Monday, November 27, 2017

अंत्ययात्रा

कोणाचा मृत्यू झाला तर घरातील व्यक्ती  सोडून बाकी कोणालाच त्याचे फार वाईट वाटत नाही.त्यात कोणी वृद्ध वारले असतील तर घरच्यांसकट सर्वाना सुटलो......!! अशी भावना होते आणि अंत्ययात्रेचे स्वरूप एखाद्या संमेलनासारखे होते.काहीजण त्या निमित्ताने नातेवाईक भेटतील म्हणून जातात.तर काही जुने मित्र.तर काही खरोखरच अंत्यदर्शनाला जातात. पण सर्वांचा हेतू प्रामाणिक असतो . त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला आपण हजर राहावे किंवा दिवसाला तरी हजर असावे असे मनापासून वाटते . नशीब अजून ऑनलाइन अंत्ययात्रा किंवा दिवसाला हजर राहण्याची योजना कोणी शोधून काढली नाही.
हे सगळे आठवायचे कारण म्हणजे त्या दिवशी जनाआजी गेली .वय वर्षे 93 ...त्यामुळे तिच्या जाण्याचे दुःख कोणालाच नाही... प्रत्येकाने किती वाजता नेणार म्हणून वेळ विचारली आणि आपापली सोय केली . पहाटेच गेलीम्हणजे सगळ्यांना सुट्टी काढावी लागली. विक्रम ही माझ्याकडे आला तेही वडापाव घेऊन विचारले तर म्हणतो म्हातारीचे होईपर्यंत दोन वाजतील ....तो पर्यंत काय उपाशी राहायचे ??? मलाही पटले आणि दोन वडापाव खाऊन घेतले.मी म्हटले ऑफिसचे काय ?? काळजी नको आजीसाठी एक दिवस ठेवलेला.
मग तयारी करताना सगळे कसे आरामात करत होते ."इतके दिवस काढले...अजून काही तास काढले असते तर सर्व दिवस भरूनच आले असते ना ....??? कोणतरी पुटपुटला.
"म्हणजे म्हातारीने आता तुमची वेळ पाहूनच वर जायचे का.... ??? विक्रम थंडपणे म्हणाला.
कोण म्हणतो तिरडी नीट बांधा रे म्हातारी जड आहे.रस्त्यातच खाली यायची . एकाने  राहुलला विचारले "अरे इलेक्ट्रिक की लाकडावर...." राहुल म्हणाला "घरी विचारतो."
इतक्यात बंड्या म्हणाला ",इलेक्ट्रिकवर घे आजीला दोन माणसांची लाकडे लागतील.पर्यावरणाची काळजी घेऊ ". कोणीतरी मागून त्याच्या टपली मारली.
अश्यातऱ्हेने  शेवटी जनाआजीला स्मशानात घेऊन गेले . तिथेही काही लुडबुड करणारे होतेच .पण एकदा इथे आलो की आता सर्व लवकर संपेल या खात्रीनेच कोणी जास्त लक्ष देत नाही . पण जसा अग्नी दिला तेव्हा माझ्यासकट कित्येकांचे डोळे ओलावलेले पाहिले मी.निघताना मुद्दाम विक्रमला विचारले "तूच म्हणालास ना.. सुटलो..!! सर्व मग हळूच डोळे का पुसत होतास".
" माहीत नाही भाऊ.. पण इतके वर्ष समोर असणारी वेळोवेळी पाठीशी उभी राहणारी कधी हक्काने मदत मागणारी व्यक्ती यापुढे कधीच दिसणार नाही .ती आपल्यासमोर अनंतात विलीन होतेय हे पाहूनच डोळे भरून आले रे .पण मला हे अश्रू माणूस असल्याची आठवण करून देतात . दिवसभर गुरासारखे राबताना मन अजून मेले नाही आपले ,याची खात्री हे अश्रू करून देतात यातच आनंद मानू".मी हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सोसायटीत शिरलो .
© श्री. किरण बोरकर

Thursday, November 23, 2017

करार

मिनाक्षीचे लग्न ठरले आणि आमच्या घरात आनंद पसरला.जरी ती सौ.ची भाची होती तरी आम्हाला मुलीसारखी.परिस्थिती बेताची म्हणून आमचा जास्त जीव तिच्यावर.तीही कशीबशी पदवीधर झाली आणि छोट्या कंपनीत नोकरीला लागली. मुलगी सालस आणि लाघवी. कधी आवाज चढलेला पहिला नव्हता मी .
तिच्या लग्नाची बोलणी करायला आम्ही गेलो . नवऱ्याकडील परिस्थितीही बेताचीच . पण एकूण बरे दिसत होते.प्राथमिक बोलणी तर यशस्वी झाली होती.मुलांकडून फारश्या अपेक्षा दिसत नव्हत्या.लग्न साधेपणाने करायचे ठरले होते . जेवणाचा मेनू ही साधाच होत. हे मात्र मीच आग्रहाने ठरविले होते.जेवण वाया जाऊ नये हीच अपेक्षा होती.
आजही काही बोलणी करावी म्हणून आम्ही मुलाकडे गेलो . चहापाणी झाल्यावर मी थोडा वेगळाच विषय काढला." समजा उद्या मुलांच्यात आणि मुलींच्यात वितुष्ट आले तर"..?  बापरे माझे बोलणे ऐकून सगळेच चमकले . सौ.ने कोपराने ढोसले आणि कुजबुजली "काहीही काय बोलता.. ?? म्हटले "का.. ?? काही गोष्टी आताच क्लिअर करू .लग्न जुळवतो आपण...ठरवितो आपण ..पण लग्न झाल्यावर काही वर्षं तरी त्यांची जबाबदारी घ्यायला नको...?? तुम्ही म्हणता एकदा लग्न लावून दिले की मोठया जबाबदारीतुन सुटका झाली . पण आपली पोर कशी संसार करतायत..?? त्यांच्या अडचणी काय आहेत??हे कळायला नको .
तसे मुलाचे वडील म्हणाले "हो भाऊ...!! बरोबर आहे तुमचे. हा मुद्दा माझ्याही लक्षात नाही आला.मान्य लग्न झाल्यावर संसार त्यांनाच करायचा आहे पण आपण त्यांच्या मागे उभे राहिलेच पाहिजे. लग्नाची नवलाई संपली की संसाराचे खरे चटके सुरू होतात मग कुरबुरी चालू होतात . मुलगा तर बायकोला कधीही घराबाहेर काढायची धमकी देतो . आणि बायको बिचारी माहेरच्यांना त्रास नको म्हणून सहन करते . काही वर्षानि दोघांचेही खरे गुण बाहेर येतात आणि चिडचिड  सुरू होते. मुलाचे ठीक आहे पण बिचार्या मुलीने काय करायचे . यावर ही उपाय करायला हवा. बोला तुम्ही.आपण दोघांनी मिळून ठरवू ".
"हरकत नाही "...मी म्हटले ",पहिला कालावधी ठरवू . आपण काय त्यांना जन्मभर बघणार नाही आहोत . पण मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईपर्यन्त तरी दोन्ही घरातल्यानी मुलीला सपोर्ट करावा .आपण लग्न ठरविताना कागदोपत्री काही ठरवत नाही आणि तशी आपली परंपरा ही नाही . पण लग्नानंतर मुलीची छळवणूक ,काही टोचून बोलणे आणि इतर गोष्टी असतात त्यामुळे मुलीला जीव नकोस होतो आणि त्याचे पुढे मोठे परिणाम भोगावे लागतात .आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी नेहमीच उभे राहू पण माहेरचे खंबीर आहेत म्हणून तिची जबाबदारी झटकून टाकाल तर ते आम्ही मान्य करणार नाही.पाहिजे तर आम्ही हे लिहून द्यायला तयार आहोत".
आमचा हा पवित्रा पाहून तिकडच्या मंडळींनीही होकारार्थी माना डोलावल्या आणि मिनाक्षीचा चेहरा खऱ्या अर्थाने खुलला.
© श्री . किरण बोरकर

Sunday, November 19, 2017

हुशार ड्रायव्हर

स्थळ ... धावती रेल्वे जनरल डब्बा कणकवली ते रत्नागिरी
वेळ .... रात्री आठ
माझ्या शेजारी बसलेला इतका विद्वान असेल असे त्याच्या चेहऱ्यावरून मुळीच वाटत नव्हते. ते सर्व सहप्रवासी एकमेकांशी गप्पा मारीत होते आणि मी रसिक श्रोता बनून त्यांचे विचार ऐकत होतो.
"साधारण नॉर्मल माणसाचे  बीपी किती असावे? नव्वद ते एकशेवीसना... ??? मला साठ ते नव्वद आहे ...".असे बोलून तो थांबला आणि सर्वांच्या चेहर्यावरून नजर फिरवली.सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव त्याच्या अपेक्षेप्रमाणे झाले तेव्हा तो पुढे म्हणाला . "पंचावन्न झाले की तू मेलास... असे डॉक्टर म्हणतात पण मला काही होत नाही. कारण मी तंबाखू खातो .त्याने माझे प्रेशर आटोक्यात राहते.बघा जी वस्तू जीवघेणी आहे ती मला आयुष्य देतेय".असे बोलून त्याने खिडकीशेजारी बसलेल्या मुलाला थोडे बाजूला करून बाहेर पिचकारी मारली.मुलाच्या कपड्यावर किती डाग पडले याची त्याला फिकीर नव्हती.
"अरे कसल्या नोटबंदी...." ?? बापरे म्हणजे आता भारतीय अर्थव्यवस्था ऐकू  मी मनात म्हटले .
"सर्व आधीच प्लॅन ह्यांचा . सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांशी आधीच सेटिंग होते.माहितीय ना मला ?? आणि त्या विषयावर चर्चा रंगली.
मग विषय झाला मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याचा. ते तीन अधिकारी म्हणे हल्ल्यात मेले ??? कसले हो ....??यांनीच संपविले त्याला . नाहीतर इतके मोठे अधिकारी एकाच गाडीतून का प्रवास करतील . ह्यांना वाटते पब्लिक मूर्ख आहे" .
इतक्यात डब्यात जेवण आले . त्याने ताबडतोब बिर्याणी घेतली ."किती .....????
' 80 रु ......वेटर ने किंमत सांगितली .
" रेंट कार्ड दाखव.... 70 रु आहे माहितीय मला.छापील किंमत कुठे ???  ह्याने आवाज चढविला .
"जाऊद्या हो" .....शेजारील त्याचा श्रोता म्हणाला . "आहो किमती प्रमाणे जेवण असते का... ?? त्या दिवशी मी तेजसने गेलो.किती फालतू जेवण.
" आयला तेजसने जाणारा माणूस आज जनरल डब्ब्यात "....?? बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या.
" त्यावेळी बर्यापैकी वेळ होता  म्हणून गेलो" त्याने बेफिकीर होऊन उत्तर दिले.त्यानंतर बिर्याणी खात बऱ्याच विषयांची खमंग चर्चा झाली.
मनात विचार आला इतके विचार करणारे नागरिक या डब्यात असतील तर देशात किती असतील ?? तरीही आपला देश मागे का.. ?? सचिनने निवृत्त कधी व्हावे हे बॅट हाती न धरलेले ठरवितात .तर अमिताभ बच्चनला आता अभिनय जमत नाही हेही हीच लोक ठरवितात .थोडक्यात ह्या लोकांकडे सगळी उत्तरे असतात पण तुम्ही त्यांना संधी देत नाही .असा त्यांचा मुद्दा .
माझे ठिकाण आले तसामी उठलो न बोलता निघणार होतो पण राहवले नाही म्हणून विचारले", दादा काय करता हो तुम्ही  ...???
"मी ट्रक ड्राइव्हर आहे .मुंबई ते सातारा फेऱ्या मारतो".माझ्या डोळ्यात उमटलेली आदराची भावना पाहून तो सुखावला .
© श्री .किरण बोरकर

Friday, November 17, 2017

गेट टू गेदर

सकाळीच ऑफिसमध्ये बंड्याचा फोन. हरिभाऊना ऍडमिट केलेय संध्याकाळी जाऊ बघायला.पण बोलताना हसत होता.त्याच्या स्वरात चिंता जाणवलीच नाही.मीही हसून बोललो ",ठीक आहे  जाऊ ". मग सहज विक्रमला फोन करून विचारले तसा तो भडकला", म्हाताऱ्याला काही कामधंदा नाही काय...??  की आम्ही रिकामे बसलोय.? यावर्षात चौथ्यांदा हॉस्पिटलमध्ये गेलाय म्हातारा , मी नाही येत आणि तुही जाऊ नकोस.गेलास तरी काही घेऊन जाऊ नकोस उलट त्याच्याकडून ज्यूस बिस्कीट खाऊन ये". मी इथूनच हात जोडले त्याला.
हरिभाऊ आमच्या सोसायटीमधील एक . सध्या निवृत्तीचे जीवन जगतायत . तब्बेतीची  खूप काळजी घेतात असे आमचे मत . काही झाले की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात मग सारे त्यांना भेटायला जातात .यावेळीही काहीतरी वाटले असेल म्हणून झाले असतील ऍडमिट . मी बंड्याला घेऊन संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो. नारळाचे पाणी सोबत घेतले.
हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बेडजवळ खूप गर्दी दिसली .क्षणभर माझा काळजाचा ठोकाच चुकला... पण जवळ जाताच हास्यविनोद चालू असलेले दिसले . बरेसचे  नातेवाईक उभे राहून,बाजूला बसून त्यांच्याशी गप्पा मारीत होते . तर दोन तीन लहान मुले त्यांच्या कुशीत शिरून खेळत होती . मध्येच कोणतरी विनोद करीत होता त्यामुळे हास्याचे फवारे फुटत होते . विक्रम बोलला तेच खरे आहे .म्हाताऱ्याला काहीच झाले नाही . मी आणलेले नारळ पाणी बंड्याच्या सॅकमध्ये टाकले .  बंड्या माझ्याकडे पाहून सहेतुक हसला.
आम्हाला पाहिल्यावर क्षणभर शांतता पसरली . मग काही लोक त्यांचा निरोप घेऊन निघाली . जाता जाता म्हणाली", हरिभाऊ खूप मजा आली हो आज .....
"मज्जा ...? मी चकितच झालो.
मी चिंतीत चेहरा करून विचारले", हरिभाऊ कसे आहात ...??
"मस्त ..... !! एकदम फिट...!!आणि हसले . बाजूच्यानीही हसून दुजोरा दिला.
मग त्यांनी सांगितले" बरे वाटते आता ..नाहीतर तो कोपऱ्यातला पेशंट बघ ..खूप सिरीयस आहे . तरी कोणी येत नाही . मरेल दोन तीन दिवसात .आणि काल रात्री त्या बेडवरचा झोपेतच गेला . आम्हाला माहीतच नाही . असे म्हणत त्यांनी वॉर्डमधील प्रत्येक पेशंटची माहिती मला दिली .इतकेच नव्हे तर चहाची ऑर्डर देऊन बाजूच्या कपाटातून बिस्किटंचा पूडा काढला.
मी आश्चर्याने विचारले ",हरिभाऊ मी तुमची चौकशी करायला आलो आणि तुम्ही तर दुसऱ्यांबद्दल सांगताय आणि उलट आमचाच पाहुणचार करताय".
तसे ते हसले पण त्या हास्यात वेदना होती . "भाऊ.. तुला आश्चर्य वाटत असेल ना ?? जरा काही झाले की मी ऍडमिट होतो.हो खरेच आहे . कारण आम्हा म्हाताऱ्यांकडे बाहेर कोणीच लक्ष देत नाही रे . सर्दी खोकला झाला तरी कोण फार लक्ष देत नाही . कोणालाही वेळ नाही आमच्यासाठी . मग आम्ही दोघे एक गेटटूगेडदर करायचे ठरवितो . सरळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो . आमच्यापैकी कोणी ऍडमिट आहे असे कळताच सगळे धावून येतात .यावेळी मात्र वेळात वेळ काढून येतात.पहिल्याच वेळी जाणवले अरे कोणीच कोणाला भेटत नाहीत . हाकेच्या अंतरावर  भाऊ राहत असला तरी त्याची चौकशी फोनवरून होते .माझे चुलतभाऊ तर दोन वर्षे एकमेकांना भेटले नव्हते . त्यादिवशी मला पाहण्याच्या निमित्ताने एकत्र आले .जाताना मला धन्यवाद देऊन गेले. मी ऍडमिट झालो की माझ्या मुलाला बरोबर सुट्टी मिळते . मग तोही पूर्ण वेळ कुटुंबाला देतो . नाहीतर तो कधी घरी सापडतो का ???  सर्वजण इथे येतात एकमेकांना भेटतात छान गप्पा मारतात . एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवितात . खरे सांगू आम्हा म्हातारा म्हातारीला ही खूप वेळ मिळतो इथे एकमेकांशी बोलायला आणि मुलाला ,सुनेलाही घरी वेळ मिळतो . खूप काही कमावतो मी या दिवसात .हा थोडे पैसे खर्च होतात पण आपल्यावर प्रेम करणारी माणसे ओळखता येतात . आज त्यांना एकत्र यायला .बोलायला वेळ नाही पण असे काही झाले तर हातातील कामे टाकून धावत येतात. ही जाणीवही उरलेले आयुष्य काढायला पुरेशी असते ".असे म्हणत त्यांनी अलगद डोळे पुसले.
मी काही न बोलता प्रेमाने त्यांचे हात हाती घेतले आणि मुकाट्याने बंड्याच्या सॅकमधील नारळ पाण्याची पिशवी काढुन त्यांच्या हाती दिली .
© श्री . किरण बोरकर

Thursday, November 16, 2017

टार्गेट .....डेव्हीड बॅल्डासी

टार्गेट .....डेव्हीड बॅल्डासी
अनुवाद .... डॉ. चंद्रशेखर चिंगरे
श्रीराम बुक एजन्सी
अमेरिकेला त्यांचे  दोन सर्वश्रेष्ठ गुप्तचर विल रॉबि आणि जेसिका रील आता नकोसे झालेत म्हणूनच त्यांच्यावर एक अतिशय घातकी कामगिरी सोपविण्यात आली आहे .त्यात ते मेले तर आयतीच सुटका होईल हा हेतू . कामगिरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडून सोपवली गेलीय.तर चुंगा ही कोरियन छळछावणीत वाढलेली खतरनाक तरुणी आहे . ती एक कुशल मारेकरी आहे . अमेरिकन गुप्तहेरांना ठार करून त्यांची ही योजना धुळीस मिळवायची कामगिरी तिच्यावर सोपवली गेली आहे . ही योजना फसली तर जगात अमेरिकेची नाचक्की होणार हे नक्की .दोन देशांच्या या खेळात आता उंदीर मांजराचा जीवघेणा खेळ सुरू झालाय .लक्ष निश्चित आहे .पण शिकारी कोण आणि शिकार कोण हे कसे कळणार ???

Monday, November 13, 2017

अतर्क्य........ संदीप दांडेकर

अतर्क्य........ संदीप दांडेकर
राफ्टर पब्लिकेशन
लेखकाचे हे पहिलेच पुस्तक .पण कुठेही ते जाणवत नाही . मानवी मन हे खूप गूढ आणि चमत्कारिक असते . खूप जणांनी यावर प्रयोग केले .आपण आपल्या मनातच वेगवेगळे अशक्य असे खेळ खेळत असतो .कधी कधी आपले मन दुहेरी व्यक्तिमत्व ही जगते . या मनाचे पट वेगवेगळ्या कथांमधून लेखकाने मांडले आहेत .गूढकथा आवडणार्यांना नक्की आवडेल असे पुस्तक .

Sunday, November 12, 2017

बिलव्हेड.......टोनी मॉरिसन

बिलव्हेड.......टोनी मॉरिसन
अनुवाद........आशा दामले
पद्मगंधा प्रकाशन
अमेरिकेतली गेल्या पंचवीस वर्षातील सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणून बिलव्हेड ओळखली जाते .ह्या कादंबरीला पुलित्झर पुरस्कार मिळाला आणि 1993 मध्ये नोबेल पुरस्कारही .यात केवळ गुलामांच्या छळाची कहाणी नसून त्यामागचा इतिहास ही शोधला आहे . अतिशय संथ कादंबरी आहे . काही ठिकाणी संदर्भ ही लागत नाही . वाचायला कंटाळा येतो

Saturday, November 11, 2017

कमलाकर अकॅडमी

मागून गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि मी दचकून फुटपाथवर उडी मारली.
"कोण आहे "......? म्हणून रागाने पाहिले. तर कारमधील व्यक्ती माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होती.
"केके ....तू ??? मी आनंदाने ओरडलो . केके उर्फ कमलाकर कदम माझा वर्गमित्र . पण शिक्षण संपल्यावर गायब झाला . मध्ये मध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला करून घ्यायचा . पण तसा संबंध नव्हताच . मध्येच अचानक गायब झाला तो आता असा समोर आला.
"अबे भाऊ ... आहेस का जिवंत... ?? चल बस.." असे बोलून बाजूला बसविले.
इतकी नवीन गाडी .छान कपडे पाहून मी हैराण झालो. हळू आवाजात विचारले", केके.. ही गाडी तुझीच का" ? मोठ्याने हसत त्याने माझ्या खांद्यावर थाप मारली.
गाडी एका दोन मजली इमारतीसमोर थांबली आणि समोरच्या ऑफिसकडे बोट दाखवून म्हणाला ",ते माझे ऑफिस".
मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले . तो समजला . "चल सांगतो".असे म्हणून आत नेले.
समोर मूठ वळवलेल्या हाताचे चित्र होते आणि खाली लिहिले होते आम्ही तुम्हाला उपाशी ठेवणार नाही कमलाकर अकॅडमी.
"हे काय.... ?? मी आश्चर्याने विचारले
"बस भाऊ..,आणि चहाची ऑर्डर देऊन तो बसला . त्याच्या टेबलवर फक्त लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन होते.
"मी कार्यशाळा किंवा तुझ्या भाषेत क्लास घेतो मुलांचे."तो शांतपणे म्हणाला.
" अरे वा ...! चांगला धंदा आहे हा"..मी हसून म्हणालो.
"तसे नाही भाऊ ..माझ्याक्लासमध्ये फक्त दहावीत पस्तीस ते चाळीस टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच  प्रवेश आहे .  त्या मुलांना इतर ठिकाणी प्रवेश मिळत नाही . जरी मिळाला तरी कॉलेजमध्ये शिकविलेले कळत नाही आणि मुळात आपल्याकडे शिकला की नोकरी मिळते ,पैसा मिळतो हा समज आहे . आयटीआयमध्ये शिकले तरी मोठ्या कंपनीत नोकरी पाहिजे ही अपेक्षा.
"मग तू काय करतोस"...?? मी उत्सुकतेने विचारले .
"एक साधा प्रश्न भाऊ ..,तुझ्या घरी ट्यूबलाईट गेली तर तू काय करतोस ..??
मी नसलो तर बायको वायरमनला बोलावते आणि काम झाले की त्याला 100 रु देते". मी उत्तरलो
"बघ साधे ज्ञान असेल आणि त्याने अशी रोज दहा कामे केली तर किती कमावेल तो ?? साधारण पंचवीस हजार रु महिना" मी उत्तर दिले.
" बस ...हेच शिकवतो आम्ही त्यांना.आपल्या ओळखीचे आणि कॉलेजचे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत .सर्वांशी माझा सोशल मीडिया आणि प्रत्यक्षातही कॉन्टॅक्ट आहे . मी त्यांना त्यांची अपेक्षा विचारतो आणि त्याप्रमाणे मुले तयार करतो आणि त्यांच्याकडे पाठवून देतो.त्यांनाही आयती मुले मिळतात आणि मुलांना काम".
"अरे पण काही  कामे धोक्याची आहेत. सर्टिफिकेट लागते. त्यासाठी काय करतोस".. ??? मी तांत्रिक प्रश्न विचारला.
"इथेच तर माझे काम आहे भाऊ .मी त्यांना प्रशिक्षण देतो .त्यासाठी ही माझेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्र मदतीला येतात . त्यांना जसे पाहिजे तसे त्यांना घडवितात आणि परीक्षा द्यायला लावतात . तोपर्यंत त्यांना साधी कामे देऊन कामाची माहिती घ्यायला लावतात . काही ठिकाणी गरज नसते सर्टिफिकेटची तिथे आम्ही डायरेक्ट पाठवतो . उदारणार्थ डेटा एन्ट्रीला सात दिवसाचे प्रशिक्षण दिले की आठव्या दिवसापासून कामाला सुरुवात.मला फक्त इथे बसून सर्वांचा डेटा लॅपटॉपमध्ये भरावा लागतो" .केके हसत म्हणाला .
"पण मुले मध्येच सोडून गेली तर .
"जाऊदे ना.. ??? मग त्यांचे नशीब.पण आपल्याकडे दुसरा आहेच. आता आपला सत्यवान भावे माहीत आहे का ?? मोठा इंटिरियर झालाय . त्याला सतत प्लंबर .वायरमन .सुतार लागतात .मी त्याला मुले देतो .प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन ते सहा महिन्यात तयार होतात.
"अरे ...असे कितीतरी छोट्या छोट्या कामात माणसे लागतात .फक्त आपली  तयारी हवी माणसे तयार करायची.जी मी करतो.  दहावीनंतर सगळेच इंजिनियर डॉक्टर ,सीए बनायला गेले तर ही कामे कोण करेल . तुम्ही डॉक्टर व्हाल आणि बाथरूमचा साधा पाईप बदली करायला माणूस शोधाल . तो दहा  मिनिटाच्या कामाचे दोनशे  रु घेणार तुम्ही ते देणार .  ही कामे करून तुम्ही उपाशी मारणार नाही . हेच आमचे बोधवाक्य.
"खरेच केके ..आपल्या लक्षातच येत नाहीत या गोष्टी .चांगल्या मार्गाने पैसे कमविणे हेच सगळ्यांचे ध्येय असते . आपापल्या कुवतीनुसार प्रत्येकाने तो कसा कमवायचा हे ठरविले पाहिजे . खरेच तुला हे कळले आणि तू दुसर्यांना मार्ग दाखवितोस .माझाही नंबर घेऊन ठेव गरज पडल्यास मीही तुझ्याकडूनच मुले घेईन .
© श्री. किरण बोरकर

Wednesday, November 8, 2017

शर्यत

"परवाची पाचशे मीटर मीच जिंकणार बरे का मित्रा".
"त्यादिवशी शंभर मिटरलाही हेच बोलला होतास. पण तिसरा आलास...."
"हो रे ...!!मध्येच ठेच लागली आणि वेग मंदावला म्हणून ".....
"आता कारणे देऊ नकोस"....
"कारणे नाहीत रे ....पण होते असे कधी कधी तरीही गेले वर्षभर मी सगळ्याच स्पर्धेत भाग घेतला.
"त्याबाबतीत तुझे अभिनंदन ...पण तुला त्रास होत नाही का.... ??
"अरे त्रास कसला ...इतके तर सहन करायला पाहिजेच . म्हणून तर तुमच्याबरोबर रोज प्रॅक्टिस करतोय .तुम्ही सांभाळून घेताय हेच महत्वाचे"
"ह्या ...!! आम्ही कसले सांभाळून घेतोय. उलट तूच किती उत्साहात सराव करतोस .एक दोन वेळा पडलास तेव्हा भीयालोच आम्ही .पण तू त्यातूनच उभा राहिलास".
"अरे हे... सर्व तुमच्यामुळे झाले .नाहीतर धावणे हे स्वप्नच राहिले असते".
"ह्या ...!! तू मनात आणलेस ना म्हणून हे सर्व .शेवटी आपल्या मनात ठरविले तेच पूर्ण होऊ शकते हे दाखवून दिलेस तू. चल आता निघुया.उशीर होईल मग मलाच बोलशील किती फास्ट चालतोस तू ???
"अरे ..हो.. हो.. हा. पाय तरी  जोडून दे मला.आता आरामात बसलो. म्हणून पाय काढून ठेवला नाहीतर हल्ली खूप चावत बसतो आतून. जुना झालाय ना . त्याचा पट्टा सारखा सटकतो.पण सवय झालीय याची म्हणून ही रेस होईपर्यंत चालवतो .मग नवीन घेईनच . चल निघुया.
© श्री. किरण बोरकर

Tuesday, November 7, 2017

मित्र

"भाऊ ..... !! सध्या तुमची मैत्रीण चर्चेत आहे आपल्या विभागात".चहाचा ग्लास माझ्या हातात देऊन बंड्या मिस्कीलपणे उद्गारला आणि मी भुवया उंचावल्या.
"कोण...? मी उत्सुकतेने विचारले.
"विभावरी ...." बंड्याने उत्तर दिले. ",हल्ली सारखी एकाशी गप्पा मारताना दिसते.तिची समाजसेवा ,लिखाण  थंड पडले का" ??
विभावरी उर्फ विभा आमची जुनी मैत्रीण . ती उच्चशिक्षित ,चांगले लिहिणारी शिवाय समाजसेवेची आवड असणारी तर विनीत तिचा नवरा. हाही मोठ्या कंपनीत उच्चपदावर होता . घरात सर्व सुखसोयी होत्या . माझे त्यांचे घरी येणे जाणे होते तर तेही कधी  आमच्याकडे यायचे.ती स्वभावाने मोकळीच होती.
पण बंड्याचे हे बोलणे ऐकून मला राहवेना . तिच्याबद्दल कोणी असे बोलावे हे  मला पटत नव्हते.
मी संध्याकाळी तिच्या घरी गेलो तेव्हा ती बाहेर जाण्याच्या तयारीत होती .मला पाहताच तिला आनंद झाला .ताबडतोब तिने कोणालातरी फोन करून आजची अपॉइंटमेंट रद्द झाल्याचे कळविले.
मी म्हणालो", अग....तू जा तुझ्या कामाला .मी नंतर येतो .
तशी ती म्हणाली", गप रे ....किती दिवसांनी आलायस . तुझ्यापुढे ते काम महत्वाचे नाही."असे बोलून बसली . हळू हळू आमच्या गप्पा रंगू लागल्या . तिच्या बोलण्यातून कुठेही जाणवले नाही की काही वेगळे घडतेय आयुष्यात .शेवटी न राहवून मी विषय काढलाच.
" विभा.... हल्ली काही वेगळेच ऐकू येते तुझ्याबद्दल ....जे मला आवडले नाही.तूच तुझ्या तोंडाने सांग.
तशी विभा हसली", मला वाटलेच.. तू हेच विचारायला आला असशील.एक सांग ..मी तुझ्याशी बोलते .विक्रमशी गप्पा मारते तेव्हा कोणाच्या मनात हा प्रश्न  नाही आला ..? मग आताच का ??
"तसे नाही ...पण आपल्याला ओळखतात सर्व . आपला स्वभाव माहीत आहे सर्वाना.मी बाजू मांडली .
" हो ...पण तुम्ही पुरुष आणि मी स्त्री .माझ्याबद्दल पहिले बोलतील ".तिचा आवाज थोडा चढला.
मी विचारले", मग लोक बोलतात ते खरे आहे का "??
" तुला काय वाटते ...?? तिने उलट प्रश्न केला.
" मला नाही वाटत खरे ...म्हणून तुलाच विचारायला आलो.
तशी ती हसली " तुझ्याबद्दल हीच खात्री होती .तो माझा एक नवीन मित्र आहे . हो थोडी जास्त बोलते मी त्याच्याशी. कारण त्याचे आणि माझे काही विचार जुळतात .खरे तर तुला माहितीय मला कशाचीच कमी नाही .विनीत परिपूर्ण नवरा आहे .तो सर्व बाबतीत मला सुख देतो . शारीरिक ,आर्थिक सगळे . आमचे सेक्सलाईफ ही छान आहे . एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करीत नाही .पण हल्ली खूप बिझी झालो आम्ही . मला लिखाणाची आवड ,तशीच थोडीफार समाजसेवाही करते मी आणि त्याला या गोष्टीची अजिबात आवड नाही . त्याला शेयर बाजार ,गुंतवणूक यात इंटरेस्ट तर मला त्या गोष्टींचा तिटकारा . त्यामुळे या गोष्टी कुठे बोलणार .काही गोष्टी मैत्रिणीला सांगायला गेले तर त्या गोष्टींचा फायदा उचलतील ही भीती . एकदा एका मीटिंगमध्ये हा भेटला . त्याचा चेहरा खास नसला तरी बोलणे छान होते .  मुद्देसूद बोलणे हा त्याचा प्रमुख गुण होता . वाचनाची आवड आणि समाजाबद्दल कळकळ आवडली मला . मी त्याच्याशी या मुद्द्यावर बोलू लागले आणि त्याची याविषयी असणारी माहिती पाहून चक्रावून गेले . मग त्याच्याशी बोलणे आवडू लागले मला.खूप काही होते माझ्या मनात आणि तो सर्व ऐकून घ्यायला तयार होत . म्हणून आमचे ट्युनिंग जुळले".
" बरे मग पुढे काय "..? मी विचारले .
"काही नाही ..असेच चालेल .त्याला अजून काही अपेक्षा असतील माझ्याबद्दल तर त्याणे विसरून जावे" . असे बोलून ती हसू लागली.
मी म्हटले ",जरा जपून हो ....
"अरे कसले काय भाऊ..? ज्या गोष्टी मला माझ्या कुटुंबाकडून मिळतात त्या गोष्टीसाठी मी दुसरीकडे का जाऊ . तू काळजी करू नकोस . तो फक्त माझा मित्र आहे . आताही त्यालाच भेटायला चालले होते पण तू आलास म्हणून कॅन्सल केले . शेवटी तुझी माझी दोस्ती फार जुनी.आता आला आहेस तर मस्तपैकी जेऊनच जा ",असे बोलून ती गोड हसली.
ते हास्य पाहून माझ्या मनातली भीती कुठच्याकुठे पळून गेली .
© श्री . किरण बोरकर