Sunday, May 9, 2021

येणं...३

येणं...२
"काय ग म्हातारे ...?? आलीस का देवाला लाच द्यायला.लॉकडाऊन आहे तरी तुला मोतीचुरचे लाडू कसे मिळतात ...."?? गणपतीच्या बंद दरवाजासमोर लाडूचा प्रसाद आणि हार ठेवणाऱ्या इंदूआतेला विक्रमने आवाज दिला तसा मी कपाळावर हात मारला.आता इथे विक्रमच्या कमीत कमी दोन पिढ्या खाली येणार हे नक्की.
"मेल्या आलास का इथेपण सतवायला.सगळे घरी बसलेत आणि तुम्ही दोघे इथे फिरतायत कसे...?? बरोबर आहे घरातील बायका किती वेळ सहन करणार तुम्हाला . संसार करतायत ते नशीब...." ती सत्तर वर्षाची इंदूआते आता चांगलीच चिडली आणि विक्रम बरोबर माझ्याही दोन पिढ्या खाली येणार हे विधीलिखित होते.
"आणि खबरदार.. देवाच्या पुढ्यातील लाडू घेतलास तर. हगवण लागेल .. या म्हातारीचा शाप आहे .." तिने विक्रमच्या मनातील भावना ओळखून शापवाणी उच्चारली आणि लाडवाच्या दिशेने पडणारी माझी पावले अडखळली.
"अरे पंधरा वर्षे झाली...माझ्या मुलाच्या घरात पाळणा हलला नाही .त्यासाठी दर मंगळवारी येते मी.. "ती हळवं होत म्हणाली.
"मग देव येणार का मदतीला .. ?? काही उपचार करा.हल्ली खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत.." विक्रम म्हणाला .
"नको त्या ट्रीटमेंट.. आमचा देव आहे पाठीशी "ती रागाने म्हणाली.
"चल तुला घरी सोडतो..."विक्रम तिचा हात धरत म्हणाला.तशी ती मुकाट्याने त्याच्यासोबत निघाली . 
दोन दिवसांनी रात्री अचानक  इंदूआतेचा मुलगा महेश घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.
"आईला बरे वाटत नाही..."
मी विक्रमला फोन केला आणि तो गाडी घेऊनच हजर झाला.आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केले.
इंदूआते कोरोना पोसिटिव्ह झाली हे ऐकून आम्ही चिंतेत पडलो पण विक्रम "ह्या ....त्यात काय ..?? योग्यवेळी घेऊन आलोय.होईल दोन दिवसात बरी.."असे बोलून औषधे आणायला गेला.
थोड्या वेळाने आम्ही घरी आलो.दुसरा दिवस टेन्शनमध्ये गेला.इंदूआते बरी होती पण रात्री तिची तब्बेत बिघडली आणि ऑक्सिजनवर गेली. पहाटे तर अशी वेळ आली की डॉक्टरने आम्हाला बोलावून घेतले .विक्रमशी हलक्या आवाजात डॉक्टरने चर्चा केली आणि मान हलवत पुन्हा आत निघून गेले.
"तयारी करायची का ...?? बंड्याला बोलावू का ..?? मी दबक्या आवाजात विक्रमला विचारले.
"गप रे.. म्हातारी आहे अजून .... तो माझ्यावर उखडला. डॉक्टरांनी निर्णय दिल्याशिवाय काही करू नकोस . चला निघुया .. काही झाले तर डॉक्टर फोन करतील .."असे म्हणताच आम्ही मुकाट्याने त्याच्या मागून निघालो.
दुपारी डॉक्टरचा फोन आला...तिची तब्बेत सुधारतेय ...हे ऐकून आम्ही उडालोच.हळूहळू तिची ऑक्सिजन लेव्हल वाढू लागली आणि पंधरा दिवसात ती नॉर्मलवर आली.
अजून काही दिवस विश्रांती घेऊन महिन्याभरात घरी आली .आम्ही चार दिवसातून एकदा तिची चौकशी करत होतोच .काही दिवसांनी ती पुन्हा हिंडू फिरू लागली आणि आज पुन्हा देवळात आली .
"म्हातारे आलीस का परत देवाला लाच द्यायला ...? बरी झालीस म्हणून आलीस धावत त्याला भेटायला ...?? किती जगशील ...?? आणि कोणासाठी ...?? विक्रमने नेहमीप्रमाणे खेचायला सुरवात केली. पण यावेळी इंदू आजी चिडली नाही उलट आमच्या हातावर एक एक मोतीचूरचा लाडू ठेवला .
"अरे माझ्यासाठी नाही.. तर माझ्या येणाऱ्या नातवासाठी मी आलेय आज.सुनबाईला चवथा चालू झालाय .त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर माझ्या कानाशी तुमची सून गरोदर आहे आताच मुलगा रिपोर्ट घेऊन आलाय असे कानाशी पुटपुटला आणि मी कष्टाने डोळे उघडले. किती आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. गेली पंधरा वर्षे ह्याच क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते.मग मनाशी निर्णय घेतला ..नाही ..आता हे आजारपण दूर करायला हवे मला सुनेची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घ्यायला हवी आणि त्यासाठी उठायलाच हवे. ते मनात ठेवूनच मी या आजाराशी झुंजत राहिले आणि शेवटी त्यावर विजय मिळवला.खरेच आज मी खुश आहे . आता बघत राहा माझ्या सुनेची कशी काळजी घेते मी .. चल लवकर घरी सोड मला.. खूप कामे खोळंबली आहेत.."ती  उत्साहाने बडबडत होती.
विक्रम हसला त्याने तिचा हात पकडला आणि मला डोळा मारून निघाला.
रात्री गच्चीवर आम्ही पुन्हा  भेटलो.
"इंदूआतेच्या  प्रकरणात तुझा किती सहभाग आहे ...??? उगाच का त्या म्हातारीला आशा दाखवतोयस...??त्या डॉक्टरला तूच काहीतरी सांगितलेस ना ..?? माझ्या प्रश्नाच्या फैरी चालू झाल्या.
"हो.. हो.. मीच त्या डॉक्टरला सांगितले म्हातारीच्या कानात सांग म्हणून. अरे तिची सून गेले वर्षभर आपल्या सईच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतेय. सई किती प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आहे हे तुला माहितीय. पण इंदूआतेला ही गोष्ट माहीत नाही. ती पडली धार्मिक आणि तिची सून विज्ञाननिष्ठ म्हणून या गोष्टी सर्वांच्या नकळत चालू होत्या. त्या दिवशी दुपारीच तिचा रिपोर्ट कळला तर इंदूआजी सिरीयस झाली. विचार केला आता जाणारच आहे तर ही बातमी सांगून टाकू तितक्याच सुखाने जाईल पण म्हातारी उठून उभी राहिली . याला म्हणतात जिद्द...."विक्रम डोळे पुसत म्हणाला 
"खरे आहे तुझे . अरे त्या बाईने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले आहे .किती प्रेम आहे तिला मुलांविषयी .आज तिच्या घरात पाळणा हलणार हे ऐकून तिने मृत्यूला ही पळवून लावले ..अशीच जिद्द सर्वांनी दाखवली तर या संकटातून आपण नक्कीच बाहेर पडू... मी विक्रमच्या पाठीवर थाप मारून म्हटले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment