Friday, March 3, 2017

जेवण

आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती . जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता . तीन वर्षात खूप काही शिकला . काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या  कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता . गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचं .अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला ,पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते . आज त्याचेच लग्न होते .तीन वेळा फोन करून  आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले .
दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते . आम्ही तिथे पोचलो .तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती .  हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले ,दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती .  मला पाहून स्टेजवर  धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला  आणि शेजारच्याला खूण केली . ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला . मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो . त्यांच्या आदरस्थित्त्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला "काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते . पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो . "अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली. कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली . जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते .युनिफॉर्म घातलेल्या  सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला .हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो . तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्लं नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ . ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या ,मिळते म्हणून सर्व घेऊ नका ,मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता  माझी डिश पूर्ण भरून घेतली  आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले . अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून देण्यासाठी गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता . माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला "सर ,रागावणार नसाल तर एक सांगू ??
अतिशय सभय माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
" हि तुमची डिश आहे ना ??
" होय, मी परत उत्तरलो .
" हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ??  म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "
मी चकित झालो .थोडा राग हि आला . त्याच रागात बोललो "आहो थोडे राहिले अन्न ?काय हरकत आहे .नाही अंदाज आला. म्हणून काय घरी न्यायचं" ??
"रागावू नका" तो गोड हसत म्हणाला .हे मोठ्यांच लग्न आहे .पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार ,मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकार्याना देऊ .आमची 25 माणसे.  पण तरीही अन्न उरणारच .आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ?? राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार  दिवस आम्ही मेहनत करतोय ,उत्कृष्ट प्रतीची भाजी ,मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..होय ,त्यासाठी आम्ही  मागू तेव्हडे पैसे तुम्ही  दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा . म्हणून आम्ही हि शक्कल लढवली ,हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता ". का ???कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
" आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाज हि वाटली आणि पटतहि होते .
खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताय आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय . इतक्यात सौ .म्हणाली  "बरोबर बोलताय भाऊ ,ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल .मेहनत ,इंधन सर्व काही वाचेल . थोड्या वेळाने आम्ही  वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .

© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment