ग्यारा ग्यारा
Gyaarah Gyaarah
साल 2001 उत्तराखंडातील एका छोट्या गावात दसरा उत्सव सुरू असतो. आठ वर्षाचा युग आर्य आणि सात वर्षाची आदिती तिवारी दोघेही जत्रेत फिरत असताना अदितीचे अपहरण होते. त्यानंतर पाच लाख खंडणी देऊनही तिचे प्रेत नदीत सापडते.
आज या गोष्टीला पंधरा वर्षे होतील.सरकारने पंधरा वर्ष पूर्वीच्या सगळ्या केसेस बंद करायचा कायदा काढला आहे .आदितीची आई अनेक वर्षे खऱ्या गुन्हेगारांचा शोध घ्यावा म्हणून लढतेय. आज युग आर्या पोलीस इन्स्पेक्टर झालाय.त्याने आदितीला एका स्त्रीसोबत जाताना पाहीले होते. तो आदिती प्रकरणाचा शोध घ्यायचा ठरवितो .त्याच्या हातात फक्त तीन दिवस आहे.तो सिनियर ऑफिसर वामीका रावतला पटवून देतो आणि त्या तीन दिवसात केस सोडवायचे ठरवितो.
2001 ला सबइन्स्पेक्टर शौर्य अंथवाल अदितीच्या केसवर काम करतोय. त्यावेळी वामीका नुकतीच पोलीस फोर्समध्ये जॉईन झाली होती आणि इन्स्पेक्टर शौर्य तिचा आदर्श होता. शौर्य प्रकरणाच्या मुळाशी जातोय असे वाटत असतानाच गायब होतो .
आज 2016 चालू आहे. रात्रीचे अकरा वाजून अकरा मिनिटे होतात आणि पोलीस स्टेशन मध्ये जुना व्हॉकीटॉकी वाजतो.युग आर्या तो उचलतो तेव्हा पलीकडून सब इन्स्पेक्टर शौर्य बोलत असतो .
हे कसे शक्य आहे ?? शौर्य अंथवाल तर 2001 ला गायब झालाय आणि आता तर 2016 चालू आहे.पण हे शौर्यला माहीत नाही.पण तो युग आर्याला ओळखतो आहे. त्याच्याच टिपवर तो जुन्या मिलमध्ये पोचलाय आणि आदिती मर्डर केस चे काही नवीन पुरावे सापडले आहेत असे सांगतो.पण एक मिनिट संपताच वोकीटॉकी बंद होतो.
हा काय प्रकार आहे .भूतकाळातील व्यक्ती वर्तमानकाळातील व्यक्तीशी कशी बोलू शकते.?
हे इथेच थांबत नाही .सब इन्स्पेक्टर शौर्य इन्स्पेक्टर युग आर्याशी 1990 आणि 1998 साली ही वेगवेगळ्या केसवर बोलतो . शौर्य आणि युग ज्याज्या वेळी वॉकीटॉकीवरून एकमेकांशी बोलतात त्यावेळी घड्याळात अकरा वाजून अकरा मिनिटे झालेली असतात आणि त्यांचे बोलणे फक्त एक मिनिटेच होणार असते.
हा सर्व गुंतागुंतीचा प्रकार जाणून घ्यायचं असेल तर झी 5 वर ग्यारह ग्यारह हिंदी सिरीज नक्की पहा.
ही सिरीज डेहराडून मसुरीच्या पार्श्वभूमीवर चित्रित केली आहे.
No comments:
Post a Comment