Thursday, December 22, 2022

लंडन हॅज फॉलन (londan has follen )

लंडन हॅज फॉलन (londan has follen )

अंजल हॅज फॉलन ( angle has fallen )
ओलंपास हॅज फॉलन ( olympus has fallen )
या तिन्ही चित्रपटात एकच सूत्र आहे .अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना ठार मारणे.पण त्यासाठी कोणत्या योजना आखल्या जातात आणि नायक एकहाती त्या कश्या धुळीस मिळवतो हे पाहण्यासारखे आहे .अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाना कसे कोंडीत पकडले जाते त्यासाठी दहशतवाद्यांनी आखलेले प्लॅन्स पाहून प्रेक्षक अचंबित होतात .
ब्रिटिश पंतप्रधानांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जगभरातील राष्ट्रप्रमुख लंडनमध्ये एकत्र येतात .माईक हा अमेरिकेच्या राधट्राध्यक्षांचा प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर असतो .त्याने याआधीही दोन वेळा राष्ट्राध्यक्षाना वाचविलेले असते.त्याचा आक्षेप असूनही राष्ट्राध्यक्ष लंडनला अंत्यसंस्कारासाठी जायचे ठरवितात .नाईलाजाने माईकला होकार द्यावा लागतो.
सर्व राष्ट्रप्रमुख लंडन येथे जमतात आणि लंडन शहर अतिरेक्यांच्या ताब्यात जाते.ते प्रथम लंडन शहरातील वीज बंद करतात .कॉम्प्युटर हॅक करतात .ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून रहदारी बंद करतात .यात काही देशांचे राष्ट्रप्रमुख मारले जातात..माईक हुशारीने राष्ट्राध्यक्षाना बाहेर काढायचा प्रयत्न करतो .काही अतिरेकी पोलिसांच्या वेशात आहेत तर लंडनच्या गुप्तहेर संघटनेतही अतिरेकी आहेत . माईक कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही .त्याला कसेही करून राष्ट्राध्यक्षाना अमेरिकन दूतावासात पोचवायचे आहे .
अमेरिकन राष्ट्राध्यक्षाना जिवंत पकडून लाईव्ह हत्या करायची आणि जगभरात त्याचे प्रसारण करायचे अशी अतिरेक्यांची योजना आहे .माईक त्यांची योजना हाणून पाडेल का ??
चित्रपट प्राईमवर आहे .

Saturday, December 17, 2022

वधांधी..द फेबल ऑफ वेलोनी

वधांधी..द फेबल ऑफ वेलोनी
अमेझॉन प्राईम
कन्याकुमारीतील छोट्या गावातील एका शेतात वेलोनीचा मृतदेह सापडतो.तो आधी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा असल्याचा मीडियावर प्रसिद्ध होते पण नंतर ती अभिनेत्रीच या गोष्टीचा खुलासा करते. मग ही कोण ?? 
तिच्या छायाचित्रावरून एक तरुण ती वेलोनी असल्याचे सांगतो.वेलोनी आपल्या आईसोबत राहत होती.तिच्या आईचे लॉज असून ती स्वभावाने खूप कडक आहे.वेलोनीचा मृतदेह पाहून ती कोसळून पडते.
 मीडियावर पुन्हा तिच्या खुनाला प्रसिद्धी मिळते.म्हणून ती केस विवेकवर सोपवली गेली.विवेक हुशार आहे थोडा सेन्सिटिव्हही आहे .त्याने वेलोनीच्या केसवर काम करायला सुरवातही केली. पण म्हणावे तसे यश येत नाही .वेलोनीचा होणारा नवरा दारू पिऊन आत्महत्या करतो आणि तोच वेलोनीचा खुनी आहे असे दाखवून केस बंद करण्यात येते. 
पण तो खुनी नाहीय याची खात्री विवेकला आहे. पण वरून दबाव असतो त्यामुळे ती केस पुन्हा ओपन करायची परवानगी वरिष्ठ देत नाही.
आपल्याकडून वेलोनीला न्याय मिळत नाहीय हे पाहून विवेक खूप अस्वस्थ होतो .तो आपल्या परीने ही केस सोडविण्याचा प्रयत्न करतोय .त्यासाठी त्याने आपल्या चार वर्षाच्या इन्क्रीमेंटवर पाणी सोडलंय. आपल्या पत्नीशी होणारे वाद टाळतोय.त्याला काहीही करून वेलोनीच्या खुन्याला पकडायचे आहे त्यामागचा हेतू शोधून काढायचा आहे .
तिच्या लॉजमध्ये एक लेखक राहायला आला होता.वेलोनीने आपली कहाणी मनातल्या भावना त्याला सांगितल्या होत्या.त्याने तिच्यावर पुस्तक लिहिले .खुनाच्या वेळी तोही कन्याकुमारीत होता.विवेक त्यांच्यापर्यंत ही पोचला .त्याने विवेकला जी काही माहिती दिली ती विवेकला उपयोगी पडेल ?? 
प्रत्येकवेळी खुन्याच्या जवळपास जाऊन विवेकला दुसरेच रहस्य कळत होते. एकदा तर संशयाची सुई वेलोनीच्या आईकडे ही वळते.पण तिथेही तो चुकीचा ठरतो .
वेलोनी वाईट चालीची मुलगी आहे असा मीडिया प्रसार करत असतो .पण विवेक आपल्या परीने तो हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो .
शेवटी अचानकपणे एक वेगळेच सत्य विवेकसमोर येते आणि संपूर्ण रहस्याचा उलगडा होतो.
आठ एपिसोडमध्ये असलेली ही साऊथची सिरीज हिंदी भाषेत डब आहे. कुठेही हाणामारी नाही .शिव्या नाहीत .अतिशय शांत आणि संयमित वातावरणात ही सिरीज चालते .

Wednesday, December 14, 2022

तक्षशिला-पाटलीपुत्र- झंझावात

तक्षशिला-पाटलीपुत्र- झंझावात
चाणक्य-चंद्रगुप्त-अशोक- त्रिधारा  कादंबरी -दोन
श्रेयस भावे
अनुवाद..अनघा नाटेकर
राजहंस प्रकाशन 
सम्राट बिंदुसार आता वृद्ध झालाय .त्यानंतर त्याचा थोरला मुलगा सुमेष सम्राट होईल असेच सर्वजण समजून चालतायत.पण आर्य चाणक्याना ते मंजूर नाही. चंद्रगुप्ताला हाताशी धरून त्याने हे साम्राज्य उभे केलेय.पण आपल्या आईच्या हत्येला कारणीभूत ठरवून बिंदुसारने चाणक्यला हद्दपार केले होते.पण चाणक्यने कधीही हार मानली नाही. चिरंतन वैदिक कृतीदलाची साथ घेऊन त्याने शहराबाहेर वेश्यालय सुरू केलंय आणि आपल्या हेरांचे जाळे सगळ्या राज्यात पसरविले आहे. 
राजपुत्र सुमेष अर्ध यवन आहे .म्हणजे त्याची आई ग्रीक होती . म्हणूनच तो सम्राट होणे चाणक्यला मान्य नाही .मग दुसरा उत्तराधिकारी कोण असेल ?? अशोक बिंदुसारचा ९८ वा पुत्र. त्याची आई वैश्य आहे आणि तो बिंदुसारचा नावडता पुत्र.लहानपणापासूनच त्याला सैनिकांसोबत वाढविले गेले .त्याने सतत लढाया केल्या.त्यामुळेच तो क्रूर आहे.
राजपुत्र सुमेषचे इतर भाऊ दारू आणि स्त्रियांत मग्न आहेत.त्यांना फक्त ऐशआराम हवाय. चाणक्यने सम्राटपदासाठी अशोकची निवड करून  त्याप्रमाणे योजना तयार केली.त्याने बिंदुसारच्या पुत्रांना एकत्र पाटलीपुत्रात जमा केले आणि त्या सर्वांची अशोकाकरवी हत्या केली.त्याआधी त्याने एक षडयंत्र आखून अशोककडूनच राजपुत्र सुमेषच्या अश्वमेध घोड्याची हत्या केली होती आणि सुमेषच्या मनात अशोकाविषयी द्वेष निर्माण केला.
आता अशोक पाटलीपुत्रच्या सिंहासनावर बसून सुमेषची वाट पाहतोय.त्याच्यासोबत त्याची प्रेयसी देवी आहे.देवी हुशार आहे .ती उत्तम वैद्य आणि उत्कृष्ट नर्तिका आहे .पण ती शूद्र आहे.आणि एक शूद्र स्त्री सम्राटाची पत्नी होणे चाणक्यला मान्य नाही .योग्य वेळ येताच तो तिलाही अशोकपासून दूर करेल .
पाटलीपुत्र बाहेरून जिंकणे कोणालाही शक्य नाही ते आतूनच जिंकता येईल.हेच सूत्र चाणक्य आणि चंद्रगुप्ताने पन्नास वर्षांपूर्वी वापरून पाटलीपुत्र जिंकले होते.पाटलीपुत्रात जमिनीखाली असंख्य भुयारांचे जाळे आहे .त्यांचा योग्य मार्ग चाणक्यशिवाय कोणालाही माहीत नाही.चिरंतन वैदिक कृतीदलाचे सदस्य या भुयारांचे रक्षण करतायत .
सर्व काही आचार्य चाणक्यच्या योजनेनुसार घडेल का ??
अशोक चाणक्यच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करेल ?
प्रचंड सैन्य घेऊन स्वारी करायला निघालेल्या सुमेषचा पराभव अशोक कसा करेल ??
चाणक्य-चंद्रगुप्त-अशोक त्रिधारातील ही दुसरी कादंबरी 
 

Monday, December 12, 2022

यशोदा

यशोदा
यशोदा सोरोगेट आई बनणार आहे.कारण ती गरीब आहे आणि तिच्या छोट्या बहिणीच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत.तिला सरकारी हॉस्पिटलमधिल एका नर्स ने हा सल्ला दिला. चांगले पैसे मिळणार होते म्हणून तिने नाईलाजाने हा मार्ग स्वीकारला. तीन महिन्यानंतर तिच्या घरी पैसे घेऊन एक माणूस आला आणि तिला गाडीतून घेऊन गेला.
आता ती मोठ्या इमारतीत आहे.तिची रूम खूप आलिशान आहे. योगा ,सकस अन्न रोजच्या रोज तपासणी करून तिच्या तब्बेतीची काळजी घेतली जातेय.पण कुठेतरी काही  खटकतंय . तिच्यासोबत अनेक मुली आहेत ज्या सोरोगेट आई बनायला आल्यात. त्या सर्वांना पैश्याची गरज आहे. पण इथे कोणालाच घरच्यांशी संपर्क ठेवता येत नाही. त्यांना दिवस रात्र कळत नाही. किती वाजलेत ते कळत नाही. हळूहळू यशोदा त्यामागची कारणे शोधून काढायचा प्रयत्न करते आणि वेगळ्याच संकटात फसते.
दुसऱ्या एका घटनेत एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आपल्या खोलीत मृतावस्थेत सापडते . एक अनोळखी ड्रग घेतल्यामुळे तिचा मृत्यू झालाय हे सिद्ध होते.
अजून एका घटनेत एका प्रसिद्ध मॉडेलचा अपघाती मृत्यू होतो .पण तो अपघात नसून खून आहे असे एका पोलीस अधिकाऱ्याला वाटते .
यशोदा जे काही शोधायचा प्रयत्न करतेय त्याच्या या दोन्ही घटनांशी संबंध असेल का...?? 
मग त्यासाठी यशोदा पाहायला हवाच .
साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री सामंथा यशोदाच्या भूमिकेत आहे .संपूर्ण चित्रपट तिने व्यापून टाकलाय .

Wednesday, December 7, 2022

चूप

चूप
त्या कमोडवरच बसलेला त्याचा मृतदेह सापडतो. तोंड प्लॅस्टिकच्या पातळ पेपरने गुंडाळलेले.संपूर्ण अंगावर पद्धतशीरपणे वार केले होते.त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. कोणीतरी अमानुषपणे त्याला मारले होते.पण तो तर एक साधा चित्रपट समीक्षक होता.दर शुक्रवारी  प्रदर्शित होणाऱ्या नवीन चित्रपटाचे समीक्षण लिहिण्याचे काम होते त्याचे. मग त्याचा खून कोण करेल आणि का ?? खुन्याने त्याच्या कपाळावर काही स्टार कोरलेले असतात .त्याचा खुनाशी संबंध असेल का ?? 
वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद माथूरकडे ही केस येते. काही दिवसांनी दुसऱ्या समीक्षकाचा खून होतो.त्याचे प्रेत रेल्वे ट्रॅकवर सापडते .हा नक्कीच सिरीयल किलर आहे हे पक्के होते आणि तिसऱ्या समीक्षकाचा मृतदेह किकेटच्या मैदानात सापडतो .यावेळी त्याच्या शरीराचे तुकडे अनेक ठिकाणी पसरून ठेवलेले असतात .
अरविंद माथूर आता खुन्याला पकडण्यासाठी डॉ. झेनोबीया श्रॉफ या क्रिमिनल सायकॉलॉजी तज्ज्ञ स्त्रीची मदत घेतो. तिच्या मदतीने तो संपूर्ण केसचा अभ्यास करून एक योजना बनवतो .पण तो यशस्वी होईल का ?
डॅनी एक फुल विक्रेता तरुण.बांद्रामध्ये त्याचे घर आणि फुलांचे दुकान आहे . नीला मेननला हवी असलेली ट्युलिपची फुले फक्त त्याच्याकडेच मिळतात .डॅनी गुरुदत्तचा फॅन आहे .त्याचा शेवटचा चित्रपट कागज के फूल डॅनीला फार आवडतो आणि हाच चित्रपट फ्लॉप झालाय याची सल त्याला असते. त्याचे आणि नीलाचे एकमेकांवर प्रेम आहे. अरविंद माथूरने खुन्याचे सावज म्हणून नीलाचीच निवड केलीय. उद्या काय वाईट घडले तर डॅनीचे काय होईल..??
अरविंद माथूरची संयमित भूमिका सनी देओलने छान उभी केलीय. तर मामुटीचा मुलगा दुलकर सलमान डॅनीच्या भूमिकेत शोभून दिसतो. अतिशय सहज आणि सुंदर अभिनय आहे त्याचा . श्रेया धन्वंतरी नीला मेननच्या भूमिकेत भाव खाऊन जाते .तर डॉ. झेबोनिया श्रॉफच्या छोट्या भूमिकेत पूजा भट बऱ्याच वर्षांनी दिसलीय.
या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर गुरुदत्तचा कागज के फूल व्यापून राहतो.त्याच्या चित्रफिती ,गाणी संपूर्ण चित्रपटात आपल्या सोबत राहतात.महान कलाकार गुरुदत्त याना ती एकप्रकारे आदारांजलीच आहे .
चित्रपट कुठेही वेडीवाकडी वळणे घेत आपल्याला चकित करत नाही. उलट खुनी कोण असेल याचा अंदाज आपण फार लवकर बांधतो .फक्त तो पकडला कसा जाईल याची उत्सुकता प्रेक्षकांना असते .

Sunday, December 4, 2022

मॉन्स्टर

मॉन्स्टर
अनिल चंद्रा आय टी चा जॉब सोडून एका खाजगी टॅक्सी वाहतुकीच्या धंद्यात घुसतो .आता त्याचा धंदा नुकसानीत चालू आहे. त्याची बायको भामिनी त्याच कंपनीत टॅक्सी चालविते आहे .त्यातच अनिल चंद्राचा छोटा अपघात झालाय. भामिनी त्याची दुसरी पत्नी पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे.आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे .
भमिनीला आज एका कस्टमरला एअरपोर्टपासून पीक अप करायचे ड्युटी आहे. त्याने दिवसभर तिची टॅक्सी बुक केली होती.कस्टमर एक पंजाबी पुरुष आहे.लकीसिंग नावाचा तो कस्टमर एकदम हसतमुख होता.योगायोगाने तो जो फ्लॅट विकायला आलाय तो नेमका भामिनीच्या सोसायटीमधील होता. 
दुपारी लकीसिंगला वेळ होता म्हणून तो अनिल आणि भामिनीच्या घरी वाढदिवस साजरा करायला जातो.तो आपल्या हसतमुख स्वभावाने सगळ्यांवर छाप पाडतो .मध्येच तो वकिलाला पैसे देण्यासाठी भामिनीला पाठवतो आणि त्यावेळेत अनिल चंद्राची गोळ्या घालून हत्या करतो. हत्येचा विडिओ आणि बंदूक पोलिसांना सापडेल अश्या पद्धतीने ठेवतो .नंतर तो अनिल चंद्राचे शव भामिनीच्या टॅक्सीत ठेवतो आणि एअरपोर्टवर निघून जाते.
एअरपोर्टवरून भामिनी घरी येते तेव्हा तिची मुलगी आणि अनिल चंद्रा दोघेही गायब झालेले असतात.ती त्यांचा भरपूर शोध घेते शेवटी पोलीस तक्रार करते.
पोलिसांना त्याचे प्रेत भामिनीच्याच टॅक्सीत सापडते.पुरावाही घरी सापडतो.पोलीस तिला अनिल चंद्राच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतात .लकीसिंग नावाचा कोणीही व्यक्ती भामिनीच्या घरी आला नाही असे वॉचमन सांगतात.सर्व पुरावे भामिनीच्या विरुद्ध आहेत आणि मध्यंतर होतो.
मोहनलालची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मध्यंतरापर्यंत अतिशय हलका फुलका वाटतो.लकीसिंगचा गमतीदार स्वभाव ,त्याचे भामिनीच्या घरी येऊन जेवण करणे ,मुलीसोबत खेळणे यावरून पुढे काय घडणार याचा अंदाज प्रेक्षक बांधत बसतो . मध्यंतरानंतर जे घडते ते अतिशय वेगवान आणि आश्चर्यचकित करणारे आहे . लकीसिंग कोण आहे?? तो अनिल चंद्रा सारख्या आजारी आणि कर्जबाजारी व्यक्तीची हत्या का करतो ? तो भामिनीला यात का अडकवितो ?? याची उत्तरे तुम्हाला मध्यंतरानंतरच मिळतात.
चित्रपट मोहनलाल व्यापतो पण हनी रोजने भमिनीच्या भूमिकेत त्याला उत्तम साथ दिली आहे.जी जितकी सुंदर दिसते तितकाच सुंदर अभिनय केला आहे . चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Friday, December 2, 2022

कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि ऑपरेशन सदभावना

कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि ऑपरेशन  सदभावना
अनुराधा विष्णू गोरे
ग्रंथाली प्रकाशन 
सैन्यदलात सर्वोच्च पुरस्कार म्हणून परमवीर चक्र ओळखले जाते.आपल्या जीवाची बाजी लावून युद्धात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या सैनिकाला परमवीरचक्र पुरस्काराने गौरविले जाते.
1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि  त्यानंतर 1947 ते 1999 या कालावधीत झालेल्या युद्धात केवळ एकवीसजणांना परमवीरचक्राचा बहुमान मिळाला.
1947 साली भारत पाक युद्धात मेजर सोमनाथ शर्मा हे पहिले परमवीरचक्र मानकरी ठरले त्यानंतर झालेले भारत चीन युद्ध , कांगोमधील शांतिसेनेत कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया तर 1999 कारगील युद्धात परमवीरचक्र मिळविणाऱ्या सर्व वीरांच्या कहाण्या आहेत.
युद्धात दाखविलेली त्याची अतुलनीय आणि अचाट कामगिरी वाचून आपल्याला भारतीय सैन्यदलाचा अभिमान वाटतो.
ऑपरेशन सद् भावना 
भारतीय सैन्यदल युद्धात जितके क्रूर आणि कठोर आहेत तितकेच ते शांतीप्रिय आणि मानवतावादी हळवेही आहेत.त्यांचे हे रूप ऑपरेशन सद् भावना मोहिमेत दिसून येते.जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात आणि ईशान्य भारतात सैन्यदलाने स्थानिकांचा विश्वास संपादन करून अनेक योजना राबवील्या .त्यासाठी त्यांनी सामान्य जनतेचे सहाय्य घेतले.शाळा कॉलेज ,वैद्यकीय सेवा सुरक्षितपणे सुरू केल्या.भारतातील इतर राज्यांच्या संस्कृतीची ओळख करून दिली.तिथल्या तरुण विद्यार्थ्यांना भारताची सफर घडवून दिली. जसजसे ऑपरेशन सद् भावना यशस्वी होत गेले तसंतसे सैन्यदलाने आपला सहभाग कमी करून ते जनतेला अर्पण केले.ऑपरेशन सद् भावनामध्ये सामान्य नागरिकही कसे सहभागी होऊ शकतात याची माहिती यात दिली आहे .
प्रत्येक भारतीयांना आपल्या सैन्यदलाचा अभिमान वाटेल असे हे पुस्तक आहे 

Monday, November 21, 2022

पाटलीपुत्राचे राजपुत्र

पाटलीपुत्राचे राजपुत्र 
चाणक्य- चंद्रगुप्त-अशोक - त्रिधारा कादंबरी १
श्रेयस भावे 
अनुवाद..डॉ. वैशाली जुंदरे
राजहंस प्रकाशन 
संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल असावा .हे आर्य चाणक्यचे स्वप्न चंद्रगुप्ताने पूर्ण केले .त्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसारने हे साम्राज्य पुढे वाढविले.पण आता बिंदुसार मृत्यूशय्येवर आहे. त्याचे शंभर राजपुत्र वेगवेगळ्या राज्यात पसरले आहेत. बिंदुसारचा जेष्ठ पुत्र सुमेष आता राज्याची धुरा सांभाळतोय.पण तो सम्राट नाही . त्यासाठी त्याने अश्वमेध यज्ञ सुरू केला.
बिंदुसारला आपल्या आई आणि पित्याच्या मृत्यूचे कारण कळले आणि त्याने आर्य चाणक्यना  राज्याबाहेर हाकलवून दिले.आर्य चाणक्य आता कौटिल्य नावाने शहराबाहेर एक वेश्यालय चालवितात.खरे तर हा व्यवसाय म्हणजे त्यांचा एक बुरखा आहे. ते आजही तक्षशिलावर बारीक नजर ठेवून आहेत.ते आपल्या गुप्तचरांमार्फत अनेक मोहिमा घडवून आणतात. तक्षशिलाचा महामंत्री राधागुप्त त्यांचाच माणूस आहे .
अशोक हा बिंदुसारचा नावडता पुत्र. त्याची आई वैश्य म्हणून त्याचा राग करतात. त्याचे आयुष्य फक्त लढाया करण्यात  गेलंय. आताही त्याला अवंती नगरीतील बंड मोडायला जायचंय. सर्व सैन्य त्याच्या मर्जीवर चालतेय म्हणून बिंदुसार त्याला परवानगी देत नाही पण राजकुमार सुमेष त्याला परवानगी देतो.
ही कथा दोन कालावधीत घडतेय . दोन्ही घटनांमध्ये कालावधी साधारण पन्नास वर्षाचा आहे. 
पन्नास वर्षांपूर्वी 
ग्रीक सम्राट अलेक्झांडरने भारतात प्रवेश करून अनेक राज्य जिंकली. पण  पौरव राज्याचा  राजा पौरसने त्याला आव्हान दिले.पौरसला मदत कर हे सांगण्यासाठी चाणक्य  तक्षशिलेचे महाराज आंभीकडे जातात पण आंभी त्याला नकार देतो आणि अलेक्झांडरला मदत करतो.मग चाणक्य  नंद घराण्यातील धनानंदांकडेकडे जातो. पण तिथेही त्याला चोर म्हणून तुरुंगात टाकले जाते. कृतीदलाचे सभासद त्याला तुरुंगातून सोडवितात . पुढे तो चंद्रगुप्ताला सम्राट बनवितो.
त्यानंतर पन्नास वर्षांनी आज चाणक्यला सम्राट बिंदुसारनंतर अशोकला सम्राट बनवायचे आहे आणि तो पुन्हा आपली  चाणक्यनीती वापरून अशोकला सम्राट बनवेल का ?? त्यासाठी तो काय काय खेळी करतो ? अश्या अनेक रहस्याची  उकल सोडविण्यासाठी हे  पुस्तक वाचावे लागेल.

Friday, November 18, 2022

भयकथा दिवाळी अंक 2022

भयकथा दिवाळी अंक 2022
संपादक.. मानसी ताम्हणकर
निशांत म्हात्रे एक तरुण बस कंडक्टर बस क्रमांक  84 च्या  रूटवर असतो. त्या दिवशी रात्री अकरा वाजता एक सुंदर तरुणी मरिन लाईन्सच्या स्टॉपवरुन बसमध्ये चढली. तिकीट काढताना निशांत आणि तिची थोडी बाचाबाची झालीच .पण तरीही त्याने तिला बांद्रा स्टेशनवरून बँड स्टँडला कसे जायचे याचे मार्गदर्शन केलेच. 
नंतर तो रोज तिची वाट पाहू लागला .बस ड्रायव्हर जाधव मामाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.एक दिवस बांद्रा स्टेशनला उतरताना तिने निशांतला नावाने हाक मारून दिलेली दहाची नोट चेक कर असे सांगितले.त्या नोटेवर तिने त्याला दादरच्या हॉटेलात दुपारी बारा वाजता भेटायला बोलावले होते.मनात धाकधूक ठेवून निशांत तिला भेटायला गेला तेव्हा तिने तिचे नाव नयन कामत सांगितले आणि निशांतची पूर्ण माहिती सांगितली. आपली इतकी अचूक माहिती ऐकून निशांत स्तब्ध झाला.नंतर तिने निशांतला लग्नाची मागणी घातली.अचानक लग्नाचा प्रस्ताव ऐकून निशांत चाट पडला.लग्न आणि तेही चार दिवसात कसे शक्य आहे ? थोडा विचार करायला वेळ दे असे सांगताच नयन चिडली आणि निघून गेली. कोण आहे नयन कामत ?? ती निशांत आणि त्याच्या परिवाराला कसे ओळखते ?? तिला ताबडतोब लग्न का करायचे आहे ?? या प्रश्नांचा शोध घेताना अनपेक्षित सत्य निशांतच्या समोर आले आणि तो हादरून गेला.
भयकथा .. 84 लिमिटेड ..मंदार माधव जोशी 
अश्या अनेक गूढ  अतर्क्य कथा आपल्याला वाचायला मिळतील भयकथा या दिवाळी अंकात

Monday, November 7, 2022

इनसाईड मॅन

इनसाईड मॅन
नेटफ्लिक्स
सत्य लपविण्यासाठी एक खोटे बोलले की मग पुढे काय घडत जाते त्यासाठी ही वेब सिरीज पाहायला हवी.
हॅरी एक पार्ट टाईम पाद्री अर्थात फादर .आठवड्यातील काही तास तो चर्चला देतो .त्याच्या घरी बायको मॅरी आणि तरुण मुलगा बेन .बेनला शिकविण्यासाठी येणारी ट्युशन टीचर जेनिस .
त्या दिवशी चर्च संपल्यावर हॅरीचा सेवक एडवर्ड आपला पेन ड्राईव्ह हॅरीला देतो.त्यात काही पॉर्न विडिओ आहेत असे सांगतो आणि आईला तो पेन ड्राईव्ह सापडू नये अशी त्याची इच्छा असते. एडवर्ड थोडासा मानसिक रुग्ण असतो. याविषयी कोणाला सांगणार नाही असे सांगून हॅरी घरी येतो .
घरी  जेनिस आलेली असते.ती काही गोष्टी बेनला देण्यासाठी पेन ड्राईव्ह मागते आणि घाईघाईत हॅरीकडील पेन ड्राईव्ह तो तिला देतो. गोंधळलेला हॅरी बेनला त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे ते सांगतो .
तोपर्यंत जेनिसने पेन ड्राईव्ह ओपन केलेला असतो . त्यातील विडिओ पाहून तिला धक्का बसतो. वडिलांना वाचविण्यासाठी बेन तो पेन ड्राईव्ह त्याचाच आहे असे जेनिसला सांगतो .
पण त्या पेन ड्राईव्हमध्ये साधे पॉर्न नसते तर लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे विडिओ असतात. पाद्रीच्या नियमानुसार हॅरीला तो पेन ड्राईव्ह कोणाचा आहे तो सांगता येत नाही .तर जेनिसला तो पेन ड्राईव्ह बेनचा आहे अशी खात्री पटते.जेनिस पोलिसांकडे जाईल म्हणून नाईलाजाने हॅरी तिला तळघरात कोंडून ठेवतो .
त्या तुरुंगात मृत्युदंड दिलेले दोन कैदी आहेत.एक विकृत खुनी ज्याने पंधरा स्त्रियांचे खून केले आहेत पण त्याची मेमरी पक्की आहे .तर दुसरा डॉ. जेफ्री ज्याने आपल्या पत्नीचा खून करून तिचे डोके लपवून ठेवले आहे आणि गुन्हा कबूल केला आहे.डॉ. जेफ्री क्रिमिनोलॉजिमध्ये डॉक्टर आहे .इतरांपेक्षा तो नेहमी वेगळा आणि दुसऱ्या बाजूने विचार करतो. काहीजण आपल्या अडचणीच्या केस घेऊन जेफ्रीकडे येतात.त्या योग्य असतील तर जेफ्री सोडवून देतो.
बेथची आणि जेसिकाची ओळख ट्रेनमध्ये झाली. बेथ एक पत्रकार आहे.बेथने तिला कॉफीसाठी बोलावले होते .पण तिचा काहीच रिप्लाय येत नाही .उलट एक गोंधळून टाकणारा मेसेज येतो. जेसिकाचा फोन लागत नाही .ती कुठे आहे हे तिला माहीत नाही.नाईलाजाने ती डॉ. जेफ्रीकडे मदत मागते.पण त्या आधी तिला जेफ्रीच्या वेगळ्या केसमध्ये मदत करावी लागते .
हॅरी स्वतः ला आणि बेनला निरपराध शाबीत करेल का ? त्यासाठी तो आपले नियम मोडेल का ? जेफ्री असे कोणते तर्क काढेल ज्यामुळे बेथला जेसिकाचा शोध लागेल. एक सत्य लपविण्यासाठी हॅरी कोणत्या थराला जाईल ?
पहिला सिजन फक्त चार भागाचा आहे.साधारण एक तासाचा एक एपिसोड .अनेक तर्कवितर्क लढवीत ही मालिका उत्कंठा वाढवीत पुढे सरकते.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .मोजकी पात्रे सलग घटनाक्रम यामुळे मालिका पकड घेते.

Saturday, November 5, 2022

काय लागतं जगायला ?....डॉ. नम्रता पडवळ

काय लागतं जगायला ?....डॉ. नम्रता पडवळ 
लोकव्रत प्रकाशन 
लेखिका व्यवसायाने फिजिओथेरिपिस्ट आहे.आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी ती कागदावर उतरवते. तिचे हे म्हणणे शब्दशः खरे आहे हे हा कथासंग्रह वाचल्यावर कळते. यात गोष्टी छोट्या आहेत.शब्दानेही आणि विषयानेही . पण त्या वाचताना आपण नकळत गुंतत जातो.त्या कथेचा एक भाग बनतो.त्यातील घडणाऱ्या घटनांच्या जवळपास आपण हजर आहोत आणि आपल्या डोळ्यासमोर ते घडतेय असे वाटते.
तिच्या पहिल्या वासरू कथेत गाय आणि वासराचे निर्मळ नाते उलगडून दाखविले आहे . परिस्थितीनुसार वासरात होणाऱ्या बदलाचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले आहे.
मर्मबंधातील ठेव यात लेखिकेने आपल्या मराठी विषयाच्या शिक्षिकेला शालांत परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवून एक प्रकारची भेटच दिली आहे .तीच मर्मबंधातील ठेव आहे तिच्यासाठी.
गोंडस गुलाबी गाठोडं आणि चिरंजीव या दोन कथेत त्यांनी सहा वर्षाच्या मुलाचा खोडकरपणा आणि आपल्या लहान बहिणीबद्दलचे प्रेम काळजी आणि समजूतदारपणा दाखविला आहे.या दोन्ही गोष्टी त्यांनी इतक्या सहज सोप्या आणि गोड भाषेत लिहिल्या आहेत त्याबद्दल कौतुक करावे तितके कमीच.प्रत्येकाला आपल्या मुलाच्या बालपणीच्या खोड्या आठवतील.माझ्यामते त्यांनी चिरंजीव या पात्रावर अनेक कथांची मालिका लिहावी.
लेखिकेने छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो आणि तो कसा मिळवावा हेच या पुस्तकातून सांगितले आहे.मनावर जर ताण असेल तर हे पुस्तक काढून त्यातील कोणतीही एक कथा वाचून ताण हलका करावा असेच हे पुस्तक आहे.
मी यातील इतर कथांविषयी लिहीत नाही .तुम्हीच पुस्तक वाचून आनंद घ्या .
डॉ. नम्रता मॅडमनी वेळातवेळ काढून माझ्या घरी येऊन पुस्तक भेट दिले यासाठी त्यांचे मनापासून आभार .यापुढेही त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित होवो आणि साहित्याची सेवा घडो .

Friday, October 28, 2022

अंजान

अंजान स्पेशल क्राईम युनिट
डिस्कव्हरी + 
गोव्यातील तो बीच झपाटलेला बीच म्हणून ओळखला जात होता. रात्री त्या बीचवर कोणीही जात नव्हते.पण त्या दिवशी ते तीन मित्र दारू प्यायला बीचवर आले होते.त्यातील एक तिकडच्या आमदाराचा मुलगा होता . अचानक त्यांना तिथे एक मच्छीमार स्त्री दिसून आली . ती हळूहळू एका पडक्या होडीच्या दिशेने चालू लागली.आमदाराचा मुलगा संमोहित झाल्यासारखा तिच्यामागे चालू लागला आणि गायब झाला. 
स्पेशल क्राईम युनिटच्या एसीपी विक्रांतकडे ही केस दिली गेली. तो गोव्यात आला तेव्हा आमदाराचा मोठा मुलगा ही काही महिन्यांपूर्वी गायब झाल्याचे त्याला आढळून आले . तसेच इतर काहीजणही तिथे असेच गायब झाले होते. गायब झालेल्या व्यक्तींचा काहीही तपास लागला नव्हता.
विक्रांत गावात फिरून चौकशी करू लागला. मध्येमध्ये त्याला एक शाळकरी मुलगा खुणावू लागला . चौकशी दरम्यान त्याला असे कळले की काही महिन्यांपूर्वी एक मच्छीमार आपल्या होडीत मृतावस्थेत सापडला होता आणि त्या नंतर त्याच्या बायकोने आपल्या मुलांसोबत आत्महत्या केली होती. बीचवर जी स्त्री आमदाराच्या मुलाला दिसली होती ती त्या मच्छीमाराचीच पत्नी होती.
असे काय कारण होते की गावातील मोजकीच माणसे गायब होत होती ?? विक्रांत हे शोधून काढेल का ?
नॅशनल पार्कच्या त्या रस्त्याने रात्री कोणीच जात नव्हते .पण त्या दिवशी एका डीजीपीचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत त्या रस्त्याने निघाला .वाटेत त्याला ती लिफ्टसाठी उभी असलेली दिसली.एक सुंदर तरुणी नववधूच्या पोशाखात हातात जड बॅग घेऊन उभी होती.तो तसाच पुढे निघाला आणि पुढच्या वळणावर ती त्याच्या गाडीसमोरच आली. त्या नंतर तो नाहीसा झाला . एसीपी विक्रांतकडे ते प्रकरण सोपवले गेले.  विक्रांतने त्याला शोधून काढले त्यावेळी तो स्वतःशी बडबडत झाडावर काही विचित्र खुणा काढत होता . भूतप्रेत या गोष्टींवर विश्वास नसलेला विक्रांत या केसकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहू लागला . एका बंद पडलेल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीचा फोटो सापडला . दहा वर्षांपासून  ती मुलगी मिसिंग होती.चौकशी करताना कळले की तिच्या लग्नाच्या दिवशीच दागिने घेऊन पळून गेली होती .
मग ती मुलगी त्याच रस्त्यावर आताही कशी दिसते ? त्या भागात काही लोक नाहीसे झाले होते. त्यांचा तर तिच्याशी काही संबंध नसेल ?? विक्रांत ही केस सोडवू शकेल ??
 एसीपी विक्रांतच्या भूमिकेत गश्मीर महाजनीने दमदार अभिनय केला आहे .पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत तो फिट बसतो. ही सिरीजमध्ये अनेक गूढ भयकथा आहेत.काही अतर्क्य अमानवी आहेत .कथेचे सादरीकरण अतिशय सुंदर आहे . कधीकधी काही सिन पाहताना भीती वाटते .
ज्यांना भयकथा गूढकथा आवडतात त्यांना ही सिरीज नक्की आवडेल . 

Thursday, October 20, 2022

द रीडर

द रीडर
बर्नार्ड शिंल्क
अनुवाद..अंबिका सरकार 
दुसरे महायुद्ध आठवले की हिटलर आणि त्याच्या छळछावण्यांचीच आठवण होते.आतापर्यंत या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.पण हे पुस्तक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर वेगळे ठरते.ही एक प्रेमकहाणी आहे .ही नुसती प्रेमकथा नाही तर त्यामागे एक गूढता आहे.
कादंबरी तीन भागात घडते .पहिल्या भागात लेखकाचे बालपण आणि त्यात त्याची नायिकेशी असलेले संबंध यावर आहे.नायक हा पंधरा वर्षाचा शाळेत जाणारा विद्यार्थी आहे तर नायिका ट्राममध्ये कंडक्टर आहे.ती साधारण पस्तीस वर्षाची असेल. नायक आणि नायिकेचे प्रेमसंबंध असतात.त्यांच्यात लैंगिक संबंध ही असतात. ती निरक्षर आहे .त्याच्याकडून वेगवेगळी पुस्तके वाचून घेते .त्यावर चर्चा करते. हे सगळे व्यवस्थित चालू असताना ती अचानक निघून जाते. इथे पहिला भाग संपतो.
दुसऱ्या भागात नायक आता मोठा झालाय.तो कायद्याचा अभ्यास करतोय. काही नाझी एसएस महिला अधिकाऱ्यांवर ज्यू अत्याचाराचा खटला चालू आहे .नायकाला तिथे ती आरोपी म्हणून दिसते. तो संपूर्ण खटला हजर राहतो तिचे निरीक्षण करतो .तीही त्याला पहाते पण लक्ष देत नाही . ती तिच्यावर असलेल्या आरोपाचे खंडन करत नाही. तिचा आरोप सिद्ध होतो आणि तिला जन्मठेपेची शिक्षा होते.
तिसऱ्या भागात नायक वकील झाला आहे. तो नायिकेला अजूनही विसरला नाही .त्याने पुन्हा तिच्या आवडीची पुस्तके वाचायला सुरुवात केली.ती पुस्तके आपल्या आवाजात रेकॉर्ड करून तिला पाठवतो. रिप्लाय म्हणून ती त्याला दोन ओळींचे पत्र पाठवते.त्यानंतर ती त्याला पत्रे पाठवीत राहते. त्याच्याशी चर्चा करण्यासाठी  ती लिहायला वाचायला शिकते. पत्राद्वारे त्याच्याशी वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करते.
शेवटी तिची तुरुंगातून सुटका होण्याचा दिवस नक्की होतो.त्यावेळी तुरुंगाधिकारी नायकाला बाहेरच्या जगात तिची सोय करशील का म्हणून विचारते.त्यावेळी तो तिला भेटायला तुरुंगात येतो.बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची प्रत्यक्षात भेट होते.ती अजूनही त्याला बच्चू म्हणूनच हाक मारते. तो तिच्यासाठी घर शोधतो. नोकरी शोधतो  आणि उत्सुकतेने तिच्या सुटकेची वाट पाहत राहतो.पण ....
 तुरुंगातून सुटका झाल्यावर ती पुन्हा त्याच्यासोबत राहील का ??  तिने खरोखरच छळ छावणीत काही गुन्हे केले होते का ?? ज्या गुन्ह्याची शिक्षा  ती भोगतेय त्यामागील सत्य काय आहे ?? एका नाझी महिला अधिकाऱ्याला जग स्वीकारेल .?? यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला शेवटी मिळतील.

Friday, October 14, 2022

कलिंगसंहाराचा न्याय ...श्रेयस भावे

चाणक्य- चंद्रगुप्त- अशोक - त्रिधारा
कादंबरी ...३
कलिंगसंहाराचा न्याय ...श्रेयस भावे
अनुवाद...शिरीष सहस्त्रबुद्धे
चाणक्य चित्रगुप्त अशोक या त्रिधारेतील हे तिसरे पुस्तक 
ही कादंबरी संपूर्णपणे सम्राट अशोक आणि आचार्य चाणक्यभोवती फिरते. सम्राट बिंदुसारनंतर त्याच्या शेकडो पुत्रांपैकी अशोक हा नावडता पुत्र राजा झाला आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आचार्य चाणक्याचा त्याला पाठिंबा होता. सम्राट अशोकाची उमेदीची वर्षे युद्ध करण्यात गेली.नंतर तो राज्यकारभारात लक्ष देऊ लागला . पण त्याच्या राज्यकारभाराची पद्धत महाआमत्य आचार्य चाणक्याला पसंद नव्हती. त्याने आपली चाणक्यनीती वापरून सम्राट अशोकला स्त्री आणि मदिराची चटक लावली.आता सम्राट अशोक पूर्वीसारखा चपळ राहिला नाही. त्याचे पोट वाढले हालचाली मंदावल्या. तो सतत स्त्री सहवास आणि दारूच्या नशेत राहू लागला. त्यात त्याने जिच्यावर जीवापाड प्रेम केले ती देवी त्याची प्रेयसी जळून मरण पावली.नाईलाजाने त्याने दुसरे लग्न केले .
सम्राट अशोक हा मौर्य सम्राट चंद्रगुप्त याचा नातू .आर्य चाणक्यने अखंड भारताचे स्वप्न पाहिले आणि ते चंद्रगुप्ताच्या मदतीने पूर्णत्वास नेले .त्यासाठी त्याने अनेक कुटील कारस्थाने केली. मार्गात आडवे येणाऱ्यांची गय केली नाही. 
कलिंग राज्य मौर्य साम्राज्यात यावे यासाठी त्याने अनेक वर्षाची योजना आखली होती.संपूर्ण कलिंग राज्यात त्याचे हेर अनेक वर्षे कार्यरत होते.
शेवटी तो दिवस आलाच. त्या दिवशी मौर्य सेनेने पूर्ण ताकदीने कलिंगाच्या सेनेवर हल्ला केला. कलिंग सेनेनेही पूर्ण ताकदीनिशी त्यांना प्रत्युत्तर दिले.या युद्धात सम्राट अशोकने प्रत्यक्ष भाग घेतला नाही .पण युद्ध संपल्यावर तो रणभूमीवर आला आणि प्रचंड नरसंहार पाहून हादरला. त्याचे अनेक आप्त स्वकीय मित्र इतकेच नव्हे जीला मृत समजत होता ती त्याची प्रेयसी देवीही होती. या युद्धानंतरच त्याचे मनपरिवर्तन झाले आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला.
 या कादंबरीत महाअमात्य आचार्य चाणक्य यांची ही प्रमुख भूमिका आहे .शंभर वर्षाचा हा म्हातारा आज चाकाच्या खुर्चीवर बसून कुशल राजनीती करतो. जे त्याला हवे तो ते कोणत्याही मार्गाने घडवून आणत असतो.त्याच्या हालचाली मंद झाल्या आहेत पण डोके अजूनही तल्लख आहे. सम्राट अशोकचा ही तो नावडता आहे. राज्य भावनेने नाही तर कठोर होऊन चालवावे लागते हीच चाणक्याची भूमिका आहे.अखंड भारत घडविण्यास तो काहीही करू शकतो आणि कोणत्याही  थराला जाऊ शकतो.
एक वाचनीय सुंदर कादंबरी

Friday, October 7, 2022

2019 मोदींनी भारत कसा जिंकला ?..राजदीप सरदेसाई

2019 मोदींनी भारत कसा जिंकला ?..राजदीप सरदेसाई 
अनुवाद....मीना कर्णिक 
अक्षर प्रकाशन
राजदीप सरदेसाई हे टेलव्हिजन न्यूज मिडियातील जेष्ठ नाव . पंतप्रधान मोदी ,अमित शहा ,आणि देशातील मातब्बर राजकारणी त्यांना प्रत्यक्ष नावानी ओळखतात.भारतीय राजकारणाचा त्यांना दांडगा अभ्यास आहे.
या पुस्तकात त्यांनी मोदींनी 2019 च्या निवडणुकीत कसा दणदणीत विजय मिळवला याचे सविस्तर वर्णन केले आहे. या निवडणुकीसाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.यात कार्पोरेट पद्धतीचे सुनियोजित नियोजन होते. यात नैतिक अनैतिकच्या सीमारेषा पुसल्या गेल्या होत्या.यासाठी प्रचंड संपत्ती आणि साधनांचा वापर केला गेला होता.काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच हाच एकमेव उद्देश यात होता.
जिथे वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता होती तिथे भाजपने कसा विजय मिळवला.? पाच वर्षात पुन्हा एकदा विरोधकांच्या पुढे जाणे भाजपाला कसे शक्य झाले ? निवडणुकीचा मुख्य मुद्दा कोणता होता ? 
हे निवडणूक युद्ध  मोदी शहानी कसे जिंकले याचे रोमांचकारी विश्लेषण राजदीप सरदेसाई यांनी केले आहे. 

Tuesday, September 27, 2022

पांढरा रंग

पांढरा रंग 
 गाव तसे छोटेच होते.मुख्य शहरापासून थोडे लांब आणि आडवाटेवर .गावाची लोकसंख्याही मर्यादित होती. गावात सर्व धर्म समभाव वागणूक होती.  आता कमी लोकसंख्येमुळे काय जातीभेद , धर्मभेद पाळणार म्हणा . गावात ईद , गणपती,  ख्रिसमस जोरात साजरे व्हायचे. त्यावेळी मात्र गावात नुसती गर्दी दिसायची .
आजपासून गावात नवरात्र उत्सव सुरू होणार होता.गावातील तरुण वर्ग  नुसता उत्साहाने सळसळत होता. सणांच्या वेळीच त्यांना एकत्र येण्याची संधी मिळत होती.उत्सव समितीने रोजचे रंग प्रसिद्ध केले होते.आता त्याप्रमाणे रोज त्यात्या रंगाच्या साड्या , ड्रेस  नेसायला सुरवात होणार होती.
आजचा रंग होता पांढरा. उत्सव समितीने आज गरबा नृत्याचे आयोजन केले होते. पण गरबा नृत्यात भाग घेणाऱ्यांनी पांढरा पोशाख नेसला पाहिजे अशी अटही ठेवली होती.
संध्याकाळ झाली तशी देवीच्या पटांगणात गर्दी जमा होऊ लागली. डीजे ही तयार होता. सर्व स्त्री पुरुष पांढरे कपडे घालून हळूहळू डीजेच्या तालावर ठेका धरू लागले. हळूहळू गर्दी वाढू लागली  प्रत्येकाच्या अंगात गरबा भिनू लागला .बेफाम होऊन सर्व नाचत होते. 

आजच्या  गर्दीत त्या दोन तरुणी उठून दिसत होत्या .पांढरी शुभ्र साडी ,मोकळे केस ,कपाळावर देवीचा मोठा टिळा,गळ्यात पांढरी माळ अश्या पेहरावात त्या मोकळेपणाने हसत धुंद होऊन नाचत होत्या .काही तरुण तर त्यांच्याभोवतीच  नाचत होते आणि त्याही प्रतिसाद देत होत्या .
गावात काही वेळेचे बंधन नव्हते .त्यामुळे मध्यरात्र उलटून गेली तरी गरबा चालूच होता . हळूहळू त्या तरुणींच्या भोवती तरुणांचा घोळका वाढू लागला . त्यातील दोन तरुणांनी त्यांना हेतुपूर्वक एका कोपऱ्यात ढकलत नेले. नाचण्याच्या नादात त्यांच्याही लक्षात आले नाही .
शेवटी नाच थांबवून ते तरुण त्यांच्या जवळ गेले.
"या गावातल्या दिसत नाही तुम्ही ? " एकाने विचारले .
"ही इथलीच आहे .एकीकडे बोट दाखवून दुसरी म्हणाली , मी शेजारच्या गावची, हिची मैत्रिण ."
"मग आता काय विचार आहे .? तिच्याजवळ सरकत एक तरुण गूढ हसत म्हणाला .
"इथे नको . घरी जाऊ .मी काय एकटी घरी जाऊ का ? मला  सोडून परत या "  दुसरी डोळ्याने सूचक इशारा करीत म्हणाली .
ते दोघे खुश झाले ."चला निघू "असे म्हणून सर्व निघाले .
गप्पा मारत मारत कधी गावाबाहेर आले ते त्यांना कळलेच नाही . अचानक एका मोठ्या झाडाच्या पारावर त्या थांबल्या .
" थोडे थांबूया इथे ,एक म्हणाली .नाचून आणि चालून पाय दुखले माझे ."
" इथे नको ," ते दोघेही घाबरत म्हणाले ."इथे स्मशान आहे .आपण पुढे जाऊ ."
"मग काय झाले . गेली कित्येक वर्षे आम्ही इथेच राहतोय. ही या झाडावर राहते आणि मी त्या स्मशानात . यावेळी पहिल्याच दिवशी पांढरा रंग होता .म्हटले आपण गेली शेकडो वर्षे पांढऱ्या रंगाचे ड्रेस घालून फिरतोय मग त्याच ड्रेसवर गरबा खेळायला जाऊ .आता उद्यापासून पुन्हा इथेच बसून गरबा बघणार .चला येतायत ना ?" असे म्हणून एक स्मशानात शिरली तर दुसरी मोठ्याने हसत झाडावर चढून गेली.
दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना एक तरुण स्मशानात तर दुसरा वडाच्या पारावर बेशुद्धावस्थेत आढळले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, September 25, 2022

क्रिमिनल जस्टिस 2

क्रिमिनल जस्टिस 2
बिहाईंड क्लोज डोअर

बिक्रम चंद्रा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी वकील आहे. पत्नी अनुराधा आणि बारा वर्षाची  मुलगी रिया यांच्यासोबत एक छान आयुष्य जगतोय. 
अनुराधा  डिप्रेशनमध्ये आहे आणि तिचे एका  मानसोपचारतज्ञाकडे उपचारही चालू आहेत. अनुराधा  एकलकोंडी बनली आहे. सतत गोंधळलेली आणि विसारळू  बनली आहे असे तो म्हणतो.त्याने तसे आपल्या आईला आणि सासऱ्यांना ही सांगितले आहे.
आजच बिक्रमने  एक खूप  गाजलेली केस जिंकली आणि तो आनंदात घरी आला .आल्यावर त्याने पत्नीचा वॉर्डरोब चेक केला .त्यातील वस्तूंचे फोटो काढले. तिच्या गाडीचे किलोमीटर चेक केले. फोन चेक केला . त्यानंतर त्याने तिला आईसस्क्रिम आणले का ? म्हणून विचारले. आईसस्क्रीमचे तिच्या लक्षात नव्हते म्हणून स्वतः जाऊन आईसक्रिम घेऊन आला . रात्री तिघेही एकत्र जेवले .
मध्यरात्री रियाला कसल्याश्या आवाजाने जाग आली . तिने बेडरूमचा दरवाजा उघडून पाहिला तर तिची आई बाहेर  जात होती. म्हणून ती त्यांच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिचे वडील जखमी अवस्थेत बेडवर पडले होते. त्यांच्या कुशीत सुरा भोसकला होता .भीतीने तिने तो सुरा बाहेर काढला आणि रक्ताची धार सुरू झाली.घाबरून तिने आपल्या आजीला फोन केला .
थोड्या वेळाने पोलीस  हजर झाले आणि बिक्रम चंद्राला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. थोड्याच वेळाने अनुराधाने त्याच्याजवळ येऊन सॉरी म्हटले आणि काही वेळाने बिक्रम चंद्रा मृत्यू पावला.
 रियाच्या जबानीनुसार पोलिसांनी अनुराधाला अटक केली. तिचा गाऊन रक्ताने माखला  होता . तिने आपण नवऱ्यावर  चाकूने वार केले हे  कबूल केले. 
तिचा बाप पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला .पोलिसांनी त्याला जामिनासाठी वकिलाची मदत घेण्यास सांगितले. बिक्रम चंद्रासारख्या वकीलावर हल्ला झालाय तेव्हा त्याच्या विरोधात कोणताही वकील केस लढणार नाही हे निश्चित होते.इतक्या रात्री कुठून वकील आणायचा या चिंतेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने माधव मिश्राला फोन केला .
माधव मिश्राचे लग्न झालेय .आज त्यांची पहिली रात्र आहे . त्याचवेळी त्याचा फोन वाजतो आणि त्याला केस घेणार का ? असे विचारले जाते. समोरची पार्टी तगडी मालदार असेल या आशेने  माधव तडक मुंबईला निघतो.
केस फारच सोपी आणि सरळ असते. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केला आहे.सर्व पुरावे अनुराधाच्या विरुद्ध आहे . सोशल मीडिया ,प्रेस सर्व अनुराधावर तुटून पडलेत.तिला तुरुंगातही त्रास होतोय.त्यात ती गरोदर असल्याची बातमी येते. अनुराधा काहीही बोलायला तयार नाही . माधव मिश्राला फक्त खुनाचा हेतू शोधायचा आहे.
अनुराधाविषयीची सगळी माहिती गोळा करायला माधव मिश्रा सुरवात करतो .त्याला साथ मिळते ती एका नवोदित हुशार स्त्री वकिल निखटची .निखटने माधव मिश्राला आधीच्या केसमध्येही मदत केलेली असते आणि त्याचा परिणाम नोकरी जाण्यात होते.आता ती पुन्हा जॉब शोधतेय .माधव पुन्हा तिला सहाय्यक बनण्याची विनंती करतो आणि ती स्वीकारते.
दोघे मिळून अनुराधाच्या केसचा पहिल्यापासून तपास करतात.त्यात त्यांना काही धक्कादायक गोष्टी कळतात.इथे तुरुंगात अनुराधा मुलीला जन्म देते. पण अजूनही ती खुनाचा हेतू सांगायला तयार नाही .
शेवटी असे काय घडते की भर कोर्टात अनुराधाला तोंड उघण्यास भाग पडते. का करते अनुराधा आपल्या पतीचा खून ??
नेहमीप्रमाणे पंकज त्रिपाठी माधव मिश्राच्या भूमिकेत भाव खाऊन गेलाय.संपूर्ण सिरीजच त्याच्या खांद्यावर आहे. अनुप्रिया गोयंका निखटच्या भूमिकेत शोभून दिसते.पंकज त्रिपाठीच्या समोर यावेळी आशिष विद्यार्थी सरकारी वकील म्हणून उभा राहिलाय .कीर्ती कुल्हारी अनुराधा चंद्राच्या भूमिकेत फिट बसते.

अभिनय

अभिनय
"आजी ,उद्या शूट आहे.फिल्मसिटी सेट तीनला . सकाळी दहा वाजता या आठवणीने ". दरवाजा उघडून आत येत त्या तरुणाने तिला निरोप दिला . तसे तिने डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहून मान डोलावली. 
तिचा होकार पाहून तो हसला. " किती दिवस शूटिंग आहे रे " तिने हातानेच चहाची खूण करत त्याला विचारले.
"असेल दोन दिवस तरी . तुला माहितीय हल्ली प्रत्येक गोष्ट काही एका एपिसोडमध्ये संपत नाही . दोन तीन एपिसोड तरी होतील ". तो मोठ्याने हसत म्हणाला ." ये वेळेवर आणि हो येताना  टॅक्सीभाडे लावायचे विसरू नकोस ." त्याने आठवण करून दिली आणि निघून गेला.
तो गेल्यावर बंद त्या दरवाजाकडे पाहत ती कितीतरी वेळ गप्प बसून होती. ती साधारण सत्तरीच्या जवळपास होती. एकटीच राहायची . म्हणजे नवरा पूर्वीच गेला होता. नंतर एकुलता एक मुलगा ही गेला . अंगात थोडे अभिनयाचे गुण होते . त्यावर कधीकधी छोटीमोठी कामे मिळायची तिला.  
हल्ली टीव्ही सिरियलमुळे कामाची कमी नव्हती त्यामुळे जिथे काम मिळेल तिथे जायची. आपल्यावर तिचा बोजा नको म्हणून नातेवाईक ही टाळत होते तिला.
आज सकाळपासूनच तिच्या अंगात थोडी कणकण जाणवत होती.पुढे ताप आला तर कोणाला त्रास नको म्हणून गोळी घेऊन थोडी पडली  तेव्हाच हा निरोप आला .
सकाळी लवकर उठली तरी अंग दुखत होतेच. घाईघाईने तयार होऊन ती सेटवर वेळेवर पोचली. तिला पाहताच तो कालचा तरुण जवळ आला .
" वेळेवर आलीस आजी " असे म्हणून सरळ सेटवर घेऊन गेला . आज सेटवर दुःखद वातावरण दिसत होते. बरेचसे कलाकार पांढऱ्या कपड्यात वावरत होते. अच्छा म्हणजे आज मरणाचा सीन आहे तर. चला म्हणजे दुःखी चेहरा करून कोपऱ्यात बसायचे इतकेच काम तर. बरे झाले . असे मनात म्हणत ती सेटवर फिरू लागली .
इतक्यात तो तरुण पुन्हा आला " आजी, त्या चटईवर झोप. प्रेतासारखे . आज तुलाच मेलेल्या आजीची ऍक्टिग करायची आहे. आज सेलिब्रिटी आहेस तू ." असे म्हणून मोठ्याने हसला. तशी ती चमकलीच .
" अरे पण किती दिवस असे प्रेतासारखे पडून राहायचे. कंटाळा येईल रे " ती केविलवाणा चेहरा करीत म्हणाली. "काळजी नको, आज दिवसभरात करून टाकू .एकदा का तुला चितेवर झोपवून अग्नी दिला की तुझे काम संपले." तो सहज स्वरात म्हणाला .
तिने डोळे वटारत त्याच्याकडे पाहिले आणि मुकाटपणे त्याने दाखविलेल्या जागेवर झोपली . हळूहळू एक एक सेलिब्रिटी कलाकार तिच्या शेजारी येऊन गोलाकार बसू लागले. सगळ्यांनी पांढरे ड्रेस चढविले होते. ती त्या कलाकारांना पाहून खुश झाली . सगळेच टीव्ही सिरियलचे मोठे कलाकार होते आणि आज तिच्यासाठी रडणार होते. नेहमीच भरपूर दागिने आणि उंची साड्या नेसणार्या , एकमेकींच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या स्त्रिया आज डोळ्याला पदर लावून रडत होत्या .एकीने सासूबाई असे मोठ्याने ओरडत तिला मिठी मारली त्यात  हातातली बांगडी जोरात तिच्या मानेजवळ टोचली . त्या मोठ्या आवाजात  मग तिनेही आई ग करीत ओरडून घेतले.
" मॅडम , इतकेही प्रेम दाखवू नका हो की प्रेताच्या मानेतून रक्त येईल." डायरेक्टर हसत ओरडला.तसे तिच्यासकट सगळेच हसू लागले.
"बघत होते आजीला खरोखरच प्रेताचा अभिनय येतोय का ?"  ती अभिनेत्री हसत हसत म्हणाली.
दुःखी असलेले वातावरण अचानक हलके झाले.सगळे इथेतिथे पसरले.काहीजण सिगारेट ओढू लागले तर काही चहासाठी गेले. बराच वेळ झोपून राहिल्यामुळे हिचे अंग आखडून गेले होते. ती उठून उभी राहिली आणि सेटवर फेऱ्या मारू लागली.
"आजी ,काही त्रास नाही ना ?  सेलिब्रिटी तुमच्या मरणावर रडतायत .भाग्यवान आहात." तो हसून म्हणाला. तशी तीही हसली.
पुन्हा शूटिंग सुरू झाले .यावेळी बरेचजण रडत होते. तिच्याविषयी चांगले बोलत होते.तिला आंघोळ घालून भरजरी साडी नेसवली गेली.दागिने चढविले गेले.
साडी तर खूपच महाग दिसते. शूटिंग संपल्यावर मागून घेतली पाहिजे निर्मात्याकडून .तिने मनात पक्के केले. केसातील गजऱ्याचे धागे तिच्या कानाजवळ येऊन गुदगुल्या करू लागले.मोठ्या कष्टाने तिला चेहरा गंभीर ठेवावा लागला .तिच्या नाकात कापसाचे बोळे होते. तोंडात कापूस आणि तुळशीचे पान ठेवले होते. शेवटी तिला उचलून तिरडीवर ठेवण्यात आले. "अरे देवा ह्याला काही नीट उचलता येत नाही का ? आता पडले असते ना मी ." ती मनातच चिडली. 
मग तिची प्रेतयात्रा  निघाली. इच्छा असूनही तिला डोळे उघडता येत नव्हते. नेमके कॅमेऱ्याने पकडले तर सगळी मेहनत वाया जायची. आज ना उद्या टीव्हीवर बघूच .
शेवटी चितेवर झोपवून पुन्हा सर्वांनी रडारड केली.त्या सेलिब्रिटी कलाकारांनी तिला पाणी पाजले आणि एक हातात जळते लाकूड घेऊन चितेभोवती फेऱ्या मारू लागला.
"अरे देवा, हा खरोखरच पेटविणार की मला ."ती मनातून हादरली.इतक्यात कट ओके आवाज ऐकू आला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
"आजी तुझे काम झाले . निघालीस तरी चालेल " तो तरुण पुन्हा तिच्याजवळ येऊन म्हणाला .तशी ती त्याच साडीवर बाहेर पडली.
सकाळी जाग आली तेव्हा तो तरुण तिच्यासमोर उभा होता. "दुसऱ्या जगात स्वागत आहे तुमचे ? "तो हसत उद्गारला 
" दुसरे जग ..? म्हणजे ".तिने कुतूहलाने विचारले.
" म्हणजे आता तुम्ही मेल्या आहात. पृथ्वीवरचे जीवन संपवून आमच्या जगात आला आहात. कालपासून तुमच्यावर नजर ठेवून होतो.योग्य वेळ येताच तुम्हाला घेऊन जाणारच होतो .पण म्हटले असेही महानगरपालिका बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करणार आहे तर निदान शुटिंगमधून तरी मृत्यूचे सर्व विधी अनुभवू द्या.चार चांगल्या लोकाना खोटेखोटे का होईना तुमच्या मृत्यूवर रडू द्या .म्हणून सर्व घडवून आणले. म्हातारे बेवारस म्हणून तुला अग्नी मिळेल पण खोटे खोटे का होईना तुझ्या प्रेतावर विधिवत अंत्यसंस्कार तरी झालेत .चल आभार मान माझे ."असे म्हणून तिचा हात धरून चालू लागला .
निघताना मागे वळून पाहिले तेव्हा बेडवर तिचे शरीर शांतपणे पडून होते.कालच नेसलेली साडी तिला शोभून दिसत होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, September 16, 2022

क्रिमिनल जस्टिस 2

क्रिमिनल जस्टिस 2
बिहाईंड क्लोज डोअर

बिक्रम चंद्रा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी वकील आहे. पत्नी अनुराधा आणि बारा वर्षाची  मुलगी रिया यांच्यासोबत एक छान आयुष्य जगतोय. 
अनुराधा  डिप्रेशनमध्ये आहे आणि तिचे एका  मानसोपचारतज्ञाकडे उपचारही चालू आहेत. अनुराधा  एकलकोंडी बनली आहे. सतत गोंधळलेली आणि विसारळू  बनली आहे असे तो म्हणतो.त्याने तसे आपल्या आईला आणि सासऱ्यांना ही सांगितले आहे.
आजच बिक्रमने  एक खूप  गाजलेली केस जिंकली आणि तो आनंदात घरी आला .आल्यावर त्याने पत्नीचा वॉर्डरोब चेक केला .त्यातील वस्तूंचे फोटो काढले. तिच्या गाडीचे किलोमीटर चेक केले. फोन चेक केला . त्यानंतर त्याने तिला आईसस्क्रिम आणले का ? म्हणून विचारले. आईसस्क्रीमचे तिच्या लक्षात नव्हते म्हणून स्वतः जाऊन आईसक्रिम घेऊन आला . रात्री तिघेही एकत्र जेवले .
मध्यरात्री रियाला कसल्याश्या आवाजाने जाग आली . तिने बेडरूमचा दरवाजा उघडून पाहिला तर तिची आई बाहेर  जात होती. म्हणून ती त्यांच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिचे वडील जखमी अवस्थेत बेडवर पडले होते. त्यांच्या कुशीत सुरा भोसकला होता .भीतीने तिने तो सुरा बाहेर काढला आणि रक्ताची धार सुरू झाली.घाबरून तिने आपल्या आजीला फोन केला .
थोड्या वेळाने पोलीस  हजर झाले आणि बिक्रम चंद्राला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. थोड्याच वेळाने अनुराधाने त्याच्याजवळ येऊन सॉरी म्हटले आणि काही वेळाने बिक्रम चंद्रा मृत्यू पावला.
 रियाच्या जबानीनुसार पोलिसांनी अनुराधाला अटक केली. तिचा गाऊन रक्ताने माखला  होता . तिने आपण नवऱ्यावर  चाकूने वार केले हे  कबूल केले. 
तिचा बाप पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला .पोलिसांनी त्याला जामिनासाठी वकिलाची मदत घेण्यास सांगितले. बिक्रम चंद्रासारख्या वकीलावर हल्ला झालाय तेव्हा त्याच्या विरोधात कोणताही वकील केस लढणार नाही हे निश्चित होते.इतक्या रात्री कुठून वकील आणायचा या चिंतेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने माधव मिश्राला फोन केला .
माधव मिश्राचे लग्न झालेय .आज त्यांची पहिली रात्र आहे . त्याचवेळी त्याचा फोन वाजतो आणि त्याला केस घेणार का ? असे विचारले जाते. समोरची पार्टी तगडी मालदार असेल या आशेने  माधव तडक मुंबईला निघतो.
केस फारच सोपी आणि सरळ असते. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केला आहे.सर्व पुरावे अनुराधाच्या विरुद्ध आहे . सोशल मीडिया ,प्रेस सर्व अनुराधावर तुटून पडलेत.तिला तुरुंगातही त्रास होतोय.त्यात ती गरोदर असल्याची बातमी येते. अनुराधा काहीही बोलायला तयार नाही . माधव मिश्राला फक्त खुनाचा हेतू शोधायचा आहे.
अनुराधाविषयीची सगळी माहिती गोळा करायला माधव मिश्रा सुरवात करतो .त्याला साथ मिळते ती एका नवोदित हुशार स्त्री वकिल निखटची .निखटने माधव मिश्राला आधीच्या केसमध्येही मदत केलेली असते आणि त्याचा परिणाम नोकरी जाण्यात होते.आता ती पुन्हा जॉब शोधतेय .माधव पुन्हा तिला सहाय्यक बनण्याची विनंती करतो आणि ती स्वीकारते.
दोघे मिळून अनुराधाच्या केसचा पहिल्यापासून तपास करतात.त्यात त्यांना काही धक्कादायक गोष्टी कळतात.इथे तुरुंगात अनुराधा मुलीला जन्म देते. पण अजूनही ती खुनाचा हेतू सांगायला तयार नाही .
शेवटी असे काय घडते की भर कोर्टात अनुराधाला तोंड उघण्यास भाग पडते. का करते अनुराधा आपल्या पतीचा खून ??
नेहमीप्रमाणे पंकज त्रिपाठी माधव मिश्राच्या भूमिकेत भाव खाऊन गेलाय.संपूर्ण सिरीजच त्याच्या खांद्यावर आहे. अनुप्रिया गोयंका निखटच्या भूमिकेत शोभून दिसते.पंकज त्रिपाठीच्या समोर यावेळी आशिष विद्यार्थी सरकारी वकील म्हणून उभा राहिलाय .कीर्ती कुल्हारी अनुराधा चंद्राच्या भूमिकेत फिट बसते.

Wednesday, September 14, 2022

क्रिमिनल जस्टीज

क्रिमिनल जस्टीस
आदित्य शर्मा एक उत्साही तरुण. तो चांगला फूटबॉल प्लेयर आहे .एमबीए करून छान करियर करायचे अशी स्वप्ने बघतोय. फावल्या वेळात तो वडिलांची खाजगी कॅबही चालवतो. 
त्या दिवशी फुटबॉल मॅच जिंकल्यावर मित्रांसोबत पार्टी करायला निघतो पण त्याची बहीण त्याला थोडा वेळ कॅब चालव अशी विनंती करते. फक्त चार कस्टमर करेन असे सांगून तो बाहेर पडतो. 
शेवटच्या क्षणी एक तरुणी सनाया त्याच्या कॅबमध्ये बसते . सनाया थोडी अस्वस्थ असते.त्याच्या विनंतीकडे लक्ष न देता चार ठिकाणी फिरवते . त्यांची बाचाबाचीही होते. शेवटी ती त्याला घरी सोडायला सांगते . तोपर्यंत पार्टीला उशीर झालेला असतो. 
 आदित्य तिला घरी सोडून निघतो पण काही अंतर गेल्यावर त्याला तिचा फोन कॅबमध्ये सापडतो . तो पुन्हा तिच्या घरी जातो आणि तिला फोन देतो.
 त्याच्या प्रामाणिकपणावर ती खूष होते .त्याला आत बोलावून ड्रिंक ऑफर करते .तो नाही बोलतो तरी जबरदस्तीने पाजते. त्याच्यासोबत डान्स करते.ड्रग घेते. चाकूने गेम खेळते.शेवटी त्यांचे संबंध घडतात आणि नंतर  ते गाढ झोपून जातात .
पहाटे आदित्यला  जाग येते आणि बाजूचे दृश्य पाहून तो हादरतो. सनाया मेलेली असते. तिच्या अंगावर चाकूचे अनेक वार केलेले असतात. संपूर्ण बेड आणि चादर तिच्या रक्ताने माखलेले असते.
आदित्य  घाबरतो. घाईघाईने पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करतो.चाकू स्वतःच्या जाकिटात लपवून पळ काढतो.त्याचवेळी शेजारच्या इमारतीतील एक गृहस्थ त्याला पाहतो.
घाईघाईने कॅब घेऊन जाताना त्याची दुसऱ्या गाडीला धडक बसते.त्यानंतर पोलीस त्याला ड्रिंक अँड ड्रॉईव्ह आरोपाखाली अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तिथे त्याला तो गृहस्थ ओळखतो आणि पोलीस त्याला सनायाच्या  खुनाच्या आरोपाखाली अटक करतात .
माधव मिश्रा  लखनौ येथून गोल्ड मेडल मिळवलेला वकील.त्याच्याकडे फक्त ड्रिंक अँड ड्रॉईव्ह , रात्री वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सोडविणे अश्या छोट्या केस येतात.यावेळी ही पोलिसांनी आदित्य शर्मा सोबत काही स्त्रियांना अटक केलेली असते आणि या सर्व  केससाठी पोलीस माधवला बोलवितात.
आपल्या अशीलला खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय हे कळताच माधवच्या पायाखालची जमीन सरकते. इतकी मोठी केस तो हँडल करू शकणार नाही याची जाणीव त्याला होते.तरीही त्यांच्याकडून काही पैसे उकळता येतील का याची चाचपणी करायला जातो पण तिथे सुप्रसिद्ध वकील मंदिरा येते आणि कॅब कंपनीतर्फे आदित्यची केस ती लढणार असल्याचे जाहीर करते. नाराज चेहऱ्याने माधव तिथून बाहेर पडतो .
त्यानंतर माधव आपल्या परीने ही केस सोडविण्याचा प्रयत्न करतो .पण त्याला यश मिळेल का ? कोण आहे या खुनामागे ? खुनाचा हेतू काय आहे ? प्रत्येक भागात माधव आदित्य सोबत प्रेक्षकही गुंतून जातात .
या मालिकेतील प्रमुख आकर्षण आहे तो माधव मिश्रा अर्थात पंकज त्रिपाठी .चेहऱ्यावर भोळेपणाचा भाव आणून थंड आवाजात विनोदी  कसे बोलले जाते हे यांच्याकडून शिकावे. तर मिर्झापुरमध्ये हाच थंड आवाज वापरून दगडी चेहऱ्याने डोळ्यातून  अंगावर काटा आणणारा अभिनय केला होता. 
जॅकी श्रॉफची या मालिकेत एक तगडी भूमिका आहे . तो तुरुंगात एक खतरनाक कैदी आहे आणि आदित्यकडून  पैसे घेऊन त्याला  संरक्षण  देतोय. 
मिता विशिष्टने मंदिराची भूमिका केलीय.
पोलीस स्टेशन , तेथील वातावरण ,तुरुंगातील  कैद्यांचे जीवन , त्यांचे राहणीमान , कोर्टरूम , वकिलांची जुगलबंदी याचे सुरेख चित्रीकरण यात केले आहे.

Wednesday, September 7, 2022

युनिफॉर्म

युनिफॉर्म
अरुण भोसलेच्या घरात शिरताच तो प्रसन्न झाला .एकतर अरुणच्या तरुण मुलाच्या भक्कम हाताचा आधार होताच .त्यात मुलीने नेहमीप्रमाणे मखर सुरेख सजवला होता. काकूने प्रसन्न चेहऱ्याने त्याचे स्वागत केले.काल रात्रभर मखराची सजावट चालू होती.पण  कोणाच्याच चेहऱ्यावर थकवा दिसत नव्हता .दरवर्षी अरुणच्या घरी असेच वातावरण असायचे.शेवटी कोकणी माणूस.भक्ती करेल तर मनापासून .
अरुण घरी नव्हताच. तो कधी असतो म्हणा.
 आठ दहा वर्षापूर्वी तो पहिल्या दिवशी असायचा .पण नंतर ड्युटीवर गेला की घरी येण्याची वेळ नाही . गेली काही वर्षे मुंबई पोलिसांचे काम वाढलंय हे खरे. त्यात हा साधा शिपाई.
सीताराम भोसले म्हणजे याच्या बापाने शिव्या देत मारून मुटकून दहावीपर्यंत शिकवला आणि त्याच शिक्षणाच्या जीवावर पोलिसात चिटकवला.
मखरातील मऊ उबदार  आसनावर बसताच त्याने आपल्या उंदराकडे नजर टाकली.यावेळी काकूने त्यालाही भरजरी वस्त्रे शिवली होती त्यामुळे तोही खुश होता.समोर कोकणातील पारंपरिक पद्धतीचा नैवेद् होता.त्याकडे हावरट नजरेने पाहत शेपटी हलवीत होता.

"आपणही वाहन बदलावे का ?" तो उंदराकडे पाहून विचार करत होता. गेली हजारो वर्षे आपण तेच वाहन वापरतोय. इथे मात्र पंधरा वर्षांनी वाहने बदलायला सांगतात, नाही ,तर तसा कायदाच केला आहे .हल्ली हा खूपच आळशी झालाय आणि बडबड ही जास्त करू लागलाय. बघू पुढे "असं ठरवून तो पूजेसाठी सज्ज झाला .
दरवर्षीप्रमाणे यावेळी ही अरुण भोसलेची ड्युटी संवेदनशील ठिकाणी होती. नेहमीप्रमाणे वरिष्ठांनी याला बकरा बनवून तिथे पाठविले होते.या सणासुदीला अरुण भोसले सारखा माणूस प्रिय बनतो.
आता रिलिव्हरही एक दोन दिवस दांडी मारणार .पण अरुण साधा होता. न बोलता प्रामाणिकपणे ड्युटी करणारा .आताही त्या म्हातारीच्या हातातली जड पिशवी घेऊन तिला जिन्यावर चढायला मदत करत होता. तिच्या बरोबरची ती सुंदर स्त्री मात्र मोबाईलवर कोणाशी तरी हसून बोलत होती. 
तिचे सामान जागेवर ठेवून तो परत आपल्याजागी आला तेव्हा तो तरुण तिथे बसला होता.एक आपलेपणाचे हास्य त्याच्या चेहऱ्यावर होते .
"काय काका ? कसे चालले आहे ? सध्या हमालाची कामे ही करता का ?" त्याने हसत अरुणला विचारले.
"मी  विनायक , महादेव पार्सेकरांचा मुलगा "त्याने अरुणच्या प्रश्नार्थक नजरेला उत्तर दिले .
"पार्सेकर म्हणजे मधल्या वाडीतले की काय ?"अरुणने आश्चर्याने विचारले. 
"होय , इथे आलो होतो म्हटले भेटून जाऊ . कधी पर्यंत ड्युटी तुमची ?" त्याने विचारले.
"अरे या ड्युटीचा काय घेऊन बसलस. ती तर माझ्या पचवीक पुजली असा.दोन दिवस हयसून खय जावूक मिळत ना बघ"  शेवटी कोकणी माणूस भेटताच अरुणचा बांध फुटला.
"वाटलाच माका. युनिफॉर्मचो वास हयसर मारता बघा" तो हसत म्हणाला.
" मग काय तू धुवून देणार आहेस का ?" अरुण चिडला ."तुम्हाला काय माहित,  किती टेन्शन असते आम्हाला . जरा चुकीचे पाऊल उचलले की हंगामा होईल. घरी बाथरूमच्या दरवाजाची कडी तुटलीय ती लावायला वेळ नाहीय.घरी तरुण बायको आहे मुलगी आहे काळजी वाटते ." अरुण आता जास्तच चिडला होता .
"तरुण बायको ? "त्याने मिस्कीलपणे अरुणकडे खालून वर पाहत विचारले.
"कोकणातला ना रे तू ? मग तुका माहीत नाय ,प्रत्येक कोकणी माणसाक त्याची बायको नेहमीच तरुणच वाटता " असे बोलून जोरात हसला.
"बरे द्या, मी तुमचे कपडे धुवून आणतो "त्याने हात पुढे करत विचारले.
"काय तरी काय ? आणि काय नागडो बसून ड्युटी करू? थट्टेने बोललय मी , मनावर घेऊ नको आणि कपडे काढले तर आतील फाटकी बनियन दिसायची " अरुण पुन्हा हसला .
"काका मी घरून तुमचे कपडे घेऊन आलोय. हे घाला ." असे बोलून त्याने कडक इस्त्रीचा युनिफॉर्म त्याच्या हातात दिला.
" घरून इलास ता बोललस नाय. आमचो बाप्पा बसलो की नाय ? पूजा बिजा झाली काय ?? दोन वर्षा खूप कठीण गेली रे.मागच्या वर्षी तुझ्या काकीला करोना झाला .ती बाहेर ,मी ड्युटीवर,  पोरांनी सर्व केलान हो ."अरुण हळूच डोळे पुसत म्हणाला . 
"सर्व व्यवस्थित झाले काका. हे कपडे घाला तोवर मी हे अंगावरचे कपडे धुवून आणतो ."असे म्हणून तो अंगावरचा युनिफॉर्म घेऊन निघाला.
 कडक इस्त्रीचा युनिफॉर्म अंगावर चढवताच अरुणला खूपच फ्रेश आणि प्रसन्न वाटू लागले. जणू काही एक नवीन उर्जाच त्याच्या अंगात निर्माण झाली .थोड्या वेळाने तो धुतलेला युनिफॉर्म हाती घेऊन आला .
"काका मस्त दिसता हो. ते शूजही द्या . पॉलिश करून आणतो . "असे बोलून जबरदस्तीने शूज काढून घेऊन गेला . काही वेळाने त्याने चकचकीत पॉलिश केलेले शूज त्याच्या हाती दिले.
"आता कसे छान रुबाबदार दिसताय तुम्ही . आता हा प्रसाद घ्या " असे बोलून त्याने उकडीचा मोदक अरुण च्या हाती दिला.मोदक तोंडात टाकताच त्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.
"काका तुमच्याच घरचा आहे . काकीने बनविलेला ." तो हसत म्हणाला .
खुश होऊन अरुणने हात जोडले."चल एक आठवण म्हणून सेल्फी काढू " असे बोलून अरुणने त्याच्यासोबत दोन सेल्फी घेतले.
"तुझा नंबर दे " अरुणने मोबाईल हातात घेत विचारले
"नंबर नाहीय माझ्याकडे .फोन बिघडलाय पण भेटीन ना मी तुम्हाला पुढे " तो म्हणाला आणि घाईघाईत निघून गेला.
"आलात का त्याचे कपडे धुवून ?" मखरात शिरताच उंदीर कुत्सितपणे म्हणाला . " शूजही पॉलिश करून दिले असतील ?"
"काय झाले रे त्यांची थोडी सेवा केली तर ? आज कित्येक वर्षे भोसले कुटुंब मनोभावे आपली सेवा करतात.अरुण बघ स्वतःचा घरचा गणपती सोडून लोकांचे गणपती कसे सुरक्षित राहतील त्याची काळजी घेतोय. करोनात कित्येक पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती दिले पण जनतेची सेवा केली. मग एक दिवस आपण त्यांची सेवा केली तर काय हरकत आहे. त्याच्या घरी माझी वस्त्रे नेहमीच बदलली जातात आणि तुझीही .मग त्याने का दोन दिवस एकाच युनिफॉर्मवर राहावे. केली मदत त्यात काय " बेफिकीर स्वरात त्याने समोरचा मोदक उचलला.
"मग तू धुतलेस का ?" उंदराने कुतूहलाने विचारले
"छे. छे.. आपण कुठे काम करतो ? इकडचे तिकडे करतो फक्त.एका बाईला सांगितले ते पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेत पण दोन दिवस युनिफॉर्म बदलला  नाही. तिने ताबडतोब धुवून दिला .तेच बूट पॉलिश साठी केले. लोक मदतीला नेहमी तयार असतात . फक्त आपण सांगत नाही " त्याने हसत हसत उत्तर दिले.
इथे मुलाने अरुणला फोन केला."काय हो बाबा कसलेही सेल्फी काय म्हणून पाठवता .एकट्याचा सेल्फी काढण्यापेक्षा गणपतीसोबत तरी काढून पाठवायचा ."
आपल्या सोबत सेल्फीत असणारा महादेव पार्सेकरचा मुलगा कसा दिसत नाही ? हाच प्रश्न पुढे दिवसभर अरुणला छळणार होता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 6, 2022

कलंक

कलंक 
त्या वृद्धाश्रमात आज नेहमीपेक्षा जास्तच गडबड दिसत होती.कारणच तसे होते.
आजपासून गणेशोत्सव चालू होणार होता. सर्व वृद्ध स्त्रीपुरुष आपल्यापरीने गणेशाच्या आगमनाची तयारी करत होते. गणेशाची पूजा करायला का होईना काहीजणांनी मुले नातेवाईक येणार होते.
आता दहा दिवस वृद्धाश्रम उत्साहाने फुलून जाणार होता. थरथरत्या हाताने आरती ओवाळली जाणार होती तर अडखळत का होईना पण उत्साहात आरती म्हटली जाणार होती.
शहराबाहेर तो वृद्धाश्रम बांधला होता.कोणी बांधला होता याची माहिती फारशी कोणाला नव्हती. पण नको झालेल्या वृद्धांना हा आश्रम सहारा देतो हे बहुतेकांना माहीत होते. त्यामुळे बरेच वृद्ध स्त्रीपुरुषांच्या हक्काचे ठिकाण बनले होते.
इथे अति वृद्ध ,आजारी,  रोगी , जखमी असे सर्वजण एकमेकांना सांभाळत राहत होते. इथला खर्च कोण कसा चालवतो याची माहिती कोणाला नव्हती पण एक दोन केयरटेकर नियमितपणे वृद्धाश्रमाची काळजी घेत होते. 
बापू राणे साधारण  नव्वदीच्यावर होते. आता त्यांचे उरलेले आयुष्य अंथरुणात आणि व्हीलचेयरवर होते. 
दरवर्षी गणपती आला की ते आयुष्यातून सुटका मागत होते. पण अशी सुटका त्यांच्या नशिबात अजूनतरी दिसत नव्हती.
आश्रमातील इतर वृद्ध त्यांच्यापासून लांबच राहत होते . तर काही ओळखीचे त्यांना चोर म्हणून ओळखत होते .
 खरे आहे , बापूंनी आपली उमेदीची काही वर्षे तुरुंगात काढली होती . त्यावेळी तुरुंगवास झालेल्या व्यक्तींना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान होता . पण बापूंच्या ते ही नशिबात नव्हते. 
टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील एका मूर्तीचे दागिने चोरल्याचा आळ त्याच्यावर होता आणि त्याचीच शिक्षा त्यांनी भोगली होती. ते दागिने  अजूनपर्यंत कधीच सापडले नव्हते आणि बापूनी ते कुठे आहेत हे सांगायला अजूनही तोंड उघडले नव्हते.
त्यांच्या या कृतीची शिक्षा कुटुंबीयांनी भोगली होती. घरदार सोडून दूर या शहरात यावे लागले होते. पण इथेही त्यांची अपकीर्ती पाठ सोडत नव्हती.
काळ बदलला. हळूहळू वातावरण निवळू लागले. त्यांच्या नातवंडांनी ही गोष्ट कधीच फारशी मनाला लावून घेतली नव्हती. ते सर्व आता उच्चवर्गीय झाले होते आजोबांचा घरात त्रास होऊ लागला होता .मग त्यांची रवानगी ह्या वृद्धाश्रमात झाली होती.
दुर्दैवाने इथेही त्यांच्या कामगिरीची बातमी पोचली होती. काही वृद्ध त्यांना ओळखत होते आणि त्यांनीच ही बातमी संपूर्ण वृद्धाश्रमात फैलावली होती.त्यामुळे प्रत्येकाची त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली होती. म्हणूनच बापू राणे आयुष्याला कंटाळले होते.कधी एकदा गणपती येतो आणि त्याच्याकडून सुटका करून घेतो असे झाले होते.
 बाप्पा मोरयाच्या गजरात सिंहासनावर बसून तो आत शिरला तेव्हा त्याच्या मनात धडधड सुरू झाली. दोन्ही बाजूला पाट धरून उचलणारे म्हातारे स्वतःला तरी सांभाळतील का याचीच भिती त्याला मखरापर्यंत  पोचेपर्यंत वाटत होती. हताश नजरेने तो नेहमी आपल्या बाजूला असणाऱ्या उंदराला शोधू लागला .तेव्हा ते महाशय आधीच मखरात जाऊन स्वतःची जागा पटकावून बसले होते. त्याच्या नजरेतील छद्मी भाव पाहून तो हसला आणि अलगद जागेवर जाऊन बसला.
" तुम्हाला या म्हाताऱ्यांच्यात बसायला बरे आवडते "प्रसादासाठी आणलेल्या उकडीच्या मोदकाकडे तो आशाळभूत नजरेने पाहत म्हणाला .
" अरे बरेच हिशोब बाकी आहेत यांच्याकडे, म्हणून मुद्दाम आलोय इथे " तो लोडाला टेकून आजूबाजूला नजर फिरवीत म्हणाला .
"आरती तरी फिरवतील ना नीट.नाहीतर पेटता दिवा आपल्याच अंगावर पडायचा .आरती स्पष्ट तरी म्हणता येईल का त्यांना " त्याने शेपटी हलवीत नाक मुरडत विचारले.
" हीच ती माणसे आहेत ज्यांनी आपल्याला घरातून बाहेर काढून सार्वजनिक बनविले आणि स्वातंत्र्यसंग्राम पेटविला हे विसरू नकोस मूषका " कठोर आवाजात त्याने आपल्या अधिकाराची जाणीव करून दिली.
त्यानंतर रोज त्याची आरती झाल्यावर वेगवेगळे कार्यक्रम होत होते. तोही तल्लीन होऊन त्याचा आनंद घेत होता .बापू राणे मात्र खोलीतूनच त्याच्या पाया पडत होते.
विसर्जनाच्या दिवशी एक तरुण वृद्धाश्रमात शिरला .भारतीय स्वातंत्र्यसंग्रामावर  काही व्याख्यान द्यायची इच्छा होती. स्वातंत्र्यसंग्राम हे नाव ऐकताच बापू राणे व्हिलचेयर वरून बाहेर आला . त्यांना पाहून तो तरुण हसला . त्याचे आश्वासक हास्य पाहून बापू भारावून गेला.
"भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामचा तो ऐन भराचा काळ होता. महात्माजींनी करो या मरो अशी हाक दिली होती .काही ठिकाणी हिंसा चालू होती .इंग्रज अधिकारी त्याचा फायदा घेऊन घरदार लुटत होते तर काही इंग्रज, स्त्रियांची अब्रू खुलेआम लुटत होते.अश्याच एका घरात ते चार इंग्रज अधिकारी शिरले आणि त्या घरातील दोन छोट्या मुलींची आणि त्यांच्या आईची अब्रू लुटून त्यांना ठार केले.पण काही काही महिन्यातच त्याच घरात त्यांची गोळ्यांनी छिन्न झालेली प्रेते सापडली होती. आजपर्यंत त्यांना कोणी ठार केले याचा शोध लागला नाही.अजूनही ती केस ब्रिटिश दप्तरी ओपनच आहे .पण त्या घटनेच्या काही दिवस आधी त्या गावातील सार्वजनिक गणपतीच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले होते त्या चोराला मात्र इंग्रजांनी पकडले काही वर्षे तुरुंगवास भोगून तो कुठे गायब झाला ते कळलेच नाही ." तो तरुण रंगून व्याख्यान देत होता.
" हे काय ते महान चोर बापू राणे." कोपऱ्यात केविलवाणा चेहरा करून  बसलेल्या बापूंच्या दिशेने बोट करीत एक वृद्ध म्हणाला .
" तुम्हाला फक्त त्यांची अर्धवट कथा माहितीय .त्यांनी चोरी केली हे खरंय पण त्या दागिन्यांतून त्याने बंदूक आणि काडतुसे खरेदी केली आणि त्या चार अधिकाऱ्यांसह पुढे कित्येक इंग्रजांना ठार केले हे कितीजणांना माहीत आहे "त्या तरुणाने शांतपणे प्रश्न विचारला .
ते ऐकताच सर्व स्तब्ध झाले . सर्वांनी उठून बापूंपुढे हात जोडले आणि माफी मागितली.
बापूनी भरल्या डोळ्यांनी त्या तरुणांकडे पाहत हात जोडले आणि खोलीत नेण्याची खूण केली.
त्या तरुणाने व्हीलचेयर ढकलत खोलीत आणली." हे सर्व तुला कसे कळले ? माझ्याशिवाय ही गोष्ट कोणालाच माहीत नाही" बापूनी त्याच्या डोळ्यात नजर रोखून विचारले.
" आहो बापू माझेच तर दागिने त्या दिवशी चोरले होते तुम्ही आणि त्या दागिन्यांचे तुम्ही काय करणार याचीही माहिती होती मला. "तो हसत म्हणाला .
" मग इतकी वर्षे का आला नाहीस.? गेली कित्येक वर्षे माझी सुटका कर म्हणून हात जोडून विनंती करतोय तुला ? खरे सांग कोण आहेस तू ? बापूनी रागानेच विचारले.
" कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते बापू. आज ती वेळ आलीय पण जाण्यापूर्वी तुमच्या नावावर लागलेला कलंक ही मिटला पाहिजे .कळू द्या जगाला स्वातंत्र्यलढ्यात तुमचे काय योगदान आहे ते आणि जाता जाता मी कोण हे ही दाखवतो तुम्हाला " असे बोलून त्याने आपले खरे रूप प्रकट केले.बापूनी  मान  वर करून पाहिले तर तो आपल्या मूळ रुपात उभा होता .त्याचे ते तेजस्वी रूप बापूंना सहन झाले नाही .समाधानाने त्यांनी डोळे मिटले .
" काय  गरज होती त्याला आपले खरे रूप दाखवायची " नेहमीप्रमाणे उंदीर चिडून म्हणाला .
" अरे आज त्याचा शेवटचा दिवस आहे या जगात. त्याने केलेल्या कार्याची कदर व्हावी म्हणून त्याला खरे रूप दाखवून समाधान दिले" तबकातील एक मोदक तोंडात टाकीत तो हसत म्हणाला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, September 4, 2022

मदत

मदत
गणेशोत्सव जवळ आला की त्या विभागातील सर्व नागरिक आणि दुकानदारांना मोठे दडपण यायचे . याचे कारण म्हणजे रघूदादा.
 आपले दोनतीन पंटर घेऊन प्रत्येक दुकानात आणि घराघरात फिरायचा . त्याची ती थंड नजर पाहून समोरची व्यक्ती मुकाट्याने पैसे देत असे. पावती वगैरे भानगड नाही. ऑनलाइन वर्गणी तर अजिबात नाही. फक्त कॅश. 
जो विरोध करेल त्याच्याकडे फक्त आपली भेदक नजर टाकून पुढे जायचा .दोन दिवसानी विरोध करणारा गळ्यात हात बांधून किंवा पायाला बँडेज बांधून वॉकर घेऊन फिरताना दिसायचा .
रघूदादाचा कारभार अतिशय शांतपणे चालला होता.एरियातील सर्व सण तो साजरे करायचा .पण त्यातही गणेशोत्सव मात्र जोरदार.
पहिल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस नुसता उत्साह असायचा. खाण्यापिण्याची चंगळ असायची . या दिवसात रघूदादाचे वेगळेच रूप पाहायला मिळायचे. त्याच्याकडे कोणीही मदत मागायला गेला की तो नाही म्हणायचा नाही .अट फक्त एकच , त्याच्या पाया पडून मदतीची याचना करा. असे कोणी मदतीची भीक मागताना पाहून त्याला आपण जणू देवच असल्याचा भास होई.
 ती त्या वस्तीत आपल्या मुलीसोबत राहत होती. करोनात नवरा गेला .त्यामुळे आर्थिक स्थिती थोडी गंभीरच होती.देवावर भरोसा ठेवून दोघीही येणारा दिवस ढकलत होत्या.
तशी ती मिळेल ते काम करीत होती. पण रोजच काम मिळेल असे नाही ना. रघूदादाकडे मदत मागायला जायचे तर आधी त्याच्या पायावर लोटांगण घालावे लागेल याची जाणीव तिला होती आणि तिला तेच नको होते.जीव देईन पण मदतीसाठी कोणाच्या पायावर डोके ठेवणार नाही  असा तिचा ताठा होता.
यावर्षी त्या दोघीही गणपतीचे स्वागत उत्साहात करणार होत्या. आहे त्या तुटपुंज्या पैश्यात तिच्या घरी गणेशाचे स्वागत उत्साहाने होणार होते.
तो उत्साहाने तिच्या घरात शिरला .आपले साधे मखर पाहून त्याने समाधानाने मान डोलावली. त्या जुनाट पाटावर तो खुशीत मांडी घालून बसला.आपल्या नाखुषीने नाक मुरडणाऱ्या उंदराकडे त्याने लक्ष न देता समोरच्या खोबऱ्याच्या वड्यांकडे हसत हसत पाहिले आणि तिच्या तरुण मुलीला मनातून आशीर्वाद दिला .
" देवा,  यावर्षी मला इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळू दे" ती त्याच्या पुढे हात जोडून म्हणाली तसा तो चमकला .
" अरे बापरे ! होय म्हटले तर पैश्याचीही सोय करावी लागेल. नाही म्हटले तर तिची बुद्धी वाया जाईल."तो द्विधा मनस्थिती सापडला. त्याची ही अवस्था पाहून खोबऱ्याची वडी कुरतडून खात असलेला उंदीर खुश झाला.
" झाले समाधान .तरी म्हटले होते या घरात नको .काही मानपान नसतो. ह्या अश्या वड्या खाव्या लागतील पाच दिवस. धड आरती नाही.कोण भक्त नमस्कार करायला येत नाहीत. तरीही तुला इघे आवडते. तो उंदीर छद्मीपणे हसत म्हणाला.
" मग काय फक्त उच्च मध्यमवर्गीय ,श्रीमंत लोकांकडे जावेच का ? खोबऱ्याच्या वड्या तर कोकणात ही देतात आपल्याला.त्यांची भक्ती श्रद्धा पाहून आपण जातो त्यांच्याकडे. हो, आता तिची मागणी पूर्ण करणे थोडे अवघड आहे .कारण आपण देव असलो तरी चमत्काराने कोणाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. इकडचे काढून तिकडे देतो. जस्ट लाईक ट्रेडिंग .तिच्याकडे बुद्धी आहे.त्यामुळे तिला ऍडमिशन मिळणार हे नक्की.पण पैसे कुठून आणायचे हा प्रॉब्लेम आहेच .जाऊदे ,  करू काहीतरी पुढे. सध्या आराम करू "असे बोलून त्याने डोळे मिटले आणि शांतपणे घोरू लागला.
रघूदादा आपल्या ऑफिसमध्ये पायावर पाय टाकून आरामात बसला होता.ऑफिस कसले ? नाक्यावर चहाची टपरी होती ती. तिथून त्याला गणपतीचा मंडप आणि बाजारपेठ दिसे. त्याचवेळी एक माणूस त्याला शोधतच समोर आला, 
"साहेब , मला तुमच्याकडून मदत हवीय ."पायाजवळ घुटमळणार्या उंदराला तो हूसकावत म्हणाला.
"कसली मदत ? आणि माझी अट माहितीय ना ?"आपले दोन्ही पाय सरळ करत रघूदादा डोळे रोखून म्हणाला.
" होय, असे म्हणत तो तरुण त्याच्या पायाशी बसला आणि त्याचे पकडून म्हणाला मला काही पैसे हवेत "
" दिले.रघूदादा खुश होऊन म्हणाला. किती पाहिजे तितके घेऊन जा " 
तो रघूदादाने दिलेले पैसे घेऊन तिच्या घरात शिरला .
" हे तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे."
" कोण तुम्ही ? आणि हे पैसे का आम्हाला देतायत ?"ती आश्चर्यचकीत होऊन उद्गारली
"आम्ही एक एनजीओ आहोत. हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करतो.तुमची मुलगी हुशार आहे . पुढे शिकायची इच्छा आहे म्हणून तिला मदत करायला आलो. " तो म्हणाला .
" पण आम्ही हे पैसे परत कधी करायचे." तिने काळजीने विचारले
" परत नाही करायचे, पण भविष्यात गरीब आणि हुशार विद्यार्थ्याना शिक्षणासाठी मदत करायची .तसे केले की आमचाही भार कमी होईल" तो हात जोडून म्हणाला.
तिने डोळ्यातील अश्रू पुसत हात जोडले आणि पैसे ठेवायला कपाटाकडे वळली.
तिची पाठ वळताच त्याने मखरात उडी मारली आणि त्या पाटावर शांतपणे बसला.
" पैसे घेण्यासाठी त्या रघुदादाच्या पाया पडायची काय गरज ?"  समोरील केळ्याचा तुकडा तोडत त्या उंदराने चिडून विचारले.
" मग काय कोणा श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करून पैसे आणू ?अरे मी देव असलो तरी असे चमत्कार करू शकत नाही आणि नेहमी लोक आपल्या पाया पडून वेगवेगळे नवस बोलतात मग एक दिवस आपण त्यांच्या पाया पडलो तर काय हरकत आहे. आपल्या एका पाया पडण्याने एक शैक्षणिक साखळी निर्माण झाली बघ.  भविष्यात तीच मुलगी अनेक विद्यार्थ्यांना मदत करेल.आपण काही करत नाही तर फक्त मार्ग दाखवतो." असे म्हणून त्याने शांतपणे डोळे मिटले.
"बाप्पा मोरया " असे म्हणत त्या उंदराने हात जोडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, September 2, 2022

जुळे

जुळे
रात्रीचे अडीज वाजले असतील.शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या त्या भागात अजूनही लगबग आणि गर्दी दिसत होती. 
पण एका अंधाऱ्या गल्लीत ती टपरी अजूनही चालूच होती. होय, गणेशोत्सव उत्साहात सुरू होता. त्या भागात अनेक सार्वजनिक गणपती बसले होते. दोन वर्षे कोविड लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मंडळांनी अतिशय साधेपणाने उत्सव साजरा केला होता.
पण यावर्षी सरकारने सणांवर लादलेली बंधने काढून टाकली होती. त्यामुळे पुन्हा उत्साहात सगळी गणेश मंडळे आपल्या विभागात गणेशोत्सव साजरा करीत होते.
एका रोषणाईने सजलेल्या गल्लीतून तो बाहेर त्या टपरीवर आला.त्याचे कपडे उच्च दर्जाचे दिसत होते.हातात ,गळ्यात सोन्याचे दागिने होते.आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक .
टपरीजवळच्या लाकडी बाकड्यावर बसून त्याने "अण्णा , एक कटिंग ." अशी ऑर्डर सोडली आणि हुश्श करून पाण्याचा जग त्याने तोंडाला लावला .
इतक्यात दुसऱ्या गल्लीतून दुसरा बाहेर आला . त्याचेही कपडे उच्च दर्जाची खूण दाखवीत होते .हातात गळ्यात फारसे दागिने ही नव्हते पण चेहऱ्यावरची बुद्धिमत्ता मात्र सारखीच होती. त्यामुळे दोघांचे चेहरेही सारखेच दिसत होते.कोणतीही घाई नसल्यासारखा तो आरामात पहिल्याचा बाजूला बसला .
"अण्णा एक कटिंग .पण कडक बनव, नवीन चहा  बनव मला घाई नाही ."असे म्हणत त्याने बरणीतल्या नानकटाईत हात घातला .
अचानक त्याने पहिल्याकडे पाहिले आणि मानेनेच घेणार का ? असे खुणेनेच विचारले.
पहिल्याने आशाळभूत नजरेने त्या बिस्किटाकडे पाहिले .तसा दुसरा हसला आणि एक बिस्कीट त्याला दिले.
"कुठला ..? " दुसर्याने त्याच्या बाजूला बसत विचारले.
"श्रीपार्कचा ,पाहिल्याने उत्तर दिले  तू "
" तिरंगी चाळ ."एका गल्लीच्या दिशेने बोट दाखवीत दुसरा म्हणाला . " तरीच, त्या बिस्किटाकडे नवलाईने पाहत होतास .कधी पाहिले नाही असे. तुम्ही श्रीमंत लोक.नेहमी तुमच्याकडे गडबड .लोकांच्या नवसाला पावणारे तुम्ही." चेहऱ्यावर छद्मी हास्य आणत दुसरा तोंडात बिस्कीट टाकत म्हणाला .
" कसला श्रीमंत रे . पार वाट लावून टाकलीय माझी. इथे झोपायला काय पण साधा श्वास घ्यायला मिळत नाही . सतत कोणी ना कोणी येत असतो .मनातील इच्छा बोलत असतो. सगळ्यांना होय म्हणावे लागते" पहिला कंटाळून म्हणाला ," तू इतका आरामात का ?? तुझ्याकडे गर्दी नाही का ?"त्याने कुतूहलाने दुसऱ्याला विचारले .
" ह्या ! तू बाजूला असताना माझ्यासारख्या गरीबाकडे कोण येईल ?  मस्तपैकी दिवसभर बसून असतो .काही येतात, पण कोण आपल्या मनातील इच्छा बोलत नाहीत .चुकून बोलल्या तर माझा मूड असेल तर त्या पूर्ण करतो. पण दर्शन मात्र डोळे भरून मिळते. त्या दिवशी एकजण आला . पुढ्यातच मांडी घालून बसला आणि लागला गायला.दोन तास तल्लीन होऊन गात होता .तुला सांगतो बालगंधर्वांची आठवण झाली .एके काळी ते ,दीनानाथ मंगेशकर असेच पुढ्यात बसून गात होते."तो जुन्या काळात हरवून गेला .
"आयला, मजा आहे रे तुझी .माझ्याकडे तर रांगच रांग असते दर्शनासाठी. रांगेत त्यांची भांडणेच भरपूर. चुकून धक्का लागला तर अंगावर येतात आणि ते रेकॉर्ड करायला मिडियावाले असतातच. कुठे मनोरंजन नाही आणि कुठे जाताही येत नाही . प्रसाद ही एकदम भारी भारी असतो. हे बिस्कीट तर कधी पाहिले ही नाही. शेवटी आज गर्दी कमी झाली तसा सटकलो .म्हटले ते नेहमीचे दूध पिण्यापेक्षा कटिंग मारू.
दोघेही हसत चहा पिऊ लागले.
" पण मला एक सांग आपण दोघेही सारखेच आहोत.बाजूबाजूला राहतो.तरी तू आरामात राहतोस मला इतका त्रास का ..? पाहिल्याने दुसऱ्याला विचारले.
" अरे तुला सवय झालीय प्रत्येकाला होय म्हणायची . मग ते खुश होऊन तुला भेटवस्तू देतात .माझे तसे नाही .मी फारच कमी आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच हो म्हणतो.आता त्या दिवशी एक बाई आली. तिची मुलगी हुशार आहे पण पुढे शिकायला पैसे नाहीत मग मी तिला होय म्हणालो.उद्या काहीजण तिला मदत करायला घरी जातील. पण तू..? त्या दिवशी तो  गृहस्थ मला सुख शांती दे असे म्हणाला तर तू पटकन होय बोलून गेलास .त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध आईवडिलांना  वृद्धाश्रमात सोडून दिले.आता घरी छान आयुष्य जगणार तो.मिळाली त्याला सुख शांती." असे म्हणून मोठ्याने हसला 
" मी अश्या लोकांना उभे करीत नाहीं म्हणून माझ्याकडे कोण येत नाही ." अजून एक बिस्कीट त्याच्या पुढे करीत दुसरा म्हणाला .
" हा अण्णा बघ .कधीच आपल्याकडे येत नाही .पण गणेशोत्सवात चोवीस तास टपरी चालू.त्याच्या टपरीत बघ.." असे म्हणून दुसर्याने टपरीत बोट दाखविले.
पहिल्याने त्या दिशेकडे पाहिले .तेव्हा देव्हाऱ्यात तो बसला होता. त्याने हसून त्या दोघांकडे पाहून ओळखीचा हात हलविला.
"अण्णा , भगवान को मानते हो."पाहिल्याने हसून विचारले.
"हा साब , रोज सुबह उसके सामने हात जोडता हू, और हार डालता हू " अण्णा हसत म्हणाला .
"कुछ मांगते नही. " दुसर्याने विचारले 
" क्या जरूरत है साब, ये सब तो उसकी देन है. मै तो सिर्फ मेहनत करता हू .अभी ये दस दिन धंदा इतना जोर से है की गाव से भतिजे को बुलाना पडा, उसको दुसरी टपरी बांधके दी है ." एका बंद टपरीकडे बोट दाखवत अण्णा म्हणाला .
" बघ , याला आपल्याकडे यायची गरज पडली नाही तरी आपण याला भरभरून देतोय. सकाळी फक्त स्वच्छ निर्मळ मनाने पाया पडतो आपल्या." दुसरा हसत हसत म्हणाला .
" खर आहे,  पण सध्या आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.मागची दोन वर्षे आरामात गेली.पण पुढे आपल्याला खूप कठीण जाणार आहेत. काय सांगावे पुढे तुला ही आराम मिळणार नाही"  पहिला दुसऱ्याच्या खांद्यावर थाप मारून म्हणाला .
" बस क्या , माझ्याकडून दोन बिस्किट्स खाऊन वर मलाच शाप देतोस का ? चल वेळ मिळाला तर ये उद्या ह्याच वेळी .आता मी शांतपणे झोपतो .मंडपात पत्त्यांचा मोठा डाव सुरू आहे ." असे बोलून दुसर्याने पहिल्याच्या हातावर टाळी दिली आणि आपापल्या मार्गाने निघाले.
दोन जुळे भाऊ परस्पर विरोधी दिशेने निघालेले पाहून अण्णा विचारात पडला.
श्रीपार्कात गणपतीच्या मंडपात अजूनही दर्शन चालू होते आणि तो प्रत्येकाच्या इच्छेला होकार देत चेहऱ्यावर कंटाळा न दाखवता तो उद्याच्या रात्रीची वाट पाहत उभा होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, September 1, 2022

जुळे

जुळे
रात्रीचे अडीज वाजले असतील.शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या त्या भागात अजूनही लगबग आणि गर्दी दिसत होती. 
पण एका अंधाऱ्या गल्लीत ती टपरी अजूनही चालूच होती. होय, गणेशोत्सव उत्साहात सुरू होता. त्या भागात अनेक सार्वजनिक गणपती बसले होते. दोन वर्षे कोविड लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मंडळांनी अतिशय साधेपणाने उत्सव साजरा केला होता.
पण यावर्षी सरकारने सणांवर लादलेली बंधने काढून टाकली होती. त्यामुळे पुन्हा उत्साहात सगळी गणेश मंडळे आपल्या विभागात गणेशोत्सव साजरा करीत होते.
एका रोषणाईने सजलेल्या गल्लीतून तो बाहेर त्या टपरीवर आला.त्याचे कपडे उच्च दर्जाचे दिसत होते.हातात ,गळ्यात सोन्याचे दागिने होते.आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक .
टपरीजवळच्या लाकडी बाकड्यावर बसून त्याने "अण्णा , एक कटिंग ." अशी ऑर्डर सोडली आणि हुश्श करून पाण्याचा जग त्याने तोंडाला लावला .
इतक्यात दुसऱ्या गल्लीतून दुसरा बाहेर आला . त्याचेही कपडे उच्च दर्जाची खूण दाखवीत होते .हातात गळ्यात फारसे दागिने ही नव्हते पण चेहऱ्यावरची बुद्धिमत्ता मात्र सारखीच होती. त्यामुळे दोघांचे चेहरेही सारखेच दिसत होते.कोणतीही घाई नसल्यासारखा तो आरामात पहिल्याचा बाजूला बसला .
"अण्णा एक कटिंग .पण कडक बनव, नवीन चहा  बनव मला घाई नाही ."असे म्हणत त्याने बरणीतल्या नानकटाईत हात घातला .
अचानक त्याने पहिल्याकडे पाहिले आणि मानेनेच घेणार का ? असे खुणेनेच विचारले.
पहिल्याने आशाळभूत नजरेने त्या बिस्किटाकडे पाहिले .तसा दुसरा हसला आणि एक बिस्कीट त्याला दिले.
"कुठला ..? " दुसर्याने त्याच्या बाजूला बसत विचारले.
"श्रीपार्कचा ,पाहिल्याने उत्तर दिले  तू "
" तिरंगी चाळ ."एका गल्लीच्या दिशेने बोट दाखवीत दुसरा म्हणाला . " तरीच, त्या बिस्किटाकडे नवलाईने पाहत होतास .कधी पाहिले नाही असे. तुम्ही श्रीमंत लोक.नेहमी तुमच्याकडे गडबड .लोकांच्या नवसाला पावणारे तुम्ही." चेहऱ्यावर छद्मी हास्य आणत दुसरा तोंडात बिस्कीट टाकत म्हणाला .
" कसला श्रीमंत रे . पार वाट लावून टाकलीय माझी. इथे झोपायला काय पण साधा श्वास घ्यायला मिळत नाही . सतत कोणी ना कोणी येत असतो .मनातील इच्छा बोलत असतो. सगळ्यांना होय म्हणावे लागते" पहिला कंटाळून म्हणाला ," तू इतका आरामात का ?? तुझ्याकडे गर्दी नाही का ?"त्याने कुतूहलाने दुसऱ्याला विचारले .
" ह्या ! तू बाजूला असताना माझ्यासारख्या गरीबाकडे कोण येईल ?  मस्तपैकी दिवसभर बसून असतो .काही येतात, पण कोण आपल्या मनातील इच्छा बोलत नाहीत .चुकून बोलल्या तर माझा मूड असेल तर त्या पूर्ण करतो. पण दर्शन मात्र डोळे भरून मिळते. त्या दिवशी एकजण आला . पुढ्यातच मांडी घालून बसला आणि लागला गायला.दोन तास तल्लीन होऊन गात होता .तुला सांगतो बालगंधर्वांची आठवण झाली .एके काळी ते ,दीनानाथ मंगेशकर असेच पुढ्यात बसून गात होते."तो जुन्या काळात हरवून गेला .
"आयला, मजा आहे रे तुझी .माझ्याकडे तर रांगच रांग असते दर्शनासाठी. रांगेत त्यांची भांडणेच भरपूर. चुकून धक्का लागला तर अंगावर येतात आणि ते रेकॉर्ड करायला मिडियावाले असतातच. कुठे मनोरंजन नाही आणि कुठे जाताही येत नाही . प्रसाद ही एकदम भारी भारी असतो. हे बिस्कीट तर कधी पाहिले ही नाही. शेवटी आज गर्दी कमी झाली तसा सटकलो .म्हटले ते नेहमीचे दूध पिण्यापेक्षा कटिंग मारू.
दोघेही हसत चहा पिऊ लागले.
" पण मला एक सांग आपण दोघेही सारखेच आहोत.बाजूबाजूला राहतो.तरी तू आरामात राहतोस मला इतका त्रास का ..? पाहिल्याने दुसऱ्याला विचारले.
" अरे तुला सवय झालीय प्रत्येकाला होय म्हणायची . मग ते खुश होऊन तुला भेटवस्तू देतात .माझे तसे नाही .मी फारच कमी आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच हो म्हणतो.आता त्या दिवशी एक बाई आली. तिची मुलगी हुशार आहे पण पुढे शिकायला पैसे नाहीत मग मी तिला होय म्हणालो.उद्या काहीजण तिला मदत करायला घरी जातील. पण तू..? त्या दिवशी तो  गृहस्थ मला सुख शांती दे असे म्हणाला तर तू पटकन होय बोलून गेलास .त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध आईवडिलांना  वृद्धाश्रमात सोडून दिले.आता घरी छान आयुष्य जगणार तो.मिळाली त्याला सुख शांती." असे म्हणून मोठ्याने हसला 
" मी अश्या लोकांना उभे करीत नाहीं म्हणून माझ्याकडे कोण येत नाही ." अजून एक बिस्कीट त्याच्या पुढे करीत दुसरा म्हणाला .
" हा अण्णा बघ .कधीच आपल्याकडे येत नाही .पण गणेशोत्सवात चोवीस तास टपरी चालू.त्याच्या टपरीत बघ.." असे म्हणून दुसर्याने टपरीत बोट दाखविले.
पहिल्याने त्या दिशेकडे पाहिले .तेव्हा देव्हाऱ्यात तो बसला होता. त्याने हसून त्या दोघांकडे पाहून ओळखीचा हात हलविला.
"अण्णा , भगवान को मानते हो."पाहिल्याने हसून विचारले.
"हा साब , रोज सुबह उसके सामने हात जोडता हू, और हार डालता हू " अण्णा हसत म्हणाला .
"कुछ मांगते नही. " दुसर्याने विचारले 
" क्या जरूरत है साब, ये सब तो उसकी देन है. मै तो सिर्फ मेहनत करता हू .अभी ये दस दिन धंदा इतना जोर से है की गाव से भतिजे को बुलाना पडा, उसको दुसरी टपरी बांधके दी है ." एका बंद टपरीकडे बोट दाखवत अण्णा म्हणाला .
" बघ , याला आपल्याकडे यायची गरज पडली नाही तरी आपण याला भरभरून देतोय. सकाळी फक्त स्वच्छ निर्मळ मनाने पाया पडतो आपल्या." दुसरा हसत हसत म्हणाला .
" खर आहे,  पण सध्या आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.मागची दोन वर्षे आरामात गेली.पण पुढे आपल्याला खूप कठीण जाणार आहेत. काय सांगावे पुढे तुला ही आराम मिळणार नाही"  पहिला दुसऱ्याच्या खांद्यावर थाप मारून म्हणाला .
" बस क्या , माझ्याकडून दोन बिस्किट्स खाऊन वर मलाच शाप देतोस का ? चल वेळ मिळाला तर ये उद्या ह्याच वेळी .आता मी शांतपणे झोपतो .मंडपात पत्त्यांचा मोठा डाव सुरू आहे ." असे बोलून दुसर्याने पहिल्याच्या हातावर टाळी दिली आणि आपापल्या मार्गाने निघाले.
दोन जुळे भाऊ परस्पर विरोधी दिशेने निघालेले पाहून अण्णा विचारात पडला.
श्रीपार्कात गणपतीच्या मंडपात अजूनही दर्शन चालू होते आणि तो प्रत्येकाच्या इच्छेला होकार देत चेहऱ्यावर कंटाळा न दाखवता तो उद्याच्या रात्रीची वाट पाहत उभा होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, August 30, 2022

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया
1
सुपरस्टार विनयकुमार उर्फ विनायक सुर्वे उर्फ विन्या आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शांतपणे बसून होता.त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.गेली दोन वर्षे करोनामुळे गावी गणपतीला गेला नव्हता. यावर्षी नक्की जायचे हे ठरविले होते.
 पण अचानक साऊथच्या बिग बजेट फिल्मसाठी त्याला बोलाविण्यात आले होते.तसेही करोनामध्ये दोन वर्षे त्याच्याकडे फारसे काम नव्हते. त्याचे स्टेटस पाहून छोटे निर्मातेही त्याला काम देत नव्हते.
 त्याचवेळी साऊथच्या निर्मात्याने त्याला भरपूर मानधन देऊन हा चित्रपट ऑफर केला होता. त्याच्यासोबत साउथचा सुपरस्टार  मेन रोलमध्ये होता. चित्रपट तुफान चालणार याविषयी शंकाच नव्हती. गणपतीच्या दिवसातच शुटिंगचे शेड्युल होते.अश्यावेळी शूटिंग अर्धवट सोडून गणपतीला जाणे परवडणार नव्हते.त्याने मनोमन बाप्पाची माफी मागितली .
इतक्यात दार उघडून त्याचा निर्माता आत आला.
    " विनयजी अपने हिरोने कहा है एक गाना गणपती के सामने हो जाय. आप मराठी है और गणपती के सामने गाना रहेगा तो महाराष्ट्र के लोगभी सिनेमा देखने आएंगे. अगर आपके पास कोई लोकेशन होगा तो बताइये,  वही शूट करेंगे." ते ऐकून विनयकुमार खुश झाला . आपल्या गावाजवळचे लोकेशन फिक्स करण्यासाठी त्याने सेक्रेटरीला फोन केला आणि डायरेक्ट घरी जाऊनच सुदाम दादाला चकित करायचे ठरविले.गणपती बाप्पा मोरया म्हणत त्याने हात जोडले.
2
केरळच्या त्या कार्पोरेट ऑफिसमधील मिटिंग आज भलतीच वादळी ठरली होती. एका मोठ्या कंपनीशी होणारे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले होते.अपयशाचे सर्व खापर  श्री.नामदेव सुर्वे उर्फ नाम्यावर फोडण्यात आले होते. नामदेव खूप चिडला होता.यावर्षी कोणत्याही परिस्थितीत गणपतीला गावी जायचे ठरविले होते. तिकीट्स ही बुक झाल्या होत्या . 
दोन वर्षांनी त्याला  सर्व  भाऊ आणि कुटुंब भेटणार होते.करोनामुळे दोन वर्षे अशीच गेली होती.त्याला गावी जाता आले नव्हते उलट नोकरीतही  त्रास झाला होता.एक मोठे डिल कॅन्सल झाले आणि त्याचे खापर नामदेववर फुटले होते. कोर्टकचेऱ्या होणार हे नक्की.
 आता फक्त नोटीस कधी येणार याची वाट पहायची होती.केरळ कोर्टाने त्याला राज्यातून बाहेर जाण्यास मनाई केली होती. नाईलाजाने  तिकीट रद्द करण्यासाठी फोन करणार इतक्यात त्याचा सेक्रेटरी धावत केबिनमध्ये शिरला . त्याने हातातील पाकीट नामदेवला दिले. त्या कंपनीने वेगवेगळ्या राज्यात असणारे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते आणि खटले त्यात्या राज्यात न चालविता मुंबईत चालविण्याचे ठरविले होते.त्यासाठी त्याने मुंबईत यावे अशी सूचना केली होती.
ते वाचून नामदेव खुश झाला . खटल्याच्या निमित्ताने का होईना मुंबईत तर जायला  मिळेल.तिथून गावी काय कसे ही जाऊ .गणपती बाप्पा मोरया असे मनात म्हणत त्याने हात जोडले .
3
शंकर सुर्वेचे लिव्हकार्ड अजूनही माझ्या टेबलवर आले नाही हे पाहून मला थोडे आश्चर्यच वाटले.दरवर्षी गणपतीला हक्काने गावी जाणारा शंकर यावेळी रजेसाठी अजूनही समोर आला नव्हता. 
मी त्याला केबिनमध्ये बोलाविले तेव्हा तो नाखुषीनेच आत शिरला. "काय मिस्त्री ? अजून रजेचा अर्ज आला नाही तुमचा .गणपतीला जाणार आहे की नाही ?"
 तो केविलवाणे हसला ." करोनामध्ये फॅक्टरी बंद होती.म्हणून बायको पोरांना घेऊन गावी राहिलो .पण तिथेही हालच झाले . दादाची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे .स्वतःचे कसे तरी भागते त्यात आमची भर.पण एकमेकांच्या मदतीने आम्ही सावरले. .फॅक्टरी चालू झाली पण घेतलेली कर्जे अजूनही फेडतोय.त्यात हल्ली पगार ही वेळेवर होत नाही .जायची तर खूप इच्छा आहे .पण सगळी सोंग करता येतात पैश्याची नाही . जायला यायला ही खूप पैसे लागतात .दादाला सांगितले आहे यावर्षी जमणार नाही यायला." असे बोलून तो निघाला .
मी ही कोकणाचाच असल्यामुळे शंकरशी चांगले संबंध होते.त्याची घरची परिस्थितीही माहीत होती.यावेळी शंकर गावी जाणार नाही हे ऐकून वाईट वाटले . 
माझे तर गावी जाणे नक्की झाले होते .खाजगी गाडीचे तिकीट्सही काढले होते.आज रात्रीच निघणार होतो. तितक्यात मोठ्या भावाची सून बाळंत झाल्याची बातमी आली .झाले !  आता सुयेरात गणपतीजवळ कोण जाईल.? शिवाय सुनबाई आणि नातवाची काळजी घ्यायला हवी .आमचे जाणे कॅन्सल झाले . 
मी शंकरला फोन केला.माझ्या तिकीट्स आहे जाणार का ? असे विचारले.
पैश्याचे काय ? त्याचा प्रश्न .
तो किती मानी आहे हे माहीत होते मला .म्हटले दे सावकाश आधी सण तर पार पडू दे. तो घरी आला तोच पेढे घेऊन .भरल्या डोळ्याने त्याने हात जोडले मी त्याच्या हातात परतीची तिकीट्स ही दिले.गणपती बाप्पा मोरया .म्हणत त्याने हात जोडले.
4
कॅनडातील आपल्या ऑफिसमध्ये अरविंद सुर्वे उर्फ अव्या फोनवरून आपल्या सहकार्याला झापत होता.
करोनानंतर आता कुठे त्याचा बिझनेस सावरत होता.गेली दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये बसून काढली होती. विमान प्रवास कठीण झाल्यामुळे कोकणात गावी ही जाऊ शकला नव्हता.
 यावर्षी सगळे सुरळीत चालू झाले होते. गावी जाणार हे पक्के ठरविले होते पण अचानक जेनीच्या वडिलांची म्हणजे त्याच्या सासऱ्यांची तब्बेत बिघडली .एक तातडीची सर्जरी करावी लागणार होती. बहुतेक त्याचे जाणे कॅन्सल होणार हे जवळजवळ निश्चित होते.
आज त्याला पुन्हा डॉक्टरांकडे जायचे होते.सुदाम दादाला फोन करून यावर्षी जमणार नाही असे सांगायचे नक्की करून तो डॉक्टरांच्या क्लीनिकमध्ये शिरला. 
अरे देवा ! जे डॉक्टर सर्जरी  करणार होते ते सुट्टीसाठी भारतात गेले होते आणि आता गणपती विसर्जनानंतरच येणार होते.
भारताचे नाव ऐकताच अव्याचे डोळे चमकले.त्याने भारतात कुठे गेलेत याची चौकशी केली तर ते योगायोगाने मुंबईतच राहणार होते.
अरविंदने ताबडतोब त्यांना कॉन्टॅक्ट केला.आपण भारतीय आणि त्यातही मुंबईकर असल्याची ओळख करून दिली. डॉक्टर ही खुश झाले. त्यांनी मुंबईतच सर्जरी करायची तयारी दर्शवली . अव्याने खुश होऊन गणपती बाप्पा मोरया अशी आरोळी ठोकली. यावेळी कुटुंबासोबत त्याचे सासरेही कोकणात गणेशोत्सव  साजरा करणार होते.
5
 कोकणातील त्या छोट्या गावात सुदाम सुर्वेच्या घरी गणपती उत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. गेली दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला होता.सुदाम दादांच्या चार भावांपैकी एकही गावी आला नव्हता. पण यावेळी कोणतरी येईल याची खात्री वाटत होती.
 घरात डेकोरेशन चालू होती. त्याच्या हातात चहाचा पेला देत बायकोने विचारले " ह्या वर्षी तरी भाऊजी येतील ना ? सुदामाने हसत देव्हाऱ्यात बसलेल्या गणपतीकडे बोट दाखविले.
"तो हाय ना ? कित्याक काळजी करतस.बघात तो.त्याका काळजी हा सगळ्यांची. "असे म्हणून हसला.
देव्हाऱ्यात बसलेला तो आपली सोंड हलवत गालात हसत होता.
" हे बरे आहे बाप्पा .म्हणजे तुझी पूजा करायला तुलाच माणसे बोलवावी लागतात.सर्व तुझ्यावर सोपवून मोकळे होतात हे भक्त. " शेजारचा उंदीर शेपटी हलवत म्हणाला.
" खरे आहे मूषका अरे मलाच आहे भक्तांची काळजी.म्हणूनच सर्व सुर्वेंची इथे येण्याची सोय करून आलोय मी.भरल्या घरात सर्वांच्या हातून निस्वार्थी सेवा करून घेण्याचा आनंद वेगळाच असतो .उद्या बघ कसे एक एक करीत सर्व सुर्वे हजर होतील माझी सेवा करायला." सोंडेने पुढ्यातील मोदक उचलत त्याने उत्तर दिले.
गणपती बाप्पा मोरया
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Friday, August 26, 2022

नाते

नाते
संतोष दिघेला सौ.सोबत येताना पाहून मी उडालोच. ते नुसते एकत्रच येत नव्हते तर सौ.कडील दोन किलो पिठाची आणि भाजीची पिशवी दिघेच्या हातात होती.तर एखाद्या सापाला गुंडाळून घ्यावे तशी दिघेची शबनम बॅग सौ.च्या गळ्यात होती.
आता आमच्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल हा संतोष दिघे कोण आहे तो ? नाही ? मग खरोखरच तुम्ही चाणाक्ष आहात म्हणून दिघेला लक्षात ठेवले नाही. बरे सौ.तरी लक्षात असेलच . हुश्शह... 
तर हा संतोष दिघे आमचा बालमित्र. तो स्वतःला लेखक समजतो .नाही.. नाही ..त्याविषयी आमची तक्रार नाही हो. फक्त तो कथा सांगायच्या निमित्ताने घरात शिरतो आणि पोटभर खाऊन जातो याचे दुःख आहे. शिवाय तो आला की आमच्या किचनमध्ये जो गोंधळ चालतो तो वेगळाच.
तर हा दिघ्या आज सौ.सोबत हमाली करत घराच्या दिशेने येताना पाहूनच मी आज जेवण जास्त करावे लागणार हे समजून गेलो.पण सौ.च्या चेहऱ्यावर त्याची फिकीर दिसत नव्हती.
शिवाय ती ज्यातऱ्हेने त्याची शबनम बॅग हाताळत होती त्यावरून कळून चुकत होते की बॅग रिकामी आहे. नाहीतर त्या दिघ्याची काय बिशाद बॅग सौ.च्या हाती द्यायची . आहो दादर स्टेशनला रात्री पुलाखाली अजूनही पिवळ्या कव्हर्सची पुस्तके मिळतात याचा पुरावा याच्या बॅगेत  सापडतो.
दोघेही हसतच घरात शिरले.मला पाहताच दिघेच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरले.पण ते क्षणभंगुर ठरणार आहे याची मला खात्री होती.
" ये संतोष ये " मी सहजपणे म्हणालो .पाणी आण ग"
" ह्या, पाणी काय.. भावोजीना सरबत करून देते. बघा किती दमलेत ते.आणि तुम्ही महाबळेश्वरवरून आणलेले सरबत तसेच पडून आहे कित्येक दिवस.आता दोनचार दिवसात फेकूनच देणार होते.भावोजीना तेच देते" असे म्हणत किचनमध्ये गेली.
मी महाबळेश्वरला कधी गेलो होतो असा विचार करेपर्यंत ती सरबताचा ग्लास घेऊनसुद्धा आली. देवा ! दोन वर्षांपूर्वी गेट टू गेदरसाठी महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हाचे सरबत ही बाई अजून ठेवून होती.
"भाऊ.तू ही घे ..." इतक्या प्रेमाने स्वागत पाहून दिघे भारावून गेला.
"नको.त्यांच्यासाठी चहा गरम केलाय.उगाच असल्या सवयी नको." सौ माझ्याकडे पाहून ठसक्यात म्हणाली.
आज दिघ्याची कत्तल होणार हे निश्चित होतेच.सगळी सूत्रे सौ.च्या हाती देऊन मी फक्त प्रेक्षकांची भूमिका घेतली.
"भावोजी आलाच आहेत तर जेवूनच जा.." किचनमधून आज्ञा झाली.
आतामात्र हद्द झाली.मित्राचा इतका अपमान कोण सहन करेल ? मी उठलो ." दिघ्या, चल बाहेर जाऊन बोलू." एक मस्कापाव आणि चहावर भागेल हाच माझा प्रामाणिक हेतू होता .
"अरे वाहिनीनेच बोलावले आहे" 
हे ऐकताच माझा आवेश गळून पडला .
"आहो मीच घेऊन आले त्यांना घरी.मला पाहून वाट वाकडी करून पळत होते.पण मी सोडतेय होय. जाग्यावरूनच जोरात हाक मारून त्यांना बोलावले.आख्या बाजाराने वळून पाहिले माझ्याकडे .मग भाऊजी काय चीज आहे."सौ. हसत म्हणाली.
माझ्यासमोर  एका हातात पिठाची आणि दुसऱ्या हातात  भाजीची पिशवी घेऊन ओरडणारी सौ.उभी राहिली. याची जाहिरात होऊन आता  सौ.ला कोणीच टाळून जाऊ शकणार नाही याची खात्रीही पटली.
" पण तुला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायची का इच्छा झाली.? पडेल स्वरात माझा प्रश्न .
"आहो ,सणवार सुरू झालेत.प्रत्येक सिरीयलमध्ये सण साजरे होत असतात.वट पौर्णिमा झाली , दहीहंडी झाली,सध्या मंगळागौर चालू आहेत. पुढे गणपती येतील . भाऊजी बऱ्याच सिरीयल लिहितात ,त्यांच्या खूप ओळखी आहेत . कुठेतरी मलाही त्यात संधी देतील.म्हणून बोलावले   त्यांना. " सौ लाजत म्हणाली.
तिचे लाजणे पाहून मी ताबडतोब विरघळतो हे तिला माहीत आहे म्हणूनच ती मोजक्याच प्रसंगी लाजते.आताही तसेच झाले आणि तिचा दिघेला घरी घेऊन येण्याचा हेतू स्पष्ट झालं.
"अग त्यासाठी नाचता यायला हवे .थोडा अभिनय यायला हवा .असे कोणीही जाऊ शकत नाही " मी जरा आवाज चढवून म्हटले.
" मी नाचत नाही का? त्या दिवशी भाचीच्या हळदीत किती वेळ नाचत होते. ते ही पूर्ण शुद्धीत .तुमच्यासारखे हे घेऊन नाही ."अंगठा दाखवत ती ओरडली.
"अभिनयही करावा लागतो थोडा.".मी प्रयत्न चालूच ठेवले.
"आतापर्यंत किती अन्याय सहन केले मी, पण कधी चेहऱ्यावर येऊ दिले नाहीत. नेहमी हसतमुखाने सर्वांची सेवा केली.शेजाऱ्यांना विचारा ते म्हणतात तू आहेस म्हणून सहन करतेस हो .."ती रागाने चेहरा फुलवत म्हणाली.
"भाऊ , बघ तिचा अभिनय बघ ." किचनमधून येणाऱ्या खमंग वासाकडे डोळे मोठे करीत दिघे म्हणाला .
" दिघ्या हा तिचा अभिनय नक्कीच नाहिय " मी मनात म्हणालो.
" ठीक आहे ,पण संतोषलाही मर्यादा आहेत.." मी हळू आवाजात म्हणालो.
" कसल्या मर्यादा ..चार मराठी चॅनल ,प्रत्येक चॅनेलवर पाच मराठी मालिका  आणि प्रत्येक मालिकेत पंधराजणी तरी असतात नाचायला.त्यात मी एकटी कुठेही ऍडजस्ट होईन .तुम्ही हो म्हणा मी ताटे वाढते..."सौ.ने शेवटची निर्वाणीची धमकी दिली.तशी संतोषने मान डोलावली .
भरपेट जेवण झाल्यावर मी संतोषसोबत बाहेर पडलो.टपरीवरून त्याने सिगारेट शिलगावली..
" संतोष, तिचे बोलणे मनावर घेऊ नकोस .तुझ्याकडून काही होणार नाही हे माहितीय मला .पण येत जा रे अधूनमधून .बरे वाटते तुझ्याशी बोलून " मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो.
"भाऊ ,वहिनी मला बहीण म्हणून जास्त जवळची आहे रे. तिचे बोलणे कधीच मनावर घेत नाही मी. मला करोना झाला होता तेव्हा तिने सहा महिने मला जेवण दिले होते हे विसरणार नाही मी कधी .आताही तीच मला खेचत घरी घेऊन आली.म्हणाली आमच्या गल्लीतून जाता पण घरी येत नाही. बहिणीची आठवण येत नाही का ..?? भाग्यवान आहेस अशी बायको मिळाली तुला आणि आम्ही ही भाग्यवान अशी वहिनी आहे म्हणून." संतोष डोळे टिपत म्हणाला.
घरी आलो तेव्हा सौ.वाट बघत असल्याप्रमाणे पुढे आली.
"काय ग तू ? काय हे नवीन खूळ काढलेस सिरीयलचे ? त्या दिघ्याचे जेवणाचे वांधे आणि तू तुझ्याविषयी बोलतेस. " मी चिडून म्हटले.
" माहितीय मला.पण भाऊजी रस्त्यावरून जातात पण घरी येत नाहीत असे कळले म्हणून आज मुद्दाम त्याची वाट पाहत उभी राहिले आणि घरी घेऊन आले.आहो आपल्याशिवाय कोण आहे त्यांना.बरे वाटते त्यांनाही आपल्याशी बोलून आणि आपल्याला ही आनंद होतोच.म्हणूनच जेवल्याशिवाय कधीच जाऊ देत नाही त्यांना. यापुढे पंधरा दिवसातून एकदा तरी घरी फेरी मारायची आणि जेवल्याशिवाय जायचे नाही असाच दम दिलाय त्यांना .भले तुमचे मित्र असतील पण मलाही लहान भावासारखे आहेत ते."
"आणि ते सरबत दे फेकून किती दिवस वापरशील" मी ओरडलो.
आहो ,ते केव्हाच संपले.आता पुन्हा बाहेर गेल्याशिवाय नवीन बाटली घरात येणार नाही हे माहितीय मला.म्हणूनच त्या दिवशी नवीन बाटली आणून ठेवली.जरा घरातही लक्ष द्या काय हवे काय नको ते विचारत जा "असे म्हणून फणकार्याने आत निघून गेली.
मी  काही न बोलता  हात जोडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर