Monday, June 24, 2019

पर्यटनस्थळ

पर्यटनस्थळ
शेवटी मास्तर गेला ..हे एक दिवस घडणारच होते . दारूने कोणाचे भले केलेय ....
आता हा मास्तर कोण ....??तर हा आमच्या कोकणातील छोट्या गावातील उनाड फाटका माणूस. पारावर बसून लोकांना सल्ले द्यायचे . मग दोन पेग मारायचे... जेवायचे ...झोपायचे ..परत संध्याकाळी पारावर बसायचे . गावात पर्यटनाला किती संधी आहे  याचे व्याख्यान झोडायचे परत दोन पेग मारून घरी जायचे आणि आडवे व्हायचे हाच त्यांचा उद्योग. काही वर्षे मुंबईला काढली आणि आमचे खिसे साफ करून झाल्यावर परत गावात येऊन राहिलेला पक्का कोकणी .एकटा जीव आणि मनाने साफ म्हणून गावकऱ्यांचा जीव.
मला तो गेल्याचा फोन आला तेव्हा मी मित्रांसोबतच होतो. एक पेग माझाही झालेला.. म्हटले तो गेलाच आहे तर त्याच्या नावाने अजून एक पेग मारू .. नाहीतरी बऱ्याच महिन्यांनी अशी संधी मिळाली होती . बरे पार्टी अर्धवट सोडून कुठे जाणार ,...?? हा गावी .. फोन करणार्याने आधीच सांगितले होते येऊ नका आम्ही थांबणार नाही ...इथे वेळ नाही कोणाला त्याच्या शेजारी बसायला ...च्यायला हल्ली माणूस मेला तर त्याच्या अंत्ययात्रेला जाण्यासही वेळ नसतो हे मुंबईकरांचे माहीत होते पण गावातही लोकांना वेळ नाही हे पहिल्यांदाच कळले . काही न बोलता मी फोन ठेवला आणि भारतातील विविध समस्येवरील आमची अर्धवट राहिलेली चर्चा साग्रसंगीत पुढे चालू केली .तरीही मास्तरांचा विचार काही मनातून जाईना . त्याचे गावावर असणारे प्रेम .. आमच्याबद्दल वाटणारी आपुलकी . एकटा असल्यामुळे आमचे प्रोग्रॅम त्याच्याच घरी ...तेव्हडीच त्याचीही सोय  आणि बकरा ही तोच . पण आम्हाला उत्साहाने आपल्या नवनवीन कल्पना सांगायचा . आम्ही आपले हसून माना डोलवायचो आणि काम झाले की घरी निघून यायचो .
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन आला . मास्तरचे अंत्यसंस्कार व्यवस्थित झाले आहेत आता दहावा आणि बारावा ही ठरले आहे . तुम्ही तेव्हाच या . पैसे घेऊन या ही न दिसणारी सूचना ही होतीच.
मी आणि विक्रमने जायचे ठरविले . जायचा दिवस ठरला आणि सकाळी स्टेशनवर विक्रमबरोबर पंधराजणांचा ग्रुप उभा असलेला पाहून मी चक्रावलो.
"ही काय भानगड आहे विकी ..."?? कोपऱ्यात घेऊन मी त्याच्या कानात कुजबुजलो.
"अरे काही नाही .. या लोकांना कोकणात फिरायचे आहे म्हटले चला आमच्याबरोबर . आमचाही चार दिवस मुक्काम आहेच . तुम्हाला ही फिरवतो . कोकणातले निसर्ग सौंदर्य पहा संस्कृती पहा . हे सर्व महाराष्ट्राबाहेरचे आहेत.माझ्या हातात चरफडण्याशिवाय काहीही नव्हते .
गावी पोचताच विक्रमने सगळ्याची राहण्याची उत्तमप्रकारे सोय केली . संध्याकाळी त्यांना एकत्र जमवून म्हणाला "उद्यापासून आपले कोकण दर्शन आणि कोकण संस्कृती अनुभवणार आहोत .सकाळी आपण गावाच्या स्मशानात जाऊन तेथील कार्य पाहणार आहोत नंतर तिथेच चहापान होईल" मी ते ऐकून हादरलो.
"अरे भाई हे काय ....?? काहीजण माझ्यासारखेच आश्चर्यचकित झाले .. कोकणात माणसाच्या मृत्यूनंतर कसे कार्यक्रम होतात त्याची माहिती आपण त्यांना देणार आहोत . त्यातून आपण कोकणातील संस्कृती आणि परंपराच दाखविणार आहोत ना .....?? कोकणातील आणि इतर राज्यातील लग्ने चालतात मग वेगवेगळे अंतिम विधी का पाहू नये "विक्रम भुवया उंचावून म्हणाला.
"मित्रा तू महान ...."असे मनात बोलतच मी हात जोडले आणि पुढे काय काय पाहावे लागेल याची कल्पना करीत बसलो.
काही वेळाने आम्ही सर्व स्मशानात गेलो. मास्तरच्या पिंडाची पूजा चालू झाली. सर्व कावळ्याच्या प्रतीक्षेत बसून राहिले . बराच वेळ झाला कावळा काही येईना . विक्रम पर्यटकांना कावळ्याचे महत्व सांगू लागला .काही वेळाने त्याने हळूच एका गावकऱ्याला खूण केली तसा  तो  उठला आणि खिशातून छोट्या पेगची बाटली काढून पिंडाजवल ठेवली .ताबडतोब एक कावळा येऊन पिंडाला शिवला. त्या मागची कारणे ही विक्रमने स्पष्ट केली . त्यानंतर सगळेच मास्तरच्या घरी गेले . त्याच्या समोरच्या अंगणात बसून चहा आणि फरसाण संपविला आणि घरी आले .
"आता आपल्याला मयताचे बारावा दिवस कसे करतात हे पहायचे आहे ..."विक्रमने घोषणा केली.
" हा xxxx.... सर्व गावाचे जेवण करून घेणार आहे का यांच्याकडून ..."मी मनात म्हटले . पण विक्रम शांत होता . मास्तरच्या बाराव्या दिवशी त्याने सकाळीच सर्वाना घरी आणले . जेवण बनवायला काही स्त्रिया जमल्या होत्या तर काही पुरुषही त्यांना मदत करीत होते . आजही कोकणात सुख दुःखात आख्खे गाव एकत्र येते .
"बघा आज गावातील प्रत्येक घरातून कोणीतरी इथे मदतीला आले आहे आणि सर्व एकत्र जेवण बनवून जेवतील. गावातील एकीचे उत्तम उदाहरण आहे हे.त्याने मृतात्म्याला शांती मिळेल" सर्व पर्यटक कुतूहलाने पाहू लागले . थोड्या वेळाने जेवण सुरू झाले . पोटभर जेवून मास्तरांच्या नातेवाईकाला पाकीट देण्याचे काम चालू झाले .
"ही एक पद्धत असते . मेलेल्या माणसाच्या परिवारावर फार आर्थिक बोजा पडू नये म्हणून सर्वजण त्याला मदत करतात .तसे प्रत्येक पर्यटकाने खिश्यातून काही रक्कम गोळा करून विक्रमच्या हातात दिली .विक्रमने ती रक्कम खिश्यात ठेवली आणि आम्ही निघालो.
रात्री फिरून आल्यावर मी विक्रमला विचारले"अरे....... त्या पैश्याचे काय करायचे ...?? विक्रम हसला "कार्य तर गावाच्या नेहमीच्या पद्धतीनुसार झाले . पण मास्तरची आपले गाव पर्यटनस्थळ व्हावे अशी खूप इच्छा होती . आज तो मेल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने का होईना चार माणसे त्याच्या कार्याला गोळा केली . पण त्यांच्या पैशावर आपला अधिकार नाही . मी ते पैसे ग्रामपंचायतीत देणार आहे . पुढेमागे गावाचे पर्यटन स्थळात रूपांतर झाले तर ती रक्कम योग्य गोष्टीसाठी वापरा असे सांगणार आहे . मास्तरची ही इच्छा तरी पूर्ण होऊ दे" . असे बोलून पाठ फिरवून झोपी गेला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment