Friday, April 30, 2021

द लास्ट डॉन.... मारिओ पुझो

द लास्ट डॉन.... मारिओ पुझो
अनुवाद....अनिल काळे
मेहता पब्लिशिंग हाऊस
१९६५  साल....आज  डॉन क्लेरिकुझिओ फॅमिलीत त्याच्या दोन नातवांचा बाप्तिस्मा समारंभ होता.बरोबर एका वर्षांपूर्वी सॅन्टाडिओ फॅमिलीशी झालेल्या युद्धात डॉनचा तरुण मुलगा आणि जावई मृत्युमुखी पडले होते.
आज डॉन आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेणार होता . आपली मुले अमेरिकेच्या उद्योगधंद्यात अधिकृतपणे सहभागी व्हावीत त्यांनी सभ्य जीवन जगावे अशी योजना आखली होती. 
त्याप्रमाणे त्याने मोठ्या मुलाला अमेरिकेतील वॉल स्ट्रीटमध्ये आणि आर्थिक क्षेत्रात तर दुसरया मुलाला हॉटेल व्यवसायात आणि तिसरा मुलगा बांधकाम क्षेत्रात जम बसवतील या दिशेने पाऊल टाकण्यास सुरवात केली .त्याचा भाचा वेगासमधील मोठे हॉटेल आणि कॅसिनो सांभाळेल अशीहि व्यवस्था केली होती.
त्याचा भाचा पिप्पी हा फॅमिलीचा प्रमुख हत्यारा राहील अशी घोषणाही केली.या पुढे क्लेरिकुझिओ फॅमिली कोणत्याही अनधिकृत धंद्यात न उतरता केवळ इतर फॅमिलीना संरक्षण देईल त्यांचे काळे पैसे पांढरे करतील असे ठरले.
भविष्यात अमेरिकेतील सभ्य समाजात वावरताना काही संघर्षाची बीजे आताच आपण रोवून ठेवलीय हे डॉनला कुठे माहीत होते.
१९९०.... आज क्लेरिकुझिओ फॅमिली बलाढ्य झालीय.डॉनच्या तिन्ही मुलांनी आपापल्या उद्योगधंद्यात जम बसविला आहे.तर पिप्पी वेगासमध्ये कॅसिनो संभाळतोय. बाप्तिस्मा झालेले डॉनचे दोन्ही नातू आता तरुण झालेत. पिप्पीचा मुलगा क्रॉस अतिशय शांत आणि बापासरखा हुशार आहे . तोही आता कॅसिनोमध्ये लक्ष देतोय तर डॉनचा दुसरा नातू दान्ते फॅमिलीत लक्ष देतोय पण गुन्हेगारी त्याच्या रक्तातच आहे .रक्तपात खून मारामारी त्याला आवडते .क्रॉसविषयी त्याच्या मनात असूया आहे.
अथेना हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री. ती कारकिर्दीतील महत्वाचा चित्रपट करतेय पण तिचा नवरा मध्येमध्ये त्रास देतोय. या त्रासातून तिला सुटका हवीय. क्रॉस आपल्या बहिणीच्या शब्दाखातर तिला या त्रासातून सोडवतो त्याच वेळी तो तिच्या प्रेमात ही पडतो.फॅमिलीना न कळवता तो तिच्या मार्गातील काटा दूर करतो.तिच्या चित्रपटाचा सहनिर्माता ही बनतो.फॅमिली या गोष्टींमुळे नाराज होते .क्रॉसचे फॅमिलीमधील स्थान ही धोक्यात येते.
सर्व व्यवस्थित सुरू असताना पिप्पीचा भर रस्त्यात खून होतो. एका भुरट्या चोराने पिप्पीची हत्या केलीय असे पसरविण्यात येते. पण फॅमिलीचा प्रमुख हत्यारा भुरट्या चोराकडून मारला जाईल हे क्रॉसला पटत नाही .फॅमिलीच्या रिवाजनुसार तो वडिलांच्या हत्येचा सूड घेण्याचे ठरवितो .
कोण आहे पिप्पीचा खरा मारेकरी...?? त्यामागे कोण सूत्रधार आहेत...?? कोण आहे लास्ट डॉन...?? यासर्वाची उत्तरे पूर्ण पुस्तक वाचून मिळतील.
माफिया फॅमिलीच्या कारभाराचे हुबेहूब वर्णन मारिया पुझोने केले आहे.अतिशय थंड रक्ताने निर्णय घेणारा डॉन आपल्या अंगावर काटा आणतो .

Monday, April 26, 2021

रद्द_झालेल्या_परीक्षा

#संकल्पना
#रद्द_झालेल्या_परीक्षा
कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर म्हटली जाते. यावेळी तर तरुण आणि लहान मुलांना ही लागण झाली.एक प्रकारची नकारात्मकता सगळीकडे दिसून आली. सध्या  शासनाने मृत्युदर रोखण्यावर आणि कोरोना पेशंट बरे होण्यावर प्राथमिकता दिली.असे म्हणतात ना की जान सलामत तो पगडी पचास.
गेले वर्षभर विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे हाल चालू आहेत. ऑनलाईन शिक्षण सर्वानाच जमत नाही.योग्य मार्ग सापडत नाही. पण खरोखर इतकी परिस्थिती गंभीर आहे का ...??
 मागील पिढीचा अर्थात आपल्या पिढीचा विचार केला तर क्लास हा प्रकार जवळजवळ नव्हताच .शिक्षक जे काही शिकवतील त्यावरच अभ्यास करायचा.दहावीचे नवनीतचे 21 अपेक्षित प्रश्नसंच खूप फेमस . त्यावरच रट्टा मारून परीक्षेला जायचे . त्यावेळी क्लास ही फक्त तीन विषयांसाठी होते . दहावीतील प्रत्येक विद्यार्थी क्लास लावायचा असे नाही . काही जण तर शाळेतही हजेरीसाठी येत.स्वतः अभ्यास करण्यावर बहुतेक विद्यार्थ्यांचा कल होता.
हल्ली तशी परिस्थिती राहिली नाही. शाळा सुटली की क्लास सुरू ...त्यानंतर घरी आल्यावर क्लास आणि शाळेचा अभ्यास .सोळा ते सतरा तास विद्यार्थी अभ्यासात बिझी राहतोय .त्याला परीक्षेत नुसते पास व्हायचे नाही तर चांगले मार्क मिळवायचे आहेत.
विद्यार्थी  पूर्ण तयारीत आहे आणि अश्यावेळो परीक्षाच रद्द झाली तर ....??  मला माहितीय 100% विद्यार्थ्यांना हा निर्णय मान्य नाही .कोणालाच हा निर्णय पचनी पडणार नाही .परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन शासनाने आम्ही परिस्थितीपुढे हतबल आहोत हेच सिद्ध केले आहे . आज प्रत्येक विद्यार्थी दोन किलोमीटर च्या परिघात शाळेत जातो .जर त्याची शाळा हेच त्यांचे सेंटर ठेवले तर त्याला प्रवास करणे सोयीचे ठरेल.शासनाने परीक्षेसाठी वेगळी यंत्रणा राबवायला हवी. आरोग्य उपचार आणि नंतर शिक्षण या गोष्टीला प्राथमिकता द्यायला हवी.
प्रत्येक विद्यार्थ्यांची...शिक्षकाची..टेस्ट करूनच त्यांना परीक्षेसाठी सेंटरमध्ये येणाची परवानगी असावी . जास्त विद्यार्थी असतील तर दोन सत्रात परीक्षा घ्यावी . त्यासाठी पेपरसेट ही वेगळे असावे .प्रत्येक शाळेत दहावीचे किती विद्यार्थी असतील याचे नोंद करून त्याप्रमाणे आयोजन केले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील . प्रत्येक परीक्षेत रिस्क ही असतेच तशीच रिस्क इथेही आहे फक्त आपल्याला काळजी घ्यायला हवी .योग्य अंतर ,मास्क ,सॅनिटायझर ,वापरल्यास बरीचशी रिस्क कमी होईल .
शेवटी जो अभ्यास करतो त्यालाच यश मिळते .आणि त्याला आपले मूल्यमापन इतरांप्रमाणे समान व्हावे हे वाटणार नाही . परीक्षा ही झालीच पाहिजे त्यासाठी जबाबदार संस्थेने आपली पूर्ण ताकद  आणि वेळ यासाठी दिला पाहिजे . विद्यार्थ्यांकडे पेपर सोडविण्यासाठी तीन तास आहेत तर यंत्रणेकडे 24 तास आहेत . विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त दहा पेपर सोडवायचे आहेत आणि यंत्रणेकडे पूर्ण महिना आहे . जर विद्यार्थी वर्षभर दिवसरात्र अभ्यास करू शकतात तर यंत्रणा महिनाभर दिवसरात्र या परीक्षेसाठी योजना आखू शकत नाही का ??? 
आज प्रत्येक शाळेत दहावीचे किती विद्यार्थी आहेत ते कुठे राहतात याची नोंद आहे जर त्यांनी त्याप्रमाणे वेळापत्रक आखले तर नक्कीच यातून योग्य मार्ग निघेल .
शासन आणि संबंधित यंत्रणा यांनी मनावर घेतले तर नक्कीच परीक्षा होऊ शकतील
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, April 18, 2021

रिबेल सुलतान्स ....मनु एस. पिल्लई

रिबेल सुलतान्स ....मनु एस. पिल्लई
अनुवाद.....तृप्ती कुलकर्णी
एक प्रकाशन 
खिलजी ते शिवाजी महाराजांपर्यंतचे दख्खन या कालावधीचा इतिहास या पुस्तकाद्वारे मनु पिल्लई यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय .लेखक अतिशय बारकाईने दख्खनच्या इतिहासाचा अभ्यास करून तो आपल्यासमोर मनोरंजकपणे सादर करतात. एकूण सात रंजक प्रकरणातून दख्खनची मांडणी करण्यात आलीय. प्रत्येक प्रकरणात महत्वाची पात्रे घेऊन त्यांचे राजकारण  डावपेच राज्यशासन ,वैयक्तिक गोष्टी अधोरेखित केले आहे.१२०६ पासूनचा दिल्लीच्या सल्तनतची स्थापना झाली तेव्हापासून १७०७ ला बादशहा औरंगजेब याचा मृत्यू  या सगळ्या घटना आपल्यासमोर येतात.
महाराष्ट्रात दख्खनची ओळख शिवाजी महाराजांच्या मोहिमेमुळे होते .पण यात शिवाजी महाराजांची ओळख सर्वात शेवटी आली आहे .
आपल्याला दख्खनचा इतिहास फारसा माहीत नाही त्यामुळे पाचशे ते सहाशे वर्षाचा इतिहास वाचायला कंटाळा येतो कधीकधी थोडा गोंधळही उडतो . पण लेखकाने अनेक संदर्भ घेऊन हे पुस्तक लिहिले आहे .

Friday, April 9, 2021

सीता रामायणाचे चित्रमय पुनर्कथन....देवदत्त पट्टनाइक

सीता रामायणाचे चित्रमय पुनर्कथन....देवदत्त पट्टनाइक
अनुवाद...विदुला टोकेकर
मंजुल पब्लिशिंग हाऊस
कोणत्याही अडीअडचणीच्या काळात..दुःखात..वादळी प्रसंगात अशी एक कथा सांगायला शक्तीदेवी शिवाला सांगते आणि रामायण या कथेचा जन्म होतो .
त्यानंतर अनेक भाषेत अनेक राज्यात त्यांच्या परंपरेनुसार रितिरिवाजानुसार ही कथा सांगितली जाते.कधी ती गद्य तर कधी पद्य तर कधी नुसत्या अभिनयातून ती सांगितली जाते.
कुठेतरी ती गोष्ट एक कावळा ऐकतो आणि ती जमेल तशी नारदमुनींना सांगतो.नारदमुनी ती वाल्मिकीना सांगतात,वाल्मिकी त्याचे एक संपूर्ण गीत तयार करतात  आणि लवकुशाना शिकवितात. लवकुश ते गीत रामासमोर गातात 
आपल्याला माहीत असलेले रामायण अपूर्ण आहे असे लेखक सांगतो. शिवाने सांगितलेले रामायण एक लाख श्लोकांचे आहे .हनुमान यातील साठ हजार श्लोक सांगतो तर वाल्मिकी चोवीस हजार सांगतात.तर इतर काही प्रांतात आणि विविध भाषेत ते कमीजास्त प्रमाणात सांगितले जाते.
लेखकाने यात अतिशय सरळ आणि सोपी कथा सांगितली आहे जी आपल्याला माहीत आहे पण त्यातील घडणाऱ्या घटनांचे विविध प्रांतात लिहिल्या गेलेल्या रामायणाचे संदर्भ दिले आहेत. एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविध रचनाकारांनी पाहिले आहे आणि त्याची मांडणी केली आहे.
भारतभर अनेक खेडी आहेत जी कोणत्या ना कोणत्या प्रसंगाने रामायणाशी जोडली गेली आहेत . मुंबईतील बाणगंगा तलाव हा रामायणाशी संबंधित आहे . रामाने जमिनीत बाण मारून हा तलाव निर्माण केला असे म्हटले जाते .
असे अनेक संदर्भ आणि वेगवेगळ्या प्रांतातील भाषेतील रामायणाच्या घटना आपण ही एक कथा वाचत जातो आणि रामायणातील इतर पैलूंचे दर्शन होते .

Wednesday, April 7, 2021

माझ्या आठवणीतील परीक्षा

माझ्या आठवणीतील परीक्षा 
मुलगा इंजिनियर डॉक्टर व्हावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. माझ्याही घरच्यांची तशी इच्छा होती.
 पण त्याकाळी मध्यमवर्गीयांना सायन्स.. आर्ट्स. कॉमर्स.. याव्यतिरिक्त दुसरे काहीच माहीत नव्हते. माझ्या चांगल्या नशिबाने दहावीत चांगले गुण मिळाले. पण इंजिनियर व्हायचे म्हणजे नक्की काय..?? याबाबत कोणतेही ज्ञान नव्हते. कोणतरी म्हणाले बारावी करून डायरेक्ट डिग्रीला ऍडमिशन घेऊ. मग मीही त्यांच्या पाठीमागे जाऊन पुन्हा शाळेच्याच ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.
पण नंतर लक्षात आले की हे सायन्स काही आपले क्षेत्र नाही.मग साम दाम दंड भेद या चारसूत्री कलमानुसार बारावीही पास झालो.
तोपर्यंत इंजिनियर म्हणजे काय..?? याचे बऱ्यापैकी ज्ञान मिळाले होते.डिग्रीला नाही पण डिप्लोमाला  शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे ऍडमिशन मिळाले आणि ठाण्यातील एका शांत... कोपऱ्यात असलेल्या त्या पवित्र वास्तूत माझ्या दादर ठाणे फेऱ्या चालू झाल्या.
बारावीचा अनुभव असल्यामुळे पाहिले वर्ष आनंदात गेले .पण दुसरे वर्ष कठीण असते असा समज होता . याचे मूळ कारण म्हणजे मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिटिक्स.भल्याभल्याना हा विषय पार करता येत नाही असा समज होता.अर्थात तो.. जे अभ्यास करीत नाहीत त्यांच्यासाठीच होता हे नंतर मोठे झाल्यावर कळले. त्यामुळे दुसरे वर्ष कसे पार पडेल या काळजीतच आम्ही होतो. आणि त्याप्रमाणे सेटिंग लावायला सुरवातही केली होती.
त्याचवर्षी माझ्या घरी ही गंभीर परिस्थिती होती . माझी मोठी बहीण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती . माझी हॉस्पिटलमध्ये एक फेरी व्हायची. त्यातच परीक्षा सुरू झाली . इंजिनियरिंगला एक बरे असते आपले कॉलेजचं परीक्षेचे सेंटर असते . त्यामुळे परीक्षेतही अगदी रोजचे वातावरण असते . पाहिले पेपर तसे सोपे गेले .सुपरवायझर कॉलेजचेच सर असल्यामुळे फार त्रास झाला नाही .पण आपण हुशार नसलो तरी आपल्या पुढेमागे...आजूबाजूला बसलेले.. आपले वर्गमित्र हुशारच असतील असे काही नसते ना ...?? तरीही पेपर आम्ही एकत्रितपणे सोडविले.
पण आता मुख्य विषय आला .मॅथेमॅटिक्समधील वीस मार्कचे स्टॅट मला येत होते पण बाकीच्या वीस मार्कचे काय.... ?? पास होण्यासाठी चाळीस मार्क लागतात. निदान पंधरा मार्कचे तरी कोणतरी दाखवू दे असे कॅक्युलेशन करून मी बेंचवर बसलो.
यावेळी माझ्या नशिबानेच आमच्या लायब्ररीयन सुपरवायझर म्हणून होत्या .त्यांनी प्रेमाने माझ्या घरच्यांची चौकशी केली.बहिणीची तब्बेत विचारली . आरामात पेपर सोडव म्हणून सल्ला ही दिला.
जसा पेपर हातात आला.. मी ताबडतोब शेवटचे पान उघडून स्टॅटेस्टिक सोडविण्यास सुरवात केली.पेपर हातात पडल्यावर तो आधी पूर्णपणे वाचवा या अंधश्रध्येला बळी पडलो नाही.
इथेही माझा कामचलाऊ अभ्यास कामी आला आणि वीस मार्काचा स्टॅट अर्ध्या तासात सोडवून झाला .पण नंतरचा पेपर पाहतच उरलेला अडीज तास कसा काढावा याची चिंता सुरू झाली.
आजूबाजूचा मित्रपरिवार पेपर सोडविण्यात दंग होता. पेपर कसा आहे याचे चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. काही घाम पुसत होते तर काही नुसतेच पेपरकडे पाहत बसून होते मध्येच माझ्याकडे पाहून हात हलवून कसेनुसे हसायचे .
शेवटी न राहवून शेजारी मन लावून पेपर सोडवत बसणाऱ्या माझ्या मित्राला हाक मारली .त्याने चेहऱ्यावर त्रासिक भाव आणून माझ्याकडे नजर टाकली आणि माझा केविलवाणा चेहरा पाहून शांत झाला.
पहिली उत्तरपत्रिका सोळा पानांची होती.त्याने पाच मिनिटे थांब असे खुणावून परत डोके खाली केले आणि पंधरा मिनिटाने ती सोळा पानांची उत्तरपत्रिका माझ्या हातात दिली. अल्लाउद्दीनचा खजिना सापडल्यागत माझा चेहरा झाला . कमीत कमी चाळीस मार्काचा ऐवज माझ्या हाती लागला होता. मी आनंदाने त्याचा पेपर कॉपी करण्यास सुरुवात केली.
 पण लिहिता लिहिता लक्षात आले की कुठेतरी काहीतरी चुकत होते. काही प्रश्न फक्त चार स्टेपमध्ये सुटत होते त्या प्रश्नाला आठ ते दहा स्टेप होत्या . काही प्रश्नाला आठ मार्क होते त्याच्याही स्टेप्स जुळत नव्हत्या.मरू दे .... आपली उत्तरपत्रिका भरतेय ना ...!! असा विचार करीत मी सर्व उत्तरपत्रिका उतरवून काढली. शेवटी इथून तिथून उत्तरपत्रिका गोळा करीत नव्वद मार्काचा पेपर सोडविला आणि हुश्श करीत बाहेर पडलो .
रिझल्टच्या दिवशी मॅथेमॅटिक्समध्ये केटी निश्चितच.. असे मनात ठरवून नोटीस बोर्डसमोर उभा राहिलो  आणि आनंदाने जोरात आरोळी ठोकली.
मी सर्व विषयात पास झालो होतो .मॅथेमॅटिक्समध्ये चाळीस मार्क मिळाले होते.पण दुःखाची गोष्ट ही होती की मला उत्तरपत्रिका देणाऱ्या मित्राला तीन विषयात केटी लागली होती त्यात मॅथेमॅटिक्स एक होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर