Friday, May 7, 2021

जाणं..४

जाणं....४
आशा कोळीण आज खुश होती.बरेच दिवसांनी भरपूर मासळी कमी भावात मिळाली होती. त्यामुळे आज  धंदा जोरात होणार होता.आल्याआल्या तिने एक हलवा.. चार पापलेट ..बाजूला काढून ठेवली.
मालतीताई आल्या तर हलवा मागणार हे नक्की होतेच.म्हातारी मासे खाण्यात वस्ताद होती पण आशाशिवाय कोणाकडूनही मासे घेत नव्हती. तिच्याशी पैश्याची घासाघीस करायला नेहमीच आवडायचे. आशाला चार शिव्या दिल्याशिवाय मासे घ्यायची नाही . नंतर हळूच प्लास्टिकचा डबा पुढे करायची त्यात लाडू पुरणपोळी किंवा काहीतरी मिठाई असायचीच.
"तुला नाही... माझ्या नातीला देतेय.खबरदार तू हात लावलास तर ...."असा प्रेमळ दमही द्यायची.
आज हलवा पाहून ती खुश होणार हे नक्की.स्वतःशी हसत तिने वाटे लावायला सुरवात केली.काही वेळाने तिने पाहिले तर आज वंदनाताई एकट्याच येत होत्या.
" अरे मालतीताई कुठे गेल्या ...?? वंदनाताई आणि मालतीताई एकत्रच बाजारात येत ... खरे तर मालतीताईमुळे वंदनाताईना बाजार स्वस्त मिळे.
" ताई .... मालतीताई कुठे गेल्या ...?? आज एकट्या कशा...?? काय सुनेने हाकलले का म्हातारीला ....?? आशाने हसत हसत विचारले. 
वंदनाताईचा चेहरा रडवेला झाला .
"परवा रात्रीच ताई गेल्या. अचानक श्वास घ्यायला त्रास झाला. म्हणून ऍडमिट केले तर चार तासात कारभार  आटपला. काल पहाटेच अंत्यसंस्कार झाले.या आजारात कोणाला कळवूही शकत नाही.मलाही काल सकाळी कळले...." वंदनाताई अश्रू टिपत म्हणाल्या.
हे ऐकताच आशा सुन्न झाली. एका क्षणात तिला मागचे दिवस आठवले. आपल्या नातीला काय सांगावे हा प्रश्न तिला पडला.पदराने डोळे पुसत तिने हलव्याच्या तुकडा कापला आणि पानावर ठेवून समोरच्या झाडाखाली कावळ्यासाठी ठेवला. आता पुढचे दहा दिवस ती रोज एक तुकडा त्या कावळ्यांसाठी ठेवणार होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment