Saturday, March 30, 2019

ऑपरेशन ब्लू स्टार  जस घडलं तस.

ऑपरेशन ब्लू स्टार  जस घडलं तस... ले. जन. के.एस. ब्रार
अनुवाद....भगवान दातार
रोहन प्रकाशन
मुळात सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाईची खरोखर गरज होती......? तर त्याचे उत्तर होय असेच होते. पंतप्रधान इंदिरा गांधींनी शेवटच्या क्षणापर्यंत ही कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केले.
ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त लष्करी कारवाई होती.त्याचे नेतृत्व करणारे ले. जन. ब्रार आजही शीख अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत . इतकेच नव्हे तर 30 सप्टेंबर 2012 मध्ये लंडन येथे त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला.
या कारवाईचे प्रमुख पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या हत्या झाल्या . तर त्यांच्या हत्येस जबाबदार असणारे आणि हत्या करणारे हुतात्मा म्हणून गौरवले गेले.
लोकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावे यासाठी ले .जन. ब्रार यांनी स्वतः अनुभव  लिहायचे ठरविले . त्यांनी या कारवाईचे अचूक आणि तपशीलवार वर्णन केले आहे .
प्रमुख अतिरेकी संत भिद्रानवाले यांनी घेतलेला सुवर्ण मंदिराचा ताबा . त्यात दडवलेली प्रचंड शस्त्रास्त्रे यावर सरकारने नरमाईचे धोरण घेतले . जातीय तणाव वाढून हिंसाचार होऊ नये ही यामागची भूमिका होती .पण पुढे गोष्टी इतक्या थराला गेल्या की 26 जानेवारी 1984 च्या प्रजासत्ताकदिनी स्वतंत्र खलिस्तानचा झेंडा मंदिर परिसरातील एका इमारतीवर फडकविण्यात आला . अतिरेक्यांना अटक करणाऱ्या पोलिसांच्या हत्या करण्यात आल्या .
सरकारशी संघर्ष उडालाच तरी आपल्याविरुद्ध लष्करी कारवाई होणार नाही असे भिद्रानवाले याना खात्री होती . जास्तीतजास्त निमलष्करी दलाचा वापर होईल असे त्यांना वाटत होते .
पण पंजाबमधील राष्ट्रपती राजवट पूर्णपणे अयशस्वी ठरली आणि प्रशासन व्यवस्था पूर्णपणे कोसळली .
अतिरेक्यांनी पंजाब पोलीसदलात शिरकाव केला त्यामुळे पोलिसदलाने आपली आपली शक्ती आणि अधिकार गमावले तसेच त्याचे मनोधैर्यही खचले .
भिद्रानवाले यांनी अकाल तख्तातून बाहेर यावे यासाठी सर्वांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले .
राज्यातील अन्नधान्याची वाहतूक रोखण्याचे आंदोलन 3 जून 1984 पासून सुरू होणार होते आणि मग राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती आणि म्हणूनच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाई करायची परवानगी दिली . पण त्यासाठी काही अटी घातल्या
कमीत कमी बळाचा वापर
सुवर्ण मंदिराचे कमीतकमी नुकसान
हर मंदिरसाहेबांच्या दिशेने गोळ्या झाडायच्या नाहीत .
कारवाईत भाग घेणाऱ्या सर्व सैनिकांनी मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे . भाविकांना बाहेर पडण्यासाठी मदत केली पाहिजे .
या अटींवरच कारवाई झाली पाहिजे असा त्यांचा स्पष्ट आदेश होता आणि प्रत्येक जवानाने तो काशोशीने पाळला . यात भारतीय लष्कराची फार मोठी हानी झाली.
1 जून 1984 ला ऑपरेशन ब्लू स्टार ला मान्यता मिळाली आणि 5 जून 1984 ला रात्री 9.30 वाजता ऑपरेशन ब्लू स्टार सुरू झाले . जास्तीत जास्त दोन रात्रीमध्ये हे ऑपरेशन संपेल असा अंदाज होता पण ते पूर्ण व्हायला 4 रात्री लागल्या .
अपुरी माहिती ..अपुरा वेळ ..मोजकेच मनुष्यबळ . प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी चुकलेले अंदाज  तर काही ठिकाणी घ्यावी लागलेली अनपेक्षित माघार याचा भारतीय लष्कराला मोठा फटका बसला.प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग...अतिरेक्यांचा चिवटपणा आणि निर्धार पाहून आपण थक्क होतो .
केवळ शीखांच्या नव्हे तर प्रत्येक भारतीयांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडतात.
आपल्या प्राणांची पर्वा न करता आणि दिलेल्या हुकुमाचे तंतोतंत पालन करणाऱ्या भारतीय लष्कराला सलाम.
© श्री . किरण कृष्णा बोरकर
मुंबई
8286837133

Tuesday, March 26, 2019

द बेस्ट लेड प्लॅन्स ... सिडने शेल्डन

द बेस्ट लेड प्लॅन्स ... सिडने शेल्डन
अनुवाद...अनिल काळे
श्रीराम बुक एजन्सी
स्त्रीचा सूड किती योजनाबद्ध आणि भयानक असू शकतो हे आपल्याला  लेस्ली स्टुअर्ट या युवतीमुळे कळते.ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केले त्याच्यासाठी केंटूकीच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत प्रचार मोहीम राबवली. त्याने लग्नाच्या पंधरा दिवस आधी आपल्या जुन्या मैत्रिणीशी लग्न केले तेही हिला कोणतीही पूर्वसूचना न देता......???
ऑलिव्हर रसेल हा तिचा प्रियकर साधा वकील आहे पण एका बलाढ्य सिनेटरच्या मुलीशी लग्न करून तो भविष्यात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनायची स्वप्ने पाहतोय . त्यासाठी त्याला त्याचा सासरा मदत करतोय. त्याचे सासरे एक बलाढ्य उद्योगपती आणि सिनेटर आहेत . आपल्या मुलींसाठी ते काहीही करू शकतात .
  त्याने केलेल्या विश्वासघाताने लेस्ली अंतर्बाह्य पेटून उठली आणि तिने योजना आखून ह्याचा सूड घ्यायचे ठरवले . त्यासाठी काही ठराविक गोष्टींची तिला आवश्यकता होती . त्या तिने कशा मिळवल्या..?? एका साध्या पण हुशार मुलीने शांतपणे हळू हळू त्याच्या मानेभोवती पाश कसे आवळले ..?? ते पुस्तक वाचूनच कळेल .मुळात या कादंबरीत केवळ चारच मुख्य पात्रे आहेत त्यामुळे कादंबरी वाचताना गोंधळ उडत नाही .

Sunday, March 24, 2019

पालखी

पालखी
"ह्या वर्षी तरी पालखीक नेतयस ना.....?? थरथरत्या आवाजात भिकू पेडणेकरानी दशरथला विचारले . तसा तो वैतागला."ओ तात्यानु पडून रवा हो ..?? या वयात खय पालखी ….पालखी करताव. ..हयसूर  वेळ कोणाक हा ...?? तुमचो  नातू दोन वर्षांनी घरी इलोय . त्याच्याबरोबर राहू की चार दिवस... गेलो  की पुन्हा दोन वर्षा येऊचो नाय…."
भिकू तात्यांच्या डोळ्यात पाणी आले . "तसा नाय रे झिला .... पण बरीच वर्षे झाली पालखी खांद्यावर घेऊन . आता लय वाटता रे जाण्यापूर्वी बघूची."  बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून कधी पाणी वाहू लागले ते कळलेच नाही.
भिकू पेडणेकर वय वर्षे 85 .. सध्या सर्व काही बिछान्यावर . बाहेर पडले तर व्हीलचेयरवरच . मुलगा दशरथ पेडणेकर सध्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर...पण आता निवृत्तीच्या वाटेवर . तर नातू निशिकांत  पेडणेकर इंजिनियर ...सध्या परदेशात वास्तव्य . आला तरी केवळ दहा दिवसासाठी भारतात.
भिकू तात्या कोकणातून मुंबईत कामासाठी आले आणि पक्के चाकरमानी बनले .पण सणासुदीला कोकणात जाणे काही थांबले नाही . दरवर्षी होळीला जायचे.... पालखी नाचावयाची….. कुटुंबासाठी नवस बोलायचं आणि तो फेडण्यासाठी पुन्हा पालखीला हजर राहायचे. दशरथ लहानपणी त्यांच्याबरोबर जायचा पण लग्न झाल्यावर बायकोला घेऊन गेला आणि त्यानंतर गावाचे तोंड पाहिले नाही.
पुढे पत्नी गेल्या नंतर त्यांनीही गावी जाणे सोडले . गेल्या चार वर्षांपासून ते अंथरुणावर खिळून आहेत . दरवर्षी होळी आली की केविलवाण्या चेहऱ्याने दशरथला पालखीला नेण्यासाठी विनवतात. पण कोणालाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुकाटपणे डोळे पुसत ते शांतपणे बसले .इतक्यात निशी आत आला .."काय झाले पपा..?? आजोबा का असे बसलेत ...??
"अरे काही नाही रे ...?? गावी जाऊ म्हणतात पालखीला .. बरीच वर्षे गेलो नाही म्हणतात. आता घेऊन चल ... पण आता जमेल का ह्यांना प्रवास .. ती धावपळ ... त्यात कोकणातले रस्ते खराब ..."
निशीने नुसतीच हम्म...!!  करीत मान डोलावली . "पालखीबद्दल बरेच काही ऐकलं आहे मी .. त्यांची इच्छा असेल तर चार दिवस जाऊया पपा ... "तो सहज स्वरात म्हणाला.
"अरे काय ....?? सोपे वाटते का तुला गावी जाणे . तिथे प्रवास बारा तासाचा ...पाण्याचा प्रॉब्लेम.टॉयलेटचा प्रॉब्लेम.." दशरथ चिडून बोलले.
"तरीही माणसे राहतात ना तिथे ...?? पपा जगात इथल्यापेक्षाही भयानक परिस्थितीत लोक राहतात . मलाही काम करताना मनासारखे काही मिळत नाही . चला यावर्षी जाऊच सगळे चार दिवस .. मी गाडीची सोय करतो "असे बोलून वळला पण नजरेच्या कोपऱ्यातून आजोबांच्या डोळ्यातील चमक त्याला सुखावून गेलीच.
नातवाच्या तोंडातून सर्व ऐकताना भिकू तात्याचे  मन प्रसन्न होत होते . अंगात नवचैतन्य आले .दुसऱ्या दिवशी पहाटे ते निघाले . आपल्या मुलाचे आणि नातवाचे मन पालटू नये म्हणून भिकूतात्या स्वतःला फिट दाखविण्याचा प्रयत्न करीत होता . दशरथलाही वडिलांचे हे रूप नवीनच होते . जसजसे गाव जवळ येऊ लागले तसतसे भिकुतात्याच्या  चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला .एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने तो सारा गाव नजरेत साठवून घेत होता . मध्येच नातवाला जुन्या आठवणी सांगत होता . निशीही कौतुकाने सगळे ऐकत होता.
घरी पोचताच एखाद्या राजप्रमाणे त्याचे स्वागत झाले . चुलतभावाने  मिठी मारून त्याचे स्वागत केले . दोघांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते . रात्री दशरथ आणि निशी होळी पेटवायला गेले तेव्हा सर्वजण त्यांची मायेने विचारपूस करीत होते.
निशीने वडिलांना विचारलेही ..की ओळख नसताना देखील ही माणसे कशी आपलेपणाने बोलतात ….??दशरथ हसून म्हणाला "अरे ...हीच तर खरी कोकणाची ओळख आहे . परक्याशी देखील आपलेपणाने वागतात . आज ती आपल्याला भिकूची पोर म्हणजेच आपली माणसे म्हणून ओळखतात.
दुसऱ्या दिवशी पालखी येणार म्हणून रात्रभर भिकू झोपलाच नाही . सकाळी लवकर उठून ठेवणीतले कपडे घालून तो पालखीची वाट पाहत बसला . चुलत भावाला जवळ बोलावून त्याने कानात काही सांगितले तसे त्याने हसत मान डोलावली . मग दशरथ जवळ येऊन म्हणाला "तात्या बोलतत पालखी तुझ्या खांद्यावरून घरात घेऊन ये ."काही न बोलता दशरथने मान डोलावली . पालखी घराजवळ आली आणि दशरथने ती एक बाजूने खांद्यावर घेतली त्याच क्षणी त्याला भरून आले . एक वेगळीच सुखाची  अनुभूती त्याच्या शरीरातून वाहू लागली.त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले . प्रत्यक्ष देवाला घेऊन आपल्या घरी चाललोय ही भावनाच त्याचा उर भरून येण्यास पुरेशी होती . दाटल्या डोळ्यांनी त्याने अंगणात प्रवेश केला . समोर व्हीलचेय वर वडील बसले होते . त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्याला कळले आपण आयुष्यात कोणते सुख कमाविले आहे . वडील आश्चर्याने मागे का पाहताय..?? म्हणून त्याने मागे नजर वळवली आणि आश्चर्याचा अजून एक धक्का त्याला मिळाला .दुसऱ्या बाजूने निशी पालखी घेऊन उभा होता . अतीव आनंदाने सर्वांनी पालखीची पूजा केली आणि निरोप दिला.
दुसऱ्या दिवशी सर्व परत निघाले . प्रवासात दशरथ थट्टेत भिकूतात्याला म्हणाला .."ओ तात्यानु.. देवाकडे काय मागीतलाव ...??
"अरे ..त्या देवाकडे काय सारखासारखा मागूचा .. आपला काय ता आपल्या नशिबात .. उगाच देवावर लोड कित्याक ..? काय मागूचा हवा म्हणून खांद्यावरून घेवून येताव की काय ..?? सर्व हसले.
दुसऱ्या दिवशी सर्व मुबंईला माघारी निघाले .रात्री घरी येऊन सर्व झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी भिकूतात्या उठलाच नाही . मेल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते . बातमी कळविण्यासाठी दशरथने गावी फोन केला .फोनवर रडत रडत म्हणाला "पालखीला जायची त्यांची अंतिम इच्छा होती ती पूर्ण झाली आणि समाधानाने गेले..
पलीकडून चुलते म्हणाले "शेवटची पालखी त्यांनी खांद्यावर घेऊन घरात आणली तेव्हाच म्हणाले होते जो पर्यंत माझा मुलगा पालखी स्वतःच्या खांद्यावर घेत नाही तोपर्यंत मला मरण देऊ नकोस.त्यांनी तुला खांद्यावर घेतलेले बघायचे आहे मला . काल तुम्ही दोघांनी पालखी खांद्यावर घेतलीत तेव्हाच त्याचे जाणे नक्की झाले होते.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, March 19, 2019

मांदार्य...राजेंद्र खेर

मांदार्य.....राजेंद्र खेर
मंजुल पब्लिशिंग हाऊस
अगस्त्य ऋषींच्या कार्याचा आढावा घेणारी ही कादंबरी.देवानी अतिशय काळजीपूर्वक राजकारण करून अगस्त्य ऋषीना देशात कार्य करण्यास निवडले होते . आदिवासी रानटी जमातीत कुटुंबव्यवस्था निर्माण करणे . त्यांना समाजात आणण्यास मदत करणे . नरमांसभक्षणापासून दूर करणे ,शेती आणि इतर उदरनिर्वाहच्या गोष्टी शिकवणे. त्यांनी मेहनतीने संपूर्ण देशात क्रूर दानवांचा विनाश करून एक ठराविक आचारसंहिता आणली.दक्षिणेकडून त्रासदायक ठरलेल्या रावणाचे उच्चाटन कसे करायचे याची योजना आखली गेली. दशरथ राजा आयोध्येतून रामाला बाहेर सोडणार नाही पण रामच रावणाचा नाश करू शकतो त्यासाठी रामाला आयोध्येतून बाहेर काढायची योजना आखली गेली .अगस्त्य ऋषींनी समुद्र पिऊन टाकला म्हणजे नक्की काय केले ..?? रावणाला दहा तोंडे होती म्हणजे काय होते ...?? ब्रम्हदेव म्हणजे नक्की कोण ..???अहिल्येला मिळालेला शाप काय होता ..?? जटायू ..वानर ..हे कोण होते....?? त्यांनी रामाला कशी मदत केली..??  या सर्वांची उत्तरे आपल्याला या कादंबरीत मिळतात .

Thursday, March 14, 2019

भायखळा ते बँकॉक ( मुंबईचे मराठी गुंड

भायखळा ते बँकॉक ( मुंबईचे मराठी गुंड )..एस. हुसेन झैदी
अनुवाद....उज्ज्वला बर्वे
मंजुल पब्लिशिंग हाऊस
हुसैन झैदी यांच्या डोंगरी ते दुबई या पुस्तकाचा पुढील भाग . मुंबईतील गुन्हेगारीचा सगळा इतिहास लेखकाला तोंडपाठ आहे . त्यावर त्यांनी प्रचंड संशोधन आणि अभ्यासही केला आहे . पहिल्या भागात त्यांनी दाऊदची कारकीर्द सांगितली. तर या भागात त्यांनी दाऊदचे प्रमुख प्रतिस्पर्धी आणि मराठी गुंड यांचा इतिहास लिहिला आहे . ज्या काळात मोबाईल ,स्मार्टफोन इंटरनेटसारख्या गोष्टी नव्हत्या त्याकाळी या गुंडांनी संपूर्ण मुंबईवर आपली दहशत बसवली होती.या पुस्तकात प्रामुख्याने अरुण गवळी ,छोटा राजन ,अमर नाईक ,अश्विन नाईक यांच्या कहाण्या आहेत .गिरणी कामगारांच्या संपात गुन्हेगारीची झालेली वाढ याचे प्रभावी लिखाण केले आहे .  मुंबई पोलिसांनी दिलेला लढा आणि त्यांचा भ्रष्टाचारही आपल्याला अचंबित करतो . यांच्यातील बऱ्याच चकमकी आजही हिंदी चित्रपटात दाखविल्या जातात .  मग ते बाबू रेशीमचा आर्थर रोड कारागृहात झालेला खून असो की अश्विन नाईकवर भर कोर्टात झालेला जीवघेणा हल्ला असो. गुन्हेगारांची हल्ला करायची योजनाबद्ध पद्धत पाहून अंगावर शहारे येतात .ज्यांना मुंबईचा माफियापट समजावून घ्यायचा असेल त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे .

Sunday, March 10, 2019

धर्मांतर ... उमेश कदम

धर्मांतर ..... उमेश कदम
राजेंद्र प्रकाशन
ही कथा आहे सुदानमध्ये घडलेल्या एक खळबळजनक खटल्याची .त्याचे पडसाद जगभर उमटले होते .इथिओपियात 1973 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा अल्झाम आणि मार्सेमा या मायलेकी आपल्या कुटुंबासमवेत सुदानला येतात.पण तिथल्या निर्वासित छावणीत पोहचेपर्यंत दोघीच जिवंत राहतात.तिथे त्यांची भेट आदिल या मुस्लिम तरुणाशी होते .मार्सेमा ख्रिश्चन असूनही आदिल तिच्याशी लग्न करतो. पण तरीही मार्सेमा धर्मांतर करीत नाही . घरच्यांचा विरोध असल्यामुळे आदिल मार्सेमा आणि अल्झामला घेऊन वेगळा राहतो . काही वर्षांनी तो सैन्यात दाखल होतो . निर्वासित छावणीतून बाहेर पडल्यावर सुखाचे आयुष्य उपभोगत असताना आदिल लढाईत हरवतो . पुढे मार्सेमा आपल्या मुलीला आलेमला डॉक्टर बनविते . आलेम आता सुदान मधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहे . ती मार्को या अमेरिकन नागरिकांशी लग्न करते . मार्को जन्मापासूनच पांगळा आहे .अचानक आलेमच्या सुखी आयुष्यात भयानक वादळ येते . तिचा काका त्यांच्याविरुद्ध तक्रार करतो . त्यामुळे तिला अटक होते . सुदानमधील मुस्लिम कायद्यानुसार तिने जो अपराध केलाय त्याला देहदंडाची शिक्षा आहे आणि जो पर्यंत ती अंमलात येत नाही तोपर्यंत आरोपीला साखळदंडाने बांधण्यात येते . आलेम गरोदर असल्यामुळे तिने बाळाला जन्म दिल्यानंतर दोन वर्षांनी तिला मृत्युदंड होईल . तुरुंगात अतिशय हालाचे किळसवाणे जीवन आलेम जगतेय . तिची सुटका करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर चालू आहेत . खुद्द पोपनी यात लक्ष घातले आहे . आंतरराष्ट्रीय  न्यायालयाने सुदानच्या अध्यक्षांचे अटक वॉरंट काढले आहे . तरीही अध्यक्ष न्यायालयीन प्रकियेत सुदान सरकार हस्तक्षेप करणार नाही असे ठासून सांगतेय . जगभरातील मानवी हक्क संघटना सुदानचा विरोध करतायत आणि आलेमच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत  . शेवटी असे काय घडले की सुदान सरकारला तिची सुटका करावी लागली . एका सत्यघटनेवर आधारलेली वाचकांना खिळवून ठेवणारी कादंबरी .

महिलादिन ..... असा ही

महिलादिन असा ही
निवारा लेडीज होस्टेलला आज गडबड.. धावपळ.. दिसत होती.जवळजवळ पंधरा लेडीज तिथे राहत होत्या . सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या  बाहेरगावातील ....परराज्यातून आलेल्या. हॉस्टेल थोडे महाग आणि खाजगी होते त्यामुळे इथे राहणाऱ्या मुलीही उच्चपदावर आणि मोठ्या पगारावर काम करणाऱ्या होत्या.आज महिलादिनानिमित्त एका पार्टीचे आयोजन करणयात आले होते.
जोत्स्ना,लिंडा,माधुरी यांनी पार्टीसाठी पुढाकार घेतला होता .  हळूहळू एक एकजणी ऑफिसमधून येऊ लागल्या.
"आज पार्टीत स्पेशल काय ....?? एकीने विचारले.
"आज आपला दिवस आहे ... एकीने सिगारेट शिलगावत सांगितले .
"माझ्याकडून दोन खंबे फिक्स आहेत . मागच्या आठवड्यात एक प्रोजेक्ट पूर्ण झाला त्याचा इंसेंटिव्ह मिळाला .."लिंडाने सांगितले.
"मस्त...." सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या. "आणि माझ्याकडून बियरचा बॉक्स .."एकीने डिक्लेर केले . "मग माझ्याकडून सिगारेट्स.." दुसरीने कोपऱ्यातून आवाज दिला.सर्वांनी एकच हल्लाकोळ केला.
"पण अजून काहीतरी स्पेशल पाहिजे यार....'जेनी हाताची मूठ वळवून म्हणाली .सर्व हसू लागले.
"होईल त्याचीही सोय होईल रात्री बघू ..."लिंडा हसत म्हणाली .
फ्रेश होऊन  रात्री परत सगळ्या एकत्र आल्या . ग्लास भरले गेले. सिगारेट्स पेटविल्या गेल्या.मध्येच कोणीतरी सिगारचा बॉक्स ओपन केला. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे सिगार पाहून सर्व खुश झाल्या.
इतक्यात बेल वाजली.दरवाजातच एक रुबाबदार तरुण उभा होता. टाईट ग्रीन टी शर्ट.. जीन्स.. स्पोर्ट शूज आणि अंगाला येणार मंद सुवास . दरवाजा उघडणारी त्याची हसरी मुद्रा पाहून बावरली. सुखाची एक लहर तिच्या अंगावरून गेली.
"मिस लिंडा आहेत का.... ??? मधुरपणे हसत त्याने विचारले .
काही न बोलता तिने नुसती मान डोलावली आणि आत घेतले.अर्थात लिंडाला मनोमन शिव्या द्यायला ती विसरली नाही. तो आत येताच लिंडा उठून उभी राहिली "फ्रेंड्स.....!! हे आहे  आकर्षण आजच्या महिलादिनाचे.." असे म्हणून कोपऱ्यातील डीजे चालू केला.त्याबरोबर त्या तरुणाने शरीराला झटके देत नाचायला सुरवात केली . एका कसलेल्या डान्सरप्रमाणे त्याच्या हालचाली होत्या.सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले तर काहींनी तोंडावर हात ठेवले.
" येस ....!! नेहमी पुरुष पार्टी करतात आणि स्त्रीला आणून नाचवतात .आज आपण एका पुरुषाला नाचावयाचे आहे .नाचो .... !! असे म्हणत लिंडाने दहा रुपयांच्या नोटा त्याच्यावर उडवल्या . आता सर्वजणी सावध झाल्या आणि त्यांनीही भाग घ्यायला सुरुवात केली .हळू हळू त्या तरुणांच्या अंगावरचा  एक एक कपडा दूर होऊ लागला.
अर्धी रात्र संपल्यावर लिंडाने विचारले "कोणाला हवा आहे का हा ....??? की घरी पाठवू ...."?? क्षणार्धात करिष्माने हात वर केला . ती एका मल्टिनॅशनल कंपनीत एसिक्युटिव्ह होती . दिल्लीची राहणारी . तिने हळूच त्याला डोळा मारला आणि बेडरूममध्ये घेऊन गेली. बाकीच्या रात्रभर धुडगूस घालून पहाटे झोपी गेल्या .
दुसऱ्या दिवशी दुपारी करिष्माला घरून आईचा फोन आला "तेरे लिये लडका धुंडा है .... मुंबईमें ही रहता है. किसीं अच्छे सर्विस इंडस्ट्रीमें काम करता है . दिखनेमे भी हँडसम है . फोटो और पता भेज रही हु . जाके मिल ले ....".तिने खुश होऊन व्हाट्स अप उघडला आणि काल रात्रभर आपल्याबरोबर मजा मारलेल्या तरुणाला पाहून कपाळावर हात मारला .
© किरण कृष्णा बोरकर

Saturday, March 9, 2019

महिलादिन

महिलादिन
"आज जागतिक महिलादिन आहे म्हणे...."?? चहाचा कप माझ्या हातात देताना सौ.ने विचारले.मी तात्काळ चहाचा कप तिच्या हातून घेतला आणि नंतर हो.... म्हणालो.
"म्हणजे नक्की काय.... .?? काय असते या दिवशी.. ??  माझ्याइतकेच अज्ञान माझ्या बायकोला पाहून मी आनंदलो आणि क्षणात माहीत नाही म्हणून उत्तर दिले "म्हणजे आजचा दिवस महिलांना समर्पित आहे.. त्यांचा आदर राखण्यासाठी सन्मान करण्यासाठी आजचा दिवस". मी भीतभीतच  उत्तर दिले.
" मग उद्यापासून परत आहे तेच चालू का...... ?? शेजारची अनिता पुन्हा नवऱ्याच्या शिव्या खाणार . मला उद्याही चक्कीवरून दळण आणावे लागेल.फायदा काय या महिला दिनाचा.." ती मान उडवत म्हणाली.अर्थात ती अशी मान उडवत बोलते तेव्हा कमालीची सुंदर दिसते हे मान्य करायलाच पाहिजे .
"मी काय म्हणते...!! हल्ली स्त्रिया जवळजवळ पुरुषांच्या बरोबरीने काम करतात .मूल जन्माला घालणे आणि मासिक पाळी अश्या  एक दोन गोष्टी सोडल्या तर सर्वच बाबतीत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीत आहे . मूल जन्माला घालणे हे सर्व प्राण्यांच्या बाबतीत मादीचेच काम आहे . आज सैन्यात....मेडिकल..अर्थशास्त्र अश्या विविध  क्षेत्रात स्त्रियाही पुरुषांबरोबर काम करतात. मग महिलादिन साजरा करून त्यांना वेगळे का करता..."??तिचा आवाज चढला तसा मात्र माझा धीर सुटू लागला . रात्रीचे जेवण मिळेल की नाही याची काळजी वाटू लागली.
"अग तसे नाही... पूर्वी स्त्रियाना कमी दर्जाची वागणूक मिळत होती.त्यांना हलके समजत होते.
" हो पण आता समजत नाही ना ...?? हल्ली एकीच्यामागे अनेक बायका आणि त्यांच्या संघटना उभ्या राहतात आणि स्त्रियाही पुरुषांची बरोबरी करण्यासाठी काहीही करतात . आता त्या नीलम बारमध्ये काही तरुणी रोज दारू पीत बसलेल्या असतात. बाजूला सर्व पुरुष असतात त्याचे त्यांना काहीच वाटत नाही".
"तुला कसे कळले हे ...??? मी आवाज चढवून म्हणालो.
"झाले .....!! झाले सुरू तुमचे .. इतकी वर्षे झाली बायकोवर  विश्वास नाहीच.आहो…. त्या बारच्या समोर बसलेल्या भाजीवाल्याकडून कधी कधी भाजी घेते तेव्हा दिसते ना समोर काय चालू आहे..??? मस्तपैकी त्या बायका पीत असतात. इतकेच काय काही बायका गर्दीत पुरुषांच्या अंगावरून हात ही फिरवतात म्हणे . उलट म्हणतात पुरुष जे काही काही करतात ते आम्ही करतो.लोकल ट्रेन तर बायका चालवतातच  आता तर एस टी ही चालवणार म्हणे . मग कशाला महिलांचा वेगळा दिवस.
" तू म्हणतेस ते बरोबर आहे ...पण पूर्वीपासून चालू आहेत हे दिवस आणि आपला देश पुरुषप्रधान आहे त्यामुळे महिला दिन हे वेगळेपणाचे ठरते.ते जाऊदे तू आपल्या रात्रीच्या जेवणाचे बघ".असे बोलून गुपचूपपणे बाहेर सटकलो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर