Thursday, August 2, 2018

टार्गेट

टार्गेट
तो कॉन्फरन्स हॉल गच्च भरला होता . देशातील सर्व प्रतिनिधी आज हजर होते . सर्वचजण अस्वस्थ होऊन अध्यक्षांची वाट पहात होते . अचानक दरवाजा उघडला आणि श्री.यमराज यांचे आगमन झाले . त्यांचे सहाय्यक श्री. चित्रसेन मागे होतेच . यमराज आले तेच तणतणत.सर्व प्रतिनिधींना त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला "टार्गेट पूर्ण का होत नाही .....? पृथ्वीचा समतोल राखला जात नाही.जीवन आणि मृत्यूचे प्रमाण कमीजास्त होतेय....काय कारणे आहेत याची..?? यमराज यांचा चेहरा संतापाने फुलून आला होता .
"साहेब.... हल्ली आजारपणाचे मृत्यू फार कमी झालेत. औषधांचा वापर करून मृत्यू पुढे ढकलता येतोय. रोज नवनवीन शोध मेडिकलमध्ये लागत आहेत. इतकेच नाही तर जगातील प्रत्येक देशात अमरत्वावर शोध चालू आहेत". एक प्रतिनिधी धाडस करून म्हणाला.
विश्वास न बसून यमराजनी चित्रसेंन यांच्याकडे पाहिले. त्यांनी ही ताबडतोब दुसरीकडे मान वळवली .
"इतकेच नव्हे साहेब.... तर जुने काही भयानक आजार नष्टच झाले आहेत .त्यावर तर जन्माला आल्याबरोबरच औषध निघाली आहेत . शिवाय आपण नवनवीन रोग काढले तर त्यावरही उपाय निघाले आहेत . हल्ली तर जुने अवयव काढून त्याजागी नवीन अवयव ही बसविता येतात"
"अरे.... हे असेच चालू राहिले तर आपली संस्था बंद करावी लागेल.काही काम राहणार नाही.कोणाकडे यावर उपाय आहे का... ?? मला टार्गेट पूर्ण करून पाहिजे ... यमराज यांचा आवाज चढला.
एक प्रतिनिधी धाडस करून उभा राहिला "साहेब ... आपण आता मानवाना आपापसात झुंजवले पाहिजे . त्यांनी एकमेकांचे खून केले पाहिजे . तरच मोठ्या प्रमाणात हानी होईल".
ते ऐकून दुसऱ्याला धीर आला" साहेब .. आपण मानवाच्या शरीरात वासनेचे प्रमाण वाढविले पाहिजे . त्यामुळे ते स्त्री मग ती कोणत्याही वयाची असो तिच्यावर अत्याचार करतील आणि समाजात मोठा भडका उडेल दंगल होईल त्यातही अनेक जण मरतील".
यमराज यांनी संतोषाने मान डोलावली.
"महाराज आपण काही लोकांच्या मनात स्वतंत्रता भरवून दिली पाहिजे .त्यांना  हक्काची  जाणीव करून दिली पाहिजे मग त्यांच्या हक्कांसाठी ,स्वातंत्र्य साठी ते इतरांची हत्या करतील. आपण लोकांना व्यसनी बनवू मग नशेच्या अमलाखाली ते स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाहीत "हळू हळू एकेकाला कंठ फुटू लागला.
"अरे वा... !! फारच छान ...पण हे घडणार कसे ...??? कोण घडविणार ...??यमराजनी प्रश्न केला .
"खूप सोपे आहे साहेब... आपण सर्वांच्या हातात स्मार्ट फोन दिले आहेत . त्यावरून आपण त्यांना रोज नव्या नव्या वाईट गोष्टींची सवय लावू  तसेही देशभरात हे काम केव्हाच चालू झाले आहे .पहा ....." असे बोलून त्याने समोरील मोठा टीव्ही चालू केला आणि बातम्यांचे चॅनेल लावले .
1) या शहरात दोन गटांमध्ये भीषण मारामारी ,चार मृत्यू 3 गंभीर,
2) या शहरात अतिरेक्यांचा हल्ला 12 जण मृत्युमुखी
3) या शहरात भयानक बॉम्बस्फोट 15जण ठार 30 जखमी
4) या शहरात रेल्वे अपघात 40 जण ठार 20 जखमी
5)या शहरात दोन गाड्यांची टक्कर 3 ठार 4 जखमी
5) या देवळात दर्शनासाठी आलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 25 भाविक ठार
"बघा साहेब या बातम्या बघा.. सगळीकडे ह्या सोशल मीडियाने कसा धुमाकूळ घातला आहे . त्यामुळे आपोआप आपले टार्गेट पूर्ण होतेय " अरे वा म्हणजे या मानवाना चांगले काही दाखवीत नाही का ....छान चला कामाला लागा. जा पटापट खाली जाऊन त्याना  उचलून आणा आणि टार्गेट पूर्ण करा " असे बोलून यमराज चित्रसेनाच्या खांद्यावर हात टाकून हसत हसत बाहेर पडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment