Thursday, January 21, 2021

रावण....अमीश

रावण......अमीश 
आर्यावर्ताचा शत्रू
रामचंद्र मालिका पुस्तक 3
ऋषी विश्रव आणि कैकसीचा पहिला पुत्र रावण जन्मतः नागा होता.नागा म्हणजेच वैगुण्यासह जन्मलेले बालक. ह्यांना समाजात हीन दर्जाची वागणूक मिळते. म्हणूनच विश्रव ऋषी रावणाचा राग करायचे.
त्याचा भाऊ कुंभकर्ण हाही नागा म्हणूनच जन्माला आला . त्याला जन्मतः ठार मारण्याची योजना होती. पण रावणाने मारीचमामाच्या मदतीने त्याचे प्राण वाचविले आणि सर्वजण परागंदा झाले.
रावण लहानपणापासूनच चतुर आणि क्रूर होता. देवी कन्याकुमारी उर्फ वेदवतीवर त्याचे मूक प्रेम होते.पुढे त्याने लंकेचा धनाढ्य व्यापारी कुबेर याच्याशी मैत्री करून त्याचे राज्य हळू हळू बळकाविण्यास सुरवात केली. त्याने मोठ्या चतुराईने सप्तसिंधूचा सम्राट राजा दशरथ याचा पराभव करून संपूर्ण समुद्री व्यापार आपल्या ताब्यात घेतला आणि पुढे अधिकृतपणे लंकेचा राजा झाला . कुंभाकर्णाची त्याच्यावर निस्सीम भक्ती होती.
मलयपुत्रांकडे अतिशय बहुमूल्य धातू आणि औषधे होती. रावण आणि कुंभाकर्णाला लागणारी औषधे ही मलयपुत्रांकडे होती. ऋषी विश्वामित्र मलयपुत्रांचे प्रमुख . सातवा विष्णू ठरविण्याचा अधिकार ही त्यांचाच होता . 
सीता हीच सातवी विष्णू असेल असे रावणाला समजले. तिला ताब्यात घेतले तर मलयपुत्रांची सर्व औषधे ,महत्वाची खनिजे आपल्याला मिळतील असा रावणाचा डाव होता. सीतेच्या अपहरणाची योजना त्याने बनवली आणि त्यात तो यशस्वीही झाला ..
आता पुढे काय ....???
अमीशच्या रामचंद्र शृंखलेच्या तिसऱ्या पुस्तकातून एक वेगळा रावण आपल्यासमोर उभा राहतो. तो उत्कृष्ट वादक आहे ,गायक आहे ,चित्रकारही आहे. अर्थात हा रावण खलनायकच आहे .त्याची सीतेला पळविण्याची अनपेक्षित आणि वेगळीच कारणे आपल्यापुढे येतात.एखाद्या व्यक्तीला महान बनवायचे असेल तर त्याने काहीतरी भरीव लक्षात येण्याइतपत कार्य केले पाहिजे आणि ते भारी कार्य करण्यासाठी परिस्थिती निर्माण केली पाहिजे असे काहीसे सूत्र तिसऱ्या पुस्तकात स्पष्ट होते. सीता कोण याचेही रहस्य उलगडले जाते .
अपेक्षेपेक्षा वेगळेच रामायण आपण अमीशच्या पुस्तकातून वाचतो आणि अनपेक्षित धक्के मिळत जातात. पण हे रामायण वाचताना कंटाळा येत नाही उलट उत्सुकता ताणून धरते.

No comments:

Post a Comment