फिरतोय मग त्याच ड्रेसवर गरबा खेळायला जाऊ .आता उद्यापासून पुन्हा इथेच बसून गरबा बघणार .चला येतायत ना ?" असे म्हणून एक स्मशानात शिरली तर दुसरी मोठ्याने हसत झाडावर चढून गेली.
दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना एक तरुण स्मशानात तर दुसरा वडाच्या पारावर बेशुद्धावस्थेत आढळले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, September 25, 2022

क्रिमिनल जस्टिस 2

क्रिमिनल जस्टिस 2
बिहाईंड क्लोज डोअर

बिक्रम चंद्रा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी वकील आहे. पत्नी अनुराधा आणि बारा वर्षाची  मुलगी रिया यांच्यासोबत एक छान आयुष्य जगतोय. 
अनुराधा  डिप्रेशनमध्ये आहे आणि तिचे एका  मानसोपचारतज्ञाकडे उपचारही चालू आहेत. अनुराधा  एकलकोंडी बनली आहे. सतत गोंधळलेली आणि विसारळू  बनली आहे असे तो म्हणतो.त्याने तसे आपल्या आईला आणि सासऱ्यांना ही सांगितले आहे.
आजच बिक्रमने  एक खूप  गाजलेली केस जिंकली आणि तो आनंदात घरी आला .आल्यावर त्याने पत्नीचा वॉर्डरोब चेक केला .त्यातील वस्तूंचे फोटो काढले. तिच्या गाडीचे किलोमीटर चेक केले. फोन चेक केला . त्यानंतर त्याने तिला आईसस्क्रिम आणले का ? म्हणून विचारले. आईसस्क्रीमचे तिच्या लक्षात नव्हते म्हणून स्वतः जाऊन आईसक्रिम घेऊन आला . रात्री तिघेही एकत्र जेवले .
मध्यरात्री रियाला कसल्याश्या आवाजाने जाग आली . तिने बेडरूमचा दरवाजा उघडून पाहिला तर तिची आई बाहेर  जात होती. म्हणून ती त्यांच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिचे वडील जखमी अवस्थेत बेडवर पडले होते. त्यांच्या कुशीत सुरा भोसकला होता .भीतीने तिने तो सुरा बाहेर काढला आणि रक्ताची धार सुरू झाली.घाबरून तिने आपल्या आजीला फोन केला .
थोड्या वेळाने पोलीस  हजर झाले आणि बिक्रम चंद्राला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. थोड्याच वेळाने अनुराधाने त्याच्याजवळ येऊन सॉरी म्हटले आणि काही वेळाने बिक्रम चंद्रा मृत्यू पावला.
 रियाच्या जबानीनुसार पोलिसांनी अनुराधाला अटक केली. तिचा गाऊन रक्ताने माखला  होता . तिने आपण नवऱ्यावर  चाकूने वार केले हे  कबूल केले. 
तिचा बाप पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला .पोलिसांनी त्याला जामिनासाठी वकिलाची मदत घेण्यास सांगितले. बिक्रम चंद्रासारख्या वकीलावर हल्ला झालाय तेव्हा त्याच्या विरोधात कोणताही वकील केस लढणार नाही हे निश्चित होते.इतक्या रात्री कुठून वकील आणायचा या चिंतेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने माधव मिश्राला फोन केला .
माधव मिश्राचे लग्न झालेय .आज त्यांची पहिली रात्र आहे . त्याचवेळी त्याचा फोन वाजतो आणि त्याला केस घेणार का ? असे विचारले जाते. समोरची पार्टी तगडी मालदार असेल या आशेने  माधव तडक मुंबईला निघतो.
केस फारच सोपी आणि सरळ असते. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केला आहे.सर्व पुरावे अनुराधाच्या विरुद्ध आहे . सोशल मीडिया ,प्रेस सर्व अनुराधावर तुटून पडलेत.तिला तुरुंगातही त्रास होतोय.त्यात ती गरोदर असल्याची बातमी येते. अनुराधा काहीही बोलायला तयार नाही . माधव मिश्राला फक्त खुनाचा हेतू शोधायचा आहे.
अनुराधाविषयीची सगळी माहिती गोळा करायला माधव मिश्रा सुरवात करतो .त्याला साथ मिळते ती एका नवोदित हुशार स्त्री वकिल निखटची .निखटने माधव मिश्राला आधीच्या केसमध्येही मदत केलेली असते आणि त्याचा परिणाम नोकरी जाण्यात होते.आता ती पुन्हा जॉब शोधतेय .माधव पुन्हा तिला सहाय्यक बनण्याची विनंती करतो आणि ती स्वीकारते.
दोघे मिळून अनुराधाच्या केसचा पहिल्यापासून तपास करतात.त्यात त्यांना काही धक्कादायक गोष्टी कळतात.इथे तुरुंगात अनुराधा मुलीला जन्म देते. पण अजूनही ती खुनाचा हेतू सांगायला तयार नाही .
शेवटी असे काय घडते की भर कोर्टात अनुराधाला तोंड उघण्यास भाग पडते. का करते अनुराधा आपल्या पतीचा खून ??
नेहमीप्रमाणे पंकज त्रिपाठी माधव मिश्राच्या भूमिकेत भाव खाऊन गेलाय.संपूर्ण सिरीजच त्याच्या खांद्यावर आहे. अनुप्रिया गोयंका निखटच्या भूमिकेत शोभून दिसते.पंकज त्रिपाठीच्या समोर यावेळी आशिष विद्यार्थी सरकारी वकील म्हणून उभा राहिलाय .कीर्ती कुल्हारी अनुराधा चंद्राच्या भूमिकेत फिट बसते.

अभिनय

अभिनय
"आजी ,उद्या शूट आहे.फिल्मसिटी सेट तीनला . सकाळी दहा वाजता या आठवणीने ". दरवाजा उघडून आत येत त्या तरुणाने तिला निरोप दिला . तसे तिने डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहून मान डोलावली. 
तिचा होकार पाहून तो हसला. " किती दिवस शूटिंग आहे रे " तिने हातानेच चहाची खूण करत त्याला विचारले.
"असेल दोन दिवस तरी . तुला माहितीय हल्ली प्रत्येक गोष्ट काही एका एपिसोडमध्ये संपत नाही . दोन तीन एपिसोड तरी होतील ". तो मोठ्याने हसत म्हणाला ." ये वेळेवर आणि हो येताना  टॅक्सीभाडे लावायचे विसरू नकोस ." त्याने आठवण करून दिली आणि निघून गेला.
तो गेल्यावर बंद त्या दरवाजाकडे पाहत ती कितीतरी वेळ गप्प बसून होती. ती साधारण सत्तरीच्या जवळपास होती. एकटीच राहायची . म्हणजे नवरा पूर्वीच गेला होता. नंतर एकुलता एक मुलगा ही गेला . अंगात थोडे अभिनयाचे गुण होते . त्यावर कधीकधी छोटीमोठी कामे मिळायची तिला.  
हल्ली टीव्ही सिरियलमुळे कामाची कमी नव्हती त्यामुळे जिथे काम मिळेल तिथे जायची. आपल्यावर तिचा बोजा नको म्हणून नातेवाईक ही टाळत होते तिला.
आज सकाळपासूनच तिच्या अंगात थोडी कणकण जाणवत होती.पुढे ताप आला तर कोणाला त्रास नको म्हणून गोळी घेऊन थोडी पडली  तेव्हाच हा निरोप आला .
सकाळी लवकर उठली तरी अंग दुखत होतेच. घाईघाईने तयार होऊन ती सेटवर वेळेवर पोचली. तिला पाहताच तो कालचा तरुण जवळ आला .
" वेळेवर आलीस आजी " असे म्हणून सरळ सेटवर घेऊन गेला . आज सेटवर दुःखद वातावरण दिसत होते. बरेचसे कलाकार पांढऱ्या कपड्यात वावरत होते. अच्छा म्हणजे आज मरणाचा सीन आहे तर. चला म्हणजे दुःखी चेहरा करून कोपऱ्यात बसायचे इतकेच काम तर. बरे झाले . असे मनात म्हणत ती सेटवर फिरू लागली .
इतक्यात तो तरुण पुन्हा आला " आजी, त्या चटईवर झोप. प्रेतासारखे . आज तुलाच मेलेल्या आजीची ऍक्टिग करायची आहे. आज सेलिब्रिटी आहेस तू ." असे म्हणून मोठ्याने हसला. तशी ती चमकलीच .
" अरे पण किती दिवस असे प्रेतासारखे पडून राहायचे. कंटाळा येईल रे " ती केविलवाणा चेहरा करीत म्हणाली. "काळजी नको, आज दिवसभरात करून टाकू .एकदा का तुला चितेवर झोपवून अग्नी दिला की तुझे काम संपले." तो सहज स्वरात म्हणाला .
तिने डोळे वटारत त्याच्याकडे पाहिले आणि मुकाटपणे त्याने दाखविलेल्या जागेवर झोपली . हळूहळू एक एक सेलिब्रिटी कलाकार तिच्या शेजारी येऊन गोलाकार बसू लागले. सगळ्यांनी पांढरे ड्रेस चढविले होते. ती त्या कलाकारांना पाहून खुश झाली . सगळेच टीव्ही सिरियलचे मोठे कलाकार होते आणि आज तिच्यासाठी रडणार होते. नेहमीच भरपूर दागिने आणि उंची साड्या नेसणार्या , एकमेकींच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या स्त्रिया आज डोळ्याला पदर लावून रडत होत्या .एकीने सासूबाई असे मोठ्याने ओरडत तिला मिठी मारली त्यात  हातातली बांगडी जोरात तिच्या मानेजवळ टोचली . त्या मोठ्या आवाजात  मग तिनेही आई ग करीत ओरडून घेतले.
" मॅडम , इतकेही प्रेम दाखवू नका हो की प्रेताच्या मानेतून रक्त येईल." डायरेक्टर हसत ओरडला.तसे तिच्यासकट सगळेच हसू लागले.
"बघत होते आजीला खरोखरच प्रेताचा अभिनय येतोय का ?"  ती अभिनेत्री हसत हसत म्हणाली.
दुःखी असलेले वातावरण अचानक हलके झाले.सगळे इथेतिथे पसरले.काहीजण सिगारेट ओढू लागले तर काही चहासाठी गेले. बराच वेळ झोपून राहिल्यामुळे हिचे अंग आखडून गेले होते. ती उठून उभी राहिली आणि सेटवर फेऱ्या मारू लागली.
"आजी ,काही त्रास नाही ना ?  सेलिब्रिटी तुमच्या मरणावर रडतायत .भाग्यवान आहात." तो हसून म्हणाला. तशी तीही हसली.
पुन्हा शूटिंग सुरू झाले .यावेळी बरेचजण रडत होते. तिच्याविषयी चांगले बोलत होते.तिला आंघोळ घालून भरजरी साडी नेसवली गेली.दागिने चढविले गेले.
साडी तर खूपच महाग दिसते. शूटिंग संपल्यावर मागून घेतली पाहिजे निर्मात्याकडून .तिने मनात पक्के केले. केसातील गजऱ्याचे धागे तिच्या कानाजवळ येऊन गुदगुल्या करू लागले.मोठ्या कष्टाने तिला चेहरा गंभीर ठेवावा लागला .तिच्या नाकात कापसाचे बोळे होते. तोंडात कापूस आणि तुळशीचे पान ठेवले होते. शेवटी तिला उचलून तिरडीवर ठेवण्यात आले. "अरे देवा ह्याला काही नीट उचलता येत नाही का ? आता पडले असते ना मी ." ती मनातच चिडली. 
मग तिची प्रेतयात्रा  निघाली. इच्छा असूनही तिला डोळे उघडता येत नव्हते. नेमके कॅमेऱ्याने पकडले तर सगळी मेहनत वाया जायची. आज ना उद्या टीव्हीवर बघूच .
शेवटी चितेवर झोपवून पुन्हा सर्वांनी रडारड केली.त्या सेलिब्रिटी कलाकारांनी तिला पाणी पाजले आणि एक हातात जळते लाकूड घेऊन चितेभोवती फेऱ्या मारू लागला.
"अरे देवा, हा खरोखरच पेटविणार की मला ."ती मनातून हादरली.इतक्यात कट ओके आवाज ऐकू आला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
"आजी तुझे काम झाले . निघालीस तरी चालेल " तो तरुण पुन्हा तिच्याजवळ येऊन म्हणाला .तशी ती त्याच साडीवर बाहेर पडली.
सकाळी जाग आली तेव्हा तो तरुण तिच्यासमोर उभा होता. "दुसऱ्या जगात स्वागत आहे तुमचे ? "तो हसत उद्गारला 
" दुसरे जग ..? म्हणजे ".तिने कुतूहलाने विचारले.
" म्हणजे आता तुम्ही मेल्या आहात. पृथ्वीवरचे जीवन संपवून आमच्या जगात आला आहात. कालपासून तुमच्यावर नजर ठेवून होतो.योग्य वेळ येताच तुम्हाला घेऊन जाणारच होतो .पण म्हटले असेही महानगरपालिका बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करणार आहे तर निदान शुटिंगमधून तरी मृत्यूचे सर्व विधी अनुभवू द्या.चार चांगल्या लोकाना खोटेखोटे का होईना तुमच्या मृत्यूवर रडू द्या .म्हणून सर्व घडवून आणले. म्हातारे बेवारस म्हणून तुला अग्नी मिळेल पण खोटे खोटे का होईना तुझ्या प्रेतावर विधिवत अंत्यसंस्कार तरी झालेत .चल आभार मान माझे ."असे म्हणून तिचा हात धरून चालू लागला .
निघताना मागे वळून पाहिले तेव्हा बेडवर तिचे शरीर शांतपणे पडून होते.कालच नेसलेली साडी तिला शोभून दिसत होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, September 16, 2022

क्रिमिनल जस्टिस 2

क्रिमिनल जस्टिस 2
बिहाईंड क्लोज डोअर

बिक्रम चंद्रा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी वकील आहे. पत्नी अनुराधा आणि बारा वर्षाची  मुलगी रिया यांच्यासोबत एक छान आयुष्य जगतोय. 
अनुराधा  डिप्रेशनमध्ये आहे आणि तिचे एका  मानसोपचारतज्ञाकडे उपचारही चालू आहेत. अनुराधा  एकलकोंडी बनली आहे. सतत गोंधळलेली आणि विसारळू  बनली आहे असे तो म्हणतो.त्याने तसे आपल्या आईला आणि सासऱ्यांना ही सांगितले आहे.
आजच बिक्रमने  एक खूप  गाजलेली केस जिंकली आणि तो आनंदात घरी आला .आल्यावर त्याने पत्नीचा वॉर्डरोब चेक केला .त्यातील वस्तूंचे फोटो काढले. तिच्या गाडीचे किलोमीटर चेक केले. फोन चेक केला . त्यानंतर त्याने तिला आईसस्क्रिम आणले का ? म्हणून विचारले. आईसस्क्रीमचे तिच्या लक्षात नव्हते म्हणून स्वतः जाऊन आईसक्रिम घेऊन आला . रात्री तिघेही एकत्र जेवले .
मध्यरात्री रियाला कसल्याश्या आवाजाने जाग आली . तिने बेडरूमचा दरवाजा उघडून पाहिला तर तिची आई बाहेर  जात होती. म्हणून ती त्यांच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिचे वडील जखमी अवस्थेत बेडवर पडले होते. त्यांच्या कुशीत सुरा भोसकला होता .भीतीने तिने तो सुरा बाहेर काढला आणि रक्ताची धार सुरू झाली.घाबरून तिने आपल्या आजीला फोन केला .
थोड्या वेळाने पोलीस  हजर झाले आणि बिक्रम चंद्राला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. थोड्याच वेळाने अनुराधाने त्याच्याजवळ येऊन सॉरी म्हटले आणि काही वेळाने बिक्रम चंद्रा मृत्यू पावला.
 रियाच्या जबानीनुसार पोलिसांनी अनुराधाला अटक केली. तिचा गाऊन रक्ताने माखला  होता . तिने आपण नवऱ्यावर  चाकूने वार केले हे  कबूल केले. 
तिचा बाप पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला .पोलिसांनी त्याला जामिनासाठी वकिलाची मदत घेण्यास सांगितले. बिक्रम चंद्रासारख्या वकीलावर हल्ला झालाय तेव्हा त्याच्या विरोधात कोणताही वकील केस लढणार नाही हे निश्चित होते.इतक्या रात्री कुठून वकील आणायचा या चिंतेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने माधव मिश्राला फोन केला .
माधव मिश्राचे लग्न झालेय .आज त्यांची पहिली रात्र आहे . त्याचवेळी त्याचा फोन वाजतो आणि त्याला केस घेणार का ? असे विचारले जाते. समोरची पार्टी तगडी मालदार असेल या आशेने  माधव तडक मुंबईला निघतो.
केस फारच सोपी आणि सरळ असते. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केला आहे.सर्व पुरावे अनुराधाच्या विरुद्ध आहे . सोशल मीडिया ,प्रेस सर्व अनुराधावर तुटून पडलेत.तिला तुरुंगातही त्रास होतोय.त्यात ती गरोदर असल्याची बातमी येते. अनुराधा काहीही बोलायला तयार नाही . माधव मिश्राला फक्त खुनाचा हेतू शोधायचा आहे.
अनुराधाविषयीची सगळी माहिती गोळा करायला माधव मिश्रा सुरवात करतो .त्याला साथ मिळते ती एका नवोदित हुशार स्त्री वकिल निखटची .निखटने माधव मिश्राला आधीच्या केसमध्येही मदत केलेली असते आणि त्याचा परिणाम नोकरी जाण्यात होते.आता ती पुन्हा जॉब शोधतेय .माधव पुन्हा तिला सहाय्यक बनण्याची विनंती करतो आणि ती स्वीकारते.
दोघे मिळून अनुराधाच्या केसचा पहिल्यापासून तपास करतात.त्यात त्यांना काही धक्कादायक गोष्टी कळतात.इथे तुरुंगात अनुराधा मुलीला जन्म देते. पण अजूनही ती खुनाचा हेतू सांगायला तयार नाही .
शेवटी असे काय घडते की भर कोर्टात अनुराधाला तोंड उघण्यास भाग पडते. का करते अनुराधा आपल्या पतीचा खून ??
नेहमीप्रमाणे पंकज त्रिपाठी माधव मिश्राच्या भूमिकेत भाव खाऊन गेलाय.संपूर्ण सिरीजच त्याच्या खांद्यावर आहे. अनुप्रिया गोयंका निखटच्या भूमिकेत शोभून दिसते.पंकज त्रिपाठीच्या समोर यावेळी आशिष विद्यार्थी सरकारी वकील म्हणून उभा राहिलाय .कीर्ती कुल्हारी अनुराधा चंद्राच्या भूमिकेत फिट बसते.

Wednesday, September 14, 2022

क्रिमिनल जस्टीज

क्रिमिनल जस्टीस
आदित्य शर्मा एक उत्साही तरुण. तो चांगला फूटबॉल प्लेयर आहे .एमबीए करून छान करियर करायचे अशी स्वप्ने बघतोय. फावल्या वेळात तो वडिलांची खाजगी कॅबही चालवतो. 
त्या दिवशी फुटबॉल मॅच जिंकल्यावर मित्रांसोबत पार्टी करायला निघतो पण त्याची बहीण त्याला थोडा वेळ कॅब चालव अशी विनंती करते. फक्त चार कस्टमर करेन असे सांगून तो बाहेर पडतो. 
शेवटच्या क्षणी एक तरुणी सनाया त्याच्या कॅबमध्ये बसते . सनाया थोडी अस्वस्थ असते.त्याच्या विनंतीकडे लक्ष न देता चार ठिकाणी फिरवते . त्यांची बाचाबाचीही होते. शेवटी ती त्याला घरी सोडायला सांगते . तोपर्यंत पार्टीला उशीर झालेला असतो. 
 आदित्य तिला घरी सोडून निघतो पण काही अंतर गेल्यावर त्याला तिचा फोन कॅबमध्ये सापडतो . तो पुन्हा तिच्या घरी जातो आणि तिला फोन देतो.
 त्याच्या प्रामाणिकपणावर ती खूष होते .त्याला आत बोलावून ड्रिंक ऑफर करते .तो नाही बोलतो तरी जबरदस्तीने पाजते. त्याच्यासोबत डान्स करते.ड्रग घेते. चाकूने गेम खेळते.शेवटी त्यांचे संबंध घडतात आणि नंतर  ते गाढ झोपून जातात .
पहाटे आदित्यला  जाग येते आणि बाजूचे दृश्य पाहून तो हादरतो. सनाया मेलेली असते. तिच्या अंगावर चाकूचे अनेक वार केलेले असतात. संपूर्ण बेड आणि चादर तिच्या रक्ताने माखलेले असते.
आदित्य  घाबरतो. घाईघाईने पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करतो.चाकू स्वतःच्या जाकिटात लपवून पळ काढतो.त्याचवेळी शेजारच्या इमारतीतील एक गृहस्थ त्याला पाहतो.
घाईघाईने कॅब घेऊन जाताना त्याची दुसऱ्या गाडीला धडक बसते.त्यानंतर पोलीस त्याला ड्रिंक अँड ड्रॉईव्ह आरोपाखाली अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तिथे त्याला तो गृहस्थ ओळखतो आणि पोलीस त्याला सनायाच्या  खुनाच्या आरोपाखाली अटक करतात .
माधव मिश्रा  लखनौ येथून गोल्ड मेडल मिळवलेला वकील.त्याच्याकडे फक्त ड्रिंक अँड ड्रॉईव्ह , रात्री वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सोडविणे अश्या छोट्या केस येतात.यावेळी ही पोलिसांनी आदित्य शर्मा सोबत काही स्त्रियांना अटक केलेली असते आणि या सर्व  केससाठी पोलीस माधवला बोलवितात.
आपल्या अशीलला खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय हे कळताच माधवच्या पायाखालची जमीन सरकते. इतकी मोठी केस तो हँडल करू शकणार नाही याची जाणीव त्याला होते.तरीही त्यांच्याकडून काही पैसे उकळता येतील का याची चाचपणी करायला जातो पण तिथे सुप्रसिद्ध वकील मंदिरा येते आणि कॅब कंपनीतर्फे आदित्यची केस ती लढणार असल्याचे जाहीर करते. नाराज चेहऱ्याने माधव तिथून बाहेर पडतो .
त्यानंतर माधव आपल्या परीने ही केस सोडविण्याचा प्रयत्न करतो .पण त्याला यश मिळेल का ? कोण आहे या खुनामागे ? खुनाचा हेतू काय आहे ? प्रत्येक भागात माधव आदित्य सोबत प्रेक्षकही गुंतून जातात .
या मालिकेतील प्रमुख आकर्षण आहे तो माधव मिश्रा अर्थात पंकज त्रिपाठी .चेहऱ्यावर भोळेपणाचा भाव आणून थंड आवाजात विनोदी  कसे बोलले जाते हे यांच्याकडून शिकावे. तर मिर्झापुरमध्ये हाच थंड आवाज वापरून दगडी चेहऱ्याने डोळ्यातून  अंगावर काटा आणणारा अभिनय केला होता. 
जॅकी श्रॉफची या मालिकेत एक तगडी भूमिका आहे . तो तुरुंगात एक खतरनाक कैदी आहे आणि आदित्यकडून  पैसे घेऊन त्याला  संरक्षण  देतोय. 
मिता विशिष्टने मंदिराची भूमिका केलीय.
पोलीस स्टेशन , तेथील वातावरण ,तुरुंगातील  कैद्यांचे जीवन , त्यांचे राहणीमान , कोर्टरूम , वकिलांची जुगलबंदी याचे सुरेख चित्रीकरण यात केले आहे.

Wednesday, September 7, 2022

युनिफॉर्म

युनिफॉर्म
अरुण भोसलेच्या घरात शिरताच तो प्रसन्न झाला .एकतर अरुणच्या तरुण मुलाच्या भक्कम हाताचा आधार होताच .त्यात मुलीने नेहमीप्रमाणे मखर सुरेख सजवला होता. काकूने प्रसन्न चेहऱ्याने त्याचे स्वागत केले.काल रात्रभर मखराची सजावट चालू होती.पण  कोणाच्याच चेहऱ्यावर थकवा दिसत नव्हता .दरवर्षी अरुणच्या घरी असेच वातावरण असायचे.शेवटी कोकणी माणूस.भक्ती करेल तर मनापासून .
अरुण घरी नव्हताच. तो कधी असतो म्हणा.
 आठ दहा वर्षापूर्वी तो पहिल्या दिवशी असायचा .पण नंतर ड्युटीवर गेला की घरी येण्याची वेळ नाही . गेली काही वर्षे मुंबई पोलिसांचे काम वाढलंय हे खरे. त्यात हा साधा शिपाई.
सीताराम भोसले म्हणजे याच्या बापाने शिव्या देत मारून मुटकून दहावीपर्यंत शिकवला आणि त्याच शिक्षणाच्या जीवावर पोलिसात चिटकवला.
मखरातील मऊ उबदार  आसनावर बसताच त्याने आपल्या उंदराकडे नजर टाकली.यावेळी काकूने त्यालाही भरजरी वस्त्रे शिवली होती त्यामुळे तोही खुश होता.समोर कोकणातील पारंपरिक पद्धतीचा नैवेद् होता.त्याकडे हावरट नजरेने पाहत शेपटी हलवीत होता.

"आपणही वाहन बदलावे का ?" तो उंदराकडे पाहून विचार करत होता. गेली हजारो वर्षे आपण तेच वाहन वापरतोय. इथे मात्र पंधरा वर्षांनी वाहने बदलायला सांगतात, नाही ,तर तसा कायदाच केला आहे .हल्ली हा खूपच आळशी झालाय आणि बडबड ही जास्त करू लागलाय. बघू पुढे "असं ठरवून तो पूजेसाठी सज्ज झाला .
दरवर्षीप्रमाणे यावेळी ही अरुण भोसलेची ड्युटी संवेदनशील ठिकाणी होती. नेहमीप्रमाणे वरिष्ठांनी याला बकरा बनवून तिथे पाठविले होते.या सणासुदीला अरुण भोसले सारखा माणूस प्रिय बनतो.
आता रिलिव्हरही एक दोन दिवस दांडी मारणार .पण अरुण साधा होता. न बोलता प्रामाणिकपणे ड्युटी करणारा .आताही त्या म्हातारीच्या हातातली जड पिशवी घेऊन तिला जिन्यावर चढायला मदत करत होता. तिच्या बरोबरची ती सुंदर स्त्री मात्र मोबाईलवर कोणाशी तरी हसून बोलत होती. 
तिचे सामान जागेवर ठेवून तो परत आपल्याजागी आला तेव्हा तो तरुण तिथे बसला होता.एक आपलेपणाचे हास्य त्याच्या चेहऱ्यावर होते .
"काय काका ? कसे चालले आहे ? सध्या हमालाची कामे ही करता का ?" त्याने हसत अरुणला विचारले.
"मी  विनायक , महादेव पार्सेकरांचा मुलगा "त्याने अरुणच्या प्रश्नार्थक नजरेला उत्तर दिले .
"पार्सेकर म्हणजे मधल्या वाडीतले की काय ?"अरुणने आश्चर्याने विचारले. 
"होय , इथे आलो होतो म्हटले भेटून जाऊ . कधी पर्यंत ड्युटी तुमची ?" त्याने विचारले.
"अरे या ड्युटीचा काय घेऊन बसलस. ती तर माझ्या पचवीक पुजली असा.दोन दिवस हयसून खय जावूक मिळत ना बघ"  शेवटी कोकणी माणूस भेटताच अरुणचा बांध फुटला.
"वाटलाच माका. युनिफॉर्मचो वास हयसर मारता बघा" तो हसत म्हणाला.
" मग काय तू धुवून देणार आहेस का ?" अरुण चिडला ."तुम्हाला काय माहित,  किती टेन्शन असते आम्हाला . जरा चुकीचे पाऊल उचलले की हंगामा होईल. घरी बाथरूमच्या दरवाजाची कडी तुटलीय ती लावायला वेळ नाहीय.घरी तरुण बायको आहे मुलगी आहे काळजी वाटते ." अरुण आता जास्तच चिडला होता .
"तरुण बायको ? "त्याने मिस्कीलपणे अरुणकडे खालून वर पाहत विचारले.
"कोकणातला ना रे तू ? मग तुका माहीत नाय ,प्रत्येक कोकणी माणसाक त्याची बायको नेहमीच तरुणच वाटता " असे बोलून जोरात हसला.
"बरे द्या, मी तुमचे कपडे धुवून आणतो "त्याने हात पुढे करत विचारले.
"काय तरी काय ? आणि काय नागडो बसून ड्युटी करू? थट्टेने बोललय मी , मनावर घेऊ नको आणि कपडे काढले तर आतील फाटकी बनियन दिसायची " अरुण पुन्हा हसला .
"काका मी घरून तुमचे कपडे घेऊन आलोय. हे घाला ." असे बोलून त्याने कडक इस्त्रीचा युनिफॉर्म त्याच्या हातात दिला.
" घरून इलास ता बोललस नाय. आमचो बाप्पा बसलो की नाय ? पूजा बिजा झाली काय ?? दोन वर्षा खूप कठीण गेली रे.मागच्या वर्षी तुझ्या काकीला करोना झाला .ती बाहेर ,मी ड्युटीवर,  पोरांनी सर्व केलान हो ."अरुण हळूच डोळे पुसत म्हणाला . 
"सर्व व्यवस्थित झाले काका. हे कपडे घाला तोवर मी हे अंगावरचे कपडे धुवून आणतो ."असे म्हणून तो अंगावरचा युनिफॉर्म घेऊन निघाला.
 कडक इस्त्रीचा युनिफॉर्म अंगावर चढवताच अरुणला खूपच फ्रेश आणि प्रसन्न वाटू लागले. जणू काही एक नवीन उर्जाच त्याच्या अंगात निर्माण झाली .थोड्या वेळाने तो धुतलेला युनिफॉर्म हाती घेऊन आला .
"काका मस्त दिसता हो. ते शूजही द्या . पॉलिश करून आणतो . "असे बोलून जबरदस्तीने शूज काढून घेऊन गेला . काही वेळाने त्याने चकचकीत पॉलिश केलेले शूज त्याच्या हाती दिले.
"आता कसे छान रुबाबदार दिसताय तुम्ही . आता हा प्रसाद घ्या " असे बोलून त्याने उकडीचा मोदक अरुण च्या हाती दिला.मोदक तोंडात टाकताच त्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.
"काका तुमच्याच घरचा आहे . काकीने बनविलेला ." तो हसत म्हणाला .
खुश होऊन अरुणने हात जोडले."चल एक आठवण म्हणून सेल्फी काढू " असे बोलून अरुणने त्याच्यासोबत दोन सेल्फी घेतले.
"तुझा नंबर दे " अरुणने मोबाईल हातात घेत विचारले
"नंबर नाहीय माझ्याकडे .फोन बिघडलाय पण भेटीन ना मी तुम्हाला पुढे " तो म्हणाला आणि घाईघाईत निघून गेला.
"आलात का त्याचे कपडे धुवून ?" मखरात शिरताच उंदीर कुत्सितपणे म्हणाला . " शूजही पॉलिश करून दिले असतील ?"
"काय झाले रे त्यांची थोडी सेवा केली तर ? आज कित्येक वर्षे भोसले कुटुंब मनोभावे आपली सेवा करतात.अरुण बघ स्वतःचा घरचा गणपती सोडून लोकांचे गणपती कसे सुरक्षित राहतील त्याची काळजी घेतोय. करोनात कित्येक पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती दिले पण जनतेची सेवा केली. मग एक दिवस आपण त्यांची सेवा केली तर काय हरकत आहे. त्याच्या घरी माझी वस्त्रे नेहमीच बदलली जातात आणि तुझीही .मग त्याने का दोन दिवस एकाच युनिफॉर्मवर राहावे. केली मदत त्यात काय " बेफिकीर स्वरात त्याने समोरचा मोदक उचलला.
"मग तू धुतलेस का ?" उंदराने कुतूहलाने विचारले
"छे. छे.. आपण कुठे काम करतो ? इकडचे तिकडे करतो फक्त.एका बाईला सांगितले ते पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेत पण दोन दिवस युनिफॉर्म बदलला  नाही. तिने ताबडतोब धुवून दिला .तेच बूट पॉलिश साठी केले. लोक मदतीला नेहमी तयार असतात . फक्त आपण सांगत नाही " त्याने हसत हसत उत्तर दिले.
इथे मुलाने अरुणला फोन केला."काय हो बाबा कसलेही सेल्फी काय म्हणून पाठवता .एकट्याचा सेल्फी काढण्यापेक्षा गणपतीसोबत तरी काढून पाठवायचा ."
आपल्या सोबत सेल्फीत असणारा महादेव पार्सेकरचा मुलगा कसा दिसत नाही ? हाच प्रश्न पुढे दिवसभर अरुणला छळणार होता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 6, 2022

कलंक

कलंक 
त्या वृद्धाश्रमात आज नेहमीपेक्षा जास्तच गडबड दिसत होती.कारणच तसे होते.
आजपासून गणेशोत्सव चालू होणार होता. सर्व वृद्ध स्त्रीपुरुष आपल्यापरीने गणेशाच्या आगमनाची तयारी करत होते. गणेशाची पूजा करायला का होईना काहीजणांनी मुले नातेवाईक येणार होते.
आता दहा दिवस वृद्धाश्रम उत्साहाने फुलून जाणार होता. थरथरत्या हाताने आरती ओवाळली जाणार होती तर अडखळत का होईना पण उत्साहात आरती म्हटली जाणार होती.
शहराबाहेर तो वृद्धाश्रम बांधला होता.कोणी बांधला होता याची माहिती फारशी कोणाला नव्हती. पण नको झालेल्या वृद्धांना हा आश्रम सहारा देतो हे बहुतेकांना माहीत होते. त्यामुळे बरेच वृद्ध स्त्रीपुरुषांच्या हक्काचे ठिकाण बनले होते.
इथे अति वृद्ध ,आजारी,  रोगी , जखमी असे सर्वजण एकमेकांना सांभाळत राहत होते. इथला खर्च कोण कसा चालवतो याची माहिती कोणाला नव्हती पण एक दोन केयरटेकर नियमितपणे वृद्धाश्रमाची काळजी घेत होते. 
बापू राणे साधारण  नव्वदीच्यावर होते. आता त्यांचे उरलेले आयुष्य अंथरुणात आणि व्हीलचेयरवर होते. 
दरवर्षी गणपती आला की ते आयुष्यातून सुटका मागत होते. पण अशी सुटका त्यांच्या नशिबात अजूनतरी दिसत नव्हती.
आश्रमातील इतर वृद्ध त्यांच्यापासून लांबच राहत होते . तर काही ओळखीचे त्यांना चोर म्हणून ओळखत होते .
 खरे आहे , बापूंनी आपली उमेदीची काही वर्षे तुरुंगात काढली होती . त्यावेळी तुरुंगवास झालेल्या व्यक्तींना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान होता . पण बापूंच्या ते ही नशिबात नव्हते. 
टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील एका मूर्तीचे दागिने चोरल्याचा आळ त्याच्यावर होता आणि त्याचीच शिक्षा त्यांनी भोगली होती. ते दागिने  अजूनपर्यंत कधीच सापडले नव्हते आणि बापूनी ते कुठे आहेत हे सांगायला अजूनही तोंड उघडले नव्हते.
त्यांच्या या कृतीची शिक्षा कुटुंबीयांनी भोगली होती. घरदार सोडून दूर या शहरात यावे लागले होते. पण इथेही त्यांची अपकीर्ती पाठ सोडत नव्हती.
काळ बदलला. हळूहळू वातावरण निवळू लागले. त्यांच्या नातवंडांनी ही गोष्ट कधीच फारशी मनाला लावून घेतली नव्हती. ते सर्व आता उच्चवर्गीय झाले होते आजोबांचा घरात त्रास होऊ लागला होता .मग त्यांची रवानगी ह्या वृद्धाश्रमात झाली होती.
दुर्दैवाने इथेही त्यांच्या कामगिरीची बातमी पोचली होती. काही वृद्ध त्यांना ओळखत होते आणि त्यांनीच ही बातमी संपूर्ण वृद्धाश्रमात फैलावली होती.त्यामुळे प्रत्येकाची त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली होती. म्हणूनच बापू राणे आयुष्याला कंटाळले होते.कधी एकदा गणपती येतो आणि त्याच्याकडून सुटका करून घेतो असे झाले होते.
 बाप्पा मोरयाच्या गजरात सिंहासनावर बसून तो आत शिरला तेव्हा त्याच्या मनात धडधड सुरू झाली. दोन्ही बाजूला पाट धरून उचलणारे म्हातारे स्वतःला तरी सांभाळतील का याचीच भिती त्याला मखरापर्यंत  पोचेपर्यंत वाटत होती. हताश नजरेने तो नेहमी आपल्या बाजूला असणाऱ्या उंदराला शोधू लागला .तेव्हा ते महाशय आधीच मखरात जाऊन स्वतःची जागा पटकावून बसले होते. त्याच्या नजरेतील छद्मी भाव पाहून तो हसला आणि अलगद जागेवर जाऊन बसला.
" तुम्हाला या म्हाताऱ्यांच्यात बसायला बरे आवडते "प्रसादासाठी आणलेल्या उकडीच्या मोदकाकडे तो आशाळभूत नजरेने पाहत म्हणाला .
" अरे बरेच हिशोब बाकी आहेत यांच्याकडे, म्हणून मुद्दाम आलोय इथे " तो लोडाला टेकून आजूबाजूला नजर फिरवीत म्हणाला .
"आरती तरी फिरवतील ना नीट.नाहीतर पेटता दिवा आपल्याच अंगावर पडायचा .आरती स्पष्ट तरी म्हणता येईल का त्यांना " त्याने शेपटी हलवीत नाक मुरडत विचारले.
" हीच ती माणसे आहेत ज्यांनी आपल्याला घरातून बाहेर काढून सार्वजनिक बनविले आणि स्वातंत्र्यसंग्राम पेटविला हे विसरू नकोस मूषका " कठोर आवाजात त्याने आपल्या अधिकाराची जाणीव करून दिली.
त्यानंतर रोज त्याची आरती झाल्यावर वेगवेगळे कार्यक्रम होत होते. तोही तल्लीन होऊन त्याचा आनंद घेत होता .बापू राणे मात्र खोलीतूनच त्याच्या पाया पडत होते.
विसर्जनाच्या दिवशी एक तरुण वृद्धाश्रमात शिरला .भारतीय स्वातंत्र्यसंग्रामावर  काही व्याख्यान द्यायची इच्छा होती. स्वातंत्र्यसंग्राम हे नाव ऐकताच बापू राणे व्हिलचेयर वरून बाहेर आला . त्यांना पाहून तो तरुण हसला . त्याचे आश्वासक हास्य पाहून बापू भारावून गेला.
"भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामचा तो ऐन भराचा काळ होता. महात्माजींनी करो या मरो अशी हाक दिली होती .काही ठिकाणी हिंसा चालू होती .इंग्रज अधिकारी त्याचा फायदा घेऊन घरदार लुटत होते तर काही इंग्रज, स्त्रियांची अब्रू खुलेआम लुटत होते.अश्याच एका घरात ते चार इंग्रज अधिकारी शिरले आणि त्या घरातील दोन छोट्या मुलींची आणि त्यांच्या आईची अब्रू लुटून त्यांना ठार केले.पण काही काही महिन्यातच त्याच घरात त्यांची गोळ्यांनी छिन्न झालेली प्रेते सापडली होती. आजपर्यंत त्यांना कोणी ठार केले याचा शोध लागला नाही.अजूनही ती केस ब्रिटिश दप्तरी ओपनच आहे .पण त्या घटनेच्या काही दिवस आधी त्या गावातील सार्वजनिक गणपतीच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले होते त्या चोराला मात्र इंग्रजांनी पकडले काही वर्षे तुरुंगवास भोगून तो कुठे गायब झाला ते कळलेच नाही ." तो तरुण रंगून व्याख्यान देत होता.
" हे काय ते महान चोर बापू राणे." कोपऱ्यात केविलवाणा चेहरा करून  बसलेल्या बापूंच्या दिशेने बोट करीत एक वृद्ध म्हणाला .
" तुम्हाला फक्त त्यांची अर्धवट कथा माहितीय .त्यांनी चोरी केली हे खरंय पण त्या दागिन्यांतून त्याने बंदूक आणि काडतुसे खरेदी केली आणि त्या चार अधिकाऱ्यांसह पुढे कित्येक इंग्रजांना ठार केले हे कितीजणांना माहीत आहे "त्या तरुणाने शांतपणे प्रश्न विचारला .
ते ऐकताच सर्व स्तब्ध झाले . सर्वांनी उठून बापूंपुढे हात जोडले आणि माफी मागितली.
बापूनी भरल्या डोळ्यांनी त्या तरुणांकडे पाहत हात जोडले आणि खोलीत नेण्याची खूण केली.
त्या तरुणाने व्हीलचेयर ढकलत खोलीत आणली." हे सर्व तुला कसे कळले ? माझ्याशिवाय ही गोष्ट कोणालाच माहीत नाही" बापूनी त्याच्या डोळ्यात नजर रोखून विचारले.
" आहो बापू माझेच तर दागिने त्या दिवशी चोरले होते तुम्ही आणि त्या दागिन्यांचे तुम्ही काय करणार याचीही माहिती होती मला. "तो हसत म्हणाला .
" मग इतकी वर्षे का आला नाहीस.? गेली कित्येक वर्षे माझी सुटका कर म्हणून हात जोडून विनंती करतोय तुला ? खरे सांग कोण आहेस तू ? बापूनी रागानेच विचारले.
" कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते बापू. आज ती वेळ आलीय पण जाण्यापूर्वी तुमच्या नावावर लागलेला कलंक ही मिटला पाहिजे .कळू द्या जगाला स्वातंत्र्यलढ्यात तुमचे काय योगदान आहे ते आणि जाता जाता मी कोण हे ही दाखवतो तुम्हाला " असे बोलून त्याने आपले खरे रूप प्रकट केले.बापूनी  मान  वर करून पाहिले तर तो आपल्या मूळ रुपात उभा होता .त्याचे ते तेजस्वी रूप बापूंना सहन झाले नाही .समाधानाने त्यांनी डोळे मिटले .
" काय  गरज होती त्याला आपले खरे रूप दाखवायची " नेहमीप्रमाणे उंदीर चिडून म्हणाला .
" अरे आज त्याचा शेवटचा दिवस आहे या जगात. त्याने केलेल्या कार्याची कदर व्हावी म्हणून त्याला खरे रूप दाखवून समाधान दिले" तबकातील एक मोदक तोंडात टाकीत तो हसत म्हणाला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, September 4, 2022

मदत

मदत
गणेशोत्सव जवळ आला की त्या विभागातील सर्व नागरिक आणि दुकानदारांना मोठे दडपण यायचे . याचे कारण म्हणजे रघूदादा.
 आपले दोनतीन पंटर घेऊन प्रत्येक दुकानात आणि घराघरात फिरायचा . त्याची ती थंड नजर पाहून समोरची व्यक्ती मुकाट्याने पैसे देत असे. पावती वगैरे भानगड नाही. ऑनलाइन वर्गणी तर अजिबात नाही. फक्त कॅश. 
जो विरोध करेल त्याच्याकडे फक्त आपली भेदक नजर टाकून पुढे जायचा .दोन दिवसानी विरोध करणारा गळ्यात हात बांधून किंवा पायाला बँडेज बांधून वॉकर घेऊन फिरताना दिसायचा .
रघूदादाचा कारभार अतिशय शांतपणे चालला होता.एरियातील सर्व सण तो साजरे करायचा .पण त्यातही गणेशोत्सव मात्र जोरदार.
पहिल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस नुसता उत्साह असायचा. खाण्यापिण्याची चंगळ असायची . या दिवसात रघूदादाचे वेगळेच रूप पाहायला मिळायचे. त्याच्याकडे कोणीही मदत मागायला गेला की तो नाही म्हणायचा नाही .अट फक्त एकच , त्याच्या पाया पडून मदतीची याचना करा. असे कोणी मदतीची भीक मागताना पाहून त्याला आपण जणू देवच असल्याचा भास होई.
 ती त्या वस्तीत आपल्या मुलीसोबत राहत होती. करोनात नवरा गेला .त्यामुळे आर्थिक स्थिती थोडी गंभीरच होती.देवावर भरोसा ठेवून दोघीही येणारा दिवस ढकलत होत्या.
तशी ती मिळेल ते काम करीत होती. पण रोजच काम मिळेल असे नाही ना. रघूदादाकडे मदत मागायला जायचे तर आधी त्याच्या पायावर लोटांगण घालावे लागेल याची जाणीव तिला होती आणि तिला तेच नको होते.जीव देईन पण मदतीसाठी कोणाच्या पायावर डोके ठेवणार नाही  असा तिचा ताठा होता.
यावर्षी त्या दोघीही गणपतीचे स्वागत उत्साहात करणार होत्या. आहे त्या तुटपुंज्या पैश्यात तिच्या घरी गणेशाचे स्वागत उत्साहाने होणार होते.
तो उत्साहाने तिच्या घरात शिरला .आपले साधे मखर पाहून त्याने समाधानाने मान डोलावली. त्या जुनाट पाटावर तो खुशीत मांडी घालून बसला.आपल्या नाखुषीने नाक मुरडणाऱ्या उंदराकडे त्याने लक्ष न देता समोरच्या खोबऱ्याच्या वड्यांकडे हसत हसत पाहिले आणि तिच्या तरुण मुलीला मनातून आशीर्वाद दिला .
" देवा,  यावर्षी मला इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळू दे" ती त्याच्या पुढे हात जोडून म्हणाली तसा तो चमकला .
" अरे बापरे ! होय म्हटले तर पैश्याचीही सोय करावी लागेल. नाही म्हटले तर तिची बुद्धी वाया जाईल."तो द्विधा मनस्थिती सापडला. त्याची ही अवस्था पाहून खोबऱ्याची वडी कुरतडून खात असलेला उंदीर खुश झाला.
" झाले समाधान .तरी म्हटले होते या घरात नको .काही मानपान नसतो. ह्या अश्या वड्या खाव्या लागतील पाच दिवस. धड आरती नाही.कोण भक्त नमस्कार करायला येत नाहीत. तरीही तुला इघे आवडते. तो उंदीर छद्मीपणे हसत म्हणाला.
" मग काय फक्त उच्च मध्यमवर्गीय ,श्रीमंत लोकांकडे जावेच का ? खोबऱ्याच्या वड्या तर कोकणात ही देतात आपल्याला.त्यांची भक्ती श्रद्धा पाहून आपण जातो त्यांच्याकडे. हो, आता तिची मागणी पूर्ण करणे थोडे अवघड आहे .कारण आपण देव असलो तरी चमत्काराने कोणाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. इकडचे काढून तिकडे देतो. जस्ट लाईक ट्रेडिंग .तिच्याकडे बुद्धी आहे.त्यामुळे तिला ऍडमिशन मिळणार हे नक्की.पण पैसे कुठून आणायचे हा प्रॉब्लेम आहेच .जाऊदे ,  करू काहीतरी पुढे. सध्या आराम करू "असे बोलून त्याने डोळे मिटले आणि शांतपणे घोरू लागला.
रघूदादा आपल्या ऑफिसमध्ये पायावर पाय टाकून आरामात बसला होता.ऑफिस कसले ? नाक्यावर चहाची टपरी होती ती. तिथून त्याला गणपतीचा मंडप आणि बाजारपेठ दिसे. त्याचवेळी एक माणूस त्याला शोधतच समोर आला, 
"साहेब , मला तुमच्याकडून मदत हवीय ."पायाजवळ घुटमळणार्या उंदराला तो हूसकावत म्हणाला.
"कसली मदत ? आणि माझी अट माहितीय ना ?"आपले दोन्ही पाय सरळ करत रघूदादा डोळे रोखून म्हणाला.
" होय, असे म्हणत तो तरुण त्याच्या पायाशी बसला आणि त्याचे पकडून म्हणाला मला काही पैसे हवेत "
" दिले.रघूदादा खुश होऊन म्हणाला. किती पाहिजे तितके घेऊन जा " 
तो रघूदादाने दिलेले पैसे घेऊन तिच्या घरात शिरला .
" हे तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे."
" कोण तुम्ही ? आणि हे पैसे का आम्हाला देतायत ?"ती आश्चर्यचकीत होऊन उद्गारली
"आम्ही एक एनजीओ आहोत. हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करतो.तुमची मुलगी हुशार आहे . पुढे शिकायची इच्छा आहे म्हणून तिला मदत करायला आलो. " तो म्हणाला .
" पण आम्ही हे पैसे परत कधी करायचे." तिने काळजीने विचारले
" परत नाही करायचे, पण भविष्यात गरीब आणि हुशार विद्यार्थ्याना शिक्षणासाठी मदत करायची .तसे केले की आमचाही भार कमी होईल" तो हात जोडून म्हणाला.
तिने डोळ्यातील अश्रू पुसत हात जोडले आणि पैसे ठेवायला कपाटाकडे वळली.
तिची पाठ वळताच त्याने मखरात उडी मारली आणि त्या पाटावर शांतपणे बसला.
" पैसे घेण्यासाठी त्या रघुदादाच्या पाया पडायची काय गरज ?"  समोरील केळ्याचा तुकडा तोडत त्या उंदराने चिडून विचारले.
" मग काय कोणा श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करून पैसे आणू ?अरे मी देव असलो तरी असे चमत्कार करू शकत नाही आणि नेहमी लोक आपल्या पाया पडून वेगवेगळे नवस बोलतात मग एक दिवस आपण त्यांच्या पाया पडलो तर काय हरकत आहे. आपल्या एका पाया पडण्याने एक शैक्षणिक साखळी निर्माण झाली बघ.  भविष्यात तीच मुलगी अनेक विद्यार्थ्यांना मदत करेल.आपण काही करत नाही तर फक्त मार्ग दाखवतो." असे म्हणून त्याने शांतपणे डोळे मिटले.
"बाप्पा मोरया " असे म्हणत त्या उंदराने हात जोडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, September 2, 2022

जुळे

जुळे
रात्रीचे अडीज वाजले असतील.शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या त्या भागात अजूनही लगबग आणि गर्दी दिसत होती. 
पण एका अंधाऱ्या गल्लीत ती टपरी अजूनही चालूच होती. होय, गणेशोत्सव उत्साहात सुरू होता. त्या भागात अनेक सार्वजनिक गणपती बसले होते. दोन वर्षे कोविड लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मंडळांनी अतिशय साधेपणाने उत्सव साजरा केला होता.
पण यावर्षी सरकारने सणांवर लादलेली बंधने काढून टाकली होती. त्यामुळे पुन्हा उत्साहात सगळी गणेश मंडळे आपल्या विभागात गणेशोत्सव साजरा करीत होते.
एका रोषणाईने सजलेल्या गल्लीतून तो बाहेर त्या टपरीवर आला.त्याचे कपडे उच्च दर्जाचे दिसत होते.हातात ,गळ्यात सोन्याचे दागिने होते.आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक .
टपरीजवळच्या लाकडी बाकड्यावर बसून त्याने "अण्णा , एक कटिंग ." अशी ऑर्डर सोडली आणि हुश्श करून पाण्याचा जग त्याने तोंडाला लावला .
इतक्यात दुसऱ्या गल्लीतून दुसरा बाहेर आला . त्याचेही कपडे उच्च दर्जाची खूण दाखवीत होते .हातात गळ्यात फारसे दागिने ही नव्हते पण चेहऱ्यावरची बुद्धिमत्ता मात्र सारखीच होती. त्यामुळे दोघांचे चेहरेही सारखेच दिसत होते.कोणतीही घाई नसल्यासारखा तो आरामात पहिल्याचा बाजूला बसला .
"अण्णा एक कटिंग .पण कडक बनव, नवीन चहा  बनव मला घाई नाही ."असे म्हणत त्याने बरणीतल्या नानकटाईत हात घातला .
अचानक त्याने पहिल्याकडे पाहिले आणि मानेनेच घेणार का ? असे खुणेनेच विचारले.
पहिल्याने आशाळभूत नजरेने त्या बिस्किटाकडे पाहिले .तसा दुसरा हसला आणि एक बिस्कीट त्याला दिले.
"कुठला ..? " दुसर्याने त्याच्या बाजूला बसत विचारले.
"श्रीपार्कचा ,पाहिल्याने उत्तर दिले  तू "
" तिरंगी चाळ ."एका गल्लीच्या दिशेने बोट दाखवीत दुसरा म्हणाला . " तरीच, त्या बिस्किटाकडे नवलाईने पाहत होतास .कधी पाहिले नाही असे. तुम्ही श्रीमंत लोक.नेहमी तुमच्याकडे गडबड .लोकांच्या नवसाला पावणारे तुम्ही." चेहऱ्यावर छद्मी हास्य आणत दुसरा तोंडात बिस्कीट टाकत म्हणाला .
" कसला श्रीमंत रे . पार वाट लावून टाकलीय माझी. इथे झोपायला काय पण साधा श्वास घ्यायला मिळत नाही . सतत कोणी ना कोणी येत असतो .मनातील इच्छा बोलत असतो. सगळ्यांना होय म्हणावे लागते" पहिला कंटाळून म्हणाला ," तू इतका आरामात का ?? तुझ्याकडे गर्दी नाही का ?"त्याने कुतूहलाने दुसऱ्याला विचारले .
" ह्या ! तू बाजूला असताना माझ्यासारख्या गरीबाकडे कोण येईल ?  मस्तपैकी दिवसभर बसून असतो .काही येतात, पण कोण आपल्या मनातील इच्छा बोलत नाहीत .चुकून बोलल्या तर माझा मूड असेल तर त्या पूर्ण करतो. पण दर्शन मात्र डोळे भरून मिळते. त्या दिवशी एकजण आला . पुढ्यातच मांडी घालून बसला आणि लागला गायला.दोन तास तल्लीन होऊन गात होता .तुला सांगतो बालगंधर्वांची आठवण झाली .एके काळी ते ,दीनानाथ मंगेशकर असेच पुढ्यात बसून गात होते."तो जुन्या काळात हरवून गेला .
"आयला, मजा आहे रे तुझी .माझ्याकडे तर रांगच रांग असते दर्शनासाठी. रांगेत त्यांची भांडणेच भरपूर. चुकून धक्का लागला तर अंगावर येतात आणि ते रेकॉर्ड करायला मिडियावाले असतातच. कुठे मनोरंजन नाही आणि कुठे जाताही येत नाही . प्रसाद ही एकदम भारी भारी असतो. हे बिस्कीट तर कधी पाहिले ही नाही. शेवटी आज गर्दी कमी झाली तसा सटकलो .म्हटले ते नेहमीचे दूध पिण्यापेक्षा कटिंग मारू.
दोघेही हसत चहा पिऊ लागले.
" पण मला एक सांग आपण दोघेही सारखेच आहोत.बाजूबाजूला राहतो.तरी तू आरामात राहतोस मला इतका त्रास का ..? पाहिल्याने दुसऱ्याला विचारले.
" अरे तुला सवय झालीय प्रत्येकाला होय म्हणायची . मग ते खुश होऊन तुला भेटवस्तू देतात .माझे तसे नाही .मी फारच कमी आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच हो म्हणतो.आता त्या दिवशी एक बाई आली. तिची मुलगी हुशार आहे पण पुढे शिकायला पैसे नाहीत मग मी तिला होय म्हणालो.उद्या काहीजण तिला मदत करायला घरी जातील. पण तू..? त्या दिवशी तो  गृहस्थ मला सुख शांती दे असे म्हणाला तर तू पटकन होय बोलून गेलास .त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध आईवडिलांना  वृद्धाश्रमात सोडून दिले.आता घरी छान आयुष्य जगणार तो.मिळाली त्याला सुख शांती." असे म्हणून मोठ्याने हसला 
" मी अश्या लोकांना उभे करीत नाहीं म्हणून माझ्याकडे कोण येत नाही ." अजून एक बिस्कीट त्याच्या पुढे करीत दुसरा म्हणाला .
" हा अण्णा बघ .कधीच आपल्याकडे येत नाही .पण गणेशोत्सवात चोवीस तास टपरी चालू.त्याच्या टपरीत बघ.." असे म्हणून दुसर्याने टपरीत बोट दाखविले.
पहिल्याने त्या दिशेकडे पाहिले .तेव्हा देव्हाऱ्यात तो बसला होता. त्याने हसून त्या दोघांकडे पाहून ओळखीचा हात हलविला.
"अण्णा , भगवान को मानते हो."पाहिल्याने हसून विचारले.
"हा साब , रोज सुबह उसके सामने हात जोडता हू, और हार डालता हू " अण्णा हसत म्हणाला .
"कुछ मांगते नही. " दुसर्याने विचारले 
" क्या जरूरत है साब, ये सब तो उसकी देन है. मै तो सिर्फ मेहनत करता हू .अभी ये दस दिन धंदा इतना जोर से है की गाव से भतिजे को बुलाना पडा, उसको दुसरी टपरी बांधके दी है ." एका बंद टपरीकडे बोट दाखवत अण्णा म्हणाला .
" बघ , याला आपल्याकडे यायची गरज पडली नाही तरी आपण याला भरभरून देतोय. सकाळी फक्त स्वच्छ निर्मळ मनाने पाया पडतो आपल्या." दुसरा हसत हसत म्हणाला .
" खर आहे,  पण सध्या आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.मागची दोन वर्षे आरामात गेली.पण पुढे आपल्याला खूप कठीण जाणार आहेत. काय सांगावे पुढे तुला ही आराम मिळणार नाही"  पहिला दुसऱ्याच्या खांद्यावर थाप मारून म्हणाला .
" बस क्या , माझ्याकडून दोन बिस्किट्स खाऊन वर मलाच शाप देतोस का ? चल वेळ मिळाला तर ये उद्या ह्याच वेळी .आता मी शांतपणे झोपतो .मंडपात पत्त्यांचा मोठा डाव सुरू आहे ." असे बोलून दुसर्याने पहिल्याच्या हातावर टाळी दिली आणि आपापल्या मार्गाने निघाले.
दोन जुळे भाऊ परस्पर विरोधी दिशेने निघालेले पाहून अण्णा विचारात पडला.
श्रीपार्कात गणपतीच्या मंडपात अजूनही दर्शन चालू होते आणि तो प्रत्येकाच्या इच्छेला होकार देत चेहऱ्यावर कंटाळा न दाखवता तो उद्याच्या रात्रीची वाट पाहत उभा होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, September 1, 2022

जुळे

जुळे
रात्रीचे अडीज वाजले असतील.शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या त्या भागात अजूनही लगबग आणि गर्दी दिसत होती. 
पण एका अंधाऱ्या गल्लीत ती टपरी अजूनही चालूच होती. होय, गणेशोत्सव उत्साहात सुरू होता. त्या भागात अनेक सार्वजनिक गणपती बसले होते. दोन वर्षे कोविड लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मंडळांनी अतिशय साधेपणाने उत्सव साजरा केला होता.
पण यावर्षी सरकारने सणांवर लादलेली बंधने काढून टाकली होती. त्यामुळे पुन्हा उत्साहात सगळी गणेश मंडळे आपल्या विभागात गणेशोत्सव साजरा करीत होते.
एका रोषणाईने सजलेल्या गल्लीतून तो बाहेर त्या टपरीवर आला.त्याचे कपडे उच्च दर्जाचे दिसत होते.हातात ,गळ्यात सोन्याचे दागिने होते.आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक .
टपरीजवळच्या लाकडी बाकड्यावर बसून त्याने "अण्णा , एक कटिंग ." अशी ऑर्डर सोडली आणि हुश्श करून पाण्याचा जग त्याने तोंडाला लावला .
इतक्यात दुसऱ्या गल्लीतून दुसरा बाहेर आला . त्याचेही कपडे उच्च दर्जाची खूण दाखवीत होते .हातात गळ्यात फारसे दागिने ही नव्हते पण चेहऱ्यावरची बुद्धिमत्ता मात्र सारखीच होती. त्यामुळे दोघांचे चेहरेही सारखेच दिसत होते.कोणतीही घाई नसल्यासारखा तो आरामात पहिल्याचा बाजूला बसला .
"अण्णा एक कटिंग .पण कडक बनव, नवीन चहा  बनव मला घाई नाही ."असे म्हणत त्याने बरणीतल्या नानकटाईत हात घातला .
अचानक त्याने पहिल्याकडे पाहिले आणि मानेनेच घेणार का ? असे खुणेनेच विचारले.
पहिल्याने आशाळभूत नजरेने त्या बिस्किटाकडे पाहिले .तसा दुसरा हसला आणि एक बिस्कीट त्याला दिले.
"कुठला ..? " दुसर्याने त्याच्या बाजूला बसत विचारले.
"श्रीपार्कचा ,पाहिल्याने उत्तर दिले  तू "
" तिरंगी चाळ ."एका गल्लीच्या दिशेने बोट दाखवीत दुसरा म्हणाला . " तरीच, त्या बिस्किटाकडे नवलाईने पाहत होतास .कधी पाहिले नाही असे. तुम्ही श्रीमंत लोक.नेहमी तुमच्याकडे गडबड .लोकांच्या नवसाला पावणारे तुम्ही." चेहऱ्यावर छद्मी हास्य आणत दुसरा तोंडात बिस्कीट टाकत म्हणाला .
" कसला श्रीमंत रे . पार वाट लावून टाकलीय माझी. इथे झोपायला काय पण साधा श्वास घ्यायला मिळत नाही . सतत कोणी ना कोणी येत असतो .मनातील इच्छा बोलत असतो. सगळ्यांना होय म्हणावे लागते" पहिला कंटाळून म्हणाला ," तू इतका आरामात का ?? तुझ्याकडे गर्दी नाही का ?"त्याने कुतूहलाने दुसऱ्याला विचारले .
" ह्या ! तू बाजूला असताना माझ्यासारख्या गरीबाकडे कोण येईल ?  मस्तपैकी दिवसभर बसून असतो .काही येतात, पण कोण आपल्या मनातील इच्छा बोलत नाहीत .चुकून बोलल्या तर माझा मूड असेल तर त्या पूर्ण करतो. पण दर्शन मात्र डोळे भरून मिळते. त्या दिवशी एकजण आला . पुढ्यातच मांडी घालून बसला आणि लागला गायला.दोन तास तल्लीन होऊन गात होता .तुला सांगतो बालगंधर्वांची आठवण झाली .एके काळी ते ,दीनानाथ मंगेशकर असेच पुढ्यात बसून गात होते."तो जुन्या काळात हरवून गेला .
"आयला, मजा आहे रे तुझी .माझ्याकडे तर रांगच रांग असते दर्शनासाठी. रांगेत त्यांची भांडणेच भरपूर. चुकून धक्का लागला तर अंगावर येतात आणि ते रेकॉर्ड करायला मिडियावाले असतातच. कुठे मनोरंजन नाही आणि कुठे जाताही येत नाही . प्रसाद ही एकदम भारी भारी असतो. हे बिस्कीट तर कधी पाहिले ही नाही. शेवटी आज गर्दी कमी झाली तसा सटकलो .म्हटले ते नेहमीचे दूध पिण्यापेक्षा कटिंग मारू.
दोघेही हसत चहा पिऊ लागले.
" पण मला एक सांग आपण दोघेही सारखेच आहोत.बाजूबाजूला राहतो.तरी तू आरामात राहतोस मला इतका त्रास का ..? पाहिल्याने दुसऱ्याला विचारले.
" अरे तुला सवय झालीय प्रत्येकाला होय म्हणायची . मग ते खुश होऊन तुला भेटवस्तू देतात .माझे तसे नाही .मी फारच कमी आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच हो म्हणतो.आता त्या दिवशी एक बाई आली. तिची मुलगी हुशार आहे पण पुढे शिकायला पैसे नाहीत मग मी तिला होय म्हणालो.उद्या काहीजण तिला मदत करायला घरी जातील. पण तू..? त्या दिवशी तो  गृहस्थ मला सुख शांती दे असे म्हणाला तर तू पटकन होय बोलून गेलास .त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध आईवडिलांना  वृद्धाश्रमात सोडून दिले.आता घरी छान आयुष्य जगणार तो.मिळाली त्याला सुख शांती." असे म्हणून मोठ्याने हसला 
" मी अश्या लोकांना उभे करीत नाहीं म्हणून माझ्याकडे कोण येत नाही ." अजून एक बिस्कीट त्याच्या पुढे करीत दुसरा म्हणाला .
" हा अण्णा बघ .कधीच आपल्याकडे येत नाही .पण गणेशोत्सवात चोवीस तास टपरी चालू.त्याच्या टपरीत बघ.." असे म्हणून दुसर्याने टपरीत बोट दाखविले.
पहिल्याने त्या दिशेकडे पाहिले .तेव्हा देव्हाऱ्यात तो बसला होता. त्याने हसून त्या दोघांकडे पाहून ओळखीचा हात हलविला.
"अण्णा , भगवान को मानते हो."पाहिल्याने हसून विचारले.
"हा साब , रोज सुबह उसके सामने हात जोडता हू, और हार डालता हू " अण्णा हसत म्हणाला .
"कुछ मांगते नही. " दुसर्याने विचारले 
" क्या जरूरत है साब, ये सब तो उसकी देन है. मै तो सिर्फ मेहनत करता हू .अभी ये दस दिन धंदा इतना जोर से है की गाव से भतिजे को बुलाना पडा, उसको दुसरी टपरी बांधके दी है ." एका बंद टपरीकडे बोट दाखवत अण्णा म्हणाला .
" बघ , याला आपल्याकडे यायची गरज पडली नाही तरी आपण याला भरभरून देतोय. सकाळी फक्त स्वच्छ निर्मळ मनाने पाया पडतो आपल्या." दुसरा हसत हसत म्हणाला .
" खर आहे,  पण सध्या आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.मागची दोन वर्षे आरामात गेली.पण पुढे आपल्याला खूप कठीण जाणार आहेत. काय सांगावे पुढे तुला ही आराम मिळणार नाही"  पहिला दुसऱ्याच्या खांद्यावर थाप मारून म्हणाला .
" बस क्या , माझ्याकडून दोन बिस्किट्स खाऊन वर मलाच शाप देतोस का ? चल वेळ मिळाला तर ये उद्या ह्याच वेळी .आता मी शांतपणे झोपतो .मंडपात पत्त्यांचा मोठा डाव सुरू आहे ." असे बोलून दुसर्याने पहिल्याच्या हातावर टाळी दिली आणि आपापल्या मार्गाने निघाले.
दोन जुळे भाऊ परस्पर विरोधी दिशेने निघालेले पाहून अण्णा विचारात पडला.
श्रीपार्कात गणपतीच्या मंडपात अजूनही दर्शन चालू होते आणि तो प्रत्येकाच्या इच्छेला होकार देत चेहऱ्यावर कंटाळा न दाखवता तो उद्याच्या रात्रीची वाट पाहत उभा होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर