पहिला पाऊस ....६
नेहमीप्रमाणे पायात चपला अडकवून तो घराबाहेर पडत होता.त्याला निघताना बघून ती काळजीने म्हणाली" रोज त्या ओसाड शेतात जाऊन काय करता हो .....?? नुसते बघतच बसता ना …."??
"मग काय करू ..?? तो चिडून म्हणाला" इथे राहिलो तर बँकवाले मागे लागतील.शेतावर आले तर गप्प तरी बसतील .."असे बोलून तो शेतावर निघाला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पाऊस उशिरा येणार किंवा कदाचित येणार नाही अशीच लक्षणे दिसत होती . शेती नुसती कोरडीच होती .गावात पियाला पाणी नव्हते तर शेतीला कुठे येणार..?? कर्जाने पूर्ण वाकून गेला होता तो. एक कर्ज फेडायला दुसरे कर्ज असेच चक्र चालू होते .बायडीच्या अंगावर फक्त काळ्या मण्याची पोत राहिली होती.छोट्याला अजून काहीही कळत नव्हते .विचार करता करता शेतात कधी आलो तेच त्याला कळले नाही. हताश होऊन त्याने आपल्या उजाड शेताकडे नजर टाकली .कसली पेरणी केली होती हे ही त्याच्या लक्षात नव्हते .तसाच उकिडवा तो शेतात फतकल मारून बसला .डोक्यावच्या तळपत्या सूर्याकडे पाहून त्याने टाहो फोडला . डोळ्यातील दोन अश्रू जमिनीवर पडले ."माफ कर आई.. मी डोळ्यातील पाणीही तुला देऊ शकत नाही . असे मनात म्हणत तो रडू लागला.शेवटी तो मनाशी काही निश्चय करून उठला .
दुपार झाली तरी नवरा घरी आला नाही म्हणून ती काळजीत पडली . बरीच वाट पाहून ती शेवटी घराबाहेर पडली.आजूबाजूला चौकशी करीत शेवटी शेतात आली आणि जमा झालेली गर्दी पाहून थोडी घाबरली . तिला पाहून सर्व बाजूला झाले आणि समोरचे दृश्य पाहून तो कोसळलीच . तिचा नवरा शेतातील झाडावर लटकत होता . शेवटी पावसाने बळी त्याचा बळी घेतला होता .
गावातील लोक त्याचे शव घेऊन घरी आले . लहान पोरगा कोपऱ्यात बसून एकटक पाहत होता . अंत्ययात्रेची तयारी झाली आणि वातावरणात बदल झाला . आभाळात ढग दाटून आले . गार वारे वाहू लागले आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली . अचानक पाऊस येताच सर्व गडबडले . तिरडीसकट त्याला उचलून घरात आणले . आलेल्या पावसाचे स्वागत करावे की पावसामुळे माणूस गेला याचे दुःख करावे हेच कोणास कळेनासे झाले. पाऊस पडताना पाहून छोटा उठला . कोपऱ्यात पांढऱ्या कपाळाने बसलेल्या आपल्या आईकडे जाऊन म्हणाला "आये पाऊस आला .. मी जाऊ भिजायला ...?? तिने काही न बोलता त्याच्या डोक्यावरून हात फिरवला "जा पोरा ह्याच पावसासाठी तुझ्या बापाने स्वतःचा बळी दिलाय...." तो पावसात जाताच ती उठली बाहेर पावसात येऊन उभी राहिली आणि सर्वांना ओरडून म्हणाली" बघता काय ...?? दरवर्षी जिवंतपणी पहिला पाऊस अंगावर घेणारामाझा नवरा आज मेल्यावरही पहिला पाऊस अंगावर घेत स्मशानात जाईल. जितेपणी पाऊस नाही पहिला निदान मेल्यावर तरी अंगावर पाऊस घेऊन जाऊ दे ...."सर्व भर पावसात येऊन उभे राहिले . चार जणांनी त्याला खांदा दिला आणि अंत्ययात्रेला सुरवात झाली . मृत्यूनंतरही पहिल्या पावसात तो भिजला होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Sunday, June 16, 2019
पहिला पाऊस ....६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment