Tuesday, August 29, 2017

आरती

बंड्याकडे गणपतीच्या आरतीसाठी निघालोच होतो तोच विक्रम समोर आला.तोंड नेहमीप्रमाणे चालूच होते बहुतेक कुठून तरी गणपतीचा प्रसाद घेतला असणार .
"बरे झाले आलास.चल बंड्याकडे आरतीला जाऊ".मी हात धरून म्हटले.
"बाबा रे ..पाया पडतो तुझ्या .आताच त्या जोशीकडून आरती करून येतोय .पाऊण तास एका जागेवर नुसता टाळ्या वाजवत उभा होतो .हालत खराब झाली बघ".विक्रम वैतागून म्हणाला .
"अरे पण तुला आरत्या येतात.मग नुसत्या टाळ्या का वाजवत बसलास".मी हसून म्हणालो.
" येतात रे !! पण त्या आपल्या नेहमीच्या पाच.त्या बहुतेक सर्वाना येतात आणि एका तालात बोलताना जर शब्द इकडे तिकडे झाले तरी चालतात .काही शब्द गाळायला टाळ मृदुगांची साथ असते . त्यामुळे एक सुरात  आरती म्हणताना छान लय लागते . पण हे जाधव बुवा आले आणि वाट लावली". विक्रम शांत झाला नव्हता.
" जाधवबुवा तर छान आरत्या म्हणतात .भजनी मंडळात गातात ते.ते कसे वाट लावतील"?? मी आश्चर्याने विचारले.
"हो ते गातात .पण आज भजनी मंडळ नव्हते त्यांचे.कुठून कुठून एक एक आरती काढली आणि मन लावून एकटेच गात बसले .आम्हाला काय येतेय त्यात.आम्ही चूप बसून टाळ्या वाजवू लागलो.बरे त्या टाळ्या तरी लयीत वाजतात का ?? माहीतच नसेल काही तर टाळ्या कश्या वाजवणार .टाळ मृदुगवाल्यांचाही ठोका चुकला .मग आरतीची मजा गेली .कधी एकदा संपतेय असे वाटू लागले . योगेशही कंटाळला आरती फिरवून फिरवून .त्यात पंखे बंद . लोकांना घाम फुटू लागला . हात भरून येऊ लागले .मी तर खात्रीने सांगतो तो गणपती ही मनात बोलत असेल अरे बाबांनो पुरे आता .कंटाळून माझी आरती करू नका" विक्रम चिडून म्हणाला.
"तुझे काहीतरीच विकी .अरे आरती केल्यावर किती प्रसन्न वाटते . कंटाळा कसा येईल ?? आणि गणपतीही खुश होतो .समोर चाललेली त्याची स्तुती पाहून". मी मुद्दाम त्याला चिडवले .
"भाऊ थोडे फार शास्त्र मलाही कळते रे .आरती किंवा मंत्र योग्य पद्धतीने उच्चारले तर वक्तृत्व अर्थात भाषा आणि बोलणे स्पष्ट होते . रक्ताभिसरणावर अनुकूल परिणाम होतो. विशिष्ट ठेक्यात टाळ्या वाजविला तरीही छान व्यायाम घडतो ह्या दोन्ही गोष्टी एकत्र तालात घडल्या तर मनावर आणि शरीरावरही चांगला  परिणाम होतो .मन प्रसन्न होते .म्हणूनच पूर्वजांपासून विशिष्ट चालीत सुरात आरत्या मंत्र म्हणण्याची पद्धत आहे . ते एक समूह गान आहे असे आपण म्हणू . पण त्याची लय कोणी बिघडवली तर.?? तुमचे मन अचानक आलेल्या ह्या गोष्टी स्वीकारायला तयार नसते .एक आरती म्हणणार आणि बाकी सगळे गप बसून हव्या तश्या टाळ्या वाजवणार .बरे हे लवकर संपले तर ठीक .बराच वेळ चालू राहिले तर हळू हळू सगळे कंटाळतात .मग त्या आरतीला काही अर्थ आहे का ते सांग .?? विक्रमने त्याच्या भाषेत आज मुद्देसूद विचारले .
मीही विचारात पडलो."पण असेल एखाद्याची आवड काही वेगळे करायची ".
"जरूर वेगळे करा पण मग तुमचा गट बनवा आणि त्यांनी अश्या आरत्या म्हणा . बाकीचे गप्प बसून राहतील .कदाचित त्यांच्या सुरात वेगळेपण असेल जे इतरांना जास्त आवडेल .पण तुमची आवड इतरांवर का लादता . तो बिचारा गणपती समोर बसून ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलाल का ?? उलट असे कंटाळलेले चेहरे बघून तो जास्त चिडत असेल".आज विक्रम काही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता .
"तुला माहितीय आपण एक गजल प्रोग्रॅमला गेलो होतो . त्या उस्तादांची एक गजल तर किती फेमस होती . पण त्यांनी पहिल्यांदाच सांगितले ती गजल मी शेवटी गाणार आता माझ्या नवीन गजल ऐका .लोकांना आधी बरे वाटले पण नंतर नंतर बोअर झालेत .आणि तेही प्रत्येक गजल वेगवेगळी तान घेऊन जायचे .एक गजल चालू असताना मी बाहेर जाऊन चहा पिऊन आत आलो तरीही तीच गजल चालू होती .पस्तीस मिनिटे ती गजल चालू होती .मी त्या हजार लोकांचे कौतुक केले . त्यांच्या सहनशक्तीचा दाद दिली. नेहमी कानावर पडणारी गोष्ट वेगळ्या पद्धतीने कानावर आली किंवा नवीन काही ऐकायला मिळाले की पहिल्यांदा थोडा त्रास होतोच .
"हे बघ विकी ..तू उगाच कुठल्याही गोष्टीचा संबंध कुठे लावू नकोस .तुला यायचे असेल तर चल नाहीतर घरी निघ . तिथे आलास तर जाधवबुवा ही आहेत हे लक्षात ठेव . आणि हो प्रसादला पुरणपोळी,काजूकतली आणि चेरी आहे .येतोस का "?? मी निर्वाणीचे विचारले .
"काय म्हणतोस ?? एव्हडा प्रसाद ",?? विक्रम आनंदाने म्हणाला ",चल येतो मी .च्यायला... त्या जोश्याकडे सफरचंदाची  एकच फोड मिळाली".असे म्हणून मला  टाळी देत मोठ्याने हसला आणि खांद्यावर हात टाकून बंड्याच्या खोलीकडे वळला .
© श्री. किरण बोरकर

Friday, August 25, 2017

नामदेव सुर्वे

नामदेव सुर्वे
हातातील महागड्या घड्याळाकडे नजर टाकून नामदेवने आपल्या सेक्रेटरीला केबिनमध्ये बोलावले ."अजून काही राहिले असेल तर घेऊन ये पटकन  नंतर दहा दिवस मी भेटणार नाही ". बोलतानाही त्याचे एक हाताने पेपरवर सह्या करणे चालूच होते.
आज त्याला सर्व कामे संपवून सुट्टीवर जायचे होते . आता दहा/बारा दिवसतरी ऑफिसचे तोंड पाहणार नव्हता.इथून सरळ विमानतळ गाठणार होता तो .आपल्या कुटुंबालाही त्याने तिथेच बोलावले होते . तिथून मुंबई आणि त्यानंतर कारने कोकणातल्या आपल्या आवडत्या गावात .सरळ सुटसुटीत प्लॅन होता त्याचा.
कामे संपवून तो कारने विमानतळाकडे निघाला तेव्हा जुन्या आठवणीत रमून गेला . गावात त्याला सर्व नाम्या बोलायचे . हा घरात तिसरा . मागे शंकर आणि शेवटी विन्या . ते दोघेही अभ्यासात तसे ढ च . पण हा प्रचंड हुशार . मोठ्या भावाने त्याची हुशारी पाहून उच्च शिक्षणासाठी खूप मदत केली . प्रसंगी बायकोचे दागिनेही गहाण टाकले. दादा आणि वाहिनीच त्याचे आईवडील होते .पुढे त्याची बुद्धिमत्ता पाहून केरळातील एक मोठ्या कंपनीने नोकरी दिली . मोठा फ्लॅट गाडी ,भरपूर पगार आणि इतर सोयीसुविधा दिल्या .दादा वहिनी आणि इतर भावाना सोडून येताना डोळ्यात पाणी आले त्याच्या. पण दरवर्षी गणपतीला दहा दिवस तरी गावाला येईन असे वचन देऊन केरळात बस्तान बसविले.
इथल्याच एक सुंदर मुलीशी लग्न केले पण दहा दिवस तरी गावी जावे लागेल ही अट घालूनच.नशिबाने बायको ही सुस्वभावी मिळाली . दक्षिणेकडील असूनही गावाच्या रीतीभाती उत्तम पाळते .गावी वहिनी सांगेल त्याप्रमाणे सर्व करते .मुलनाही सवय लागलीय.बाकीच्या दिवसात उनाडक्या करतील पण गणपतीचे दहा दिवस कुटुंबासोबत हे ठरलेल आहे त्यांच.इकडचे सर्व मित्र चिडवतात त्यांना पण ते लक्ष देत नाही . त्या निमित्ताने सर्व भावंडाना भेटायला मिळले .जाम खुश असतात.विन्या तर काय मोठा स्टार झालाय.पण गावात आल्यावर वाटतच नाही मोठा स्टार आहे . शंकर पहिल्यापासूनच मानी . दरवर्षी सांगतोय माझ्याकडे ये नोकरीला पण विषय टाळतो . यावर्षी परत प्रयत्न करू .मला मोठे करण्यात त्यानेही कष्ट घेतलेत.
दादा ही थकलाय, त्याच्याही भविष्याची सोय करायला हवी.आमची स्वप्न पूर्ण करता करता स्वतःची स्वप्ने मारताना पाहिलंय मी . आताही कसलीच मदत घेत नाही .तरी बरे मुलाच्या अकाउंट मध्ये थोडे थोडे पैसे भरतोय त्याच्या नकळत .ह्यावेळी त्याच्या अकाउंट मध्ये भरु .अरविंदला सांगतो तसे .त्यांना सांभाळायची जबाबदारी आपली आहे .विरोध करायची कोणाच्यात हिम्मत नाही .दादा वहिनींनी आमच्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव सर्वाना आहे .
विचार करता करता विमानतळ कधी आले ते कळलेच नाही . त्याने गाडीतून उतरून समोर उभ्या राहिलेल्या कुटुंबियासमवेत विमानतळावर   प्रवेश केला .
© श्री. किरण बोरकर

Sunday, August 20, 2017

शंकर सुर्वे

शंकर सुर्वे
"अरे किती रजा घेशील ?? रजा नाहीत तुझ्याकडे" .मी संतापून शंकरला म्हणालो.तसा शंकर म्हणाला"बिनपगारी झाल्या तरी चालतील पण गणपतीला गावी जाणारच" .मी नाइलाजाने हो म्हटले  आणि शंकरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
शंकर सुर्वे आमच्या मेंटेनन्स विभागातील कुशल कामगार . कोकणातील एक लहानशा गावातून आलेला . कितीही अडचण आली तरी गणपतीसाठी रजा मागायला येणारच . आम्हीही खूप त्रास होतोय असे दाखवून त्याची रजा मंजूर करतोच .कारण मनाने खूप निर्मळ असलेला चांगला माणूस आहे तो .
शंकर मोठ्या खुषीतच घरी आला .नेहमीप्रमाणे यंदाही रजेसाठी भांडावे लागले.पण साहेबलोक चांगले आहेत.कटकट करीत का होईना रजा देतात .घरी येऊन पोरांच्या पाठीवर धपाटे घालत बायकोला दम भरत गावी जाण्याची तयारी करायला सुरुवात केली .बाकीच्या भावांचे बरे आहे असल्या कटकटी नाहीत त्यांना. एक मराठी चित्रपटातील सुपरस्टार ,एक केरळमध्ये मोठ्या पदावर अधिकारी .तर एक कॅनडात उद्योगपती .पण कोणाला गर्व नाही हो . वर्षातून एकदा गणपतीसाठी दहा दिवस एकत्र  येतात .अशी संधी कोण सोडेल .पण भावांच्या मोठेपणाचा फायदा कधीच शंकरने उचलला नाही .
शंकर तालुक्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडला . मोठ्या भावावर फार बोजा पडू नये असे त्याला नेहमी वाटायचे . त्यात त्याला मशीनची आवड म्हणून फिटर झाला आणि मिळेल ती नोकरी स्वीकारून मुंबई आला .एक छोट्याश्या चाळीत आपल्या बायको मुलांसह राहत होता  . गावातून मुंबईत कोणीही आले तरी ह्यांच्याकडेच उतरायचे . विन्याही आपल्या उमेदवारीच्या काळात ह्यांच्याकडे राहत होता .काय करणार हा नाटके करून ?? असे रोज शंकर बायकोला बोलायचा. पण त्या बाईने विन्याला खूप धीर दिला हो ..!! आपल्या ताटातील भाकरी त्याला दिली .आज मोठा सुपरस्टार झालाय पण कितीही मोठा झाला तरी पाय जमिनीवर आहेत त्याचे .शेवटी भाऊच आहे आपला.  नेहमी आडून मदत करायला बघतोय.पण हे दोघेही मानी .आहे त्या परिस्थितीत राहतील पण कोणाकडे मदत मागणार नाहीत .
विन्याने लग्न करावे म्हणून मागे लागलेत पण हा पठया काही दाद देत नाही . बाकीचे भाऊ चांगल्या स्थितीत आहेत पण ते त्यांचे नशीब आणि मेहनतीवर वर चढलेत . दरवर्षी गणपतीला न चुकता येतात हेच महत्वाचे आहे . दादाने आई बाबा गेल्यावर आपल्या इच्छा मारून सर्वाना लहानाचे मोठे केले  याची जाणीव सर्वाना आहे . विन्या काल बायकोला फोन करून विचारात होता गाडीने येताय का ? पण ही माझ्या शब्दाबाहेर जायची नाय . नको बोलून मोकळी झाली .अरे आता नेशील एकदा ..नंतर आम्हाला नेहमीसारखे  धक्के खातच प्रवास करायचा आहे ना ?? कशाला नसत्या सवयी ....
यावर्षी परत नाम्या विषय काढेलच नोकरीचा . गेली दोन वर्षं मागे लागलंय केरळला चल माझ्याबरोबर. तिथे नोकरीला लावतो . पण मुंबई आणि गाव सोडून खय जावचा वाटत नाय . पण बघू  त्याचा विचार आता  नको .गणपती होऊन जाऊदे
.
© श्री. किरण बोरकर

मी अश्वत्थामा चिरंजीव .. अशोक समेळ

मी अश्वत्थामा चिरंजीव .. अशोक समेळ
खरे तर अशोक समेळ नाटककार .पण बरीच वर्षे महाभारतातील हे एक पात्र त्यांच्या मनात घर करून राहिले होते . त्यातूनच निर्माण झाली ही महाकादंबरी .कपाळावर जन्मजात निलमणी असलेला गुरू द्रोणाचार्यांचा हा पुत्र  एक दुर्लक्षित खलनायक म्हणून ओळखला जातो .श्रीपरशुराम,हनुमान,बिभीषण,बळीराजा,महर्षी व्यास,कृपाचार्य  व अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव ओळखले जातात . पण अश्वत्थाम्याला चिरंजीवीत्व हा शाप समजला जातो . त्याने पांडवांच्या वशजांचे झोपेत असताना केलेल्या संहाराची शिक्षा म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाकडून त्याच्या कपाळावरील मणी कापून काढला.त्यामुळे  झालेली भळभळती जखम घेऊन दारोदार  तेल मागणार योगी असा त्याचा लौकिक बनला . अश्या अश्वत्थामाच्या आत्मसंवादातून ही कादंबरी रेखाटली गेली आहे .

Saturday, August 19, 2017

विनायक सुर्वे उर्फ विनायकुमार

विनायक सुर्वे उर्फ विनयकुमार
कोकणातील छोट्या गावातून आलेला विनायक सुर्वे तसा अभ्यासात ढ होता .पण व्यावहारिक ज्ञान भरपूर होते .
पाच भावांमध्ये सगळ्यात लहान .आई बाबा लहानपणीच देवाघरी गेलेले .मोठ्या भावाने त्यांना वाढविले .गरिबी काय असते? याचा अनुभव घेतला होता .जगण्यासाठी कष्टच करावे लागतात या मतावर तो ठाम होता.
दशवतारात छोटीछोटी कामे करता करता आपल्यातील गुणांची खात्री पटली त्याला आणि मुंबईत आला .काही दिवस आपल्या मोठ्या भावाच्या घरी राहिला . पण शंकरला स्वतःच्या कुटुंबाचे भागवताना जीव मेटाकुटीला येत होता .पण त्याने आणि वहिनीने कधी तोंडातून तक्रारीचा शब्द काढला नाही .आपल्यातलीच भाजी भाकरी त्याला दिली .पुढे तो मिळेल त्या नाटकात छोटी मोठी कामे करू लागला आणि वेळीअवेळी घरी येण्याच्या कारणावरून भावाचे घर सोडले. शंकरला खूप वाईट वाटले .पुढे हळू हळू चित्रपट, मालिका मिळू लागल्या .काही वर्षातच तो चित्रपतशृष्टीत सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला .मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत मोठे घर घेतले .दारासमोर गाड्या आल्या .आज त्याने आपल्या चित्रपटात काम करावे यासाठी निर्माते त्याच्या घरासमोर रांग लावू लागले .
मोठा स्टार होऊनही त्याचे पाय अजूनही जमिनीवर होते . भावांचे कष्ट ,गावातील घर, काहीही विसरला नव्हता तो .कामाच्या रगाड्यात गावी जाणे होत नव्हते पण गणपतीला  काहीही करून हजर राहत होता .ते दहा दिवसच त्याचे होते .सर्व सुर्वे कुटुंब एकत्र यायचे .वडीलांसमान असलेल्या मोठ्या भावाच्या चेहऱ्यावरील आनंद वर्षभर हृदयात साठवून ठेवत होता.
आपल्या व्यवसायात विनायक सुर्वे हे नाव शोभत नाही म्हणून विनायकुमार नाव ठेवले .पण गावात कोण विनयकुमार म्हणाला की चिडत असे .विन्या हेच नाव बरे वाटे .
अजूनही अविवाहितच होता तो .दरवर्षी गणपतीला त्याच्या लग्नाचा विषय निघत असे आणि हसून तो टाळत असे .कारकिर्दीला उतरती कळा लागली की लग्न करायचे असे त्याने ठरविले होते . यावर्षी ही गणपतीसाठी दहा दिवस गावी जाणार होता.
एका निर्मात्याने त्याला नवीन चित्रपटाची ऑफर दिली होती.पण शुटिंग गणपती उत्सवात करायचे अशी अट होती .तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट त्याने केला असता तर अजून प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला असता आणि हिंदी चित्रपटसुष्टीची दारे त्याच्यासाठी उघडली असती .पण त्याने नकार दिला.
आता तो शांतपणे आपली बॅग भरत गावी जाण्याची तयारी करत होता .शंकर ,वहिनी आणि त्याच्या मुलांनाही आपल्या बरोबर घेऊन जावे असे त्याला वाटत होते .पण शंकर खूप मानी आहे तो यायला नकार देईल हे त्याला माहित होते .तो नाही मग वहिनी ही नाही आणि मुले ही नाही .शंकरने मोठे घर घ्यावे ,आणि चांगली नोकरी करावी यासाठी मित्रांकडे शब्द टाकायची तयारी होती त्याची पण तो ऐकणार नाही याचीही खात्री होती त्याला.  जाऊदे कोकणी माणूस आपला स्वभाव सोडणार नाही.
आता गणपतीचे दहा दिवस फक्त आपल्या कुटुंबासमवेत घालवायची आणि  मज्जा करायची असे ठरवत विनायक सुर्वे उर्फ विनयकुमार आपल्या कारमध्ये बसला.
© श्री. किरण बोरकर

Thursday, August 17, 2017

कोकण आणि गणेश उत्सव

स्थळ.. मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेले ठिकाण
सुपरस्टार विनयकुमार  शांतपणे आपली बॅग भरत होता .त्याचे खरे नाव विनायक सुर्वे .कोकणातील आपल्या गावी गणपतीसाठी जाण्याची तयारी करीत होता .दरवर्षी गणपतीसाठी गावी जाण्याचा रिवाज अजूनही पाळत होता तो .त्यासाठी त्याने नवीन चित्रपटही नाकारला होता. शंकरलाही आपल्याबरोबर कारने घेऊन जायचे का ?? पण शंकर मानी  आहे .भाऊ असला तरी आपल्याबरोबर येणार नाही याची खात्री होती त्याला .
स्थळ... मुंबईतील एक मध्यमवर्गीय वस्ती
शंकर सुर्वे पोरांच्या पाठीवर धपाटे घालीत आणि बायकोच्या अंगावर ओरडत गावाला जाण्याची तयारी करीत होता . मोठ्या मुश्किलीने सुट्टी मिळाली होती त्याला . नाहीतरी तो गेलाच असता म्हणा .कितीही झाले तरी गणपती उत्सव गावाच्या घरात साजरा करायचा ही परंपरा होती .यावर्षी तरी विनायकचे लग्न होऊदे म्हणून साकडे घालणार होता.लग्न झाले तर दोघे पुढच्यावर्षी पूजेला बसतील . असेल तो मोठा सुपरस्टार पण पहिला भाऊ आहे माझा .
स्थळ .... केरळातील एक कॉर्पोरेट ऑफिस
हातातील पेपर्सवर भराभर सह्या करीत नामदेव सुर्वे आपले काम संपविण्याचा मागे लागला होता . संध्याकाळचे विमान पकडून त्याला मुंबईला जायचे होते .तिथून कोकणात आपल्या गावी . दरवर्षीप्रमाणे यंदाही हा नियम मोडणार नव्हता .तो एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर काम करीत होता .पुढील दहा दिवसासाठी आपली सर्व कामे सहकाऱ्यांवर सोपवून निघणार होता. यावर्षी तरी शंकरला आपल्याकडे बोलवून छान नोकरी द्यावी असे ठरविले होते . त्या छोट्या चाळीत ,छोट्या कंपनीत काम करून आपले आयुष्य वाया घालवावे हे पटत नव्हते त्याला .
स्थळ....कॅनडा
प्रसिद्ध उद्योगपती अरविंद सुर्वे आपल्या कुटुंबासह विमानतळावर हजर होते .दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा दिवस कोकणातील आपल्या गावी जायचे असा रिवाज होता त्यांचा . मुले आधी कटकट करायची.आतापर्यंत त्यांनी हुशार प्रसिद्ध उद्योगपती  पहिला होता होता .कोकणातील बाप नाही  . एक आवाज काढताच सरळ झाली .यावर्षी तरी नामदेवला कॅनडात घेऊन यायचे असे ठरविले होते .त्याच्या बुद्धीची कदर इथेच होईल याची खात्री होती त्याला . बघू काय होते .
स्थळ...कोकणातील एक छोटे गाव
सुदाम सुर्वे आपल्या हातातील डेकोरेशनचे सामान सांभाळत घरात शिरला .अजून खूप कामे  बाकी होती.गणपतीला सर्व भाऊ कुटुंबासमवेत घरी येतात याचा त्याला फार अभिमान होता ..आई वडील गेल्यानंतर खूप कष्टाने त्यांना वाढविले होते .आज जो तो आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध होते .पण जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी गणपतीसाठी गावी यायचेच .हीच तर खरी कोकणातील परंपरा आहे .
गणेश चतुर्थीचा पहिला दिवस
पारंपरिक वेशात ,डोक्यावर पांढऱ्या शुभ्र टोप्या घालून सारे भाऊ आपल्या मुलासह गणपती घरी घेऊन आले .नऊवारी लुगडे ,नाकात नाथ आणि दागिन्यांनी मढलेल्या आपल्या कुटुंबाकडे पाहून मन आनंदाने भरून गेले .आता दहा दिवस आपले शहरी आयुष्य ,डोक्यावरच्या कामाचा बोजा विसरून  गजाननाच्या चरणी स्वतःला वाहून घेणार होते ते .
© श्री.किरण बोरकर

तिरस्कार आणि प्रेम

आई बाबांच्या   लग्नाचा बावन्नवा वाढदिवस साधेपणाने करायचे असे प्रमोदने ठरविले तेव्हा मला आश्चर्य वाटले .आई बाबांबद्दल त्याच्या मनात किती प्रेम होते हे आम्हाला माहीत होते .त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस किती झोकात केला होता ते आम्हाला माहीत होतेच . विक्रमला याचे कारण विचारले तर नेहमीप्रमाणे उत्तर आले जेवण मिळतेय ना एक वेळ फुकट ? मग जास्त विचार का करतोयस.?गप जेवू आणि घरी जाऊ.मी हात जोडले .
वाढदिवसाला आम्हा दोघांचेच कुटुंबीय बाहेरचे होते . सर्व मिळून पंधराजण असतील .कार्यक्रम सुरू होताच माईंची थोडी कटकट चालू झाली . अण्णांच्या प्रत्येक वाक्यावर, शब्दावर काहीतरी आक्षेप घेत होत्या . प्रत्येक गोष्टीवर काहीतरी निषेधाचे सूर होतेच .आम्हाला थोडे खटकलेच .पण म्हातारा म्हातारी चे प्रेम असेल म्हणून आम्ही गंभीरपणे घेतले नाही . तरी बाहेर आल्यावर विक्रम बोललाच म्हातारी सरबरलीय.किती कटकट करते.
काही दिवसांनी अण्णा नातवाला घेऊन गार्डनमध्ये बसले होते .मला पाहून हात हलवला.
मी जवळ जाऊन म्हटले "काय अण्णा ?? एकटेच..!! माई कुठेय" ??
ते हळूच हसले ",ती नाही म्हणाली .आता काय तरुण आहोत का गार्डन मध्ये बसून बोलायला? वय झाली आपली .असे म्हणत अर्धा तास लेक्चर दिले . मी आलो ह्याला घेऊन".
" एक विचारू अण्णा" ?? मी शेजारी बसून विचारले  "या वयात प्रेमाने हसत खेळत राहायचे सोडून सतत भांडणे का होत असतात तुमची ".
अण्णा हसले पण त्यात वेदनाच जास्त दिसत होती .
"अरे ह्या वयात चालायचच  अस ,आता उत्तरार्ध चालू झालाय आमचा .थोडीफार उणी दुणी निघणारच .शेवटी बावन्न वर्ष संसार केला आहे आम्ही .अण्णा माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाले .
"तसे नाही अण्णा ,मी लहानपणापासून तुम्हाला पाहतोय.आदर्श जोडपे म्हणून  तुम्हाला ओळखले जायचे . पण काल माईंचे  वागणे विचित्रच वाटले .इतका राग आहे तुमच्याबद्दल ?? तुमच्या प्रत्येक वाक्याला तिच्याकडे तिरकस उत्तर तयार होते .आणि तुम्ही ही काही बोलत नव्हता .इतके शांत कसे राहता तुम्ही." मी थोडे आग्रहाने विचारले .
अण्णा परत हसले", खरे सांगू भाऊ ?? ,तिला माझा राग नाही येत .तिचे माझ्यावर अजूनही पूर्वी इतकेच प्रेम आहे .पण हल्ली ती जाणवू देत नाही . रात्री अपरात्री मध्येच उठलो की ही पटकन जागी होते .बुधवार,रविवार आठवणीने माझ्या आवडीची मच्छी आणते .उशीर झाला तर  नातवाला काहीतरी करण सांगून फोन करायला लावते.
"पण तरीही इतकी कटकट का करते" मी चकित होऊन विचारले.
"कारण ती तयारी करतेय ?? अण्णांनी शांतपणे उत्तर दिले .
" कसली तयारी "??  मी हादरून गेलो .
"माझे मरण सहन करण्याची.....असे पाहून नकोस . खरे तेच बोलतोय.इतक्या वर्षाचा संसार ,सारी सुखदुःखे एकत्र भोगलेली .कठीण परिस्थितीत एकमेकांना साथ दिलेली .तर पै पै साठवून संसार उभा केलेला . कसे विसरू शकतो आपण?? आणि त्या संसारातील आपला साथीदार अचानक निघून गेला तर ? किती धक्का बसेल दुसऱ्याला.?  तोच धक्का सहन करायची तयारी चालू आहे तिची....आतापासूनच तिरस्कार करायला सुरुवात करायची .इतका तिरस्कार करायचा की मी अचानक गेलो तरी त्याचा धक्का ती सहन करेल ".
"पण अण्णा तुमच्या आधी ती गेली तर ? मी गंभीर झालो.
"पुरुष थोडे धीट असतात .त्यांनी आधीच हा विचार केलेला असतो. स्वतःची दुःखे पुरुष कधीच उघडपणे व्यक्त करीत नाहीत .पण आतल्या आत रडत असतो . आमचे आज ना उद्या जाणे मी स्वीकारलय आणि ती ते पचवायची ताकद निर्माण करतेय .कदाचित हे सर्व नैसर्गिक असावे निसर्गचक्र चालू राहण्यासाठी . काल प्रमोदने  वाढदिवस  घरीच साजरा केला . उगाच लोकांपुढे  तमाशा नको असे त्याला वाटले असेल".असे बोलून त्यांनी नातवाला हाक मारली आणि त्याचा हात धरून घरची वाट धरली .
© श्री. किरण बोरकर