Friday, December 6, 2019

वेळ

वेळ
शेवटी अप्पा कुडाळकर गेले ... ..अर्थात ते रात्री झोपेतच गेले.त्यामुळे आता डॉक्टर जी वेळ लिहितील ते मान्य करावेच लागेल.रात्री देवाला हात जोडताना पाहिले ते शेवटचे...असे प्रकाश म्हणतो.बरोबर आहे म्हणा.... हा उठतो तो पहिला बाथरूममध्ये घुसतो मग चहा पिऊन सरळ बाहेर चालू पडतो.त्या दिवशीही तो नेमका पुण्याला निघाला होता.अलकाचा फोन आला तेव्हा लोणावळ्याला पोचलाही होता.तिथून परत फिरला तेव्हा मनात म्हणाला बाबांची वेळ वाईट निघाली.
अलका नेहमीप्रमाणे साडेसातला उठली.स्वतःचे आवरेपर्यंत आठ वाजले.बाबा अजून कसे उठले नाहीत....?? म्हणून पाहायला गेली तेव्हा अप्पा ताठ झालेले. ही घरात एकटीच ..तिने पहिला फोन प्रकाशला केला.मग डॉक्टरला फोन केला .डॉक्टर बाहेरगावी गेलेले म्हणून दुसऱ्या डॉक्टरची शोधाशोध.  फोन करता करता मनात म्हणाली  बाबांची वेळ वाईट आहे.
मला फोन आला तेव्हा मी नुकताच  ऑफिसमध्ये शिरलो होतो.आता परत फिरणे शक्य नव्हते.दोन तीन फाईल आज क्लियर करायच्याच होत्या.कस्टमरही बाहेर येऊन बसले होते . मोकळा होईपर्यंत संध्याकाळ झाली असती.घरचे संबंध आणि अप्पाच्या अंगाखांद्यावर खेळलो असल्यामुळे ताबडतोब हजर रहाणे गरजेचे होते. पण आतातरी ते शक्य नव्हते . मनात म्हटले म्हाताऱ्याने वेळ काही चांगली गाठली नाही.
बंड्याने माझा फोन येताच बाईकला किक मारली . थोडे अंतर जाताच पाऊस सुरू झाला.भेxxx हल्ली पावसाचे काही खरे नाही .कधीही येतो  सिझन संपला तरी जात नाही . आता असेच चालू राहिले तर कोण येईल प्रेतावर .च्यायला....!!अप्पांची वेळच वाईट.
हरी कधी नव्हे तो अलिबागला गेला होता. माझा फोन गेला तेव्हा स्वारी एकदम हवेत होती . अप्पांचे सांगितले तेव्हा पहिल्यांदा बंड्या करेल सर्व... असे सांगून फोन कट केला . पण काही वेळाने त्यानेच परत फोन करून सर्व माहिती विचारली. रात्रीच गेलेत म्हटल्यावर काळजीत पडला.बंड्याला सांग अप्पांच्या हातापायांना तेल लावीत राहा नाहीतर म्हातारा कडक होईल. खोलीतून बाहेर काढायचे वांधे होतील ..असे सांगून मी येतोय असा निरोप ही दिला.सल्ला दिला. फोन ठेवता ठेवता म्हणाला" च्यायला... म्हाताऱ्याची वेळच  वाईट आहे.
विक्रमला फोन गेला तेव्हा तो नुकताच उठला होता.त्यानेच ताबडतोब अप्पाच्या घरी जाऊन सगळी सूत्र ताब्यात घेतली होती .डॉक्टर सर्टिफिकेटसाठी चार ठिकाणी फिरत होता . त्यात पाऊस सुरूच होताच. शेवटी कुठेतरी ओळखी लावून एक डॉक्टर गाठला आणि सर्टिफिकेट घेऊन आला . तोपर्यंत साफ भिजून गेला होता . सर्टिफिकेट घेऊन स्मशानात गेला तेव्हा क्लार्क ने सांगितले "लाकडे भिजली आहेत.. काहीतरी जळण आणि भरपूर रॉकेल घेऊन या". "इलेक्ट्रिक वर घ्या...." विक्रम तडकून म्हणाला.
"दोन महिने झालेत ..इलेक्ट्रिक बंद आहे . सुशोभीकरण चालू आहे भट्टीचे ...तो क्लार्क थंडपणे म्हणाला. चिट्ठी घेऊन विक्रम बाहेर पडला आणि बाईकला किक मारत मनात म्हणाला च्यायला... म्हाताऱ्याची वेळच वाईट आहे . 
संध्याकाळी सगळे जमा झाले .हरीने सवयीनुसार सगळे सोपस्कार पार पाडले आणि  नेहमीसारखा प्रकाशच्या खांद्यावर हात टाकून स्मशानाबाहेर पडला. निघताना त्याने हळूच विक्रमला इशारा केला . विक्रमने नकारार्थी मान डोलावताच त्याने रागाने डोळे फिरवले . प्रकाशला टॅक्सीत बसवून तो आमच्याजवळ आला . "अरे सामान नाही कसे ...?? तो चिडून म्हणाला . "हरीभाऊ... आज ड्राय डे आहे .सर्व बंद .. चला आज असेच घरी .. सदा हसत म्हणाला . तसा हरीचा चेहरा पडला . आम्ही सर्व एकदम म्हणालो म्हाताऱ्याची वेळच वाईट निघाली. 
आदल्या रात्रीची गोष्ट 
नेहमीप्रमाणे तो दूत आपले सावज शोधत फिरतच होता . सकाळीच त्याच्या बॉसने अर्थात यमराजाने त्याच्यावर खुश होऊन त्याला आवडेल त्या व्यक्तीला घेऊन येण्याची परवानगी दिली होती . पण तेव्हापासून योग्य असा माणूस त्याला भेटलाच नव्हता .फिरत फिरत तो नेमका अप्पा कुडाळकरांच्या घरात शिरला .अप्पा शांतपणे  देवासमोर हात जोडून उभे होते . त्यांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते.
" देवा.... खूप छान आयुष्य दिलेस मला.सर्व बाबतीत मी सुखी आहे .आता मरणही असेच चांगले दे .माझ्या घरच्यांना माझा त्रास नको. झोपेतच शांतपणे मरण दे हीच इच्छा.असे बोलून अंथरुणात शिरले . दूत हसला आणि हातातील फार शांतपणे अप्पाच्या दिशेने फेकला .खरेच अप्पाची वेळ वाईट होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment