Saturday, January 30, 2021

रॉ... रवींद्रकुमार आमले

रॉ... रवींद्रकुमार आमले 
भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा
मनोविकास प्रकाशन 
रॉची स्थापना 1968 सालाची.त्या आधी देशाची फाळणी झाल्यानंतर  भारतीय केंद्रीय गुप्तचर यंत्रणा स्थापन झाली. तिचे नाव इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबी.
चीन युद्धाच्या अपयशानंतर देशाला बाह्य हेरगिरी यंत्रणेची आवश्यकता वाटू लागली. लष्करप्रमुखांनी या योजनेला मान्यता दिली आणि ती कशी असावी...?? याचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्तींनी अमेरिका आणि ब्रिटनला भेट दिली.
लालबहादूर शास्त्रीच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी या योजनेला मंजुरी दिली पण त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे नियंत्रण असेल हे स्पष्ट केले आणि त्याची जबाबदारी रामेश्वरनाथ काव
कोण होते रामेश्वरनाथ काव ...??
रॉने स्थापने पासून कोणत्या कामगिरी केल्या.. ?? त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला .?? याचा आढावा लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.
भारतात काहीही भयंकर घडले की पंतप्रधान या मागे परकीय शक्तीचा हात असल्याचा उल्लेख करतात. सामान्य नागरिकांना ते नेहमीच हास्यास्पद वाटते . पण खरोखरच परकीय शक्ती नेहमी यामागे असत. चीन,पाकिस्तान ,श्रीलंका नेपाळ नेहमीच आपल्या देशाविरुद्ध काही षडयंत्र रचत असतात. त्यांच्यावर सतत नजर ठेवणे,त्यांच्या कारवाया रोखणे तसेच त्यांच्या देशात आपले हेर घुसवून बातम्या गोळा करणे हे रॉ चे प्रमुख कार्य .
१९७१ च्या युद्धाच्या आधी काश्मीरमधून इंडियन एयरलाईन्सच्या विमानाचे अपहरण झाले . त्यात 26 प्रवासी होते.दहशतवादयानी ते विमान लाहोरला नेले .यात पाकिस्तानचा हात आहे असे इंदिरा गांधीनी जाहीर केले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी दहशतवाद्यांशी चर्चा केली नंतर 26 प्रवाश्यांना सोडून देण्यात आले आणि विमानाला आग लावली गेली. जगाला वाटले यात भारताची मानहानी झाली . पण यासर्व घटनेमागे रॉ चा हात होता. कसा ?? त्याने भारताला काय फायदा झाला ??? 
बांगला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात रॉ ने बांगला देशाला पाठिंबा दिला.त्यांनी स्वातंत्रसैनिकाना प्रशिक्षण दिले.शस्त्र पुरवठा केला .याह्याखान पूर्व पाकिस्तानवर हल्ला करणार याची खबर इंदिरा गांधी आणि रॉ ला आधीच होती. त्यांनी आधीच आपली रणनीती ठरवली. 
 सिक्कीमच्या विलीनीकरणात रॉचा मोठा हात आहे.सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी रॉ ला काय काय करावे लागले याची रंजक माहिती मिशन सिक्कीम प्रकरणात मिळते.
मिशन काहुटा मध्ये रॉ ने पाकिस्तानात काहुटा गावी असलेल्या अणूऊर्जा प्रकल्पाचा कसा पर्दाफ़ाश केला याची माहिती मिळते .
पंजाबातील खलिस्तान चळवळ रॉने मोठ्या हिकमतीने मोडून काढली पण नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या रोखण्यात अपयशी ठरले.
10 एप्रिल 1983 ला रॉ चे प्रमुख बेपत्ता झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ते दुसऱ्या राष्ट्रात पळून गेले अशी बातमी पसरली.पण ते कुठे गेले होते..?? त्यांनी मॉरिशसचे बंड कसे मोडून काढले .. याची माहिती आपल्याला ऑपरेशन लालदोरा प्रकरणात मिळते.
श्रीलंकेतील  राजकारणात हस्तक्षेप आणि राजीव गांधींची हत्या हे रॉचे प्रमुख अपयश मानले जाते.आंतराष्ट्रीय राजकारणात भारताच्या पाठीमागे रॉ खंबीरपणे उभी आहे.पाकिस्तान नेपाळ श्रीलंका आपली शेजारी राष्ट्रे अशांत ठेवण्यात रॉचा हात आहे.
एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनेमागे किंवा साध्या वाटणाऱ्या घटनेमागे किती मोठा कट असू शकतो.हे या पुस्तकातून कळते.

No comments:

Post a Comment