Thursday, February 28, 2019

बदलती मुंबई

बदलती मुंबई
दत्तूनाना शिरगावकर कायमचे गावी चालले पण त्यांच्याबरोबर रमाकांत ही जातोय हे ऐकून आम्हाला जास्त धक्का बसला.
रमाकांत... दत्तूनानांचा एकुलता एक मुलगा.इथेही चांगला सर्विसला आहे . पण सर्वच शिरगावकर कुटुंब  कायमचे कोकणात निघून जातायत हा धक्का  आम्हाला काही पचनी पडला नाही.
संध्याकाळी मी आणि विक्रम त्यांच्या घरी गेलो .रम्या खरेदीसाठी बाहेर गेलेला.घरात फक्त दत्तूनानाच होते . "मला वाटलेच ...तुम्ही येणार आज .विकी घरात कोणीच नाही  तेव्हा तूच आत जाऊन चहा कर आपल्यासाठी" नाना हसत हसत म्हणाले.माझ्याकडे चिडून पाहत विक्रम आत गेला.
"नाना ...अचानक गावी स्थायिक होण्याचा निर्णय ....?? मी विचारले .
"इथे काय राहिलय .."?? नानांचा उलट प्रश्न.
"याच मुंबईने तुम्हाला खूप काही दिलय नाना.." विक्रम रिकामा कप हातात घेऊन बाहेर येत म्हणाला.
"मान्य.. पण तेव्हा मुंबईला आमची गरज होती. मी इथे आलो तेव्हा सगळीकडे मोकळे वातावरण होते . सर्वाना कामे मिळायची .महागाई नव्हती. खाण्याचे वेगवेगळे प्रकार नव्हते त्यामुळे चॉईस नव्हता .लोकल रिकाम्या धावायच्या .."नाना हसत म्हणाले.
" म्हणजे आता खाणे परवडत नाही म्हणून चाललात...??? विक्रम हसत म्हणाला. वातावरणातील ताण निवळला . आम्ही सर्व हसलो.
"अरे ....मी मुंबईत आलो तेव्हा हातात एक पिशवी आणि खिश्यात पाच रुपये होते. गिरणगावात आमचे गाववाले राहत होते .त्यांच्यात राहून मी गिरणीत कामाला राहिलो  आणि तेव्हाचे आयुष्य सुखी होते .संध्याकाळी चौकात एकत्र जमायचे . मग कोणी नकला करायचे तर कोणी पोवाडा गायचे . तर काही जण गुत्त्यात बसायचे .हो ...पण कोणाला आग्रह नाही हा दारू प्यायचा. मालवणी मसाल्याच्या वासानेच वातावरण धुंद व्हायचे . इथे कधीही कोणाकडे गेले की घोटभर चहा प्यायल्याशिवाय घरातून बाहेर पाठवीत नसत.मी गिरणीत माझ्या मेहनतीने जॉबर झालो. पण आमच्या गावावल्यानी कधी जाबर केला ते कळलेच नाही". दत्तूनानं हसत हसत जुन्या आठवणीत रमून गेले.
"मग नाना ....आताच का मुंबई न आवडेनाशी झाली ...?? विक्रम गरम चहाचा पेला त्यांच्या हाती देत हळूच म्हणाला .हातातील चहाकडे पाहत पुन्हा दत्तूनान आठवणीत रमले .
"अरे चालू झाला तो भयानक गिरणी संप .. एक आयुष्यभसर न विसरता येणारी काळी आठवण . होत्याच नव्हतं झालं रे .. चूक कोणाची ते माहीत नाही . पण आम्ही भिकेला लागलो .रम्याची आई हिकमती म्हणून कंबर कसून कामाला लागली . मिळेल ती कामे केली . रमाकांतला शिकवले . कधी पापड लाटले तर कधी कोणाच्या घरी लग्नकार्याची खरकटी भांडी घासली . भाऊ ..विचार तुझ्या बायकोला काय हाल काढले तिने आणि तिच्या आईने ... ..?? तरीही सर्व एकत्र राहिलो हो ... एक चपाती ही सर्वांनी मिळून खाल्ली . नंतर नुकसान भरपाई काही मिळालीच नाही . आमचे नशीब थोर म्हणून मुलगा पदवीधर झाला . चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला . बाकीची पोर गेली गँगवॉर मध्ये . तर कोणी दुकानात सेल्समन .तर कोणी वडापाव विकत .आमची उरलेली आयुष्य पोरांची दुःख बघतच जाणार असे वाटू लागले .."
"असे कसे नाना...??  रम्या आता व्यवस्थित कामाला जातोय .बायको ही चांगली भेटलीय त्याला.मुले ही छान आहेत मुख्य म्हणजे तुमचे संस्कार आहेत त्यांच्यावर "मी म्हणालो.
"हो रे ....ते सर्व कबूल. पण हल्ली ह्या मुंबईत गर्दी किती वाढलीय .आमच्या गिरण्या गेल्या तिथे मॉल आले  सोन्यापेक्षाही जास्त भाव जमिनीला आला . कॉर्पोरेट पार्क आले.  फॅक्टऱ्या बाहेरच्या राज्यात गेल्या . जे कमी शिकलेत त्यांनी हमाली नाहीतर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करा .. सरकारी नोकरीसाठी वशिलेबाजी सुरू झाली ..मुलांची शाळेची फी किती महाग झाली आणि हो ...ते नवीन काय इंटरनॅशनल स्कूल चालू झालेत . मराठी अनुदानित शाळेत मुलांना पाठविणे कमीपणाचे वाटते हल्लीच्या पालकांना . महानगर पालिकेच्या शाळा तर बंद पडायच्या मार्गावर.अरे ....तुम्ही तर सर्व एकाच शाळेत तेही मराठी माध्यमात शिकलात ना ...?? मग तुम्हाला काही  प्रॉब्लेम नाही आला तो कधी ..नानांनी प्रश्न केला .
"कारण आम्ही आमच्या पालकांची परिस्थिती पाहिलीय. त्यांच्याबरोबर आम्हीही भोगलय म्हणून आम्ही आमच्या कर्तबगारीवर उभे राहिलो .. "मी अभिमानाने म्हणालो.
"हो ...पण ती परिस्थिती तुमच्या मुलांना नाही जाणवू दिली तुम्ही . कॉर्पोरेट पार्कमुळे मोठ मोठ्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या . त्यामुळे बाहेरचे मुंबईत येऊ लागले . त्यांच्याकडे शिक्षण होते . पैसा होता त्यामुळे मुंबईतील जागेचे भाव वाढले  मूळ मुंबईकर चढ्या भावाला जागा विकून बाहेरगावी जाऊ लागला . इथे एकटेच राहायला मिळतेय म्हणून तरुण तरुणी त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ लागले . नको त्या वयात भरमसाठ पगार आणि घरची जबाबदारी नाही ..मग व्यसन आली . आपल्या नाक्यावर बघ कित्येक तरुण तरुणी सिगारेट पीत असतात . काही ठिकाणी तर बार ही मुलीने फुल असतात . रात्रभर पबमध्ये गोंधळ घालायचा  पहाटे नशेत घरी यायचे हेच चालू आहे .गर्दीमुळे ट्राफिक वाढतोय.... दहा मिनिटाच्या प्रवासाला एक तास लागतोय .हवेमध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढतेय . त्यामुळे ऋतू बदलतायत .प्रदूषण इतके वाढलेय की 90% लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे . त्यामुळे औषधांच्या किमती वाढल्या. सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी तर खाजगी हॉस्पिटल भरमसाठ फी घेतात. अरे ...!! ह्या मुंबईत प्रदूषणविरहित कोणतीही वस्तू मिळत नाही . मिळते ते विकत घ्यावे लागतेय . पाणी पाहिजे तर फिल्टर घ्या .हवा पाहिजे तर एअर कंडिशन घ्या. गावी असलेला माझा सासरा नव्वद वर्षाचा आहे. तो अजूनही शेतात जातो ..चष्म्या लावीत नाही . कसला आजार नाही आणि मी बघ..?? मधुमेह ..गुढगेदुखी.. असे अनेक आजार घेऊन बसलोय .तेव्हा पुरे झाले हे ...आता गावी जातो . शेती आहे ..कलम आहेत ,वर्षाचे पाच सहा लाख उत्पन्न येईल . तब्बेत चांगली राहील .. पोरही खुश रहातील .."नाना पोटतिडकीने बोलत होते .
"तुमचा मुद्दाही विचार करण्यासारखा आहे नाना.. पण मुंबईतील मूळ माणसेच अशी जाऊ लागली तर मुंबईचे काय होईल ....??विक्रम ने विचारले .
"काही होणार नाही मुला... परिस्थितीनुसार मुंबई बदलली पण तुम्ही ते स्वीकारत नाही. त्यानुसार उपाययोजना करीत नाही .तुम्ही त्यातून मार्ग काढण्यापेक्षा अजून  तिच्यावर बोजा टाकताय..मुबई बदलली आहे तुम्ही ही बदला...."असे म्हणून त्यांनी आम्हाला हात जोडून नमस्कार केला.
मी आणि विक्रमने एकमेकांकडे हताश नजरेने पाहिले आणि बाहेर पडलो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, February 25, 2019

पहिला वाढदिवस

पहिला वाढदिवस
आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता . ते दोघेच साजरा करणार आहेत . पण आपणही त्यांच्यात सामील होऊ .
ती...काय रे ह्याच हॉटेलमध्ये बोलावतेस पार्टीला ..?? दुसरे नव्हते का ..??
तो.. अग पण तुला हेच हॉटेल आवडते ना ..?? लग्नाआधी कितीवेळा बोललीस तू माझे आवडते हॉटेल ..
ती ..हो कारण तुझ्या आवडीचे ड्रिंक इथे मिळत होते आणि तुला नाराज करायचे नव्हते मला. मला तर कधीच आवडले नाही  हे हॉटेल  आणि हे काय त्या दिवशी मी दिलेला शर्ट का नाही घातलास तू ...?
तो.. कोणता तो रेड ..?? ह्या काय तो कलर .. मला फार आवडत नाही तो ...? शिवाय फिट ही फार होतो
ती.. पण लग्नाआधी तर तुला रेड कलर आवडत होता..आणि साईझ ही तीच आणलीय.
तो.. हो ग ते तुला नाराज करायचे नव्हते म्हणून मी घालायचो .
ती..बरे राहू दे आता . पुढच्यावेळी लक्षात ठेवेन . आणि प्लिज ती सिगारेट ओढू नकोस  इथे .
तो .. अरे ... आपण दोघेही लग्नाआधी सिगारेट ओढायचो की. आज बघ तुझा ब्रँड आणलाय आणि तोच पिणार मी . खरे तर तुझा हा बायकी ब्रँड मला कधीच पटला नाही . तुझ्यामुळे पीत होतो .
ती.. मीही तुला कंपनी द्यायलाच पीत होती . तेव्हा मजा म्हणून तुला कंपनी दिली . आता तर वास ही सहन होत नाही .
तो.. ठीक आहे मी माझा ब्रँड पीतो.
ती.. काही गरज नाही तुला प्यायची . मला अजिबात आवडणार नाही .
तो...ह्या.... आणि हा कुठला केक घेऊन आलीस  ..??
ती.. अरे आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तूच म्हणाला होतास मला आवडतो हा केक म्हणून तोच ऑर्डर केला .
तो.. कारण माझ्या खिशाला तेव्हा तोच परवडत होता आणि तुही मलाही आवडतो म्हणालीस . त्यानंतर कधी खाताना पाहिलेस का मला हा केक ...?
ती.. मग आता काय फेकून देऊ का ...??
तो... राहूदे आता .तू काय पिणार ..??
ती.. बियरच घे ..
तो ..अरे तुला टकीला आवडते ना ...? लग्नाआधी किती पियाचो आपण .
ती.. हो कारण पार्ट्या चालू असायच्या आणि आपल्यात न पिणारा बावळट ठरतो म्हणून पीत होते मी .टकीला बरी पडते . एका घोटात संपते .आणि अर्ध्या तासात थोडी उतरते . मग पुन्हा एक शॉट.. पण तुझे काही कमी झाले नाही . वाटले जबाबदारी आली की तू सुधारशील . तुझे पिणे आहे तेव्हडेच आहे .
तो... विषयच काढला आहेस म्हणून बोलतो . बऱ्याच गोष्टी बदलल्या आपल्यात . खरेतर आपला प्रेमविवाह. आपण कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नाही . तेव्हा एकमेकांना कधीच आपण विरोध केला नाही . पण हल्ली प्रत्येक गोष्टीला विरोध .
ती .. हो खरे आहे .. आता बघ ना तू ऑर्डर केलेली डिश मला आवडत नाही पण लग्नाआधी बऱ्याच वेळा आपण ती डिश खाल्ली आहे .
तो .. तुला आईस्क्रीम खाल्ले की सर्दी होते पण माझ्याबरोबर खाण्यास कधी नकार दिला नाहीस . दुसऱ्या दिवशी सर्दीने नाक लाल व्हायचे तुझे .
ती .. हल्ली आपले शारीरिक संबंध ही कमी झालेत .. असे का... ?? लग्नाआधी ही आपल्यात संबंध होते .
तो ... खरे तर तुझी आक्रमक वृत्ती मला झेपत नाही . तुला पाहिजे तेच तू करायला सांगतेस . आणि तुला हवे तेव्हा तू येतेस .माझा विचारच करीत नाहीस
ती.. मग लग्नाआधी तू कधी माझा विचार केलास . रूम रिकामी मिळाली की बोलावं आणि हवे तसे ओरबाडून काढायचास ..तेव्हा मी तुला विरोध केला नाही . आणि हो हल्ली माझ्या घरच्यांशीही तू तुसडेपणाने वागतोस . लग्नाआधी भारीतली मिठाई घेऊन यायचास आता रिकाम्या हाताने येतोस कधी आणलेस तर पाव किलो वेफर्स .
तो.. तू ही लग्नाआधी घरी यायचीस तेव्हा माझी आई माझी आई करीत गोंडा घालयाचीस आता बेसिन मधले कप ही बराच वेळ तिथे पडून असतात . दहावेळा हात धुतेस पण कप धुत नाहीस.
ती.. म्हणजे हल्लीएकमेकांच्या  बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडत नाहीत तर ...
तो.. हो कदाचित ...
ती....माझ्या सहकारी पुरुषांशी जास्त बोललेले ही हल्ली तुला आवडत नाही .. लग्नाआधी आपण सर्व एकत्रच पार्टी करायचो . त्यातील काहींना हाताशी धरूनच मला प्रपोज केले होतेस तू ..
तो.. थोडेसे आवडत नाही हे खरे आहे पण माझ्याही शाळेतील जुन्या मैत्रिणीशी बोललेले तुला कुठे आवडते . बऱ्याचवेळा आपण त्यांच्या घरीही गेलो होतो . माझ्या एका मैत्रिणीचा पुनर्विवाह ही तूच पुढाकार घेऊन केलास .
ती... म्हणजे थोडक्यात आपण एकमेकांवर हक्क गाजवू लागलो तर .....??
तो.. हो आपल्यातील पोसिटीव्ह गोष्टी बाजूला ठेवून आपण निगेटिव्ह गोष्टीचाच विचार करतोय तर ..??
ती.. लग्नाआधी तू पहिला माझा मित्र होतास तेव्हा तू जे काही करायचास त्याने मला काही फरक पडत नव्हता . नंतर प्रियकर झालास तेव्हा तू नेहमी खुश रहावास असे मला वाटू लागले तेव्हा तुझ्या सर्व गोष्टी स्वीकारल्या मी . तुझे सुख तुझा आनंद हा माझा मला वाटू लागला . मग नवरा झालास ..
तो.. हो मग आपण एकमेकांना गृहीत धरू लागलो. एकमेकांना मालकी हक्काचे वाटू लागलो. अरे आता ही कुठे जाणार आहे मला सोडून असा भ्रम झाला . मग न आवडलेल्या गोष्टीत नकार देऊ लागलो. आपण जेव्हा लग्न केले तेव्हाच आपण एकमेकांना गृहीत धरले .आपल्या आवडी निवडी ,सवयी पुन्हा मूळ जागी म्हणजेच आपल्यात परत आल्या .
ती.. खरे आहे ...मग यावर उपाय काय ...
तो ... वेगळे व्हायचे का ...?? आणि परत मित्र बनूया
ती.. की आपल्या सवयी आवड स्वप्ने ऍडजस्ट करत एकत्र राहूयात ...?? पैश्याचा तर प्रॉब्लेम नाही ..
तो .. पण कितीही झाले तरी आपली कोणतरी काळजी घेतेय.,घरी वाट पाहतेय ही भावना सुखद असते .  तिच्या डोळ्यातील काळजी आणि प्रेम पाहून सर्व टेन्शन विसरून जायला होते .
ती .. खरे आहे रे . ... अंगात ताप असला की तू उठू नकोस झोपून राहा माझे मी आटपतो असे म्हणत स्वतःची तयारी करणारा आणि नंतर  गरम चहा स्वतःच्या हाताने पाजणारा नवरा असला की वाटते यासारखे सुख नाही . बाहेर पडल्यावर कधी फोन न करणारा यावेळी मात्र दर दोन तासांनी फोन करतो .
तो ...मग काय विचार आहे...  टकीला की बियर ..
ती ... तू हा केक खाणार असशील तर मी टकीला शॉट मारेन...
तो ..ओके डन ...वेटर दोन टकीला शॉट प्लिज .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, February 23, 2019

मखलाशी... शिरीष कणेकर

मखलाशी...... शिरीष कणेकर
राजा प्रकाशन
शिरीष कणेकर मला खूप आवडतात . त्यांची शैली सर्वसामान्य माणसाच्या जवळ जाते . चालता बोलता  अगदी सहज चिमटे काढतात ते.सोपी भाषा ,शोधक नजरेने ते व्यंग शोधत असतात . मनमोकळी निवेदन शैली . त्यामुळे त्यांचा विनोद आपल्या घरातच घडतोय असे वाटते.त्यांचा हा कथासंग्रह नक्कीच हसवेल तुम्हाला.

Friday, February 22, 2019

मुमताज

मुमताज
" अरे मुमताज .....!! यहा किधर..... ?? कितने सालों बाद आज दिखाई दी तुम......?
"माफ कीजिये.... मैं मुमताज नही हु.माझे नाव अनघा आहे.आपण मुमताज का म्हणालात.....???
"ओ हो ....!! सॉरी..मला वाटले तुम्ही मुमताज आहात.
" पण का असे वाटल....?? सांगा तर.... मी रागावणार नाही "
"खरे म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वी पनवेलच्या नाईट क्वीन बारमध्ये एक डान्सर होती ती तुमच्यासारखी दिसायची.मला वाटले त्या तुम्हीच ..माफ करा मला "
"हरकत नाही....खरे तर तीच आहे मी .पण खूप वर्षे झाली.हे नाव आता विसरते मी.. पण तुम्ही कोण...?? आता तेव्हडे आठवत नाही.... !"
"बरोबर आहे, खूप जणांशी रोज तुमचा संबंध... पण फाटक्या नोटा फेकल्या तरी तुम्ही मला किस द्यायचा ..आठवले का आता ???
"अरे हो....आता आठवले. हा..! हा..! हा.. !तूच तो.. फटी नोटवाला.... आम्ही तुला नाव ठेवले होते. े"निर्लज्ज कुठला....""
"आता काय चालू आहे ...."???
"काही नाही..अचानक डान्स बार बंदी झाली. आम्हाला तर तेव्हढेच येत होते.एका रात्रीच रस्त्यावर आलो.पैसा कमावला होता भरपूर.... पण साठवायची आणि गुंतवायची अक्कल नव्हती. ऐशआरामाची चटक लागलेली..आठवड्यात कंगाल झालो.... ".
"मग त्या नंतर काय केलेस....."??
"अरे त्या वेटर अनिल बरोबर लग्न केले मी.दुसरा कोण स्वीकारणार आम्हाला...?? जो तो रात्रीपुरता मागायचा .पण मी तेव्हा कधीच कोणाबरोबर गेले नाही.संसार करावा..मुलेबाळे असावीत इतकेच स्वप्न होते माझे ...पण या बंदीमुळे जमिनीवर आपटले मी. नशीब डोक्यावर छप्पर होते .सगळे माहित असणारा समजून घेणारा  नवरा आहे ..एक मुलगी आहे.."
"अरे वा ....! छान.... !"
"मग काय....!!  पुढे पैसे मिळवण्यासाठी कष्ट करायला सुरवात केली .मिळेल ते काम केले .हळू हळू सावरले, पैशाचे महत्त्व कळले. तेव्हा नको त्या वयात नको इतका पैसा कमावला पण अक्कल नव्हती.तुझ्या महिन्याच्या पगराइतके पैसे एका रात्री कमवायचे मी....असो तू काय करतोस आता... ???
"मी....? ओके ...नोकरी करतोय ...संसार आहे ..बाकी सगळे बंद"
"छान....!!  माझी मुलगी आता आर्किटेकच्या लास्ट वर्षात आहे .कदाचित पुढे अच्छे दिन आयेंगे..खूप भोगले मी आयुष्यात .लोकांची पैसे कमांवण्याची धडपड पहिली .खूप घृणा येते मला माझी .त्याच्या कष्टाचे पैसे ते आमच्यावर उडवायचे .आज खूप बरे वाटते , गरिबीत का होईना माझ्या मुलीला कष्टाच्या पैशाने वाढवतेय...पण एक सांग... तू नेहमी फाटक्या नोटा कुठून आणायचास..."?? मालक खूप चिडायचा आमच्यावर कोणी आणल्या ह्या नोटा म्हणून.. "??
"मग तू कधी बोलली नाहीस त्याला... ??माझे नाव सांगितले नाहीस....??
"नाही सांगितले...??? माहित नाही का ...?? कुठेतरी तरी मनाने खूप मोकळा आणि चांगला वाटलास.तुझे तिथे येणेही इतरांसारखे नव्हते .खूप व्यवहारी  वाटलास तू,...गुंतत नव्हतास तू कशात ..नाही दारू ..नाही समोरची बाई...," आताही तुझ्याशी बोलताना मोकळेपणा वाटतो . मनापासून ऐकून घेतोस तू माझी गोष्ट.."
"अरे ....? थँक्स...., असे काही नाही.त्यावेळी तरुणपणाचा जोश होता . पण खिश्यात पैसे नसायचे. म्हणून कंट्रोल करत जास्त मज्जा कुठे मिळेल ते पाहायचो .मित्रांचे किराणा मालाचे दुकान होते. तो फाटक्या नोटा ही स्वीकारायचा . म्हणायचा जाऊ दे रे गरीब माणसांकडून कुठे नोटा बदलून घेऊ. मग तुमच्या बारमध्ये त्याच नोटा घेऊन यायचो . तुही काही न बोलता त्या नोटा घ्यायचीस तेव्हा आश्चर्य वाटायचे .थोडे  फील झाले आणि त्या  आठवणी  अजूनही आहे .म्हणून अचानक दिसलीस आणि राहवले नाही. ठीक आहे. भेटू पुन्हा कधी...".
"नाही सॉरी....!!  आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, मागील भूतकाळातील वाईट पान पालटून मी खूप पुढे निघून आले आहे. माझ्या भूतकाळाची काळी छाया आता माझ्या मुलीच्या भविष्यावर नको , त्यामुळे आपली हि शेवटची भेट आहे. राग मानू नकोस. पण तू समजून घेऊ शकतोस. मी माझ्या भूतकाळाला ओळख देत  नाही आणि कोणाशीही या विषयावर बोलत नाही ..."
"अगं ठीक आहे... मी नक्कीच समजू शकतो. राग धरण्याचा तर प्रश्नच नाही. कारण काही असो पण त्या नरकातून तुझी सुटका झाली आणि आज ताठ मानेनी तू जगत्येस हे बघून खरंच खूप बरं वाटलं."..... बाय .

(C) श्री. किरण  कृष्णा बोरकर

Wednesday, February 20, 2019

खिल्ली ..... पु. ल.देशपांडे

खिल्ली ..... पु. ल.देशपांडे
श्रीविद्या प्रकाशन
खरेतर या पुस्तकाबद्दल लिहिण्याची गरज नाहीच.पु.ल.च्या पुस्तकावर लिहायचे नसते तर फक्त वाचून आनंद घ्यायचा  असतो. यात त्यांनी समाजातील काही प्रतिष्टित व्यक्तींची आणि समाजातील काही घटकांची आपल्या खेळकर शैलीत खिल्ली उडवली आहे.प्रस्तावानेतच त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे जर प्रत्यक्षातील व्यक्तींशी या पुस्तकातील पात्रांशी साम्य आढळले तर तो योगायोग समजू नये तर ते खरे आहे .नेते मंडळींची वक्तवे आणि प्रत्यक्षातील कृती यामध्ये अफाट विसंगती असते हे पु.ल.नी दाखवून दिले आहे .यातील सर्व लेख 1972 ते 1981 पर्यंतच्या दिवाळी आणि इतर वर्तमानपत्रात छापून आले होते . आताच्या पिढीला हे वाचताना थोडा कंटाळा येईल कारण काहीच संदर्भ लागणार नाहीत . पण पु.ल.च्या शैलीसाठी जरूर वाचावे .

Monday, February 18, 2019

अशीही श्रद्धांजली

अशीही श्रद्धांजली
आज त्या स्मशानातील वडावर मोठी गडबड दिसत होती.आजूबाजूच्या झाडावर बरेच कावळे बसून होते . काही कावळ्यांनी वडाच्या ढोलीत मेलेले उंदीर,बाजारातील मासे ,पिंडावरील भात आणून ठेवला होता .एकंदरीत वडाच्या झाडावर काहीतरी गडबड होणार हे नक्की.अर्थात सर्वसामान्य माणसांना याचा काही पत्ता नव्हता.ती बिचारी स्वतःच्या दुःखातच मग्न होती. पण आज सगळ्याच पिंडांना कावळे पटापट कसे शिवतात याची नेहमीच येणार्यांना उत्सुकता वाटत होती.
इतक्यात आकाशात काहीतरी गडबड उडाली . आजूबाजूचे सगळे कावळे सावध झाले .काव.....काव.. करीत त्यांनी इतरांना इशारा दिला आणि अखिल भारतीय कावळे संघटनेचे अध्यक्ष श्री. का. ळा. काक यांचे आगमन झाले.त्यांच्यामागून देशाच्या विविध राज्यातील कावळे संघटनेचे प्रतिनिधी येऊ लागले . श्री.काक केवळ अखिल भारतीय कावळे संघटनेचे अध्यक्ष नव्हतेच तर महाराष्ट्रातील कावळा संघटनेचे ही अध्यक्ष होते .  पूर्ण देशातील प्रतिनिधी एकत्र म्हणजे विशेष काही घडले आहे हे नक्की याची खात्री आजूबाजूच्या कावळ्यांना झाली .मीटिंग ला ताबडतोब सुरवात झाली.
"मित्रानो .....तुम्हाला माहीतच असेल की आपल्या देशातील काही जवानांवर नुकताच एक भ्याड हल्ला  झालाय . बेसावध क्षणी झालेल्या त्या हल्ल्यात आपले  42 जवान मारले गेले.आता तुम्ही म्हणाल आपला काय संबंध .....?? ते मानव आहेत .त्यांचे ते बघतील . पण त्या मानवांमुळे आपणही जगतोय . ते आपल्याला खायला देतात . आपल्याला दशक्रिया विधीला मोठा मान देतात.मुख्य म्हणजे ते आपल्याला कधीही मारत नाहीत. आपली शिकार करीत नाहीत. तर ...आपण त्या शाहिद जवानांसाठी काहीतरी केले पाहिजे ".
सर्व प्रतिनिधी अवाक झाले.ह्यासाठी आम्हाला लांबून बोलावले ....?? "तुमच्यामते काय केले पाहिजे ..."??एक प्रतिनिधी म्हणाला.
"मुळात आपले काम काय आहे ...??? श्री काक यांनी प्रश्न विचारला .
"मृत व्यक्तींच्या पिंडांना आपण चोच मारतो तेव्हा त्यांच्या आत्मास शांती मिळाली ..मुक्ती मिळाली.. असे समजले जाते .."?? दुसरा प्रतिनिधी उत्तरला.
" आणि नाही चोच मारली तर ....."?? परत काक यांनी प्रश्न केला .
"तर त्यांचे नातेवाईक पिंडासमोर त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू अशी वचने देतात ......??? आपल्याला अर्थात मृत व्यक्तींचे ऐकून चोच मारावी लागते...".त्या प्रतिनिधीने उत्तर दिले .
"ठीक आहे ...मग यापुढे त्या 42 जणांच्या पिंडाला आपण स्पर्श करायचा नाही.असेही त्यांचे आत्मे अतृप्तच आहेत. या अश्या मृत्यूने त्यांचे आत्मे कधीच मुक्त होणार नाही त्यांना बदला घ्यायचाय आणि जोपर्यंत त्याच्या दिवसाला आलेले पिंडासमोर हात जोडून बदला घेऊ असे म्हणत नाहीत तोपर्यंत आपण पिंडाला चोच मारायची नाही.."श्री . काक यांनी संतापाने काव काव करीत आपले म्हणणे स्पष्ट केले .
"पण त्याने काय होईल ....."?? एका प्रतिनिधीने शंका काढली .
"त्याने किती फरक पडेल ते माहीत नाही ... पण भारतात सोशल मीडियाचे प्रमाण जास्त आहे . जे दिसेल त्याची विडिओ शूटिंग काढून ते प्रसारित करण्याची वाईट खोड आहे . माणूस काय करतोय याच्याशी आपल्याला मतलब नाही. पण या देशात आपण राहतो . ही माणसे आपला तिरस्कार करतात ..किळसवाण्या नजरेने पाहतात .पण योग्य ठिकाणी आपल्याला मान ही देतात .आपण कोणाच्या खिडकीत गेलो की काहीतरी आपल्या पुढ्यात टाकतात.दशक्रियेच्या दिवशी आपल्यापुढे हात जोडतात .आज त्याचाच फायदा घेऊन आपण अशी श्रद्धांजली त्या शाहिद जवानांना द्यायची आहे . बोला आहे मंजूर ....?? श्री . काक यांनी खणखणीत आवाजात विचारले .सर्वांनी काव काव करून पाठिंबा दर्शविला.हा ठराव आपल्या राज्यातील कावळ्यांना सांगण्यासाठी सर्वांनी आकाशात झेप घेतली आणि परतीच्या वाटेला निघाले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर