Wednesday, December 22, 2021

काळेकरडे स्ट्रोक्स... प्रणव सखदेव

काळेकरडे स्ट्रोक्स... प्रणव सखदेव
रोहन प्रकाशन 
काहीजण कथा कादंबरी लिहितात त्यातून त्यांना नेमके काय सांगायचे असते ते कळत नाही . साधारणतः प्रत्येक पुस्तकात काहीतरी एक सूत्र असते आत्मचरित्रात संघर्ष असतो ,चरित्रात थोरांविषयी माहिती असते. कादंबरीत कथा असते.पण एखाद्याच्या आयुष्यात काही वेगळे घडत नसेल तो त्याचे आयुष्य त्याला हव्या त्या पद्धतीने जगत असेल तर तो कादंबरीचा विषय होऊ शकतो का ...??
नेमके हेच काळेकरडे स्ट्रोक्स या कादंबरीत आहे .
यातील नायक  कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकणारा कोवळा तरुण .ज्याला फिल्म डायरेक्टर बनायचे आहे आणि त्यासाठी त्याने रुईया कॉलेजमध्ये मासकॉमला ऍडमिशन घेतलीय. त्याचे आईवडील मध्यमवर्गीय.. डोंबिवलीत राहणारे . हा कॉलेजचे लेक्चर कधीच अटेंड करताना दिसत नाही.हा रुईयाच्या कट्ट्यावर आपला अंध मित्र आणि त्याच्या मैत्रिणीसोबत असतो . हा तिथे  त्याच्या बुथवर  सिगारेट  पीत बसलेला असतो. संध्याकाळी  चायनीज गाडीच्या पाठीमागे काळोखात दारू पितो.
आईबाप त्याला जेव्हाजेव्हा उपदेश करायला जातात तेव्हा तो त्यांच्याशी भांडून बाहेर पडतो .तो बापाच्या खिशातील पैसे चोरतो.त्या पैशांनी दारू पितो सिगारेट ओढतो .
पुढे त्या अंध मित्राचे अपघातात निधन  होते तेव्हा हा त्याच्या मैत्रिणीला मानसिक आधार देतो .तिच्यासोबत दारू पितो सिगारेट ओढतो .एका गाफील क्षणी दोघात संभोग घडतो .मग ती त्याच्यापासून दूर निघून जाते आणि तो पश्चातापाने जळत राहतो. पुढे त्याला दुसरा मित्र भेटतो . तो त्याला गांजाची सवय लावतो .वेश्यांची  ओळख करून देतो . त्याचवेळी त्याला दुसरी मैत्रीण भेटते .ती एका आजाराने त्रस्त झालेली असते तरीही तिला दारू सिगारेट चे आकर्षण असते . हा तिच्यासोबत डॉक्टरकडे जातो .तिच्या सोबत असतो .
हे सगळे चालू असतानाच अंध मित्राची मैत्रीण पुन्हा त्याला भेटायला बोलावते .त्याला भेटल्यावर ती आत्महत्या करते. पुन्हा हा वेडापिसा होतो . दारू पितो गांजा ओढतो आणि त्या नशेत आपल्या मैत्रिणीला भर लेक्चरमधून हात पकडून जेन्ट्स टॉयलेट मध्ये नेतो . तिथे दोघेही नको त्या अवस्थेत सापडतात . सर्व न्यूज पेपरमध्ये बातमी येते . त्याला कॉलेजमधून काढून टाकतात .पुन्हा घरी भांडण करतो तेव्हा बाप याला घराबाहेर काढतो हा घराबाहेर पडताना कपाटातील लॉकरमधून पैसे चोरतो आणि हिमालयात निघून जातो .
त्यानंतर एकदम तो फिल्म डायरेक्टर बनूनच रुईयाच्या कट्ट्यावर येतो.बोलण्यातून कळते की याच्या दोन तीन फिल्म विविध फेस्टिवलमध्ये दाखविल्या जातात .पुन्हा तो आपल्या मैत्रिणीला शोधून काढतो .
संपली गोष्ट 
यात इतका तरुण मुलगा मोठ्यांसारखा गोंधळलेला अलिप्त कसा राहतो. तो नेहमी मैत्रिणीसमोर सिगारेट गांजा कसा ओढू शकतो .त्यांची घरे नेहमी रिकामी कशी असतात  सेक्स त्यांच्यासाठी इतका सहज सोपा कसा असू शकतो .इतके सगळे घडूनही त्याचा डायरेक्ट बनण्याचा प्रवास  एक दोन ओळीत कसा मांडला जातो .
एका तरुणांचा वाईट मार्गावरचा प्रवास असेच या पुस्तकाच्या बाबतीत म्हणू शकतो

Tuesday, December 14, 2021

स्क्रीम फॉर मी....करेन रोझ

स्क्रीम फॉर मी....करेन रोझ
अनुवाद....दीपक कुलकर्णी 
मेहता पब्लिकेशन
त्याने आपल्या बळीची निवड काळजीपूर्वक केली होती.ठार मारण्यापूर्वी त्याने तिला मनमुराद उपभोगले होते. मग तिला तपकिरी रंगाच्या ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून दिवसा अगदी सहजपणे सापडेल अश्या ठिकाणी नेऊन टाकले होते.त्याचा हा डाव यशस्वी झाला . डटन जॉर्जिया येथील वार्षिक क्रॉस कंट्री सायकल स्पर्धेतील शेकडो सायकलपटू या रस्त्यानेच जाणार होते आणि त्यातील अनेकजण हे दृश्य पाहणार होते.
बरोबर तेरा वर्षांपूर्वी डटन जॉर्जिया येथे असाच एक खून झालाय.मृत तरुणीची जुळी बहीण अँलेक्स अजूनही त्या धक्क्यातून सावरली नाहीय. तिच्या समोर आईने गोळी झाडून आत्महत्या केली होती. मावशीने सावत्र बापाच्या तावडीतून तिची सुटका केली होती .
आज तेरा वर्षांनी तिची सावत्र बहीण बेली गायब झालीय असा तिला फोन आला आणि म्हणून ती घाईघाईने  डटन जॉर्जिया इथल्या घरी निघाली होती. तिच्या सावत्रबहिणीला एक सहा वर्षाची मुलगी ही आहे हे तिला आजच कळले होते.
स्पेशल एजंट डॅनियल याची या केससाठी नेमणूक झालीय. डॅनियल मुळातच डटनचा रहिवासी आहे .आठवड्यापूर्वीच त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तो आला होता .
तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती आता घडणार का ...?? कोण करतोय हे खून ...?? का ?? कशासाठी ...??? अलेक्सचा या खुनाशी काय संबंध आहे ?? डॅनियलचा छोटा भाऊ सायमन ज्याला डॅनियलने स्वतःच्या हाताने ठार मारलाय त्याचा या खुनाशी काही संबंध आहे का ....?? की तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेत सायमनचा प्रमुख सहभाग आहे ..??
या प्रकरणात गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती ही गुंतल्या आहेत.आणि खुन्याची नजर आता अलेक्सकडे वळली आहे .

Sunday, December 5, 2021

द गन्स ऑफ नॅव्हारन ...अँलिस्टर मॅक्लिन

द गन्स ऑफ नॅव्हारन ...अँलिस्टर मॅक्लिन
अनुवाद.…..अशोक पाध्ये
मेहता पब्लिशिंग हाऊस
दुसऱ्या महायुद्धवर अनेक पुस्तके लिहिली गेली अनेक चित्रपट निघाले . त्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लेखकाने एका घातकी मोहिमेवर हे पुस्तक लिहिले . त्यावर नंतर चित्रपटही बनविला गेला.
 तुर्कस्थानजवळील खेरोस या छोट्या बेटावर बाराशे ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते . काही दिवसांनी या सैनिकांना जर्मन सेनेने मारून टाकले असते. 
खेरोस  बेटावर जाताना नॅव्हारन गाव पार करून जावे लागणार होते . ते गाव जर्मनीच्या ताब्यात होते .नॅव्हारान गावातील किल्यात दोन महाकाय तोफा समुद्राच्या दिशेने तोंड करून उभ्या होत्या. त्यामुळे कोणतीही बोट अथवा विमान नॅव्हारन पार करून खेरोसला पोचू शकत नव्हते .
ब्रिटिशांनी नॅव्हारनच्या तोफा उध्वस्त करायची योजना आखली. पण ते फार कठीण होते. जर्मन आणि इटली सैन्याचा कडेकोट बंदोबस्त असलेल्या किल्यात शिरणे सोपे नव्हते . किल्याच्या एका बाजूला सरळसोट कडा होता . जो कोणत्याही गिर्यारोहकाला चढून जाणे शक्य नव्हते .त्यामुळे तिथून कोणी येणार नाही याची खात्री जर्मनाना होती.
कॅप्टन किथ मॅलरीला या मोहिमेसाठी निवडले गेले . किथ हा उत्कृष्ट गिर्यारोहक होता . युद्धाआधी त्याने न्यूझीलंड येथील अनेक शिखरांवर यशस्वी चढाई केली होती . घातपाती युद्धात तो निपुण होता . त्याच्या जोडीला अजून चार माणसे देण्यात आली .जी आपापल्या कामात तरबेज होती.
आता कॅप्टन किथ मॅलरीला या चार सैनिकांना सोबत घेऊन कोणाच्याही मदतीशिवाय तो सरळसोट कडा ओलांडून नॅव्हारनच्या तोफा नष्ट करायच्या होत्या .त्याचवेळी जर्मन सेना ही खेरोस बेटावर हल्ला करायच्या तयारीला लागले होते .ब्रिटिश आरमारही आपल्या सैनिकांना सोडविण्यासाठी निघाले होते. ते नॅव्हारनच्या तोफेसमोर येण्याआधीच मॅलरी आणि त्याची टीम त्या नष्ट करतील का ..??
एक थरारक रोमांचकारी अनुभव 
द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट 1961 साली प्रदर्शित झाला होता . त्यात  सुप्रसिद्ध अभिनेता ग्रेगरी पॅकने कॅप्टन किथ मॅलिरी ची भूमिका केली होती .

Saturday, November 6, 2021

द कृष्णा की.... अश्विन संघी

द कृष्णा की.... अश्विन संघी
अनुवाद...डॉ. मीना शेटे- संभू
अमेय प्रकाशन
श्रीकृष्ण आपल्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतची कहाणी आपल्याला सांगतोय पण त्याचवेळी वर्तमानकाळात अनिल वर्षने राजस्थानातील छोट्या गावात एका साध्या घरात आपल्याला सापडलेल्या पुरातन वस्तूचा अभ्यास करीत होता .तो भारतातील सर्वात तरुण आणि हुशार सांकेतिक भाषा आणि लिपीतज्ञ आहे.त्याच्यासमोरच एक चौरसाकृती मुद्रा पडली होती.कोणत्यातरी तबकडीच्या खाचेत बसणारी ती मुद्रा होती.त्याचा अभ्यास चालू असतानाच त्या अनोळखी तरुणाने त्याच्या घरात प्रवेश केला होता आणि काही कळायच्या आत त्याला बेशुद्ध केले होते.त्यानंतर त्याला काटकोनात बसवून त्याच्या कपाळावर एक रबरी शिक्का मारला.त्यामुळे वर्षनेच्या कपाळावर एका चक्राची खूण उमटली. मग एका धारधार चाकूने त्याच्या डाव्या पायाच्या टाचेत घुसवून मास बाहेर काढले.मग त्याच रक्ताने एक श्लोक भिंतीवर लिहून ती मुद्रा घेऊन बाहेर पडला .
रवी मोहन सैनी हा वर्षने मित्र .खून होण्यापूर्वी काही तास आधी तो आपल्या मित्राला भेटला होता .रवी सैनी पुराणकथाचा इतिहास शिकवीतो. महाभारत श्रीकृष्ण यांच्यावर त्याचा सखोल अभ्यास होता .प्रवासात अनिल वर्षनेने त्याला आपल्याकडील मुद्रा दाखविली होती आणि अजून तीन मुद्रा कुठे आहेत हे ही सांगितले .या मुद्रा द्वारकाकालीन असाव्या असा त्याचा अंदाज होता .कदाचित द्वारकेत प्रवेश करण्याचा पासपोर्ट किंवा एका पुरातन रहस्याची चावी .
वर्षनेचा मारेकरी आता उरलेल्या तीन मुद्रांच्या मागे आहे . त्याला माहितीय त्या मुद्रा कोणाकडे आहेत आणि त्या ताब्यात घेताना त्यांच्या मालकांचीही वर्षने सारखीच गत होणार आहे .
राधिकासिंग ही महिला अधिकारी वर्षनेच्या खुनाचा तपास करतेय.सर्व पुरावा रवी सैनीच मारेकरी असल्याचे स्पष्ट करतोय.तिने रवीच्या कॉलेजमधूनच त्याला अटक केलीय .
मुद्रा गायब झाल्याचे ऐकून बाकीच्या मुद्रा शोधण्याचा ही प्रयत्न होणार हे रवी सैनी ओळखतो आणि आपल्या विद्यार्थिनीच्या मदतीने तो तुरुंगातून पळ काढतो .पण तो ज्यांना भेटायला जातो त्यांचा आधीच खून होऊन मुद्रा गायब झालेली असते .
असे कोणते रहस्य आहे जे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला जगापासून लपवून ठेवायचे आहे आणि त्यासाठी त्याने इतकी गुंतागुंतीची रचना करून ठेवली आहे .
अश्विन संघीने नेहमीप्रमाणे इतिहास पौराणिक आणि वर्तमानाचा सुंदर मिलाफ करून ही कादंबरी आपल्यासमोर मांडली आहे .यात अनेक पात्र आहेत हळूहळू सर्वांचा संबंध जुळत जातो. एक श्वास रोखून ठेवणारा पाठलाग आपल्याला वाचायला मिळतो.
 श्रीकृष्णाने आपल्या जन्माआधीपासून कथा सांगायला सुरुवात केली. त्याचा अवतार घेण्याचे कारण..., कंसाचा मृत्यू...मथुरेतून द्वारकेत येणे.यादव कुळाचा इतिहास ..त्यांचा नाश ..महाभारताचे युद्ध ..हे सर्व काही तो आपल्याला सांगत असतो .
डॅन ब्राऊनच्या परंपरेतील भारतीय लेखकाची ही थरारक कादंबरी .

Tuesday, October 19, 2021

द वॉचमन.... रॉबर्ट क्रेस

द वॉचमन.... रॉबर्ट क्रेस
अनुवाद...बाळ भागवत 
मेहता पब्लिशिंग हाऊस
लार्किंन कॉनर ..एका धनाढ्य उद्योगप्रमुखाची एकुलती एक मुलगी . त्या दिवशी पहाटे तीन वाजता युक्का या हॉलिवूडच्या फेमस क्लबमधून बाहेर पडली .नंतर आपल्या अत्याधुनिक कारमधून सुसाट वेगाने घराकडे निघाली . पण वाटेत ती एका मर्सिडीजला आदळली.पुढच्या सीटवर एक पुरुष आणि स्त्री बसली होती तर मागे एक पुरुष बसला होता . तिने मदतीसाठी 911 नंबर दाबून त्यांना मदत करायला बाहेर पडली .पण ती मर्सिडीज ताबडतोब सुसाट वेगाने निघून गेली पण त्या आधी मागे बसलेला माणूस गाडीबाहेर पडून बाजूच्या गल्लीत शिरल्याचे तिने पाहिले .तिने हे सर्व पोलिसांना सांगितले .हे सर्व आता संपले असे तिला वाटले पण आता तर कुठे एका भयानक नाट्याला सुरवात झाली होती.
 पुढील दोन दिवसात डिपार्टमेंट ऑफ जस्टीसचे एजंट्स तिची गाठ घेणार होते आणि सहा दिवसात तिचा जीव घेण्याचा पहिला प्रयत्न होणार होता .
पाईक एक भाडोत्री सैनिक आहे . त्याने सुरवातीस  पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केले होते .लार्किंनच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली .
तिचे रक्षण करतानाच तिच्या मागे कोण लागले आहे हे शोधण्याची जबाबदारीही त्याने स्वीकारली .कोण आहेत ही माणसे जी एका व्यावसायिक शिकाऱ्यांसारखे तिच्या मागे लागले आहेत...?? .तिने ओळखलेला तिसरा माणूस कोलंबियातील आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे . पण तीन वर्षांपूर्वीच तो मारला गेला आहे . मग हा कोण ....??
पाईक लार्किंनला वाचवू शकेल . या मागे नक्की कोण आहे ते शोधून काढेल का ....??
एक गुंतागुंतीची रहस्यमय कादंबरी .

Friday, October 15, 2021

नववी माळ..... रंग.….?? 2021

नववी माळ..... रंग.….?? 2021
"काय करतेस ग घरी बसून ...??  सकाळी सात ते रात्री आठपर्यंत नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहणारी तू .घरात कंटाळा येत नाही का  ....?? तिची एक  मैत्रीण विचारत होती.
त्या चारपाचजणी चौकातील देवीच्या मंडपापाशी जमल्या होत्या .आजच्या रंगाचा ड्रेस आणि साड्या सर्वांना खुलून दिसत होत्या.तिने ही आजच्याच रंगाची साधी साडी नेसली होती.सर्वजणी कॉलेजपासून एकत्रच होत्या .नोकरी …करियर..संसार सांभाळणाऱ्या.
"हिला कसला कंटाळा येणार ग ...?? बघावे तेव्हा ऑनलाईन दिसत असते ...फोन करावा तर माझा कार्यक्रम आहे .मी लाईव्ह आहे ..हीच कारणे देत असते ..." दुसरीने बोलायचा चान्स सोडला नाही .
"म्हणे मुलीसाठी नोकरी सोडतेय. तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे ..जशी काय आम्हाला मुलेच नाही ..." तिसरीने बऱ्याच दिवसाची खदखद काढली.
"कॉलेजमध्ये असल्यापासून बघतेय अगदी शांत असतेस तू. काही प्रकरण ही केले नाहीस तू.जॉब ही व्यवस्थित चालू होता .....मग आता काय करतेस तू....?? एकीने कुतूहलाने विचारले .
"जाऊ द्या ग ...बोलत बसलो तर दिवस पुरणार नाही . आरती सुरू होतेय चला जाऊया..."असे बोलून ती सर्वांसोबत मंडपात शिरली.
मंडपाच्या प्रवेशद्वारावर एका फळ्यावर आजचा रंग त्याची कारणे आणि एका देवीची माहिती सुंदर हस्ताक्षरात लिहिली होती. 
" किती सुंदर हस्ताक्षर आहे. बघत राहवेसे वाटते..."एक कौतुकाने म्हणाली .
आतमध्ये देवीची आरती सुरू झाली होती.फारच थोडी माणसे योग्य अंतर ठेवून आरती करत होते पण त्यात ती बारा वर्षांनी छोटी मुलगी लक्ष वेधून घेत होती. आजच्या रंगाचा स्वच्छ ड्रेस ,त्याच रंगाची रिबीन आणि स्पष्ट खणखणीत स्वरात लयबद्ध टाळ्या वाजवित आरती म्हणत होती.तिच्या आरतीमुळे इतरांची तारांबळ उडत होती. बऱ्याजणांना योग्य शब्दच माहीत नव्हते . त्याचे परिणाम दिसत होते. पण ती छोटीमात्र आत्मविश्वासाने आरती म्हणत होती.
"एकतरी आरती इतक्या स्पष्टपणे बोलता येईल का आपल्याला ... "?? टाळ्या वाजवित एक मैत्रीण दुसरीच्या कानात पुटपुटली.
आरती संपली आणि तीर्थप्रसादला गर्दी झाली.पण ती छोटी मुलगी तिच्याकडे  धावत गेली आणि पायाला हात लावून नमस्कार केला .
"मॅडम ...बरोबर म्हटली ना आरती आणि मनाचे श्लोक ..."?? छोटीने निरागस चेहऱ्याने विचारले .
"खूप सुंदर..... " तिने कौतुकाने गालावर हात फिरवत सांगितले.
इतक्यात एक दहा वर्षाचा मुलगा प्रसाद घेऊन तिच्यासमोर आला .
"अरे रवी..... छान लिहिलेस तू बोर्डवर . सगळे तारीफ करतात तुझ्या हस्ताक्षराची .पण आता ड्रॉईग सुधरव. मी तुला एका मॅडमशी ओळख करून देते. त्या तुला ड्रॉईग शिकवतील ...." तिने त्याच्या पाठीवर हात ठेवीत म्हटले . 
"चालेल मॅडम .."असे म्हणून त्यानेही तिच्या पायाला हात लावून नमस्कार केला .
तिच्या मैत्रिणींना कळेना काय चालू आहे .ती अजूनही शांतच होती.
मंडपाच्या बाहेर येताच एक मध्यमवयीन माणूस आपल्या तेरा वर्षाच्या मुलीला घेऊन तिच्या समोर आला .
"कालच सोसायटीच्या वॉचमनला आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले. हिने घरी येऊन आम्हास सांगितले तो हिच्या अंगाला कुठे कुठे स्पर्श करीत होता .मॅडम तुमच्यामुळे माझ्या मुलीला बरे वाईट स्पर्श कळू लागले त्यामुळेच पुढचा अनर्थ टळला ...."असे बोलून त्याने हात जोडले. 
"मॅडम मी तुमच्यावर कविता केली आहे . ऐकणार ..?? त्या मुलीने विचारले .
" हो ..." तिने कौतुकाने उत्तर दिले 
मग एक छान कविता त्या मुलीने सर्वांसमोर ऐकवली.
ती ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .
"हे सर्व काय चालू आहे ग ...?? तिच्या एका मैत्रिणीने आश्चर्याने विचारले.. कोण तो मुलगा ....?? कोण ही मुलगी ....?? सगळे पाया का पडतात तुझ्या ."??
" हे सर्व माझे ऑनलाईन विद्यार्थी आहे .तुम्ही विचारताना तू सतत ऑनलाईन कशी असतेस..?? मी ह्या मुलांना बालसंस्कार शिकवते .दर दिवशी संध्याकाळी दोन तास मी या मुलांना देते. त्यांना सगळ्या देवांची आरती,मनाचे श्लोक, देशातील शूर सैनिकांची, प्रसिद्ध नेत्यांची माहिती सांगते .शरीराच्या विविध भागांची ओळख,त्याची कार्य ,चांगले ,वाईट काय याची माहिती देते . सुंदर हस्ताक्षर कसे काढावे हे शिकवते . मोबाईलने मुले बिघडतात त्यांच्यावर वाईट संस्कार होतात हे नुसते बोलण्यापेक्षा त्याच मोबाईलचा वापर करून मुलांवर संस्कार कसे करता येईल याचा प्रयत्न करते मी. यातील एक जरी विद्यार्थी चांगला नागरिक बनला तरी स्वतः ला भाग्यवान समजेन मी . उगाच घरी बसून काय करते याचे उत्तर हेच आहे ...असे बोलून ती चालू लागली 
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, October 14, 2021

आठवी माळ.... रंग ....?? 2021

आठवी माळ.... रंग ....?? 2021
 ती ऑफिसमध्ये शिरली आणि तिथला गोंगाट शांत झाला. सगळे तिच्याकडे पाहू लागले.काहींच्या नजरेत सहानुभूती होती तर काहींच्या डोळ्यात असूया तर काहींच्या तिरस्कार.तशी ती कोणाच्या अध्यातमध्यात नव्हती.दिसायला साधारण. नेहमी एका टाईपचा ड्रेस तो ही साधा . कधीतरी साडी तीही साधारण.एकच हेयर स्टाईल . काहीजण ही नेहमी रस्त्यावरील कपडाबाजारात कपडे घेते असे म्हणायचे .
पण तिला याची कधीच जाणीव नसायची आणि असली तरी ती लक्ष देणारी नव्हती. सहकाऱ्यांशी नेमके बोलणे आपले काम चोख करणे आणि वेळ झाली की घरी पळणे हाच तिचा दिनक्रम.
नवरात्र उत्सव सुरू झाले होते. सगळे ऑफिस आजच्या रंगाचे ड्रेस घालून आले होते .फोटो सेशन चालू होते . उद्याच्या रंगाची चर्चा चालू होती. पण ही मात्र नेहमीसारखीच आली होती. तिला रंगाचे सोयरसुतक  दिसत नव्हते.आजच्या रंगाची एकही गोष्ट तिच्या शरीरावर दिसत नव्हती .
इतरांच्या गोंधळाकडे लक्ष न देता तिने आपले काम सुरू केले .मध्येच फोन वर  कोणाशीतरी बोलायची .संध्याकाळी ऑफिस संपले तशी ती निघाली.बाकीचे थांबले .
 घामाने भिजलेला आपला चेहरा पदराने पुसत दरवाजाचे लॅच उघडून ती आत शिरली तेव्हा समोर तो बसला  होता. त्याला पाहून ती गोड हसली .
"शॉवर घेणार ...?? त्याने विचारले तशी ती मोहरली .लाजून तिने त्याला कळेल इतपत मान डोलावली . तिने त्याची व्हीलचेयर बाथरूमच्या दिशेने वळवली .मग आपल्या खांद्याचा आधार देत त्याला आत नेऊन प्लॅस्टिक टेबलवर बसविले आणि हळूहळू त्याचे कपडे काढू लागली मग त्याच्यासमोर उभी राहून स्वतःचे कपडे काढले.तो अनिमिष नेत्राने तिला पाहत होता .
शॉवर सुरू करून त्याला हळुवारपणे साबण लावत आंघोळ घालू लागली. तो डोळे बंद करून ते अनुभवत होता.काही वेळाने दोघेही बाहेर आले. तिने त्याला स्वछ करून नवे कपडे चढविले. आजच्या रंगाचा टी शर्ट आणि शॉर्ट .कालच तिने ते काढून ठेवले होते .मग सावकाश स्वतःचे कपडे घालू लागली. आजच्या रंगाची शरीरावर फिट बसणारी साडी . त्याच रंगाची लिपस्टिक, टिकली . दोन्ही हातात त्याच रंगाच्या बांगड्या .तयारी पूर्ण झाल्यावर तिने त्याच्याकडे पाहून हसून स्वतःभोवती गिरकी घेतली .त्याने हातानेच छानची खूण करून तिला जवळ ओढले .
"जेवण काय करू ..."?? तिने विचारले 
"काहीही कर ...पण माझ्यासमोर राहून कर ..."तो डोळा मारीत म्हणाला .
"चावट ..."ती लटक्या रागाने हात उगारत म्हणाली.
 रात्री जेवण करून तिने त्याला बेडवर झोपविले आणि नंतर हळूच त्याच्या कुशीत शिरली .त्याचे डोके आपल्या छातीशी घट्ट धरून केसांमधून हात फिरवीत बसली. काही वेळाने तो शांत झोपी गेला.
तो झोपल्याची खात्री होताच ती उठली .कपडे बदलताना तिने टेबलावरील त्याच्या फोटोकडे पाहिले . फोटोत तो रुबाबदारपणे बाईकजवळ उभा होता.बाजूला एका पेपरचे कात्रण फ्रेम करून ठेवले होते . त्यात लिहिले होते एका तरुणाने जीवाची बाजी लावून एका तरुणीला चार गुंडांपासून वाचविले होते पण त्या प्रयत्नात त्याच्या कमरेखालील बाजू पूर्णपणे निकामी झाली होती .
तिने फोटोसमोर हात जोडले . त्यादिवशी तो आला नसता तर त्या गुंडांनी तिच्या शरीराचे काय हाल केले असते याची कल्पनाच ती करू शकत नव्हती .असा नवरा दिल्याबद्दल देवाचे आभार मानले तिने .
होय ती देवीच आहे
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, October 13, 2021

सातवी माळ...रंग .?? 2021

सातवी माळ...रंग .?? 2021
शनिवार असल्यामुळे तो मॉल गर्दीने फुलून गेला होता.तीन मजली असलेला तो मॉल शहरात प्रसिद्ध होता . सुईपासून ते मोटारपर्यंत प्रत्येक गोष्ट तिथे मिळत होती.साहजिकच सर्व थरातील लोक तिथे खरेदीला यायचे आणि  एखादा सण किंवा उत्सव असेल तर पाहायलाच नको ..काहीजण नुसते टाईमपाससाठी यायचे..पण कसला टाईमपास..?? काहीही खरेदी न करता दोनतीनशे रुपये कसे खर्च व्हायचे ते त्यांनाच कळायचे नाही .
आजच्या रंगाच्या कपड्यांनी आणि वस्तूंची तो मॉल जणू झळाळून उठला होता .नवरात्र उत्सव चालू होता त्यामुळे रोज नव्या रंगाच्या कपड्यांनी आणि वस्तूंनी मॉल भरून गेला होता.
आज तिची ड्युटी फूड मॉलजवळ होती. अंगावर कडक इस्त्रीचा युनिफॉर्म ..डोक्यावर स्वछ कॅप.. पायात चकचकीत शूज घालून ती कठोर चेहऱ्याने सर्वांवर नजर ठेवून होती.मॉलच्या सिक्युरिटी गार्डपैकी एक गार्ड होती ती. आजच्या रंगाचे विविध ड्रेस पाहून तिच्या मनात असूया उमटत होती.पण शेवटी आपली नोकरी स्पेशल आहे याची  तिला जाणीव होती. तरीही आजच्या रंगाचा स्कार्फ गळ्यात घालून ती ड्युटी करत होती.
एका फूड शॉपजवळ काही टारगट मुले तरुण मुलींच्या जवळपास फिरत होती हे तिने नजरेच्या कोपऱ्यातून पाहिले होते .सहज फिरत ती त्यांच्याजवळ गेली .एका मुलीच्या कंबरेखाली जाणारा त्या मुलाचा हात तिने कोणाच्या नकळत पकडला .आजूबाजूला कोणाचा गोंधळ न उडू देण्याची काळजी घेत तिने त्याच्या हाताची विशिष्ट नस दाबली आणि पुन्हा गडबड केलीस तर फेकून देईन असे कानात कुजबुजत सांगितले .हात चोळत तो तरुण दूर झाला आणि परत ती जागेवर गेली.
अचानक तिला रेड अलर्ट मिळाला.हातातील वॉकीटॉकीमधून सगळ्यांना बाहेर काढा अशी सूचना मिळाली.
तिने चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता सर्वाना एकत्र जमा करून हळूहळू फूड मॉलच्या बाहेर जाण्यास मदत करू लागली . पण त्याचवेळी पाठीवर सॅक असलेली तरुणी टॉयलेटच्या दिशेने जाताना दिसली . सर्वजण फूड मॉलच्या बाहेर गेल्याची खात्री पटताच ती टॉयलेटकडे वळली .
टॉयलेटमध्ये ती तरुणी सॅक खोलून काहीतरी करत होती .अचानक सिक्युरिटी गार्ड पाहताच ती चपापली. सॅकमधून हात बाहेर काढणार इतक्यात तिच्या मानेवर मजबूत हाताची पकड बसली आणि क्षणात तिची मान तुटली .
"फूड मॉलमध्ये एक ... तिने मोबाईलवरून कोणाशी तरी संपर्क साधला आणि अंगातील युनिफॉर्म काढून टाकला .आतमध्ये आजच्या रंगाची टी शर्ट आणि ट्रॅकपॅन्ट होती.केस मोकळे सोडून कानाला इयरफोन लावून ती बाहेर पडली आणि खालच्या गर्दीत दिसेनाशी झाली.
गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना आपली ओळख उघड करायची नसते हा ट्रेनिंगमधील पहिला धडा  ती कधीच विसरत नव्हती.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, October 12, 2021

सहावी माळ... रंग ??? 2021

सहावी माळ... रंग ??? 2021
"म्हणजे माझी सेवा करायला तुला नेमले आहे का सुनबाईने ....."?? विमलआजीने  समोरील तरुण स्त्रीला निरखून विचारले.
 नवरात्र चालू होते . त्यामुळे आजच्याच रंगाचा ड्रेस त्या तरुण स्त्रीवर खुलून दिसत होता . विमलआजी बेडवर बसल्या होत्या ..
"होय ...मी संस्थेकडून आलीय .."ती हसत म्हणाली .
"किती दिवस राहणार आहेस ..?? माझ्याकडे फार कोण टिकत नाही .. मी खूप त्रास देते म्हणतात ..." विमल ताई छद्मीपणे म्हणाल्या ."म्हातारी झालीय ना आता"
"असू द्या हो... या वयात असे होणारच ..."ती म्हणाली .
"होय ना ... वय वाढते तसे आम्ही टाकाऊ होतो. तुम्ही असे वागता जसे आम्ही जग पहिलेच नाही"
"हा तुमचा औषधांचा डबा का .."?? तिने आजीच्या  बोलण्याकडे लक्ष न देता विचारले .
"हो आणि बघ त्या फ्रीजमध्ये गुलाबजाम आहे . तो देतेस का ...."?? तिने दिनवाणा चेहरा करीत म्हटले.
"आहो तुम्हाला डायबेटीस आहे ..असे काही देऊ नये अशी ऑर्डर आहे मला ... "ती कठोर स्वरात म्हणाली .
"मग त्या ओव्हनमध्ये पिझ्झाचा तुकडा असेल बघ .. माझा नातू ठेवून गेला होता ... " आजीने पुन्हा विनवणी केली.
"आहो आजी असे काही खायचे नाही . तुमचे पथ्यपाणी नीट पाळ अशी ऑर्डर आहे मला .... " तिने पुन्हा सांगितले .
"बरे ...मला भूक लागली आहे काही करून देशील का...." ??? शेवटी नाईलाजाने आजी तिच्यावर ढकलून  मोकळी झाली .
"हो... तुमच्यासाठी सूप आहे. उकडलेल्या पालेभाज्यांचा... तो ही रेडिमेड ... " हातातील रेडी टू ईटचे पाकीट दाखवीत तिने सांगितले ..
"अरे देवा ..असा रेडीमेड आणायचा होता तर तो मंचुरीयन सूप तरी आणायचा ..." आजी चिडून म्हणाली .
"चायनीज खाणे तुम्हाला पचणार नाही असे सांगितले आहे मला .."ती कामाच्या बाबतीत खूपच प्रामाणिक दिसत होती.
"राहू दे ....तो टीव्ही लावतेस का ...?? मराठी सिरीयल पहायची आहे मला ..".आजीने मोठ्या आशेने विचारले .
" सगळे मराठी चॅनेल काढले आहेत .सासूबाई मराठी सिरीयल प्रमाणे वागतात आणि आमच्याकडून ही तश्याच अपेक्षा ठेवतात असे मॅडम म्हणाल्या .... "ती फारच स्पष्टवक्ती दिसत होती .
"ते भाज्यांचे सूप...?? तू तरी पितेस का ..."?? आजीने छद्मीपणे विचारले .
"नाही...मी माझ्यासाठी न्यूडल्स करणार आहे .मी काय खायचे ते ही मॅडम ने ठरविले आहे ... " तिने शांतपणे म्हटले.
" मला दूध तरी देशील का ....?? आता तर आजी हात जोडण्याच्या तयारीत होती .
" दूध संपले आहे . मॅडम आणि सर जीममधून आल्यावर पिऊन जातात .तुमच्यासाठी चहा पुरते ठेवतात..." ती पक्की व्यावसायिक दिसत होती .
"तुमची औषध घेण्याची वेळ झाली आजी... "तिने गोळ्या हातात ठेवत म्हटले .
"अग बाई ... !! आताच तर चार गोळ्या दिल्यास ना ...?? ह्या दोन कुठल्या ...?? मी नाही घेणार या ..आता आजी  चिडल्या ...
"आहो तुमच्या दीर्घ आयुष्यासाठीच ही औषधे आहेत.मॅडमनी सांगितले आहे आईला कसलाही त्रास झाला नाही पाहिजे ....".ती ठामपणे म्हणाली.
"हे असे आयुष्य जगण्यापेक्षा मला घेऊन का जात नाहीस माते .....आजीने हताश होऊन देव्हाऱ्यातल्या देवीपुढे हात जोडले .
"यावेळी नक्की येणार ना ..."?? तीने हसून विचारले. 
"यावेळी म्हणजे ...."?? विमलआजी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या .
"मागील दोन वर्षे तुम्ही घेऊन जा म्हणताय .दोन्ही वेळा दूत पाठविले आम्ही.पण तुम्ही वेगवेगळी कारण काढून टाळलेत. म्हटले यावेळी स्वतःच येऊन बघू कसे टाळता तुम्ही आम्हाला .... पण यावेळी खरच तुम्हाला कंटाळा आलेला दिसतोय .तयार असाल तर चला माझ्याबरोबर काही न बोलता .हे सर्व इथेच सोडून... ती शांतपणे आजीसमोर उभी राहून म्हणाली .
"यावेळी खरच येते. फक्त मला आजच्या रंगाची साडी नेसवून यांच्या फोटोसमोर घेऊन चल ...एकदा डोळे भरून पाहून घेते याना ...."
त्या स्त्रीने अलगद आजीला  बेडवरून उचलले आणि आजच्या रंगाची साडी नेसवून  तिच्या नवऱ्याच्या फोटोसमोर आणले .त्या फोटो कडे पाहत आजीने अलगद डोळे मिटले . तिने पुन्हा आत आणून  बेडवर झोपविले आणि दरवाजा उघडून निघून गेली .
होय ती देवीचं आहे 
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Monday, October 11, 2021

पाचवी माळ... रंग ...?? 2021

पाचवी माळ... रंग ...?? 2021
नवरात्र चालू झाले आणि त्या गावात एक उत्साह पसरला .तिथे मनोरंजनाची फारशी साधने उपलब्ध नव्हतीच .लाईट तर अधूनमधून जात होते त्यामुळे टीव्ही हा प्रकार जवळजवळ बादच झाला होता .सण आले की गावात उत्साह संचारात होता . नवरात्र म्हणजे गरबा हे समीकरण लोकांच्या डोक्यात फिट बसले होते.त्यामुळे आता सगळेच खूष होते .
ती यावेळी मैत्रिणीकडे आली होती . शहरात राहणारी असल्यामुळे गावातील संथ जीवन तिला आवडले होते. इथला नवरात्र खूप प्रसिद्ध आहे अशी तिची मैत्रीण सांगत होती. गावाच्या बाहेर मोकळ्या पटांगणावर नवरात्रीचे विविध कार्यक्रम नऊ दिवस चालत.यावेळी ती पूर्ण तयारीत आली होती. नऊ रंगाचे वेगवेगळे कपडे. दागिने ,गरबा स्टिक सर्वच घेऊन आली होती.
आजचा दिवशी ही तिने आजच्या रंगाचा गरबा ड्रेस घातला होता .संध्याकाळपासून कार्यक्रम चालू झाले होते . ती मैत्रिणीसोबत धमाल करीत होती.काही वेळाने गरबा सुरू होणार होता त्याकडेच तिचे लक्ष लागून राहिले होते.
अचानक तिच्या मैत्रिणीला अवस्थ वाटू लागले. " तू गरबा खेळ...मी घरी जाते ..."असे म्हणून तिची मैत्रीण निघाली .एकटी राहिल्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली पण काही वेळातच गरब्यात रंगून गेली. 
त्या गरब्यात एक तरुणी तिच्यासमोर आली. तिच्याच वयाची असेल साधारण.आजच्याच रंगाची साडी नेसून ती एका लयबद्ध तालात नाचत होती.दिसायला साधी होती पण तिचा ताल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. समोरासमोर येताच दोघीही एकमेकांकडे पाहून हसत होत्या.
किती वेळ झाला कोण जाणे…. पण रात्र वाढत होती . शेवटी एक एक करत सर्व बाहेर पडू लागले . हिलाही आपल्या एकटेपणाची जाणीव झाली."निघायला हवे..."असे स्वतःशी म्हणत ती घराच्या दिशेने चालू लागली .
गावाबाहेरचा रास्ता असल्यामुळे गर्दी नव्हतीच. पुढेपुढे ती एकटीच चालू लागली.मनात गरब्याचे विचार चालू असल्यामुळे तिला आजूबाजूचे भान नव्हते.अचानक बाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल जाणवल्यामुळे तिची लय तुटली आणि एकांतवासाची जाणीव झाली.
शहरातील असल्यामुळे पहिल्यांदा भीती वाटली नाही पण हळू हळू सर्वत्र पसरलेल्या काळोखामुळे भीती वाटू लागली.त्याचवेळी " आहो ताई.." अशी हाक ऐकू आली . अचानक कानावर पडलेल्या हाकेने ती दचकली वळून पाहिले तर तीच साडी नेसून गरबा खेळणारी मुलगी तिला हाक मारत होती.
"एकट्याच ..."तिने हसून विचारले 
"हो ना ...."
"चला आता मी आहे सोबत ..गप्पा मारीत निघू .."तिने साडीचा पदर कमरेला खोचला आणि चालायला सुरुवात केली.
"मी मुंबईला असते ...तुम्ही ....." तिने विचारले 
"मी फक्त नवरात्रात येते दरवर्षी. मग जाते पुन्हा घरी ..." दुसरीने सहज उत्तर दिले .
नंतर काही न बोलता दोघीही शांतपणे चालत होत्या .
"तुला भीती नाही वाटत असे एकटे चालायला .."पहिलीने कुतूहलाने  विचारले .
कसली भीती ...?? दरवर्षी कोणी ना कोणी गरबा खेळून तुझ्यासारख्या एकट्या चालत जातात किंवा चकव्यामुळे रस्ता विसरतात . त्यांना रस्ता दाखवायची जबाबदारी मी घेते .....तिने गुढपणे उत्तर दिले.
"म्हणजे ..."
"अग...गेली सत्तर ऎशी वर्षे मी तुझ्यासारख्या मुलींची या रस्त्यावर सोबत करतेय. माझ्या भक्तांसाठी इतकेतरी करायला हवे ना ...जा ते बघ तुझे घर आले ...."
तिने चमकून पाहिले तर खरेच तिचे घर दिसत होते  आभार मानण्यासाठी ती वळली तेव्हा तिची सोबती गायब झाली होती .
गेली कित्येक वर्षे एक स्त्री रात्री एकट्या स्त्रियांना सोबत करते अशी दंतकथा गावात पसरलेली होती.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, October 10, 2021

चवथी माळ... रंग ...?? 2021

चवथी माळ... रंग ...?? 2021
संध्याकाळ होत आली होती. ती नुकतीच बाजारातील देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडली होती. आजच्या रंगाची साडी तिला शोभून दिसत होती. आहो घरी गेल्यावर आपल्या रूपाची तारीफ करणार हे पक्के माहीत होते तिला . त्या विचारानेच ती मोहरून जात होती. दहा वर्षे मुलीची ती आई आहे हे सांगूनही खरे वाटत नव्हते.
 तशी ती एकदम सरळमार्गी स्त्री. रस्त्यात कोणाचे भांडण झाले तरी रस्ता बदलून लांबून अंग चोरत जायची.आपले घर आपला छोटा संसार यात रमणारी साधी गृहिणी होती ती .
चौकात येताच तिची नजर भिरभिरु लागली .जणू काही ती कोणाला तरी शोधत होती. सकाळी इथेच तर पाहिले होते तिला. आजच्याच रंगाचा परकर पोलके घालून हातात चाबूक घेऊन स्वतःला फटके मारत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैसे मागत फिरत होती.
तिच्या मुलींच्याच वयाची दिसत होती म्हणून जास्त लक्षात राहिली होती ती. नवरात्र सुरू झाल्यात त्यामुळे नऊ दिवस ती जरीमरी मातेची भक्त बनून इथे लोकांकडे पैसे मागणार हे नक्की.
सकाळी तिने तिला दहाची नोट दिली . तो माणूस बहुतेक तिचा बाप असावा ...त्याच्या डोक्यावर जरीमरी आईचा देव्हारा ठेवला होता . तो नुसताच तिच्या मागून फिरत होता .वा... रे... वा .. पोरगी स्वतःला चाबकाचे फटके मारत लोकांपुढे हात पसरते आणि हा शहाणा नुसता डोक्यावर देवी घेऊन फिरतो.अस्सा राग आला होता तिला....
शेवटी तिला त्या दुकानाच्या बंद शटरजवळ ती दिसलीच .त्या माणसाच्या मांडीवर बसून वडापाव खात होती. त्याचे हात तिच्या अंगावरून फिरत होते.मध्येमध्ये ती त्याचा हात झटकून टाकायचा प्रयत्न करीत होती . ती जवळ येताच दोघांनीही मान वर करून तिच्याकडे पाहिले. छोटीशी नजर स्वछ निर्मळ दिसली पण त्याची नजर पाहून अंगावर शहारे आले तिच्या अंगावर .हातातील खाऊचा पुडा देऊन ती ताबडतोब मागे फिरली .पण त्याची नजर तिच्या डोक्यातून जात नव्हती .
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती उठली.कालची घटना तिच्या मनातून साफ निघून गेली होती. आपल्या नवऱ्याचे आणि मुलीची तयारी करण्यात अर्धा दिवस पार झाला .दुपारी मुलीला आजच्या रंगाचा ड्रेस आणि स्वतः आजच्या रंगाची साडी नेसून ती बाहेर पडली . आपल्या मुलीला ती जरीमरी मुलगी काय करते ते दाखवायचे होतेच .
मुलीला घेऊन ती चौकात आली. चौक गर्दीने फुलून गेला होता. सगळीकडे आजचा रंग खुलून दिसत होता. चौकाच्या मध्यभागी ती जरीमरी मुलगी आपल्या अंगावर चाबूक ओढीत पैसे मागत होती आणि तो माणूस देवीचा देव्हारा कोपऱ्यात ठेवून तंबाखू मळत बसला होता. 
तिने दहाची नोट आपल्या मुलीच्या हातात दिली आणि देवीच्या पुढ्यात ठेवायला सांगितली. देवीच्या पुढ्यात नोट ठेवणार्या आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहत असताना तिची नजर त्या माणसाकडे वळली आणि ती ताठरली. 
होय.....तीच नजर तिने काल रात्री त्याच्या डोळ्यात पहिली होती. अचानक तिला त्या नजरेचा अर्थ कळला आणि तिचे डोळे संतापाने फुलून उठले.
काही न बोलता तिने त्या मुलीचा चाबूक आपल्या हाती घेतला आणि सपासप त्याच्या अंगावर ओढू लागली . अचानक झालेल्या हल्ल्याने तो गोंधळला आणि ओरडत रस्त्यावर लोळू लागला . पण आता ती दया दाखवणार नव्हती .काही न बोलता ती देवीचे रौद्र रूप धारण करून त्याच्या पाठीवर सपासप चाबूक ओढत राहिली.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, October 9, 2021

तिसरी माळ... रंग ....?? 2021

तिसरी माळ... रंग ....?? 2021
रात्रीची  साधारण साडेनऊची वेळ. त्या बसस्टॉपवर ती एकटीच उभी होती. नवरात्रीच्या दिवसात हल्ली रंगांना फारच महत्व आले होते. तिने ही आजच्याच रंगाची साडी नेसली होती. सारखी घड्याळात पाहत दूरवर मोकळ्या रस्त्याकडे पाहत होती.
जसजशी रात्र चढू लागली तसतशी आजूबाजूची गर्दी  वाढू लागली. नको त्या माणसांचा वावर तिथे होऊ लागला .एक दोनजणी तर तिच्याकडे पाहून नई है क्या ...?? हमारे पेट पे क्यू लाथ मारने आई है ..??असे पुटपुटताना तिने ऐकले. शेजारून एक काळपट घामाजलेला तरुण तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडून गेला .हळूहळू तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटू लागली .
नाईलाजाने तिने एका रिक्षाला हात केला .ती रिक्षा थांबली नाही पण बराच वेळ एका कोपऱ्यात उभी असलेली रिक्षा हलली आणि तिच्यासमोर उभी राहिली.ती आत बसताच रिक्षा चालू झाली .काही अंतरावर जाताच अजून दोन माणसे रिक्षात चढली .त्यांना पाहताच ती घाबरली . त्या सर्वांनीच आजच्या रंगाचे शर्ट आणि टी शर्ट चढविले होते .
तिने रिक्षा थांबविण्याची विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही . आतमध्ये झटापट सुरू असतानाच एका जुन्या फॅक्टरीजवळ ती रिक्षा थांबली .त्या तिन्ही तरुणांनी खेचतच तिला बाहेर काढले आणि उचलून आतमध्ये नेले .
आतमध्ये जमिनीवर फेकताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.ते दोन तरुण तिच्या शरीराशी खेळू लागले तर एकजण तिचा विडिओ काढू लागला .
अचानक त्या रूमचा दरवाजा धाडकन उघडला आणि एक जीन्स आणि टीशर्ट घातलेली तरुणी आत शिरली. तिच्यासोबत साध्या कपड्यातील पोलीसही होते. त्या तरुणीने ही आजच्याच रंगाचे टी शर्ट घातले होते .
पोलिसांना पाहताच त्या तिघांनीही पळायचा प्रयत्न केला पण त्या तरुणीने आपल्या हातातील रिव्हॉल्व्हरने त्यांना शांतपणे गोळ्या घातल्या .
पहिल्या तरुणीने ताबडतोब तिघांचे खिसे चपापले आणि त्यांची पाकिटे काढून त्यातील सर्व पैसे आपल्या पर्समध्ये टाकले.
"लवकर यायला काय होते .दोघांनी वाट लावली माझी सर्व अंग दुखतंय. साले मिळेल तिथे हात लावत होते...."ती दुसरीकडे पाहत रागाने म्हणाली .
"म्हणून तर तुला मदतीला घेतले.सभ्य मुलगी तयार झाली असती का ...?? बरेच दिवस यांच्यावर संशय होता.किती स्त्रियांच्या आयुष्याची नासाडी केली असेल यांनी ..आज तुझ्या मदतीने याना धडा शिकवला .त्यांच्या पाकिटात जितके पैसे मिळतील ते तुझे .शेवटी तुझीही मेहनत आहेच की.आजच्या रात्रीची कमाई समज ही ..." दुसरीने रिव्हॉल्व्हर काखेखालच्या होस्टरमध्ये ठेवत म्हटले .
होय दोघीही देवीचं आहेत 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, October 8, 2021

दुसरी माळ... रंग ..?? 2021

दुसरी माळ... रंग ..?? 2021
खरे तर तो वॉर्डच किळसवाणा होता. औषध..मलमूत्राची दुर्गंधी ..त्यातच कीटकनाशकांचा वास यांचे एकत्र मिश्रण असलेला वास सतत तिथे पसरून राहिला होता .लास्ट स्टेजला असलेले पेशंट तिथे आणून ठेवले जात होते. कोणाची जखम उघडी तर कोणाच्या अंगावर कपडे नाहीत तर कोणी स्वतःच्या घाणीत झोपलेला.तिथे आलेला पेशंट दोन रात्रच राहत असे तिसरा दिवस पाहतच नसे.पेशंट बरा होण्याचे चान्सेस नसल्यामुळे त्या वॉर्डकडे कोणीच लक्ष देत नसे .
नुकताच नवरात्र सुरू झाले होते .सगळीकडे ठराविक दिवसाचे रंग दिसत होते .आजच तिलाही कोणीतरी त्या वॉर्डमध्ये ऍडमिट केले होते. आपले दिवस फार राहिले नाहीत हे तिच्या लक्षात आले होते. आजाराने तिला पोखरून काढले होते .हाडाचा सापळाच दिसत होता .पण डोळ्यात एक चमक दिसत होती. 
आजच्या रंगाची साडी आणि हातात मध्यम आकाराची बॅग घेऊन तिने वॉर्डात प्रवेश केला तेव्हा ड्युटीवरच्या नर्सने बोटाने तिची बेड दाखवली. एक गोड हसून ती त्या बेडच्या दिशेने गेली.
बेडवरची काळी चादर पाहून तिने नाक मुरडले तशी शेजारची चिमुरडी हसली. 
"कोणी येणार नाही करायला ...असेच राहावे लागेल..ती चिमुरडी म्हणाली.तशी तीही हसली.
 "मग आपणच आपले करू ...." तिनेही  टोला परतवला आणि दोघीही हसू लागल्या .
तिने बागेतून स्वछ डार्क रंगाची चादर काढली .एका फडक्याने आपला बेड स्वछ केला .चादर बदलली बाथरूममध्ये जाऊन चादर धुवायला टाकली.
शेजारची ती चिमुरडी असूयेने तिच्याकडे पाहत होती. "माझी चादर कधीतरी बदलते ती मावशी .."ती चिमुरडी म्हणाली .
"मी बदलेन की ..."असे म्हणून तिने त्या छोटीला उचलले .तिला कमरेखाली काही जाणीवच नाही हे उचलताच लक्षात आले तिच्या.पण तिने तसे दाखवून दिले नाही .उचलताना तिचे कपडे ओलसर लागले . न जाणे किती दिवस तो फ्रॉक तिच्या अंगावर होता .कितीतरी वेळा नैसर्गिक विधी त्यातच झाले असतील. लाज वाटून त्या छोटीने मान खाली घातली .पण हिने अजिबात जाणवू न देता तिला व्हीलचेयरवर बसविले.मग तिचा बेड स्वच्छ केला .त्यावर नवीन चादर घातली. त्यानंतर व्हीलचेयर हळू हळू ढकलत बाथरूमपर्यंत आणली. एव्हड्या कामानेही तिला धाप लागली. तरीही तिला स्वछ करून पुन्हा बेडजवळ आणले .
"त्या पिशवीत माझे कपडे आहेत.त्यातील एक घाल मला..."छोटीने ऑर्डर सोडली. 
तिने हसत ती पिशवी उघडली.आत जुने जीर्ण चार पाच कपडे होते .त्यातील आजच्या रंगाचा ड्रेस काढून तिला घातला .मग अलगद बेडवर बसविले.आणि आपल्याकडील बिस्कीटचा पुडा तिला दिला .
"किती दिवस आहेस तू इथे ..."?? तिने  बिस्कीट खात विचारले .
"माहीत नाही .पण लवकरच जाईन ..."असे म्हणून तिने हात वर केला .
"मी ही जाईन लवकर असे म्हणतात सगळे.रात्री खूप त्रास होतो.....पण माझ्या आधी जाऊ नकोस ...." चिमुरडी डोळ्यात पाणी आणून म्हणाली .
"नाही जाणार ..." तिनेही डोळ्यातील अश्रू लपवित उत्तर दिले .
"उद्या ही आपण नवीन कपडे घालूया ...?? उद्या कोणता रंग आहे ..."?? तिने बाजूच्या कॅलेंडरकडे पाहत विचारले.त्यावर कोणीतरी नवरात्रीचे रंग लिहिले होते .
"हो नक्की ...."तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले .
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने उठून पाहिले तर शेजारची चिमुरडी गाढ झोपली होती पुन्हा कधीही न उठण्यासाठी .
तिने शांतपणे एक फोन केला आणि पलीकडच्या व्यक्तीला छोट्या मुलींसाठी आजच्या रंगाचा एक नवीन ड्रेस आणायला सांगितला.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, October 7, 2021

पहिली माळ ......रंग ....??? 2021

पहिली माळ ......रंग ....??? 2021
रात्री होणाऱ्या शोसाठी ती संध्याकाळी लवकरच हॉटेलमधून बाहेर पडली .रस्त्यात किती ट्रॅफिक असतो आणि चाहते कसे आडवे येतात याची तिला चांगलीच कल्पना होती. त्यात नवरात्र सुरू झाले होते.
तिने आजच्या रंगाची साडी नेसली होती.सेलिब्रेटींनी हे सर्व करायलाच हवे.मार्केटिंगचाच एक भाग असतो तो. 
गेले महिनाभर ती राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शो करीत होती .आताही तिचे पोस्टर हॉटेलभर लागले होते . शेवटी आंतरराष्ट्रीय किर्तीची नृत्यांगना होती ती . जगभरात नाव होते तिचे. तिला नुसते पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते.आताही ती बाहेर पडली  आणि बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांकडे पाहून हात हलविला  आणि गाडीत बसली .
"मॅडम... आजचा शो ओव्हरपॅक आहे .शो झाल्यावर पहाटेचे फ्लाईट आहे .उद्या दुपार आणि संध्याकाळ दोन शो आहेत....तिच्या सेक्रेटरीने माहिती दिली.
काही न बोलता तिने मान डोलावली .रस्त्यात एके ठिकाणी गाडी सिग्नलला थांबली तेव्हा गाडीच्या काचेवर टकटक झाली.तिने काच खाली केली तेव्हा समोर आठ वर्षांचा मुलगा हातात थाळी घेऊन उभा होती .त्याच्या अंगावर आजच्याच रंगाचा फाटका शर्ट होता.तिच्या सेक्रेटरीने मान हलवून नकार दिला तेव्हा त्या मुलाने फुटपाथवर एका ठिकाणी बोट दाखविले . कुतूहलाने तिने तिकडे पाहिले.
  साधारण बारा  वर्षाची एक मुलगी लवचिकपणे अंग हलवित नाचत होती. तिच्या अंगावर आजच्याच रंगाचा ड्रेस होता.तिचे पदन्यास पाहून ती अचंबित झाली .घाईघाईने तिने शोफरला गाडी बाजूला लावायला सांगितली .रस्त्याच्या एका कोपऱ्यात गाडी लावून ती कौतुकाने तिचा नाच पाहत बसली.
 नाच संपताच तिच्या भोवतालची गर्दी पांगली आणि पाहणारे आपापल्या रस्त्याने चालते झाले .पुन्हा तो मुलगा तिच्यासमोर येऊन थाळी वाजवत बसला.थाळीत मोजून तीस ते चाळीस रुपये होते.तिने काही न बोलता शंभर रुपयांची नोट टाकली.त्याने नवलाईने त्या नोटेकडे पाहिले आणि गोड हसून आपल्या बहिणीकडे नाचतच गेला.स्वतःशी हसत तीने गाडी सुरू करायची सूचना केली. नेहमीप्रमाणे थिएटरभोवती गर्दी जमली होती . कशीबशी वाट काढत ती आत शिरली आणि सर्व विसरून कार्यक्रमाच्या तयारीला लागली.
नेहमीप्रमाणे तिचा परफॉर्मन्स दमदार झाला. काहीजणांनी तर चक्क नोटा उधळल्या .समाधानाने ती रात्री हॉटेलकडे निघाली. त्या सिग्नलजवळ येताच तिला त्यांची आठवण झाली .मध्यरात्री रस्त्यावर शुकशुकाट होता .वातावरण ही थंडच होते. तिची नजर त्या दोघांना शोधत होती.
 सिग्नलजवळ असलेल्या  बिल्डिंगच्या भिंतीला चिटकून ते दोघे झोपले होते .त्यांना पाहून ती खाली उतरली. तिची चाहूल लागताच त्याची सावध झोप उडाली.समोर तिला पाहताच दोघेही चकित झाले.
" दीदी..... हिनेच आपल्याला शंभर रुपये दिले.... "त्या मुलाने सांगितले.
" छान नाचतेस तू ...तिने तिच्याकडे पाहत म्हटले  आणि पर्समधून हातात येतील तितके पैसे काढून त्यांच्या समोर ठेवले.
"मी ओळखते तुम्हाला. शोरूमच्या टीव्हीत तुमचा डान्स पाहत मी नाचायला शिकले. खूप छान नाचता तुम्ही....तिने  तिला सलाम करीत म्हटले  आणि पैसे तिला परत केले .
आश्चर्यचकित होत तिने ते पैसे हातात घेतले आणि वळली.गाडीजवळ येताच ती थांबली आणि गाडीतील म्युझिक सिस्टीम सुरू केली. त्या म्युझिकच्या ठेक्यावर नकळत तिच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या.साडीचा पदर कमरेत खोचून ती जवळजवळ पंधरा मिनिटे बेभान होऊन नाचत होती. एक जगप्रसिद्ध नर्तिका आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय परफॉर्मन्स देत होती.आणि समोर प्रेक्षक होते ती दोन लहान मुले .
म्युझिक संपले आणि थकलेल्या शरीराने ती त्यांच्यासमोर उभी राहिली .आ वासून ती दोन्ही मुले तिचा तो अप्रतिम परफॉर्मन्स पाहत होते .
"कसा वाटला माझा डान्स ...."?? तिने हसत विचारले .
काही न बोलता ती मुलगी उभी राहिली आणि जसाच्या तसा परफॉर्मन्स तिच्या समोर सादर केला .डोळ्यातील पाणी बाहेर पडू न देण्याचा प्रयत्न करीत  तिचा परफॉर्मन्स  ती पाहत होती .
ते नृत्य संपताच  तिने थाळीतील  नोट काढून तिच्यासमोर धरली आणि पायावर डोके टेकविले .
"ही गुरुदक्षिणा आहे आणि तुमच्या कलेचा सन्मान आहे .जसा तुम्ही संध्याकाळी माझ्या कलेचा केलात .."
 तिने  चकित होऊन हातातील नोटेकडे पाहिले.तीच दुपारची शंभराची नोट होती.
होय त्या देवीचं आहेत
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Monday, October 4, 2021

वन अरेंज्ड मर्डर .....चेतन भगत

वन अरेंज्ड मर्डर .....चेतन भगत 
अनुवाद....सुवर्णा अभ्यंकर 
आज करवा चौथचा उपवास आहे. प्रेरणाने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी लग्नाआधीच उपवास केलाय.तिला भूक लागलीय .तसेही सौरभ आणि प्रेरणाची आवड एकच आहे . ती म्हणजे खाणे. दोघांनाही खाण्याची खूप आवड त्यामुळे दोघेही खूपच हेल्दी आहेत आणि तिच्या आकारमानावरून  केशवने बोललेले सौरभला आवडले नाही . याच कारणावरून दोघात दुरावा आलाय.
केशव आणि सौरभ दोघे मित्र. दिल्लीत एकत्र राहतात . एकाच आयटी कंपनीत काम करतात . दोघे मिळून एक झेड सिक्युरिटी नावाची खाजगी गुप्तहेर एजन्सी चालवतात.
प्रेरणाचा स्वतःचा व्यवसाय आहे. तिचे वडीलांची रमेश मल्होत्राची आलिशान गाड्यांची एजन्सी आहे तसेच ऑटोपार्ट्स बनविण्याचा कारखाना आहे . दिल्लीतील  उच्चभ्रू फ्रेंड कॉलोनीत त्यांचा बंगला आहे. त्यांच्यासोबत पत्नी ,भाऊ ,बहीण ,आई ,प्रेरणा आणि लहान मुलगा राहतात .तसेच नुकतीच अमेरिकेहून आलेली भाची अंजली ही त्यांच्या सोबत राहायला आलीय.
सौरभ प्रेरणाला भेटायला निघालाय.आज प्रेरणा त्याला काही खास गोष्ट सांगणार होती.तिने त्याला बंगल्याच्या मागील दारातून आत यायला सांगितले होते. पण जेव्हा सौरभ तिथे पोचला तेव्हा गच्चीच्या कठड्याजवळ प्रेरणाची ओढणी होती आणि प्रेरणाखाली जमिनीवर पडली होती. 
पोलिसांचा पहिला संशय सौरभवर होता .कारण गच्चीवर तोच सापडला होता.या घटनेच्या वेळी रमेश आणि अंजली सोडून बाकी सर्व घरात होते. रमेश पान आणायला गेले होते तर अंजली ट्रॅकवरून घरी परतत होती. प्रेरणाच्या अंगावर कोणाचेच ठसे नव्हते ,इतर कोणतेही पुरावे नव्हते .
हा खून आहे की आत्महत्या की अपघात ....?? 
रमेश पोलिसांना हात जोडून ही केस बंद करायला सांगत होते . पोलिसांना ही इंटरेस्ट नव्हताच . पण केशव आणि सौरभने याचा छडा लावायचा ठरविले .रमेशचा भाऊ आदित्य यावर पहिला संशयित म्हणून पाहिले गेले आणि ड्रगचा ओव्हरडोस घेतल्यामुळे आदित्यचा मृत्यू झाला ..
मग यामागे कोण असेल ...?? केशव आणि सौरभला खरा खुनी सापडेल का ??
दिल्लीतील हाय प्रोफाईल फॅमिली आणि कार्पोरेट जगाचे उत्तम चित्रण लेखकाने यात केले आहे . अत्याधुनिक डिजिटल साहित्य ,सोशल मीडिया यांचा अतिशय कुशलतेने वापर करून हे रहस्य सोडविले आहे .

Thursday, September 30, 2021

नवी सुरवात

नवी सुरवात
आज सकाळीच बरीच कामे होती म्हणून ऑफिसला उशीराच निघालो होतो.जी मिळेल ती लोकल पकडून निघायचे असे ठरवून प्लॅटफॉर्मवर पोचलो.तसेही लॉकडाऊन अजून पूर्ण संपले नसल्यामुळे ट्रेनला गर्दी कमीच दिसत होती.
 मी जी लोकल आली त्यात चढलो आणि नेहमीसारखा पुस्तकात डोके घालून बसलो .ट्रेन विक्रोळीला थांबून निघाली आणि थोड्याच वेळात माझ्या बाजूला ती परिचित टाळी ऐकू आली .त्यानंतर भाऊ...!! करून ओळखीचा आवाज.तो आवाज ऐकून मी त्याच्याकडे मान वळवली तेव्हा तो हसत हसत बाजूला बसला आणि सोबत असलेल्या दोन लहान मुलांना समोरच्या सीटवर बसविले .
"भाऊ ... कसे आहात..?? ड्युटी बदलली का ..."?? त्याने आपल्या पुरुषी खर्जातील आवाजात विचारले .
"नाही ...आज लेट निघालोय .पण तू वेळ बदलली हे नक्की ...आणि हे काय ....?? या लहान मुलांनाही हे शिकवतोस का ...."?? मी थोड्या चढ्या आवाजात विचारले.
"बस काय भाऊ .....?? हीच किंमत का आपली ..."?? तो हात जोडत म्हणाला . "मी सर्व बंद केले आता . बघून वाटत नाही का ...."?? 
"खरेच की ... मी पूर्वीच्याच नजरेने त्याच्याकडे पाहत होतो. पण आता तो बदलला होता . छान साडी ,हलका मेकअप . व्यवस्थित बांधलेली एक वेणी . आणि विशेष म्हणजे बऱ्यापैकी स्त्री सारखे बोलणे .अर्थात तिच्यातील पुरुष लपत नव्हता पण ती स्त्री दिसण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होती.
"अरे वा.... हे छान आहे .." मी ताबडतोब कॉप्लिमेंट दिली. तसा तो हसला." पुरुषीपणा लपत नाही म्हणा पण मी प्रयत्न करतेय.."
"मग ही कोण..." ?? मी दोन्ही मुलांकडे बोट दाखवून विचारले .
"आहो हे अनाथाश्रमातील मुले आहेत .मी विक्रोळीला  एका म्हातारीच्या सोबतीला जाते. ती आजी छान बालसंस्कार वर्ग घेते . मग म्हटले महिनाभर याना घेऊन जाऊ . काहीतरी चांगले शिकतील .आमचाही वेळ जाईल. काही पैसे ही मिळतील .आता त्यांना सोडून घरी जाईन ..." तिने मुलांकडे हसून पाहिले.
" वा छान ...!! . पण तुझी कमाई बंद झाली .पूर्वीपेक्षा कमी पैसे मिळत असतील..." मी हसत विचारले .
" किती वर्षे लोकांपुढे टाळ्या वाजवत त्यांना धमकावत ..अचकट विचकट बोलून ..प्रसंगी शरीरावर हात फिरवायची संधी देऊन पैसे काढू भाऊ ...??  उद्या वय झाले की कोण विचारणार नाही आणि हेच जीवन का जगायचे आम्ही. आता चांगले वागायची सुरवात केली तर पुढच्या पिढ्यातरी समाजात ताठ मानेने वावरतील. मानवजातीतील तिसऱ्या वर्गाला आता कुठे हळू हळू सन्मान मिळू लागलाय तो अजून पुढे न्यायला आम्हीच काहीतरी केले पाहिजे...."त्याच्या बोलण्यात कळकळ दिसत होती.
"खरे आहे तुझे ...मग भीक मागणे बंद केले तर भागते कसे तुझे ....."?? मी कुतूहलाने विचारले .
" खूप कामे आहेत भाऊ... हल्ली सर्वाना ऑनलाईन कामे करायची सवय लागली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गरज भासते तिथे माणसेच उपलब्ध नसतात .उदा. हॉस्पिटलमध्ये आजारी माणसांची शुश्रूषा करायला .अनाथाश्रमातील वृद्धांची सेवा करायला . जेवणाचे डबे पोचवायला.  तसेच छोट्या मोठ्या डिलिव्हरीसाठी माणसे हवी असतात .तिथे मी जातो .,जे मिळतील ते पैसे घेतो.तुला माहितीय...मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा ही कोर्स केलाय .."तो मोठ्याने हसत म्हणाला .
"अच्छा …..म्हणून हा बदल आहे तर .…" मी त्याच्याकडे निरखून बघत म्हणालो . तसा तो लाजला आणि क्षणात गंभीर झाला .
"भाऊ... भीक मागण्यापेक्षा हे बरे नाही का ..?? समाजातील उपेक्षित समाज म्हणून आमची गणना होते. गेल्या कित्येक पिढ्या हेच भोगत जगतोय आम्ही.हळू हळू बदल घडतायत.आमच्यातील कित्येकजण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतायत.मग मी ही नव्यानं सुरवात का करू नये ...?? झिरो मिळण्यापेक्षा एक मिळवणे चांगले नाही का ..?? आणि एक मिळाला तरच दोन पुढे तीनचार मिळत जातील ..तो बोलताना हळवा झाला 
.आयुष्याच्या नवीन सुरवातीस माझ्या शुभेच्छा....असे म्हणत मी त्याचे हात प्रेमाने दाबले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, September 29, 2021

फिडेल कॅस्ट्रो ....अतुल कहाते

फिडेल कॅस्ट्रो ....अतुल कहाते
मनोविकास प्रकाशन 
क्युबा म्हटले की डोळ्यासमोर येतो तो हवाना सिगार ,मुष्ठीयोध्ये आणि फिडेल कॅस्ट्रो.
अर्थात नवीन पिढी कोण हा कॅस्ट्रो..?? म्हणून विचारेल आणि म्हणूनच लेखकाला कॅस्ट्रोला नवीन पिढीसमोर आणावेसे वाटले.
1959 साली फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी युवकांनी क्युबात स्वातंत्र्याचे वारे आणले.अमेरिकेने आपल्या आज्ञेत राहतील असे हुकूमशहा क्युबाला दिले पण एकटा फिडेल कॅस्ट्रो त्या सर्वांना पुरुन उरला. अमेरिकेने त्याला खूप त्रास दिला. त्याला मारण्याचे शेकडो प्रयत्न केले. पण फिडेल आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि अमेरिकेशी सतत संघर्ष करीत राहिला .जेमतेम मुंबई इतकी साधारण दीड कोटी लोकसंख्या आणि फक्त 100 चौ. किलोमीटर आकार असलेल्या क्युबावर कॅस्ट्रोमुळे अमेरिकेला कधीच वर्चस्व राखता आले नाही. त्याने जवळजवळ पन्नास वर्षे क्युबाचे नेतृत्व केले. अमेरिकेने त्याला वेठीस आणण्यासाठी क्युबाची आर्थिक राजकीय कोंडी करायचे प्रयत्न केले पण सोव्हिएत युनियनच्या पाठिंब्यावर कॅस्ट्रोने अमेरिकेवर मात केली.
क्युबा चार शतके स्पॅनिश सत्तेच्या नियंत्रणाखाली होती पण 1898 ला क्रांतिकारांनी क्युबा स्वतंत्र केले आणि ताबडतोब अमेरिकेने यात उडी मारली. फिडेलचे बालपण अतिशय सुखात गेले.  अभ्यासात फार गती नव्हती पण इतिहासात रस होता . त्याची भाषणे अतिशय प्रभावशाली असत. तो दोन ते चार तास सलग एका जागी उभे राहून भाषण देऊ शकत असे.
अखेर 26 नोव्हेंबर 2016 साली फिडेल क्रिस्टोने जगाचा निरोप घेतला .
लेखकाने अतिशय सुरस आणि रोमांचकारी पद्धतीने चरित्र लिहिले आहे त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही . अमेरिकेविरुद्ध त्याने सतत वेगवेगळे डावपेच वापरले .तो शेवटपर्यंत अमेरिकेचा विरोधकच राहिला .

Thursday, September 23, 2021

पगारी मित्र "ह्या म्हाताऱ्याचे काय करावे तेच कळत नाही....." बाजूच्या खुर्चीवर धपकन बसत अव्या पुटपुटला. मी आणि विक्रमने चमकून त्याच्याकडे पाहिले. आम्ही बऱ्याच दिवसांनी अण्णाकडे बसलो होतो. "काय झाले अव्या...."?? बशीतले शेवटचे बिस्कीट त्याच्याकडे सरकवून विक्रमने विचारले .अर्थात म्हातारा म्हणजे अविचा बाबा हे सांगायची गरज नव्हती."भाऊ ...हल्ली बाबांची खूप चिडचिड चालू आहे . काय करावे कळत नाही.. सारखे समोर कोणतरी हवे असते. माझे ऐकत नाही कोणी हीच तक्रार ..."अवि चिडून म्हणाला ." म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात फेक..." विक्रम चहाचा घोट घेत म्हणाला ." गप रे...तुला माहितीय मी असे करणार नाही .... वृद्धाश्रमाची कल्पनाच आम्ही करू शकत नाही .पण तुम्हीच सांगा ..सकाळी आठला आम्ही घरातून बाहेर पडतो.ते रात्री सातनंतर घरी .आई होती तोपर्यंत चालत होते .आता घरात ते एकटे ..."अवि भावुक झाला ." माणूस ठेव ..." विक्रमकडे सल्ल्याची कमी नव्हती." माणूस काय करणार....?? तो पगारी नोकर ..जेवण औषधे वेळच्यावेळी देईल. पण ह्यांच्याशी गप्पा कोण मारेल...?? तुम्हाला माहितीय बाबांना राजकारणात किती इंटरेस्ट आहे .सगळ्या पक्षांच्या चार चुका काढल्याशिवाय जेवत नाही .आणि हो त्यांचे ते हार्मोनियम वादन कोण ऐकेल.तो माणूस पळून जाईल .." अवि माझ्या हातावर टाळी देत हसत म्हणाला."करू काहीतरी..." असे म्हणत विक्रम उठला तसे आम्हीही उठून बाहेर पडलो.त्यानंतरच्या रविवारी अव्याच्या घरची बेल वाजली .दारात आम्हाला पाहून अव्या उडाला .आमच्यासोबत एक तरुण होता. विक्रमने त्याची ओळख मुलाचा मित्र अशी करून दिली. बाबा खुर्चीत बसून पेपर वाचत होते." एक खाजगी काम आहे .."असे म्हणत आम्ही अव्याला गॅलरीत घेऊन आलो आणि तो तरुण बाबांशी गप्पा मारत बसला.अव्या आणि त्याची बायको अधूनमधून बाबांकडे नजर टाकत होते .पण कसे काय..कोण जाणे म्हातारा खूप खूष होऊन त्या तरुणाशी बोलत होता .मग आम्हीही निश्चित होऊन गप्पा मारत बसलो. दोन तासानी आम्ही उठलो जाता जाता बाबांनी त्या तरुणांच्या पाठीवर थाप मारून "उद्या ये..मी हार्मोनियम ऐकवतो तुला.." असे प्रेमाने आमंत्रण दिले तश्या अव्याच्या कपाळावर आठ्या पडल्या."कशाला त्याला त्रास ..."?? असे तो पुटपुटला. तसा तो तरुण म्हणाला " काही हरकत नाही ...फोन करा ..येईन मी .…"असे हसून म्हणताच अव्या उडालाच ."ही काय भानगड आहे विकी .."?? खाली येताच अव्याने कमरेवर हात ठेवून विचारले."दोनशे दे त्याला ..." तरुणांकडे बोट दाखवत विक्रम म्हणाला." म्हणजे ....."?? अव्या चिडलाच." तूच म्हणालास ना म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात ठेवणार नाही . मग वृद्धाश्रम तुझ्या घरी आले तर ...?? हा तरुण निखिल ..तुझ्या बाबांसोबत राहील . त्यांना पाहिजे तेव्हा तो हजर होईल. त्यांच्याशी पाहिजे त्या विषयावर गप्पा मारेल. त्यांचे सर्व काम करेल. त्यांना औषधांची आठवण करून देईल शक्य झाल्यास देईलसुद्धा . त्यांचे हार्मोनियम ऐकेल. पत्ते खेळेल .अगदी आतल्या गोष्टींवरही चर्चा करेल. त्यांना कंटाळा येईल तेव्हा निघून जाईल. पण संध्याकाळी तो जो चार्ज लावेल तो तुला द्यावा लागेल ...विक्रम अविकडे रोखून पाहत म्हणाला ." च्यायला विकी ...म्हातारा किती खडूस आहे ते तुला सांगायला नको...अरे चिडला तर शिव्या ही देईल त्याला .."अवि काळजीने म्हणाला ."खाईल तो शिव्या ... तो त्याचेच तर पैसे घेणार आहे .तो सगळे काही सहन करेल. आपण नाही का आपल्या साहेबांच्या शिव्या ऐकतो...तू फक्त त्याला वेळोवेळी पैसे देत जा ...जे वृद्धाश्रमात खर्च करणार ते याला दे ..." मी समजावले ."ठीक आहे ...पण हा उचललास कुठून ...?? अविने हसत विचारले . तसे मी आणि विक्रम एकमेकांकडे पाहून हसलो .काल संध्याकाळीच आम्ही कमलाकर अकॅडमीच्या कमलाकर कदम उर्फ केकेला जाऊन भेटलो होतो आणि आमची समस्या त्याच्यासमोर मांडली होती.नेहमी सारखे छद्मी हसत त्याने एक फोन फिरवला होता आणि त्या तरुणाला आमच्याकडे पाठवून दिले होते.त्याआधी त्याने अवीच्या बाबांची सगळी माहिती त्याला दिली होती . केके सहज म्हणाला बाबांना वृद्धाश्रमात जायचे नसेल तर आपणच वृद्धाश्रम घरी आणू.© श्री.किरण कृष्णा बोरकर

पगारी मित्र 
"ह्या म्हाताऱ्याचे काय करावे तेच कळत नाही....." बाजूच्या खुर्चीवर धपकन बसत अव्या पुटपुटला. मी आणि विक्रमने चमकून त्याच्याकडे पाहिले. 
आम्ही बऱ्याच दिवसांनी अण्णाकडे बसलो होतो. 
"काय झाले अव्या...."?? बशीतले शेवटचे बिस्कीट  त्याच्याकडे सरकवून विक्रमने विचारले .अर्थात म्हातारा म्हणजे अविचा बाबा हे सांगायची गरज नव्हती.
"भाऊ ...हल्ली बाबांची खूप चिडचिड चालू आहे . काय करावे कळत नाही.. सारखे समोर कोणतरी हवे असते. माझे ऐकत नाही कोणी हीच तक्रार ..."अवि चिडून म्हणाला .
" म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात फेक..." विक्रम चहाचा घोट घेत म्हणाला .
" गप रे...तुला माहितीय मी असे करणार नाही .... वृद्धाश्रमाची कल्पनाच आम्ही करू शकत नाही .पण तुम्हीच सांगा ..सकाळी आठला आम्ही घरातून बाहेर पडतो.ते रात्री सातनंतर घरी .आई होती तोपर्यंत चालत होते .आता घरात ते एकटे ..."अवि भावुक झाला .
" माणूस ठेव ..." विक्रमकडे सल्ल्याची कमी नव्हती.
" माणूस काय करणार....?? तो पगारी नोकर ..जेवण औषधे वेळच्यावेळी देईल. पण ह्यांच्याशी गप्पा कोण मारेल...?? तुम्हाला माहितीय बाबांना राजकारणात किती इंटरेस्ट आहे .सगळ्या पक्षांच्या चार चुका काढल्याशिवाय जेवत नाही .आणि हो त्यांचे ते हार्मोनियम वादन कोण ऐकेल.तो माणूस पळून जाईल .." अवि माझ्या हातावर टाळी देत हसत म्हणाला.
"करू काहीतरी..." असे म्हणत विक्रम उठला तसे आम्हीही उठून बाहेर पडलो.
त्यानंतरच्या रविवारी अव्याच्या घरची बेल वाजली .दारात आम्हाला पाहून अव्या उडाला .आमच्यासोबत एक तरुण होता. विक्रमने त्याची ओळख मुलाचा मित्र अशी करून दिली. बाबा खुर्चीत बसून पेपर वाचत होते.
" एक खाजगी काम आहे .."असे म्हणत आम्ही अव्याला गॅलरीत घेऊन आलो आणि तो तरुण बाबांशी गप्पा मारत बसला.
अव्या आणि त्याची बायको अधूनमधून बाबांकडे नजर टाकत होते .पण कसे काय..कोण जाणे म्हातारा खूप खूष होऊन त्या तरुणाशी बोलत होता .
मग आम्हीही निश्चित होऊन गप्पा मारत बसलो. दोन तासानी आम्ही उठलो जाता जाता बाबांनी त्या तरुणांच्या पाठीवर थाप मारून "उद्या ये..मी हार्मोनियम ऐकवतो तुला.." असे प्रेमाने आमंत्रण दिले तश्या अव्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"कशाला त्याला त्रास ..."?? असे तो पुटपुटला. तसा तो तरुण म्हणाला " काही हरकत नाही ...फोन करा ..येईन मी .…"असे हसून म्हणताच अव्या उडालाच .
"ही काय भानगड आहे विकी .."?? खाली येताच अव्याने कमरेवर हात ठेवून विचारले.
"दोनशे दे त्याला ..." तरुणांकडे बोट दाखवत विक्रम म्हणाला.
" म्हणजे ....."?? अव्या चिडलाच.
" तूच म्हणालास ना म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात ठेवणार नाही . मग वृद्धाश्रम तुझ्या घरी आले तर ...?? हा तरुण निखिल ..तुझ्या बाबांसोबत राहील . त्यांना पाहिजे तेव्हा तो हजर होईल. त्यांच्याशी पाहिजे त्या विषयावर गप्पा मारेल. त्यांचे सर्व काम करेल. त्यांना औषधांची आठवण करून देईल शक्य झाल्यास देईलसुद्धा . त्यांचे हार्मोनियम ऐकेल. पत्ते खेळेल .अगदी आतल्या गोष्टींवरही चर्चा करेल. त्यांना कंटाळा येईल तेव्हा निघून जाईल. पण संध्याकाळी तो जो चार्ज लावेल तो तुला द्यावा लागेल ...विक्रम अविकडे रोखून पाहत म्हणाला .
" च्यायला विकी ...म्हातारा किती खडूस आहे ते तुला सांगायला नको...अरे चिडला तर शिव्या ही देईल त्याला .."अवि काळजीने म्हणाला .
"खाईल तो शिव्या ... तो त्याचेच तर पैसे घेणार आहे .तो सगळे काही सहन करेल. आपण नाही का आपल्या साहेबांच्या शिव्या ऐकतो...तू फक्त त्याला वेळोवेळी पैसे देत जा ...जे वृद्धाश्रमात खर्च करणार ते याला दे ..." मी समजावले .
"ठीक आहे ...पण हा उचललास कुठून ...?? अविने हसत विचारले . तसे मी आणि विक्रम एकमेकांकडे पाहून हसलो .
काल संध्याकाळीच आम्ही कमलाकर अकॅडमीच्या कमलाकर कदम उर्फ केकेला जाऊन भेटलो होतो आणि आमची समस्या त्याच्यासमोर मांडली होती.नेहमी सारखे छद्मी हसत त्याने एक फोन फिरवला होता आणि त्या तरुणाला आमच्याकडे पाठवून दिले होते.त्याआधी त्याने अवीच्या बाबांची सगळी माहिती त्याला दिली होती . केके सहज म्हणाला बाबांना वृद्धाश्रमात जायचे नसेल तर आपणच वृद्धाश्रम  घरी आणू.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Wednesday, September 22, 2021

सन्स ऑफ फॉर्च्युन... जेफ्री आर्चर

सन्स ऑफ फॉर्च्युन... जेफ्री आर्चर
अनुवाद..अजित ठाकूर 
मेहता पब्लिशिंग हाऊस
सुझान आणि मायकेल कार्टराईटच्या आयुष्यात चक्क जुळ्यांचा प्रवेश होणार होता.त्यातील थोरला नॅट तर दुसरा पीटर सहा मिनिटांनी जन्माला आला . 
रूथ डेव्हनपोर्टचा दोनदा अकाली गर्भपात झाला होता. आता ही आई होण्याची ही तिची शेवटची संधी असेल असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते. सुझान आणि रूथ एकाचवेळी सेंट पॅट्रिक हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी ऍडमिट झाल्या.रूथ त्या हॉस्पिटलची अध्यक्ष होती.
दुर्दैवाने रुथचा मुलगा जन्माला येतात काही वेळाने मरण पावला . हा धक्का तिला सहन होणार नाही याची कल्पना तिची खाजगी नर्स निकॉलला होती आणि म्हणूनच तिने पीटर कार्टराईटला रूथच्या हाती दिले आणि सुझानच्या हाती रूथचा मृत मुलगा दिला .
पुढे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी वाढू लागले .दोघेही जन्मतः हुशार असल्यामुळे त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत होता .
नॅट कार्टराईट तरुणपणातच सैन्यात भरती होऊन व्हिएतनाम युद्धात भाग घेतला आणि शौर्यपदक मिळवले नंतर तो प्रसिद्ध बँकर बनला तर पीटर उर्फ पलेचरने वकील होऊन राजकारणात शिरकाव केला .
पुढे दोघांनाही गव्हर्नरपदाची उमेदवारी मिळाली आणि ते एकमेकांसमोर उभे ठाकले. अचानक त्यातील तिसऱ्या उमेदवाराचा खून झाला आणि त्याचा आळ नॅट कार्टराईटवर आला .त्याला यातून वाचवण्याची ताकद फक्त एकाच व्यक्तीकडे होती आणि ती व्यक्ती म्हणजे पलेचर डेव्हनपोर्ट......
पण पलेचर डेव्हनपोर्ट त्याला या खूनाच्या आरोपातून बाहेर काढेल का ???  दोघांनाही आपले जन्म रहस्य माहीत होईल का ...?? शेवटी गव्हर्नरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल ...??
जेफ्री आर्चरने आपल्या नेहमीच्या शैलीत विस्ताराने ही कथा लिहिली आहे . यातील काळ खूप मोठा आहे. कथानायकाच्या जन्माच्या आधीपासून ते लहानाचे मोठे कसे होतात आणि त्याच मार्गाने त्यांच्या आयुष्यातील ठळक घडामोडी मांडल्या आहेत. पण हे वाचताना कुठेही कंटाळवाणे होत नाही . उलट काही ठिकाणी नर्म विनोद ही आहेत. सुरवातीलाच रहस्य उघड होऊनही आता पुढे काय घडेल याची उत्सुकता सतत वाटत आपण पुस्तक वाचत जातो ते अगदी शेवटच्या पानावरील शेवटच्या ओळीपर्यंत.

Tuesday, September 7, 2021

एक गहन षडयंत्र... डॉ. स्नेहल घाटगे

एक गहन षडयंत्र... डॉ. स्नेहल घाटगे
शब्दविश्व प्रकाशन
डॉ. राघव विद्यासागर हे प्रसिद्ध डॉक्टर होते. कथा सादर करणारा ईशान विद्यासागर हा त्यांचा नातू आहे . डॉ. राघव विद्यासागर यांचा नुकताच मृत्यू झाला म्हणून त्यांचे एक रहस्य ईशान इथे सांगत आहे .
डॉ. राघव हे व्यवसायाने डॉक्टर. त्याचा मित्र अंबर जेधे हा खाजगी गुप्तहेर. राघवची प्रेयसी तेजस्विनी आपली बहीण माया आणि तिचा नवरा हरी सरंजामे यांच्यासोबत राहत होती.हरी सरंजामे हे आजारी वृद्ध गृहस्थ आहेत तर माया ही सुंदर तरुण स्त्री.
डॉ. मनोहर हे राघवचे बॉस . ते शहरातील पाहिले नर्व्हस डिसऑर्डरचे तज्ञ म्हणून ओळखले जात.
त्या दिवशी अचानक रात्री तीन वाजता राघवला हरी सरंजामेकडे बोलविण्यात आले .एका चाकूने सरंजामे यांचा खून झाला होता. त्यावेळी घरात फक्त तेजस्विनी आणि दोन नोकर होते. माया आपल्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेली होती. 
जी व्यक्ती कर्करोगाने मरणार आहे तिचा खून करून कोणास फायदा होणार आहे. ??  पोलिसांसोबत या प्रकरणाचा छडा लावायची जबाबदारी अंबर जेधेने घेतली .पण त्याची प्रगतीही संथ होती. 
काही दिवसानी माया सरंजामेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . तो अपघात होता की आत्महत्या ...?? 
ही अतिशय गुंतागुंतीची केस शेवटी उलगडली गेली आणि वेगळेच रहस्य सर्वांसमोर आले .

Sunday, September 5, 2021

शिक्षकदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

शिक्षकदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
इथे मी सर्वाना शुभेच्छा देतोय याचे कारण माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या व्यक्तींना मी शिक्षकच समजतो. मग ते लहान असो वा मोठे. ऑनलाईन भेटणारे असो की ऑफलाईन असोत. 
प्रत्येक व्यक्तीने मला नेहमीच काहीतरी शिकवले आहे . खरेतर शाळेतील शिक्षकांविषयी माझ्या मनात कधीच फारसा आदर नव्हता . कदाचित मी साधारण बुद्धीचा , शिक्षणात ,वक्तृत्वात फारशी चमक न दाखवणारा असेन.म्हणूनच शाळेतील शिक्षकांच्या मी फारसा स्मरणात राहिलो नाही.आजही कोण समोर आले तर ओळखणार नाही हे निश्चित. अर्थात ती त्यांची चूक नाही म्हणा पण त्यामुळे कोणाच्या लक्षात राहायचे असेल तर कशात तरी चमक दाखविणे गरजेचे आहे हे शिकलो. 
पण शाळेच्या मित्रांकडून बरेच काही शिकलो . चेहऱ्यावरची एकही रेषा न हलवता निर्विकारपणे समोरच्याची टेर खेचणे. त्याने दिलेल्या शिव्या सहजपणे झेलणे . त्यावर हसणे . जर आपण एखाद्याला टार्गेट करत असलो तरी आपणही कोणाचे टार्गेट होऊ शकतो याचे भान ठेवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोस्ती निभावणे हे शिकलो.
 पुढे कॉलेज जीवनात अनेक चांगले शिक्षक लाभले . त्या सर्वांनी आम्हास खूप मदत केली . काहीजण अजूनही व्यक्तीशः ओळखतात .त्या शिक्षकांनी आम्हा मित्रात एकजूट आणली. एकमेकांवर विश्वास ठेवणे शिकवले . एकमेकांना समजून घेणे शिकवले . त्यामुळेच अजूनही आम्ही सर्व मित्र एकत्र आहोत .कॉलेजमधील आमच्या मित्रांनी आम्हाला व्यसने शिकवली पण त्या व्यसनांपासून दूर कसे राहावे हे ही शिकवले .ते ही शिक्षकच असणार.चांगले शिक्षणच आपल्याला चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक बनवते हे आम्ही कॉलेजमधून शिकलो .
त्यानंतर व्यावहारिक विश्वात आम्ही पाऊल  ठेवले . तिथे आमचे सिनियर आमचे शिक्षकच होते. त्यातील काहींनी आम्हाला टाईमपास कसा करावा . पाट्या कश्या टाकाव्या ,आपले काम दुसऱ्यांवर कसे ढकलावे ते शिकवले तर काहींनी प्रामाणिकपणे काम कसे करावे. आपली जबाबदारी कशी पार पाडावी. वरिष्ठांचा आदर करावा ज्युनियर्सना कसे ट्रेनिंग द्यावे हे शिकवले. 
पण मुळात चांगली व्यक्ती घडविण्यासाठी संस्कार महत्वाचे असते आणि हे लहानपणापासूनच  मुलांवर बिंबवले पाहिजे आणि तेच कार्य शाळेतील शिक्षकांकडून घडते . यासाठीच शाळा असतात आणि शाळेत जाणे गरजेचे असते. आजही ग्रामीण भागात शाळेचे महत्व शहरांपेक्षा कमीच आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागातून फारच कमी मुले यशाच्या शिखरावर पोचतात .
आणि यावर अभ्यास आणि विचार विनियम करूनच स्टार्ट गिविंग फौंडेशनची स्थापना झाली . शहरातील अत्याधुनिक सोई ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाल्या तर त्यांना शाळेत येण्यात उत्साह वाटेल ही मूळ संकल्पना घेऊन आम्ही मित्रांनी या क्षेत्रात पाऊल टाकले. एकमेकांना विचारून दुसऱ्यांच्या सूचनेचा आदर करून कोणाला न दुखावता आपल्या योजना यशस्वी होतील यावर आम्ही भर दिला . लाल फितीचा कारभार वगळून लवकरात लवकर कशी मदत गरजू कडे कशी पोचेल यावर भर दिला .आम्हाला वाटत नव्हते की यात फार काळ टिकून राहू पण विश्वास ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला आत्मविश्वास देते. त्याच विश्वासावर आज आठ वर्षे स्टार्ट गिविंग फौंडेशन डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात काम करतेय . गेल्या आठ वर्षात साधारण  25च्यावर शाळा आम्ही डिजिटल केल्या . त्याशिवाय पाणी फौंडेशन ,अनाथाश्रमात मेडिकल कॅम्प ,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, नाम फौंडेशन सारख्या संस्थेला मदत यासारखी छोटी मोठी कार्य केलीत. होय आमच्यासाठी ही कार्य छोटीच आहेत. कारण शैक्षणिक क्षेत्रात कराल तितके कमीच आहेत . पण आज काही केले नसते तर जे काही केले ते झालेच नसते .शून्य मिळविण्यापेक्षा एक मिळवा बडबड नको कृती करा हेच आमचे ध्येय .आम्हाला माहीत नाही यामुळे कोणाचा किती फायदा होईल पण सुरवात तरी केली हे महत्वाचे आहे.पण हे सर्व कशामुळे झाले ....?? आम्हाला का सुचले ...?? का आम्ही आमच्या खिशातील पैसे काढून या कार्यास देतो ...?? कारण आमच्यावर तसे संस्कार करणारेच आमचे गुरू आमचे शिक्षक आहेत मग ते आमचे  आमचे आईवडील असो ,मित्र असो .आमच्या आयुष्यात आलेला आणि पाठिंबा देणारा हा आमचा शिक्षक आहे .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, September 4, 2021

श्वास

श्वास
संतोष दिघेला हातात चिकूची पिशवी घेऊन घरात शिरलेले पाहताच मी उडालोच. सौ नेतर बाहेर जाऊन ह्याच्या मागे कोणी आले नाही ना याची खात्री करून आली.
मी मात्र या चिकूच्या बदल्यात मला कितीचा फटका पडेल...?? या चिंतेत पडलो.मुळात हे चिकू संतोषने माझ्यासाठी आणले का ..?? हा सर्वात मोठा गहन प्रश्न . मागच्या वेळी अननस आणला होता तेव्हा सुटे नाही म्हणून माझ्याकडून पैसे घेऊन त्या फळवाल्याला दिले आणि नंतर उपकार केल्यासारखे एक छोटा तुकडा मला देऊन उरलेला अननस एकट्याने संपविला होता .पुढे काही अघटित घडू नये म्हणून ही गोष्ट मी सौपासून लपवून ठेवली होती.
अरे हो ...!! हा संतोष दिघे कोण.. हे तुम्हाला माहीत असेलच . हो तोच.. जो स्वतःला लेखक समजतो . काही मराठी सिरियलचे लेखनही करतो असे आम्हाला सांगतो. सौ ला आणि तिच्या नातेवाईकांना  सिरीयलमध्ये काम करायची संधी देतो असे सांगून बऱ्याचवेळा भरपेट जेवून जातो . कधी कधी सौच्या शिव्या ही खातो.
लेखक असल्यामुळे त्याच्या शबनम बॅगेत दोन चार वह्या.. तीन पेन.. दोन पेन्सिली नेहमी असतात . मला नेहमी आपले लिखाण दाखवतो पण ते ऐकून माझे तोंड बघून ताबडतोब फाडून टाकतो आणि तो कचरा माझ्या हॉल मध्ये सोडून जातो.पण आज त्याच्या खांद्यावर बॅग नव्हती हे पाहून हायसे वाटले.
पण आता त्याने सौला चक्क हाक मारून तिच्या हातात ती चिकूची पिशवी दिली आणि आम्हाला एकदम सुचेनासे झाले .
"घ्या वहिनी ...दोन डझन आहेत.यापुढे तुम्ही चिकू कधीच बाहेरून विकत घ्यायचे नाहीत ..." दिघे हसत म्हणाला .
"म्हणजे या पुढे चिकू तुझ्याकडून विकत घ्यायचे का ..."? मी छद्मीपणे हसत विचारले.
"गप बसा हो...आपल्या माणसाला कोण पैसे देते का ...सौ त्याच्या हातातील पिशवी जवळजवळ हिसकावून घेत म्हणाली आणि संतोषचा विचार बदलायच्या आत ती आत पळाली.
"काय भाऊ ...कामाला जातोस की नाही …."त्याने माझ्या पाठीवर थाप मारून विचारले .
"तुझ्यासारख्या मित्राकडून त्या भयानक कथा ऐकण्यापेक्षा ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या खाल्लेल्या परवडल्या..." मी तिरकसपणे म्हणालो.
माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता  त्याने खिश्यातून स्मार्टफोन काढला आणि त्यातून एक फोल्डर ओपन करून त्यातील कथा मला वाचायला दिली.
"आयला हे काय...?? दिघ्या चक्क हायटेक झालाय.मोबाईलवर लिहितो.म्हणून त्याची ती सुप्रसिद्ध शबनम बॅग मला दिसली नव्हती.
" म्हणजे तू हल्ली कागद पेन वापरणे सोडून दिलेस तर....!! असा अचानक कोणता साक्षात्कार झाला तुला..?? मी कुतूहलाने विचारले .
ह्या माणसाने कथा लेखनाच्या नावाखाली किती कागद वाया घालवले असतील त्याची कल्पना फक्त मला आणि विक्रमला होती. त्या कागदाचा अर्धा फायनान्सर तर विक्रमच होता.
"मी हल्ली कागद वापरणे सोडून दिले भाऊ.."संतोष गंभीरपणे म्हणाला .
"फक्त कागद ...?? कथा नाही .."?? मी चिडून विचारले.पण त्याचा चेहरा पाहून गप बसलो.
"तुला माहितीय आपण आतापर्यंत किती रिम कागद वापरले असतील .…?? त्याने प्रश्न केला . 
"मी तुझ्यापेक्षा नक्कीच कमी वापरले आहेत..." मी मान उंचावून सांगितले .
" मान्य.. तुला माहितीय भाऊ एक झाड आपल्याला सतरा रिम कागद देते आणि एका रिममध्ये साधारण पाचशे कागद असतात...विचार कर भाऊ आपण आतापर्यंत किती झाडांची हत्या केलीय...." दिघे गंभीर होऊन म्हणाला .
"च्यायला ...मी हा विचारच केला नव्हता. दिघ्याला नक्कीच कोणतरी गुरू भेटलाय.
"काय झाले संतोष .."?? मी गंभीरपणे विचारले .
"काही महिन्यांपूर्वी ट्रेनमध्ये एक गृहस्थ भेटले . कणकवलीत एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहेत ते . माणूस हुशार .माझे पेपरवर चाललेले चाळे पाहून अस्वस्थ होत होते. शेवटी ते चिडलेच आणि हेच प्रश्न मला विचारले. माझे ही तुझ्यासारखेच झाले.मग त्याने ही थियरी सांगितली आणि मी गप्पच झालो. आपल्याला मिळणाऱ्या शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती ही झाडांकडून होते.आपल्याला ऑक्सिजनची किती गरज आहे ते करोनाने दाखवुनच दिलेय. मी आजारी असताना तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरसाठी किती धावपळ केलीत ते वहिनीने सांगितलंय मला.एका माणसाला रोज 550 लिटर ऑक्सिजन लागतो .एक पूर्ण वाढ झालेले झाड दोनजणांना आयुष्यभर पुरेल इतका ऑक्सिजन देते .पण ते झाड कोणी लावलेले असते .…?? आपण किती झाडे लावतो...? आपण झाडे लावत नाही मग आपल्या पुढच्या पिढीला कोण ऑक्सिजन देईल...?? मी त्यांचे बोलणे ऐकून हादरलो. खरेच किती विचार न करता वागतो आपण . असे कागद वापरून किती झाडांची हत्या केली असेंन मी ..किती लोकांचा श्वास हिरावून घेतला असेल . मी त्यांची माफी मागितली  आणि झाडे लावून ती जगविण्यासाठी काही उपाय आहे का ते विचारले .."
"मग .."?? आता माझीही उत्सुकता वाढली 
" त्यांनी सांगितले तू फक्त माझ्या जमिनीत एक झाड लाव.आणि वर्षाला एक ठराविक रक्कम दे .ते झाड मी जगविन . त्या झाडाला तुझे नाव देईन संतोष दिघेचा श्वास . तू कधीही ये त्या झाडाखाली बस सेल्फी काढ त्या झाडाला जितकी फळे /फुले लागतील  ती सर्व तुझी. तू सर्व घेऊन जा .मला फक्त ते झाड जगविण्यासाठी नाममात्र पैसे देत जा .त्या झाडावर तुझी आणि तुझ्या कुटुंबाची मालकी असेल . फक्त दोन झाडे लाव आणि आपल्या कुटुंबाचा श्वास निश्चित कर ...भाऊ मला ती कल्पना आवडली. अरे त्यांनी जी रक्कम सांगितली ती त्या कार्याच्या बदल्यात काहीच नव्हती.मग मी चिकुचे झाड लावले .आज पहिल्यांदा त्या झाडाला फळे लागली.ते घेऊनच मी पहिला तुझ्याकडे आलो.आणि हो मी हल्ली मोबाईलवरच टाईप करतो त्यामुळे कागद वाचतात  आणि माझ्या झाडांमुळे कमीतकमी दोन जणांना ऑक्सिजन मिळतोय याची जाणीव ही सतत होत असते..….हळवा होत दिघे म्हणाला.
"वा संतोष ....आज तू मलाही नवीन दृष्टी दिलीस.चल मी ही तुझ्या मित्राकडे जाऊन माझ्या आवडीचे एक झाड लावतो .पर्यावरणाची चर्चा करण्यापेक्षा पर्यवरणात वाढ कशी होईल याकडे लक्ष देऊ ..".मी संतोष दिघेला सलाम करीत म्हणालो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, August 29, 2021

कालचक्राचे रक्षक....अश्विन सांघी

कालचक्राचे रक्षक....अश्विन सांघी
अनुवाद....आरती देशपांडे
एका प्रकाशन 
गेल्या वर्षभरात जगातील प्रमुख नेत्यांच्या हत्या होत होत्या. त्यात ब्रिटिश परराष्ट्र सचिव ,जर्मन चॅन्सलर, अमेरिकेचे अटर्नि जनरल,जपानचे पंतप्रधान यांचा समावेश होता .त्या चारही घटनांमध्ये मारेकऱ्यांनी कोणतीही सुरक्षा यंत्रणा भेदली नव्हती. त्यांच्या अंगावर कोणतीही जखमेची खूण नव्हती. त्यांच्या पोटात ही काही सापडले नव्हते . पण त्यांचा मृत्यू एकाच पद्धतीने झाला होता.अंगाला खाज सुटणे,चेहरा सुजणे . घाम येणे.शेवटी सापाच्या विषाने मृत्यू.त्यांच्यात दुसरा एक समान दुवा होता ..ते उदारमतवादी होते. मुस्लिम समुदायाविषयी त्यांच्या मनात सॉफ्टकॉर्नर होता.
माईलेशियन लॅबने विजय सुंदरमला नोकरीची ऑफर दिली. विजयने दिल्ली आयआयटी मधून पीएचडी केली होती. माईलेशियन लॅब ही  प्युयर सायन्स क्षेत्रात गुप्त संशोधन करणारी कंपनी होती. तिचा प्रमुख प्रकल्प उत्तराखंड मध्ये आहे.हजार एकरच्या प्रकल्पात पन्नास एकरवर  इमारत आणि प्रयोगशाळा होती तर बाकीचे घनदाट जंगल होते.विजयने क्वांटम थियरीवर पीएचडी केली होती. त्याच्या संशोधनाचा फायदा लॅबला होणार होता.माईलेशियन लॅब अतिशय गुप्तता पाळणारी कंपनी आहे. तिथे केवळ दहा संशोधक आणि पंचवीस कर्मचारी काम करतात..तिथे काम करणारी व्यक्ती बाहेरच्या जगाशी संपर्क साधू शकत नाही .तिथे अतिशय अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असून प्रत्येकावर पाळत ठेवली जाते.
आयजी 4 ही चीन रशिया भारत अमेरिका या देशातील गुप्तचर प्रमुखांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संस्था आहे .यात फक्त चारच देशाचे प्रमुख गुप्तहेर अधिकारी आहेत. जगातील प्रमुख नेत्यांच्या हत्येमागे माईलेशियन लॅबचा हात आहे असा त्यांना संशय आहे.त्यानी विजयला माईलेशियन लॅबमध्ये नोकरी स्वीकारण्यास भाग पाडले .
अबू अहमद अल-मफराकी हा कट्टर मुस्लिमवादाचा पुरस्कर्ता. त्यानेच जगातील प्रमुख देशात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत . अमेरिकेने त्याच्यावर पाच कोटी डॉलरचे बक्षीस लावले आहे .
आता विजयला त्या अभेद्य सुरक्षा यंत्रणेचा भेद करून खरा प्रकार समजून घ्यायचा आहे . असे कोणते संशोधन करतात ज्याचा संबंध प्रमुख राजकीय नेत्यांच्या हत्येशी आहे...??  कोणते देश आणि कोण व्यक्ती यात सामील आहेत...?? जगातील काही देशात अचानक भूकंप का होतात...?? हवामानात कोणतेही बदल नसताना रस्ते का खचतात.…?? बुद्धांनी कलचक्राचे कोणते रहस्य सांगितले आहे ..?? आणि आता ते रहस्य कोण वापरते आहे ...?? स्वामी ब्रम्हांनंद कोण आहेत...?? त्यांचे खरे वय किती आहे ..?? अध्यात्म आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध ते कसे जोडतात ....?? या प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास हे पुस्तक वाचायलाच हवे.
अश्विन सांघी पौराणिक घटना ,इतिहास आणि वर्तमान काळ यांचा सुंदर मिलाफ आपल्याला रंजकपणे समजावतात. हिंदू ,मुस्लिम,बौद्ध धर्माचा त्यांनी प्रचंड अभ्यास केलाय हे  लिखाणात दिसून येतो. त्याचसोबत त्यांनी या सर्वांना विज्ञानाची जोड दिली आहे .

Wednesday, August 25, 2021

सिंडिकेट... निरंजन ओक

सिंडिकेट... निरंजन ओक
पनवेल लॉकअपमध्ये कमला या तरुणीलाअटक करून आणले होते.वेश्या व्यवसाय करण्याचा तिच्यावर गुन्हा होता. पण ती ओरडून सांगत होती की ते आरोप खोटे आहेत. शेजारच्या कोठडीत येडा भास्कर या कुप्रसिद्ध गँगस्टरला ठेवले होते.ठाण्याचे इंनचार्ज राणे एक भ्रष्टाचारी ऑफिसर होते.त्यांनी कोठडीत येडा भास्कर चा एन्काऊंटर केला.आणि नंतर त्याने कमलावर अत्याचार केले. ती मृत आहे असे समजून तिचा देह फेकून दिला पण ती बचावली पण त्यानंतर तिला आपला नवरा गमवावा लागला . पुढे ती ठाण्यात एका अनाथाश्रमात राहू लागली. पण दोन वर्षांनी पुन्हा ती राणेंच्या नजरेत आली..आता पुढे काय ....??
मुंबई गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या क्राईम सिंडिकेटमध्ये अडकली होती.गुन्हेगारीचे प्रमाण अचानक वाढले होते.यामागे कोण आहे याचा तपास लागत नव्हता म्हणून मुख्यमंत्र्यांनी इन्स्पेक्टर सावंत याना मुंबईत बोलावून घेतले होते.मुंबईतून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करायची जबाबदारी सावंतवर होती.
अब्दुल कसाई मुंबईच्या गुन्हेगारीतील राजा होता. पण त्याच्याविरुद्ध एकही पुरावा पोलिसांकडे नव्हता. तोच सिंडिकेट चालवतो असा संशय होता.येडा भास्कर हाच अब्दुल कसाईचा माणूस होता.
कमला येडा भास्करच्या एन्काऊंटरची आय विटनेस होती. इन्स्पेक्टर राणे तिला शोधतील का ??? आता कमला त्यांना कशी सामोरी जाईल.इन्स्पेक्टर सावंत मुंबईला अब्दुल कसाईच्या जाळ्यातून मुक्त करतील का ...??
एक सरळ क्राईम स्टोरी

Sunday, August 15, 2021

बहिर्जी ..स्वराज्याचा तिसरा डोळा

बहिर्जी ..स्वराज्याचा तिसरा डोळा
लेखक.ईश्वर त्रिंबकराव आगम
शिवरायांच्या अनेक शिलेदारांविषयी आपण वाचले आहे. त्यांचा पराक्रम अनेक मालिकेतून.. चित्रपटातून पाहीला आहे. बहिर्जी नाईक हे नाव आपण नेहमी ऐकतो. महाराजांचा अतिशय विश्वासू साथीदार .लहानपणापासूनच सोबती. गुप्तहेरखात्याचा प्रमुख.
महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत त्याने प्रमुख भूमिका बजावली होती. पण या शिलेदारांविषयी फारच कमी बोलले जाते. त्याचा विस्तृत पराक्रम कोणालाच माहीत नाही. इतिहासात त्याच्याविषयी फारच कमी लिहिले गेले आहे . कदाचित हेच त्याचे जातिवंत गुप्तहेर असण्याचे लक्षण असावे.
अश्या बहिर्जी नाईकची माहिती लेखकाने या पुस्तकात आपली कल्पनाशक्ती वापरून लिहिली आहे. हे पुस्तक दोन भागात लिहिणार असल्याचे लेखक स्पष्ट करतो . त्यातील हा पहिला भाग.
यात आपल्याला बहिर्जी नाईकचे बालपण कळते. त्याचा स्वभाव ,त्याचे मित्र. याची माहिती मिळते.
बहिर्जी  जाधव रामोशी जातीतला. अतिशय हुशार चपळ आणि काटक . त्याची निरीक्षणशक्ती अफाट होती. तो उत्कृष्ट नकलाकार होता .
शिवाजी महाराजांनी शेताची नासाडी करणाऱ्या रानडुक्कर...लांडगे... मारणार्यांना सोन्याचे कडे इनाम म्हणून देण्याचे जाहीर केले.तेव्हा बहिर्जी आणि त्याच्या मित्राने अतिशय कौशल्याने चार पाच रानडुकरे आणि दोन लांडगे मारून जिजाबाईंकडून इनाम घेतले आणि नंतर आपल्या निरीक्षणशक्तीची कमाल शिवाजी महाराजांना दाखवली . त्यांनी खूष होऊन बहिर्जीला आपल्या मित्रमंडळीत सामील करून घेतले .तेव्हापासून त्याने स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेत मोलाचे योगदान दिले.
पुस्तक छान आहे पण बहिर्जी नाईकांच्या कामगिरीची विस्तृत माहिती मिळत नाही .

Friday, August 13, 2021

दि रोझाबल लाइन... अश्विन सांघी

दि रोझाबल लाइन... अश्विन सांघी
अनुवाद…..संकेत दि. लाड
वेस्टलँड पब्लिकेशन लिमिटेड 
श्रीनगर ,काश्मीर 2012
जुन्या श्रीनगर मधील कान्यार जिल्ह्यात असलेल्या रोझाबल कबरीमध्ये युझ असफ नावाच्या इसमाचे शव असल्याची माहिती त्या माहिती फलकावर होती. स्थानिक कागदपत्रात ही कबर इसवी सन ११२ पासून असल्याचे दाखले होते. रोझाबलचा अर्थ प्रेषितांची कबर असा होतो. ज्यू प्रथेनुसार युझ असफची शवपेटी पूर्व पश्चिम अक्षांवर ठेवलेली होती.शवपेटीजवळच असफच्या पावलांचे ठसे होते.त्यावर काही खुणा होत्या.क्रुसावर चढविताना ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांच्या त्या खुणा असाव्यात.असे वाटते की असफला क्रुसावर चढवून ठार मारले होते.संपूर्ण आशियात अशी पद्धत कधीच वापरली गेली नव्हती.कदाचित असफला दूरच्या देशातून इथे आणले असावे.
मक्का सौदी अरेबिया 2012
गालिबने दुसऱ्यांदा मक्केला आला होता. दोन्ही वेळा त्याने सर्व विधी पूर्ण केले होते. लष्कर- ए-तोयबा अर्थात पवित्रांचे सैन्य नावाची संघटना काश्मीरमध्ये जिहाद लढत होती.जगभरातील गुप्तचर संघटना यावर लक्ष ठेवून होत्या .पण त्यांना माहीत नसलेली एक गोष्ट लष्करकडे होती.त्यांनी एक अंतर्गत अतिविशिष्ट गट निर्माण केला होता .लष्कर-ए-तलतशार नावाचा हा गट म्हणजे फक्त तेरा जणांचे सैन्य होते. गालिब या गटाचा नेता होता.
येशू ख्रिस्ताचेही बारा अनुयायी होते आणि येशू त्यांचा नेता होता.
लंडन 2012
लंडन विद्यापीठाच्या ग्रंथालयात बार्बरा पॉलसन भगवतगीता  ग्रंथ शोधत होती.प्राध्यापक टेरी ऍक्टन याना तो हवा होता.नेहमीच्या जागेवर त्या पुस्तकाच्या जागी एक खोके ठेवले होते. आश्चर्यचकित होऊन तिने ते खोके उघडले तेव्हा त्यात प्राध्यापक टेरी ऍक्टनचे शीर होते .
वझिरीस्थान अफगाणिस्थान 2012
त्या डोंगराळ प्रदेशातील एका गुहेत सुंदर गालिच्यावर तो बसला होता. सफेद पगडी,पांढरी लांब दाढी,लष्करी जॅकेट आणि चालताना आधारासाठी वेताची  छडी असा त्याचा अवतार . त्याचे बोलणे सौम्य होते. वर्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी त्याच्या संघटनेने स्वीकारली होती. आता त्याही पेक्षा भयानक योजना त्याच्या डोक्यात आकार घेत होती. ती योजना अविश्वसनीय आणि भयंकर होती. त्या व्यक्तीचे नाव होते ओसामा बीन लादेन .
व्हॅटिकन सिटीतील अल्बर्टो कार्डिनल व्हॅलेरिओ यांच्या सुचनेनुसार ओडिपस ट्रस्ट मधून  इझाबेल मडोना ट्रस्टमध्ये एक कोटी डॉलर ट्रान्सफर केले गेले. इझाबेल ट्रस्टचा प्रमुख लाभधारक होता ओसामा बीन लादेन
2012 तील प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला जगातील वेगवेगळ्या शहरात भयानक दहशदवादी हल्ले झाले . हे हल्ले जैविक ,रासायनिक, स्वरूपाचे होते . याहून ही मोठा हल्ला 21 डिसेंबर ला होणार होता . त्यासाठी लागणारा अणुबॉम्ब गालिबच्या नेतृवाखाली प्रवास विविध देशांच्या सीमा ओलांडून प्रवास करत होता .
लेखकाने या पुस्तकात अनेक पात्रे निर्माण केली आहे. हे पुस्तक आपल्याला विविध देशात आणि विविध काळात घेऊन जाते . येशूच्या क्रुसावर चढविण्याच्या प्रसंगाचे वर्णन करते. इसवीसन 12 ते 2012 या कालखंडात ही कादंबरी फिरते.येशू पुनर्जन्मानंतर भारतात आला आणि त्याची वंशावळी आजही अस्तित्वात आहे याचा शोध काहीजण घेत आहेत.
सुरवातीपासूनच कादंबरी वेगवेगळ्या प्रसंगात विखुरली जाते मग ती हळू हळू एका तुकड्यात एकत्र होत जाते. शेवट च्या काही पानांमध्ये कादंबरीची कथा स्पष्ट होते सर्व शंकांचे निरसन होते . पण तो पर्यंत आपण श्वास रोखून ,उत्कंठा मनात ठेवून वाचत जातो.

Friday, August 6, 2021

अघटित.... संदीप दांडेकर

अघटित.... संदीप दांडेकर 
राफ्टर पब्लिकेशन 
हा एक गूढकथा ,रहस्यकथा संग्रह आहे .काही कथा अस्वस्थ करणाऱ्या आहेत.
विहीर या कथेत  सतेंद्र हा जिल्हाधिकारी विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. माझा मुलगा जिवंत आहे का ...?? असे रोज विचारणारा बाप एके दिवशी माझा मुलगा मेला का असे विचारतो आणि त्यामागची कारणे ऐकून सतेंद्र सुन्न होतो.
रक्षण या कथेत दोन वाघांची झुंज आहे .त्यांचा संबंध निलेशशी आहे. हे वाघ ज्या गावात आहेत त्या गावातच निलेशचा जन्म झाला होता.पण निलेशला गावविषयी आत्मीयता नाही .योगायोगाने तो पुन्हा गावात आला आणि एक वाघ त्याच्या स्वप्नात आला. नंतर त्या वाघाने निलेश वर हल्ला केला पण अचानक दुसऱ्या वाघाने त्याचे प्राण वाचविले .
लिव्ह इन ही एक वेगळी कथा आहे . गैरसमजातून शत्रू बनलेले दोन मित्र आयुष्यातील उत्तरार्धात एकत्र येतात अशी थोडी वेगळी कथा .
समय नावाची विज्ञानकथा भविष्यकाळातील अंतराळ वसाहतीतील एक मानव भूतकाळात जातो आणि त्याचे परिणाम काय होतात यावर आहे . कथा थोडी किचकट आहे .
खोली ही गूढकथा . अनेक वर्षे बंद असलेल्या वाड्याच्या एका खोलीत प्रवेश केल्यावर काय घडते...?? त्यातून कोणती रहस्य बाहेर येतात ..??
मिती नावाच्या विज्ञानकथेत अजिंक्य गुप्ते हा अंतराळवीर अभिनेत्री दीपिकाला पत्र लिहून आपले अंतराळातील अनुभव सांगतो .
अश्या अजून कथा आहेत. प्रत्येक कथा नाविन्यपूर्ण आहेत .

Wednesday, August 4, 2021

रहस्य सांकेतिक चिन्हांचे ....सुनील वाईकर

रहस्य सांकेतिक चिन्हांचे ....सुनील वाईकर 
Amazon. in
विक्रमगढ हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटे गाव. पूर्वी ते संस्थान होते. पण स्वातंत्र्यानंतर देशात विलीन झाले .व्यंकटराव देसाई हे त्या संस्थानचे वंशज .तीनशे वर्षांपूर्वीचा आपला जुना वाडा सोडून आता ते दुसरीकडे राहतात . जुन्या वाड्याविषयी काही दंतकथा गावात पसरलेल्या आहेत.व्यंकटरावांची आजी अचानक त्या वाड्यातून नाहीशी झाली. म्हणूनच तो वाडा सोडून सर्व दुसरीकडे राहायला आले.
त्या वाड्यात एक आरसा होता. त्यावर अनेक चिन्ह कोरली होती. त्या चिन्हांचे रहस्य आणि अर्थ कोणालाच माहीत नव्हता आणि त्या वाड्यात गेलेला पुन्हा परत येत नव्हता म्हणून कोणीही त्या वाड्यात फिरकत नव्हते.
व्यंकटरावाना दोन मुले दोन मुली नातवंडे असा भला मोठा परिवार होता . दर दिवाळी आणि उन्हाळ्यात सर्व परिवार एकत्र येत होता. 
यावेळी मुलांनी कुतूहल म्हणून वाड्यात प्रवेश केला .आरश्यातील चिन्हांचे त्यांना आकर्षण वाटले आणि त्यांनी त्या चिन्हांचा अभ्यास करण्याचे ठरविले. पण तो प्रवास धोकादायक होता. यात काहीजणांच्या जीवावर  बेतणार हे नक्की होते.
पण काय आहे त्या आरश्यावरील चिन्हांचे अर्थ आणि त्यातून काय उलगडणार आहे ...?? 
एक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी कादंबरी.
कादंबरी छोटी आणि आटोपशीर आहे. धक्कादायक वळणे नाहीत. त्यामुळे फार धक्के बसत नाहीत .

Saturday, July 31, 2021

मिशन वारी….अमोल पोतनीस

मिशन वारी….अमोल पोतनीस 
आषाढातील महत्वाचा सण म्हणजे एकादशी.लाखो भक्त माऊलीचे नाव घेत वारीत चालतात .अतिशय सुनियोजित योजनाबद्ध अशी वारीची आखणी असते. यात प्रवासाचे वेगवेगळे टप्पे असतात .सर्व वारकऱ्यांच्या मुखी फक्त माऊलीचा जप असतो. सर्वाना त्या वारीत सुरक्षितता वाटत असते . पण यावेळच्या वारीत काहीतरी भयंकार घडणार असा सुगावा स्पेशल इन्व्हेस्टीगेशन ब्युरोला लागला आणि त्याचा छडा लावण्याची जबाबदारी त्यांनी कॅप्टन आकाश सुमंतवर टाकली.
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मोठा टप्पा म्हणजे पुणे ते सासवड हा साधारण बत्तीस किलोमीटरचा प्रवास.त्यात चार किलोमीटरचा घाट . हा घाटमाथा लाखो वारकर्यांनी फुलून गेलेला असतो. या टप्प्यातच काहीतरी घडणार अशी खबर आकाशला मिळाली.
काय घडणार होते त्या वारीत....?? लाखो लोकांच्या जीवावर बेतणारा कट कॅप्टन आकाश आणि त्याचे सहकारी उधळून लावतील का ....?? कशा शोध घेणार ते ....?? 
हे सर्व कळण्यासाठी मिशन वारी वाचायला हवे.
लेखकाला साहसकथेची आवड कै. सुहास शिरवरकरांमुळे लागली आणि म्हणून हे पुस्तक त्यांना अर्पण केले आहे.

Wednesday, July 28, 2021

बुब्स... नजर... आणि इतर काही

बुब्स... नजर... आणि इतर काही 
डेपोत उभ्या असलेल्या एसी बसमध्ये ती शिरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
मोजक्याच सीट्स असलेली ती बस आता भरलेली होती. म्हणजे सगळ्या सीट्सवर प्रवासी बसलेले होते.ती एका खांबाचा आधार घेऊन उभी राहिली.
स्त्रियांसाठी राखीव म्हणून दोनतीन सीट होत्या.पण सध्याच्या काळात ते नियम कोण पाळत नव्हतेच.प्रवास करायला मिळतोय हेच पुरेसे....मोठ्या कष्टाने बसमध्ये जागा मिळते. ती उभ्या स्त्रीला कोण देईल ...?? बरे ती नुसती स्त्री नव्हती तर तरुण स्त्री होती. अंगावरचा तिचा कुर्ता नेमक्या जागी फिट बसला होता आणि त्यामुळे छाती एकदम उठावदार दिसत होती .गळ्यात एक बारीक चेन.कानात ब्लूटूथ इयर फोन आणि त्याची रिंग गळ्यात अडकवलेली होती .ब्लॅक टाईट लॅगिंगमुळे कंबरेखालील शरीरही भरीव दिसत होते. छातीच्या मानाने बाकी शरीर सूट होत नव्हते.पण  पाहणाऱ्याचे पाहिले लक्ष छातीकडेच जात होते.
ती खांबाला टेकून उभी राहिली आणि पर्समधून मोबाईल काढला . तिला पाहताच जवळच्या सीटवर बसलेल्या एका स्त्रीने उगाचच आपली ओढणी नीट केली. दुसरीने शेजारी बसलेल्या आपल्या नवऱ्याच्या कुशीत कोपर्याने ढोसले.बसमधील सगळे प्रवासी नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होते.
ती दिसायला काही देखणी नव्हती पण मानेखालचे शरीर नजरेत भरण्यासारखे होते. तसेही हल्ली तोंडावरच्या मास्कमुळे अर्धा चेहरा झाकूनच जातो म्हणा.त्यामुळे नजर उरलेल्या अंगावरूनच फिरते.
"पिच चांगले आहे.बॉलिंग करायला मजा येईल...."माझा शेजारी स्वतःशी पुटपुटला.
"बॅटिंग कधी करणार ..."?? मीही तिरकसपणे विचारले. 
"अश्या पिचवर बॅटिंग नाही मिळाली तरी चालेल. फक्त बॉलिंग करू ...."तो हसत म्हणाला.मी काही न बोलता मोबाईलमध्ये डोके घातले .
पुढच्या स्टॉपवर अजून एक स्त्री बसमध्ये चढली.अगदी लूज असलेला सलवार तिने अंगावर चढवला होता.छाती अतिशय सरळ दिसत होती . तिचीही नजर पहिलीच्या छातीकडे गेली. एक क्षणभर असूयेची चमक तिच्या नजरेत आली. आपल्याकडे कोणाचेही लक्ष नाही पाहून थोडे हायसे वाटले . पण अधूनमधून प्रवासात तीही तिच्या छातीवर नजर मारून घेत होती.
मध्येच एक प्रवासी उठला आणि त्याच्या जागेकडे ती सरकली.तिला क्रॉस करताना त्याचा हात नक्कीच तिच्या छातीकडे सरकलेला सर्वाना दिसला. ती रिकाम्या सीटवर बसताच उभे असलेले प्रवासी तिच्या शेजारी उभे राहिले . काहीजण शर्थीचे आपली नजर तिच्या कुर्त्यातून खोलवर भेदण्याचा प्रयत्न करू लागले .
संध्याकाळी 
ती ऑफिसमधून घरी आली. कालच ऑनलाइनवरून मागावलेला कुर्ता आज घालून गेली होती.छातीवर जरा जास्तच फिट बसला होता . संपूर्ण प्रवासात आणि ऑफिसमध्ये सगळे तिच्या छातीकडेच चोरून पाहत होते. तिलाही ते जाणवत होते पण काहीही घाला हल्ली मास्कमुळे लोक चेहऱ्याकडे न बघता खालीच बघतात .स्त्रीकडे बघण्याची वृत्ती बदलणार नाहीच .तिने कपडे काढले . छातीवरची  डबल पॅडची ब्रेसीयर काढून बाजूला ठेवली . आपल्या छोट्याश्या उभारावरून हात फिरवीत स्वतःशी हसली आणि गाऊन चढवून बाथरूममध्ये शिरली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

बियॉण्ड सेक्स ... सोनल गोडबोले

बियॉण्ड सेक्स ... सोनल गोडबोले 
चेतक बुक्स 
चाळीशीनंतर पुनर्जन्म होतो का ...?? एक नवीन आयुष्य खुणावते का ...? काहीतरी नवीन हवेसे वाटते ..? जोडीदाराच्या स्पर्शाचा कंटाळा येऊ लागतो का ..?? संसारातील बहुतांशी जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर रितेपणा जाणवतो का ...?? अश्यावेळी कोण अनोळखी आयुष्यात आला तर काय होईल ..?? समाज काय म्हणेल..?? घरचे काय म्हणतील...?? 
नेमक्या याच गोष्टी लेखिकेने सरळ साध्या लिखाणात मांडल्या आहेत . सोशल मीडियाचा आयुष्यावर होणारा परिणाम कधी चांगला असू शकतो तर कधी वाईट.
मीरा ही कथेची नायिका . तिचा प्रेमविवाह. आता ती चाळीस वर्षाची आहे.स्वतःला जीम योगा करून फिट ठेवलंय. अत्याधुनिक राहणीची आवड. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह. ती कविता करते. मैत्रिणीमध्ये फेमस.  रोज नवीन फोटो अपलोड करत असते.तिचा नवरा समीर ..इंजिनिअर आणि मोठ्या कंपनीत मॅनेजर. दोन मुले .एकूण काय... तर आर्थिक किंवा इतर जबाबदारी नाही .तरी तिला आता शारीरिक संबंधामध्ये स्पर्शामध्ये तोचतोचपणा जाणवू लागलाय .तिची कामेच्छा जास्त आहे हे तीच मान्य करतेय. मोबाईलमधून भरपूर साहित्य मिळतेय. तिच्या स्वप्नात परपुरुष आहेच. पण तरीही नवऱ्यावर आत्यंतिक प्रेम आहे .
शेवटी फेसबुकवरून तिची एका पुरुषाशी मैत्री होतेच .जस बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत होते तसेच तिच्या बाबतीत ही होते. प्रथम हाय..गुड मॉर्निंग...जेवण झाले का.. ?? मग सौंदर्याची तारीफ,कवितेची स्तुती नंतर व्हाट्स अप चॅटिंग.असे होत तो तिला भेटतो . मग भेटीगाठी वाढू लागतात . एक चांगला मित्र म्हणून तो तिच्या मनात आपली प्रतिमा तयार करतो . पण पुढे काय ..…?? ही निखळ मैत्रीचं राहील का ...?? दोघांचे साथीदार त्यांची मैत्री स्वीकारतील का ...?? त्यांची मैत्री कुठल्या थरापर्यंत जाईल ...?? यासाठी हे पुस्तक वाचायला हवेच.
हे पुस्तक वाचताना सोशल मीडियावर कशी मैत्री होते याचा सत्य अनुभव येतो. नायिकेशी मैत्री जुळण्याची पद्धत ही बऱ्याचजणांच्या ओळखीची आहे .

Sunday, July 25, 2021

महाभारताचे रहस्य

महाभारताचे  रहस्य... क्रिस्टोफर सी. डॉयल 
अनुवाद...मीना शेटे संभू
ख्रि. पू. २४४ ... 
त्या गर्द वनात लपलेल्या गुहेत सम्राट अशोक आपला सेनापती शूरसेनसोबत उभा होता. तिथे काय दिसणार आहे याची शूरसेनने आधीच कल्पना दिली होती. तरीही त्याला त्या गोष्टी पाहून भयानक धक्का बसला होता . समोर दिसणाऱ्या गोष्टी महाभारताशी संबंधित होत्या. गुहेतील रहस्य बाहेर पडले तर जगाचा विनाश निश्चित होता.आता हे रहस्य जगासमोर कधीच येऊ नये याची जबाबदारी सम्राट अशोकवर होती .
महाभारताच्या एका प्रकरणात या रहस्याची पाळेमुळे होती आधी ते प्रकरण महाभारतातून काढायला हवे पण त्याच बरोबर भविष्यात या रहस्याचे रक्षणही करायला हवे याची कल्पना सम्राट अशोकला होती. त्यासाठी त्याने आपल्या नऊ सरदारांची नेमणूक केली . आता भविष्यात त्या सरदार आणि त्यांच्या वारसांकडून रहस्याचे रक्षण होणार होते .
सन ५०० 
 राजवीरगडमध्ये कोणाला तरी ते पुस्तक सापडले होते आणि आता ते पालाच्या मागे लागले होते. अश्यावेळी काय करायचे ते पालाला पक्के माहीत होते.शेवटी तो त्या रहस्याचा राखणदार होता.वायव्येच्या बामियान राज्यात तो जाणार होता आणि दुसऱ्या राखणदाराच्या हाती आपल्याकडील रहस्य सोपविणार होता.
मार्च २००१ 
तालिबान्यांनी बामियानमधील प्राचीन बुद्धाच्या मूर्ती नष्ट केल्या पण त्यामागील गुहेत एक मानवी सांगाडा सापडला जो दीड हजार वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज होता.
आता
जोनगडच्या किल्ल्यात  प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ विक्रमसिंह राहायला आलेत.त्यांच्याकडे अशी काही गोष्ट आहे जी काही दहशतवादी संघटनांना हवी आहे . त्या गोष्टीसाठी अनेकांचे खून झालेत.आताही विक्रमसिंहाचा जीव धोक्यात आहे. त्यांच्या किल्ल्यातील अत्याधुनिक  सुरक्षा यंत्रणा तोडून काही प्रशिक्षित मारेकऱ्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. पण मरणापूर्वी त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या  विजयसिह या आपल्या पुतण्याला काही इ मेल करून रहस्याचे रक्षण करण्यासाठी काही संकेत दिलेत.
विजयसिह आपल्या मित्रासह भारतात येतो पण विमानतळापासूनच त्याच्यामागे काही माणसे लागतात . ही माणसे लष्कर ए तोयबाचे दहशतवादी आहेत. त्यांना विजयसिहकडून त्या रहस्याचा शोध घ्यायचा आहे आणि त्यातूनच  जगभरात भयानक हल्ले करायचे आहे .
विजय आणि त्याचा मित्र या रहस्याचा शोध घेतील का ..?? कुठपर्यंत त्यांना हे रहस्य घेऊन जाणार आहे ..?? ते नऊजण अजूनही त्या रहस्याचे रक्षण करतायत का ...?? सम्राट अशोकाने भारतभर त्या रहस्याचे संकेत दडवून ठेवले आहेत .
एक थरारक.... क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी कादंबरी .

Monday, July 19, 2021

कॅप्टन ब्लड... राफेल सबातिनी

कॅप्टन ब्लड... राफेल सबातिनी
अनुवाद .....अमित पंडित 
चेतक बुक्स 
ही सतराव्या शतकात समुद्री चाचेगिरीची काल्पनिक कथा .इंग्लड आणि वेस्ट इंडिज बेटांच्या सागरी वसाहतीत ही कथा घडते. कॅप्टन ब्लड हा खरा एक कुशल डॉक्टर . सॉमरसेट परगण्यातील ब्रिजवॉटर शहरात तो डॉक्टरकीचा व्यवसाय करतो. 
त्याच्या शहरात इंग्लंडचा  राजा दुसरा जेम्स याच्याविरुद्ध बंड चालू होते.त्या बंडाचा नेता जखमी होतो . त्याच्यावर उपचार करण्यासाठी ब्लड त्याच्या घरी जातो आणि राजाच्या सैन्याचा बंदी बनतो. पुढे त्याला तीन महिन्यांच्या बंदीवास होतो आणि नंतर वेस्ट इंडिज बेटांवर गुलाम म्हणून विकले जाते . 
वेस्ट इंडिज बेटांवर स्पेन सैनिक हल्ला करतात त्यात ब्लड निसटतो आणि एक जहाज ताब्यात घेऊन कॅप्टन ब्लड बनतो. आणि चाचेगिरी सुरू करतो . खरे तर त्याला हा मार्ग पसंद नसतो पण आपल्या साथीदारांच्या पोटासाठी त्याला हे करावे लागते . 
पुढे काय होते...?? कॅप्टन ब्लड पुन्हा आपल्या डॉक्टरी पेशाकडे वळून चांगल्या आयुष्याची सुरवात करेल का...??

Friday, July 16, 2021

कलि ..एक शोध .…भाग 2...विनय राजेंद्र डोळसे

कलि ..एक शोध .…भाग 2...विनय राजेंद्र डोळसे
कलि या पुस्तकाचा दुसरा भाग. कलिची युधिष्ठिराने सुटका केल्यानंतर काय घडते ते यात आहे.
 ब्रम्हदेवाच्या योजनेनुसार कलिचा जन्म झाला आणि त्याचा पिता कोण हे ही कळले. जसजसे वय वाढत गेले तसतश्या कलीच्या शक्ती वाढत गेल्या.आपल्या पित्याचा शोध घेण्यासाठी त्याने देवलोकांवर हल्ला करायचे ठरविले.
कलिच्या शक्तीला सर्व देव घाबरून असत.यात देवांची निंदा केली आहे. ब्रम्हा ,विष्णू अतिशय स्वार्थी स्वतःचे हित पाहणारे.. तर महादेव अतिशय भोळा . कलिविरुद्ध लढण्यासाठी  देवानी प्रथम दानवाना  पाठविले गेले. कलिने त्यांचा सहज पराभव केला.
सर्व देवांचा पराभव करून कलिने त्यांच्यावर पंचवीस अटी लादल्या. त्यानंतर कलिच्या पित्याला एक मोठे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर जायचे होते त्यासाठी त्याने कलिची परवानगी मागितली.
सुमेधा कलिचा पिता. त्याला पृथ्वीवर नवा धर्म स्थापन करायचा होता . पुढे काय झाले ...?? कलिचा पराभव होईल का ...?? ब्रम्हा विष्णू आपल्या स्वार्थासाठी कलिचा वापर कसा करून घेतील....?? सुमेधाचे अवतार कार्य पूर्ण होईल का ...? त्याला कोणता धर्म स्थापन करायचा आहे ...?? कलिची  आणि त्याची भेट होईल का ....?? 
लेखकाने आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे एक छान कादंबरी लिहिली आहे .

Wednesday, July 14, 2021

सीरिया ..एक रक्तरंजित पट... अतुल कहाते

सीरिया ..एक रक्तरंजित पट... अतुल कहाते
सकाळ प्रकाशन 
आयसिस या इस्लामिक गटामुळे सीरिया देश चर्चेत आला . या अज्ञात असलेल्या देशाविषयी सोप्या शब्दात लेखकाने माहिती दिलीय.
सीरियाची लोकसंख्या साधारण दोन कोटी . यात बहुतांशी अरब.दमास्कस ही राजधानी.पूर्वी या मध्यपूर्व आशियाई भागावर ऑटोमन टोळ्यांचे राज्य होते. नंतर सीरिया फ्रेंचांच्या ताब्यात आला. युरोपियन देशांचे वर्चस्व अरब देशांना सहन झाले नाही आणि स्वातंत्र चळवळ सुरू झाली.
सीरियामध्ये फैझलच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र चळवळ सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर सीरिया स्वतंत्र झाला पण हुकूमशाही कायम राहिली. सीरियातील जनता नेहमीच युद्धाच्या छायेत राहिली. शेजारचा इस्त्रायल हा सीरिया आणि इतर अरब राष्ट्रांचा कट्टर शत्रू . त्याच्याविरुद्ध सततच्या युद्धात सिरियाचा विकास झालाच नाही .
अशी पुस्तके वाचल्यावर आपण किती सुखी आहोत याची जाणीव होते.

Tuesday, July 13, 2021

कलि.. एक शोध ...१…विनय राजेंद्र डोळसे

कलि.. एक शोध ...१…विनय राजेंद्र डोळसे
अठ्ठावीस युग झाल्यानंतर विश्वाचा नाश होईल असे म्हटले जाते आणि म्हणूनच देवानी कलियुग निर्माण केले.आणि त्यासाठीच कलिचा जन्म झाला .
उत्तर भारतातील चुन्ड देशाच्या प्रधानाची मुलगी कात्यायनीच्या पोटी कलिचा जन्म झाला. पण त्याचा बाप कोण हे माहीत नसल्याने त्यांना वाळीत टाकले गेले .पुढे कलिला आपल्यातील सामर्थ्याची कल्पना आली आणि चुन्डच्या राजाश्रयामुळे तो राजा बनला .आपल्या मायावी शक्तीच्या सामर्थ्याने तो अजिंक्य झाला.
आपला पिता कोण .…?? हा प्रश्न त्याला नेहमीच पडायचा. विष्णू त्याचा पाठीराखा होता. पण विष्णुही सांगू शकत नव्हता .शेवटी त्याने संतापून देवलोकावर स्वारी केली.
पुंण ऋषी आणि आलवक ऋषी कलिला रोखण्याचा प्रयत्न करत होते .विष्णूच्या सल्ल्याने त्यांनी एका महान देवाच्या केसांचा साखळदंड बनवून कलिला बांधून टाकले .
पुढे विष्णूने कृष्णाचा अवतार घेतला आणि युधिष्ठराच्या मदतीने कलिची चातुर्याने सुटका केली .
कलियुग निर्माण व्हावे हीच ब्रम्हा विष्णू महेश यांची इच्छा होती आणि त्यासाठीच त्यांनी कलिला निर्माण केले .
कलिने त्या साखळदंडातून सुटका करून घेतली .पुढे काय .....???
हा भाग पहिला आहे .