Thursday, May 6, 2021

पांचालीचे महाभारत मयसभा

पांचालीचे महाभारत मयसभा... चित्रा बॅनर्जी दिवाकरूणी
अनुवाद...डॉ. प्रतिभा काटीकर
मंजुल पब्लिशिंग हाऊस
आपल्यासारख्या सर्वसामान्यांना माहीत असलेली महाभारत कथा.यातील प्रमुख महानायिका द्रौपदी आपले मनोगत इथे सांगतेय.
एका महायुद्धाला कारणीभूत ठरलेली स्त्री असे तिचे वर्णन केले जाते.तिच्या मनाचा ठाव आतापर्यंत खूप कमीजणांनी घेतला आहे.भले जग तिला सर्वश्रेष्ठ हुशार पतिव्रता स्त्री मानत असेल पण ती स्वतः ला एक साधी स्त्रीच समजते. जिला प्रेम करता येते मत्सरही करता येतो,सूड घेण्याची इच्छा होते सासूशी पटत नाही.
द्रुपद राजाने केलेल्या यज्ञात प्रकट झालेली ही कन्या खरे तर कोणाचीही आवडती नव्हती. राजाला त्या यज्ञातून पुत्र हवा होता जो त्याला मिळाला पण त्या मागोमाग मुलगीही आली.
द्रौपदीच्या मते ती कधीच वडिलांची आणि त्याच्या प्रिय राणीची आवडती नव्हती.पहिल्यापासून ती उतावीळ आणि चौकस बुद्धीची होती. चोरून ऐकणे तिला आवडत होते .आपल्या भावाशी तिचे चांगले पटायचे.कृष्ण तिचा लहानपणापासूनचा सखा मित्र होता .कदाचित दोघेही सावळ्या रंगाचे म्हणून पटत असेल असे तिचे मत.
स्वयंवरात अर्जुनाने तिला जिंकले पण तिच्या मनात शेवटपर्यंत  कर्णच भरून राहिला.आपण कुंतीच्या सांगण्यावरून पाच पांडवाची पत्नी बनलो हे तिच्यासाठी धक्कादायक होते आणि तेव्हापासून कुंतीविषयी तिच्या मनात अढी बसली ती कायमचीच.दोघीही आयुष्यभर एकमेकांच्या वरचढ बनायचे प्रयत्न करीत राहिल्या.आपण जिंकून आणलेली स्त्री आपल्या भावांचीही पत्नी बनली याला कारणीभूत द्रौपदीच आहे असा ग्रह अर्जुनाने शेवटपर्यंत करून घेतला.
एका राजकन्येला लग्न झाल्यापासून काही वर्षे जमिनीवर फाटक्या चटईवर झोपावे लागले ,पती आणि सासूसाठी विस्तवावर जेवण बनवावे लागले. खांडववनातील जळणारा धूर आणि उडणाऱ्या राखेची चव घ्यावी लागली.
पण शेवटी तिला पाहिजे तसा महाल बनविला गेला आणि तिच्या मर्जीनेच त्याला मयसभा नाव दिले गेले.हा जादुई महाल म्हणजे तिचे सर्वस्व होते.
 पण तुझ्या हसण्यावर ताबा ठेव हा महर्षी व्यासाचा आणि महालात परक्याना आणू नकोस हा मयाचा सल्ला ती विसरली आणि महायुद्धाला एक कारण मिळाले.
पांडवांच्या इतर बायकांचा तिने मत्सर केला त्यावरून ती नेहमी पतींशी भांडायची. दरबारात ती कर्णाला शोधायची . भीम तिचा लाडका होता हे तिने कबूल केले . जो पती स्वतः द्यूतात हरला तो आपल्या पत्नीला कसा पणाला लावू शकतो असा प्रश्न तिने भर दरबारात विचारला.
वस्त्रहरणानंतर चालू झाले एक भयानक सूडनाट्य आणि याची नायिका ही द्रौपदीच होती. कुरुक्षेत्रावरील युद्धात ती आपल्या पतीच्या सोबत होती.व्यासांनी तिलाही दिव्यदृष्टी दिली होती आणि त्यातूनच तिला कर्णाचे जन्म रहस्य कळले होते.
आपल्या मनोगतात तिने स्त्री स्वभावाच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. सासू सुनेचे शीतयुद्ध,सवती मत्सर, पतींची तुलना अश्या गोष्टी ज्याचा आपण विचार केला नाही .
पुस्तकातील भाषा अतिशय साधी सहज नेहमीच्या वापरातील आहे. कुठेही अलंकारिक भाषा नाही .पांचाली आपल्या पतींना अरे तुरेच करते. इथे पांचाली महाराणी नाही तर एक स्त्री म्हणून आपले मनोगत सांगतेय .
एक वेगळे पुस्तक म्हणून नक्की वाचावे

No comments:

Post a Comment