Tuesday, June 23, 2020

लॉकडाऊन ....३

लॉकडाऊन ....३
"अहो... बाबांना टॉयलेटला जायला मदत करा ...."तिची हाक ऐकताच त्याने लॅपटॉपमधून डोके बाहेर काढले आणि कपाळावर आठ्या आणत बायकोकडे पाहिले.
"मी चपात्या करतेय म्हणून सांगितले तुम्हाला ...." तिने चेहरा बारीक करून म्हटले.
तसा तो नाईलाजाने उठला.
गेले पंधरा दिवस त्याचा बाप अंथरुणावर पडून होता.वॉकला जाताना एका सायकलस्वाराने धडक दिली आणि कंबरेचे हाड फॅक्चर झाले.
हॉस्पिटलमधून घरी आणल्यावर त्यांच्यासाठी एक माणूस चोवीस तास ठेवला होता.त्यामुळे फारसे लक्ष द्यायची गरज नव्हती .पण लॉकडाऊन सुरू झाला आणि तो यायचा बंद झाला . ह्यालाही वर्क फ्रॉम होमची ऑर्डर मिळाली आणि हा पण आजपासून घरीच बसला .
चेहऱ्यावर त्रासिक भाव आणूनच तो त्यांच्याजवळ गेला.
"अरे फक्त व्हीलचेयरवर बसव बाकी करेन मी.." बाबा मिस्कीलपणे म्हणाले.तसा तो हसला.
"नको... तितका वेळ नाहीय ...  कामे आहेत.."असे म्हणत त्याने दोन्ही हातानी त्यांना उचलले आणि टॉयलेटच्या दिशेने चालू लागला.
"असेच मी तुला उचलून न्यायचो बघ.गावी आंब्याच्या झाडावरून पडला होतास आणि पाय  फॅक्चर झाला होता . तेव्हा असेच तुला उचलून सगळीकडे घेऊन जावे लागायचे .."ते हसत हसत म्हणाले.
त्याने काही न बोलता त्यांना कमोडवर ठेवले "झाले की सांगा .... बाहेर मी उभा आहे ...."
 "उपकार नाही केले ... मुलगा आहे मी तुमचा .कर्तव्यच होते ..तो मनात पुटपुटला .
लहानपणापासूनच बापविषयी एक प्रकारची अढी मनात बसली होती .त्याचे वडील अध्यात्मिक वृत्तीचे कीर्तनकार आणि समुपदेश. गावोगावी कीर्तन करायचे. आणि आई प्राथमिक शाळेत शिक्षिका.
संसार काही फार सुखाचा नव्हता . ह्याला पहिल्यापासून कॉम्पुटर ..नेटची ..आवड .पण वडिलांनी कॉमर्सला  टाकले . आपली आवड बाजूला सारत तो पदवीधर झाला आणि चांगल्या कंपनीत जॉब मिळाला . तसेही मुंबईत आता सर्व कॉर्पोरेट ऑफिसच उभी राहिली होती . मग त्याने हळू हळू कॉम्पुटरचे विविध कोर्स केले आणि आता मोबाईलचे नवीन अँप तयार करू लागला .
तसे त्याचे लग्नही मानविरुद्धच झाले होते .एका मुलीवर त्याचे प्रेम होते .पण वडिलांना मंजूर नव्हते .त्यांनी त्याला दोन वर्षे थांबायला सांगितले पण मुलगी थांबली नाही .नाईलाजाने वडिलांनी ठरविलेल्या मुलीशी लग्न करावे लागले . त्याची बायको स्वभावाने खूप चांगली होती ..नोकरी सांभाळून.. सर्वांना सांभाळून संसार करीत होती. पण त्याच्या मनात राहिले ते राहिलेच.
आज त्याला नाईलाजाने का होईना वडिलांचे सर्व करावे लागत होते . रोज उठून स्पंजिंग करणे औषधे देणे नैसर्गिक विधी .... हे सर्व चालूच होते.
तो वडिलांशी फार काही बोलत नव्हता पण बायकोचे आणि वडिलांचे एकमेकांशी छान पटत होते असे वाटते . ते सतत काहीतरी मिस्कील बोलून वातावरण प्रफुल्लित ठेवत होते . संध्याकाळी आपल्या सहज सोप्या शैलीत नातवाला कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार देत होते . पहिल्यांदा त्याचे डोके फिरायचे पण हळू हळू त्याला ते आवडू लागले.
मग तो ही हळूहळू मोकळा होऊ लागला . कधी कधी त्यांच्याबरोबर पत्यांचा डाव बसू लागला . ते नेहमी त्याच्या लहानपणीच्या आठवणी काढून सर्वांना हसवायचे . आई मध्येच गेली आणि तीही बाबांमुळेच असा त्याचा समज . पण तरीही बाबांनी दुसरे लग्न केले नाही त्याचे कारण ही उमजू लागले.
त्या दिवशी मित्राने कुठूनतरी शोधून मटण आणून दिले होते . संध्याकाळी घरभर मटणाचा वास दरवळू लागला . "च्यायला... ह्या लॉकडाऊनमध्ये बरेच दिवस दारूच प्यायलो  नाही .. तो मनात म्हणाला. तशी घरात एक बॉटल होती . पण आतापर्यंत प्यायची वेळच आली नव्हती.
 त्याने हळूच बायकोला खूण केली . तिने रागाने डोळे वटारले. बाबांकडे खूण केली . तो चरफडत गप्प बसला .
इतक्यात बाबांची हाक ऐकू आली . 
"चिरंजीव .. आज छान बेत आहे वाटत जेवणाचा ...?? 
तो हसून हो म्हणाला .
" मग नुसते मटण खाणार ..?? आधी काय घेणार की नाही ..."?? बापाने अंगठा दाखवीत हसत विचारले.
त्याने खजील होत मान खाली घातली.
" घे रे ... !! उगाच मन मारू नकोस .. मला माहितीय तू घेतोस ते ... आणि तू मोठा झालायस.. बरे वाईट कळते तुला ...चल आजचा दिवस मी कंपनी देतो तुला ..."?? ते  हसत हसत म्हणाले.
" काहीही काय बाबा ....?? तुम्ही घेत नाही माहितीय मला .." तोही हसत म्हणाला.
"हो पण कोल्डड्रिंक तर घेईन... चल इथेच घेऊन ये आणि दरवाजा लावून घे ...." बाबांनी ऑर्डर सोडली तसा तो सगळा सरंजाम घेऊन आत आला. 
त्याला कसेतरीच वाटत होते पण बाबांनी हळू हळू त्याची भीती घालवली . तो अजून मोकळा झाला . 
"तुझी जुनी मैत्रीण काय करते आता ..."?? त्यांनी अचानक प्रश्न विचारला आणि तो हडबडला .. 
"माहीत नाही.. तिचा घटस्फोट झाला मग बहुतेक तिने दुसरे लग्न केले . पुढे माहीत नाही ..." तो खाली मान घालून म्हणाला.
"दुसरा ही घटस्फोट झाला ... बाबा  कोल्डड्रिंकचा एक घोट घेत म्हणाले ... तुला खरेच वाटते ती तुझ्यासाठी योग्य होती....??  ती मुलगी चांगली असेल पण ती आपल्याला सूट झाली असती ..?? तुझ्यासाठी दोन वर्षे ही थांबली नाही ती आणि स्वतः चे संसार ही सांभाळू शकली नाही .... आणि ही मुलगी ....?? आज तुला संभाळतेय ,माझा त्रास सहन करतेय नोकरी करतेय ... मला वाटते त्यावेळी मी घेतलेला निर्णय योग्यच होता ". त्यांनी नजर रोखून विचारले .
"पण शिक्षणाचे काय ....?? तो चिडून म्हणाला .
"येथील कारखाने कमी होऊन फक्त कॉर्पोरेट ऑफिस राहतील याचा अंदाज होता मला . कीर्तनाला ..समुपदेशन.. करायला जायचो तेव्हा हेच ऐकू येत होते. म्हणून तुला कॉमर्सला घातले . नंतर नोकरी मिळाल्यावर तू काहीही करशील याची खात्री होती मला . आपण मध्यमवर्गीय माणसे . शिक्षण आणि नोकरी आपल्यासाठी महत्वाची मग दुसरे छंद . तुझी आई गेली आपली ओढाताण होऊ लागली . दुसरे लग्न केले तर तुझ्यासकट बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील हे कळले मला .म्हणून दुसरे लग्न केले नाही .. पण आज आपली परिस्थिती बघून वाटतेय योग्य वेळी योग्य निर्णय घेतले मी .. परिस्थितीशी तडजोड त्यावेळी ही केली मी .. आणि आजही करतोय ...."त्याच्या हातातील दारूच्या ग्लासाकडे बोट दाखवीत  म्हणाले .
त्याने काही न बोलता ग्लास रिकामा केला . बाबांना उचलून टॉयलेटला घेऊन गेला. रात्रीचे जेवण शांततेत  झाले. 
रात्री झोपताना तो बायकोला म्हणाला .."लॉक डाऊन संपल्यावर त्या मेडला चोवीस तास बाबांच्या मदतीला ठेवायची गरज नाही . आठ तासच ठेवू . ते बरे होईपर्यंत मी वेळेवर घरी येईन .
 बायकोने हसून मान डोलावली आणि त्याच्या मिठीत शिरली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ...२

लॉकडाऊन ...२
रात्रीची वेळ... साधारण दीड वाजला असेल.त्या एक मजली लांबलचक चाळीत भयानक शांतता होती.
चौकीच्या गाडीने त्याला चाळीजवळ सोडले.
" चल.. उद्या भेटू .."सहकार्यांना हात करत तो चाळीत शिरला.त्याच्या हालचालीने काही घरात दिवे पेटले तर काहींनी खिडक्या उघडून पाहिले . त्यांच्याकडे ओळखीचे हसत.. हात उंचावत तो स्वतःच्या दारात उभा राहिला.
दरवाजावर थाप मारण्याऐवजी त्याने मोबाईलवरून फोन केला.घरात कुठेतरी रिंग वाजली आणि काहीवेळाने बंद झाली. आतून पावले वाजताच तो दरवाजपासून दूर उभा राहिला.
दरवाजा उघडला गेला आणि दारात ती उंभी राहिली .. अर्धवट जागी,केस विस्कटलेले . अंगावर फुलफुलांची डिझाईन असलेला डार्क ढगळ गाऊन.
कितीवेळा सांगितले तिला असा ढगळ गाऊन घालत जाऊ नकोस म्हणून ,काकूबाई दिसतेस ... पण प्रत्येकवेळी हसते. आताही त्याला पाहातच ती गोड हसली.परत आत शिरून पाण्याने भरलेली बादली घेऊन आली आणि हातात टॉवेल. 
त्याने काही न बोलता अंगावरचे कपडे काढून त्या बादलीत टाकले . पाकीट घड्याळ ,पट्टा, मोबाईल  बाजूला ठेवला आणि थेट बाथरूममध्ये शिरला.
थंड पाणी अंगावर ओतून कमरेला टॉवेल गुंडाळून तो बाहेर आला तेव्हा ती किचनमध्ये जेवण गरम करीत होती. तिला पाठमोरे पाहून त्याच्या शरीरात वीज सळसळली . किती दिवस झाले तिला जवळ घेऊन . हा 21 दिवसाचा लॉकडाऊन ..त्याआधी होळीच्या निमित्ताने संवेदनशील ठिकाणी ड्युटी.
साल....!!  या चाळीत दिवसा काहीच करता येत नाही. दिवसा दार लावले तरी शेजारी काहीतरी मागायला किंवा द्यायला दार ठोठावणार.दुपारी पोरगा शाळेतून येणार. आमची फक्त रात्रीच मज्जा .... तो चरफडला. न राहवून तिच्या मागे उभा राहिला. 
त्याच्या चाहुलीने ती मोहरली .त्याने अलगद तिला मागून मिठी मारली . ती शांत उभी राहिली ..एक सुस्कारा सोडून तिने लाजेने डोळे मिटून घेतले. 
"पोरगा उठेल ना ...?? ती लाजून पुटपुटली .
"काय पण ...?? रात्री दोन वाजता आठ वर्षाचा पोरगा कसा उठेल ..."?? तो चिडून म्हणाला.
" पण नको ...मला अडचण आहे ...".तिच्या आवाजात अपराधीपणा होता.
"भेxx कधी....?? तो चिडून बोलला.
"पहिला दिवस .... तुम्हाला सांगणारच होते येताना पॅड घेऊन या. पण कधी याल त्याचा भरोसा नाही . म्हणून शेजारच्या मालतीकडून घेतले . उद्या येताना आणा म्हणजे तिचे तिला देऊन टाकू ...." ती खाली मान घालून म्हणाली.
लॉकडाऊनमुळे हे ही काम वाढले तर ...तो स्वतःशी हसला .  तिच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्याकडे पाहून तो खजील झाला.
 त्याला आठवला तो हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर. कोरोनाचा पहिला पेशंट आल्यापासून तो ड्युटीवर आहे . आंघोळ कधी करतो ,टॉयलेटला कधी जातो ते अजून पहिलेच नाही . घरदार सगळेच विसरून गेलाय.  त्या दिवशी म्हणाला हे एकदा संपले की  दोन खंबे मारून दोन दिवस झोपून राहीन . त्याच्या एका खंब्याची जबाबदारी आपण घेतलीय .काय साला माणूस आहे की मशीन ...?? आणि आपण बायको सापडली की चिकटलो.
 काही न बोलता त्याने तिची हनुवटी उचलून चेहरा जवळ आणला आणि थरथरणार्या ओठावर हळूच ओठ ठेवले.
" ह्याची तर अडचण नाही ना तुला ... तो हळूच पुटपुटला . तिचा संयम सुटला . डोळ्यातील अश्रू त्याचा चेहरा भिजवू लागले . 
"कधी संपणार हो हे ..."असे म्हणत त्याच्या छातीवर आपले डोके टेकविले .
"संपेल आपणच संपवू या रोगाला .. विश्वास ठेव ...तो जड आवाजात उत्तरला .
सकाळी सहाला नेहमीप्रमाणे जाग आली . त्याने घाईघाईने आवरले . तिने दिलेला चहा नेहमीप्रमाणे अर्धा पिऊन अर्धा तिच्यासाठी ठेवला.मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत "ह्याला माझा फोटो तरी दाखव... नाहीतर विसरून जाईल मला ..." गमतीने म्हणत तिच्या डोक्यावर टपली मारून बाहेर पडला .
"मास्तर आज तुमची ड्युटी फोरास रोडला ...." साहेबांनी हुकून सोडला . 
"त्या बायकांकडे कोणी जाणार नाहीत याकडे लक्ष द्या आणि हो कोणीच नाही म्हणून तुम्ही जाऊ नका ...."साहेब हसत म्हणाले . सर्वच हसत बाहेर पडले.
 गल्लीच्या तोंडावरच त्याने बैठक ठोकली . सकाळी उगाचच फिरणाऱ्यांवर दोनचार काठीचे फटके मारले . तशी ही गल्ली रात्रीची जागी असते पण लॉकडाऊन मुळे दिवसरात्र शांत होती .
काहीजणी खिडकीत दात घासत बसल्या होत्या तर काही एकमेकींशी गप्पा मारत होत्या . त्याचे लक्ष गेले की काहीजणी मुद्दाम इशारा करीत होत्या .एकूण वातावरण हलके फुलके होते .
त्या कोपऱ्यातील खिडकीत ती उभी होती . फिट्ट बसणार ब्लाऊज खाली शॉर्ट परकर. नजर रोखून त्याच्याकडे पाहत होती .तिच्या चेहऱ्यावरचा माज नजरेतही स्पष्ट दिसत होता . तिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या शरीरात वीज सळसळली .. त्याची नजर तिने बरोबर हेरली आणि नजरेने खेळ तिने चालू केले .
तो सहज राउंड मारायला म्हणून उठला आणि फिरत फिरत तिच्या दारासमोर उभा राहिला .
"बसणार का ...?? साहेब.. आम्हाला ही तुमची सेवा करायची संधी द्या की ..... किती दिवस सलग ड्युटी करतायत . पोटाची भूक असते तशी शरीराची ही असते की .. या मोकळे व्हा ... आज फ्री देते मी ... ती त्याच्या शरीराला चिकटून डोळ्यात डोळे रोखून म्हणाली .
त्याच्या शरीरातील रक्त जोरात धावू लागले . बायकोला रात्री मारलेली मिठी डोळ्यासमोर आली . क्षणभर त्याच्या डोळ्यात वासनेची ठिणगी उडाली .पण पुन्हा तिच्या डोळ्यातील अश्रू आठवून विझून गेली . काही न बोलता त्याने तिला बाजूला केले .
"साली ... उठबस हेच आठवत का तुम्हाला .... "तो चिडून म्हणाला .
"काय करू साहेब ... ..जो तो आपल्या परीने सगळ्यांना मदत करतोय. आमचे शरीर हेच आमचे भांडवल आहे .आज ते फुकटही कोणी घेत नाही .  वीस दिवसांपूर्वीच टेस्ट करून घेतलीय आम्ही . त्यानंतर आतापर्यंत घरातच बसून आहोत . सेफ आहोत आम्ही .  पोटाची भूक भागवायला सर्वच तयार होतात पण शरीराची भूक भागवायला आम्हाला पुढे यावेच लागेल . म्हणून आज तुम्हाला ऑफर केली . शेवटी समाजाला आमचेही देणे लागतेच की ....ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली . 
तो काही न बोलता बाहेर पडला .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Thursday, June 18, 2020

लॉकडाऊन ...१

लॉकडाऊन ...१
शेवटी नाना मुळेकर गेले आणि आमच्या सोसायटीतील शेवटचा स्वातंत्र्यसैनिक अनंतात विलीन झाला.
अर्थात नव्वद हे जाण्याचेच वय आहे म्हणा.. त्यामुळे अलोकला.. म्हणजे त्याच्या मुलाला फारसे दुःख झाले नाही.उलट गेले काही महिने तो आणि नाना सकाळी  देवाच्या एकत्रच पाया पडायचे आणि ने रे बाबा ..पटकन ... असे देवाकडे मागणे मागायचे.
 याचा अर्थ असा नव्हे अलोकला त्यांचा काही त्रास होता उलट घरातले सर्वच त्यांचे आनंदाने करायचे .
अर्थात गेले काही दिवस देवाकडे मागणे बदलले होते . हा लॉकडाऊन संपूदे मग उचल... असे रोज सांगितले जात होते . शेवटी  देवच तो .. ह्यांचेच दिवसच भरले तर तो काय करणार .. नेले रात्री उचलून ..
च्यायला अलोक हैराण .. सर्टिफिकेट द्यायला कोण डॉक्टर तयार होईना .शेवटी सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यावे असे ठरले.
 लॉकडावूनमुळे अँबुलन्स ही सहजी मिळेना. शेवटी विक्रमने कशीबशी अर्रेन्ज केली आणि बंड्याला अलोकबरोबर पाठवून दिले.
ह्या कोरोनामुळे म्हाताऱ्याची रवानगी थेट शवागृहात......"दोन दिवसांनी बॉडी घेऊन जा .. "असा स्पष्ट आदेश अलोकला मिळाला.डॉक्टरांची ओळख काढली गेली पण या कोरोनामुळे सगळे कायदे कडक झाले आहेत असे सांगण्यात आले .नाईलाजाने अलोक घरी आला.
शेवटी दोन दिवसाने नानांची बॉडी घरी आणली गेली .कोरोना नाही यातच सर्वांनी आनंद मानला.
पण बॉडी डायरेक्ट घेऊन जायची की घरी न्यायची यावर चर्चा झाली.हरी म्हणतो काहीही होवो पण म्हाताऱ्यावर विधीवत अंत्यसंस्कार झाले पाहिजे.
 विक्रम हळूच म्हणाला "त्यासाठी चार माणसे तरी गोळा झाले पाहिजे ना ....?? आणि सामानाचे काय ..."??  हरीने तुच्छ नजरेने त्याच्याकडे पहाताच विक्रम मागे सरकला.
अलोकही म्हणाला "बाबांना शेवटचे घर पाहू दे.नाहीतर आयुष्यभर मनात राहील.."
शेवटी बॉडी घरी आणली.पण सोसायटीतले कोण जवळ यायला मागेना.बंड्या आणि अलोकनेच बॉडी घरात आणली आणि हलक्या आवाजात रडारड चालू झाली .
मी आणि विक्रम सामान आणायला गेलो .हारफुले काहीही मिळणार नाही असे दुकानदाराने स्पष्ट सांगितले .
"जे मिळेल ते दे .."असे बोलून सामान घेऊन आलो.
सामान पाहतच हरीच्या अंगात नेहमीचा आवेश संचारला . ताबडतोब बंड्याला घेऊन तिरडी बांधायला सुरवात केली . मी भात शिजवायला विस्तव पेटविणार इतक्यात हरीने थांबविले.
"भाताची गरज नाही..लॉकडाऊनमुळे काही मिळत नाही . रस्त्यात गरिबाला हे तांदूळ दे ...." तो सहज म्हणाला.
"मग ते विधिवत अंत्यसंस्कार ...?? मी भुवया उंचावत विचारले.
" तू मला शिकवू नकोस ... आहे त्यात ऍडजस्ट करीन मी .. तसाही म्हातारा काही बोलणार नाही ..."हरीने तिरसटपणे उत्तर दिले . मी काही न बोलता बाजूला झालो.
तयारी झाल्यावर परत बॉडीला खाली आणले .पाय धुवून तिरडीवर झोपविले.
" पक्याच्या घरसमोर तुळस आहेत भरपूर ..त्याची पाने काढून हार बनव..." हरीने पुन्हा ऑर्डर सोडली . मी मान हलवून तुळस काढायला गेलो.
"चला निघुया .... "हरी अलोककडे पाहून म्हणाला.
इतक्यात विक्रम कुठूनतरी हार घेऊन आला
 "अरे घरच्या देवाचे काढून आणलेस की काय ..."?? हरीने विक्रमला सोसायटीला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने विचारले. विक्रमच्या डोळ्यातील राग पाहून  जीभ चावली.
तिरडी उचलायला बंड्या आणि विक्रम पुढे झाले. मागे पुढे राहून त्यांनी तिरडीला हात लावला तोच पुन्हा हरी ओरडला .. "च्यायला.... ठेवा खाली. दोघात काय उचलता ..?? चार माणसे पाहिजे इतकी अक्कल नाही का तुम्हाला ..."?? 
"हरीभाऊ .. इतकी माणसे आहेत का ..?? आणि अँम्ब्युलन्सही जवळ आहे . नेताना तर बॉडी दोघांनीच वर नेली होती.." बंड्या उत्तरला. 
"बंड्या... वर नेताना ती बॉडी होती रे.आता ते प्रेत झाले आहे आणि प्रेताला खांदा द्यायला चार माणसेच हवी ." हरी बंड्याला समजावत म्हणाला.
शेवटी हरी गुरू होता त्याचा .
"मग आता चार कोण ..."?? मी विचारले.
" तू .. मी.. बंड्या .. विक्रम .. मडके अलोक धरेल. चला विधीनुसार जितके जमेल तितके करू ." हरी तिरडीला हात लावत म्हणाला ... आणि आम्ही पुढे झालो .
तिरडी आत ठेवल्यावर हरी बंड्याच्या कानाला लागून पुटपुटला. तसा बंड्या मान डोलवत मोटारसायकलवर बसला .
"भाऊ.. चला बसा आणि तो मास्क नीट लावा ." मला सूचना करत बंड्याने बाईक पुढे आणली .
एक मोटारसायकल पुढे... एक मागे मध्ये अँम्ब्युलन्स अशी नानांची अंत्ययात्रा निघाली . रस्त्यात बंड्याने राजू टायरवाल्याकडून सायकलचे दोन टायर घेतले .
"आता हे कशाला ..."?? मी चिडून विचारले .
"हरिभाऊ बोलले तूप वापरायचे नाही ते घरी कामास येतील. रॉकेल कोण देणार नाही.टायर घे चिता लवकर पेटेल..."बंड्या शांतपणे म्हणाला .. 
स्मशानात शिरताच हरीने सवयीनुसार पटापट विधी करून नानांना अग्नी दिला . 
 सोसायटीत येताच विक्रमने हरीच्या खांद्यावर हात ठेवला .."चल तुझी सोय करतो.."
हरीने शांतपणे खांद्यावरचा हात काढला.
"ते नको रे .. पोरांसाठी बिस्किट्स मिळतात का ते बघ . घरातली बिस्किट्स संपून गेली . पोर रोज विचारतात बिस्किट्स कधी आणणार ...??त्यांना काय माहीत रे कोरोना म्हणजे काय ....?? आपल्या दुकानात तर मिळतच नाही"
इतक्यात अलोक बाहेर आला .त्याच्या हातात एक मोठा बॉक्स होता . त्याने तो हरीच्या हातात दिला . आतमध्ये चार पाच प्रकारचे आठ दहा बिस्किट्सचे पुडे होते .
"हे काय ...?? हरीने आश्चर्याने विचारले .
"अरे नानांची आहेत. त्यांना खाताना खूप त्रास व्हायचा  मग दुधातून बिस्किट्स द्यायचो त्यांना . बरीच आणलेली त्यात ही राहिली . आमच्याकडे लहान मूल नाहीत ,तू घेऊन जा..."  अलोक डोळे पुसत म्हणाला . भारावलेल्या चेहऱ्याने हरीने तो बॉक्स घेतला आणि हळूच डोळे पुसले .
"तुझ्या बिस्किट्सची सोय झाली.आता तुझी सोय मी करतो. कालच नटराजच्या मागच्या दारातून एक बाटली आणलीय . अर्धी घेऊन जा माझ्याकडून .. चल.. पाठीवर थाप मारून विक्रम हरीला ओढत घेऊन गेला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

कामगार कपात

कामगार कपात
त्या कॉर्पोरेट ऑफिसच्यासमोर  मोठ्या संख्येने कर्मचारी जमले होते .सर्वचजण चेयरमन यशवंत मनोहर राज यांनी वाट पाहत होते.
थोड्याच वेळात काळ्या बुलेटवरून त्यांचे आगमन झाले.मागच्या गाडीतून त्यांचे प्रिय मित्र आणि सेक्रेटरी चित्रगुप्त हसऱ्या चेहऱ्याने उतरले.
जमा झालेल्या कर्मचार्यांकडे पाहून श्री. य.म.राज यांच्या कपाळावर आठ्या पडल्या तर चित्रगुप्त नेहमीसारखे छद्मीपणे हसले.जमावाला हात करून ते ऑफिसमध्ये शिरले .
"चित्रगुप्ता... काय प्रॉब्लेम आहे ..?? हे लोक आज येथे का ..??  त्यांनी चिडून विचारले . 
"काही कल्पना नाही सर...?? त्यांनाच विचारू.." चित्रगुप्तानी गूढ आवाजात म्हटले.
"ठीक आहे ..बोलवा त्यांच्या प्रतिनिधींना .." य.म.राजनी ऑर्डर सोडली .
काही वेळातच  सात आठ कर्मचारी ऑफिसमध्ये शिरले आणि श्री.य.म.राजांपुढे उभे राहिले .
"बोला काय प्रॉब्लेम आहे ...."?? हातातील सोन्याची साखळी गरागरा फिरवत विचारले .
 "साहेब... तुम्ही कर्मचारी कमी करणार असे समजले ...याबाबत तुम्ही युनियनला ही विश्वासात घेतले नाही..." एक प्रतिनिधी मोठ्या आवाजात म्हणाला .
"यात काय सांगायचे ..?? राष्ट्रीय आपत्ती आहे. संपूर्ण देशात फक्त एकाच गोष्टीने मृत्यू होण्याचे प्रमाण चालू आहे.तेही इतरांच्या मानाने फारच कमी .बाकी सगळीकडे बंदच आहे .रस्ते ओस पडलेत .रस्त्यावरून माणसेही चालत नाहीत . एकट्या रस्ते अपघातात रोज अनेक माणसे मारली जातात पण सगळी वाहतूक बंद.तर ट्रेन अपघातही बरेच होतात पण चक्क लोकल ही बंद झाल्यात . त्याशिवाय इतर छोटे मोठे आजार आहेत  डॉक्टरांकडे रांगा लागतात ,मग कधी कधी त्यातही संधी शोधून काही माणसांना आणतो आपण ओढून . इतकेच काय तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण दहशतवादी हल्ले  घडवून आणायचो.पण आता ते ही बंद आहेत..." श्री.य.म.राज समजवण्याचा सुरात म्हणाले .
" पण हे सर्व अचानक का ...?? दुसऱ्या प्रतिनिधीने विचारले .
"त्या श्री. देवेंद्र यांनी निर्माण केलेल्या नवीन रोगामुळे एकाच प्रकाराने मृत्यू होतातय आणि ते ही हळू हळू . त्यासाठी आपली माणसे ही कमीच लागतात. मग इतरांना ठेवून काय करायचे . हल्ली आपण फक्त हॉस्पिटलजवळ आपली माणसे ठेवली आहेत . रेल्वे स्टेशन ,रस्ते ,देशाच्या सीमा ,वादग्रस्त प्रदेश इथून आपली माणसे कमी केली आहेत ..."यमराज यांनी स्पष्टपणे सांगितले .
 " पण इतकी वर्षे सर्व सुरळीत चालू होते . आम्हाला इंसेंटिव्हही मिळत होता . काही काही भागात तर खूपच काम होते ... "एक प्रतिनिधी चिडून म्हणाला.
" माहीत नाही... मोठया साहेबांच्या मनात काय चालू आहे..?? मागे झालेल्या वार्षिक सभेत  पृथ्वीवरील परिस्थितीची चर्चा झाली होती. मानवाच्या वागणुकीवरही थोडा रागाचा सूर होता . मानवजात स्वतःला सगळ्यात श्रेष्ठ समजू लागली आहे असा एकूण सूर दिसत होता . आतापर्यंत साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला . कधी समुद्र विभागाच्या साहेबाना सांगून मोठमोठ्या लाटा निर्माण केल्या तर कधी वरुण विभागात ऑर्डर देऊन वेळीअवेळी प्रचंड पाऊस पाडला तर पशु पक्ष्यांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांच्यामार्फत रोगराई पसरवली . इतकेच नव्हे तर सूर्य विभागाला सांगून काही भागात दुष्काळही पाडला.पण मानवाने त्यावर मात केली इतकेच नव्हे तर .आम्ही कुठेही थांबणार नाही...आमचे स्पिरिट दाखवले अश्या वल्गना ही केल्या...."श्री. य.म.राज आपले म्हणणे प्रतिनिधींकडे स्पष्ट करीत होते.
"पण मानव आपले बुद्धिकौशल्य प्रभावी पणे वापरतोय  ना...?? त्यांनी संहारक अस्त्रे शोधली. पण त्याचा वापर करणार नाहीत असे वचनही दिले . अणूशक्तीचा वापर लोक कल्याणासाठी केला . सतत नवनवीन औषधे शोधली. एकमेकांवर कंट्रोल ठेवला ..आणि मुख्य म्हणजे तो कोणत्याही अवघड परिस्थितीला सामोरा जातोय....." एक प्रतिनिधी म्हणाला .
"हो... पण तो निसर्गाला विसरलाय. आपल्या माणसांना विसरलाय.. त्या दिवशी त्यात्या मुरुडकरच्या प्रेताला फक्त बारा माणसे होती . त्या स्वातंत्र्यसैनिकांची शेवटची यात्रा भव्यदिव्य व्हावी म्हणून आपण रविवारी त्यांचे प्राण ओढून आणले . तर शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी होती म्हणून बरेचजण पिकनिकचा प्लॅन ठरवून बसले होते .तर काहींनी मेगाब्लॉकची कारणे सांगितली .तर काहींनी रोज ऑफिसमध्ये राब राब राबतो म्हणून एक दिवस आराम करू म्हणून टाळले . तर मागे मीनल राजवाडेच्या लग्नाला सुट्टी नाही म्हणून बऱ्याच लोकांनी व्हाट्स अँपवरच शुभेच्छा दिल्या तर काहींनी संध्याकाळी रिसेप्शन ठेवा तर येऊ असा निरोप दिला . पूर्वी चार चार दिवस लग्न समारंभ व्हायची पण आता फक्त सकाळी लग्न लावतात संध्याकाळी पूजा घालतात . दुसऱ्यादिवशी सर्व आपापल्या कामाला निघून जातात . पैसे जास्त खुळखुळले की नवीन फर्निचर घेतात ,जुने कवडीमोल भावाने विकून टाकतात. रस्ते , इमारती ,मोठमोठे कारखाने बनविण्यासाठी वृक्षतोड होतेय . पर्यावरणाचा नाश होतोय . रस्त्यावर गाड्यांची प्रचंड गर्दी ..ट्राफिक जाम त्यातून विषारी वायू वातावरणात सोडला जातोय . लोकांना घरी जेवण बनवायचा कंटाळा सगळे बाहेरून रेडिमेड मागवले जाते आणि त्यामुळे आजार वाढतायत . जितके आजार वाढले तितकीच नवीन औषधे निर्माण झालीय . कारखान्यातील रसायने नदी आणि समुद्रात सोडली गेली त्यामुळे पाणी ही विषारी बनतेय . अरे ह्या मानवाने पाणी बनविण्याचे कारखानेही सुरू केले . लोकांना साधे पाणी पिणे कमीपणाचे वाटू लागले . काहीही झाले कुठे जायचे ठरविले की आम्हाला भरपूर कामे आहेत ,वेळ नाही हे ब्रीदवाक्य झालेय ... नुसते धावत असतात. म्हणूनच असे ठरविले असेल की मानवाला थांबवावे . घरात डांबून ठेवायचे ,इतकेच नाही तर त्याला उपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी थांबवाव्या . कळू दे त्याला या सर्वांची किंमत . कळू दे त्याला कुटुंब आणि नातलगांची किंमत . मानवाला जगण्यासाठी किती कमी गोष्टींची गरज असेल याची जाणीव झालीच पाहिजे...."यमराज आवेशातच म्हणाले . त्यावर चित्रगुप्तनीही हसत मान डोलावली .
"पण साहेब... यातूनही मानव पुन्हा ताठ उभा राहील . तो या परिस्थितीवर नक्कीच मात करेल .आणि पुन्हा बेताल वागेल ..."एक प्रतिनिधी हसून म्हणाला.
"होय... शेवटी तो मानव आहे . एक लढवय्या योद्धा आहे. तो नक्कीच यावर मात करेल पण पुढे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून यावर उपाय ही शोधेल.पण यावरून  त्याला पर्यावरणाचे महत्व कळेल . स्वच्छतेचे ,सुरक्षित अंतर ठेवायचे.. रोगांपासून लांब कसे राहायचे हे ही कळेल.त्याला अन्नाचे ,आपल्या कुटुंबाचे महत्व कळेल.अरे.... आपण त्यांचे शत्रू नाही आहोत ते आजही आपल्याला पूजतात. संकटकाळी आपली आठवण काढतात.आपण फक्त सृष्टीचा समतोल राखायचा प्रयत्न करतोय.आज तुमच्याच नाहीत तर लाखो मानवाच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झालाय . पण ते नक्कीच यातून मार्ग काढतील आणि तुम्हाला मार्ग शोधून देतील . जा सध्या तुम्ही ही काही दिवस आराम करा .. पुढे तुमचेही काम पूर्ववत होईलच ..." असे बोलून यमराजनी हात जोडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, June 5, 2020

द अनटचेबल्स

THE UNTOUCHABLES
द अनटचेबल्स
ही कथा घडतेय १९३० सालात.
अवैध दारूचा धंदा करणारा माफिया डॉन अल कॅपोन शिकागो शहरावर नियंत्रण ठेवून आहे . संपूर्ण पोलीस खाते त्याच्या नियंत्रणात आहे . त्यावेळीच कठोर अधिकारी इलियट नेस याला परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पाठविले जाते . मोठ्या धाडसाने मारलेली पहिली रेड  भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे फसली आणि नेसचे हसू झाले .
पण एक वृद्ध प्रामाणिक अधिकारी  जिम मालोन त्याच्या मदतीला येतो आणि ते दोघे मिळून एक टीम बनवितात . त्यात एक प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी आहे आणि एक अकाउंटन.
ते सर्व अजून एक रेड मारतात आणि ती यशस्वी होते . त्यानंतर ते कॅपोनच्या मागे लागतात . पण माफिया किंगला हलविणे इतके सोपे नसते . त्याच्या टीम मधील जिम मालोन आणि दुसरा साथीदार याचे निर्घृणपणे मुडदे पाडले जातात . 
शेवटी काय होईल ...?? अर्थात दुष्टांचा नाश आणि सत्याचा विजय याच सूत्राने चित्रपट संपतो . पण तो कसा ...?? हे पाहणे खूपच थरारक आहे .
या चित्रपटाची स्टार कास्ट तगडी होती . रॉबर्ट द निरो अल कॅपोनच्या भूमिकेत होता . हसतमुख समोरच्याला चीड आणणारा क्रूर खलनायक त्याने ताकदीने उभा केला होता . त्याच्या समोर नेसच्या मुख्य नायकाच्या भूमिकेत केविन कॉस्टनर होता तर  जिमी मालोनच्या भूमिकेत शॉन काँन्हेरी .
या चित्रपटातील बरेचसे शॉट बॉलिवूडमध्ये वापरले गेले . विशेषतः तेजाब चित्रपटात अनिलकुमार पायऱ्यांवर धावत जाऊन लहान बाळाला बेबीगाडीसकट अडवतो आणि गुंडाला पकडून देतो . खरे तर या सीनमुळेच अनटचेबल्स भारतात फेमस झाला असे म्हणायला हवे .
या चित्रपटवरून बॉलिवूडमध्ये चित्रपट तयार झाला . त्यात कुमार गौरव आणि शत्रुघ्न सिन्हा होते . नाव आठवत नाही .
1987 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट शॉन कॉन्हेरी ला बेस्ट सपोर्ट अक्टरचे ऑस्कर देऊन गेला .
© श्री. किरण बोरकर